(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गद्रे मरीनचे उद्योगपती दीपक गद्रे

    त्यांनी बनवलेल्या माशांच्या विविध खाद्यपदार्यांच्या निर्यातीचा आकडा २५ हजार टनापर्यंत पोहचला आहे. त्यांची वार्षिक उलाढाल आहे ४२५ कोटी. गद्रे ब्रॅडने आता देशभर मेट्रोसिटीमध्ये ‘रेडी टू कूक अ‍ॅण्ड रेडी टू इट’ खाद्यपदार्थ दाखल केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या कारखान्यात माशांवर प्रक्रिया करण्यासाठी वापरलेल्या पाण्यापासून इंधनही बनवले जाते. त्यातून निघालेल्या मिथेन वायूचा उपयोग बॉयलरमध्ये इंधन म्हणून केला जातो.

  • इंग्लिश लेखक पी जी वुडहाऊस

    वुडहाउस यांच्या लिखाणावर खूश होऊन हॉलिवुडच्या एम.जी.एम्. या बड्या कंपनीने १९३० मध्ये त्यांना पटकथा लेखनासाठी खास कॉन्ट्रॅक्टवर तेथे आमंत्रित केलं. दर आठवड्याला दोन हजार डॉलर्स एवढा लठ्ठ पगार त्यांना मिळत होता.

  • रघुनाथराव पेशवे

    (१ ऑगस्ट १७३४ - ११ डिसेंबर १७८३)

    उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर असलेला एक पेशवा. पहिला बाजीराव व काशीबाई यांचा हा दुसरा मुलगा असून तो राघो भरारी, राघोबा, दादासाहेब इ. नावांनीही ओळखला जातो. त्याचा जन्म माहुली येथे झाला. बालपण छ. शाहूंजवळ गेले. लहानपणी हा उनाड होता. १७५३ पासून तो स्वतंत्रतेने स्वार्‍या काढू लागला. त्याची पहिली स्वारी १७५३ ते १७५५ पर्यंत चालली. तीत तो दिल्लीस गेला होता. या स्वारीत राजस्थानातून त्याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्याची दुसरी स्वारीही दिल्लीवरतीच झाली, पण १७५७ मध्ये अब्दाली दिल्लीहून अफगाणिस्तानात परत गेल्यावर मग हा दिल्लीस पोहोचला. तेथून तो दिल्लीच्या उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेत घेत अटकपर्यंत पोहोचला व काही मराठे घोडदळाच्या तुकडया तर पेशावरला जाऊन राहिल्या होत्या, पण हा काही कारण नसता १७५८ मध्ये पूण्यास परत आला. १७६० मध्ये भाऊसाहेब पानिपतमध्ये अडकले असता त्यांना साहय करण्यासाठी बाळाजी बाजीराव राघोबास घेऊन उत्तरेत जात होता. तेव्हा राघोबास निजामाला मदतीस आणण्यासाठी दक्षिणेत पाठविले, पण निजामाचे मन वळविण्याचा कोणताच प्रयत्न न करता हा दक्षिणेस स्वस्थ बसून राहिला.

  • स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार – वसंत गोविंद पोतदार

    वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले.पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले.

  • संगीत सूर्य केशवराव भोसले

    केशवराव यांचे वडील वैद्यकी करत. कोल्हापुरात भोसले वैद्य म्हणून ते परिचित होते. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी कोल्हापूर येथे झाला. पण लहानपणीच वडील वारले आणि घराचं घरपण नाहीसं झालं. चार चिमण्या जिवांची जबाबदारी आईवर पडली. दत्तू, केशव, नारायण आणि एक अगदी छोटी लहान बहीण. त्यांच्या आईला मोलमजुरीसाठी घराबाहेर पडणं भाग पडलं. त्यावेळी ‘स्वदेशी हितचिंतक’ नाटक कंपनीचा मुक्काम कोल्हापुरातच होता. ‘विद्याविलास’कार शंकरशास्त्री गोखले यांच्या मध्यस्थीने, त्यांची आई घरकामासाठी कंपनीत जाऊ लागली.

    आईबरोबर दत्तू आणि केशवही होतेच. दोन्ही मुलगे मोठे चुणचुणीत होते. कंपनीचे मालक जनुभाऊ निमकर यांनी त्या दोघांना वरकामासाठी कंपनीत ठेवून घेतले. त्यावेळी दत्तू नऊ वर्षांचा आणि केशव अवघा चार वर्षांचा होता.

    ‘स्वदेशी हितचिंतक’ नाटक मंडळी हे एक मोठं कुटुंबच होतं. कुटुंब प्रमुख जनुभाऊ मोठे व्यवहार कुशल आणि करड्या शिस्तीचे होते. व्यवसाय नाटकाचा असला तरी कंपनीचं वातावरण अगदी घरगुती होतं. कुठे नाटकाची तालीम सुरू आहे, कुणी आपली नक्कल पाठ करतो आहे, कुणी तंबोरा जुळवून रियाज करतो आहे, कोणी ताला-सुरात आपलं गाणं पक्क करतो आहे. अशा अनोख्या पण आवडत्या वातावरणात दत्तू आणि केशव तिथे रंगून जात होते.

    कंपनीतल्या मुलांना गाणं शिकवण्यासाठी दत्तूबुवा जांभेकर होते. दत्तूबुवा जांभेकर हे केशवरावांचे गानगुरू आणि जनुभाऊ निमकर हे नाट्यगुरू. इतर मुलांबरोबर केशव कंपनीत गाणं शिकू लागला. त्याची गाण्यातली चमक लक्षात यायला बुवाना वेळ लागला नाही. ‘हे पाणी काही वेगळं आहे’ अशी बुवांची खात्री पटली आणि बुवा त्याच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले.

    बालकलाकार म्हणून केशव हळूहळू रंगभूमीवर वावरू लागला. कधी त्याला स्त्री पात्राची भूमिका करावी लागत असे. तो प्रेक्षकांच्या प्रथम नजरेत भरला तो ‘शारदा’ नाटकातल्या ‘वल्लरी’च्या मिष्किल भूमिकेत. ते काम तो मोठ्या ठसक्यात करी. त्याचं कौतुकही होऊ लागलं.

    कंपनीचा मुक्काम पंढरपूरला होता. खेळ चालू होते. शनिवारचा कंपनीचा पेटंट खेळ ‘शारदा’ जाहीर झाला होता. गुरूवारपासून तिकीट विक्री चालू झाली होती. पण नाटकात ‘शारदे’ची भूमिका करणारा कृष्णा देवळी हा अचानक आजारी पडला. तो तापाने फणफणत होता. शनिवारचा खेळ रद्द करावा अशी बोलणी सुरू झाली. इतक्यात छोटा केशव जनुभाऊंसमोर येऊन धीटपणे म्हणाला, ‘खेळ बदलू नका, मी करतो शारदा! माझी नक्कल पाठ आहे.

    गाणी तयार आहेत! घ्या म्हणून हवी तर...’ तो एका दमात भराभर बोलत होता. मालक जनुभाऊ म्हणाले, ‘अरे वेड्या, एवढं मोठं काम तुला एकदम कसं झेपेल?’ त्यावर तो ताडकन म्हणाला, ‘मी खरंच करीन! एकदा पहा तर खरं! माझं काही चुकलं तर थोबाडीत मारा!’ जनुभाऊ कौतुकानं त्याच्याकडे बघू लागले आणि त्यांना एकदम काय वाटलं कुणास ठाऊक? मॅनेजर म्हैसकरना ते म्हणाले, ‘यादीत ‘शारदे’साठी केशवचं नाव टाका!
    दोन दिवस कसून तालमी झाल्या.केशव आनंदाने फुलून आला होता.

    शनिवार उजाडला. रात्री नाटकाचा पडदा वर गेला. जनुभाऊंच्या पायावर डोकं ठेवून केशव रंगभूमीवर गेला. स्टेजवर तो असा वावरत होता की जसं काही तो नेहमीच रोजचंच काम करत होता. शारदेच्या भूमिकेत तो सुरेल गायला आणि सुंदर दिसत होता. ‘मूर्तिमंत भीती उभी’ हे पद असं गायला की प्रेक्षकांतून ‘वन्समोअर’ वर ‘वन्समोअर’ मिळत होते. प्रेक्षक शारदेला रंगभूमीवरून आत जायलाच देत नव्हते. शेवटी जनूभाऊ स्टेजवर आले आणि केशवला जवळ घेऊन प्रेक्षकांना म्हणाले, ‘‘पोरगं लहान आहे, दमलं आहे. सांभाळून घ्या. क्षमा करा!’’ जनुभाऊंचे आणि प्रेक्षकांचेही डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्या दिवसांपासून केशव ‘हितचिंतक’ ‘रंगशारदा’ ठरला. वय होतं फक्त दहा वर्षे! साल होतं, १९०१!

    ‘शारदे’चं अपरंपार कौतुक झालं. प्रयोग रंगू लागले. पैशांचा पाऊस पडू लागला. उभ्या महाराष्ट्रात केशवरावांचं नाव झालं. सौभद्र, मृच्छकटिक, इत्यादी खेळ रंगू लागले. सुभद्रा, वसंतसेना केशवरावांकडेच आल्या. प्रेक्षक खेळांना गर्दी करू लागले. साहजिकच आपल्यामुळेच उत्पन्न भरपूर मिळतं. हे दत्तोबा आणि केशवराव यांच्या मनात यायला वेळ लागला नाही. कौतुक होत होतं. पण त्यांच्या हातात पैसे अधिक पडत नव्हते. आईला आता जास्त पैसे पाठवावेत, असं त्यांना वाटत होतं. पण ते जमत नव्हतं. जनुभाऊंकडे विषय काढला तरी ते लक्ष देत नव्हते. खूप धीर धरला, पण शेवटी एक दिवस सगळ्या मित्र मंडळींनी उचल खाल्ली आणि सगळेजण कंपनी सोडून बाहेर पडले.

    ‘जो पगार घेणार नाही तो मालक’ या तत्त्वावर नवीन कंपनी सुरू करण्याचं ठरलं. नोकरांपेक्षा मालकच जास्त! सुरूवातीला वीस-एकवीस मालक होते, पण कंपनी सुरू झाली तेव्हा दत्तोबा आणि केशवराव हे दोघे भाऊ, आणि वीरकर बेडेकर असे स्नेही मिळून सात आठ मालक झाले. कंपनीची स्थापना हुबळी मुक्कामी, सिद्धरूढ स्वामींच्या शुभाशीर्वादाने झाली. कंपनीचं नाव केशवरावांनी सुचवलं. ‘ललित कलादर्श नाटक मंडळी’ तो दिवस होता. एक जानेवारी १९१० आणि तेव्हा केशवराव होते अवघे अठरा वर्षाचे! त्या काळातली ‘ललित कलादर्श’ ही एकमेव नाटक मंडळी आज शंभर वर्षानंतरही भालचंद्र पेंढारकर यांच्या रूपाने कार्यरत आहे.

    सौभद्र, शारदा, गोपीचंद असे खेळ संस्था करत होती. पण कंपनीचा जम बस नव्हता. सावकार तगादा लावत होते. केशवराव जीव तोडून आपल्या भूमिका करत होते. कंपनी उत्तम चालवत होते, पण वर्षा, दोन वर्षातच, एकेका मालकाने अंग काढून घेतले आणि कंपनीची जबाबदारी दोघा भोसले बंधूंवर पडली.

    केशवराव नव्या नाटकाच्या शोधात होते. त्यांनी आ. रा. दोंदे यांचं ‘मदालसा’ आणि हिराबाई पेडणेकर यांचं ‘दामिनी’ अशी दोन नाटकं बाहेर काढली. पण, त्यांनी दम धरला नाही. हिराबाई या तत्कालीन ‘अकुलिना स्त्री’चं नाटक रंगभूमीवर आणून त्यांनी तत्कालीन सामाजिक प्रतिष्ठेचा आशयही साकार केला. याच सुमाराला त्यांनी वीर वामनराव जोशी यांचं ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक मिळवलं.

    २० सप्टेंबर १९१३ रोजी मुंबईत बॉम्बे थिएटरमध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. नाटकाचा विषय, आशय, याला पूरक असं सुसंग नेपथ्य, सिद्धहस्त कलाकार आनंद मेस्त्री यांनी दिलं होतं. प्रथमच इथे मराठी रंगभूमीला मखमली पडदा मिळाला. या नाटकातील केशवरावांच्या ‘मृणालिनी’च्या भूमिकेने आणि तेजस्वी गायनाने रसिक दिपून गेले. कंपनीवर पैशांचा पाऊस पडला. कर्ज तर फिटलेच पण गाठीशी पैसाही खूप आला. यावेळी मुंबई रसिकांनी आणि मित्र परिवाराने केशवरावांचा भव्य नागरी सत्कार करून त्यांना एक थैली अर्पण केली होती. या समारंभाला केशवरावांचे गुरू दत्तोपंत जांभेकर मुद्दाम आले होते. केशवरावांनी कृतज्ञतापूर्वक नम्रपणे त्यांना मिळालेली थैली गुरूचरणी अर्पण केली.

    तिथून पुढे केशवराव कंपनी घेऊन विदर्भाच्या दौऱ्यावर गेले, तेही स्पेशल ट्रेन घेऊन. ट्रेनवर फलक झळकत होता, ‘ललित कलादर्श नाटक मंडळी.’ त्याकाळी नाटक कंपन्या संस्थानिकांच्या राजे राजवाड्यांच्या आश्रयावर, सहाय्यावर चालायच्या. पण केशवराव आपल्या कंपनीचा उल्लेख, खास लोकाश्रयाखालील असा मोठ्या अभिमानाने करीत होते.

    ‘राक्षसी महत्त्वाकांक्षे’च्या जोडीला दुसरं नवं नाटक आणण्याच्या विचारात केशवराव होते. इतक्यात त्यांना ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगाचे हक्क मिळाले. याच वेळी बापूराव पेंढारकर त्यांना मिळाले. ‘मानापमान’ च्या तालमी जोरात सुरू झाल्या आणि ‘मानापमान’चा पहिला प्रयोग त्यांनी मुंबईत डिसेंबर १९१५ मध्ये बॉम्बे थिएटरमध्ये सादर केला. धैर्यधर (केशवराव) भामिनी (बापूराव पेंढारकर) आणि लक्ष्मीधर (दत्तोपंत भोसले)! खुद्द काकासाहेब खाडिलकर यांनी, ‘मला तुमचा धैर्यधर खूप आवडला!’ असं केशवरावांचं कौतुक केलं.

    ‘कर्ज फिटेपर्यंत कपाळाला गंध लावणार नाही’ असा केशवरावांनी पण केला होता. म्हणून ते गंध लावत नसत. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ आणि ‘मानापमान’ च्या अपूर्व यशानंतर ते नरसोबावाडीला गेले. दत्त हे त्यांचं दैवत. तिथे षोडशोपचारे पूजा केली. सहस्त्रभोजन घातलं आणि मंत्रघोषात आशीर्वाद घेऊन कपाळी केशरी गंध लावलं आणि मग पुण्याला परतले.

    पुढचा मुक्काम होता कोल्हापूर. वयाच्या चौथ्या वर्षी घर सोडल्यापासून जन्मभूमीत ते प्रथमच पाऊल टाकत होते. दोन महिन्याच्या मुक्कामात सौभद्र, शारदा, राक्षसी महत्त्वाकांक्षा, मानापमान अशा खेळांनी कोल्हापूर दुमदुमून गेलं. उत्पन्नही अफाट मिळालं. मिळालेला सारा पैसा त्यांनी दानधर्मात खर्च केला. आई अंबाबाईच्या मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवला. अनेक संस्थांना देणग्या दिल्या. कोल्हापूरला मिळालेला पैसा कोल्हापूर वेशीच्या बाहेर नेला नाही.

    मामा वरेकर हे नवे नाटककार आता ललित कलेला लाभले होते. त्यांची ‘हाच मुलाचा बाप’ आणि ‘संन्याशाचा संसार’ ही दोन नवी सामाजिक नाटके केशवरावांनी रंगभूमीवर आणली आणि त्यातून हुंडा आणि पतित परिवर्तन, अशा सामाजिक विषयांना त्यांनी कलारूप साकार केलं. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात पशू डॉक्टरचं काम, दामू अण्णा मालवणकर यांनी केलं होतं. प्रेक्षक त्यांच्यावर बेहद्द खूष झाले होते.

    गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्याबद्दल केशवरावांच्या मनात अतिव आदर होता. ललितकला नाट्य कंपनीचे ते गुरू! वझेबुवांची गायकी आक्रमक होती. त्यांना केशवरावांसारखा तडफदार आवाजाचा शिष्य लाभला.
    १९२१ हे ललितकलाचं वैभवाचं वर्ष होतं. केशवरावांच्या कारकीर्दीचं ते सोनेरी वर्ष होतं. पुण्यात किर्लोस्कर थिएटरमध्ये तेव्हाचं नाट्यसंमेलन भरलं होतं. या नाट्य संमेलनाचं यजमानपद ललितकलेकडे होतं. संमेलनाचा सर्व खर्च त्यावेळी केशवरावांनी केला होता. जमलेले सर्व रसिक संमेलनात, केशवरावांचं मनापासून कौतुक करीत होते.

    याच वर्षी, आप्पासाहेब टिपणीस यांचं ‘शहाशिवाजी’ हे नाटक केशवरावांनी १४ मे १९२१ रोजी रंगभूमीवर आणलं. शिवाजी महाराज प्रथम गायले ते याच नाटकात. केशवरावांचा ‘संगीत शिवाजी’ प्रेक्षकांना इतका पसंत पडला की खरा शिवाजी असाच दणदणीत गात असला पाहिजे, असे प्रेक्षकांना वाटू लागले.

    १९२० साली लो. टिळकांचं निधन झालं आणि देशाने गांधीजीचं नेतृत्व स्वीकारलं. गांधीजींनी लोकमान्य स्वराज्य फंडासाठी एक कोटी रूपयांचा संकल्प सोडला होता. या संकल्पामुळेच रंगभूमीवर एक अभूतपूर्व प्रयोग घडला. तो म्हणजे संयुक्त ‘मानापमान’चा! यात केशवराव धैर्यधर होते, तर बालगंधर्व भामिनी, इतर पात्रांची विभागणी करताना गणपतराव बोडस म्हणाले, ‘केशवराव, शिपाई ललितकलेतले आणा, चोर गंधर्व कंपनीत आहेत.’

    या प्रयोगाला त्यावेळी पहिले तिकीट होते १०० रूपये आणि पिटातले तिकीट होते पाच रूपये. प्रयोग केव्हाच हाऊसफुल्ल झाला होता. केशवरावांच्या तेजस्वी ताना आणि बालगंधर्वांच्या गळ्यातील गोडवा, यांनी रसिकांची मने तृप्त झाली. या प्रयोगानंतर रसिकांच्या पसंतीची टाळी केशवरावांच्या गाण्याकडे झुकलेली होती असे इतिहास सांगतो.

    या प्रयोगात खर्च जाऊन प्रत्येकी साडेचार हजार रूपये आले. कर्जबाजारी झालेल्या बालगंधर्वांना केशवराव म्हणाले, ‘दादा, कर्ज—कर्ज काय घेऊन बसलात? मनात आणलं तर असे प्रयोग करून कर्जाचे डोंगर आपण फेकून देऊ!’

    प्रयोगाच्या वेळी ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी सर्वप्रथम केशवरावांचा उल्लेख ‘संगीतसूर्य’ असा केला. ललित कलादर्श नाट्य संस्थेच्या रूपाने रसिकांचे ऋण मान्य करणे, मखमली पडद्याचे वास्तव नेपथ्य सुरू करणे आणि आपल्या मालकीची, आपण निर्माण केलेली, वाजती, गाजती आपली नाट्यसंस्था आपल्या कलेच्या वारसदाराकडे बापूराव पेंढारकरांकडे सोपवणं हे करायला मन केवढं मोठं असावं लागतं. कौटुंबिक वारसांचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. इथे ओढ होती ती रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या संस्थेच्या भवितव्याची!

    मराठी रंगभूमीवरच्या अनेक मूलभूत उपक्रमांचे केशवराव धनी होते.आणखी एक महत्त्वाचा केशवरावांनी राबवलेला उपक्रम म्हणजे नाटक ठरल्यावेळी घड्याळाच्या ठोक्याला सुरू करण्याचा. केशवरावांच्या ललितकलाच्या नाटकाच्या तिकिटावर ‘रात्री नऊ’चा आकडा छापलेला असे. याचा अर्थ, नाटक रात्री नऊच्या ठोक्यालाच सुरू होणार.

    यासंबंधी एक आठवण सांगितली जाते. एकदा एका संस्थानात ललितकलाच्या नाटकाचा प्रयोग होता. वाड्यावरून निरोप आला की, ‘राजेसाहेब नाटकाला येणार आहेत, तेव्हा प्रयोग अर्धातास उशिरा म्हणजे साडेनऊला सुरू करावा.’ केशवरावांनी ठरल्या वेळी नऊ वाजता तिसरी घंटा दिली आणि नांदी सुरू केली. केशवरावांच्या तेजस्वी तडफदार आवाजात प्रेक्षकांना त्या दिवशी अर्धातास नांदी ऐकायला मिळाली.

    महाराज साडेनऊला आले. तोपर्यंत नांदी चालू होती आणि नांदी संपल्यानंतर साडेनऊला नाटक सुरू झाले.
    पुढे ‘माझा सूर ज्या क्षणी कमी होईल, त्याक्षणी मला मृत्यू यावा’ असा संकल्प केशवरावांनी केला आणि त्यांना ताप येऊ लागला. त्याही अवस्थेत त्यांनी बालगंधर्वासोबत ‘सौभद्र’ नाटक केलं पण ताप त्यांचा पिच्छा सोडेना. अखेर तो टायफॉईड ठरला आणि ४ ऑक्टोबर १९२१ रोजी या केशव भोसले नावाच्या संगीतसूर्याचा अस्त झाला. केशवराव नावाचं तुफान शांत झालं.

    वामन काळे
    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • पार्श्वगायक किशोरकुमार

    किशोरदाने आपल्या मिश्किल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमिकांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन व संगीताच्या तालावर थिरकणे या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोर नी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली.

  • जेष्ठ संगीतकार अनिल विश्वास

    भारतीय संगीताच्या इतिहासात अनिलदा म्हणजेच अनिल विश्वामस या बंगाली संगीतकाराचं नाव ठळकपणे कोरलं गेलंय. त्यांचा जन्म ७ जुलै १९१४ रोजी बंगालमधील बरिसाल येथे झाला.

    अनिल विश्वास यांच्या दर्जेदार संगीतानं लाखो श्रोत्यांना तृप्त केलं. अनिल विश्वाास नसते, तर मुकेश आणि तलत महेमूद यांचा हृदयाला भिडणारा आर्त स्वर आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता. हिंदी चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून अनिल विश्वास ओळखले जातात. ते स्वतः उत्तम गायक होते, संगीतकार तर होतेच, पण एक अभिनयाची जाण असलेले उत्तम अभिनेताही होते. तसंच ते तबला अतिशय उत्कृष्ट वाजवत.

    अनिल विश्वास यांच्यामध्ये संगीताची गोडी त्यांच्या आईमुळे निर्माण झाली. वयाच्या चवथ्या वर्षांपासून ते गायला लागले. त्यांची आई यामिनीदेवीचा आवाज खूपच सुरेल होता. ती स्वतः संगीतरचनाही करत असे. अनिल विश्वास यांचे वडील कामानिमित्त नेहमी बाहेर असत, त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोला संगीत शिकण्याची मोकळीक दिली होती. याच कारणानं घरात नेहमी संगीतमय वातावरण असे. अशा वातावरणात अनिल विश्वास संगीताकडे ओढले जाणार नाहीत तर नवलच! आईनं लावलेला हाच संगीताचा वेलु पुढे बहरणार होता. एखादी रचना एकदा कानावर पडली, की ती जशीच्या तशी त्यांना पुन्हा गाता येत असे. त्यांची ग्रहणक्षमता कमालीची होती. कुठलीही गोष्ट ते क्षणात आत्मसात करत. त्यामुळे आसपासचे लोक अवाक् होत आणि त्यांना ‘श्रुतीधर’ म्हणत.

    संगीत शिकताना पुढे आईशिवाय अनिल विश्वास यांना कालीप्रसन्न नट आणि लालमोहन गोस्वामी हे दोन गुरू मिळाले. पुढे त्यांनी महफिलींमध्ये गायला सुरुवात केली. पण गायकापेक्षा त्यांची ओळख संगीतकार म्हणून होत गेली. अनिल विश्वास यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. संगीताची समग्र समज त्यांना होती. बरिसालमध्ये त्यांना संगीताची आवड निर्माण झाली आणि कलकत्यामध्ये ती अधिक परिपक्व होत गेली. बरिसालप्रमाणेच कलकत्यातल्या महफिलींमध्ये अनिल विश्वास नसतील, तर ती महफिल अधुरी वाटे.

    अनिल विश्वास यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाएकाचं शिष्यत्व त्यांनी कधीच पत्करलं नाही. एका साच्यात त्यांनी स्वतःला कधी ठेवलं नाही. त्यामुळे अमुक एका घराण्याचा शिक्का त्यांच्यावर बसला नाही. ज्या कोणाकडून शिकायला मिळेल, तिथून ते शिकत. अगदी वेश्या, नाचणार्यां च्या कोठ्यावर देखील त्यांची पावलं संगीत ऐकण्यासाठी वळली. संगीतक्षेत्रातल्या संधी त्यांच्यासमोर येत गेल्या आणि ते स्वीकारत गेले. अनिल विश्र्वास कविताही करत. वयाच्या १४ व्या वर्षापासून ते संगीत समारोहात गात असत.

    वयाच्या १६ व्या वर्षी त्या वेळचे कलकत्त्यामधले थोर बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडे आश्रय घेतला. पन्नालाल घोष यांचा विवाह अनिल विश्वास यांची बहीण पारोल घोष हिच्यासोबत झाला होता. अनेक दिवस त्यांनी शिकवण्या घेतल्या. तसंच मेगा फोन रेकॉर्ड कंपनीत त्यांनी काम केलं. १९३० मध्ये अनिल विश्वादस कलकत्यातल्या रंगमहल थिएटरबरोबर अभिनेता, गायक सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायला लागले. रंगमहल थिएटर हे कलकत्यामधलं सर्वश्रेष्ठ असं थिएटर होतं. कलकत्यामध्ये एक निहार नावाची वेश्या होती, तिला ते बहीण मानत. ती त्यांना रंगमहल थिएटरमध्ये घेऊन गेली आणि इथून त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. इथूनच त्यांच्यातला गायक, संगीतकार, कवी, अभिनेता बहरत गेला आणि त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला.

    संगीतक्षेत्रात लोक त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेऊ लागले. त्याच वेळी ते हिंदूस्थान रेकॉर्डिंग कंपनीबरोबरही जोडले गेले. तिथेच त्यांची कुंदनलाल सहगल आणि सचिन देव बर्मन यांच्याबरोबर भेट झाली. अनिल विश्वास व लता मंगेशकर हे एक समीकरणच होतं. १९४७ नंतर, लता मंगेशकर यांच्या आवाजाने अनिल विश्वास यांच्या संगीतात मुक्त संचार केला. ‘प्रीतम तेरा मेरा प्यार’ (गजरे), ‘याद रखना चाँद तारो’ (अनोखा प्यार), ‘मन में किसी की प्रीत बसले’ (आराम, ‘आए थे धडकन लेकर दिल में’ व ‘इस हंसती गाती दुनिया में’ (लाजवाब), ‘हंसले गाले ओ चाँद मेरे’ व ‘मस्त पवन है चंचल धारा’ (जीत), ‘क ैसे कह दूँ बजरिया के बीच’ (लाडली), ‘मोसे रूठ गयो मेरा सांवरिया,’ व ‘बेईमान तोरे नैनवा (तराना), ‘जा मैं तोसे नाही बोलूं’ (सौतेला भाई) इत्यादींसारखी अनेक हृदयस्पश्री गीतं अनिल विश्र्वास श्रेष्ठत्व ठरविण्यास पुरेशी ठरतात.

    भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा अतिशय कुशल प्रयोग त्यांनी चित्रपटसंगीतात केला आणि भारतीय चित्रपटसंगीताला एक दर्जेदार संगीताचा मान मिळवून दिला. त्यांना ऑकेस्ट्राचं जे वेड होतं, त्यामुळेच त्यांनी बॅले संगीतावर उल्लेखनीय काम केलं. त्यांनी उर्दु गजलांचा अनुवाद बंगाली भाषेत केला. तीन दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी संगीताच्या जगात त्यांनी आपला ठसा उमटवला. १९३१ बोलपटांचा जमाना सुरू झाल्यानंतर, चित्रपट संगीताला नवी दिशा देणार्‍या त्यातही, शास्त्रीय व लोकसंगीताचा सुरेख वापर वेळोवेळी करणार्‍या अनिल विश्वास यांनी आपल्या यशस्वी संगीत कारकिर्दीत जवळपास ९५ चित्रपटांना उत्तम संगीत दिलं.

    मिलन, ज्वारभाटा, लाडली, अरमान, अनोखा प्यार, आरजू, छोटी छोटी बाते, सौतेला भाई या चित्रपटांचं संगीत अजरामर आहे. अनिल विश्वास यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मुकेश, तलत महेमूद, लता मंगेशकर, बेगम अख्तर, मीना कपूर आणि अमीरबाई कर्नाटकीसारख्या एकूण ७६ गायकांनी गाणी गायली. नाट्यसंगीत आणि भक्तीसंगीताचीच त्या वेळी मक्तेदारी होती, अशा वातावरणात ती चौकट भेदून अनिल विश्वास यांनी संगीताला खरं भारतीय व्यक्तित्व दिलं. अखिल भारतीय स्तरावर संगीताला वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. चित्रपटसंगीताच्या क्षेत्रातून निवृत्ती घेउन अनिल विश्वास दिल्ली आकाशवाणीत रुजू झाले. तिथे त्यांनी १९६३ ते १९७५ या कालावधीत काम केलं. १९८६ साली त्यांना संगीत क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवलं गेलं. या काळात एक नॅशनल ऑर्केस्ट्रा बनवण्याच्या विचारानं त्यांना झपाटलं होतं. पण थंड सरकारी यंत्रणेकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यानं ती योजना तशीच बारगळली.

    दिल्ली आकाशवाणी वर अनिल विश्वास यांनी नरेंद्र शर्मां यांच्या रचना मन्नाडेंच्या आवाजात गाऊन घेतल्या. त्यातली ‘नाच रे मयुरा’ ही शास्त्रीय बंदिश इतकी श्रवणीय आहे की त्या काळी ती खूपच गाजली होती. ते जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातही संगीत सल्लागार म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी संगीताचे वर्गही चालवले. हम लोग’, बैसाखी’, ‘फिर वही तलाश’ सारख्या उत्कृष्ट टीव्ही मालिकांनाही त्यांनी संगीत दिलं.

    ‘हम लोग’चं शीर्षक गीत आजही सगळ्यांना आठवत असेल, आईए हाथ उठाये हम भी’ या ओळींची रचना केली होती फैज यांनी. या एक ओळीला दिलेलं संगीत आणि त्यामागचा कोरस आजही विसरता येत नाही. तसंच अनिल विश्वास यांनी ‘गजलेर रंग’ हे गजलवर आधारित बंगाली भाषेत एक पुस्तकही लिहिलं.

    ‘गजल’ या विषयावरचं त्यांचं संशोधन खूपच महत्त्वपूर्ण आहे. अनिल विश्वांस यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना सन्मानित केलंच, पण मध्यप्रदेश सरकारनेही त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं गौरवलं. अनिल विश्वास यांचे ३१ मे २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • वसंत तांबे

    वसंत तांबे हे रा.स्व. संघाचे सक्रिय कार्यकर्ते आणि अर्थात जुनेजाणते आधारस्तंभ. १९८७ ते १९९७ अशी १० वर्षे त्यांनी सांभाळलेली मुंबई महानगर कार्यवाहपदाची जबाबदारी, कोकण प्रांताचे प्रचार विभागप्रमुख म्हणून केलेले काम, विश्व संवाद केंद्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्थांच्या उभारणीतला सहभाग अशा कामांतून संघाला त्यांनी दिलेले योगदान मोलाचे होते.

    तांबे यांचे लहानपण पुण्यात गेले. तेव्हापासून ते संघाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर असलेल्या तांबे यांनी मुंबईत आल्यानंतरही आपले कार्य सुरूच ठेवले. नायगाव नगराचे संघचालक म्हणून, मुंबई महानगर कार्यवाह म्हणून त्यांनी इथे कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. सगळ्यांचे ऐकून घेऊन, सगळ्यांना एकत्र घेऊन संघटना उभी करण्याचे कसब, उत्तम वक्ता आणि संवादक असलेल्या तांबे यांच्या ठायी होते.

    वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाला आकार देण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्या काळात मुंबईच्या नायगावातील त्यांचे घर कार्यकर्त्यांसाठी केंद्रच बनले होते. आदिवासी मुलांना मुंबईत आणणे, त्यांना शिकवणे, मुंबई फिरवणे वगैरे कामे ते करत. महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार होता. १९९५च्या सुमारास उभ्या राहिलेल्या विश्व संवाद केंद्राच्या कामात, तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उभारणीतही त्यांनी आपल्या विचारांचे योगदान दिले होते.

    महिलांच्या राजकीय कामांमध्ये सहभागी करून घेण्याबाबतच्या त्यांच्या सकारात्मक विचारांची दखल संघाकडून अखिल भारतीय स्तरावरही घेतली गेली. १९९३ साली किल्लारीच्या भूकंपामधील नुकसान त्यांनी आपल्या परीने भरून काढण्याचा प्रयत्न केला. जनकल्याण समितीच्या वतीने तेथील भूकंपग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांची डिझाइन्स त्यांनी तयार केली. त्यांचे अलीकडचे महत्त्वाचे काम म्हणजे, त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी' ही संस्था. तिचे काम आज राष्ट्रीय स्तरावर सुरू असून अनेक निवृत्त लष्करी अधिकारी त्यात कार्यरत आहेत.

    वसंतरावांचे वैयक्तिक आयुष्य साहित्य, संगीत यांनी समृद्ध होते. ते उत्तम तबलावादक होते. शास्त्रीय संगीताचे दर्दी होते. 'विचार करण्यासारखे काही', 'ज्येष्ठपर्व', 'प्रश्न प्रश्न प्रश्न', 'दक्षिण दिग्दर्शन' ही पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांचे लेखनकार्यही अखेरपर्यंत सुरू होते.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • चन्द्रशेखर मोरेश्वर टिळक

    चन्द्रशेखर टिळक हे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडमध्ये (एनएसडीएल) कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. गेली १३ वर्षे ते ‘एनएसडीएल’मध्ये कार्यरत आहेत, त्याशिवाय त्यांनी मुंबई शेअर बाजारात ८ वर्षे, सेबीमध्ये २ वर्षे आणि इंडसेकमध्ये २ वर्षे अशी गुंतवणूक क्षेत्रांशी संबंधीत नोकरी केली आहे. १ एप्रिल १९९२ साली त्यांची सेबीवर प्रतिनियुक्ती झाली. भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसमधुन प्रतिनियुक्तीवर जाणारे सर्वात तरूण आणि पहिले महाराष्ट्रीय अधिकारी आहे. अनेक अर्थिक घोटाळ्यांची त्यांनी तपासणी अधिकारी म्हणून तपासणी केली आहे.

  • जेष्ठ संगीतकार यशवंत देव

    यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
    यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे झाला. आजतागायत अनेक नाटके आणि चित्रपटासाठी गाणी लिहिली, संगीत दिले. त्याचप्रमाणे बालकविता, विडंबन, विनोदी काव्यप्रकारही लिहिले. यशवंत देवांनी हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज संगीतकार अनिल विश्वास यांना आपले गुरू मानले होते. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.

    यशवंत देव जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवीसुद्धा आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. जीवनात ही घडी अशीच राहू दे, श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे, अशी धरा असे गगन कधी दिसेल का?, कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे, तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी, अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात, अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा....अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी, तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत. मा.यशवंत देवांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते. चिंतनशील कलाकार असणारे यशवंत देव एका फार मोठय़ा सांगीतिक कालखंडाचे साक्षीदार आहेत. स्वत:सोबत अनेकांची कारकीर्द घडताना त्यांनी जवळून पाहिली आहे. १९५१ मध्ये ते सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले.

    लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात पुढे येत होती. हे सर्व देवांना जवळून बघायला मिळाले. एच. एम. व्ही. च्या नोकरीने देवांना अनुभवसमृद्ध केले. देव साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना लाभला होता. म्हणूनच ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची गाणी विलक्षण गाजली.

    एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नाहीत. तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगतात. त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर. (तेव्हाच्या सुमन हेमाडी!) त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली.

    या गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी होती, हेही देव विशद करताना म्हणतात, ‘गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दांतच ते दडलेले असतात हे जाणवलं. शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य विजेसारखं डोळ्यांसमोर आणि डोक्यात चमकलं!’’ म्हणूनच पुढच्या काळात देवांचं ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असतात. यातूनच ‘शब्दप्रधान गायकीचे उद्गाते’ हे बिरूद त्यांना बहाल झालं. 'दिवस तुझे हे फुलायचे', 'पाऊस कधीचा पडतो', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'क्षितिजावर खेळ विजेचा' अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, 'प्रिया आज माझी', 'स्वर आले दुरुनी', इ. गीतांचे कवी, 'शब्दप्रधान गायकी', 'रियाजाचा कानमंत्र', 'कृतज्ञतेच्या सरी', 'पत्नीची मुजोरी' अशा अनेक पुस्तकांचे लेखक मा. ‘प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव’ हे अशोक चिटणीस यांनी पुस्तक लिहिले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट