(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • एक अभिमानास्पद मित्र – डॉ. अब्दुल कलाम

    एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी जगप्रसिध्द शास्त्रज्ञ व आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी जगाचा निरोप घेतला. माझ्या या अभिमानास्पद मित्राला अंत:करणापासून श्रध्दांजली.

    बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे विशाल सभागृह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने ओसंडून वाहत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम मंचावर येऊन उभे राहिले आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून अख्खे सभागृह डोक्यावर घेतले. वातावरण चैतन्याने अक्षरशः भारून जाणे म्हणजे काय असतं हे प्रत्येकाने अनुभवण्यास सुरवात केली. मंचावरील सर्व मंडळी आसनांवर स्थानापन्न झाल्यावर व दीपप्रज्वलन, प्रास्ताविक इ. उपचार आटोपल्यानंतर कलाम साहेब बोलण्यास उभे राहणार एवढ्यात ध्वनिक्षेपण यंत्रणा अचानक बंद पडली आणि आयोजकांचे धाबे दणाणले व यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी धावपळ सुरु झाली. मी पहिल्या रांगेत बसलो होतो व सर्व घडामोडी मला अगदी जवळून बघायला मिळत होत्या. मला वाटलं, ते आयोजकांजवळ नाराजी व्यक्त करतील, पण तसं न घडता त्यांनी खाणाखुणा करून यंत्रणा नियंत्रित करणाऱ्या माणसाचे स्वतःकडे लक्ष वेधले आणि ती कशी दुरुस्त करायची हे त्याला समजावून सांगितले. काही क्षणातच ध्वनिक्षेपण यंत्रणा सुरु झाली आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली. विलक्षण प्रेरणादायक असलेलं ते भाषण टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात संपलं आणि राज्य मंत्री मंडळातील काही मंत्री व बारामतीतील अतिविशिष्ठ व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी कलाम साहेब त्या परिसरातील अतिथीगृहाकडे रवाना झाले.

    कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मिटींग सुरु होण्यास काही मिनिटं राहिली असताना मी तिथे पोहोचलो. सभागृह अनेक अतिविशिष्ठ मंडळींनी गजबजून गेले होते. डॉ. कलामांना मी स्वतःची ओळख करून देऊन भेटीचा उद्देश सांगताच त्यांनी माझा हात धरून त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवून घेतले. ‘तुमची मिटींग आटोपल्यावर आपण बोलू’ असं मी म्हणताच ते म्हणाले ‘या मिटींगपेक्षा आपल्या चर्चेचे विषय मला जास्त महत्त्वाचे वाटतात कारण त्यांचा संबंध थेट आपल्या शेतकरी बांधवांशी आहे.’ विजेच्या वापराशिवाय सिंचन, स्वयंपूर्ण खेडी, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवर मला अनेक प्रश्न विचारून ते थांबले नाहीत तर त्यावर तयार केलेल्या नोट्स तिथेच वाचून त्यांनी उपस्थित मंत्र्यांना काही प्रश्नही विचारले. संसद भवनावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मी तयार केलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या आराखडयावरही आमची चर्चा झाली. पाच मिनिटात संपेल असं वाटणारी चर्चा तब्बल वीस मिनिटे झाली तरी सुरूच होती. उपस्थितांमध्ये वाढू लागलेली अस्वस्थता बघून मी कलाम सरांचा निरोप घेण्याची तयारी करताच त्यांनी मला चहा घेण्याची व मान्यवरांच्या मिटींगमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी वस्तुस्थिती कथन करताना विलक्षण खिन्नतेने त्यांचा चेहरा झाकोळून गेला होता व डोळे पाणावले होते. भारतासारख्या देशाचा एक राष्ट्रपती किती संवेदनशील असू शकतो हे बघून मी थक्क झालो.

    मिटींग संपल्यानंतर चर्चेनंतर उपस्थितांची फोटो सेशनसाठी लगबग सुरु झाली. आम्ही सर्वांनी फोटोसाठी पोझ दिली, पण कॅमेऱ्याने फोटो काढण्यास नकार दिला आणि आयोजकांना घाम फुटला. ग्रुपमध्ये माझ्या शेजारी उभे असलेले कलाम साहेब शांतपणे फोटो काढण्याची धडपड करणाऱ्या तरुणाकडे गेले, कॅमेऱ्याचं निरीक्षण करून त्याच्याशी काहीतरी बोलले आणि पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये येऊन सुहास्य वदनाने उभे राहिले. त्यांचा विलक्षण साधेपणा व निगर्वीपणा बघून मी थक्क झालो असतानाच फोटो सेशन संपले व पुन्हा लवकरच भेटण्याचे ठरवून आम्ही एकमेकाचा निरोप घेतला.

    ज्यांच्या भेटीने उभ्या आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना निर्माण व्हावी, ज्यांच्या विलक्षण प्रेरणादायी पण तितक्याच सध्या व्यक्तिमत्त्वाने भारून जावे, आदर्शांचा दुष्काळ पडलेल्या या देशात ज्यांचा आदर्श जिवापाड जपून एखादे महान कार्य उभे करण्याची प्रेरणा मिळावी असे थोर शास्त्रज्ञ, लेखक, कवी, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आज आपल्यात नसले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेरणादायक स्मृती आपल्या देशातील तरुणांना सतत प्रेरित करत राहतील. या महामानवाला माझी अंत:करणापासून श्रद्धांजली.

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • ज्येष्ठ निर्माता शेखर ताम्हाणे

    सविता दामोदर परांजपे’, ‘तू फक्त हो म्हण’, ‘नकळत सारे घडले’ या सारखी नाटके शेखर ताम्हाणे यांनी लिहिली. तसेच त्यांनी ‘कलकी’, ‘ट्रॅक’ यासारख्या गाजलेल्या मालिकाचे लेखन केले होते.त्यांची ‘आगंतुक’ कादंबरीचा पण गाजली होती.

  • डॉ. अविनाश जोशी

    हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत वर्ध्याचे अविनाश जोशी डॉक्टर झाले. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून सेवा देत असताना त्यांना पालक आणि मुलांच्या समस्या जाणवल्या. त्यावर उपाय म्हणून त्यांनी गतिमंदांसाठी 'मे फ्लॉवर' शाळेचे नंदनवन फुलविले. विशेष शाळा सुरु केली. शेकडो आयुष्ये सावरली. समाजात 'बुद्धी' विषयी जनजागृती व्हावी म्हणून 'म्युझियम ऑफ ब्रेन अॅण्ड माइंड' हा उपक्रम सुरु केला. मानसिक रुग्णांच्या वैवाहिक आयुष्याचा डाव अर्ध्यावरती मोडू नये, म्हणून त्यांनी आता ऑनलाइन मॅरेज ब्युरो सुरु केला आहे...

    'मे फ्लॉवर्स' चे नंदनवन

  • भारतीय सिनेमाची ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी

    मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लीम परिवारात झाला. आधीच खुर्शीद नावाची मुलगी असल्याने मुलगा व्हावा, अशी तिच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. पण मुलगी जन्माला आल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यावेळी तर त्यांच्याकडे डॉक्टरांचे बिल देण्यासाठीही पुरसे पैसे नव्हते. म्हणून जन्मल्यानंतर लहानग्या महजबीनला मुस्लीम समाजाच्या अनाथालयात सोडण्याचे तिच्या जन्मदात्यांनी ठरवले. मात्र अनाथालयाच्या पायरीवर तिला सोडून जात असताना ऐनवेळी तिच्या वडिलांचे हृदयपरिवर्तन झाले आणि माघारी परतून महजबीनला छातीशी घट्ट कवटाळले. तसेच जमेल तसे तिचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला.

    मीना कुमारी यांना कलेचा वारसा तिच्या आई-वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट तसेच पारसी रंगभूमीवरील एक कलाकार होते. काही चित्रपटांत संगीतकार म्हणूनही त्या काळी त्यांनी काम केले होते. आई इक्बाल बानो, पूर्वाश्रमीची प्रभावती देवी ही एक प्रसिद्ध नृत्यांगना होती. कामिनी या नावाने ती रंगभूमीवर अभिनय करत असे. पंडित रवींद्रनाथ टागोर यांच्या परिवाराशी त्यांचे जवळचे नातेसंबंध होते. मीना कुमारीला यांच्या परिवारात त्यांना ‘मुन्ना’ या नावाने संबोधले जात असे. चौथ्या वर्षापासूनच तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. विजय भट्ट यांचा ‘लेदर फेस’ हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. खरंतर त्यांना शिकायची खूप इच्छा होती. पण चित्रपटांत अभिनय करून त्यांना लहानवयातच कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. अधुरी कहानी, फरजद ए हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशासारख्या वीस चित्रपटांत त्या बाल कलाकार ‘बेबी मीना’ म्हणून चमकली. नायिका म्हणून अभिनय केलेला ‘बच्चों का खेल’ हा पहिला चित्रपट. त्यावेळी मा.मीना कुमारी अवघी चौदा वर्षाची होती. सुरुवातीला त्यांनी पौराणिक चित्रपटांतून अभिनय केला. नर्गिस, निम्मी, सुचित्रा सेन, नूतनसारख्या नव्या दमाच्या अभिनेत्रींचा तो काळ होता. ‘महल’ या चित्रपटाच्या यशानंतर एका चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक कमाल अमरोही यांना तिने अभिवादन केले असता त्यांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. मा.मीना कुमारी नायिका म्हणून यशस्वी ठरल्यानंतर कमाल अमरोही यांच्याकडूनच तिला त्यांच्या ‘अनारकली’ चित्रपटात काम करण्याबाबतचा प्रस्ताव आला. मागील अनुभव चांगलाच लक्षात असल्याने मा.मीना कुमारीने प्रस्ताव नाकारला. त्यामागचे कारण समजल्यानंतर कमाल अमरोही यांनी समक्ष भेटून तिचा गैरसमज दूर केला. त्यानंतर मीना कुमारीने सदर चित्रपट करण्यासाठी होकार दिला. दरम्यानच्या काळात मीना कुमारी यांना अपघात झाला. तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्या कालावधीत कमाल अमरोही तिला ससून हॉस्पिटलला नियमित भेटावयास येत असत. ‘अनारकली’ चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेबाबत तिने अमरोही यांना विचारले असता तिच्या हातावर ‘मेरी अनारकली’ असे लिहीत. त्या भूमिकेसाठी अन्य कुणाच्या नावाचा विचारही करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अपघातात हाताला इजा झाल्यामुळे मीना कुमारीला कायमस्वरूपी बँडेड लावावे लागले. साडी अथवा ओढणीत तो हात तिला लपवावा लागत असे. पुढे ‘अनारकली’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होऊनही आर्थिक बाबींमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. मात्र त्या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अमरोही यांना मा.मीना कुमारी ‘चंदन’ तर अमरोही तिला ‘मंजू’ या नावाने संबोधत असत. वडिलांच्या संमतीशिवाय निकाह करण्यास मीना कुमारी तयार नव्हती. आधी लग्न करू आणि मग घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांची संमती मिळवू, असे अमरोही यांनी पटवून दिल्याने मा.मीना कुमारी राजी झाली. १४ फेब्रुवारी १९५२ रोजी मीना कुमारीला वडिलांनी तिची लहान बहीण महलिकासह फिजिओथेरपी उपचारासाठी एका दवाखान्यात सोडलेले असताना रात्री ८ ते १० वाजताच्या दरम्यान प्रथम शिया आणि सुन्नी पद्धतीने मोजक्या साक्षीदारांसह दोघांचा निकाह झाला. पुढे वडिलांना समजल्यावर ते संतापले. तलाक व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी दोघांच्या भेटीगाठींवर निर्बंध आणले. मीना कुमारी यांना पती, कमाल अमरोहीच्या ‘डेरा’ चित्रपटात अभिनय करायची इच्छा होती. मात्र अली बक्ष यांनी मेहबूब खान यांच्या ‘अमर’ या चित्रपटात अभिनय करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. त्या चित्रपटाचे चार-पाच दिवसांचे चित्रीकरण झालेले असताना मेहबूब खान यांच्याशी मतभेद झाल्याने मीना कुमारी ‘अमर’ चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट सोडून पती कमाल अमरोही यांच्या ‘डेरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघून गेली. या कारणामुळे वडिलांनी रात्री घरात न घेतल्याने पयार्याने मा.मीना कुमारी यांना कमाल अमरोही यांच्या घरी जावे लागले. मा.अमरोही यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये होती. त्यामुळेच खूप इच्छा असूनही मीना कुमारीला मूल होऊ न देण्याचा निर्णय त्यांचेकडून तिच्यावर लादला गेला.

    परिणिता, दिल अपना और प्रीत पराई, दायरा, एक ही रास्ता, शारदा, दिल एक मंदिर, साहिब बिवी और गुलाम, काजल, फूल और पत्थर हे मा.मीना कुमारी यांनी अभिनय केलेले काही उल्लेखनीय चित्रपट. ‘परिणिता’ या चित्रपटापासून तिला भारतीय नारीच्या भावुक भूमिकाच मिळत गेल्या. फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली मा,मीना कुमारी ह्या पहिली अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. पुढे ‘साहिब बिवी और गुलाम’ आणि ‘काजल’ चित्रपटांतील भूमिकांसाठी असे एकूण चार फिल्मफेअर पुरस्कार तिला मिळाले. दहाव्या फिल्मफेअर पुरस्कारावेळी ‘मैं चुप रहूंगी’, ‘आरती’ आणि ‘साहब बिवी और गुलाम’ चित्रपटांसाठी सवरेत्कृष्ट नायिकेच्या पुरस्कारासाठीची नामांकने तिलाच मिळालेली होती. मा.मीनाकुमारी ही अभिनेत्रीबरोबरच गायिका तसेच कवयित्रीदेखील होती. मात्र आपल्या रचना प्रकाशित करण्याचा फारसा प्रयत्न तिने कधीच केला नाही. ‘नाझ’ या नावाने तिच्या काही उर्दू रचना प्रकाशित आहेत. मा.मधुबाला ह्या मीना कुमारीच्या आवाजाची चाहती होती. दिलीप कुमार तिच्यासमोर नि:शब्द होत असे तर राजकुमार आपले संवाद विसरून जात असे. अभिनेता भारतभूषण तिच्या एकतर्फी प्रेमात होते. मा.मीना कुमारी यशाचे शिखर काबीज करत होती. मात्र कमाल अमरोही यांना तिच्या यशाचा हेवा वाटू लागला होता. सोहराब मोदी यांनी एका चित्रपटाच्या प्रीमियरवेळी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल यांना कमाल अमरोही यांचा परिचय लोकप्रिय अभिनेत्री मीना कुमारी यांचे पती असा करून दिला होता. तेव्हा ‘मी कमाल अमरोही व ही माझी पत्नी मीना कुमारी’ असे नमूद करत अमरोही त्या कार्यक्रमातून निघून गेले. मीना कुमारीने अभिनय करणे सोडून द्यावे, असे त्यांना वाटत असे. मात्र मीना कुमारीने नकार दिल्याने त्यांनी काही अटींवर तिला अभिनय कारकीर्द सुरूठेवण्यास अनुमती दिली. चित्रीकरण आटोपून साडेसहा वाजण्याच्या आत घरी परतणे. मेकअपरूममध्ये मेकअपमनशिवाय अन्य कुणाशी संवाद न साधणे. स्वत:च्याच वाहनाने प्रवास करणे, अशा त्या अटी होत्या. मात्र मीना कुमारीने त्या निमूटपणे स्वीकारल्या. तरी त्यांच्या वैवाहिक संबंधात दुरावा येत होता. पुढे ते विभक्त राहू लागले. मीना कुमारी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अभिनेता धमेंद्र हा चित्रपटांत जम बसवण्यासाठी धडपडत होता. मीना कुमारीच्या यशाचा धमेंद्रला मोठया प्रमाणावर फायदा झाला. दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावेळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मीना कुमारीची विमानतळावर भेट झाली असता त्यांनी तिच्याकडे धमेंद्रबाबत विचारणादेखील केली होती. पुढे मात्र ‘फूल और पत्थर’ चित्रपटानंतर धमेंद्रने तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती अत्यंत व्यथित झाली. तिची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत होती. डॉक्टरांनी झोप येण्यासाठी तिला एक पेग ब्रँडी घेण्याची सूचना केली. पण एक पेगचे दोन, दोनचे चार असे पेग वाढतच गेले आणि मीना कुमारी पुरती नशेच्या आहारी गेल्या. चित्रीकरणावेळी, प्रवासात सगळीकडे तिच्यासोबत पर्समधे मदिरेची छोटी कुपी असायची. ‘साहिब बिवी और गुलाम’मधील ‘छोटी बहू’ हे पात्र आपल्या वास्तव जीवनाशी साधम्र्य असल्याचे मीना कुमारी सांगत असत. त्यानंतरच्या काळात कमाल अमरोही त्यांच्या महात्त्वाकांक्षी ‘पाकिजा’ चित्रपटाची निर्मिती करत असताना आर्थिक संकटांना तोंड देत होते. त्या चित्रपटात मा.मीना कुमारी केवळ अभिनयच करत होती, असे नाही तर तिने तिची सर्व मालमत्ता अमरोही यांच्या चित्रपटासाठी पणाला लावली होती. तरीही ‘पाकिजा’चे चित्रीकरण अनेक वर्षे रखडले गेले. सुनील दत्त आणि नर्गिस यांनी पुढाकार घेऊन पुन्हा चित्रीकरण केले. ३ फेब्रुवारी १९७२ रोजी ‘पाकिजा’ प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला सुरुवातीला फारसा प्रतिसाद फारसा मिळाला नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतरच मा.मीना कुमारीचे निधन झाले. मीना कुमारी यांचे ३१ मार्च १९७२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / श्रीराम वाघमारे

    मीनाकुमारी यांची काही गाणी, पाकिजा चित्रपट, बायोग्राफी
    https://youtu.be/0R04XbzDNjU

    https://youtu.be/qkD39k9xaVQ

    https://youtu.be/XtdGZd7vR-U

    https://youtu.be/jNdVm0W7Vtc

    https://youtu.be/TnM5g4eTYUI

    https://youtu.be/Q2X6u0Zg8P8

  • इराकचे एकेकाळचे हुकुमशहा सद्दाम हुसेन

    सद्दाम हुसेन हे भारताचा मोठा फॅन होते. सद्दाम हुसेन प्रोग्रेसिव्ह विचाराचे होते. त्यांच्या काळात मुलीना शिक्षणासाठी बंदी नव्हती. मुली आधुनिक कपडे घालू शकत होत्या, नोकरी करू शकत होत्या. इंदिरा गांधीसारखी महिला भारतासारख्या मोठ्या देशावर राज्य करते याचे त्यांना आश्चर्य वाटायचं. इंदिराजी जेव्हा इराक दौऱ्यावर गेल्या होत्या तेव्हा त्यांची सुटकेस सुद्धा सद्दाम हुसेन यांनी उचलली होती. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला पाठींबा देणारा सद्दाम हुसेनच होते. अस म्हणतात की भारताच्या प्रेमातुन त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचं नाव उदय ठेवलं.

  • नामदेव लक्ष्मण ढसाळ

  • वामन दाजी ओक

    वामन दाजी ओक म्हणजे मोरोपंत, मुक्तेश्वर, वामनपंडित, अमृतराव अशा पंतकवींचे महत्व आधुनिक मराठी कवितेच्या उदयकाळात स्पष्ट करणारे अभ्यासक. १७ जून १८८५ रोजी वामन दाजी ओक यांचे निधन झाले.

    ## Vaman Daji Oak

  • बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी जयाप्रदा

    जयाप्रदा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलगू सिनेमाद्वारे केली होती. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ रोजी झाली.वयाच्या १४ व्या वर्षी जयाप्रदा यांना आपल्या शाळेतील डान्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यांचे नृत्य बघून एक दिग्दर्शक प्रभावित झाले होते. त्यांनी भूमिकोसम या सिनेमात त्यांना नृत्य सादर करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही. त्यानंतर आईवडिलांच्या म्हणण्यावरुन त्यांनी ही ऑफर स्वीकारली. या सिनेमासाठी जयाप्रदा यांना केवळ १० रुपये मानधन मिळाले होते. १९७९ सालीआलेल्या 'श्री श्री मुवा' या सिनेमाचा हिंदी रिमेक असलेल्या 'सरगम' या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे जयाप्रदा यांना एका रात्रीत स्टारडम मिळाले. त्यानंतर मात्र रिलीज झालेले काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. कामचोर या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना नशीबाने साथ दिली. हा सिनेमा यशस्वी ठरला. बॉलिवूड सिनेमांमुळे मा.जयाप्रदा यांना खरी ओळख प्राप्त झाली. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये जयाप्रदा यांची गणना व्हायची. अमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यासोबतची त्यांची जोडी चांगली गाजली. मा.जयाप्रदा यांनी विवाहित श्रीकांत नाहटा नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. श्रीकांत नाहटा हे निर्माते आहेत. या लग्नावरुन बराच वाददेखील निर्माण झाला होता. सिनेमात उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणा-या जयाप्रदा यांचा राजकारणातील प्रवेशदेखील चर्चेत राहिला. सिनेमासोबतच राजकारणातदेखील त्यांनी नाव कमावले. तेलगू देशम पक्षाद्वारे त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    जयाप्रदा यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=ARKnsS541g8

  • खलनायिका, अभिनेत्री नादिरा

    भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९३२ रोजी बगदादमध्ये झाला. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिरा यांनी एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं. नादिरा या दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होत्या. त्यांच्या आग्रहामुळे नादिरा या मुंबईत वयाच्या १९ व्या वर्षी दाखल झाल्या आणि आवारासाठी नर्गिस यांनी आन चित्रपटावर वर पाणी सोडल्यानंतर मेहबूब खान यांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात एका फरहान इझिकेल या फिल्मी क्षेत्रात अगदी नवख्या असलेल्या बगदादी ज्यू मुलीची निवड केली व तिलाच ‘नादिरा’ या नावाने स्टार बनविण्याचा निर्धार केला.

    ‘आन’मधील एका राजपूत राजकन्येच्या तिच्या भूमिकेनंतर त्यांच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे त्यांना सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘श्री ४२०’ मधील ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भूमिकेने नादिरा यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. नादिरा यांच्या वेगळ्या, पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्वामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळेपण उठून दिसे.

    २००० साली प्रदíशत झालेला ‘जोश’ हा नादिरा यांचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी नादिराच्या नशिबी एकटेपणा आला. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर, ज्युडाइझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती. हिंदी चित्रपटसृष्टीत नादिरा ह्या स्वत:कडे रोल्सराइस असलेली पहिली अभिनेत्री. मा.नादिरा यांचे ९ फेब्रुवारी २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनेते चंद्रकांत मांडरे

    चंद्रकांत मांडरे यांचे मूळ नाव गोपाळ मांडरे. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ रोजी झाला.

    बाबूराव पेंटरांनी चंद्रकांत यांना पहिले काम दिले. शेतकऱ्याचं आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे "सावकारी पाश' या चित्रपटामधील चंद्रकांत यांचा अभिनय.

    गोपाळाचं "चंद्रकांत' असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा पुढाकार होता. "राजा गोपीचंद' या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळऐवजी "चंद्रकांत' हे नाव लावण्यात आलं. "सावकारी पाश' या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांतारामबापूंनी केलं, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं. "सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली.

    व्ही. शांताराम यांच्या "शेजारी' या चित्रपटापासून चंद्रकांत "प्रभात'मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. "युगे युगे मी वाट पाहिली', "पवनाकाठचा धोंडी', "संथ वाहते कृष्णामाई' या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. "खंडोबाची आण' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला.

    "रामराज्य' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. "स्वयंवर झाले सीतेचे'मध्ये तर ते रावण झाले होते. रामापासून रावणापर्यंतचा "ग्राफ' टिपणारा हा एकमेव कलावंत. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच "रामराज्य' या चित्रपटाला डोक्यारवर घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता. म. गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. अमोल पालेकरांचा "बनगरवाडी' हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट.

    चंद्रकांत मांडरे यांचे निधन १७ फेब्रुवारी २००१ रोजी झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    चंद्रकांत मांडरे यांचे उल्लेखनीय चित्रपट :- युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी