जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
चंद्रकांत मांडरे यांचे मूळ नाव गोपाळ मांडरे. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ रोजी झाला.
बाबूराव पेंटरांनी चंद्रकांत यांना पहिले काम दिले. शेतकऱ्याचं आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे "सावकारी पाश' या चित्रपटामधील चंद्रकांत यांचा अभिनय.
गोपाळाचं "चंद्रकांत' असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा पुढाकार होता. "राजा गोपीचंद' या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळऐवजी "चंद्रकांत' हे नाव लावण्यात आलं. "सावकारी पाश' या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांतारामबापूंनी केलं, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं. "सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली.
व्ही. शांताराम यांच्या "शेजारी' या चित्रपटापासून चंद्रकांत "प्रभात'मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. "युगे युगे मी वाट पाहिली', "पवनाकाठचा धोंडी', "संथ वाहते कृष्णामाई' या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. "खंडोबाची आण' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला.
"रामराज्य' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. "स्वयंवर झाले सीतेचे'मध्ये तर ते रावण झाले होते. रामापासून रावणापर्यंतचा "ग्राफ' टिपणारा हा एकमेव कलावंत. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच "रामराज्य' या चित्रपटाला डोक्यारवर घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता. म. गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. अमोल पालेकरांचा "बनगरवाडी' हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट.
चंद्रकांत मांडरे यांचे निधन १७ फेब्रुवारी २००१ रोजी झाले.
चंद्रकांत मांडरे यांचे उल्लेखनीय चित्रपट :- युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी
इ.स. १९०८ साली त्यांनी ‘कुंजविहारी’ हे पहिले नाटक लिहिले. पांतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, १९१८ रोजी प्रथम आलेले ‘हाच मुलाचा बाप’ हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले.
पणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत समृद्ध करणारे एक व्यक्तीमत्व आहे. व्याकरण, ज्योतिष, भाषा, कीर्तन इ. चा मोठा कौटुंबिक वारसा लाभलेल्या गुरुजींचा लहानपणापासूनच संगीताकडे ओढा होता. गुरुजींचे आजोबा व वडील हे संस्कृत पंडित तर एक ज्येष्ठ बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि दुसरे दाजीशास्त्री हे पुराणकाल अभ्यासक असताना याच कुटुंबातील गुरुजींनी मात्र संगीताची वेगळी वाट शोधली.
महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’सारख्या नाटकांचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर हे भारतीय रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव! त्यांचा जन्म ३० जानेवारी १९४९ रोजी झाला.
आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते.
आळेकरांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांची आई म्हणजे न.वि. गाडगीळ यांची कन्या. मा.आळेकरांचे शिक्षण पुण्यात झाले. त्याचे मामा काकासाहेब गाडगीळ.
शाळकरी वयात शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका नाट्यप्रयोगाचा इतका खोल परिणाम होऊ शकतो, हे त्यांना नवीनच होतं. आळेकरांनी नाटकांबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली, आणि ते पुढील जीवनात खरोखरच नाटककार झाले.
फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ’ओळख', 'काळोख' या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले.
'मेमेरी' ही पहिली एकांकिका आळेकरांनी 'पीडीए'च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती 'सत्यकथे'ला पाठली. संपादक राम पटवर्धन यांनी ती प्रसिद्ध केली. 'झुलता पूल' एकांकिकेबाबत त्यांनी आळेकरांना सुधारणा सुचविल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर पटवर्धन यांनी ही एकांकिका सत्यकथेमध्ये प्रसिद्ध केली होती.
'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची खर्या अर्थाने सुरुवात केली. थिएटर या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या 'मिकीमाऊस आणि मेमसाब', 'महापूर', 'महानिर्वाण', 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची 'महापूर', 'महानिर्वाण' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. मा.आळेकर यांनी 'जैत रे जैत' चित्रपटाची पटकथा, 'देखो मगर प्यार से' ही दूरदर्शन मालिका, 'कथा दोन गणपतरावांची' या चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. मा. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे. प्ले-राइट्स डेव्हलपमेन्ट स्कीम आणि रीजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेन्ट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते.
सतीश आळेकर यांचा भारत सरकारने २०१२ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांना साहिर लुधियानवी फाउंडेशनचा बलराज साहनी पुरस्कार,द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा फर्ग्युसन अभिमान पुरस्कार, सवरेत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
नाटककार म्हणून त्यांची प्रतिमा असली तरीही त्यांनी नुकत्याच आलेल्या `व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटात अत्यंत संस्मरणीय भूमिका केली आहे.
संगीत नाटक अकादमीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अतुल पेठे यांनी 'नाटककार सतीश आळेकर' ही फिल्म निर्माण केली आहे.
सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके
अतिरेकी, एक दिवस मठाकडे, दुसरा सामना, बेगम बर्वे, महानिर्वाण, महापूर, मिकी आणि मेमसाहेब, शनिवार-रविवार.
एकांकिका
आधारित, आळशी अत्तरवाल्याची गोष्ट, कर्मचारी, जज्ज, झुलता पूल, दार कोणी उघडत नाही, नशीबवान बाईचे दोन, बसस्टॉप, भिंत, भजन, मेमरी, यमूचे रहस्य, वळण, सामना, सुपारी.
सतीश आळेकर यांची वेबसाईट.http://satishalekar.com/
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कर्तृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली.
प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक अशी ख्याती असलेल्या विनायक भावे यांचा जन्म ६ नोव्हेंबर १८७१ साली कोंकणातील पळस्पे या गावी झाला होता. त्यांचे बालपण व शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या जनार्दन बाळाजी मोडक या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. विनायक भावे यांनी विल्सन विद्यापीठातून बी. एस्सी ची पदवी संपादन केली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली.
विनायक भावे यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले सारे आयुष्य महाराष्ट्र कवी नावाच्या मासिकासाठी अर्पण केले. या मासिकाने सलग चार वर्षे रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजविताना अनेक ग्रामीण व होतकरू कविंच्या व लेखकांच्या, उजेडात न आलेल्या कवितांना व इतर कलाकृतींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. या मासिकाने अनेक मराठी काव्ये, बखरी, व इंग्रजी अमदानीच्या पुर्वी होऊन गेलेल्या कवींच्या कवीतांना पुन्हा उजाळा देऊन या सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन करण्याची धडक मोहिम राबवली होती. हे एकीकडे सुरु असताना, दुसरीकडे त्यांचे वाचून झालेल्या ग्रंथसंपदेचे विवेचनात्मक व रसभरित विश्लेषण करणेही चालूच होते. त्यांनी इतिहास संशोधनाची नवी व प्रगल्भ दालने इतरांसमोर उघडली होती.
साहित्य व इतिहासाव्यतिरीक्त निसर्गातील प्राणी, पक्षी, किटक यांवर अतिशय उपयुक्त टिपणवजा माहिती त्यांनी संग्रहित करून ठेवलेली आहे. विनायक भावे यांनी आजवर अनेक जुने अप्रकाशित लेखक व कवींच्या, काव्य-लेखनसंपत्तीचे आभ्यासपुर्ण मंथन केले. आध्यात्मिक व वृत्तालंकारादी व्याकरणाच्या जंजाळात फसलेल्या कवितांपेक्षा, त्यांनी मुक्तेश्वरांच्या व शाहिरांच्या कवितांचे, रसग्रहण करण्यात अधिक धन्यता मानली. कारण या कवितांमध्ये भक्तीरसापेक्षा, त्या कवितेच्या आशयाला व भावनेला अधिक आपलेसे केले गेले होते. “महाराष्ट्र सारस्वत“ ही तर त्यांच्या काव्यप्रेमाने गाठलेली उत्कटतेची परिसीमा मानली जाते. ह्या कधीही विसरता न येणार्या दर्जेदार साहित्य विवेचकी वृत्तीने रसिकांसमोर उलगडुन दाखविले होते.
महाराष्ट्र सारस्वतची पहिली आवृत्ती ग्रंथमाला नावाच्या मासिकामध्ये प्रसिध्द झाली होती. त्यानंतर ह्या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती म्हणजे केवळ ९८ पृष्ठांचा एक निबंध होता. भावे यांनी पुढे त्यात सतत भर घातली. त्यामुळे हा ग्रंथ तिसर्या आवृत्तीपर्यंत ७४४ पृष्ठांपर्यंत वाढला. “ग्रंथमाला“त पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे “चक्रवर्ती नेपोलियन“ हा देखील त्यांच्यामधील प्रतिभावंत व बोलक्या लेखकाचा, एक विनम्र प्रयत्न होता. भावे हे कोणताही ऐतिहासिक प्रसंग आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या बळावर जिवंत करण्यात तज्ञ होते, याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना वारंवार येतो.
१२ सप्टेंबर १९२६ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.
अॅड. श्री प्र. वा. रेगे यांनी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे शाखेचे कार्यकारी विश्वस्त म्हणून गेली अनेक वर्षे मराठी साहित्य संवर्धनाचे, व संस्कृतीप्रचाराचे स्वीकारलेले कार्य, अत्यंत एकनिष्ठतेने व कल्पकतेने साध्य केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत या ग्रंथालयाने भरपूर यश प्राप्त केले आहे. अनेक नवेदित मराठी कवी, साहित्यीक, नाटयकर्मी यांना उत्साह दि्वगुणीत करण्यासाठी त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, ग्रंथालयाने अभिनव योजना कार्यान्वित केले.
रेगे हे सारस्वत बँक ठाणे शाखेचे ते माजी अध्यक्ष व संचालक राहिले आहेत. त्यांनी संस्थेच्या इमारतपुनर्बांधणीत कार्यकारी विश्वस्त या नात्याने मोलाचे मार्गदर्शन तर केलेच, शिवाय उत्स्फुर्तपणे या बहुआयामी योजनेसाठी साडे बारा लाखांची भरघोस देणगी दिली. याची कृतज्ञता म्हणून संस्थेच्या नवीन इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सभागृहास, त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कै. वा. अ. रेगे आणि कै. सुंदराबाई वा. रेगे यांचे नाव दिले गेले आहे. त्यांचे चिरंजीव मकरंद रेगे हे तसेच योगदान संस्थेचे विश्वस्त या नात्याने देत आहेत. विशेषतः कायदेशीर बाबींबद्दल ते संस्थेला मार्गदर्शन करीत असतात.
१९९९ मध्ये प्र. वा. रेगे यांनी स्थानिक साहित्यीकांना एकत्र बांधण्याच्या हेतुने संस्थेकडे एक लाख वीस हजार रूपये सुपुर्द करून त्याच्या व्याजातून ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ठ ललित मराठी साहित्य निर्मिती करणार्या लेखकांना प्रत्येकी पाच हजार रूपयांची दोन स्वतंत्र बक्षिसे दरवर्षी देण्याचा घाट घातला होता. या प्रस्तावानुसार आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील कित्येक लेखकांना त्यांच्या संस्मरणीय साहित्य निर्मितीसाठी संस्थेच्या वार्षिकोत्सवामध्ये ( त्यांचे वडिल श्री. वा. अ. रेगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ) सन्मानपूर्वक पारितोषके देण्यात आली आहेत. त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांमुळे व प्रसिध्दी करण्याकरिता त्यांनी शोधून काढलेल्या निरनिराळया तंत्रांमुळे, त्यांच्या काळात लेखकांची गुणवत्ता व संख्या या दोन्ही घटकांमधला सुवर्णमध्य साधला गेला व मराठी साहित्य ग्रंथालय ही संस्था नावारूपास आली.
विकासाची दृष्टी असणारे आणि त्यासाठी अथक वेळ देणारे शिस्तीचे नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. सर्वाचेच ऐकायचे हा त्यांचा स्वभाव असला तरी कुणाचे आणि कोणते काम करायचे याबाबत मात्र ते कमालीचे जागरूक असल्याचे मानले जाते.
माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म १९ ऑगस्ट १९१८ भोपाळ येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध वैद्य होते. त्यांचे भोपाळ आणि आग्रा येथे सुरूवातीचे शिक्षण झाले. अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए. आणि नंतर लखनौ विद्यापीठातून एल्एल् .एम्;. पुढे केंब्रिज विद्यापीठ आणि लिंकन्स इन (इंग्लंड) यांतून अनुक्रमे पीएच्. डी. व बार अँट लॉ या पदव्या मिळविल्या.
सहकार क्षेत्रात दादांचा प्रत्येक शब्द अंतिम मानला जात असे. वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले होते पण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी – असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.
Copyright © 2025 | Marathisrushti