(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • गुरुनाथ विष्णू नाईक

    मराठीतील सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक.

    बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनीही शेकडो रहस्यमय कादंबऱ्या लिहील्या. त्यांच्या रहस्यकथांनी एकेकाळी संपूर्ण पिढीला वेड लावले होते.

    दर महिन्याला ते सरासरी शंभर पानांच्या ७-८ कादंबऱ्या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत असत.

    १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबऱ्या आहेत.

    गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा तसेच कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणाऱ्या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.

    # Gurunath Naik

  • कैलास विनायक अन्याल

    चित्रकला हे कार्यक्षेत्र असलेले श्री. कैलास अन्याल यांनी ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुलमधून आपल्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. नंतर रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. जाहिरात क्षेत्रात ते १४ वर्षे कार्यरत होते. नंतर मुक्तपणे पूर्णवेळ चित्रनिर्मितीला त्यांनी सुरुवात केली.

  • नानाजी देशमुख

    चित्रकूटमधील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रकल्प हाती घेतला. चित्रकूटमध्ये त्यांनी गोशाळा स्थापन केली असून महिला सक्षमीकरणासाठी उद्यमकेंद्राची स्थापना केली आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पिकांवर संशोधन केले जाते. पिकांचे कोणते वाण वापरावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.

  • डॉ. मृणालिनी गडकरी

    सीकेपी समाजातील अनेक महिला आज जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये अग्रणी राहून आपल्या समाजाला गौरवीत करत आहेत. खासगी संस्था ते मल्टिनॅशनल कोर्पोरेट्स, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पाककला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रांत सुद्धा आपल्या महिलांचा वावर वाखाणण्याजोगा आहे. तलवार आणि लेखणीचा वारसा सांगणाऱ्या आपल्या या समाजात लेखणीचा उत्तम वापर करत साहित्य निर्मिती करणाऱ्या अनेक महिला आजही विविध माध्यमांतून आपले साहित्यिक योगदान देत असतात. योगायोगाने या वर्षी २२ मे रोजी पुणे येथे दुसरे सीकेपी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सीकेपी समाजातील शंभराहून अधिक लेखिका कवयित्रींना आणि अगदी पाकशास्त्रावरील पुस्तके लिहिणाऱ्या सुगरणींना तुमच्यासमोर आणायचा हा एक छोटासा प्रयत्न.

  • अरूण दाते

    लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गाणारे अरूण दाते हे मराठीतील बहुधा एकमेव गायक असावेत. यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरूण दाते या त्रिकुटाने मराठी भावगीताला पुन्हा एकवार झळाळी प्राप्त करून दिली. श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अरूण दाते यांच्या आवाजावर स्वत:च्या रचना चढवण्याचा मोह आवरता आला नाही.

  • वैजयंती गुजर-घोलप

    बहुमत गाठीशी नसतानाही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा विक्रम करून दाखविणारी शिवसेना येत्या काही दिवसांनी त्यांच्याच पसंतीचा उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आणून दाखविण्याचा पराक्रम करेल, अशी दाट शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अर्थात हा चमत्कार काही केवळ पक्षनेतृत्वाच्या चलाखपणातून घडला असेल वा घडेल अशी शक्यता नाही,

    ते घडण्याला खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरले आहे ते महापौरपदावरील व्यक्तीचे, म्हणजे वैजयंती गुजर घोलप यांचे, अजातशत्रू आणि कार्यप्रवण व्यक्तिमत्व. वैजयंतीताई नगरसेवकपदी सर्वप्रथम निवडून आल्या त्यालाही आता पंधरा र्वषे होऊन गेली. २०१० च्या निवडणुकीत एकतर भलेभले तिकिटाविना राहिले, किंवा तिकिटे मिळालीच तर मनसेच्या लाटेत उद्ध्वस्त तरी झाले अशी बहुसंख्य उमेदवारांची स्थिती असताना एकाच वॉर्डातून सलग चौथ्यांदा निवडून जाणाऱ्या, आणि तिकिट नको असे म्हटल्यानंतरही तुम्हालाच तिकिट घ्यावे लागेल हा पक्ष नेतृत्वाचा आदेश मानणे भाग पडलेल्या, वैजयंतीताईंनी यंदा हा महापराक्रम केला आहे.

    वैजयंतीताईंचा जन्म कल्याणचा, शिक्षण कल्याणचं, सामाजिक कार्य कल्याणातलं, नोकरी कल्याणातली आणि विवाहही कल्याणच्याच समविचारी कार्यकर्त्यांबरोबरचा. धनगर समाजात त्या जन्मल्या, घरचा व्यवसायच खाटकाचा. आईवडील मटणविक्रीच्या व्यवसायात. पण दोघंही सातवीपर्यंत शिकलेली असल्यानं त्यांनी वैजयंतीताईंना आनंदानं शाळेत घातलं. शाळकरी वयातच आईवडील दोघंही दुकानावर जात असल्यानं स्वयंपाकघर सांभाळण्यापासून सारी कामं वैजयंतीताईं करू लागल्या. गणित चांगलं, त्यामुळे दुकानाचे हिशेबठिशेब वैजयंतीताईंकडेच असत.

    उत्तम गुण मिळवून त्या दहावी पास झाल्या खऱ्या, पण इंग्रजी फारसं चांगलं नसल्यानं त्यांनी कलाशाखेकडे प्रवेश घेतला. अकरावीचं पहिलं र्वष कसंबसं पार पडलं, पण बारावीच्या पहिल्या महिन्या-दोन महिन्यातच वैजयंतीताईंना आपली चूक कळून आली, त्यांनी थेट प्राचार्याच्या केबिनवरच धडक मारून कॉमर्सला प्रवेश मागितला. कॉमर्स विषयांची चाचणी द्यावी लागेल असं प्राचार्यानी बजावलं. गणित चांगलं होतंच, मनापासून अभ्यास करून ताईंनी दोन्ही विषयात पहिला वर्ग मिळवला, कॉमर्सला प्रवेश घेतला आणि त्या सरळ कॉमर्स पदवीधर झाल्या. पदवीधर झाल्यानंतर मटणविक्रीच्या दुकानावर बसणं काही शक्य नव्हतं, त्यामुळे नोकरी करणं ओघानं आलंच, अपंगांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत कारकून म्हणून त्या नोकरीस लागल्या आणि पुढली सारी र्वष नगरसेवक म्हणून सार्वजनिक कार्य करीत असतानाही त्यांची नोकरी सुरूच राहिली.

    तीस मुलांनिशी त्यांनी सुरू केलेली ती संस्था, आता दोनशे मुलांच्या निवासी शाळेत रूपांतरित झाली आहे आणि जैन समाजातली काही परिचित मंडळी आता ती चालवताहेत, पण वैजयंतीताईंचा संस्थेशी असणारा संबंध पूर्वीप्रमाणेच कायम आहे. महापौरपदी गेल्यामुळे आता दाराशी गाडी आहे, पण ती गाडीही अडल्यानडल्यासाठी ठेवून वैजयंतीताई आजही पायी फिरणंच पसंत करतात. निवडून गेल्यानंतर सगळे मतदार सारखेच, पक्षीय बंधनांमध्ये न अडकता प्रत्येकासाठी धावून जाणं, आनंदाच्या क्षणांबरोबरच मृत्युप्रसंगी तिरडी बांधण्यापर्यंत सहभागी होणं हे वैजयंतीताईंनी विनासंकोच केलं म्हणूनच मतदानप्रसंगी अवास्तव खर्च करण्याची वेळ त्यांचेवर कधी आली नाही.

    नोकरी होती तेव्हा पगार मिळायचा, पण नगरसेवकपदाचं मानधन आणि नोकरीतला पगार खर्च व्हायचा तो सार्वजनिक कामासाठी, महिनाअखेरीला पर्समध्ये ठणठणाटच असायचा. महापौर झाल्याच्या निमित्तानं एका संस्थेनं वैजयंतीताईंच्या आईवडिलांचा सत्कार केला, सत्कारासाठी आलेल्या पाहुण्यांचं चहापान त्यांच्याच घरी झालं, ते स्वाभाविकही होतं. पण अस्वाभाविक होतं, ते त्यांचं स्वत:च पुढे होऊन चहाचे कप देण्यासाठी धावपळ करणं. वडिलांच्या आजारपणामुळे सत्कार घरगुतीच होता, आणि तोही घरासमोरच्याच मोकळ्या जागेत.

    आयोजकही होते स्थानिकच. पण आईचा सत्कार करताना, तिला साडी देण्याची वेळ आली तेव्हा साडीवर रीतीप्रमाणे हळद-कुंकवाचं बोट लावायला पाहिजे असं कुणातरी म्हणालं आणि आपलं पद विसरून कुंकवाची कुयरी आणण्यासाठी मैदानातून थेट घराकडे धाव घेतली, ती वैजयंतीताईंनीच. कार्यकर्तेपण इतकं निखळ पारदर्शी असू शकतं याची ती खूणगाठच होती. वैजयंतीताई आता 'महापौर आपल्या दारी' हा कार्यक्रम घेऊन मतदारांना सामोऱ्या जाताहेत, असा कार्यक्रम घेणाऱ्या त्या काही पहिल्याच नव्हेत, पण त्यांच्याठायी असलेली कार्यप्रवणता आणि त्याला मिळणारी तेवढीच जनताभिमुख आयुक्ताची जोड याबरोबरच त्यांचा आजवरचा पारदर्शकतेचा व्यवहार पाहता मतदारांना खरोखरीच महापौर आपल्या दारी आल्याचे अनुभवण्यास मिळेल अशी आशा करावयास हरकत नाही.

  • चारुदत्त सरपोतदार

    चारुदत्त सरपोतदार हे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व होते. गेली सुमारे सत्तरहून अधीक वर्षे ‘पूना गेस्ट हाउस’च्या माध्यमातून कलावंतांपासून सर्वसामान्य पुणेकर खवय्यांचे चोचले पुरविणारे चारुदत्त सरपोतदार हे शेवटपर्यत पुण्याच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत होते.

  • दिलीप प्रभावळकर

    दिलीप प्रभावळकर हे नाव माहित नसलेला रसिक मराठी माणुस विरळाच. ज्याला खरी अभिनयाची जाण व गोडी आहे , त्याला प्रभावळकरांमधला सच्चा व प्रतीभाशील कलावंत हा भावतोच.

  • बी. टी. देशमुख

    विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत प्रा. बी. टी. देशमुख यांचा पराभव झाल्याने, प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या शैक्षणिक चळवळीचा आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या संसदीय संघर्षांचाही पराभव झाला आहे. भाऊराव तुळशीरामजी उपाख्य बी. टी. देशमुख नावाची चळवळ १९६० साली अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात सुरू झाली आणि पाहता पाहता या चळवळीने राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात संचार सुरू केला.

    विद्यार्थी असतानाच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बी. टी. सहभागी झाले. बी. टीं.च्या घरी अठराविश्वे दारिद्रय़ होते. पण, तरूण वयापासूनच परिस्थितीला शरण न जाता संघर्षरत राहण्याची बी.टीं.ची वृत्ती होती. शिक्षण आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, अशा दोन्ही आघाडय़ांवर सक्रिय राहण्यासाठी पोट किमान भरलेले असावे, ही मूलभूत गरज होती आणि ती भागवण्यासाठी भाऊराव नावाचा हा युवक चक्क कंपोझिटरचे म्हणजे छापखान्यात अक्षरे जुळवण्याचे काम करत असे. कंपोझिटरची ही नोकरी करत करतच राज्यशास्त्र या विषयात एम.ए. ची पदवी संपादन केली आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. तो काळ शिक्षकी पेशासाठी कमी वेतन आणि प्रामाणिकपणे विद्यादानाचा होता. विद्यादान करणाऱ्यांना चरितार्थासाठी येणाऱ्या अडचणी स्वत: अनुभवताना बी. टीं. मधला चळवळ्या जागा झाला. त्यातूनच महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसाठी विदर्भभर आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. नेतृत्वासाठी नैतिक पातळीवर असणारे स्वच्छ चारित्र्य त्यांच्याजवळ होतेच. त्यामुळे शिक्षक चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे आपसूकपणे चालत आले. नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाचे (नुटा) १९७३ पासून आजपर्यंत ते अध्यक्ष आहेत. सलग एखाद्या चळवळीचे ३७ वर्षे अध्यक्षपद भूषवले जाण्याचा हा विक्रमच असावा! ‘नुटा’चे अध्यक्षपद सांभाळत असतानाच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे अपरिहार्यपणे आले. चळवळी उभारतानाही विद्यादानाच्या व्रतापासून बी. टी. क्षणभरही ढळले नाहीत. प्राध्यापकपदाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होईपर्यंत म्हणजे ३०-३२ वर्षे बी.टी. नियमितपणे शिकवत असत. केवळ रस्त्यावर संघर्ष करून शिक्षकांचे प्रश्न सोडवता येणार नाही, म्हणून १९८० साली बी.टीं.नी विदर्भ पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेत प्रवेश केला. अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी बी.टीं.नी विधिमंडळात सर्व संसदीय अस्त्रांचा वापर केला. हे विद्यापीठ स्थापन झाल्यावर म्हणजे १९८६ मध्ये हा मतदारसंघ अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. या मतदारसंघातून सलग पाच वेळा बी.टी. विधान परिषदेवर विजयी झाले. ३० वर्षांच्या संसदीय जीवनात त्यांची प्रतिमा अभ्यासू आमदार म्हणून राहिली. शिष्टाचाराचा, वर्तनाचा कोणताही तोल ढळू न देणारा आणि तरी अत्यंत आक्रमक आमदार म्हणून बी. टी. देशमुख यांची कारकीर्द तेजस्वी राहिली, तशीच ती निष्कलंकही राहिली. याच संयत आक्रमकतेच्या जोरावर शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यात बी.टीं.ना यश आले. एखाद्या विषयावर बी. टी. बोलायला लागले तर संपूर्ण सभागृहात पूर्ण शांतता असे. दहा-बारा वर्षांत बी.टी. आणि नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सभागृहात विदर्भाच्या अनुशेषाच्या निवारणासाठी जो ‘संसदीय संघर्ष’ उभारला गेला, त्याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल. विदर्भाच्या विकासाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना देशमुख-गडकरी या दुकलीने अक्षरश: सळो की पळो करून सोडले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर गडकरी दिल्लीला गेले आणि विकासाच्या संसदीय लढाईची जबाबदारी एकटय़ा बी.टीं. वर आली. एकाच वेळी संसदीय आणि उच्च न्यायालय अशा दोन पातळ्यांवर एकहाती ही लढाई बी.टी. लढत होते. बी.टीं.च्या पराभवामुळे विधान परिषदेतील या लढाईचे नेतृत्वच संपले आहे, असे नव्हे तर या लढाईची धार अतिशय बोथट झाली आहे. विधान परिषद निवडणुकीतील बी.टी. देशमुख यांच्या पराभवाचा अर्थ इतका असा व्यापक आहे आणि विदर्भाचे केवढे मोठे नुकसान झालेले आहे, हे स्पष्ट करणारा आहे. बी.टी. देशमुख तन आणि मनाने चळवळे आहेत. वयाच्या सत्तरीतही चैतन्याने फुललेलेच आहेत. ते हार मानणार नाहीत. आता पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरू करतील. त्यांच्या पुढच्या लढाईला शुभेच्छा!

  • डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी

    आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.