ठाणे शहर हे ज्याप्रमाणे संस्कृती कला, परंपरा यांचा आदर करतं त्याचप्रमाणे विज्ञान, तंत्रज्ञान यांचीही कास ठाण्यानी धरली आहे. याचीच साक्ष देतात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणून बिरुद मिळालेले श्री. दा.कृ. सोमण.
May 23, 2014
एखाद्या गावाची ओळख त्या गावाच्या ग्रामदेवतेवरून होते. तसेच एखाद्या व्यक्तिमत्त्वामुळे गावाचे श्रेष्ठत्व वाढते. नाशिकला लाभलेले असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज.
February 4, 2010
दहा चित्रपटांतील साध्या सोप्या शब्दातल्या परंतु अर्थपूर्ण गीतांमुळे शांताराम आठवले यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या गीतांमुळेच अनेक चित्रपट यशस्वी झाले, चित्रपटरसिकांनी त्यांच्या गीतांसाठी चित्रपट पाहिले, समीक्षकांनीही त्यांची गीते नावाजली.
May 7, 2014
व्हि.पी.एम. महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या श्रद्धाचं शालेय शिक्षण ठाण्यातील होली क्रॉस शाळेतून झालं. श्री प्रताप चव्हाण आणि त्यानंतर श्री. नाईक यांच्याकडून अॅथलेटिक्सचं प्रशिक्षण घेतलेल्या श्रद्धा मांद्रेकरांनी महाराष्ट्र रज्याच्या संघाचं १९८१ ते १९८६ अशी सलग पाच वर्षं कर्णधार पद भूषविलं.
June 16, 2014
कुळकर्णी, राजाभाऊ
विदर्भाच्या वाचनसंस्कृतीचा आधारस्तंभच राजाभाऊ कुळकर्णी यांच्या निधनाने निखळून पडला आहे. राजाभाऊंचे निधन वयाच्या ७६ व्या वर्षी झाले आणि त्यापैकी गेली ५५ वर्षे ते विदर्भात होते. १९५५ साली अहमदनगर जिल्ह्य़ातला ‘भा.ल.’ कुळकर्णी नावाचा एक नुकताच मिसरूड फुटलेला युवक शिवचरित्राच्या प्रचारासाठी विदर्भात आला आणि ‘भा.ल.’ ही त्याची ओळख विसरून आणि ‘राजाभाऊ’ हे नवे रूप घेऊन विदर्भाच्या भूमीत स्थिरावला.
या साडेपाच दशकांच्या काळात राजाभाऊंची भूमिका विदर्भाच्या वाचनसंस्कृतीला वेगवेगळ्या मार्गाने विकसित करणारी आणि दिशा देणारी ठरली. ते केवळ पुस्तक विक्रेते नव्हते तर, अक्षरांच्या पाऊलवाटांवर अनेक नामवंतांसोबत नवोदितांनाही चालायला लावणारे मार्गदर्शक होते. पुस्तकविक्रीसोबत ते प्रकाशन व्यवसायात शिरले पण, रूढार्थाने ते केवळ साहित्य प्रकाशकच नव्हते तर, साहित्याच्या वाटा उजळून टाकणारा एक दीप म्हणून या काळात राजाभाऊ वावरले. त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या यादीवर आणि ते लिहिणाऱ्या लेखकांच्या नावावर नुसती नजर जरी टाकली तरी राजाभाऊंचा साहित्यिक संपर्क आणि आवाका केवढा थक्क करणारा होता, हे सहज लक्षात येते. प्रकाशक म्हणून त्यांचा व्यवहारही वाचनसंस्कृतीला उत्तेजन देणारा, लेखकाचा सन्मान राखणारा आणि प्रकाशित झालेले अक्षरधन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेणारा राहिला. वाचक जर खरेच भुकेला असेल तर, पुस्तके त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राजाभाऊंनी अशा अनेकांना मराठीतील उत्तमोत्तम साहित्य हप्त्याने कसे उपलब्ध करून दिले, याविषयी आजही अतिशय आदराने बोलले जाते. दूरचित्रवाणीचा प्रचार आणि प्रसार भारतात सुरू झाल्यावर शाळकरी मुले पुस्तकांपासून लहान वयातच दुरावत आहेत, हे लक्षात आल्यावर राजाभाऊ कुळकर्णी यांनी साहित्य प्रसार केंद्राच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वाचनस्पध्रेचा सुरू केलेला उपक्रम वैदर्भीय वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी उपकारक ठरला. राजाभाऊंचे साहित्य प्रसार केंद्र केवळ पुस्तक विक्रीचे दुकान म्हणून नागपूर-विदर्भात परिचित नव्हते तर, साहित्यिक आणि वाचकांचा ते एक अड्डा आहे. ग्रेस आणि सुरेश भट, भास्कर लक्ष्मण भोळे आणि प्रा. वसंत वऱ्हाडपांडे, महेश एलकुंचवार आणि प्रा. राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे आणि अरविंद इनामदार, अशी नावे कोणत्याही जोडीने उच्चारली तरी ती परस्पर विरोधी विचारशैली आणि लेखनाची प्रतीके आहेत, मात्र असे सर्व भिन्न विचार-संस्कृतीचे लेखक, कवी, समीक्षक साहित्य प्रसार केंद्रात आपापल्या विचारांच्या झुली बाजूला ठेवून केवळ साहित्य या एका रंगात न्हाऊन निघाले असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. व्यक्तिगत पातळीवर राजाभाऊ अध्यात्मवादी होते आणि त्यांच्या विचारनिष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य प्रवाहाशी जोडल्या गेलेल्या होत्या. असे असले तरी साहित्याच्या व्यासपीठावर आणि सार्वजनिक जीवनात राजाभाऊंनी ते अध्यात्म आणि त्या संघनिष्ठांना डोके वर काढू दिले नाही. किंबहुना वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात या निष्ठा कोणत्याही प्रकारे आड येणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. त्यामुळेच संघाशी नाळ जुळलेल्या राजाभाऊंचा साहित्यिक आणि सार्वजनिक परिवार मात्र सर्वपक्षीय, सर्वरंगीय, सर्वजातीय आणि सर्वधर्मीय असा सर्वसमावेशक राहिला. ज्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या आदेशाने राजाभाऊ कुळकर्णी विदर्भात आले, रुजले, फुलले आणि वैदर्भीय भावजीवनाचा अविभाज्य घटक झाले त्या बाबासाहेब पुरंदरे यांचे भाषण सुरू असतानाच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजाभाऊ कुळकर्णीना हृदयविकाराने गाठावे आणि आयुष्यभर पुस्तकांचा ध्यास घेतलेल्या एखाद्याचा मृत्यू पुस्तक प्रकाशन समारंभात आणि त्याच्या आदर्श व्यक्तीसमोरच व्हावा, हेही एखाद्या साहित्यकृतीतच शोभावे.
August 5, 2017
त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या.
July 2, 2022
भारतातील हाताच्या बोटांवर मोजता येणार्या द्विभाषिक लेखकांमध्ये व नामांकित कादंबरीकारांमध्ये किरण नगरकर ह्यांचे नाव प्राधान्याने घेण्यात येते. मुंबई या महानगरीतील कनिष्ठ वर्गीयांचे खुमासदार आणि अंतर्मुख करणारे वर्णन वाचकांसमोर उलगडणारी, नगरकरांची १९९४ साली प्रकाशित झालेली ‘रावण अँड एडी’ ही कादंबरी बहुचर्चित ठरली.
July 26, 2017
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर असताना ठरलेल्या कार्यक्रमानुसार लाहोर किल्ल्याला भेट देणार होते. मात्र त्याचवेळी पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा गटातील एका अधिकाऱ्याने त्यास आक्षेप घेतला. रस्त्याची सुरक्षा तपासणी होत नाही तोपर्यंत पंतप्रधानांचा ताफा निघणार नाही, असे या अधिकाऱ्याने ठामपणे सांगितले. या पवित्र्यामुळे राजनैतिक अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. त्यातही एका पोलीस अधिकाऱ्याने पंतप्रधानांचा ताफा रोखून धरल्याचे वास्तव त्यांना सहनच झाले नव्हते.
परंतु आक्षेप डावलणेही शक्य नव्हते. त्या रस्त्यावर पोलीस पथक पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लपून बसलेल्या स्थानिक दहशतवाद्यांनी या पथकावर हल्लाबोल केला. या घटनेनंतर मात्र ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची चांगलीच वाहवा झाली. तो अधिकारी म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून, ते आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजीव दयाळ!
मितभाषी, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष दयाळ प्रसारमाध्यमांपासून नेहमीच दूर राहिले. १९७७ च्या तुकडीतील दयाळ यांचा आयपीएस वर्तुळातही चांगलाच दबदबा आहे. व्यवस्थापनातील त्यांच्या वादातीत कौशल्यामुळे त्यांना सहकाऱ्यांनी ‘चाणक्य’ ही पदवी दिल्याचे बोलले जाते. ‘आपले काम बरे’ अशा भावनेतून ३३ वर्षांत ते ज्या ठिकाणी नियुक्तीत होते तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. दिल्लीजवळच्या गुरगावात त्यांचे बालपण गेले.
एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दयाळ यांची, महाराष्ट्राचे केडर मिळाल्यानंतर पहिली नियुक्ती नाशिकचे अतिरिक्त अधीक्षक म्हणून झाली. त्यानंतर १९८२ मध्ये मुंबईत येण्याआधी नांदेड, अमरावती येथे ते अधीक्षक होते. ज्युलिओ रिबेरो हे तेव्हा मुंबईचे पोलीस आयुक्त होते. धारावीत वरदराजन मुदलियार ऊर्फ वरदाभाईची प्रचंड दहशत होती. यादवराव पवार यांनी उपायुक्त म्हणून वरदाभाईची चांगलीच कोंडी केली होती. रिबेरो यांनी पवार यांच्या जागी दयाळ यांना नेमले.
दयाळ यांनी कसलाही गाजावाजा न करता वरदाभाईला सळो की पळो करून सोडलेच पण धारावीतले मटक्याचे, दारूचे अड्डे साफ उध्वस्त करून टाकले. त्यानंतर त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोत उपसंचालक म्हणून जाणे पसंत केले. १९८८ ते ९२ पर्यंतचा काळ प्रतिनियुक्तीवर काढल्यानंतर १९९३ मध्ये पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून शासनाने त्यांची नियुक्ती केली. त्यावेळी पश्चिम प्रादेशिक विभाग हा वांद्रे ते दहिसपर्यंत पसरलेला होता. त्यावेळीही त्यांनी मटक्याच्या व दारूच्या अड्डय़ांवर लक्ष केंद्रित केले होते. दोन वर्षांचा कालावधी अर्थातच कुठलीही प्रसिद्धी न मिळविता त्यांनी गाजविला. त्यानंतर इतर पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे मुंबईतच ठाण मांडून न राहता ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा गटात सामील झाले.
तब्बल सात वर्षे ते एसपीजीत होते. तेथून त्यांची नियुक्ती मुंबई पोलीस दलाच्या प्रशासन विभागाचे सहआयुक्त म्हणून झाली. येथेही त्यांनी आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीने ठसा उमटविला. पोलीस शिपायांच्या भरतीत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत होता आणि तो रोखण्याची कोणाचीच तयारी नव्हती. राजकारणी मंडळी या भरतीत हस्तक्षेप करीत होते. दयाळ यांनी राजकारण्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी भरतीची प्रक्रियाच बदलून टाकली. उमेदवारांच्या नावापेक्षा त्याला विशेष ओळख क्रमांक देण्याची पद्धत दयाळ यांनी रूढ केली ती आजतागायत. तेव्हापासून खरेतर दयाळ यांच्या मि. क्लीन प्रतिमेचा गवगवा झाला. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी ते कधीच नव्हते.
नियम आणि कायद्यावर बोट ठेवून प्रसंगी राजकारण्यांनाही सुनावणारे दयाळ सत्ताधारी पक्षाला तसे भारीच पडले असते. त्यामुळे दयाळ हे मुंबईचे पोलीस आयुक्त होतील, असे कुणीही ठामपणे सांगत नव्हते. तरीही आयत्यावेळी दयाळ यांचे नाव घोषित करून सत्ताधारी पक्षाने धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राजकारण्यांच्या हस्तक्षेपाबद्दल छेडले असता ते शांतपणे उद्गारले की, ‘कायदा आणि घटनेत स्पष्ट तरतुदी आहेत. त्यापेक्षा मोठे कुणीही नाही. आपण नेहमी त्याचाच आदर करतो.’ केंद्रातील गृहमंत्रालयाने २६/११ संबंधातील राम प्रधान समितीने केलेला अहवाल विचारात घेऊन दयाळ यांची नियुक्ती सुचविली, हे उघड आहे. महाराष्ट्र सरकारचा २६/११च्या वेळचा कारभार आणि व्यवहार फारसा आश्वासक नव्हता हेच या नेमणुकीने अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे.
August 5, 2017
मराठी मालिका आणि सन्मान सोहळ्यात दिसणारा एक चेहरा आपणा सर्वांच्याच ओळखीचा आहे. आपल्या निवेदनाने आणि अभिनयाने तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे संस्कृत भाषेतील प्रभुत्वामुळे सर्व श्रोत्यांना भुरळ घालणारी समीरा गुजर-जोशी ही देखील ठाण्यातलं एक रत्नच!
May 23, 2014
प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक विजू माने म्हणजे ठाणे शहरातल्या शिरपेचातला आणखी एक हिरा. नाटकामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या माने यांनी नंतर गोजिरी, ती रात्र यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लेखक म्हणूनही काम केले.
May 27, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti