(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • अभिजीत केळकर

    अभिजीत केळकर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख प्राप्त झाली ती “ऊन पाऊस” या मराठी मालिकेपासून. त्याचं  चित्रपटसृष्टीत पदार्पण ” मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ” या बहुचर्चित मराठी चित्रपटातून झालं.

  • मकरंद प्रधान

    देशोदेशी व्यापार करणार्‍या प्रत्येक उद्योजकाकडे कंटेनर भरुन पाठविण्याइतका माल नसतो. अशा कंटेनर पेक्षा कमी आकाराच्या मालाची दाही दिशांना निर्धोक ने-आण करण्याच्या व्यवसायात मकरंद प्रधान यांनी संधी शोधली. त्यांच्या सीपी वर्ल्ड ग्रुपने जगात १४०० कोटी तर देशांतर्गत कंपनीने ३०० कोटींच्या वार्षिक उलाढालीपर्यंत मजल मारली. युरोप, आशिया, अफ्रिका, आखात व अमेरिका अशा जगभर पसरलेल्या उद्योगाबरोबरच प्रधान यांनी भारतातही मोठा विस्तार केला...

    दाही दिशा व्यापाराच्या

  • राम कदम

    मराठी लावणीचे लावण्य खुलवून रामभाऊंनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. जुन्या झिलला उजाळा दिला, नवं रूप दिलं. मायबाप रसिकांनी दिलेली ‘लावणी सम्राट’ ही बिरुदावली त्यांनी अभिमानाने मिरवली.

  • पंढरीदादा जूकर

    जूकर, पंढरीदादा

    चित्रपटसृष्टीची फार ढोबळ ओळख सर्वसामान्य प्रेक्षकाला असते. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंपैकी छायाचित्रण, संकलन या विभागाची कामे काय असतात याचे थोडेफार तरी ज्ञान अनेकांना असते; परंतु ‘मेकअप’विषयी साधारणत: फारच कमी आणि त्रोटक माहिती चित्रपटसृष्टीच्या बाहेरील लोकांना असते. ‘मेकअप’ म्हणजे ‘तोंड रंगविणे’ असा एक सर्वसाधारण ठोकताळा असतो. मात्र असे ‘तोंड रंगविणाऱ्याला’ व्यक्तिरेखांचा अभ्यास असेल, अभिनेत्याच्या चेहऱ्यात नेमके काय कमी आहे आणि काय अधिक आहे याचा अंदाज असेल आणि या ज्ञानाचा उपयोग तो ‘मेकअप’ करताना जाणतेपणी करीत असेल तर ‘मेकअप’ हा ‘मेकअप’ राहत नाही, त्याची कला बनते.

    पंढरीदादा जूकर यांनी ‘मेकअप’ला असे महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देता देता स्वत:ही एक कलावंत म्हणून स्थान मिळविले. गेली जवळपास ५० वर्षे पंढरीदादा आपली या क्षेत्रातली ‘दादगिरी’ टिकवून आहेत. आज या क्षेत्रात काम करणारे जवळपास सर्वच तंत्रज्ञ कधीतरी पंढरीदादांच्या ‘हाताखालून’ गेलेले आहेत. मेकअपचे तंत्र जेव्हा पुरेसे विकसितही झाले नव्हते तेव्हापासून दादांचा परिसस्पर्श हजारो चेहऱ्यांना झालेला आहे. चित्रपटसृष्टी ‘कृष्णधवल’कडून रंगांच्या युगात आली तेव्हा छायाचित्रण, वेशभूषा, रंगभूषा या सर्वच गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे ‘कृष्णधवल’च्या युगात ज्यांची चलती होती, असे अनेकजण ‘रंगांशी’ जुळवून घेण्यात अपयशी ठरले किंवा कमीतरी पडले. पंढरीदादा जूकर यांनी मात्र हे आव्हान सहजगत्या स्वीकारले .‘मधुबाला’पासून ‘मीनाकुमारी’पर्यंत आणि तेथून माधुरी दीक्षित, जुही चावलापर्यंतचा एक मोठा टप्पा गाठला. माधुरीचं नाव या ठिकाणी प्रामुख्यानं घ्यावं लागलं कारण पंढरीदादांच्या मते माधुरी दीक्षितचा चेहरा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अलीकडल्या काळातला सर्वाधिक वेधक चेहरा होता. माधुरीनंतर त्यांना थोडेफार आकर्षक, आव्हानात्मक वाटले ते मनिषा कोइराला आणि सुश्मिता सेन हे दोनच चेहरे. आजही प्रत्येक मोठी नायिका आणि हिंदी-मराठी मालिकांमधील छोटय़ा-मोठय़ा अभिनेत्रीही आपल्या चेहऱ्याला पंढरीदादांच्या मेकअपचा स्पर्श व्हावा म्हणून उत्सुक असतात. कारण त्या त्या चेहऱ्याची सौंदर्यस्थळे काय आहेत, पडद्यावर चेहर दिसतो तेव्हा नेमका तो कोणत्या बाजूने अधिक आकर्षक दिसतो याबाबतचे नेमके मार्गदर्शन पंढरीदादा करतात. १९६१ साली सुरू झालेला त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास, मीनाकुमारी, माला सिन्हा, मधुबाला, वहिदा रेहमान, हेमामालिनी, श्रीदेवी, स्मिता पाटील असा आजच्या काळापर्यंत येऊन ठेपला आहे. त्या काळात मेकअपसाठी केवळ ‘व्हाइट जेली’ उपलब्ध असे, भूवया कोरण्यासाठी काजळाचा वापर होत असे आणि व्यक्तिरेखा ‘म्हातारी’ करताना केस पांढरे करण्यासाठी अंडय़ाचा बलक हा एकमेव पर्याय असे. एवढय़ा मर्यादित साधनांचा वापर करूनही नायिकांचे सौंदर्य पडद्यावर उठून दिसत असे कारण दादांच्या मते त्या चेहऱ्यांमध्येच नैसर्गिक गोडवा होता. पंढरीदादा जर ‘मेकअप’साठी उपलब्ध नसतील तर मीनाकुमारी चित्रिकरणासाठी येतच नसे. ‘त्यांच्या चेहऱ्यांवर फार कमी मेहनत घ्यावी लागत असे,’ असे दादा आवर्जुन सांगतात; परंतु सुंदर चेहरेही अधिक सुंदर करण्यात दादांचा हात कोणी धरू शकत नाही. ‘चांदणी’ किंवा ‘लम्हे’मधली श्रीदेवी आणि ‘हम आपके है कौन’मधील माधुरी नेहमीपेक्षा वेगळी भासते कारण पंढरीदादांनी त्यांना ‘मेकअप’मधून काही वेगळी वैशिष्टय़े बहाल केली होती. ‘डर’च्या वेळी जुही चावला आणि पंढरीदादांची प्रथमच गाठ पडली. हा चित्रपट पाहून जुही चावला म्हणाली ‘मी यापूर्वी कधीही एवढी सुंदर दिसले नव्हते.’ गेली पााच दशके ‘ग्लॅमर’ला ग्लॅमरस करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या पंढरीदादा जूकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कर देण्यात येत आहे. चित्रपटसृष्टीतील अभिनय, दिग्दर्शनाव्यतिरिक्त इतर अंगांना क्वचितच असे पुरस्कार दिले जातात. पंढरीदादांच्या निमित्ताने पुरस्कार देणाऱ्यांचे लक्ष अशा उपेक्षित विभागांकडे गेले तर खुद्द पंढरीदादांनाही त्याचा अधिक आनंद होईल. आज आथुनिक साधने हाताशी असताना अनेक गोष्टी सहजसाध्य झालेल्या आहेत, परंतु हे सर्व नसतानाही आजच्यापेक्षा अधिक उत्तम परिणाम साधला जात होता याचे रहस्य आहे कलांच्या जाणिवांमध्ये आणि निष्ठेमध्ये!

  • मिलिंद तुळाणकर

    जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी ते वाजवितात.

  • भगवंत गांगल

    भगवंत गांगल यांचे लेखन हे सहजस्फुर्तीमधून जन्माला आले. लेखनीक व्हायचे या आकांक्षेने ते कधीच जगले नसल्यामुळे, त्यांची लेखणी ही व्यावसायिक ध्येयाने कधीच मुहूर्तरूपात उमटली नाही. त्यात सफाईदारणा किंवा आभ्यासपूर्ण लिखाणामुळे जमून आलेली खमंग फोडणी नव्हती, परंतु मानवी स्वभावाच्या विवीध कडांच्या अचूक चित्रणामुळे, ती रसिकांच्या मनाला मात्र चांगलीच भावली. कथा व कादंबरी या दोन वाचकप्रिय प्रकारांना आपलेसे करून त्यांनी पहिल्यांदा हातात लेखणी धरली होती. त्यातून मध्यमवर्गीयांच्या भावना व मनोजीवनाचे हुबेहूब चित्रण करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. नव्या व काहीश्या अपारंपारिक, विचारांची कुपी पहिल्यांदा आपल्या साहित्यातून वाचकांपर्यंत पोहोचवणारे लेखक ही ओळख त्यांना अल्पावधीत मिळाली. नव्या पिढीचे स्पष्ट विचार, पारदर्शीपणे तिच्या तत्वांचा, स्वप्नांचा व आकांक्षाचा आपल्या साहित्यामधून केलेला जिवंत उहापोह, ही खरं तर त्या काळामध्ये त्यांनी उचललेली धाडसी पाऊले होती. त्यामुळे त्यांचे साहित्य हे कर्मठ व सनातनी लोकांच्या पचनी पडलेले नसले, तरी तरूणांनी त्यांच्या साहित्याची पताका नेहमी उंचावरच फडकवत ठेवली.

    क्षणचित्रे (१९३८), शल्ये (१९४४), आसवांची माळ (१९३४), पिंजर्‍यातील पक्षी (१९३८), पाझर (१९४०), रंगाचे घर (१९४४) या कादंबर्‍यांद्वारे त्यांनी मनुष्यस्वभावाच्या विविधांगी पैलुंचा, त्यांना झालेला साक्षात्कार कलात्मकरितीने रसिकांसमोर मांडला. हे सर्व रसिकांना पटवून देण्यासाठी त्यांनी, अनेक रोचक पात्रांचा व उत्कंठावर्धक परिस्थितींचा परस्परसंबंध मोठया कुशलपणे गुंफला. समाजात आपण पाहिलेले, ऐकलेले, अनुभवलेले, नजरेस पडलेले सांस्कृतिक व नागरी जीवन संक्षिप्तरूपात चितारण्याच्या एकाच ध्येयाने, त्यांनी विपुल लेखन केले. हे ध्येय त्यांच्या साहित्याने काही प्रमाणात पुर्ण केले हे नक्की सांगता येईल. गांगलांनी त्यांच्या अनेक कथांमधून, त्या काळानुरूप विस्फोटक असलेल्या सामाजिक गोष्टींवर बिनधास्त मते नोंदवली. जसे- अधोगती की उध्दार या कथेमध्ये विधवाविवाहाची उपयुक्तता रसिकांमनावर बिंबवण्यासाठी, त्यांनी एक अप्रतिम व ओघवता कथासाचा निर्माण केला होता. आसवांची माळ या कथेतून त्यांनी प्रेमविवाहाचा जाज्वल्य पुरस्कार केला. मनाविरूध्द विवाह घडावून आणल्याने भविष्यात कोणते भीषण परिणाम होऊ शकतात, व प्रत्येक व्यक्तीला इमानाने आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार न दिल्याने कोणती परिस्थिती उद्भवु शकते, हे रसिकांना ह्या कादंबरीने प्रभावीपणे पटवून दिले होते. ही कादंबरी देखील भरपुर वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे नव्या जाणीवेने केलेले स्पष्टवक्ते लेखन हा त्यांच्या कथेचा आत्मा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आसवांची माळ या कादंबरीचा अपवाद सोडला तर पुढील लेखनात त्यांनी साध्या साध्या अर्थपूर्ण प्रसंगांतून घरगुती जिव्हाळ्याचे वातावरण तयार केले. पात्रांच्या वास्तव आणि मनोजीवनाचे धागे एकमेकांमध्ये, कौशल्यपुर्ण प्रसंग रचनेच्या व लक्षवेधी संवादांच्या साहाय्याने गुंतवून, वाचकांना त्या पात्राच्या भावविश्वामध्ये गुंगवून ठेवण्याचे कसब त्यांनी चांगलेच अवगत केले होते.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • मदन महादेव देशपांडे

    एक सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित, कुटुंबवत्सल, लेखक, यशस्वी उद्योजक, शास्त्रज्ञ व डॉ. होमी भाभांचे जीवनाभ्यासक श्री. मदन महादेव देशपांडे.

  • उमेश इनामदार

    श्री. उमेश इनामदार यांचा जन्म १९६० साली मुंबई येथे झाला. शालेय शिक्षण मुंबई येथील पोद्दार हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पूर्ण केले.

  • सुधीर वैद्य

    सुधीर वैद्य हे भारतामधील अत्यंत प्रथितयश व सर्वपरिचीत असे व्यावसायिक संख्यातज्ञ, संकलक, व क्रिकेटविषयक चतुरस्त्र लेखन करणारे प्रतिभावंत लेखक आहेत.

    गेली ५० वर्षे भारतामध्ये व भारताबाहेर खेळवल्या गेलेल्या प्रत्येक कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा संपूर्ण लेखाजोगा, त्या सामन्यातील प्रत्येक रंगतदार क्षणांसह त्यानी आपल्या संग्रही जतन केला गेल्या असल्याने, साहजिकच क्रिकेटमधील जाणकारांचा व चाह्त्यांचा त्यांच्याकडे कायम राबता असतो.

    क्रिकेट डोळसपणे पाहण्याची व त्यातील सर्व बारीक घडामोडी, तांत्रिक आकडेमोड, गोलंदाजांनी टिपलेले बळी, फलंदाजांनी ठोकलेल्या धावा, पकडले गेलेले झेल, दोन्ही संघांच्या व्यूहरचना व धावसंख्या एवढेच काय, तर त्या सामन्याचे ठिकाण व ऐतिहासिक महत्व अशा 'अ पासून ते ज्ञ' पर्यंतच्या सगळ्या तांत्रिक व अतांत्रिक माहितीचे संकलन करणे, ही त्यांची, लहानपणापासून जाणीवपुर्वक वृध्दिंगत केली गेलेली आवड होती. या आवडीला व्यावसायिक साचा देण्यात ते पुर्णतः यशस्वी ठरले आहेत.

    गेली पंधरा वर्षे भारतीय क्रिकेट बोर्ड त्यांच्या अचूक विश्लेषणांचा व काळजीपुर्वक केल्या गेलेल्या सांख्यिक निरीक्षणांचा लाभ अव्याहतपणे घेत आहे. असामान्य विश्वासार्हता, ही त्यांनी आजवर या क्रीडा पटलावरती निरंतर काम व प्रामाणिक मेहेनत करून केलेली कमाई आहे.

    भारतीय क्रिकेट बोर्डाकडून दर वर्षी संपादित व प्रकाशित केल्या जाणार्‍या विविध सांख्यिक वार्षिक अंकांचे लेखन गेली अनेक वर्षे ते नियमीतपणे करत आले आहेत. क्रिकेट या खेळाचा जेव्हा व्यावसायिक दृष्टीने पुनर्जन्म झाला, तेव्हापासून आतापर्यंत झालेले जवळजवळ २००० कसोटी सामने, ३,१०० एकदिवसीय सामने, व ५००० प्रथम श्रेणी क्रिकेट सामने, या सगळ्या सामन्यांचा विस्तृतपणे घेतलेला आढावा, तसेच सांखिक व असांख्यिक माहितीचा दुर्मिळ खजिना त्यांच्याकडे, विविध आकाराच्या फाईली व रजिस्टर पुस्तकांमध्ये सुरक्षित आहे. यासाठी नुकतीच त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्येही झाली आहे.

    गेली अनेक वर्षे सुधीर वैद्य यांचा मुक्काम ठाणे शहरात आहे. मध्यंतरी दाभोळ येथील एन्रॉन वीज प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी म्हणुनही त्यांनी काम पाहिले होते.

  • श्री. पु. भागवत

    मौज या मराठीमधील सर्वात जुन्या व उल्लेखनीय प्रकाशन संस्थेचे साक्षेपी संपादक व प्रकाशक राहिलेल्या श्री. पु. भागवत यांचा जन्म २७ जानेवारी १९२३ रोजी झाला .

    मुंबई विद्यापीठातून एम.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९५० ते २००७ या काळात मौज या संस्थेला स्वतःची प्रेस व फाउंड्री मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. खटाव वाडीतील त्यांच्या कार्यालयामधून ही संस्था कार्यरत असत. मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड भागवतांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या.

    मौज प्रकाशनच्या मौज (साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक अशी त्यांची ख्याती झाली. प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती अश्या माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

    महाबळेश्वर येथे ३१ जानेवारी १९८७ रोजी पार पडलेल्या तिसर्‍या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष पद भागवत यांनी भुषविले होते.

    २१ ऑगष्ट २००७ या दिवशी श्री. पु. भागवत यांचे निधन झाले.

    भागवत यांच्या स्मत़ीप्रित्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेला श्री.पु. भागवत पुरस्कारने सन्मानित करते. आजपर्यंत औरंगाबाद येथील 'साकेत' प्रकाशन, मौज प्रकाशनच्या संजय भागवत व मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेला या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

    अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

    प्रकाशक श्री पु भागवत (27-Dec-2021)

    पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक श्री.पु.भागवत (27-Dec-2018)