बी. टी. देशमुख

विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत प्रा. बी. टी. देशमुख यांचा पराभव झाल्याने, प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या शैक्षणिक चळवळीचा आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या संसदीय संघर्षांचाही पराभव झाला आहे. भाऊराव तुळशीरामजी उपाख्य बी. टी. देशमुख नावाची चळवळ १९६० साली अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात सुरू झाली आणि पाहता पाहता या चळवळीने राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात संचार सुरू केला.

विद्यार्थी असतानाच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बी. टी. सहभागी झाले. बी. टीं.च्या घरी अठराविश्वे दारिद्रय़ होते. पण, तरूण वयापासूनच परिस्थितीला शरण न जाता संघर्षरत राहण्याची बी.टीं.ची वृत्ती होती. शिक्षण आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, अशा दोन्ही आघाडय़ांवर सक्रिय राहण्यासाठी पोट किमान भरलेले असावे, ही मूलभूत गरज होती आणि ती भागवण्यासाठी भाऊराव नावाचा हा युवक चक्क कंपोझिटरचे म्हणजे छापखान्यात अक्षरे जुळवण्याचे काम करत असे. कंपोझिटरची ही नोकरी करत करतच राज्यशास्त्र या विषयात एम.ए. ची पदवी संपादन केली आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. तो काळ शिक्षकी पेशासाठी कमी वेतन आणि प्रामाणिकपणे विद्यादानाचा होता. विद्यादान करणाऱ्यांना चरितार्थासाठी येणाऱ्या अडचणी स्वत: अनुभवताना बी. टीं. मधला चळवळ्या जागा झाला. त्यातूनच महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसाठी विदर्भभर आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. नेतृत्वासाठी नैतिक पातळीवर असणारे स्वच्छ चारित्र्य त्यांच्याजवळ होतेच. त्यामुळे शिक्षक चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे आपसूकपणे चालत आले. नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाचे (नुटा) १९७३ पासून आजपर्यंत ते अध्यक्ष आहेत. सलग एखाद्या चळवळीचे ३७ वर्षे अध्यक्षपद भूषवले जाण्याचा हा विक्रमच असावा! ‘नुटा’चे अध्यक्षपद सांभाळत असतानाच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे अपरिहार्यपणे आले. चळवळी उभारतानाही विद्यादानाच्या व्रतापासून बी. टी. क्षणभरही ढळले नाहीत. प्राध्यापकपदाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होईपर्यंत म्हणजे ३०-३२ वर्षे बी.टी. नियमितपणे शिकवत असत. केवळ रस्त्यावर संघर्ष करून शिक्षकांचे प्रश्न सोडवता येणार नाही, म्हणून १९८० साली बी.टीं.नी विदर्भ पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेत प्रवेश केला. अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी बी.टीं.नी विधिमंडळात सर्व संसदीय अस्त्रांचा वापर केला. हे विद्यापीठ स्थापन झाल्यावर म्हणजे १९८६ मध्ये हा मतदारसंघ अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. या मतदारसंघातून सलग पाच वेळा बी.टी. विधान परिषदेवर विजयी झाले. ३० वर्षांच्या संसदीय जीवनात त्यांची प्रतिमा अभ्यासू आमदार म्हणून राहिली. शिष्टाचाराचा, वर्तनाचा कोणताही तोल ढळू न देणारा आणि तरी अत्यंत आक्रमक आमदार म्हणून बी. टी. देशमुख यांची कारकीर्द तेजस्वी राहिली, तशीच ती निष्कलंकही राहिली. याच संयत आक्रमकतेच्या जोरावर शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यात बी.टीं.ना यश आले. एखाद्या विषयावर बी. टी. बोलायला लागले तर संपूर्ण सभागृहात पूर्ण शांतता असे. दहा-बारा वर्षांत बी.टी. आणि नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सभागृहात विदर्भाच्या अनुशेषाच्या निवारणासाठी जो ‘संसदीय संघर्ष’ उभारला गेला, त्याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल. विदर्भाच्या विकासाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना देशमुख-गडकरी या दुकलीने अक्षरश: सळो की पळो करून सोडले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर गडकरी दिल्लीला गेले आणि विकासाच्या संसदीय लढाईची जबाबदारी एकटय़ा बी.टीं. वर आली. एकाच वेळी संसदीय आणि उच्च न्यायालय अशा दोन पातळ्यांवर एकहाती ही लढाई बी.टी. लढत होते. बी.टीं.च्या पराभवामुळे विधान परिषदेतील या लढाईचे नेतृत्वच संपले आहे, असे नव्हे तर या लढाईची धार अतिशय बोथट झाली आहे. विधान परिषद निवडणुकीतील बी.टी. देशमुख यांच्या पराभवाचा अर्थ इतका असा व्यापक आहे आणि विदर्भाचे केवढे मोठे नुकसान झालेले आहे, हे स्पष्ट करणारा आहे. बी.टी. देशमुख तन आणि मनाने चळवळे आहेत. वयाच्या सत्तरीतही चैतन्याने फुललेलेच आहेत. ते हार मानणार नाहीत. आता पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरू करतील. त्यांच्या पुढच्या लढाईला शुभेच्छा!



विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत प्रा. बी. टी. देशमुख यांचा पराभव झाल्याने, प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या शैक्षणिक चळवळीचा आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या संसदीय संघर्षांचाही पराभव झाला आहे. भाऊराव तुळशीरामजी उपाख्य बी. टी. देशमुख नावाची चळवळ १९६० साली अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात सुरू झाली आणि पाहता पाहता या चळवळीने राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात संचार सुरू केला.

विद्यार्थी असतानाच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बी. टी. सहभागी झाले. बी. टीं.च्या घरी अठराविश्वे दारिद्रय़ होते. पण, तरूण वयापासूनच परिस्थितीला शरण न जाता संघर्षरत राहण्याची बी.टीं.ची वृत्ती होती. शिक्षण आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, अशा दोन्ही आघाडय़ांवर सक्रिय राहण्यासाठी पोट किमान भरलेले असावे, ही मूलभूत गरज होती आणि ती भागवण्यासाठी भाऊराव नावाचा हा युवक चक्क कंपोझिटरचे म्हणजे छापखान्यात अक्षरे जुळवण्याचे काम करत असे. कंपोझिटरची ही नोकरी करत करतच राज्यशास्त्र या विषयात एम.ए. ची पदवी संपादन केली आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. तो काळ शिक्षकी पेशासाठी कमी वेतन आणि प्रामाणिकपणे विद्यादानाचा होता. विद्यादान करणाऱ्यांना चरितार्थासाठी येणाऱ्या अडचणी स्वत: अनुभवताना बी. टीं. मधला चळवळ्या जागा झाला. त्यातूनच महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसाठी विदर्भभर आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. नेतृत्वासाठी नैतिक पातळीवर असणारे स्वच्छ चारित्र्य त्यांच्याजवळ होतेच. त्यामुळे शिक्षक चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे आपसूकपणे चालत आले. नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाचे (नुटा) १९७३ पासून आजपर्यंत ते अध्यक्ष आहेत. सलग एखाद्या चळवळीचे ३७ वर्षे अध्यक्षपद भूषवले जाण्याचा हा विक्रमच असावा! ‘नुटा’चे अध्यक्षपद सांभाळत असतानाच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे अपरिहार्यपणे आले. चळवळी उभारतानाही विद्यादानाच्या व्रतापासून बी. टी. क्षणभरही ढळले नाहीत. प्राध्यापकपदाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होईपर्यंत म्हणजे ३०-३२ वर्षे बी.टी. नियमितपणे शिकवत असत. केवळ रस्त्यावर संघर्ष करून शिक्षकांचे प्रश्न सोडवता येणार नाही, म्हणून १९८० साली बी.टीं.नी विदर्भ पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेत प्रवेश केला. अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी बी.टीं.नी विधिमंडळात सर्व संसदीय अस्त्रांचा वापर केला. हे विद्यापीठ स्थापन झाल्यावर म्हणजे १९८६ मध्ये हा मतदारसंघ अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. या मतदारसंघातून सलग पाच वेळा बी.टी. विधान परिषदेवर विजयी झाले. ३० वर्षांच्या संसदीय जीवनात त्यांची प्रतिमा अभ्यासू आमदार म्हणून राहिली. शिष्टाचाराचा, वर्तनाचा कोणताही तोल ढळू न देणारा आणि तरी अत्यंत आक्रमक आमदार म्हणून बी. टी. देशमुख यांची कारकीर्द तेजस्वी राहिली, तशीच ती निष्कलंकही राहिली. याच संयत आक्रमकतेच्या जोरावर शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यात बी.टीं.ना यश आले. एखाद्या विषयावर बी. टी. बोलायला लागले तर संपूर्ण सभागृहात पूर्ण शांतता असे. दहा-बारा वर्षांत बी.टी. आणि नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सभागृहात विदर्भाच्या अनुशेषाच्या निवारणासाठी जो ‘संसदीय संघर्ष’ उभारला गेला, त्याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल. विदर्भाच्या विकासाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना देशमुख-गडकरी या दुकलीने अक्षरश: सळो की पळो करून सोडले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर गडकरी दिल्लीला गेले आणि विकासाच्या संसदीय लढाईची जबाबदारी एकटय़ा बी.टीं. वर आली. एकाच वेळी संसदीय आणि उच्च न्यायालय अशा दोन पातळ्यांवर एकहाती ही लढाई बी.टी. लढत होते. बी.टीं.च्या पराभवामुळे विधान परिषदेतील या लढाईचे नेतृत्वच संपले आहे, असे नव्हे तर या लढाईची धार अतिशय बोथट झाली आहे. विधान परिषद निवडणुकीतील बी.टी. देशमुख यांच्या पराभवाचा अर्थ इतका असा व्यापक आहे आणि विदर्भाचे केवढे मोठे नुकसान झालेले आहे, हे स्पष्ट करणारा आहे. बी.टी. देशमुख तन आणि मनाने चळवळे आहेत. वयाच्या सत्तरीतही चैतन्याने फुललेलेच आहेत. ते हार मानणार नाहीत. आता पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरू करतील. त्यांच्या पुढच्या लढाईला शुभेच्छा!

Author