(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • सयाजीराव गायकवाड (महाराजा)

    महाराजा सयाजीराव गायकवाड या नावाने ओळखले जाणारे प्रजाहितदक्ष, आदर्श असे नरेश. पूर्वाश्रमीचे ते गोपाळ काशीराम गायकवाड. अतिशय गरीब घरातला एक हुशार, चुणचुणीत मुलगा. १० मार्च १८६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवणाणे येथे त्यांचा जन्म झाला.

  • नारायण सीताराम फडके

    फडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

  • रघुनंदन बर्वे

    रघुनंदन बर्वे हे सर्वपरिचीत व कौशल्यवान लेखक, दिग्दर्शक, एडिटर, व फ्री लान्सींग करणारे कलाकार आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल योगदान समाजाच्या विवीध स्तरांमधुन वाखाणलं गेलेलं आहे. झी टॉकिज सारख्या प्रतिष्ठीत चित्रपट निर्माण कंपनीमध्ये कायमस्वरुपी, लेखक व दिग्दर्शक रुजु झालेल्या रघुनंदनने त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचा उत्तम फायदा मिळवला आहे. मराठी व्यासपीठ गाजवलेल्या व सर्वसामान्य रसिकांच्या हृद्यास स्पर्शुन गेलेल्या अनेक मालिकांची, चित्रपटांची व म्युझिक अल्बम्सची लांबलचक यादी त्याच्या सफाईदार दिग्दर्शनाखाली तावुन सुलाखून निघालेली आहे.

  • एल.पी उर्फ लक्ष्मीकांत

    लक्ष्मीकांत यांचे पूर्ण नाव लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्विकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते ईमानदार राहीले.

  • वासुदेव सिताराम बेंद्रे

    इतिहास संशोधकांचे मुकुटमणी वि. का. राजवाडे यांना गुरू मानून वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी त्यांची संशोधनाची परंपरा एकनिष्ठेने पुढे चालवली. शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास अथक संशोधन करून महाराष्ट्रालाच नव्हे, तर जगाला दाखवून देण्याचं अभूतपूर्व कार्य बेंद्रे यांनी केलं आहे.

  • बापूसाहेब जोशी

    जोशी, बापूसाहेब

    ‘प्रसाद’ प्रकाशनाचे संस्थापक, साहित्यिक य. गो. जोशी ऊर्फ भाऊ यांच्या अखेरच्या काळातील ही गोष्ट. भाऊंनी त्यांच्या चिरंजीवाला सांगितले, ‘बघ, या व्यवसायात पडणार असशील, तर मी बरीच प्रकाशने करून ठेवली आहेत. ती विकत राहिलास तरी तुझा चरितार्थ चालेल.’ त्यावर चिरंजीव म्हणाले, ‘काय भाऊ, य. गो. जोशींच्या मुलाला तुम्ही स्टॉक विकायला सांगताय. मी तुमच्याही पुढे जाईन.’ भाऊंचे चिरंजीव म्हणजे मनोहर ऊर्फ बापूसाहेब जोशी.

    ऐन विशी-बाविशीतच बापूसाहेब वडिलोपार्जित प्रकाशन व्यवसायात उतरले, प्रसाद मासिकाचे संपादक झाले आणि व्यवयासात यश मिळवत, कर्तृत्वाचा ठसा उमटवत त्यांनी वडिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. बापूसाहेब म्हणजे सदाप्रसन्नता, उत्साह आणि उमदेपणा. बापूसाहेबांचे गेल्या शुक्रवारी पुण्यात निधन झाले. सदाशिव पेठेतील प्रसाद प्रकाशनाच्या कार्यालयात आता बापूसाहेबांचा दरबार पुन्हा कधीच भरणार नाही, ही कल्पनाही खूप वेदना दायक आहे. मराठी ग्रंथांसाठी ठेव म्हणून रक्कम ठेवा, ठेवीच्या व्याजातून ग्रंथ मिळवा आणि मुदतीनंतर ठेव परत न्या, अशी अभिनव योजना बापूसाहेबांनीच १९८० मध्ये प्रथम आणली आणि पुढे अशा सहा योजना त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. या योजनांमधील ९९ ग्रंथांपैकी ८४ ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले आहेत आणि उर्वरित प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ‘आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे,’ ‘सुबोध शांकर ग्रंथावली,’ ‘देवभाषेचे देणे: मराठीचे लेणे’ या ग्रंथ ठेव योजना मोठय़ा प्रतिसादाने पूर्ण झाल्या आणि ‘समर्थ वाग्वैजयंती,’ ‘अभिनव प्रसन्न दर्शन’ ‘पंचमहाकाव्ये’ या योजनातील ग्रंथ प्रसिद्धीचे काम सुरू आहे. भारतीय संस्कृतीची सर्वार्थाने नव्याने ओळख करून देणारे बापूसाहेबांचे हे ग्रंथप्रकल्प यशस्वी झाले ते त्यांच्या परिश्रमांमुळे, बिनचूक नियोजनामुळे, अफाट लोकसंग्रहामुळे आणि पारदर्शी व्यवहारांमुळे. गेली ५० वर्षे ‘प्रसाद’ मासिक प्रसिद्ध करताना त्यांनी दरवर्षी एक दैवत विशेषांक प्रसिद्ध करण्याची योजना सलग २८ वर्षे चालवली. त्यानंतर नद्यांवरील विशेषांक प्रसिद्ध केले. प्रत्येक दिवाळी अंकात ते एक विस्तृत संतचरित्र प्रसिद्ध करीत असत. त्यांचे हे सारे विशेषांक आजही संदर्भग्रंथासारखेच वापरले जातात. प्रकाशनाचा व्याप सांभाळतानाच प्रसिद्ध श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त म्हणूनही बापूसाहेबांनी अतिशय उत्साहाने सुमारे २५ वर्षे काम पाहिले. बापूसाहेबांवर मराठी वाचकांनी मोठा विश्वास दाखवला. ‘आमची ठेवीची रक्कम परत नको. आमचे पैसे तुमच्या चांगल्या कामासाठीच वापरा,’ असे सांगून अनेक ठेवीदार मुदत संपल्यानंतर त्यांची ठेव बापूसाहेबांनाच परत देत असत. असे प्रेम करणारे वाचक बापूसाहेबांना लाभले आणि तीच त्यांची प्रकाशन व्यवसायातील ‘मोठी ठेव’ ठरली. बापूसाहेबांच्या बरोबरीने त्यांची कन्या उमा बोडस याही गेली दोन दशके प्रकाशनाचे काम पाहत आहेत. बापूसाहेबांनी हाती घेतलेल्या अनेक योजना पुढे नेण्याची जबाबदारी आता या पुढच्या पिढीकडे आली आहे.

  • मधुकाका कुलकर्णी

    श्रीविद्या प्रकाशनचे श्री मधुकाका कुलकर्णी.

    गेली कित्येक वर्षे, अनेक दर्जेदार ग्रामीण कवी व नवोदित लेखकांचे आर्थिक चणचणींमुळे अंधारात राहिलेले साहित्य आकर्षक व सुबक रूपांमध्ये प्रकाशित करून ते नावारूपास आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. स्थानिक ग्रामीण कवी व लेखकांना ओळख मिळवून देण्यात मधुकाकांचा मोलाचा वाटा आहे.

    कोणत्याही जादा अपेक्षांचे ओझे साहित्यिकांवर न लादता त्यांनी अनेकजणांना या क्षेत्रात आर्थिक भरभराट व सुबत्ता मिळवून दिली. उपेंद्र कुलकर्णींचे विपूल व दर्जेदार साहित्य त्यांनी पुस्तकरूपांत आणले आहे.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • व्ही. शांताराम (शांताराम वणकुद्रे)

    व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट. व्ही. शांताराम यांचे पूर्ण नांव शांताराम वणकुद्रे. वयाच्या १९ व्या वर्षीच ते महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले.

  • शुभा खोटे

    चित्रपटांची संपूर्ण दुनिया ग्लॅमरभोवती फिरते त्यामुळे अनेकदा पुरस्कारांवर प्रमुख नट-नटय़ांचीच नावे कोरली जातात आणि चरित्र अभिनेते त्यापासून वंचित राहतात. पी. सावळाराम पुरस्कारांमध्ये शुभा खोटेंचे नाव येणे हे त्यामुळे चकित आणि आनंदित करणारे आहे. पावणेदोनशे चित्रपटांमध्ये आणि अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये तसेच इंग्रजी रंगभूमीवर सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या शुभा खोटे यांच्या अभिनय प्रतिभेचे खरे तर कधीच गांभीर्याने विश्लेषण झाले नाही.

    अनेकदा अभिनेते प्रसिद्धीकडे गांभीर्याने पाहत नाहीत आणि प्रसार माध्यमांचेही डोळे कायम प्रमुख अभिनेत्यांकडेच लागलेले असतात. शुभा खोटे यांनी अगदी सुरुवातीला नायिका, सहनायिका म्हणून काही चित्रपट केले; परंतु त्याची कारकीर्द खरी गाजली ती चरित्रनायिका अथवा विनोदी अभिनेत्री म्हणून. किंबहुना विनोदी अभिनेत्यांच्या प्रभावळीत स्वत:चे असे स्वतंत्र स्थान मिळवू शकलेल्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये शुभा खोटेंचे नाव अव्वल क्रमांकावर आहे. क्रीडाक्षेत्रात मनापासून रमत असलेल्या किशोरवयीन शुभा खोटेचे एक छायाचित्र पाहून निर्माता-दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी तिला ‘सीमा’ या चित्रपटात भूमिका दिली. १९५५ साली आलेल्या या चित्रपटात शुभा खोटे कॉलेज कन्यका म्हणून सायकल चालविताना दिसल्या. शुभा खोटेंच्या विनोदी शैलीत सांगायचे झाले तर ‘सीमा’नंतर त्यांची अभिनयक्षेत्रातील वाटचाल ‘सायकल’ सारखीच झाली. म्हणजे नायिकेसारखी ‘मोटरगाडी’ची कारकीर्द तिच्या वाटय़ाला आली नाही. अर्थात शुभा खोटेंनी स्वत:ला अगदी सुरुवातीपासूनच वैविध्याची चटक लावली.

    ‘पेईंग गेस्ट’मध्ये त्यांनी चक्क खलनायिका साकारली होती. परंतु आपली ही व्यक्तिरेखा पडद्यावर पाहण्याची त्यांची स्वत:चीच हिंमत झाली नाही. १९५७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट शुभा खोटेंनी १९८० नंतर कधीतरी व्हिडीओवर पाहिला म्हणतात. १९५९ साली प्रदर्शित झालेला एल. व्ही. प्रसाद यांचा ‘छोटी बहन’ हा चित्रपट शुभाबाईंच्या अभिनय कारकीर्दीतला खरा ‘टर्निग पॉईंट’ म्हणावा लागेल. मेहमूद, शुभा खोटे आणि धुमाळ ही धमाल ‘तिकडी’ किंवा ‘त्रिकूट’ याच चित्रपटापासून जन्माला आले आणि पुढील जवळपास दोन दशके त्यांनी संगीतमय प्रेमपटांमध्ये धमाल उडविली. शुभा खोटे आणि मेहमूद यांची प्रेमकथा आणि शुभाच्या वडिलांच्या भूमिकेत धुमाळ. धुमाळ सतत या दोघांच्या पाळतीवर, अशी ‘हमखास हास्यकथा’ त्यात असे. ससुराल, दिल एक मंदिर, दिल तेरा दिवाना, भरोसा, जिद्दी अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रेमाची ही लपवाछपवी रंगली. त्यातूनच ‘मै तेरे प्यार मे क्या क्या न बना दिलवर’ सारखी धमाल गाणी जन्माला आली. चित्रपटाच्या मुख्य कथानकातले ताण-तणाव सुसह्य करण्याचे काम या तिघांनी चोख बजावले.

    नर्स, शेजारीण, आई, मैत्रिण, ख्रिश्चन शेजारीण, शाळेची मुख्याध्यापक, मुलींच्या वसतीगृहाची प्रमुख अशा अक्षरश: शेकडो व्यक्तिरेखा शुभा खोटेंनी १९७० नंतरच्या शंभरेक चित्रपटांमधून साकारल्या. परंतु त्यात लक्षात राहिली ती ‘एक दुजे के लिये’मधली ‘सपना’ची अर्थात रती अग्निहोत्रीची प्रेमद्वेष्टी आई. वासूनं पाठवलेली चिठ्ठी सपनाची आई जाळून टाकते, तेव्हा त्या पत्राची राख कॉफीत घालून सपना ती कॉफी पिऊन टाकते. तेव्हा ‘सपनाची आई’ म्हणून शुभा खोटेंनी दिलेला ‘लूक’ केवळ अवर्णनीय म्हणावा लागेल. चित्रपटांमधील भूमिकांचा वेग मंदावल्यावर शुभा खोटेंनी मराठी चित्रपट निर्मितीचाही प्रयत्न करून पाहिला. १९६७ साली ‘चिमुकला पाहुणा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही शुभा खोटे यांनी केले. अर्थात एकाच चित्रपटात ही मोहीम थंडावली आणि नंतरच्या काळात शुभा खोटेंनी इंग्रजी रंगभूमीकडे मोर्चा वळविला.

    भरत दाभोळकर यांच्या अनेक ‘हिंग्लीश’ नाटकांमध्ये ‘देशी विनोद’ करणाऱ्या व्यक्तिरेखा त्यांच्या वाटय़ाला आल्या. दरम्यानच्या काळात दूरचित्रवाणीवर विनोदी मालिकांचा सुकाळ झाला त्यातही त्यांनी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. परंतु गेली काही वर्षे त्या सवयीने आणि सरावाने भूमिका साकार करीत आहेत. आजही शुभा खोटेंचे नाव घेतले की, संगीतमय प्रेमकथांचा हिंदी चित्रपटांचा जमाना डोळ्यांपुढे येतो. धुमाळच्या ‘संरक्षणाखाली’ खोलीत बंद असलेली उपनायिका शुभा खोटे आणि तिच्या वियोगात ‘ऊर बडवीत’, ‘प्यार की आग मे तनबदन जल गया’ म्हणणारा मेहमूद. त्या सर्व मनोरंजक क्षणांसाठी आपण शुभाजींचे ऋणी आहोत!


  • डॉ. राजन गवस

    भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये आणि रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावर राजन गवस यांनी बारकाईनं अभ्यास करून समीक्षात्मक लेखन-संपादन केलं आहे. गवस यांच्या साहित्यात मांडणी आणि अभिव्यक्तीवर कळत-नकळतपणे या साहित्यिकांचा प्रभाव पडलेला दिसतोच.