महानुभावीय साहित्याची गूढ लिपी उकलून, महानुभावीय साहित्याचं संशोधन वि. भि. कोलते यांनी केलं.
अण्णा मार्तंड जोशी हे एक महाराष्ट्रीय नाटककार होते. ते अण्णासाहेब किर्लोस्करांचें समकालीन होते. अण्णासाहेबांच्या देखरेखीखालीं बेळगावमध्ये स्थापन झालेल्या “भरतशास्त्रोत्तेजक” मंडळींत जोशी होते.
राजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख आहे. कोल्हापूर. सावंतवाडी, गडहिंग्लज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
निपाणी येथील महिला बिडी कामगार व शेतकर्यांच्या तंबाखू आंदोलनापासून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. शिरगुप्पे यांचे “सडक” हे नाटक व त्यातील कविता आजही आंदोलकांच्या तोंडी आहेत.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी ते गेली दहा वर्षे जोडले गेले आहेत. धरणग्रस्त, देवदासी प्रथा निर्मूलनाच्या लढ्यातही ते सहभागी झाले होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांत भाग घेतला आहे. नाट्यलेखन व दिग्दर्शन म्हणून त्यांची अनेक नाटके गाजली आहेत.
तुकोबांच्या पत्नीच्या जीवनावरील “तिच्या नवर्याचे वैकुंठगमन”, “कपान”, “होते कुरुप वेडे”, “उंटावरचा शहाणा”, “आम्ही क्रांतिसिंह आहोत”, “हा आणि बारावा” अशी नाटकांचे लेखनही त्यांनी केले.
किशोर, मासिक ऋग्वेद, लोकमत वगैरेंमध्येही त्यानी विपुल लेखन केले आहे. हिंदू-मुस्लिम समस्येवर आधारित “षड्यंत्र” या माहितीपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. बसवाण्णांच्या तत्वज्ञानाचे ते गाढे अभ्यासक आहेत.
सांगली येथे झालेल्या दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राजाभाऊ शिरगुप्पे यांनी भुषविले आहे.
## Shirguppe, Rajendra Vitthal (Rajabhau Shirguppe)
## Shirguppe, (Prof) Rajendra Vitthal
गौरी देशपांडे या लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्पुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत.
अतिशय विद्वान व लोकप्रिय शिक्षक व संस्कृत भाषेचे गाढे आभ्यासक म्हणून मान्यता असलेल्या जनार्दन बाळाजी मोडक यांची १८८२ मध्ये ठाण्याच्या नामांकित बी. जे. हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. भारताच्या प्राचीन संस्कृत साहित्याच्या नानाविध पैलुंबद्दल, विशेष संशोधन व उत्खनन केल्यामुळे भारताच्या असंख्य परंपरांमधून वाहणार्या ज्ञानगंगोत्रीचे तीर्थ ते कोळून प्यायले होते.
ठाण्याच्या ऐतिहासिक छटांना गडद करणारे, व सांस्कृतिकरित्या समृध्द अशा नगरीची अचूक उहापोह व उलगडा करणारे पहिले पुस्तक जनार्दन मोडक यांनी लिहीले होते. यामध्ये ठाण्याच्या इतिहासाविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली होती. आजही लोक एक बिनचूक मार्गदर्शक या नात्याने या पुस्तकाचा संदर्भ घेत आहेत. काही काळ काव्योतिहास संग्रह या मासिकाशी त्यांचा निकटचा संबंध होता.
लेखन व संशोधनशास्त्राबरोबरच भारताच्या प्राचीन ज्योतिषशास्त्राविषयी त्यांच्या मनी प्रचंड उत्सुकता होती. या शास्त्राच्या विवीध पैलुंची उकल करून त्याला नव्या विज्ञानवादी, ज्ञानप्रवाहांचा आयाम द्यायचा हे त्यांचे स्वप्न होते. ठाण्याचे सुप्रसिध्द ज्योतिषविद्वान शंकर बाळकृष्ण दिक्षित यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्याकाळातील ज्योतिर्विषारद विसाजी कृष्णा लेले यांच्या सायनेवादावरील लेखनाने ते खुपच प्रभावित झाले होते. या दोघांनी व ठाण्यातील प्रसिध्द कवी भास्कर पाळंदे अशा तिघा विद्वानांनी मिळून मराठी भाषेतील पहिल्या पंचांगाची निर्मिती करुन ते प्रसिध्द केले. त्यांच्या ज्योतिषाशास्त्राच्या सखोल आभ्यासामुळे तसेच परिपक्व व्यासंगामुळे, पाश्चात्य इतिहासकार फ्लांट व डॉ. सेबेल यांना भारतीय कालगणना करणे सोपे गेले.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
लावणी म्हटलं की ' अप्सरा आली...' अन् 'मला जाऊ द्या ना घरी...' या लावण्या नवीन पिढीच्या ओठी सहजपणे येतात; पण याच लावणीला मान मिळावा म्हणून काहींनी आयुष्य खर्ची घातलं. त्यातील एक म्हणजे लीला गांधी. राज्य सरकारच्या व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली.
वयाच्या आठव्या वर्षापासून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत, तालबद्ध पदन्यास आणि त्याच तोडीच्या देहबोलीतून त्यांनी लावणी सादर करताना प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तमाशापटांचा जमाना सुरू झाल्यावर नृत्यपारंगत लीलाताईंच्या कारकीर्दीला खर्या अर्थाने 'ब्रेक' मिळाला. 'कुण्या गावाचं आलं पाखरू', 'ऐन दुपारी, यमुनातिरी' अशा त्यांच्यावर चित्रीत झालेल्या लावण्या असो, वा 'बुगडी माझी सांडली गं' सारख्या लावणीला लाभलेली त्यांची नृत्यदिग्दर्शनाची साथ असो; हा प्रकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यामध्ये, शब्द-संगीताची किमया तर होतीच; पण त्याचबरोबर पडद्यावर पाहायला मिळणारा लावणीचा शृंगार आणि ऐटबाज ठसका, यांचाही वाटा होता. पडद्यावर दाखवल्या जाणार्या लावणीतील नजाकत कायम राहून, ती बीभत्सपणाकडे झुकणार नाही, याची काळजी लीलाताईंनी घेतली. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो, टाळ्या-शिट्ट्यांची दाद मिळते म्हणून लावणीच्या सादरीकरणात त्यांनी तडजोड केली नाही. लावणीचे लावण्य त्यांनी जपले, जोपासले आणि त्यातील निखळ सौंदर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले.
तमाशा आणि लावणी याऐवजी मराठी चित्रपट आणि लावणी, असा काळ निर्माण करण्यात लीलाताईंचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. असंख्य चित्रपटांतून लावणीचा ठुमका सादर केल्यानंतर त्यांनी 'लीला गांधी नृत्यदर्शन' हा कार्यक्रमही राज्यभर सादर केला. रुपेरी पडद्यावरची त्यांची लावणी गाजली, तशीच लोकप्रियता त्यांच्या या कार्यक्रमालाही मिळाली. सादरीकरणासाठी उत्तम स्टेज, येण्या-जाण्याचा खर्च, निवासाची पंचतारांकित व्यवस्था अशा सुविधा नसतानाही केवळ लावणीचा प्रेक्षक तयार करण्यासाठी त्यांनी राज्याचा काना-कोपरा ढवळून काढला. शेतातल्या ढेकळांवर आणि मुलाच्या आजारपणाची पर्वा न करता 'शो मस्ट गो ऑन' यासाठी त्या सातत्याने कार्यरत राहिल्या.
खूप वर्षांनी मराठी चित्रपटांमध्ये लावणीला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे; पण त्याच्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार असलेल्या लीलाताईंना त्यातील बाजारू गोष्टी खटकतात. सध्याच्या नृत्यकलावंतांची तारीफ त्या आवर्जून करतात; परंतु त्याचवेळी लावणी चमचमत्या कपड्यांतून नाही, तर मुद्राभिनयातून, अदाकारीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असते, असे परखड मतही व्यक्त करतात. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शिष्य न घडवता आल्याची त्यांच्या मनातील सल म्हणूनच सर्वसामान्य प्रेक्षकांनाही बोचत राहते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
कंपनी कायद्याच्या क्षेत्रात चंद्रशेखर ऊर्फ बाबूराव रेळे यांचे नाव मोठे असले तरीही संगीताच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान तेवढेच मोलाचे असल्याची माहिती कायद्याच्या क्षेत्रातील फार थोडय़ा लोकांना असेल. आज मुंबईत राहणाऱ्या सव्वा कोटी लोकांपैकी कितीजण अस्सल मुंबईकर असतील, हे शोधावेच लागेल.
पण बाबूराव रेळे यांच्या पूर्वजांचा जो काही ज्ञात इतिहास उपलब्ध आहे, तो पाहता, मूळचे मुंबईचे असे जे काही थोडे लोक आज असतील, त्यात त्यांच्या कुटुंबाचा समावेश करावा लागेल. मुंबईतील खंबाला हिल भागातील जायफळाची बाग बाबूरावांच्या पणजोबांच्या मालकीची होती. त्यामुळे घरून काही मिळवण्यासाठी काही करण्याचा आग्रह असण्याची शक्यता नव्हती. पण रेळेंनी आपले सारे आयुष्य संपन्नपणे जगण्यासाठी अगदी लहान वयातच प्रयत्नांना सुरुवात केली होती. जे मनापासून आवडते, ते करण्यासाठी कष्ट पडत नाहीत, हे त्यांना लवकर उमगले असावे. त्यामुळेच त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू करण्याच्या कितीतरी अगोदर, तेव्हा मुंबईत नव्याने सुरू झालेल्या प्रो. बी. आर. देवधर स्कूल ऑफ म्युझिकमध्ये १९३५ मध्ये, म्हणजे वयाच्या आठव्या वर्षीच आपले नाव दाखल करून टाकले होते. आपल्याला संगीताची विशेष आवड आहे आणि ती जोपासण्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे आवश्यक आहे, याची जाण त्यांच्या दोन्हीकडच्या आजोबांना होती. १९३६ मध्ये याच संगीत शाळेत दाखल होण्यापूर्वी कुमार गंधर्व नावाच्या मुलाने साऱ्या देशात आपल्या अपूर्व गायनाने ख्याती मिळवली होती. बाबूराव आणि कुमारजी यांच्यातील मैत्रीचे धागे इतके घट्ट झाले की, हे दोघेही एकमेकांशिवाय राहणे अशक्य झाले. संगीतातील आनंद निर्माण करण्याच्या प्रज्ञेचा कुमारांनी केलेला अपूर्व प्रयोग घडत असताना त्यांच्या अगदी जवळ असे जे काही थोडेचजण होते, त्यात बाबूरावही होते. संगीताकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वैज्ञानिकाची होती. ही दृष्टी प्रो. बी. आर. देवधर यांच्याकडूनच मिळाली असणार हे नक्की! कारण देवधर मास्तर हे केवळ संगीत शिक्षक नव्हते, ते संगीताबद्दल मूलगामी चिंतन करणारे होते. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे ज्येष्ठ कलावंत विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे संगीत शिकल्यानंतरही त्यांनी आपली दृष्टी सतत विस्फारित ठेवली. इतर घराण्यांचे गाणे ऐकायलाही दुरापास्त असताना देवधर मास्तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नामवंत कलावंतांचे कार्यक्रम आयोजित करत असत. कुमारजी आणि बाबूराव यांच्याकडे संगीताकडे पाहण्याची जी वेगळी नजर होती, त्याचे मूळ इथे आहे. बाबूरावांनी आयुष्यभर कायद्याच्या क्षेत्रात काम केले, पण त्यांचे सुखनिधान संगीत हेच राहिले. मैफली गवई व्हायचे नाही, असे काही त्यांनी ठरवले नव्हते. पण त्यांनी मैफली करण्यापेक्षा संगीतावर चिंतन करणे अधिक पसंत केले आणि संगीतावर ग्रंथ लिहिले. ‘स्वरप्रवाह’ हे संगीतातील थाट पद्धतीचे विश्लेषण करणारे त्यांचे पुस्तक महत्त्वाचे ठरले आहे. कायद्याच्या क्षेत्रात काम करीत असतानाही त्यांनी संशोधन करून पीएच.डी. संपादन केली. ‘स्वरप्रवाह’ हा या संशोधनाचाच ग्रंथ. बाबूरावांनी स्वत: काही बंदिशींच्या रचनाही केल्या होत्या. अशा सुमारे सव्वाशे बंदिशींचा ‘गुंजन’ हा संग्रहही त्यांनी प्रकाशित केला होता. कुमार गंधर्व यांच्या अपूर्व मैत्रीचा ठेवा उलगडून दाखवणारे ‘कुमार माझा सखा!’ हे पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी गाता गाता मृत्यू यावा असे संगीताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंताचे एक स्वप्न असते. बाबूरावांच्या बाबतीत ते सत्यात उतरले. संगीतावर व्याख्यान देत असतानाच त्यांना मृत्यूने निमंत्रण दिले. त्यांच्या निधनाने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील संगीताच्या इतिहासाचा साक्षीदार आपल्यातून निघून गेला आहे.
भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाची पाया रचणार्या डॉ.वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात १९३३ साली झाला! अवकाश , हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात मह्त्त्वपूर्ण असे संशोधन डॉ.वसंत गोवारीकर यांनी केले आहे.
विख्यात प्राच्यविद्या संशोधक आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक.
बाळकृष्ण प्रधान आणि दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी यांचे नाते अतूट असे होते. इतके की प्रधान सर म्हणजे इंडियन एज्युकेशन सोसायटीचा चालता बोलता इतिहासच होते.
२९ मार्च १९१८ रोजी जन्मलेल्या प्रधानांचे प्राथमिक शिक्षण जुन्या जंजिरा संस्थानातील बोरली पंचायतन इथे, तर माध्यमिक शिक्षण ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. वयाच्या १९ व्या वर्षी ते मॅट्रिक, तर १९४१ सालात राम नारायण लोहिया कॉलेजातून बी.एससी. झाले.
सुरुवातीचा काही काळ त्यांनी इंडिया युनायटेड मिल आणि दिल्ली केमिकल क्लॉथमध्ये केमिस्ट म्हणून काम केले. परंतु त्यांचा स्वाभाविक ओढा शिक्षणक्षेत्राकडे होता. त्यामुळे १९४८ सालापासून त्यांनी अध्यापनाचे काम केले.
विज्ञान आणि गणित हे विषय ते अतिशय तळमळीने शिकवित असत. वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वाशी येथील न्यू बॉम्बे हायस्कूलमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले. बहुआयामी व्यकिमत्त्व असलेले प्रधान सर हाडाचे शिक्षक होते. तळमळीने आपला विषय शिकविणे हा त्यांचा सहजस्वभाव होता. विज्ञान आणि गणित यांबाबत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी धडपडणार्या प्रधान सरांनी अखिल भारतीय शिक्षण परिषदांमध्ये एक तपाहून अधिक काळ सक्रिय सहभाग घेतला. तर १९५० ते १९६५ या काळात त्यांनी 'एज्युकेशन फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग' या विषयावरील चर्चासत्रांमध्ये सातत्याने भाग घेतला.
एस.एस.सी. मंडळाच्या विभागीय आणि राज्यस्तरावरील अभ्यासक्रम समितीतही त्यांनी काम केले. १९७२ सालाच्या सुमारास महाराष्ट्रात विज्ञान व गणित या विषायांच्या अभ्यासक्रमात क्रांतिकारक बदल सुचविण्यात आले. त्यावेळेस गणिताच्या अभ्यासक्रमातील बदलांच्या संकल्पना प्रधान सरांनी उचलून धरल्या आणि त्याबाबतच्या चर्चांमध्येही त्यांनी भाग घेतला. शालेय पातळीवरील विज्ञान-गणित या विषयांतील बदल हे बदलत्या काळानुरूप होत आहेत आणि त्याच्या तपशिलाबाबत मतभेद असले तरी तत्त्व म्हणून आपण ते बदल स्वीकारले पाहिजेत, असे प्रधान सरांचे म्हणणे होते. आपली ही मते त्यांनी १९७६ साली झालेल्या 'नॅशनल फोरम ऑफ टिचर सेमिनार ऑन प्रॉब्लेम्स ऑफ एज्युकेशन' या विषयावरील सेमिनारमध्ये मांडली.
त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांच्या शिक्षणसेवेचे कौतुक करण्यात आले. 'निर्मळ बुद्धीत ओलावा असतो आणि निर्मळ हृदयात बुद्धीचा प्रकाश असतो' असे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणार्या प्रधान सरांनी तत्त्वनिष्ठ आणि शाश्वत मूल्यांची आयुष्यभर जोपासना केली. असा हा शिक्षणव्रती १९ जानेवारीला काळाच्या पडद्याआड गेला आणि शिक्षणक्षेत्रातले एक नामवंत व्यक्तिमत्व हरपले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
Copyright © 2025 | Marathisrushti