दिवाकर नारायण भिष्णूरकर (शाहीर योगेश)

‘जय भवानी-जय शिवराय.,’ ‘छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार.’ हे शिवछत्रपतींचे गुणगान ऐकत-त्याच्यातील जोश कानात साठवत महाराष्ट्रातील अनेक पिढय़ा मोठय़ा झाल्या. या पंक्ती राज्यातील अनेक गायक मनसोक्तपणे गात आणि श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध होई, मात्र त्या रचना नेमक्या कोणाच्या याची माहिती सर्वानाच नव्हती. मराठी मनांचा ठाव घेणारे या पंक्तींचे कर्ते होते शाहीर योगेश. योगेश ऊर्फ दिवाकर नारायण भिष्णूरकर.

आपले काव्य आणि पोवाडे योगेश स्वत:च गात असत, तेव्हा त्यांचा आवेश पाहण्यासारखा असे, खडा आवाज ऐकण्यासारखा असे. तो ऐकण्याचे भाग्य लाभलेले मराठीजन त्यांच्या सादरीकरणाविषयी सांगतातच, पण त्यांच्या रचना दुसऱ्यांकडून ऐकलेलेही त्या पंक्तीतील चमक, देशप्रेम पाहून दिपून जात. शाहीर मूळचे विदर्भातील. अमरावती जिल्ह्य़ातील अंजनगाव सुर्जी या लहान गावात त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९२८ ला झाला. आपल्या भावामुळे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रचनांकडे ओढले गेले. त्यांच्या रचना म्हणण्याचा छंद त्यांना लागला. मात्र त्यानंतर शाहीर पांडुरंग दत्तात्रेय खाडिलकर यांचा शाहिरी कार्यक्रम त्यांनी ऐकला आणि शाहिरीतील तेजाने ते तिकडे आकर्षिले गेले. खाडिलकर यांचे पोवाडे गातगात ते स्वत:च रचना करू लागले. मराठी आणि हिंदीतील तब्बल पाचशे काव्यरचनाही त्यांनी केल्या. जुन्या मॅट्रिकनंतर चरितार्थासाठी त्यांनी पशुसंवर्धन खात्यात नोकरी केली, पण त्यांचा खरा ओढा हा काव्यरचना करून त्या गाण्याकडे होता. त्यासाठी त्यांनी उभा महाराष्ट्र पालथा घातला. शिवाजीमहाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर त्यांनी पोवाडे रचले. शिवछत्रपतींप्रमाणेच शंभूराजे, संत तुकाराम, रामदास स्वामी, श्री चक्रधर स्वामी, लहुजी वस्ताद साळवे, डॉ. हेडगेवार आदींवरही त्यांनी केलेले पोवाडे गाजले. त्यांची गीते चटकन ओठांत खेळू लागत आणि मग ती पाहतापाहता सर्वच जण गाऊ लागत. सातवीच्या एका पुस्तकात त्यांचे शिवबाचे गोंधळी हे गीत समाविष्ट करण्यात आले होते, मात्र त्यांचे नावच त्यात नव्हते, तसेच ‘देश धरमपर मिटनेवाला, शेर शिवाका छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था।’ या संभाजीमहाराजांचे यथार्थ चित्र रंगणारे गीतही कोणीतरी स्वत:च्या नावाने छापले. हे लक्षात आल्यावर आपल्या रचनांची पुस्तके प्रसिद्ध करण्याचे योगेश यांनी ठरविले. ‘शिव-मातृ वंदना’, ‘वीरश्री गाथा-पोवाडे’, ‘प्रहरी’ अशी पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. केवळ शाहिरीला नव्हे तर राज्यातील सर्वच शाहिरांनाही कायम आठवणीत राहील अशी गोष्ट त्यांनी केली आणि ती म्हणजे शाहीर हिंगे यांच्या साथीने स्थापन केलेली शाहीर परिषद. १९६८ मध्ये स्थापन झालेल्या या शाहीर परिषदेच्या २६ जिल्ह्य़ांत शाखा सुरू झाल्या आणि शाहिरांचे प्रश्न सोडविण्याच्या महत्त्वाच्या कामाला सुरूवात झाली. आपल्या आयुष्याच्या अगदी अखेपर्यंत म्हणजे तब्बल ८३ व्या वर्षांपर्यंत ते कार्यरत होते, खडय़ा आवाजात ‘ही रात्र शाहिरांची’ सारखे कार्यक्रम गाजवत होते. मात्र अचानक काळाने त्यांना हिरावून नेले आणि खडय़ा आवाजातील शाहिरी आवाज मुका झाला.



‘जय भवानी-जय शिवराय.,’ ‘छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार.’ हे शिवछत्रपतींचे गुणगान ऐकत-त्याच्यातील जोश कानात साठवत महाराष्ट्रातील अनेक पिढय़ा मोठय़ा झाल्या. या पंक्ती राज्यातील अनेक गायक मनसोक्तपणे गात आणि श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध होई, मात्र त्या रचना नेमक्या कोणाच्या याची माहिती सर्वानाच नव्हती. मराठी मनांचा ठाव घेणारे या पंक्तींचे कर्ते होते शाहीर योगेश. योगेश ऊर्फ दिवाकर नारायण भिष्णूरकर.

आपले काव्य आणि पोवाडे योगेश स्वत:च गात असत, तेव्हा त्यांचा आवेश पाहण्यासारखा असे, खडा आवाज ऐकण्यासारखा असे. तो ऐकण्याचे भाग्य लाभलेले मराठीजन त्यांच्या सादरीकरणाविषयी सांगतातच, पण त्यांच्या रचना दुसऱ्यांकडून ऐकलेलेही त्या पंक्तीतील चमक, देशप्रेम पाहून दिपून जात. शाहीर मूळचे विदर्भातील. अमरावती जिल्ह्य़ातील अंजनगाव सुर्जी या लहान गावात त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९२८ ला झाला. आपल्या भावामुळे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रचनांकडे ओढले गेले. त्यांच्या रचना म्हणण्याचा छंद त्यांना लागला. मात्र त्यानंतर शाहीर पांडुरंग दत्तात्रेय खाडिलकर यांचा शाहिरी कार्यक्रम त्यांनी ऐकला आणि शाहिरीतील तेजाने ते तिकडे आकर्षिले गेले. खाडिलकर यांचे पोवाडे गातगात ते स्वत:च रचना करू लागले. मराठी आणि हिंदीतील तब्बल पाचशे काव्यरचनाही त्यांनी केल्या. जुन्या मॅट्रिकनंतर चरितार्थासाठी त्यांनी पशुसंवर्धन खात्यात नोकरी केली, पण त्यांचा खरा ओढा हा काव्यरचना करून त्या गाण्याकडे होता. त्यासाठी त्यांनी उभा महाराष्ट्र पालथा घातला. शिवाजीमहाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर त्यांनी पोवाडे रचले. शिवछत्रपतींप्रमाणेच शंभूराजे, संत तुकाराम, रामदास स्वामी, श्री चक्रधर स्वामी, लहुजी वस्ताद साळवे, डॉ. हेडगेवार आदींवरही त्यांनी केलेले पोवाडे गाजले. त्यांची गीते चटकन ओठांत खेळू लागत आणि मग ती पाहतापाहता सर्वच जण गाऊ लागत. सातवीच्या एका पुस्तकात त्यांचे शिवबाचे गोंधळी हे गीत समाविष्ट करण्यात आले होते, मात्र त्यांचे नावच त्यात नव्हते, तसेच ‘देश धरमपर मिटनेवाला, शेर शिवाका छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था।’ या संभाजीमहाराजांचे यथार्थ चित्र रंगणारे गीतही कोणीतरी स्वत:च्या नावाने छापले. हे लक्षात आल्यावर आपल्या रचनांची पुस्तके प्रसिद्ध करण्याचे योगेश यांनी ठरविले. ‘शिव-मातृ वंदना’, ‘वीरश्री गाथा-पोवाडे’, ‘प्रहरी’ अशी पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. केवळ शाहिरीला नव्हे तर राज्यातील सर्वच शाहिरांनाही कायम आठवणीत राहील अशी गोष्ट त्यांनी केली आणि ती म्हणजे शाहीर हिंगे यांच्या साथीने स्थापन केलेली शाहीर परिषद. १९६८ मध्ये स्थापन झालेल्या या शाहीर परिषदेच्या २६ जिल्ह्य़ांत शाखा सुरू झाल्या आणि शाहिरांचे प्रश्न सोडविण्याच्या महत्त्वाच्या कामाला सुरूवात झाली. आपल्या आयुष्याच्या अगदी अखेपर्यंत म्हणजे तब्बल ८३ व्या वर्षांपर्यंत ते कार्यरत होते, खडय़ा आवाजात ‘ही रात्र शाहिरांची’ सारखे कार्यक्रम गाजवत होते. मात्र अचानक काळाने त्यांना हिरावून नेले आणि खडय़ा आवाजातील शाहिरी आवाज मुका झाला.

Author