जागतिक कीर्तीचे चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला.
नितिन चंद्रकांत देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.१९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.
प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई!
एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणाऱ्या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओमध्ये या स्टुडिओची गणना होते.
नितीन देसाई हे भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक महत्वाचे नाव. गेल्या शतकातील ऐंशीच्या दशकापासून हे नाव छोट्या पडद्याला व मोठ्या पडद्याला आपलं रुपडं देत आलं आहे. भारतातील प्रत्येक मोठा चित्रपट किंवा दूरदर्शनवरील प्रकल्प हा नितीन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाने सजत असतो. भारत की खोज सारखी ऐतिहासिक महत्वाची मालिका असो किंवा लगान सारखा अफाट चित्रपट असो. त्या प्रकल्पावर नितीन देसाई हे असणारच! त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यातील चौकजवळ हा स्टुडीओ उभारायला घेतला. एक भव्य स्वप्न सृष्टी येथे आकाराला येऊ लागली. हा स्टुडिओ मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांपासून समान अंतरावर आणि हमरस्त्याला लागून आहे.
शेजारीच मोरबे धरणाचा सुंदर परिसर, सह्याद्रीच्या डोंगररांगा, वळणदार रस्ते, सहकार्याला कायम उत्सुक असणारे गावकरी आणि नयनरम्य पार्श्वभूमी ही या स्टुडिओची खासियत आहे. आज खालापूर कर्जतचे नाव एक कलापूर या नात्याने सर्वदूर पसरण्यात एन् डी स्टुडिओचा फार मोठा सहभाग आहे. स्टुडिओमुळे खरंतर या संपूर्ण परिसरातील अर्थकारण आणि समाजकारण बर् यापैकी बदललं आहे. या परिसरात भारतातील छोटे मोठे सर्व कलाकार येतात, हजारो जणांना रोजगार मिळतो, याबरोबरच एका व्यवसायाला जोडून अनेक नवनवे जोडधंदे सुरू होत जातात.
एकूणच सारा भाग हा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे अनेक कंपन्या बंद पडत असताना, एन् डी स्टुडिओमुळे काही प्रमाणात सावरला गेला आहे. आमीर खानचा द रायझिंग हा येथे चित्रित केला गेलेला पहिला भव्य चित्रपट. त्यानंतर या स्टुडिओने मागे पाहिले नाही. मधुर भांडारकर यांचा गाजलेला ट्रॅफिक सिग्नल हा त्यानंतरचा महत्वाचा चित्रपट. १८५७ चा भारला गेलेला कालखंड असेल किंवा मुंबईची अफाट गर्दी वाहून नेणारा गजबजलेला हमरस्ता असेल, तो तेथे साकारला गेला. जोधा अकबर सारखा पिरियड ड्रामा असणारा चित्रपटही येथेच चित्रित झाला. आग्र्याचा भव्य किल्ला येथे दिमाखाने त्यातील सर्व बारकाव्यांसह स्टुडिओमध्ये उभा केला गेला.
ग्रेट कॉमेडी सर्कस, बिग बॉससारख्या अनेक लोकप्रिय आणि भव्य मालिकांचे निर्माण येथे झाले आहे. राजा शिवछत्रपति सारखी भारतीय दूरचित्रवाणीमधील आजवरची सर्वात भव्य मालिका जवळपास संपूर्णपणे येथेच चित्रित झाली. छत्रपतींची राजधानी, त्यांचा दरबार, राजगड, पन्हाळा, रायगड, शिवनेरीसारखे किल्ले उभे केले गेले, आणि ते आजही मालिका संपून गेल्यानंतर त्याच दिमाखात जतन केले गेले आहेत. यासंदर्भात बोलताना श्री नितीन देसाई म्हणाले की, हे सर्व सेट आम्ही निर्माण केले पण ते आम्ही मोडणार नाही, ते तसेच जतन करून ठेवणार, या प्रत्येक सेटला एक ऐतिहासिक महत्व आहे याची जाणीव आम्हाला आहे.
भारतीय कलाइतिहासाची ही सोनेरी पाने आहेत. हा स्टुडिओ म्हणजे लवकरच एक पर्यटन स्थळ म्हणून आम्ही विकसित करणार आहोत. आज अनेकदा ही मयसृष्टी आणि सर्वसामान्य माणसं यांच्यात अंतर पडलेले आपणांस जाणवते. हे अंतर या निमित्ताने कमी होईल आणी कलावंताबद्दलच्या आकर्षणाबरोबरच या कलावंताला आपली कला जोपासायला, पडद्यावरील आपली व्यक्तिरेखा साकारताना किती प्रकारचे कष्ट उपसावे लागतात याची नम्र जाणीव आम्ही करून देऊ शकू. एका दृष्टीने ते लोकशिक्षणच असेल.
आमच्या स्टुडिओमध्ये एकाच वेळी शेकडो कलावंतांची, सहयोगी तंत्रज्ञांच्या राहण्याची, जेवण्याची, अखंड विद्युत पुरवठ्याची आम्ही सोय करू शकतो. आज आमच्या कंपनीचं प्रचंड मोठं असं कार्यालय पवई येथे आहे. एका सामान्य कुटुंबात मी जन्माला आलेलो असल्यामुळे मला माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या लोकांसमोर विनम्र असं उदाहरण ठेवता येतं आहे यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे. एन् डी स्टुडिओने आता स्वत:ची कंपनी स्थापन करून नव्या दूरचित्रवाणी मालिका, नवे चित्रपटही घडवायला सुरुवात केली आहे.
राजा शिवछत्रपति या मालिकेच्या निर्मितीबरोबरच तुफान गाजलेल्या महाराणी पद्मिनी, झाशीची राणी या मालिकांची निर्मिती एन् डी स्टुडिओने केली आहे. जगातील सात आश्चर्ये येथे उभी करून ज्यांना ज्यांना ही आश्चर्ये पहाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी त्या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती येथे उभारल्या जातील, येथे एक जागतिक दर्जाचं म्युझियम बनविण्याचा श्री देसाई यांचा मानस आहे.
एन् डी स्टुडिओ हे एका सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीनं आपल्या जिद्द, चिकाट आणि कला यांच्या सहाय्याने साकारलेलं सत्य-स्वप्न आहे! नितिन देसाई यांच्यावर ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’
लेखक मंदार जोशी. हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
नितीन देसाई हे व्यक्तिमत्व एकूणात ‘नाही रे’ वर्गाला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आहे. खिशात काहीही नसताना, वरळीच्या चाळीत राहणार्याव एका सर्वसामान्य परिस्थितीतील बँक कर्मचाऱ्याचा हा मुलगा पुढे अवघ्या अडीच दशकात जागतिक कीर्तीचा कर्तबगार कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर बनतो, १०० एकरांच्या एन्. डी. स्टुडिओचा मालक कसा बनतो याचा शोध हा मराठी मनाच्या कुतुहलाचा विषय आहे आणि हे कुतुहल शमविणारं हे पुस्तक आहे.
चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई (6-Aug-2021)
दिग्दर्शक नितीन देसाई (6-Aug-2017)
#NitinChandrakantDesai
आता ती मैफलही सुनीसुनी!
बऱ्याच वर्षांपूर्वीची संध्याकाळ. शास्त्रीय संगीताच्या एका मैफलीत एक उंच, सावळे व्यक्तिमत्व दाखल झाले. चालणे, डौल ‘नमवी पहा भूमी हा चालताना’ असे. कुतूहल चाळवले ते मैफलीत दाद देण्याची रीत पाहून. लहान-सहान जागांनाही जाणकारीने पण हळुवारपणे तर कधी ‘क्या बात है.’ अशी मोकळी दाद. मैफल संपल्यावर जेवणाआधीच्या ‘मैफली’त ओळख झाली- मी दत्ता मारुलकर! त्यांचे स्फुट लिखाण अनेकदा वाचले होते. थोडय़ाच वेळात ‘अरे-तुरे’वर आलो. नंतर दत्ता घरचाच झाला.
माणसे त्यांना जास्त आवडायची का संगीत हा प्रश्नच. सदैव गप्पांचा फड जमवण्याची आवड व जागरण करण्याची अमर्याद ताकद. सैन्यातली नोकरी त्याने प्रामाणिकपणे केली पण साहित्य-संगीतापासून दूर असणाऱ्या जगात तो रमू शकला नाही. १०/११ वर्षांतच त्याने सैन्यातून बाहेर पडत खासगी नोकरी पत्करली. त्या निमित्त दिल्ली, इंदूर, मुंबई, अहमदाबाद व शेवटी पुणे अशी भटकंती केली. पुण्यात मात्र तो स्थिरावला. नोकरीत कसूर नाही पण उरलेला वेळ गाणी ऐकणे, त्या समुदायात वावरणे, पुस्तके वाचणे असा ‘आनंदी आनंद गडे.’ वाचन, विशेषत: ललित मराठी वाचन हे दत्ताने प्रयत्नपूर्वक जपले होते.कादंबरी, नाटक, कथा, कविता अशा ललित साहित्याच्या प्रांगणात तो सुजाण वाचक म्हणून वावरायचा, त्यातली सौंदर्यस्थळे गप्पांच्या बैठकीत दाखवायचाही. मुळात तल्लख पण परिस्थितीमुळे महाविद्यालयीन जीवनाला पारखा असल्याने इंग्रजी ललित-वैचारिक लेखनापासून आपण बाजूला पडलो, ही त्याला खंत होती. ती उणीव भरून काढायला असे वाचन असलेल्या मित्रांकडून तो कुतूहल शमवायचा. कुतूहल लहान मुलांमध्ये असते तसे, सदैव जागरूक असे. दत्तामध्ये लपलेले हे ‘बालक’ कधी जागे होईल याचा अंदाज कधीच आधी येत नसे. मात्र अशा प्रसंगी त्रागा, वैताग या बरोबर ‘माता दिसली समरी विहरत’ याचा प्रत्यय येत असे. दत्ताचा कुठलाच मित्र, या ‘गेट आऊट’ ते ‘पुन्हा तोंड पाहणार नाही’ अशा रॅपिड फायर वर्षांवापासून वाचला नसेल. त्यातल्या त्यात सौम्य म्हणणे ‘आय अॅम सॉरी पण.’ असे यायचे. हे क्षणिक आहे, पुढच्या २/३ मिनिटांत गाडी पुन्हा रुळावर अशी खात्री- अनुभव गाठीशी असल्याने दत्ताशी मैत्री तुटणे अशक्य होते.
‘गाणे ऐकणे’ या नादापायी त्याने किती प्रवास केला, त्या क्षेत्रातल्या एकेका शिखरासोबत संवाद साधला, अनेक ठिकाणी जवळीकही झाली याची मोजदाद त्यालाही अशक्य होती. ललित साहित्याच्या डोळस वाचनाने, त्याही क्षेत्रात व्यक्तिगत ओळखी असल्याने प्रसन्न शैली त्याने कमावली होती. त्याच्या लेखनाचे संग्रह प्रकाशित झाले. संगीतावर जाणकारीने लिहिणारा-बोलणारा अशी प्रतिष्ठाही दत्ताला मिळाली. नोकरीच्या ठिकाणी घडलेल्या मालक-मजूर तंटय़ामागच्या तणावामधले नाटय़ रंगवणारी कादंबरी हे त्याचे पहिले स्वतंत्र ग्रंथलेखन.
कुठेतरी, केव्हातरी ‘संगीत’ या त्याच्या पंचप्राणाशी संबंधित स्वतंत्र ग्रंथनिर्मितीवर हा प्रवास त्याला घेऊन जाणार होता. तो योग आला आणि ‘गानसरस्वती’सारखे लक्षणीय पुस्तक आले. मात्र या निर्मितीनंतरचा अनुभव त्याला एकीकडे मनस्ताप देणारा तर दुसरीकडे आर्थिक नुकसान करणारा ठरला. या सर्व प्रकरणातले क्लेश त्याने पचवले. तिथे जन्म झाला ‘स्वरहिंदोळे’ या पुस्तकाचा. भारतीय संगीतविश्वातल्या सात शिखरांची शब्दचित्रे रेखाटताना दत्ताची लेखणी बहरली.
नंतर श्रीनिवास खळ्यांच्या सांगीतिक चरित्राला हात घातला गेला. यासाठी खूप धावपळ, परिश्रम केले पण ग्रंथ प्रकाशित झालेला पाहण्यास तो नाही.
एकदा माणूस आपला म्हटला, की त्याच्यासाठी दत्ता खस्ता खायला नेहमीच तयार असायचा. ओळखीच्या कुणाच्या आयुष्यातला, कुटुंबातला जीवघेणा प्रसंग कळला तर तो विव्हल होत असे. हे हळवेपण त्याच्या निखळ माणूसपणाचा भाग होते, पारदर्शी होते. एक-दोन वेळा आलेल्या अनुभवांमुळे असे वाटले होते की, आजाराला दत्ता हळवा आहे. प्रसंग किरकोळ होते. मात्र ही समजूत त्याच्या शेवटच्या आजारात खोटी ठरली. मधुमेह सोबती होता. बऱ्याचदा प्रकरण मर्यादेबाहेरही जाई.
दत्ताच्या सैन्य सोडल्यानंतरच्या आयुष्यातल्या अनेकानेक जागा फुलल्या त्या पुष्पावहिनींमुळे. शेवटची अनेक वर्षे घरची आर्थिक आवक, घर सांभाळणे, मुलींची लग्ने, दत्ताचा लोकसंग्रह असा सर्व व्याप शांतपणे सांभाळत पुन्हा स्वत:चे वाचन-महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती असे सर्व करायला लागणारी ऊर्जा वहिनींकडे कुठून येत होती हे मला आजही कोडेच आहे.
दत्ताचा उल्लेख संगीत समीक्षक म्हणून व्हायचा. व्याख्यानांमध्ये त्याची शैली हरिदासी कीर्तन परंपरेच्या सर्व वैशिष्टय़ांसह प्रकट व्हायची. असे चित्रदर्शी लिखाणही त्याचे वैशिष्टय़. वसंतराव देशपांडय़ांवरील लेखात दत्ताने, ‘स्वर्गात भरलेल्या संगीतसभेत वसंतराव नसल्याने रंग भरेना म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वसंतरावांना तिकडे बोलावून घेतले गेले’, असे चित्र रंगविले होते. अशा सभा सध्या तिथे वारंवार भरत असणार. दत्ताचे श्वास असलेले कुमार गंधर्व, माणिकताई, मोगूबाई कुर्डीकर, जितेंद्र अभिषेकी, शोभा गुर्टू. असे गायक व पु.ल., रामूभय्यांसारखे रसिक जाणकार यांच्या सभेत वसंतराव गात आहेत आणि एका जीवघेण्या ‘जागेवर’ मंडपातून दाद निनादताना ‘बहोत अच्छे’, ‘क्या बात है’ अशी उंच आवाजात ‘ठाण्’ स्वरात साद घातली जाईल ती या ‘हरितात्या’चीच असेल. ती जाणवून आजही त्याच्याशी बोलावे म्हणून अनेकदा हात फोनपर्यंत जातोच. दत्ता मारुलकर यांचे १२ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.
#DattaMarulkar
श्यामला वनारसे मूळ पेशाने मानसशास्त्रज्ञ. मानव संसाधन विषयातल्या तज्ज्ञ. अनेक कंपन्या व संस्थांमधून प्रशिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक. शाळा, महाविद्यालये, कंपन्या, सामाजिक संस्था, चळवळी, महिला संघटना, अशा सर्वत्र त्यांनी चित्रपट या माध्यमाचा कल्पक वापर करून त्या त्या विषयांची मांडणी केली. मुले आणि महिला हे त्यांचे विशेष आस्थेचे समूह. तिथेही त्यांनी आवर्जून चित्रपट या माध्यमाचा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संदर्भात वापर केला. इतर कलामाध्यमाविषयीही त्यांना आस्था आहे. संगीताचे मानसशास्त्र, घाशीराम कोतवाल- एक अभ्यास ही त्यांची पुस्तके याची साक्ष आहेत. सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर या पुस्तकातून त्यांनी सत्यजित राय यांच्या चित्रपटांतून उभ्या राहणार्या भारतीय समूहमनाचे विस्तृत विश्लेषण केले आहे.
कलेचा वारसा श्यामलाताईंना बालपणापासूनच लाभला. वडील फोटोग्राफर होते. दृश्यकलांकडे पाहण्याची दृष्टी तिथून मिळाली, पण निमित्त घडले पुण्यातल्या एका चर्चासत्रातल्या व्याख्यानाचे. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे तत्कालीन संचालक प्रा. सतीश बहादूर यांचे एक व्याख्यान श्यामलाताईंनी ऐकले आणि चित्रपटांकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलून गेली. चित्रपटांचा कलामाध्यम म्हणून विचार, सूक्ष्म विश्लेषण, मौलिक लेखन, भाषांतरे करून त्यांनी चित्रपट अध्यापनाची एक पद्धती विकसित केली. विविध समूह व शैक्षणिक संस्थांसाठी चित्रपटविषयक अभ्यासक्रम आखण्यात पुढाकार घेऊन विलक्षण झपाटलेपणाने त्यांनी चित्रपटसंस्कृतीचा प्रसार करण्याचे काम केले. बहादुरांचे लेखन संग्रहित करणे, प्रसिद्धीपरान्मुख असणार्या बहादुरांच्या लेखनाला उचित व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या लेखनाची मराठीतून भाषांतरे करणे ही कामेही त्यांनी गुरूनिष्ठेतून केली. आज प्रा. सतीश बहादूर हयात नाहीत, परंतु बहादुरांनी घातलेला चित्रपट विश्लेषण, लेखन, अध्यापनाचा हा पाया विस्तृत करण्याचे कार्य त्या आज वयाची सत्तरी ओलांडल्यावरही करीत आहेत. चित्रपट संस्कृतीतील बहादूर स्कूलच्या त्या एकमेव प्रसारक आहेत.
मुंबईत झालेल्या दहाव्या आशियायी चित्रपट महोत्सवात श्यामला वनारसे यांना सत्यजित राय स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटसंस्कृतीचा व्रतस्थपणे प्रसार करणार्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आजवर प्रा. सतीश बहादूर, अरुणा वासुदेव, बासू चटर्जी, एच. एन. नरहरी राव यांना देण्यात आला आहे. डॉ. श्यामला वनारसे हेदेखील याच गौरवशाली परंपरेतले एक नाव.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात पं. वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत भूमिका साकारण्याची संधी पं. दिनकर पणशीकरांना लाभली. ‘आडा चौताला’ सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो.
ललित व वैचारिक लेखन करणार्या गांधीवादी लेखिका प्रभा श्यामराव कंटक यांचा जन्म १ जुलै १९०६ रोजी झाला. “काम आणि कामिनी”, “अग्नियान”
या कादंबर्या, “प्रांतजीवन” हा नाटिकांचा संग्रह, हिंदी स्त्रियांचे जीवन, “महाभारत-एक मुक्त चिंतन या पुस्तकांसह “सत्याग्रही महाराष्ट्र”
या ग्रंथातून म. गांधीजींच्या चळवळींचा इतिहास त्यांनी चितारला आहे.
## Prabha Shamrao Kantak
“हुसेन टू विजय कुलकर्णी” या चित्र मालिकेच्या माध्यमातून औरंगाबादचे चित्रकार विजय कुलकर्णी यांच्या चित्रांची मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, गोवा, चेननई, कोचीन शहरांत प्रदर्शने भरली. अमूर्त चित्रशैलीने सुरुवात करणारे कुलकर्णी यांनी वळणावर मात्र अजिंठा चित्रशैलीचा अभ्यास सुरु केला व पुढील ३५ वर्षे याच चित्रशैलीने त्यांची ओळख बनविली.
अजिंठा स्कूल
मराठी साहित्यात सामाजिक वास्तवाचे भान असावे, या मताचा हिरीरीने पुरस्कार करणारे साहित्यिक डॉ. मनोहर जाधव हे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख. विचारमंथनातून निमिर्तीक्षम साहित्यसेवा आणि अध्यापनातून कृतिशील संवेदना जपणारे जाधव समतावादी परंपरा पुढे नेणारे असे कवी.
साहित्यिकांनी सामाजिक दृष्टिकोनातून बदलत्या समाजजीवनाचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, या त्यांच्या भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटते. वास्तवाची जाणीव, आसपासच्या घटनांचे भान आणि लेखन परंपरेचे अधिष्ठान त्यांच्या लेखनातून ठळक होते. या जाणीवेतूनच दलित साहित्याकडे ते पाहतात.
समाजव्यवस्थेचे बळी ठरलेल्या दलितांच्या आत्मभानाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सहसंवेदनेची आहे. दलित कविता ही मराठी कवितेचे एक वैशिष्ट्यपूर्ण वळण आहे. या कवितेच्या मुळाशी असलेला जीवनानुभव त्यांना स्पर्श करतो. दलित कवींच्या तिसर्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कवी शेषराव धांडे यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत दलित कवितेवर होणारा आक्रस्ताळेपणाचा आरोप ते खोडून काढतात. आक्रस्ताळेपणा आणि आक्रमकपणा, स्थितिशीलता आणि परिवर्तन, आक्रोश आणि विदोह यातील फरकावर ते नेमके भाष्य करतात.
'दलित स्त्रियांची आत्मकथने', 'प्रत्ययपर्व', 'साहित्य : शोध आणि बोध' यांसारखी त्यांची पुस्तके समीक्षकांनी गौरविली आहेत. समतावादी साहित्य संमेलन असो वा भटक्या-विमुक्तांवरील राष्ट्रीय चर्चासत्र, जाधव आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून आलेली सुधारणावादी भूमिका आग्रहाने मांडतात.
त्यांनी हिंदी भाषेतही मुशाफिरी केली आहे. कवी अरुण काळे यांच्या कवितासंग्रहाच्या 'सायरन के शहर' या अनुवादाला डॉ. जाधव यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. हिंदीतील सहा समकालीन मान्यवर कवींच्या कवितांच्या अनुवादाचे कामही त्यांनी केले आहे.
फैजपूर येथे अध्यापन करून १९९५ मध्ये ते पुण्यात आले. पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुखपद सांभाळताना त्यांची कृतिशीलता अधिक स्पष्ट होते. मराठी विषयात व्यवसायाभिमुख कौशल्यावर आधारित चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचे धोरण काळाबरोबर जाण्याच्या त्यांच्या आग्रहाला पुष्टी देते.
अमराठी भाषकांना मराठी शिकविण्यासाठी सहा महिन्यांचा मराठीचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. बालवाङ्मयाचा विद्यापीठ पातळीवर अभ्यास व्हावा, अशी निराळी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
डॉ. जाधव यांना बुलढाणा जिल्हा साहित्य संघातर्फे उत्कृष्ट साहित्य निमिर्तीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
आपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक यांनी आपल्या गावालाच शाळेत शिक्षण घेतले. तेथेच त्यांनी संगीताचे धडे गिरवले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट निवडली. पीडीएच्या घाशिराम कोतवालमधून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. सतीश आळेकरांच्या “महानिर्वाण” या नाटकाने त्यांना संगीतकार चख्याती मिळवन दिली.
ठाण्यातील चित्रकला क्षेत्रातील एक तरुण व्यक्तिमत्व म्हणजे शार्दुल संभाजी कदम हे होत. व्यावसायिक चित्रकार म्हणून पुढे येत असलेले शार्दुल कदम हे सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये अधिव्याख्याता आहेत.
जोशी, बापूसाहेब
‘प्रसाद’ प्रकाशनाचे संस्थापक, साहित्यिक य. गो. जोशी ऊर्फ भाऊ यांच्या अखेरच्या काळातील ही गोष्ट. भाऊंनी त्यांच्या चिरंजीवाला सांगितले, ‘बघ, या व्यवसायात पडणार असशील, तर मी बरीच प्रकाशने करून ठेवली आहेत. ती विकत राहिलास तरी तुझा चरितार्थ चालेल.’ त्यावर चिरंजीव म्हणाले, ‘काय भाऊ, य. गो. जोशींच्या मुलाला तुम्ही स्टॉक विकायला सांगताय. मी तुमच्याही पुढे जाईन.’ भाऊंचे चिरंजीव म्हणजे मनोहर ऊर्फ बापूसाहेब जोशी.
ऐन विशी-बाविशीतच बापूसाहेब वडिलोपार्जित प्रकाशन व्यवसायात उतरले, प्रसाद मासिकाचे संपादक झाले आणि व्यवयासात यश मिळवत, कर्तृत्वाचा ठसा उमटवत त्यांनी वडिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. बापूसाहेब म्हणजे सदाप्रसन्नता, उत्साह आणि उमदेपणा. बापूसाहेबांचे गेल्या शुक्रवारी पुण्यात निधन झाले. सदाशिव पेठेतील प्रसाद प्रकाशनाच्या कार्यालयात आता बापूसाहेबांचा दरबार पुन्हा कधीच भरणार नाही, ही कल्पनाही खूप वेदना दायक आहे. मराठी ग्रंथांसाठी ठेव म्हणून रक्कम ठेवा, ठेवीच्या व्याजातून ग्रंथ मिळवा आणि मुदतीनंतर ठेव परत न्या, अशी अभिनव योजना बापूसाहेबांनीच १९८० मध्ये प्रथम आणली आणि पुढे अशा सहा योजना त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. या योजनांमधील ९९ ग्रंथांपैकी ८४ ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले आहेत आणि उर्वरित प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ‘आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे,’ ‘सुबोध शांकर ग्रंथावली,’ ‘देवभाषेचे देणे: मराठीचे लेणे’ या ग्रंथ ठेव योजना मोठय़ा प्रतिसादाने पूर्ण झाल्या आणि ‘समर्थ वाग्वैजयंती,’ ‘अभिनव प्रसन्न दर्शन’ ‘पंचमहाकाव्ये’ या योजनातील ग्रंथ प्रसिद्धीचे काम सुरू आहे. भारतीय संस्कृतीची सर्वार्थाने नव्याने ओळख करून देणारे बापूसाहेबांचे हे ग्रंथप्रकल्प यशस्वी झाले ते त्यांच्या परिश्रमांमुळे, बिनचूक नियोजनामुळे, अफाट लोकसंग्रहामुळे आणि पारदर्शी व्यवहारांमुळे. गेली ५० वर्षे ‘प्रसाद’ मासिक प्रसिद्ध करताना त्यांनी दरवर्षी एक दैवत विशेषांक प्रसिद्ध करण्याची योजना सलग २८ वर्षे चालवली. त्यानंतर नद्यांवरील विशेषांक प्रसिद्ध केले. प्रत्येक दिवाळी अंकात ते एक विस्तृत संतचरित्र प्रसिद्ध करीत असत. त्यांचे हे सारे विशेषांक आजही संदर्भग्रंथासारखेच वापरले जातात. प्रकाशनाचा व्याप सांभाळतानाच प्रसिद्ध श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त म्हणूनही बापूसाहेबांनी अतिशय उत्साहाने सुमारे २५ वर्षे काम पाहिले. बापूसाहेबांवर मराठी वाचकांनी मोठा विश्वास दाखवला. ‘आमची ठेवीची रक्कम परत नको. आमचे पैसे तुमच्या चांगल्या कामासाठीच वापरा,’ असे सांगून अनेक ठेवीदार मुदत संपल्यानंतर त्यांची ठेव बापूसाहेबांनाच परत देत असत. असे प्रेम करणारे वाचक बापूसाहेबांना लाभले आणि तीच त्यांची प्रकाशन व्यवसायातील ‘मोठी ठेव’ ठरली. बापूसाहेबांच्या बरोबरीने त्यांची कन्या उमा बोडस याही गेली दोन दशके प्रकाशनाचे काम पाहत आहेत. बापूसाहेबांनी हाती घेतलेल्या अनेक योजना पुढे नेण्याची जबाबदारी आता या पुढच्या पिढीकडे आली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti