(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सिंहासनकार अरुण साधू

    एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये अरुण साधू यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जुन १९४१ रोजी झाला. त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. यावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपटही अजराअमर ठरला. या सिनेमातील ‘दिगू टिपणीस’ हे अभिनेते निळू फुले यांनी साकारलेले पात्र अरूण साधू यांच्यावरच बेतलेले होते, अशीही चर्चा त्यावेळी झाली.

    ‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. ३० वर्ष त्यांनी पत्रकारिता केली. टाईम्स ऑफ इंडीया, स्टेटसमन, फ्री प्रेस जर्नल,केसरी, माणूस, इंडीयन एक्सप्रेससाठी त्यांनी काम पाहीलं होतं.त्रिशंकू, बहिष्कृत, स्फोट या कादंबऱ्याही प्रचंड गाजल्या.यातील बहिष्कृत ही कादंबरी जवळपास ४ दिवसांत त्यांनी लिहून पूर्ण केली होती.६ वर्ष ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहीलं.

    २००० साली आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील आधारीत चित्रपटामध्येही साधू यांचे योगदान होते, या चित्रपटासाठी त्यांनी सहलेखक म्हणून भूमिका बजावली होती. काकासाहेब गाडगीळ हे पुस्तक त्यांनी इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये आणलं होतं ‘ मुंबई दिनांक’ ही कादंबरी हिंदीमध्ये ‘ बंबई दिनांक’ नावाने प्रसिद्ध करण्यात आली होती. सगळ्या पिढीचे लेखक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.अमेरिकेमध्ये महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. आणि ड्रॅगन जागा झाला, शापित, शुभमंगल, मुखवटा या कादंबऱ्यांचेही लेखन केले.

    झिपऱ्या, तडजोड, शोधयात्रा या ही कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. बेचका,एक माणूस उडतो त्याची गोष्टी, बिनपावसाचा दिवस,मुक्ति, ग्लानिर्भवती भारत हे कथा संग्रह प्रसिद्ध झाले. अरुण साधू यांचे २५ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 17, 2019


  • सुप्रसिद्ध नेपथ्यकार व ज्येष्ठ रंगकर्मी बापू लिमये

    मूळचे अमरावतीचे असलेले बापू लिमये यांनी गेली सहा दशके मराठी हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर रंगकर्मी, नेपथ्य आरेखन, रचना करण्याचे काम केले. कारकिर्दीच्या सुरूवातीला त्यांनी मध्य रेल्वेत महसूल विभागात हिंदी अधीक्षक म्हणून नोकरी केली. नोकरी निमित्तच ते अमरावतीहून मुंबईला आले. त्यानंतर ते कल्याणमध्ये स्थायिक झाले.

    साधे सुती कपडे आणि खांद्याला झोळी अशा अवतारातले बापू जिथे नाटक असेल तिथे जात आणि चाललेल्या गोष्टींचे बारीक अवलोकन करत. ते फार बोलत नसत, परंतु सर्वत्र असत. नव्या रंगकर्मींची राज्य नाट्य स्पर्धेतली नाटके न चुकता बघत. त्यांना सूचना करत. त्यांनी नाटकाच्या दिग्दर्शनापासून अभिनय आणि नेपथ्य-प्रकाश योजनादी तंत्रांच्या हाताळणी पर्यंत सर्व घटकांत रस घेतला. पण नेपथ्यरचनेत ते विशेष रमले. १९६० ते १९७५ ह्या काळात त्यांनी रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून आपला ठसा उमटवला. हा काळ मराठीतील राज्य नाट्य स्पर्धांचा बहराचा काळ होता. याच काळात हौशी रंगभूमीवर अनेकानेक प्रयोग झाले आणि प्रायोगिक रंगभूमीने बाळसे घेतले.

    जेव्हा डॉ. श्रीराम लागू विजय तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ हे नाटक दिग्दर्शित करत होते. त्यांनी बापूंकडे या नाटकाच्या नेपथ्याची धुरा सोपवली. ‘गिधाडे’ हे तसे उग्र प्रकृतीचे नाटक. तेंडुलकरांनी त्यात माणसांमधल्या गिधाडांचे दर्शन घडवले होते. बापू लिमयेंनी नाटकातील हिंसक प्रवृत्तीच्या माणसांच्या घरालाच गिधाडांच्या ढोलीचा आकार दिला. घरातील फर्निचर हे ओबड धोबड, वृक्षांच्या कापलेल्या ओंडक्यांप्रमाणे होते. नेपथ्यातला रासवटपणा नाटकाची प्रकृती अधोरेखित करील हे त्यांनी पाहिले. त्यांचे हे अतिवास्तववादी नेपथ्य त्याकाळात खूप गाजले. ‘गिधाडे’ या नाटकाने त्यांना नेपथ्यकार म्हणून ओळखले जावू लागले. त्यांनी ‘चक्रावर्त’, ‘गार्बो’, ‘आर्य चाणक्य’ या नाटकांना केलेले नेपथ्य असेच वेगळे ठरले. त्यांनी बाळ कोल्हटकरांच्याही नाटकांचे नेपथ्य केले. ‘सविता दामोदर परांजपे’ ह्या व्यावसायिक नाटकाचे नेपथ्य त्यांनी केले. ‘सं कट्यार काळजात घुसली’ या नाटकाची त्यांनी दोन अंकी रंगावृत्ती तयार केली होती.

    ते जिथे नोकरी करत त्या मध्य रेल्वेतील कलाकारांसाठी कल्चरल अकादमीची त्यांनी स्थापना केली. नाटककार विजय तेंडूलकर यांच्या नाटकाच्या आवडीबरोबरच त्यांनी लिखाणमध्येही आपली छाप सोडली आहे. त्यांच्या डोक्यात कायम रंगभूमीचा विचार असायचा आणि कृतीत अखंड प्रयोगशीलतेचा ध्यास असायचा. ते हाडाचे नेपथ्यकार होते आणि त्यांनी ‘नेपथ्याची बखर’ नावाचे पुस्तकच लिहिले होते, ज्यात मराठी रंगभूमीवरील गेल्या १५० वर्षांतील नेपथ्याच्या वाटचालीचा इत्थंभूत इतिहास होता. बापूंना हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवावासा वाटायचा. केवळ इतिहासच नव्हे तर नेपथ्याचे तंत्र आणि मंत्र नव्या रंगकर्मींना सांगावेसे वाटत. त्यांनी ‘गोष्ट नेपथ्याची’ हे तीन भागांतले पुस्तक लिहिले.

    अनेक नाट्यप्रशिक्षण कार्यशाळांमधून त्यांनी ह्या तंत्रमंत्राचे धडे दिले. आणि शिवचरित्रकार डॉ. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथातील निवडक विषयांवर समीक्षा लेखन केले. या बरोबरच बापू लिमये उवाच, हा निबंध संग्रह, समीक्षा, लेख संग्रह त्यांनी लिहिले. विद्यार्थ्यांसाठी ‘विचारसूत्र’ लिहिली. ते मध्य रेल्वेच्या कल्चरल अकादमीचे संस्थापक होते. हौशी रंगमंच संघटनेचे ते माजी अध्यक्ष, रंगमंच कलाकार संघटनेचे ते माजी अध्यक्ष, कार्यकर्ते होते. त्यांनी ९७ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढवली होती. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 26, 2017


  • ज्येष्ठ रंगकर्मी व नकलाकार राजाभाऊ चिटणीस

    माणुसकी, हलाहल, तिखट मिरची घाटावरची, हिंदी चित्रपट ‘कानून का शिकार’ या चित्रपटातून राजाभाऊ मोठ्या पडद्यावरही झळकले. त्यांचे चिरंजीव राजेश चिटणीस व त्यांची नात राजसी राजेश चिटणीस यांना देखील आजोबांच्या कलेचे बाळकडू मिळाले आहे.

      April 27, 2022


  • संस्कृतचे गाढे अभ्यासक पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार

    गुलाम दस्तगीर बिराजदार हे प्रसिद्ध गझलकार बदीऊज्जमा बिराजदार यांचे वडील होत. पंडित गुलाम यांना राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती यांनी वाचस्पती या पदवीने सन्मानित केले होते. शहाजी हायस्कूल, सोलापूर व मुंबई येथे त्यांनी संस्कृत शिक्षक म्हणून सेवा केली. आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा राष्ट्रपती यांचे हस्ते पुरस्कार मिळाला होता. तसेच विविध संस्थांनी त्यांना महापंडित, पंडितेंद्र, संस्कृतरत्नम, परशुरामश्री, विद्यापारंगत, वाचस्पती अशा पदव्या बहाल केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य, संस्कृत पाठ्य पुस्तक निर्माण बालभारतीचे ते अध्यक्ष होते.बिराजदार यांना १८ हून अधिक पुरस्कार मिळालेले होते.

      April 22, 2022


  • मराठी नाट्यसंगीत गायक, अभिनेते छोटा गंधर्व

    हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक, अभिनेते, संगीत रचनाकार छोटा गंधर्व यांचे खरे नाव सौदागर नागनाथ गोरे. त्यांचा जन्म १० मार्च १९१८ रोजी झाला.

    बालगंधर्व यांच्यानंतर पुण्यस्मरण करावे असे रंगभूमीवरील व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.छोटा गंधर्व. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती.

    छोटा गंधर्व यांनी १० वर्षे वयाचे असताना ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत.

    आपल्या गायकीने अर्धशतकाहून अधिक काळ रंगभूमी गाजविणारे स्वरराज छोटा गंधर्व हे त्यांच्या दातृत्वासाठी सर्वपरिचित होते, १९४३ मधे त्यांनी काही कलाकारांसह 'कलाविकास' ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली.

    संगीत सौभद्रातील तसेच 'सुवर्णतुले'तला कृष्ण, 'संगीत मानापमाना'तील 'धैर्यधर', 'मृच्छकटिका'तील 'चारुदत्त', 'संशयकल्लोळ' मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली.

    आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या छोटा गंधर्व यांना आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला.

    १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.

    छोटा गंधर्व यांचे ३१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकी पिडीया

      December 31, 2016


  • प्रवचनकार, कीर्तनकार डॉ. सदानंद मोरे (देहूकर)

    त्यांनी दैवत कोशांची निर्मिती केली. जीवनसंग्राम, ताई अन् भाऊ, वटपत्र, राष्ट्रसेवकाची शिदोरी, राम बंधू त्याग सिंधू, उक्तीविशेष, साहित्य सरिता, अज्ञाताची वचने, वंदे मातरम, किशोर मित्रांनो, देवादिकांच्या गोष्टी, हनुमान कोश, श्रीराम कोश, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

      June 25, 2022


  • मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए.

    जी. ए. नी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्लिश भाषाचे अध्यापन केले. त्यांचा जन्म १० जुलै १९२३ रोजी झाला. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जात. जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. मराठीतील एक आघाडीचे नवकथालेखक म्हणून जी.ए. ओळखले जातात.

    निरनिराळ्या प्रतीकांचा वापर करून आपल्या कथेची मांडणी करण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे मानवाला अगतिक व नगण्य बनविणार्यार नियतीला आणि तिच्या असीम शक्तीला जी.एं.नी आपल्या कथामधून बरेच प्राधान्य दिले असल्याचे आपणास पाहावयास मिळते. जी.ए. कुलकर्णी यांच्या निळासावळा व रक्तचंदन या कथासंग्रहाना महाराष्ट्र शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार मिळले होते.

    जी.ए. कुलकर्णी यांना ’काजळमाया’ या कादंबरीसाठी मिळालेला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, पुढे टीका झाल्यामुळे जी.एं.नी प्रवासखर्चासकट परत केला.

    त्यांची ग्रंथसपदा: निळासावळा, पारवा, हिरवे रावे, काजळमाया, रक्तचंदन इत्यादी कथासंग्रह.

    जी. ए. कुलकर्णी यांचे ११ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 11, 2017


  • तारकांचे जन्मरहस्य संशोधिणारा : डॉ गुरुराज वागळे

    आकाश दर्शनाचे संस्कार जर शालेय वयात झाले तर या कुतुहलाचे रुपांतर जिज्ञासात होऊ शकते. तसे झाले तर खगोल शास्त्राचा अभ्यास करण्याचा ध्यास त्या विद्यार्थांना शालेय वर्षातच लागतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सरस्वती सेकंडरी स्कूलचा माजी विद्यार्थी डॉ. गुरुराज वागळे.

      October 14, 2018


  • चरित्रकार सुमती देवस्थळे

    आज २७ डिसेंबर आज चरित्रकार सुमती देवस्थळे यांचा जन्म २७ डिसेंबर १९२७ रोजी झाला. सुमती देवस्थळे यांची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि लालित्यपूर्ण भाषेत सर्वच चरित्रं अत्यंत लोकप्रिय झाली होती. टॉलस्टॉय एक माणूस, मॅक्झिम गॉर्की, छाया व ज्योती, एक विचारवंत (मार्क्स), अल्बर्ट श्वाइत्झर, सप्तर्षी आणि अरुंधती अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सप्तर्षी आणि अरुंधती या पुस्तकात त्यांनी आठ प्रतिभावंतांच्या चरितकथा मांडल्या. टॉलस्टॉय एक माणूस यात टॉलस्टॉयचे चरित्र लिहिताना.

    विश्वशांतीचा मार्गदर्शक, अलौकिक प्रतिभासंपन्न साहित्यिक, दीन-दुबळ्यांचा कैवारी, सत्याचा उपासक, अभिनव प्रयोग करणारा शिक्षणशास्त्रज्ञ, अविरतपणे आत्मशोधनात मग्न असणारा, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा, शांतीने प्रतिकार करा असा आग्रह धरणारा टॉलस्टॉय एकीकडे दिसतो. तर दुसरीकडे 'वॉर ऑण्ड पीस'सारखे युद्धविरोधी लिखाण लिहिलेला, मात्र तरुणपणी स्वत: आघाडीवर राहून लढलेला, गरिबांचा कळवळा असला तरी कुटुंबाचे हाल नको,या सबबीखाली जमीनदारी थाटात राहणारा, वेगवेगळ्या क्षेत्रांत शिरुनही त्यात सातत्य न टिकवणारा, संयमाचा मंत्र सांगूनही स्वत: विषयासक्त असणारा असा टॉलस्टॉय आहे असे त्यांनी दाखवून दिले.

    सुमती देवस्थळे यांचे २२ जानेवारी १९८२ रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 27, 2018


  • लेखक,कवी वि.स. खांडेकर

    वि.स.खांडेकर यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८९ रोजी झाला. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. कुमार वयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्र्चात्त्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला.

    ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचनमृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देव्हारा, पहिले प्रेम अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या. शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा- कादंबऱ्यातून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे. हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची क्रौंचवध ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती, अमृतवेल या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत.

    ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कथा-कादंबर्यांंवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दुरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांत व विदेशी भाषांतही अनुवाद झाले. ‘रूपककथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी या कथांतून केली. वेचलेली फुले या संग्रहात या रूपककथा आहेत. अक्षरश: चकित व्हायला व्हावे एवढे विविध प्रकारचे, विपुल आणि तरीही दर्जेदार असे लेखन करून खांडेकरांनी मातृभाषेची सेवा केली आहे, आणि त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत व साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्र्वास निर्माण केला. मा.वि.स.खांडेकर यांचे २ सप्टेंबर १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    वि.स. खांडेकर यांची ग्रंथसंपदा : हृदयाची हाक, कांचनमृग, हिरवा चाफ़ा, दोन मने, रिकामा देव्हारा, उल्का, सुखाचा शोध, पहिले प्रेम, पांढरे ढग, ययाती, अमृतवेल इत्यादी कांदबर्या . कालची स्वप्ने, नवा प्रात:काल, ऊनपाऊस, दत्तक आणि इतर गोष्टी, प्रसाद, जीवनकला, स्त्री-पुरुष, पाषाणपूजा इत्यादी कथासंग्रह. चांदण्यात, वायुलहरी, सायंकाळ, मझधार, झिमझिम, कल्पकता इत्यादी लघुनिंबधसंग्रह. याशिवाय काही रुपकथासंग्रह, टोपणनावाने लिहिलेल्या काही कविता, रंकाचे राज्य हे नाटक, काही टीकात्मक लेखनाचे ग्रंथ यांचाही त्यांच्या साहित्यात समावेश होतो.

      January 19, 2018