शोभा गुर्टू ह्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. लोकांनी त्यांना 'ठुमरी सम्राज्ञी' म्हणून नावाजले होते. शोभा गुर्टूंचे लग्नाअगोदरचे नाव भानुमती शिरोडकर. संगीताचे प्रारंभिक शिक्षण त्यांना आपली आई व नृत्यांगना मेनकाबाई शिरोडकर यांचेकडून मिळाले. मेनकाबाईंनी गाण्याचे शिक्षण जयपूर घराण्याच्या उस्ताद अल्लादिया खान यांचेकडून घेतले होते. शोभाताईंचे शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण त्या लहान असतानाच उस्ताद भुर्जी खान यांचेकडे सुरू झाले. ते उस्ताद अल्लादिया खानांचे धाकटे सुपुत्र होत. शोभाताईंची ग्रहणशक्ती व प्रतिभा यांमुळे भुर्जी खानांच्या कुटुंबाने ह्या मुलीस आपल्या परिवाराचा जणू हिस्साच बनविले. नंतर त्या उस्ताद नथ्थन खानांकडे संगीत शिकू लागल्या. उस्ताद घम्मन खान हे शोभाताईंच्या आईला, मेनकाबाईंना त्यांच्या मुंबई येथील घरी ठुमरी - दादरा व इतर उपशास्त्रीय संगीताचे प्रकार शिकवायला यायचे. त्यांच्याकडेही शोभाताई संगीत शिकल्या.
ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती इत्यादी उपशास्त्रीय संगीत प्रकार हे शोभाताईंची खासियत होते. आपल्या गायनात शास्त्रीय संगीतातील आलापी त्या खुबीने वापरत असत. गायिका बेगम अख्तर व उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्या गायकीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. शोभाताईंच्या ठुमरी गायनाचे असंख्य चाहते होते. त्यांनी मराठी व हिंदी भाषा चित्रपटांतही पार्श्वगायन केले होते. त्यांनी सर्वप्रथम ज्या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले तो म्हणजे कमाल अमरोहींचा पाकिजा (१९७२) होय. फागुन (१९७३) मध्ये त्यांनी 'बेदर्दी बन गए कोइ जाओ मनाओ सैंयां' हे गीत गायले. मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८) साठी त्यांनी गायलेल्या 'सैंया रूठ गए' गाण्याबद्दल त्यांना फिल्मफेअरचे उत्कृष्ट पार्श्वगायिकेचे नामांकन मिळाले होते.
'सामना' व 'लाल माती' ह्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. गझल, मराठी नाट्य संगीत या गायन प्रकारांतही त्यांनी श्रोत्यांची दाद मिळविली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. २७ सप्टेंबर २००४ रोजी शोभा गुर्टू यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया
एक अभिनेत्री, शास्त्रीय नृत्यांगना, कर्नाटकी गायिका, नृत्य प्रशिक्षक व राजकारणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वैजयंती माला यांनी वयाच्या १३ व्या वर्षी तामिळ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. एम डी रमन व वसु़ंधरादेवी हे त्यांचे आईवडिल. पापाकुट्टी (अर्थ लहान मुलगी) या नावाने ती ओळखली जात असे.
वैजयंती माला यांची आई तमिळ चित्रपटांतील एकेकाळची एक आघाडीची नायिका होती. ७ वर्षांची असल्यापासुन मा.वैजयंती माला यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात ती पारंगत झाली.
त्यांचे कौटुंबिक परिचित दिग्दर्शक एम डी रमन वझकई या तमिळ चित्रपटासाठी एका नव्या अभिनेत्रीच्या शोधात होते. त्या दरम्यान वैजयंतीमालाला त्यांनी नृत्य करतांना पाहिले व ते प्रभावित झाले. मात्र वैजयंतीमाला यांना त्यांच्या चित्रपटात संधी देण्यापुर्वी त्यांना तिच्या आजीचे, यदुगिरी देवी यांचे मन वळवावे लागले होते. कारण तिच्या शिक्षण व नृत्यावर याचा परिणाम होईल असे आजीचे मत होते.
वयाच्या सोहाव्या वर्षी अभिनय केलेला वैजयंतीमाला यांचा हा पहिलाच चित्रपट आर्थिकद्रुष्ट्या यशस्वी ठरल्याने याच चित्रपटाचा तेलगु मधे जीवितम या शीर्षकाने रिमेक करण्यात आला. नायिकेच्या भुमिकेसाठी पुन्हा वैजयंतीमालाची यांचीच निवड करण्यात आली. हा चित्रपट देखील यशस्वी झाला. १९५१ मध्ये आलेल्या 'बहार' या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
१९५४ मध्ये रिलीज झालेला नागिन हा सिनेमा त्यांच्या करिअरमधील पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. 'देवदास' हा सिनेमा वैजयंती माला यांच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. विमल राय दिग्दर्शित या सिनेमात वैजयंती माला यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९५८ मध्ये पडद्यावर झळकलेल्या 'साधना' या सिनेमातील भूमिकेसाठी वैजयंती माला यांना त्यांच्या करिअरमधील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
देवदास, नया दौर, मधुमती, गंगा जमुना, लीडर, आम्रपाली, गंवार, लीडर, सुरज, संगम, पैगाम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी त्यांना ओळखले जाते. त्या गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगणा आहेत. एकामागून एक हिट सिनेमे देणा-या वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये आपल्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसह काम केले आहे.
दिलीप कुमार, राजकपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, सुनील दत्त या अभिनेत्यांसोबत ऑन स्क्रिन त्यांची जोडी चांगली जमली होती. ‘संगम‘चे चित्रीकरण चालू असतांना एकदा वैजयंतीमालाचा वाढदिवस आला॰ राजने एक मोठा केक आणून त्यावर एकच मोठी मेणबत्ती लावली॰ सर्वांच्या प्रश्नार्थक नजरांना राजने हा वैजयंतीमालाचा RK मधील पहिलाच वाढदिवस आहे; तिचे येथे आणखी भरपूर वाढदिवस होवोत, मग मेणबत्यांची संख्या वाढत जाईल, असे सांगितले.
१९६८ मध्ये वैजयंती माला यांनी डॉ. चमनलाल बाली यांच्यासह लग्न केले. लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करणे बंद केले. १९६९ मध्ये रिलीज झालेला 'प्रिन्स' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये हिंदीसह तेलगू, तामिळ आणि बांग्ला या भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला.
वैजयंती माला यांना संगीत नाटक अॅकाडमी व पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ४८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे अध्यक्षपद भुषविले तर लोकसभा सदस्य म्हणुन त्यांनी काही काळ काम पाहिले. सन २००७ मधे बॉंडींग नावाने तिचे आत्मचरित्र प्रकाशित झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-दिव्य मराठी
सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात मिसळणे टाळणाऱ्या सुचित्रा सेन या बंगालच्या ‘ग्रेटा गाब्रो’ म्हणून प्रसिद्ध होत्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. ‘शेष कोठाई’ या चित्रपटापासून त्यांनी १९५२ मध्ये सुरुवात केली व नंतर बिमल रॉय यांच्या १९५५ मधील ‘देवदास’ या चित्रपटात त्यांना दिलीपकुमारच्या देवदासबरोबर साकारलेल्या पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी पडद्यावर जुळली. त्यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले. त्यांनी ५२ बंगाली तर ७ हिंदी चित्रपट केले. भारतभूषणबरोबरचा चंपाकली, देव आनंदबरोबर सरहद, बंबई का बाबू यासह ममता हा एक चित्रपटही त्यांनी केला होता. १९७४मध्ये त्यांनी ‘देवदास’नंतर गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. संजीव कुमार यांच्यासमवेत त्यांनी जी भूमिका केली होती, त्यात त्यांची भूमिका ही इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती त्यामुळे तेव्हा वाद निर्माण झाला होता. १९७८ मध्ये त्यांनी सौमित्र चटर्जी यांच्याबरोबर ‘प्रणोय पाश’ हा चित्रपट केला. तो पडला. त्यानंतर सुचित्रा सेन कधीच कुणाला दिसल्या नाहीत व २००५ मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता. यशस्वी कारकिर्दीनंतर अचानक त्या एकाकी आयुष्य जगू लागल्या होत्या. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांना भारत सरकार कडून पद्मश्री आणि बंगाल सरकार कडून बंगबिभूषण हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मा.सुचित्रा सेन यांचे निधन १७ जानेवारी २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
निशिकांत कामत यांनी ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’, ‘फोर्स’, ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’ यासारख्या एकापेक्षा हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं.याशिवाय ‘सातच्या आत घरात’,‘रॉकी हॅण्डसम’,‘ज्युली 2’,‘मदारी’,‘भावेश जोशी’, फुगे, ‘डॅडी’ सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात अभिनयही केला.
साडेतीनशे वर्ष झाली तरी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या राजसदरेवर शिवरायांचा पुतळा नव्हता. मेघडंबरी म्हणजे छत्र आहे, पण त्या मेघडंबरी मध्ये शिवरायांचा पुतळा नाही अशी परिस्थिती होती. या मेघडंबरीत पुतळा बसविणे हि काही सामान्य गोष्ट नव्हती. हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने तेथे कोणतीही नवीन गोष्ट करण्यास बंदी होती. यासाठी युवराज संभाजीराजेंनी पुरातत्व खात्याशी सातत्याने पाठपुरावा करून पुतळा बसविण्यास परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळत नव्हती. शेवटी ६ जुन २००८ हा दिवस पुतळा बसविण्यासाठी निश्चित करण्यात आला.
काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीमुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चितळे उद्योग समूह वाढला. व्यवसाय फक्त डेअरीपुरता मर्यादित न ठेवता दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या व बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले.
शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’ यांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ रोजी झाला. शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे वडील सोलापुरातील पहिले पदवीधर डॉक्टर होते. त्यांना यंत्रकलेची अफाट आवड होती. किर्लोस्कर कंपनीने या वेळी कडबा कापण्याचे यंत्र बनविले होते. त्याची जाहिरात बनविण्याचे काम शंकररावांना देण्यात आले. दोन बैलांचे संभाषण. एक बैल या यंत्राने कापलेला कडबा किती स्वच्छ असतो हे सांगताना त्या जाहिरातीत दर्शविले होते. शंकररावांची ही पहिलीच जाहिरात. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना एक बॉक्स कॅमेरा मिळाला व येथून पुढे शंकररावांनी छायाचित्रणाचे धडेही गिरविले. पुढे शंकररावांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला, नंतर मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना वरच्या वर्गात प्रवेश मिळाला. तेथेही केवळ दिसते तसे चित्र न काढता, त्यामध्ये कल्पनाशक्तीची भर टाकणे आवश्यक आहे, हे त्यांच्या मनात रुजले व त्यासाठी शंकररावांनी संस्कृत, इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. वाचन वाढविले व आपल्यातील कलावंत परिपूर्ण केला. दर मंगळवारी ‘केसरी’मध्ये किर्लोस्कर नांगराची जाहिरात येत असे.
शंकररावांनी जाहिरातीची सूत्रे हातात घेतली. हळूहळू कंपनीचा बोलबाला वाढला. उत्पादने वाढली व किर्लोस्करला चिन्हाची गरज भासू लागली आणि आज सर्व परीचित झालेले विशिष्ट वळणाचे ‘किर्लोस्कर’ हे नाव हाताने लिहून ते रजिस्टर करण्यात आले. त्या वेळी विदेशातून किर्लोस्करकडे बरेच टपाल येत असे. एकदा त्यात फोर्ड कंपनीची ‘फोर्ड टाइम्स’ ही पुस्तिका आली. ती पाहताच शंकररावांच्या मनात आले, की आपल्या कारखान्याचे असे मासिक का असू नये? त्याचे नावही त्यांनी निश्चित केले. ‘किर्लोस्कर खबर!’ उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडमोडी. गावातील लोकांच्या कथा-कविता असे स्वरूप होते या मासिकाचे व ते छापायला एक जुना हॅण्डप्रेसही विकत घेतला आणि १९२० साली पहिला ‘किर्लोस्कर खबर’चा अंक प्रकाशित झाला. अन् मराठी साहित्य जगतात लहानशी खळबळ उठली.
१९२९ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किर्लोस्कर कारखान्यास भेट दिली. त्यांच्या पाहण्यात ‘किर्लोस्कर खबर’ आले व त्यातील ‘खबर’ हा फारसी शब्द त्यांना खटकला, त्यानंतर केवळ ‘किर्लोस्कर’ हे वाङ्मय क्षेत्रात गाजलेले नाव मासिकाला राहिले. पुढे शंकररावांनी त्यामध्ये ललित व वैचारिक लेख समाविष्ट केले. १९३० मध्ये स्त्रियांनी सामाजिक बदलांना सामोरे जावे या हेतूने ‘स्त्री’ मासिकाची स्थापना झाली. तसेच तरुण युवकांना उत्तेजन देण्यासाठी १९३४ मध्ये ‘मनोहर’ हे मासिक सुरू करण्यात आले. हळूहळू ‘किर्लोस्कर’ मासिकाचा व छापखान्याचा विस्तार वाढला. ‘किर्लोस्कर’वाडीचे क्षेत्र त्याला अपुरे पडू लागले. तेव्हा ‘किर्लोस्कर’चे स्थलांतर पुणे येथे १९५९ च्या जून महिन्यात झाले. किर्लोस्कर नावाला केवळ उद्योग जगतापुरते मर्यादित न ठेवता त्याला जनसामान्यांमध्ये लोकप्रिय करण्याचे श्रेय ‘किर्लोस्कर', 'स्त्री' व 'मनोहर' ही मासिके व त्यांचे संपादक शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’ यांनाच द्यावे लागेल.
किर्लोस्कर घराण्याच्या औद्योगिक कार्यास शंकररावांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उत्तरदायित्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे १ जानेवारी १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अजय वढावकर यांनी मालीकाच्या बरोबर येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, इंग्लिश बाबू देसी मेम या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार' प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला.
मुंबईतील दादर भागात लहानाचे मोठे झालेल्या वढावकर यांचा अंतकाळ हलाखीचा होता. मधुमेहामुळे पाच वर्षांपूर्वी त्यांना पाय गमावावा लागला. त्यानंतरही त्यांनी जिद्दीने "झी टीव्ही'वरील ‘पवित्र रिश्ता' मालिकेत काम सुरू केले. 'झी' टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' ही त्यांची शेवटची मालिका होती.
अजय वढावकर यांचे २७ फेब्रुवारी २०१५ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
पु. भा. यांचे नाव मराठी नवकथेचे जनक म्हणून घेतले जाते. कथालेखक म्हणून ते युगप्रवर्तक ठरले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी झाला.त्यांच्या सतरा कादंबर्यानी मराठी भाषेत नवतारुण्य आणले. नाटककार म्हणून ते मखमली पडद्यावर आले. नंतर रजपटावर झळकले. आपल्या सर्व साहित्यात त्यानी जीवन व मृत्यु या सनातन प्रश्नांचा पाठपुरावा केला. प्रतिभा, पांडित्य आणि पौरुष यांचा सुरेख संगम भाव्यांच्या लेखनात आढळतो. मानवाच्या बर्याकवाईट सर्व प्रकृतीचा आलेख त्यांनी आपल्या साहित्यातून मांडला. वाचकांचा जीवनानुभव त्यांनी समृद्ध केला. लेखन हे भाव्यांचे आयुअष्यभराचे व्रत होते. केवळ लेखनावर जगायच ही त्यांची जिद्द होती. मा.पु.भा.भावे यांची सहित्य संपदा विशाल व सर्वस्पर्शी अशी होती. ६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले. त्यांचे "प्रथम पुरुष एकवचनी" नावाच्या आत्मचरित्राचे तीन खंडही प्रसिद्ध आहेत. याशिवाय 'सावधान' व 'आदेश' या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्या अमौलिक झुंजार पत्रकारितेचे दर्शन भाव्यांनी समाजाला घडवले. ते उत्कृष्ट तत्त्वचिंतक होते.
मे १९५४ मध्ये अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष झाले होते. १९६७ मध्ये विदर्भ साहित्य संमेलन, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे ते अध्यक्ष होते. १९७७ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यानीच भूषविले होते.
पु.भा.भावे यांचे वक्तृत्त्वही अमोघ होते. पु.भा.भावे यांचे १३ ऑगस्ट १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
हिंदी चित्रपट सृष्टीत हास्य अभिनेता म्हणून स्थान मिळविणारा पहिला अभिनेता म्हणून बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ़ जॉनी वॉकर यांचे नाव व व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२० रोजी झाला. सदाबहार व्यक्तिमत्व असणार्याब या कलाकाराने विनोदी अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत अढळ पद संपादन केले आहे.
जॉनी वॉकर यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत गेलं. जॉनी वॉकर यांनी सुरुवातीच्या काळात बेस्ट मध्ये बस कंडक्टर म्हणून काम केले होते. बसमध्ये प्रवाशांबरोबर मजामस्ती करुन त्यांचे मनोरंजन करत होते. हे पाहून बलराज साहनी प्रभावित झाले होते. बलराज साहनी यांनी त्यांची भेट गुरु दत्त यांच्याशी करुन दिली. १९५० साली आलेल्या ’ आखरी पैगाम” द्वारे ते' रसिकांच्या पुढे आले.त्याच वर्षी नवकेतनचा ’बाजी’ झळकला आणि जॉनी वॉकर यांनी मागे वळून पाहिले नाही.
बाजीमधील त्यांच्या दारुड्याच्या अभिनयामुळे खूष होऊन गुरुदत्त यांनी त्यांना "जॉनी वॉकर" हे जगप्रसिद्ध व्हिस्कीच्या ब्रँडचे नाव दिले आणि बद्रुद्दीन जमालुद्दीन काझीचा 'जॉनी वॉकर' झाला. बिमल रॉय सारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाच्या ’मधुमती’त जॉनी वॉकर यांनी दारूड्याची भूमिका एवढी अप्रतिम केली की समीक्षकांनी त्यांना त्या वर्षाचा सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार बहाल केला गेला.
जॉनी वॉकर यांनी आयुष्यात कधी दारूला स्पर्श ही केला नाही पण दारूड्याचे बेअरींग एवढे झकास सांभाळले की बिमलदा म्हणाले 'हा माणूस दारूला स्पर्श देखील करीत नाही या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही.’देव आनंद यांच्या सोबत 'सीआयडी'त तर त्यांनी कमाल केली होती. 'ऐ दिल है मुश्कील जीना यहां जरा हठ के जरा बच के ये है बॉंम्बे मेरी जान’ हे गाणं तर त्या वर्षीच बिनाका टॉपचं गाणं ठरलं! वॉकर यांची विनोदातील लोकप्रियता एवढी होती की ’जॉनी वॉकर’नावाचा एक सिनेमा पन्नासच्या दशकात आला होता यात त्याने मुख्य भूमिका केली होती.
श्रीमंत मेहुणा पाहिजे या मराठी सिनेमात देखील त्यांनी भूमिका केली होती. जवळपास प्रत्येक सिनेमात वॉकर यांच्यावर गाणं चित्रित केलेले असायचं. आपल्या ३५ वर्ष्याच्या करीयर मध्ये जॉनी वॉकर यांनी ३२५ चित्रपटात काम केले. मिस्टर कार्टून एम.ए., खोटा पैसा, मिस्टर जॉन, नया पैसा, रिक्षावाला आदी चित्रपटात जॉनी वॉकर यांनी नायक म्हणून काम केले होते. जॉनी वॉकर यांनी काळाची पावले ओळखून सत्तरच्या दशकात निवृत्ती पत्करली पण हृषिकेश मुखर्जी यांच्या आग्रहावरून 'आनंद' व गुलज़ार यांच्या आग्रहावरून 'चाची ४२०' या चित्रपटात काम केले होते. जॉनी वॉकर यांचे २९ जुलै २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti