१९८६-८७ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसचा व्यवसाय खूपच लहान प्रमाणात होता. काही मोठे प्रकाशक त्या वेळी डॉमिनेटिंग स्टेजला होते. तसंच आपणही मराठी प्रकाशन व्यवसायात आपलं वेगळं स्थान निर्माण करायला हवं असं ध्येय ठेवून ते व्यवसाय वाढवत गेले. पुढे मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाउसच्या माध्यमातून प्रकाशन आणि वितरण क्षेत्रात भरारी घेतली.
March 3, 2022
मनोज कुमार यांच्या "उपकार‘ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्रदिनी अन् प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं गाणं "मेरे देश की धरती‘... हे गाणं कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९३४ रोजी झाला.
महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत-संगीताकडे त्यांचा वाढता कल होता. त्यांचे कुटुंब मुंबईत आले तेव्हा महेंद्र कपूर यांना एक दिशा मिळाली. या मार्गावर खूप संघर्ष करावा लागणार शालेय स्तरावरच त्यांचा गोड आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला. प्रसिद्ध गायक मा.मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन घेतले. सेंट जेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. संगीत की शिक्षा उन्होंने पं. तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोतदार, फैयाज अहमद तसेच पंडित हुस्नलाल यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे गिरवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या आवाजाची चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. 'मदमस्त' या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले.
गीत, गझल, भजन, कव्वाली सारखे सर्व प्रकार ते सहजरीत्या गात असत. त्यांच्या काळातील नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, रवी, कल्याणजी-आनंदजी, खय्याम अशा जवळजवळ सर्व संगीतकारांसाठी ते गायले आणि अभिनेत्यांना आवाज दिला.
रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांमुळे त्यांना कमी संधी मिळाली. तरीदेखील एवढ्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. बी. आर. चोपड़ा आणि मनोज कुमार यांच्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. बी. आर. चोप्रा, संगीतकार रवी आणि महेंद्र कपूर या त्रिवेणीने अनेक यादगार गीते गायली. चोप्रा यांची 'धूल का फूल', 'वक्त', 'हमराज', 'धुँध' यांच्या अनेक चित्रपटांमध्ये महेंद्र कपूर यांनी गायन केले. मनोज कुमार यांच्या 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यांसारखे अनेक चित्रपट यशस्वी होण्यामध्ये महेंद्र कपूर यांचेही योगदान आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपरगीते हिट झाली. 'मेरे देश की धरती' या गीताची लोकप्रियता अजूनही कायम आहे. हिंदीबरोबरच त्यांनी इतर भाषांमध्येही गीते गायली. मराठी चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांचे खूप जमले. महेंद्र कपूर यांना आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा फिल्म फेयर पुरस्कार, सारखे अनेक पुरस्कार मिळाले. मा.महेंद्र कपूर यांचे निधन २७ सप्टेंबर २००८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 9, 2018
मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी झाला. अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७ मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १९४१ मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. आणि तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते.
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.
गीतकार म्हणून अनंत काणेकर यांनी लिहिलेली गाणी
आता कशाला उद्याची बात
आला खुशीत् समिंदर
एकलेपणाची आग लागली
तू माझी अन् तुझा मीच
दर्यावर डोले माझं
अनंत काणेकर यांचे २२ जानेवारी १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 13, 2019
सावनी शेंडेला स्वरांचा वारसा घरातूनच मिळाला आहे. तिचा जन्म १८ ऑगस्ट १९७९ रोजी झाला.आजी कुसुम शेंडे आणि वडील डॉ. संजीव शेंडे यांच्या रूपाने गाण्याची शाळाच सावनीच्या घरी होती. कुसुम शेंडे या किराणा घराण्याच्या गायिका; तसेच संगीत नाटकाच्या पिढीतील उत्तम कलाकार होत्या.
वडील डॉ. संजीव शेंडे यांनाही शोभा गुर्टू यांचे मार्गदर्शन लाभले. दादरा, ठुमरी अशा उपशास्त्रीय गायनात त्यांचा हातखंडा आहे. लहानपणी आजीचा आणि वडिलांचा रियाज कानावर पडल्याने हळूहळू तिचा कान गाण्यासाठी तयार होऊ लागला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच प्रेक्षकांसमोर गाण्याची संधी त्यांना मिळाली. लहानपणीच सावनीची क्षमता उमगल्यामुळे तिचे शास्त्रोक्त शिक्षण सुरू झाले. त्यानंतर बाराव्या वर्षी तिला राष्ट्रपतींसमोर गाण्याची संधी मिळाली.
सावनीने आजीकडून किराणा घराण्याचे, तर डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. ग्वाल्हेर, अहमदाबाद, मुंबई, कोलकता, बंगळुरू यांसह देशभरात विविध ठिकाणी तिचे गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. सावनीने "कैरी' या मराठी चित्रपटासाठी पार्श्व गायन केले आहे. "सावली' चित्रपटासाठी सावनी यांना पुरस्कारदेखील मिळाला आहे. पं. जसराज गौरव पुरस्कार, माणिक वर्मा मेमोरिअल पुरस्कार अशा पुरस्कारांच्या सावनी मानकरी आहे.
"झाले मोकळे आकाश' या मालिकेचे शीर्षकगीत सावनी हिने गायले आहे. त्यासाठी तिला "रापा इंटरनॅशनल पुरस्कार' मिळाला आहे. "हृदय स्वर' हे सावनीचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात तिने स्वतः रचलेल्या काही बंदिशी आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
http://www.sawanishende.com/
August 18, 2017
नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्य त्यांच्याबद्द्लच्या जागवलेल्या आठवणी.
आयुष्यभर अभिनयकलेची व्रतस्थपणे सेवा करून त्या कलेचे अनेकांना दान करून कलाकारांची ललाटरेखा कालातीत बनविणारे मराठी रंगभूमी व रुपेरी पडद्यावरील नायक,खलनायक,चरित्र नायक आणि दिग्दर्शक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे असंच एक अनोखं व्यक्तिमत्व........
कोल्हापूर-कलानगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर,पंचगंगेचा अवखळपणा आणि सह्याद्रीचा कणखरपणा असा विलोभनीय संगम असलेल्या या नगरीने महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या राष्ट्राला अनेक रत्ने बहाल केली.कलेचा समृद्ध वारसा असल्याने जुन्यांचे पडद्याआड जाणे आणि नव्यांचे चमचमणे हे नियतीचे रहाटगाडगे....असे अविरत चाललेले...ज्यांचा उमेदीचा काळ कोल्हापुरात गेला त्या सर्वांचे कार्यकर्तुत्व खरं तर बंदिस्त करणे कठीण;पण मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीच्या कळसावर विराजमान झालेले आणि अभिजात शिष्य कलावंतांच्या मांदियाळीत पताका घेऊन पुढे उभे असणारे व आपल्या कसदार अभिनयाने मराठमोळ्या जनतेच्या हृदयसिंहासनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्यांच्या परंपरेतील एक कलाकार म्हणजे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे.
नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे उत्कृष्ट खलनायक आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म पुणे येथे १ मार्च १९१० रोजी महाशिवरात्रीला झाला.३ सप्टेंबर १९८६ रोजी कोल्हापूर येथे त्यांचे देहावसान झाले.या ७५ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण १०० चित्रपट आणि १३४ नाटके व त्यांचे असंख्य प्रयोग त्यांच्या नांवावर आहेत.त्यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडीओत चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी बराच काळ व्यतीत केला.
राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे होते जयशंकर दानवे. सुलोचना या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्रीला “ करीन ती पूर्व ” या रंगमंचावरील नाटकाद्वारे प्रथम अभिनय क्षेत्रात आणणारे आणि “ जयभवानी ” या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रथमच त्यांना मुख्य नायिकेची संधी देणारे होते जयशंकर दानवे. “ ऐका हो ऐका ” या नाटकातून गणपत पाटील यांना नाच्याची पहिली टाळी शिकविणारे व राजशेखर यांना रंगभूमीवर याच नाटकाद्वारे प्रथम दिग्दर्शन करणारे होते जयशंकर दानवे.
चंद्रकांत,सुर्यकांत मांडरे,सोहराब मोदी,विक्रम गोखले,जयश्री गडकर,पद्मा चव्हाण, रत्नमाला,रमेश देव अशा कलाकारांना अभिनयाच्या पाउलवाटेवर प्रथम संधी देऊन सिने-नाट्य सृष्टीची कवाडे त्यांच्यासाठी खुली करणारे होते जयशंकर दानवे.त्यांनी एक काळ हैद्राबादला ‘हैम्लेट’ नाटकाचे असंख्य प्रयोग करून गाजवला होता. उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असूनही मुंबईच्या अभिनय महासागरात न जाता कोल्हापुरात राहून त्यांनी अनेक कलाकार शिष्य घडविले.
करवीर वाचन मंदिर,करवीर नाट्य मंदिर,देवल क्लब,मेडिकल असोसीएशन, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल,न्यू हायस्कूल अशा कोल्हापुरातील अनेक संस्थाना नाटकांच्याद्वारे उर्जितावस्था आणली अशा कलाकाराचे चिरंतन स्मरण करणे आवश्यक आहे.म्हणूनच २०११ सालापासून “नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार ” हा मानाचा पुरस्कार दानवे परिवारातर्फे प्रदान करण्यात येतो.
आजपर्यंत रंगकर्मी “श्री.दिलीप प्रभावळकर,डॉ.मोहन आगाशे,श्री.सदाशिव अमरापूरकर,श्री.शरद पोंक्षे, श्री.अरुण नलावडे,श्री.सुबोध भावे” यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अशा नाट्य-सिनेदिग्दर्शकाचे व कलाकाराला ही भावांजली.......
“ स्मृतीत तुमच्या मिळते स्फूर्ती, गातो आम्ही तुमची कीर्ती
भावफुले ही तुम्हास अर्पण, स्मृतीस तुमच्या शतश: वंदन ”
जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर
(९८६०४४७५९७)
३ सप्टेंबर २०१६
February 27, 2017
September 13, 2016
२६ नोव्हेंबर, २००८ रोजी अतिरेक्यांच्या हल्ल्यात माझा जिवलग मित्र हेमंत करकरे शहीद झाला. दरवर्षी आजच्या दिवशी माझ्या जखमेवरची खपली निघून भावना भळाभळा वाहू लागतात.
प्रिय हेमंत
मी वर्गात शिरलो तेव्हा एका बेंचाच्या कोपऱ्यात स्वत:च्या अत्यंत कृश शरीराचं मुटकुळं करून खाली मान घालून तो बसला होता. कुपोषित बालक हा शब्द तेव्हा अस्तित्वात नसला तरी आज जाणवतं की मेळघाटातल्या एखाद्या कुपोषित बालकात आणि त्याच्या शरीरयष्टीत ‘काडी’चाही फरक नव्हता. अगदी आवर्जून त्याच्याशी बोलावं, त्याची मुद्दाम ओळख करून घ्यावी आणि मैत्री करावी असं त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीही नसल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तो अदखलपात्रच होता. माझ्या आक्रमक व बऱ्यापैकी भांडखोर स्वभावाला त्याच्या शांत स्वभावाचं प्रचंड आश्चर्य वाटत असे. माणसात कितीही वैगुण्ये असली तरी निसर्गाने त्यांची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भरपाई केलेली असते. त्याच्या बाबतीत ती भरपाई त्याच्या पाणीदार डोळ्यांच्या रूपाने झाली होती.
मी त्याला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे समोरच्या व्यक्तीवर जरब बसवणारे तेजस्वी डोळे मला क्षणात नामोहरम करीत असत. माझ्यासकट सर्व मित्र मैदानावर खेळत असताना तो वर्गात एकटाच बसून काय करतो हे बघण्यासाठी मी एक दिवस हळूच वर्गात शिरलो तेव्हा चांदोबा नावाचं मासिक वाचण्यात तो एवढा तल्लीन झाला होता की मी त्याच्या शेजारी येऊन बसलो आहे हे त्याला कळलंही नाही. पण त्या क्षणी मला एक अत्यंत महत्त्वाची जाणीव झाली की आम्ही दोघेही समानधर्मी व अत्यंत व्यसनी आहोत. आम्हा दोघांनाही वाचनाचं जबरदस्त व्यसन होतं व त्या व्यसनामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने मित्र झालो. त्या मैत्रीतून वयाच्या अकराव्या वर्षी आमच्या दोघांच्याही घरात छोट्याशा ग्रंथालयांचा जन्म झाला. चांदोबाचे जुने अंक व चोरबाजारातून आणलेली कॉमिक्स ही आमच्या ग्रंथालयांची ग्रंथसंपदा होती व त्यांचा फडशा पाडण्यासाठी ती एक्सचेंज करणं हे आमचे नित्यकर्म झाले होते.
दहावीच्या परीक्षेनंतर भेटी दुर्मिळ झाल्या. तो आयपीएस झाल्याची बातमी माझ्यासाठी केवळ धक्कादायकच नाही तर अविश्वसनीय होती. शिव्याच काय, पण साधे अबे-काबे हे शब्दही ज्याच्या तोंडातून कधी बाहेर पडले नाहीत असा खाली मान घालून सर्वत्र वावरणारा माझा एक सरळमार्गी मित्र चक्क पोलिस दलात काम करणार? मध्य प्रदेशात मी एका जर्मन कंपनीचा अधिकारी म्हणून कार्यरत असताना पोलिस दलातील त्याच्या प्रगतीच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. अनेक वर्षांच्या भटकंतीनंतर मी महाराष्ट्रात परत आलो व आमच्या बॅचच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने खूप वर्षांनंतर आमची भेट झाली. त्या कार्यक्रमात त्याचं आगमन झालं आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वात झालेला आमूलाग्र बदल बघून पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील ‘नंदा प्रधान’ साक्षात माझ्यासमोर अवतरल्याचा मला भास झाला. दीर्घ कालावधीनंतर आमची भेट झाल्यावर त्याचा पहिला प्रश्न होता - ‘काय म्हणते तुझी लायब्ररी?’ इतक्या वर्षांनंतर भेट झाल्यावरही त्याला उत्सुकता होती ती चांदोबा मासिकाच्या एका अंकापासून सुरू झालेल्या लायब्ररीच्या प्रगतीची ! त्याच्याजवळ असलेल्या सर्व पुस्तकांची विषयानुसार कशी मांडणी केली आहे याची माहिती एखाद्या शाळकरी मुलाच्या उत्साहाने मला पुरवून त्याच्या त्या कौतुकाच्या लायब्ररीचं दर्शन घेण्यासाठी येण्याचं आमंत्रण त्याने मला दिलं, पण आम्हा दोघांच्याही व्यग्रतेमुळे आमची प्रत्यक्ष भेट पुन्हा कधी झालीच नाही.
पोलिस खात्यात एका मोठ्या व अत्यंत महत्त्वाच्या पदावर त्याची नियुक्ती झाल्यानंतर मला आनंद होण्याऐवजी माझ्या काळजाचा ठोका चुकला. केवळ दहशतवादाचेच नव्हे, तर शक्य तितक्या सर्व गोष्टींचे अत्यंत निर्लज्जपणे राजकारण करणाऱ्यांच्या या देशात राजकारण्यांच्या इशाऱ्यांवर नाचण्याची वेळ जर त्याच्यावर आली तर त्याच्यासारख्या प्रामाणिक व सरळमार्गी माणसाचा कसा काय निभाव लागणार या विचाराने माझी अस्वस्थता वाढू लागली. बॉम्बस्फोटांच्या चौकशीला सुरुवात झाल्यानंतर टीव्हीवर जवळपास रोज होणाऱ्या त्याच्या दर्शनाने माझ्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली आणि मी त्याला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सावध करण्यासाठी धडपड करत असतानाच २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एका मित्राने मला फोन करून एक हादरवून टाकणारी बातमी दिली -‘आपला मित्र हेमंत करकरे या जगात नाही. त्याला थोड्या वेळापूर्वी अतिरेक्यांनी ठार केलं.’ तो ज्या खुर्चीवर बसला होता तिचा प्रत्येक क्षणी मृत्यूशी अगदी जवळून संबंध येणार आहे याची पूर्ण जाणीव असूनही त्या बातमीचा अर्थ समजून घेण्याचा मी आजही निष्फळ प्रयत्न करतो आहे.
कोणासाठी तू स्वत:ला मृत्यूच्या दाढेत झोकून दिलंस मित्रा? लोकल्सच्या डब्यांना लटकून रात्रंदिवस प्रवास करणाऱ्या मुंबईच्या असहाय्य नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी की निवडून आल्यानंतर कधीही पूर्ण न होणाऱ्या खोट्या आश्वासनांचा मतदारांवर पाऊस पाडून स्वत:च्या तुंबड्या भरण्यात धन्यता मानणाऱ्या पराकोटीच्या स्वार्थी लोकप्रतिनिधींसाठी? संसद भवनातील अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बहुसंख्येने अनुपस्थित राहिलेल्या कृतघ्न नेत्यांसाठी की दहशतवाद्यांचा पूर्ण बीमोड होण्याआधीच जाळपोळीच्या धगीने व गोळीबाराने तापलेल्या तव्यांवर अत्यंत गलिच्छ राजकारणाच्या पोळ्या शेकण्यासाठी गिधाडालाही लाजवणाऱ्या वेगाने तुटून पडलेल्या निर्लज्ज राजकारण्यांसाठी? तू या जगात असताना तुझ्या प्रामाणिकपणावर शंका घेऊन ज्या माकडांनी स्वत:च्या वैचारिक दिवाळखोरीचं जाहीर प्रदर्शन केलं त्याच माकडांच्या हाती तू या जगाचा निरोप घेताना कोलीत दिलं याची तुला कल्पना आहे?
समवयस्क असूनही प्रत्येक भेटीत वडीलकीच्या नात्याने प्रत्येक मित्राची अत्यंत आस्थेने चौकशी करणारा तुझ्यासारखा मित्र आम्हा सर्व मित्रांना पोरकं करून गेला. दगड-विटांनी तयार होतात त्या साध्या इमारती, घरं नव्हेत. त्या निर्जीव इमारतींमध्ये राहणारी आपल्या सर्वांसारखी हाडामांसाची जिवंत माणसं खरी घरं जन्माला घालत असतात ! अशाच एका जिवंत घरात राहणाऱ्या सर्वांचा तू कर्तृत्वाच्या शिखरावर असताना अचानक कायमचा निरोप घेतलास. २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री तुझ्या हत्येची बातमी ऐकल्यानंतर डबडबलेल्या डोळ्यांमधून मी अश्रूंना अजूनही बाहेर पडू दिलेलं नाही. तुझ्यासारख्या धीरोदात्त मित्राच्या मृत्यूवर अश्रू ढाळणं हा तुझ्या उत्तुंग कर्तृत्वाचा सर्वात मोठा अपमान ठरेल. भ्रष्टाचाराने अंतर्बाह्य पोखरलेल्या व स्वार्थी राजकारणाने पूर्णत: सडवून टाकलेल्या आपल्या देशाने तुझ्या अत्यंत दुर्दैवी मृत्यूच्या निमित्ताने जर कात टाकली तर तू खऱ्या अर्थाने अजरामर होशील, अन्यथा दहशतवाद्यांपासून असंख्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:ला मृत्यूच्या खाईत झोकून देणारा तू केवळ आमचाच नव्हे, तर आपल्या देशाचा शेवटचा मित्र ठरशील!
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
November 29, 2016
अभिजीत चव्हाण यांनी रंपाट,गोजिरी,सायकल आणि बऱ्याच मराठी सिनेमात लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. अगली, रॉकी हँडसम आदी हिंदी सिनेमात सुद्धा त्यांनी उत्तम काम केले आहे. तसेच पु.ल. देशपांडे ह्यांच्यावर आलेल्या “भाई” ह्या बायोपिक मध्ये आचार्य अत्रे ह्यांची भूमिका अभिजीत सरांनी केली आहे.
April 11, 2022
हरिभाऊ देशपांडे यांनी नाट्यसंगीत गाणारे अनेक शिष्य तयार केले. लालजी देसाई, मोहिनी पेंडसे-निमकर, आनंद भाटे हे त्यांपैकी काही.
June 28, 2022
एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित आहे. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.त्यांचं नाव घेताच डोळ्यांपुढे त्यांचा हसरा, गोल चेहरा, घारे डोळे आणि त्यांची अभिनयाची मोठी कारकीर्द तरळून जाते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. 'हिरवा चुडा', 'हा माझा मार्ग एकला' अशा चित्रपटांतून 'बेबी नयन' नावाने बालकलाकार म्हणून मा.रीमा लागू यांनी चित्रपट सृष्टीत सुरवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० सालच्या ’आक्रोश, 'कलयुग' या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. 'रिहाई'सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो' मधल्या आईच्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला आहे. त्यांनी केलेल्या नाटकातील पुरूष,सविता,घर तिघांचं हवं आत्ताचं छापाकाटा अशी बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, काही नाटकं तितकी चालू नाही शकली. पण हे करत असताना त्या ब-याच व्यक्तिरेखा नाटकाच्या माध्यमातून जगत होत्या. मा.रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या रीमा लागू झाल्या. मा.रीमा लागू यांनी 'श्रावणसरी' या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन केले होते. मा.रीमा लागू यांनी ’अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली आहे. तसेच ’तू तू मैं मैं’ ही मा.रीमा लागू यांची अतिशय गाजलेली आणि स्वच्छ, साधी सरळ टीव्ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्या मालिकेनंतर त्यांनी ’तुझं माझं जमेना’ या मालिकेमधून काम केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti