एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव अरुण सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. मो. ग. रांगणेकर हे "भटाला दिली ओसरी' हे नाटक बसवीत होते. या नाटकात अरुणनं काम केलं. याच वेळी एक उत्कृष्ट संधी मा.अरुण सरनाईक यांच्या कडे चालून आली. विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोक्यापत "शाहीर प्रभाकर' हा चित्रपट करण्याचं घोळत होतं. यातील शीर्षक व्यक्तिरेखा अरुण सरनाईक यांनी साकारावी, असं त्यांच्या मनात होतं. परंतु, हा चित्रपट काही कारणांमुळे बनला नाही आणि अरुण सरनाईक यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबलं. प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांनी "शाहीर परशुराम' चित्रपटात अरुण सरनाईक यांना एक दुय्यम भूमिका दिली. "रंगल्या रात्री अशा' या चित्रपटानं किमया केली आणि अरुण सरनाईक यांचा अरुणोदय झाला. या चित्रपटानं सरनाईकांना मोठा "फॅन फॉलोअर' मिळाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांनी तबलावादन केलं होतं. प्रत्यक्ष चित्रपटात तबल्यावरील सरनाईकांची सफाई पाहून अल्लारखॉंनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यापुढं जात शिवसेनाप्रमुखांनी या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं आणि नंतर ते खरं ठरलं. बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर हा कलावंत बघताबघता इतरांच्या पुढं गेला. त्या काळातला चित्रपट हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर होता. सरनाईकांनी या दोन्ही प्रकारांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित "पाहू रे किती वाट' या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झलकले तर "सुभद्राहरण' या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला. सरनाईकांची कारकीर्द उंचावली जाण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे "एक गाव बारा भानगडी', "केला इशारा जाता जाता', "सवाल माझा ऐका', "सिंहासन' आदी चित्रपट. "सवाल माझा ऐका'मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. असाच ढोलकीवाला त्यांनी "केला इशारा जाता जाता' या चित्रपटातही साकारला होता. "पाच नाजूक बोटे' या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीनं सादर केली. "मुंबईचा जावई'मधील सरनाईकांचा नाट्यवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित "सिंहासन' मधील मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यसक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते. सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कदम. "डोंगरची मैना' आणि "गणगौळण' या दोन चित्रपटात कदम यांनी सरनाईकांना पार्श्वीगायनाची संधी दिली. "घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतलं. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या "चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या चित्रपटामधील "एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं...' हे गाणंही सरनाईकांमधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या "आनंदग्राम'मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. अरुण सरनाईक यांचे २१ जून १९८४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- मंदार जोशी / इंटरनेट
पां . वा . गाडगीळ हे पहिले मराठी संपादक आहेत. जे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक होते. दिल्लीला जाणं-येणं त्यांना न झेपणारं होतं. तरीसुद्धा प्रेस कौन्सिलची एकही बैठक गाडगीळसाहेबांनी कधीही चुकवली नाही. बैठक एका दिवसाचीच असायची. त्या बैठकीला समितीच्या सदस्याला निवासस्थानाहून यायला गाडी असायची. गाडगीळ त्यावेळच्या महाराष्ट्र सदनात राहायचे. प्रेस कौन्सिलचे कार्यालय समोरच्याच फुटपाथवर त्यावेळी होते . त्यावेळी प्रेस कौन्सिलतर्फे आलेली गाडी ते परत पाठवायचे आणि चालत जायचे आणि चालत परत यायचे.
गोळवलकर गुरुजी यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९०६ रोजी रामटेक येथे झाला.
माधव गोळवलकर उर्फ गोळवलकर गुरुजी हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. १९४० ते १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली.
श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांतातील जनकल्याण समितीतर्फे गोळवलकर गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थविविध क्षेत्रातील व्यक्तींना ’परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार’ दिले जातात.
गोळवलकर गुरुजी यांचे निधन ५ जून १९७३ रोजी झाले. आपल्या समूहाकडून गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
वर्षा उसगावकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत -जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगावकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "गंमत जंमत' नंतर तिने "खट्याळ सून नाठाळ सासू' "तुझ्याविना करमेना', "हमाल दे धमाल', "मुंबई ते मॉरिशस', "लपंडाव' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित "यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपटांची सुरवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी "दूध का कर्ज' हा चित्रपट केला. ९० च्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात "महाभारत' या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित "एक होता विदूषक'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "आत्मविश्वाणस' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे "ब्रह्मचारी' हे नाटक गाजले आहे. नाट्यशास्त्राचे रीतसर दोन वर्षे औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे शिक्षण घेतलेल्या वर्षा उजगावकर ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणारी अशी स्टार अभिनेत्री आहेत. 'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मा.रवी यांच्या वर्षा उसगावकर या सुनबाई आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये अरुण साधू यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जुन १९४१ रोजी झाला. त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. यावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपटही अजराअमर ठरला. या सिनेमातील ‘दिगू टिपणीस’ हे अभिनेते निळू फुले यांनी साकारलेले पात्र अरूण साधू यांच्यावरच बेतलेले होते, अशीही चर्चा त्यावेळी झाली.
‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. ३० वर्ष त्यांनी पत्रकारिता केली. टाईम्स ऑफ इंडीया, स्टेटसमन, फ्री प्रेस जर्नल,केसरी, माणूस, इंडीयन एक्सप्रेससाठी त्यांनी काम पाहीलं होतं.त्रिशंकू, बहिष्कृत, स्फोट या कादंबऱ्याही प्रचंड गाजल्या.यातील बहिष्कृत ही कादंबरी जवळपास ४ दिवसांत त्यांनी लिहून पूर्ण केली होती.६ वर्ष ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहीलं.
२००० साली आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील आधारीत चित्रपटामध्येही साधू यांचे योगदान होते, या चित्रपटासाठी त्यांनी सहलेखक म्हणून भूमिका बजावली होती. काकासाहेब गाडगीळ हे पुस्तक त्यांनी इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये आणलं होतं ‘ मुंबई दिनांक’ ही कादंबरी हिंदीमध्ये ‘ बंबई दिनांक’ नावाने प्रसिद्ध करण्यात आली होती. सगळ्या पिढीचे लेखक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.अमेरिकेमध्ये महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. आणि ड्रॅगन जागा झाला, शापित, शुभमंगल, मुखवटा या कादंबऱ्यांचेही लेखन केले.
झिपऱ्या, तडजोड, शोधयात्रा या ही कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. बेचका,एक माणूस उडतो त्याची गोष्टी, बिनपावसाचा दिवस,मुक्ति, ग्लानिर्भवती भारत हे कथा संग्रह प्रसिद्ध झाले. अरुण साधू यांचे २५ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
त्यांच पहिलं नाटक “जयद्रथ विडंबन” हे १९०४ मध्ये प्रकाशित झाल. हे एक संगीत नाटक होत. या नाटकातील पदे तत्कालीन टीकाकारांनी उचलून धरली. त्यांच दुसरे नाटक “दामिनी” हे १९१२ मध्ये प्रसिद्ध झाल. हे नाटक केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या कंपनीने रंगमंचावर आणले. अशाप्रकारे हिराबाई या पहिल्या महिला नाटककार बनल्या.
भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक व्यक्तीमत्व म्हणून अन्नपूर्णा देवी देशाला परिचित आहेत. मात्र त्यांचे स्वर्गीय सितार वादन ऐकण्याचे भाग्य अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांना लाभलं आहे. जवळपास गेली साठ वर्षे त्या एकांतवासात होत्या. त्यांनी अनेक वर्षापासून संगीत वादन सोडलं आणि एकांतवास स्वीकारला.
अन्नपूर्णा देवी यांचा जन्म २३ एप्रिल १९२६ रोजी झाला. त्या सरोद वादनातील अध्वर्यू अल्लाउद्दीन यांच्या कन्या. उस्ताद अल्लाउद्दीन हे शास्त्रीय संगीतातील महारथी होते.
अन्नपूर्णा देवींनी आपले बंधू उस्ताद अली अकबर खान यांच्यासमवेत आपल्या वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण प्राप्त केले. १९३८ साली रवी शंकर वयाच्या अठराव्या वर्षी अल्लाउद्दीन यांच्याकडे मैहरला शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी आले. अल्लाउद्दीन यांनी अन्नपूर्णा देवींना प्रथम ध्रूपद आणि सितार शिकवलं. पण नंतर सूरबहार वादनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. सूरबहार आणि सितार यांच्यात साम्य असलं तरी, ते सितारपेक्षा अधिक जड आणि वाजवण्यास अधिक अवघड समजलं जातं. अन्नापूर्णा देवी सूरबहार उत्तम वाजवत असत. अन्नापूर्णा देवी आणि पंडित रवीशंकर यांचा विवाह व्हावा असं उदय शंकर यांचे मत होते. उदय शंकर हे रवी शंकर यांचे वडिल बंधू होते. देशातील कलेच्या क्षेत्रातील दोन दिग्गज कुटुंबं विवाहामुळे एकत्र येतील, ही उदय शंकर यांची कल्पना होती. उदय शंकर यांनी अल्लाउद्दीन यांच्याकडे विवाहासाठी परवानगी मागितली. अल्लाउद्दीन हे प्रथमत: या विवाहाला परवानगी देण्यास तयार नव्हते, पण नंतर त्यांनी विवाहास होकार दिला. अन्नपूर्णा देवी आणि रवीशंकर यांचा विवाह हिंदू पद्धतीने १९४१ साली झाला आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना पूत्ररत्न झाले. शूभेंद्र शंकर असे त्याचे नाव. पण शुभेंद्र शंकर यांचा १९९२ साली अमेरिकेतच अकाली मृत्यू झाला. पंडितजींनी शुभेंद्र शंकर यांची योग्य ती काळजी घेतली नाही आणि एका धर्मादाय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. पंडितजींनी शुंभेंद्रकडे दुर्लक्ष केलं आणि त्यासाठी आपला दुसरा विवाह झाला असल्यानं जबाबदारी फेटाळली. याबाबत बोलताना अन्नपूर्णा देवी म्हणाल्या कि, याचा अर्थ पंडितजी शुंभकरला आपल्या कुटुंबाचा सदस्य मानत नव्हते. पण अल्लाउद्दीन यांच्याप्रती मात्र पंडितजींनी कर्तव्यात कोणतीही कसर ठेवली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. अन्नापूर्णा देवी यांनी आपला शेवटचा कार्यक्रम १९५६ साली सादर केला. त्यानंतर पंडितजी फक्त एकदाच १९८० साली अन्नपूर्णा देवींना भेटायला आले. अन्नपूर्णा देवींनी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच शिष्यांना कला शिकवली आहे. त्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित नित्यानंद हळदीपूर, उस्ताद आशिष खान, पंडित बसंत काब्रा, पंडित प्रदीप बारोट आणि पंडित सुरेश व्यास या सरोद वादकांचा समावेश आहे. उस्ताद अल्लाउद्दीन यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांनाही अन्नपूर्णा देवींचा आधार होता. त्यात पंडित निखील बॅनर्जी आणि उस्ताद बहाद्दूर खान यांचा समावेश आहे. अन्नपूर्णा देवींनी मैफिलींना राम राम केल्यानंतरही अनेकांनी त्यांना त्यासंदर्भात विनंती केली. पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. पंतप्रधान इंदिरा गांधींसह देश आणि परदेशातल्या अनेक नामांकित व्यक्तीमत्वांनी त्यांना वादन चालू करण्याबद्दल आग्रह केला होता पण अन्नपूर्णा देवींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. अन्नपूर्णा देवींना १९९७ साली पद्मभूषण, १९९९ साली देशिकोत्तम आणि २००४ साली संगीत-नाटक अकादमीची फेलोशीप मिळाले. हे कोणतेही पुरस्कार स्वीकारण्यास त्या स्वत: गेल्या नाहीत. उस्ताद अली अकबर खान एकदा म्हणाले होते की, रवी शंकर, पन्नालाल घोष आणि मी एका पारड्यात आणि अन्नपूर्णा देवी दुसऱ्या पारड्यात ठेवल्या तरीही त्यांची बाजू वरचढ ठरेल हे अगदी यथार्थ असं वर्णन आहे. मात्र नुकतच त्यांनी आपले एकांतवासाचे आजवर बाळगलेलं मौन सोडलं आहे. पंडित रवी शंकर यांची पत्नी म्हणून ओळख असलेल्या अन्नपूर्णा देवी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. पंडित रवी शंकर यांच्या बरोबरचा विवाह टिकवण्यासाठीच आपण संगीताला तिलांजली दिली. आम्ही दोघे एकत्र सितार वादन सादर केल्यानंतर लोकं मला अधिक दाद देत असत. मात्र हे रवी शंकर यांना आवडत नसे असं त्यांनी सांगितलं. रसिक माझ्या वादनाला देत असलेल्या प्रतिसादामुळे आमच्या वैवाहिक आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ लागला. पंडित रवी शंकर यांनी मला मैफिलीत सादरीकरण करु नये असं जरी स्पष्टपणे सांगितलं नाही, तरी मला मिळणारी दाद यामुळे ते आनंदी नव्हते. मला व्यवसायिक यश किंवा विवाहातील सौख्य यात निवड करण्याची वेळ आली, तेंव्हा मी विवाह सौख्याला प्राधान्य दिलं. मला नाव आणि लौकिक यापेक्षा लग्न टिकवणं अधिक महत्वाचं वाटलं. पण दुर्दैवाने एवढा त्याग करुनही हा विवाह टिकू शकला नाही. मी सर्वतोपरी प्रयत्न करुन पाहिले, पण मला यश आलं नाही. मला माझे वडिल उस्ताद अलाऊद्दिन खान यांना दुखावयचे नव्हते. उस्तादजी हे पापभिरु व्यक्तिमत्व होते. उस्तादजींना आपल्या मुलीचा विवाह मोडला हे आवडलं नाही. रवी शंकर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर १९८२ साली अन्नपूर्णा देवींनी आपले शिष्य ऋषीकूमार पंड्या यांच्याशी विवाह केला.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपल्या नाचगाण्याच्या वेडापायी शाळेच्या चार इयत्ता कशाबशा पार पाडून राजा गोसावी यांनी मुंबई गाठली. त्यांचा जन्म २८ मार्च १९२८ रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे झाला.त्यांनी ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकांच्या कंपनीत काम केले. दामुअण्णा मालवणकर हे त्यांचे गुरू. दामुअण्णांच्या प्रभाकर नाटय़मंदिरात ते प्रॉम्टरची नोकरी करत. याच कंपनीच्या ‘भावबंधन’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीशी त्यांचे भावबंध जुळले ते कायमचेच. ‘अखेर जमलं’ या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक राजा परांजपेंनी ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात त्यांना घेतलं. हा चित्रपट त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरला. ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तिकीट फाडणाराच चित्रपटाचा नायक असल्याचे पाहून प्रेक्षक चकीत झाले. ‘लाखाची गोष्ट’ प्रदर्शित झाला त्या वेळी मा.राजा गोसावी ‘भानुविलास टॉकीज’मध्ये बुकिंग क्लार्क होते. स्वत:च्या सिनेमाची तिकिटे स्वत:च विकत असत आणि काही वेळा त्यांनी ब्लॅकमध्ये विकली. जागतिक सिनेमा इतिहासातला हा अचाट प्रकार. ‘लाखाच्या गोष्टी’ची ही गोष्ट मा. राजा गोसावी पुढे अनेक काळ रंगवून सांगत असत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये समजूतदार विनोदी अभिनेत्यांच्या यादीमध्ये मा.राजा गोसावी यांचा क्रमांक आघाडीवर होता. मा.राजा गोसावी वाढले पुण्याच्या सदाशिवपेठेत, त्यामुळे त्यांचा विनोद सुशिक्षित मध्यमवर्गीय असे. राजा गोसावींचा आवडता कलाकार म्हणजे हॉलिवूडचा डॅनी के! आपल्या सहजसुंदर अभिनयाने राजा गोसावी संपूर्ण पडद्यावर वावरत असत. त्यांच्यातील हजरजबाबीपणाची झलक चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासूनच दिसत असे. एक सुंदर मराठी चित्रपट म्हणजे देखणा नायक, मध्यमवर्गीय नायिका, तिचे आई-वडील, चित्रपटाचे सुंदर शांत संगीत, गाणी हे सारे काही विलक्षणच असे. १९५० ते १९७० पर्यंतची दोन दशके मा.राजा गोसावी यांनी आपल्या अभिनयाने अक्षरश: गाजवली. जयश्री गडकर, स्मिता, रेखा, सीमा, नीलम अशी विविध नायिकांची साथ मा.राजा गोसावी यांना लाभली. अवघाची संसार, पैशाचा पाऊस, झालं गेलं विसरून जा, राजमान्य राजश्री, याला जीवन ऐसे नाव, बाप माझा ब्रह्मचारी, वाट चुकलेले नवरे, कामापुरता मामा, सुधारलेल्या बायका, दिसतं तसं नसतं, शेरास सव्वाशेर, श्रीमंत मेहुणा पाहिजे इत्यादी अनेक चित्रपटांतून वसंत पवार, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, राम कदम यासारख्या लोकप्रिय संगीतकारांच्या सुंदर गाण्यांनी चित्रपटांना मजा आणली. मा.राजा गोसावी यांनी अडीचशे चित्रपटातून त्यांनी काम केले. केवळ विनोदी नव्हे तर गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका विशेष लक्षात राहिली. मा.राजा गोसावींच्या अभिनयातील सहजता, मुद्रेवरील भाव व संवादफेकीचं अचूक टायिमग अगदी दाद देण्यासारखं होतं. त्यांच्या या गुणांमुळेच लोकांनी त्यांना भरघोस दाद दिली. त्यांच्या शंभराहून अधिक विनोदी चित्रपटात फार विविधता नसली तरी त्यांनी लोकप्रियता अफाट मिळविली. त्यांची ही लोकप्रियता पाहून १९५९ मध्ये वसंत पिक्चर्सचे निर्माते वाडिया यांनी ‘राजा गोसावींची गोष्ट’ या नावाचा चित्रपटच निर्माण केला होता. मुंबई दूरदर्शनवरील ‘रंगतरंग’ या कार्यक्रमात बोलताना मा.राजा गोसावी म्हणाले होते,‘‘माझ्या जीवनात पैसा हा योगायोगाने आला आणि भोगाभोगाने गेला! ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटाचे मला मिळाले अवघे पाचशे रुपये! परंतु, त्यातील एकही रुपया आजतागायत खर्च झालेला नाही. उलट माझ्या या जनता जनार्दन बँकेत लक्षावधी ‘टाळ्या व हशे’ जमा आहेत. म्हणूनच आडनाव ‘गोसावी’असले तरी रसिक मला विनोदाचा ‘राजा’ म्हणतात!’’ चित्रपटसृष्टीत यश मिळवूनही ते रंगभूमीला विसरले नाहीत. ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेम संन्यास’, ‘एकच प्याला’, ‘नटसम्राट’ ही त्यांची गाजलेली नाटके. मा.विनायकांचं ‘सहजतेचे हास्य स्कूल’चा खरा वारसदार असणाऱ्या मा.राजा गोसावींना पदरी वाक्य पेरण्याचं अगदी व्यसन होतं. आचार्य अत्र्यांच्या अनेक नाटकातही त्यांना हा मोह आवरला नाही, तर चित्रपटात कॅमेऱ्यासमोर अशा शेकडो ऑडिशन्स मा.राजा गोसावींच्या नावावर आहेत. १९९५ ला झालेल्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाटय़ परिषदेने ‘बालगंधर्व’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला. मा.राजा गोसावी यांना मराठीतील ‘दिलीपकुमार’ म्हणत असत. मा.राजा गोसावी यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने अचूक संवादफेकीने निखळ विनोद निर्माण करून जवळजवळ पाच तपे मराठी रसिकांवर अधिराज्य केले. मा.राजा गोसावी यांचे २८ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
राजा गोसावीयांनी अभिनय केलेल्या चित्रपट व गाण्याची लिंक
रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला https://www.youtube.com/watch?v=qmXHU1m-5SA
अशी निशा पुन्हा दिसेल का https://www.youtube.com/watch?v=601Fy9v3DVk
मानसीचा चित्रकार तो https://www.youtube.com/watch?v=PP7XEtn4ljQ
‘लाखाची गोष्ट’ चित्रपट https://www.youtube.com/watch?v=AAXcdz0vg9c
‘चिमण्यांची शाळा’ चित्रपट https://www.youtube.com/watch?v=Yg4f1d87_2s
खेमचंद प्रकाश हे बिकानेर च्या राजमहलात गायक म्हणून होते. जेष्ठ संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म १२ डिसेंबर १९०७ रोजी झाला. नंतर ते नेपाल च्या राजघराण्यात गायक म्हणून होते. १९३९ साली ते मुम्बईला आले. अवघ्या १०-१२ वर्षात त्यांनी ४७ चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे पहिले दोन चित्रपट म्हणजे 'सुप्रीम पिक्चर्स'चे गाजी सलाऊद्दीन आणि मेरी ऑंखें. त्या सुमारास रणजित मूव्हीटोनच्या चंदुलाल शाह यांनी त्या कंपनीच्या संगीताची धुरा ज्ञान दत्त आणि खेमचन्द प्रकाश यांच्याकदे सोपवली, आणि नन्तरच्या पाच वर्षात या दोघांनी सिनेसंगीताच्या इतिहासात कायम मानाची नोन्द होईल असे संगीत दिले.
खेमचन्दजीची काही गाणी त्यांच्या मृत्युनन्तर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांत ऐकायला मिळतात. 'स्ट्रीट सिंगर' हा सिनेमा त्यातल्या 'बाबुल मोरा' गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण त्यात 'लो खा लो मॅडम खाना' हे विनोदी गाणे खेमचन्दजींच्या आवाज़ात आहे. ते त्यांच्यावरच चित्रित केले होते, आणि ते यू-ट्यूबवर पाहता येते. सैगल, खुर्शीद या ज़म बसलेल्या गायकांकडून तर त्यांनी बहारदार गाणी केलीच, पण पुढे लता मंगेशकर आणि किशोर कुमार हे कलाकार आपला ज़म बसवू पाहत असताना त्यांनाही चिरस्मरणीय गाणी दिलीत. त्यांची गाणी गायलेल्यांची यादी मोठी होईल. कमल दासगुप्ता हे थोर संगीतकार खेमचन्दजींचे समकालीन होते.
कमल-दा खेमचन्दजींना सर्वश्रेष्ठ संगीतकार मानत. काही सिनेमांना त्यांनी 'खेमराज' नावाने संगीत दिले होते. संगीतकार खेमचन्द यांचे निधन १० ऑगस्ट १९५० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : विकिपिडीया
लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला.
सध्या मराठी चित्रपट सृष्टीतलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रवीण विठ्ठल तरडे.
पुणे जिल्ह्यातील, जातेडे गावाच्या, शेतकरी कुटुंबातील प्रवीण तरडे यांनी एमबीए आणि पुढे आयएलएस महाविद्यालयातून विधी शाखेची पदवी घेतली आणि पुढे एक नोकरी देखील सुरु केली. पण मुळचा कलोपासक प्रवीण तरडे तिथे रमलेच नाही. घरी, थिएटर किंवा चित्रपटसृष्टी संदर्भातली कोणतीही पार्श्वभूमी नसतांना देखील प्रवीण तरडे यांची आवड त्यांना आपोआप ह्या क्षेत्रात घेऊन आली. सुनील कुलकर्णी हे त्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरू होत.
प्रवीण तरडे यांचे लहानपणापासूनच, बोलणं खूप प्रभावी होतं. कॉलेज मध्ये असतांना १९९७ मध्ये प्रवीण तरडे यांनी पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पातळीवरच्या वक्तृत्त्व स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या प्रभावी वक्तृत्त्वाने नुसती ती स्पर्धा गाजवलीच नाही तर जिंकली सुद्धा, तेही राष्ट्रपतींच्या हातून प्रथम क्रमांक घेऊन! त्यांनी यशवंतराव मोहिते महाविद्यालयात शिकत असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली. पुरुषोत्तममध्ये – लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी सर्व बक्षिसे घेऊन ते प्रसिद्धीच्या झोतात आले. पुढे त्यांनी अनेक एकांकिका केल्या. शिवाय अनेक events आणि अनेक मालिकांचं बहारदार लेखन केलं. पहिल्यांदा प्रवीण तरडे यांनी ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी लिहिलं. ह्या मालिकेसाठी प्रवीण तरडे यांनी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली! पुढे ‘पिंजरा’, ‘अनुपमा’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘तुझं माझं जमेना’, ‘असं हे कन्यादान’ अश्या अनेक यशस्वी मालिका प्रवीण तरडे यांनी लिहिल्या. अनेक चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. ‘चिनू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘रेगे’, ‘कोकणस्थ’, ‘मुळशी पॅटर्न’ ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. मग चित्रपटाच्या लेखनाचं आणि दिग्दर्शनाचं – शिवधनुष्य त्यानं उचललं आणि पेललं देखिल! ‘देऊळबंद ‘ ह्या मराठी चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शन आणि आपल्या अभिनयानं त्यानं मराठी चित्रपट सृष्टीला ‘देऊळबंद’ सारखा सुपरहिट चित्रपट दिला. ‘स्टॅंडबाय’, ‘कुटुंब’, ‘अजिंक्य’, ‘पितृऋण’, ‘रेगे’, ‘सुरक्या’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ आणि ‘देऊळबंद २’ व ‘मुळशी पॅटर्न’ हे चित्रपट त्यांचे गाजले आहेत.
दरम्यान, प्रवीण तरडे यांनी पुण्यातील कलाकारांना घेऊन, ‘एक सूचक बाकी वाचक’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. ही संस्था पुस्तक वाचणाऱ्या हौशी लोकांसाठी आहे. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या ह्या संपूर्ण योगदानमुळे प्रवीण तरडे यांची ‘भरत नाट्य संशोधन मंदिराच्या’ नियामक मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली आहे. प्रवीण तरडे यांच्या प्राविण्यांचे कौतुकही वेळोवेळी झाले आहे.
प्रवीण तरडे यांना आत्तापर्यंत २५० च्या वर पारितोषिके, मिक्ता अवॉर्ड, संस्कृती कला दर्पण पुरस्कार आणि दोन वेळा मानाचा झी गौरव असे अवॉर्ड मिळाले आहेत, प्रवीण तरडे त्यांच्या यशाचं श्रेय आई-वडील, व पत्नी स्नेहल आणि त्याच्या मित्रपरिवारालाही आवर्जून देतात.
प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल या सुद्धा पुरुषोत्तम स्पर्धेत, सर्वोकृष्ट अभिनेत्री म्हणून दोनदा सन्मानित झाल्या आहे.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Copyright © 2025 | Marathisrushti