(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे)

    २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या.

  • तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता

    जयललिता उर्फ अम्मा यांचे निधन

    जयललिता यांची माहिती

    जन्म. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी तामिळनाडूमधील अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात जयललिता जन्माला आल्या. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मा.जयललिता नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. कोमलावल्ली (मा.जयललितांचे जुने नाव) जयललितांना कधीही चित्रपटात येण्याची इच्छा नव्हती. पण नाइलाजाने त्यांना चित्रपटांत यावे लागले. जयललितांच्या आईची दुसरी बहीण अमबुजावल्ली यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत आणले. सुरुवातीला त्यांनी लहान-लहान ड्रामा कंपनीत अभिनय केला त्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे मोर्चा वळवला. काही वर्षांनंतर जयललिताही मद्रासला गेल्या आणि त्यांनी प्रसिद्ध भारतनाट्यम गुरू वैजूवूर बीरमैया पिल्लई यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले. मायलापूरच्या एका ऑडिटोरियममध्ये जयललितांचा कार्यक्रम झाला त्यावेळी तत्कालीन सुपरस्टार शिवाजी गणेशन त्यांच्यावर भलतेच इम्प्रेस झाले. त्यांनी जयललिताला चित्रपटात अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार १५ वर्षांच्या असताना त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली व जयललिता यांनी १७ व्या वर्षी लीड अॅक्ट्रेस म्हणून ‘वेनिरा अडाई’ हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.

    पहिल्या चित्रपटानंतर जयललिता यांना अनेक प्रकारच्या ऑफर यायला सुरुवात झाली होती. पण जयललितांना शिक्षण सुरू ठेऊन वकील बनायचे होते. त्यांच्या आईचीही तशीच इच्छा होती.

    पण घरची आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी अभिनय करण्याखेरीज दुसरा पर्याय जयललितांकडे नव्हता. अभिनयाच्या कामाच्या मोबदल्यात त्यांना लगेचच पैसे मिळायचे. त्यानंतर चित्रपट हेच जयललिता यांचे करियर बनले. त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांत अभिनय केला. त्या दक्षिणेतील सुपस्टार बनल्या होत्या. शर्मिला टागोर यांच्याशी त्यांची तुलना होऊ लागली होती. त्या काळातील फेमस ब्रँड लक्सने त्यांना साईन केले. राजकारणात सक्रिय होईपर्यंत जयललिता हे तमीळ चित्रपटसृष्टीत आघाडीचं नाव होतं. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता तरुणपणात त्या काळच्या लोकप्रिय नायिका होत्या.जयललिता यांनी हिंदी चित्रपट इज्जत मध्येही काम केलं होतं. या चित्रपटात जयललितांसोबत धर्मेंद्र यांनी काम केलं. जयललिता यांनी एमजीआर यांच्यासोबत जवळपास २८ चित्रपटांत काम केलं आहे. जयललिता या शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जात. मा.जयललिता या AIADMKचे संस्थापक एमजी रामचंद्रन ऊर्फ एमजीआर यांच्या जवळच्या समजल्या जायच्या. जयललिता यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकत एमजीआर यांच्यासोबत सक्रिय राजकारणात प्रवेश केला.एम. करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष फुटल्यानंतर एमजीआर यांनी AIADMK या पक्षाची स्थापना केली. एमजीआर यांनी १९८३ साली जयललिता यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली आणि त्यांना राज्यसभेवर पाठवलं.एमजीआर आणि जयललिता यांच्यात मतभेदाच्या अनेक बातम्या आल्या. त्यानंतर जयललिता यांनी १९८४ मध्ये AIADMK या पक्षाचं प्रचार अभियानाचं नेतृत्व केलं.एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी मजबूतपणे पक्षाची कमान सांभाळली आणि १९९१ मध्ये निवडणूक जिंकून त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. १९९६ च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तरीही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम राहिला. जयललिता यांनी १९९१, १९९६, २००२, २००६, २०११, २०१४ आणि २०१५ ला तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • बहुरंगी व्यक्तिमत्व कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके

    अपना बाजार' दुकानात दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा कोंडके सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. तेथे कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणा-या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. 'खणखणपुरचा राजा' मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादा कोंडके यांनी स्वतःचा फड उभारला व दादा कोंडके वसंत सबनिसांच्या 'विच्छा माझी पुरी करा' नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादा कोंडके यांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. 'विच्छा'चे १५०० हून अधिक प्रयोग झाले, आणि दादांसारखे रत्न मा.भालजी पेंढारकरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे मा.दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे मा.दादा कोंडके यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.'सोंगाड्या' ही मा.दादा कोंडके यांनी पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रख्यात विनोदी अभिनेते एवढीच त्यांची ओळख नव्हती. गीतं, संवाद, लेखनं यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, आणि एक उत्तम माणूस अशी मा.दादा कोंडके यांची ओळख होती. अनेक रजत व सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले. खरे तर मा.दादा कोंडके यांच्यासारखा सारखा कलाकार पुन्हा झाला नाहीच मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्णकाळ म्हणजे मा.दादा कोंडके यांची कारकीर्द, दादांनी प्रेक्षकांना हसवले आणि प्रसंगी अगदी अलगद टचकन रडवले देखील, त्यांच्या काळातील सिनेसृष्टी आणि सध्याच्या काळातील सृष्टी यात प्रचंड तफावत आहे खूप अत्याधुनिक तंत्र आता उपलब्ध आहे. मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन मा.दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत. दादा कोंडके सारखे कलावंत मात्र नाहीत. आणि सध्याच्या युगात अशा… दादा कोंडके यांचे एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या, रामराम गंगाराम, पांडू हवालदार असे गाजलेले चित्रपट कुठे टी व्ही वर दिसत नाहीत, जुन्या तंत्रात असलेल्या या चित्रपटांचे कोणी पुनरुज्जीवन केले नाही अनेक जुने चित्रपट, गाणी वारंवार टी व्ही वर दिसतात पण जणू दादा कोंडके यांचे चित्रपट रसिकांना बघायला मिळत नाहीत.

    दादा कोंडके यांच्या जीवनावर ''एकटा जीव'' हे पुस्तक लिहिण्यात आले होता. या पुस्तकात मा.दादा कोंडके यांचे चरित्र आहे. त्यांचं व्यक्तिमत्व प्रगल्भ, बहुआयामी होतं, पडद्यावरचं त्यांचं आयुष्य अनेकांनी अनेक वेळा पाहिलं असेल, पण दादा पडद्यामागे कसे होते. याची ओळख लेखिका अनिता पाध्ये यांनी या पुस्तकात करून दिली आहे. प्रत्यक्ष दादांच्याच शब्दांत ती वाचायला मिळते. बालपण, तारुण्य, नातेसंबंध, सिनेमाचे जग, तेथील वातावरण, रसिकांचे मिळालेले प्रेम, सेन्सॉर बोर्ड, द्वयर्थी गीतांच्या गमतीजमती अशा अनेक विषयांवर दादा मोकळेपणानं बोलले आहेत. त्यांचा हजरजबाबीपणा आणि विनोदाची उत्तम जाण त्यातून ठळक होते. दादा जसे सदाहरित होते, तसें हे पुस्तकही!

    दादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    ''एकटा जीव'' या पुस्तकाची लिंक
    http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5264348057482910856

    आज मंगळवार १४ मार्च २०१७ रोजी दिवसभर झी टॅाकीजवर दादा कोंडकेच्या काही खास चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. सकाळी ९ वाजता ‘गनिमी कावा’, दुपारी १२ वाजता‘मला घेऊन चला’, सायंकाळी ६ वाजता ‘पळवा पळवी’ हे चित्रपट प्रेक्षकांना पाहता येतील. या चित्रपटांबरोबरच दुपारी ३ वाजता ‘दादागिरी’ या विशेष कार्यक्रमाअंतर्गत दादा कोंडके यांच्या कारकीर्दीचा पट उलगडला जाईल.
    मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत.

    दादा कोंडके यांनी अभिनय केलेली काही गाणी
    अगं ये जवळ घे ना
    मी तर भोळी अडाणी
    नको चालूस दुडक्या चाली
    काय ग सखू
    माळ्याच्या मळ्या मंधी कोण ग उभी

    दादा कोंडके यांचे चित्रपट.

    पांडू हवालदार
    www.youtube.com/shared?ci=-x8XEOwLsic
    सोंगाड्या
    www.youtube.com/shared?ci=eXYAL3Eh8aM

  • अभिनेते शशी कपूर

    हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते.

  • बीटल्सफेम ब्रिटीश गीतकार, अभिनेते, गायक जॉर्ज हॅरिसन

    बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बँडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून सुप्रसिद्ध ब्रिटीश संगीतकार, गिटारवादक, गायक, गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते जॉर्ज हॅरिसन यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली.

  • प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके

    मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९५० रोजी झाला. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृध्द वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. पितृसहवास हा मौलिक ठेवा असला तरी त्यांच्या लहानपणी गाण्याशी त्यांचा संबंध ऐकण्यापुरताच होता. आधी शिक्षण पुरं कर असं वडिलांनीच बजावलं होतं.

    मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून फिजिक्स व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांत एम.एस्सी. केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले व त्यांनी न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एस. पदवी संपादन केली. त्यांच्या संगीत-प्रवासाला आरंभ झाला अमेरिकेतच. कॅम्लिन कंपनीच्या मालती दांडेकर अमेरिका भेटीवर आल्या होत्या. त्यांनी श्रीधर फडके यांना हरिपाठाचं पुस्तक दिलं व 'देवाचिया व्दारी, उभा क्षणभरी....' या अभंगाला चाल लावण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मा.श्रीधर फडके यांनी चाल बांधली व तेथेच, कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात खुद्द सुधीर फडके यांनी त्या चालीवर तो अभंग गायला. 'तो आपल्या आयुष्यातील जपावासा वाटलेला क्षण' असं श्रीधर फडके म्हणतात.
    लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील “फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश” हे गीत त्यांनी लावलेल्या चालीमुळे लोकप्रिय झालं.

    सुधीर मोघे यांनी लिहिलेलं हे गीत ’बाबुजी’ (सुधीर फडके) व आशा भोसले यांनी गायलं होतं. संगीत हा श्रीधर फडके यांचा व्यवसाय नसल्यानं त्यांनी कधी तडजोड केली नाही. सवंगपणाला बळी पडून त्यांनी कधी रतीब घातला नाही किंवा चालींच्या जिलब्या पाडल्या नाहीत. त्यांना कवितेची सखोल जाण आहे. ‘मन मनास उमगत नाही ’ ही ग्रेस यांची कविता. त्यांनी पहिल्या चार ओळींना चाल लावली. पण पुढील ओळींचा अर्थ उमगेना. तेव्हा त्यांनी आपल्या चालीचं घोडं तसंच पुढ दामटलं नाही तर त्यांच्या आवडत्या कवीपैकी एक असलेले सुधीर मोघे यांना आपली अडचण सांगून चाल लावलेल्या ओळी ऐकवल्या आणि 'तुम्हाला या ओळींच्या आधारे काही सुचलं तर पाहा' असं सुचवलं. सुधीर मोघे सिध्दहस्त कवी, त्यांनी श्रीधर फडके यांची विनंती मान्य केली व पुढील ओळी लिहून दिल्या.

    स्वप्नातील पदर धुक्याचा
    हातास कसा लागावा
    आधार कसा शोधावा
    मन मनास उमगत नाही.

    श्रीधर फडके यांच्या तळमळीला मोघे यांनी सृजनात्मक प्रतिसाद दिल्यानं एका सुरेल गीताचा जन्म झाला. कवितेवर असं कलम करून घेण्याची किमया मा.श्रीधर फडके यांनी आणखी एकदा घडवून आणली. वैद्य यांच्या पुढील ओळी श्रीधर फडके यांना फार भावल्या त्या अशा...
    कुठे जातात भेटून
    कशा होतात ओळखी
    आणि आपली माणसे
    कशी होतात पारखी

    या ओळीदेखील फडके यांनी सुधीर मोघे यांना ऐकवल्या व पुढील ओळी लिहून देण्याची विनंती केली. त्यानुसार मोघें यांनी पुढील ओळी रचल्या....
    कुण्या देशाचे पाखरू
    माझ्या अंगणात आले
    त्याचे पंख परदेशी
    परी ओळखीचे डोळे

    श्रीधर फडके यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्या अनेक चाली रागांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ ओंकार स्वरूपा (बैरागी भैरवी),ऋतू हिरवा(चारुकेशी), फिटे अंधाराचे जाळे(मिश्र भैरवी), सांज ये गोकुळी(पूर्वाकल्याण व यमनकल्याण), मी राधिका, मी प्रेमिका (मधुकंस).

    एखादं गाणं आवडलं की चाल लावण्यासाठी झगडणं काही तासांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असू शकतं असं श्रीधर फडके म्हणतात.‘ मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद ’ या एकनाथांच्या अभंगाला चाल सुचायला सहा महिने लागले. एकदा तर गंमतच झाली. कविवर्य ग्रेस यांच्या ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी ’ या कवितेला चाल लावायची होती. त्या दिवशी ते पुण्यात होते, दिवसभरात काही सुचलं नाही. पण मुंबईला परतायच्या प्रवासात पनवेलच्या आसपास चाल मनात दाटून आली. ती हरवू नये , सांडू नये म्हणून श्रीधर फडके ती चाल मुंबईला पोचेपर्यंत गुणगुणत राहिले. प्रत्येक चालीची कुंडली वेगळी असते असं सांगून फडके म्हणतात, “ अंतरा व मुखडा या प्रमाणे त्यांतील नि:शब्द जागाही एकाच लयीत गुंफण आवश्यक आहे. त्यामध्ये त्रुटी राहिल्या तर छोटया तुकड्या तुकड्यांत गाणं ऐकल्याचा भास निर्माण होतो. गाणं कसं असावं, चाल कशी बांधावी, उत्तम चाल कशी असावी हे मी बाबुजींकडून शिकलो.”

    श्रीधर फडके यांनी सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांपैकी मनाचे श्लोक , ओंकार स्वरूपा, अवघा विठ्ठलु, ऋतू हिरवा या ध्वनिफिती/ सीडीज यशस्वी झाल्या, त्याबद्दल त्यांना प्लॅटिनम डिस्क प्रदान करण्यात आली. स्वत:चं खास तंत्र व गायनशैली विकसित केलेल्या श्रीधर फडके यांनी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं, विराण्या, गजल, नाट्य संगीताचा बाज असलेली गाणी असे अनेक प्रकार लीलया सादर केले आहेत. त्यांना ‘वारसा लक्ष्मीचा’ या चित्रपटासाठी ‘पुत्रवती’ या चित्रपटासाठी, ‘लेकरू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे .मा.श्रीधर फडके यांनी आत्ता पर्यंत अठरा मराठी चित्रपटांचे व एका हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन, सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन, ३ मराठी व ११ गुजराथी नाटकांचे व पाच दूरदर्शन मालिकांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. अशोक जैन / थिंक महाराष्ट्र

    श्रीधर फडके यांनी गायलेली, संगीत दिलेली काही गाणी
    https://www.youtube.com/watch?v=GKOEi9p_VaM
    https://www.youtube.com/watch?v=BMNQF1OfHWQ
    https://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk
    https://www.youtube.com/watch?v=7T8PqtOGsLI&t=1096s
    https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE&t=287s