प्रसाद सावकार यांचा जन्म १४ डिसेंबर १९२८ बडोदे येथे झाला.
प्रसाद सावकार यांचे पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार. गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील नामवंत सावकार घराण्यात त्यांचे वडील रघुवीर सावकार हे स्त्रीभूमिकांसाठी प्रसिद्घ असलेले गायक-नट होते व ते ‘रंगदेवता’ या पदवीने ओळखले जात.
वडिलांच्या ‘रंगबोधेच्छु नाट्यसमाज’ या नाट्यसंस्थेत प्रसाद सावकारांचा बालपणापासूनच वावर असल्याने त्यांच्यावर लहानवयातच नाटक प्रसाद सावकार व संगीत यांचे संस्कार होत गेले. गायन-अभिनयाचे प्राथमिक धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. संशयकल्लोळ नाटकात त्यांनी वडिलांबरोबर कृत्तिकेची भूमिका केली. एवढेच नव्हे, तर ह्याच नाटकात कृत्तिका, साधू, जलशातील गायक व वैशाख शेठ अशा चार भूमिका एकाच वेळी करून त्यांनी एक विक्रमच केला. गोपीनाथ सावकारांच्या ‘कलामंदिर’ संस्थेच्या सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, मानापमान अशा नाटकांतून त्यांनी सुरुवातीला काही भूमिका केल्या, तसेच हौशी रंगभूमीवर करीन ती पूर्व इ. नाटकांतूनही कामे केली. मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेच्या रंभा कुलवधू, कोणे एके काळी, एक होता म्हातारा या नाटकांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. लग्नाची बेडी या नाटकातील त्यांची ‘गोकर्णा’ची भूमिका उल्लेखनीय होती. पेडगावचे शहाणे, गोरा कुंभार अशा मोजक्या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.
१९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. १९६० मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटके–पंडितराज जगन्नाथ व सुवर्णतुला लागोपाठ रंगभूमीवर आली. या दोन नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीचे नवे पर्व सुरू झाले आणि प्रसाद सावकारांनी गायिलेली त्या नाटकांतील पदे संस्मरणीय ठरली. विशेषतः पंडितराज जगन्नाथ या नाटकातील वसंत देसाईंच्या संगीत-दिग्दर्शनाखाली प्रसाद सावकारांनी (भूमिका पं. जमनलाल) गायिलेली ‘जय गंगे भागिरथी’ व ‘सावन घन गरजे’ ही नाट्यपदे खूपच लोकप्रिय झाली. ‘जय गंगे’ने तर लोकप्रियतेचा कळस गाठला व प्रसाद सावकारांना श्रेष्ठ गायक-नट असा लौकिक मिळवून दिला. त्यांनी सुवर्णतुला नाटकात कृष्णाची भूमिका केली आणि ‘रतिहून सुंदर’ व ‘रागिणी मुख’ ही पदे गायिली. यानंतर विद्याधर गोखले यांच्या मंदारमाला नाटकात त्यांनी ‘मदनगोपाळ’ ही व्यक्तिरेखा साकारली व राम मराठे यांच्याबरोबर ‘बसंत की बहार’ ही जुगलबंदी गायिली. तसेच विद्याधर गोखले यांच्या जय जय गौरीशंकर या नाटकात ‘ श्रृंगी’ची भूमिका केली. त्यातील त्यांनी गायिलेली ‘ भरे मनात सुंदरा’ व ‘नारायणा रमारमणा’ ही नाट्यपदेही लोकप्रिय झाली. यानंतर त्यांनी पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या कट्यार काळजात घुसली या नाटकात ‘सदाशिव’ची भूमिका साकारून पं. जितेंद्र अभिषेकींसमवेत ‘घेई छंद’ हे पद गायिले. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या घनश्याम नयनी आला या नाटकात त्यांनी गायिलेल्या दोन गीतांची ध्वनिमुद्रिका निघाली. मधुसूदन कालेलकरांच्या तो राजहंस एक या नाटकात त्यांनी कृष्णाची भूमिका साकारली. अमृत मोहिनी, अवघा रंग एकची रंग ही त्यांच्या भूमिका असलेली अखेरची नाटके होत. त्यांचा आवाज भरदार व श्रवणमधुर, वाणी स्वच्छ व शुद्ध आणि गायकीत आवश्यक त्या करामती, ताना व हरकती असल्याने त्यांच्या गाण्यांची श्रोत्यांवर सहज छाप पडते. छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवणगुरू मानले.
त्यांना अनेक मानसन्मान लाभले: पद्मश्री, अ. भा. मराठी नाट्यपरिषदेचे बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृतिपुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, गोमंतक मराठी अकादेमीच्या दीनानाथ स्मृतिप्रतिष्ठानतर्फे लता मंगेशकर पुरस्कार इत्यादीचा त्यात समावेश होतो.
आपल्या समुहा तर्फे. प्रसाद सावकार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
मोहन तोंडवळकर यांचं वाचन उत्तम होतं. त्यामुळे संहितेतलं वेगळेपण त्यांना लगेचच जाणवे. लेखकाच्या प्रभावी नाटय़वाचनाला भुलून त्यांनी कधीच नाटकं स्वीकारली नाहीत. याबाबतीत ते स्वत:व्यतिरिक्त दुसऱ्या कुणावरही सहसा विसंबले नाहीत. नाटकाच्या बुकिंग प्लॅनवर एक नजर टाकली तरी त्यांना त्या नाटकाचं भवितव्य कळे. त्यामुळेच आपल्याला आवडलेलं नाटकही त्यांनी चालत नसताना कधी हट्टाग्रहानं सुरू ठेवलं नाही.
सशक्त अभिनेत्री, अभ्यासू भरतनाटय़म नृत्यांगना ते व्हिएतनाम येथे पार पडलेल्या ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाईड 2017’ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेमध्ये टॉप 50मध्ये बाजी मारणारी प्रतिभावान स्पर्धक तर याच स्पर्धेमध्ये ‘मिसेस टॅलेंटेड’ हा बहुमान पटकावणारी सन्मानमूर्ती म्हणजे कल्पिता राणे-सावंत. अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग अशा तिहेरी कलांवर अधिराज्य गाजवणारी हुशार कलावती म्हणून कल्पिताची ओळख जगाला आहे. मध्यमवर्गीय घरात जन्मलेली आणि घरी कोणतीही कलेची पार्श्वभूमी नसताना, या क्षेत्रात कोणताही गॉडफादर नसताना कल्पिताने मिळवलेलं हे यश नेहमीच कौतुकास पात्र ठरलं आहे. मात्र तिचा हा प्रवास तितकाच खडतर आणि धैर्याचा होता, हे तिच्याशी बोलताना नेहमीच जाणवतं.
कल्पिता एक उत्तम नृत्यांगना आणि कलासक्त अभिनेत्री तर आहेच, शिवाय ती बोलक्या चेहऱयाची मॉडेलदेखील आहे, हेच हेरून तिचे ‘फोटोंच्या गोष्टी’ या सदरासाठी फोटोशूट करायचं असं मी ठरवलं. सुरुवातीला भरतनाटय़म नृत्यप्रकारात आपला वेगळा ठसा उमटविलेल्या या नृत्यांगनेचा तिच्या नृत्यमुद्रा टिपण्याबाबत तिच्याशी मी बोललो. त्यानुसार तिचं कॉस्च्युम, मेकअप, हेअर हे करण्यात आलं. विजू माने प्रॉडक्शनच्या ‘स्टुडिओ 108’मध्ये तिचं हे फोटोशूट आयोजित करण्यात आलं होतं. भरतनाटय़म हा नृत्यप्रकार आणि म्हणूनच त्यातील भाव, मुद्रा, नृत्य करतानाची ऊर्जा हे सारं काही लाइव्ह शोच्या वेळी नीट टिपता येईल हे माहीत असूनही हे फोटोशूट करण्याचं मी ठरवलं. त्याचं कारण म्हणजे अनेकदा लाइव्ह शोमध्ये छायाचित्रकाराला हवी ती लायटिंग करता येतंच असं नाही. शिवाय यावेळी कलाकार त्याच्या कलेत गुंतलेला असल्याने त्याच्या मुद्रा या कॅमेऱयाच्या अँगलमध्ये नीट बंदिस्त करता येतात असं नाही. शिवाय कलाकाराच्या चेहऱयावर आलेला घाम, थकवा यामुळे ते फोटो फ्रेश वाटतातच असं नाही. या लाइव्ह शोच्या वेळी टिपता येतात ते कॅण्डीड फोटोज. मात्र मला ठरवलेले, पोज केलेले फोटो टिपायचे होते.
सुरुवातीला फ्लॅट लायटिंग (मॉडेलच्या उजव्या आणि डाव्या बाजूला समान तीव्रतेचा प्रकाश टाकून केलं जाणारं छायाचित्रण) करून काही फोटो मी टिपले. यानंतर कल्पिताच्या विविध भावमुद्रा त्याच कल्पकतेने टिपण्यासाठी मी ड्रमॅटिक लायटिंग केली. ही लायटिंग करत असताना कधी प्रकाशाचा एक स्रोत तर कधी प्रकाशाचे दोन स्रोत वापरून तिच्या विविध नृत्यछटा, भावमुद्रा मी कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो. कल्पिताची प्रचंड ऊर्जा, तिचा भरतनाटय़मचा अभ्यास आणि याच्या जोडीला तिच्यात लपलेली सशक्त अभिनेत्री आणि मॉडेल या साऱयाचा उपयोग मला फोटोशूटसाठी झाला. साधारणपणे दोन अडीच तास हे शूट चाललं.
कल्पिताने गेली अनेक वर्षे नृत्यक्षेत्रात आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे. अभिनय आणि मॉडेलिंग या क्षेत्रातही तिचं नाव अदबीने घेतलं जातं. इयत्ता तिसरीत असताना कल्पिताला अभिनयाची गोडी लागली. पृथ्वी थिएटरमधून अभिनयाचे प्राथमिक धडे तिने गिरवले. इथे तिची ओळख प्रेमा साखरदांडे यांच्याशी झाली आणि त्यांनी तिला सुलभाताई देशपांडे यांच्या ‘आविष्कार’ चंद्रशाळेत जाण्यासाठी सांगितलं. याच चंद्रशाळेत कल्पितावर अभिनयाचे संस्कार झाले. पुढे या संस्थेतर्फे ‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाटिकेतून काम करण्याची संधी तिला मिळाली. पुढे तिची निवड ‘झाशीच्या राणी’ या मालिकेसाठी करण्यात आली. या मालिकेत तिने झाशीच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तर यानंतर ‘हुंकार’, ‘मांगल्याचे लेणे’, ‘शंभूराजे’, ‘हे माझे नव्हे’ अशा अनेक व्यावसायिक नाटकांत आपल्या अभिनयाने रसिक मन जिंकलं.
भारतीय विद्या भवनमधील गुरू विद्या राव यांच्याकडे भरतनाटय़मच कल्पिताने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. तर सीसीआरटी स्कॉलरशिप मिळाल्याने पुढे गुरू तेजस्विनी लेले आणि गुरू दीपक मुझुमदार यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवण्याची संधी तिला मिळाली. भरतनाटय़म विशारद आणि दहावीची परीक्षा असं दोन्ही एकाच वेळी उत्तीर्ण होत पुढे नालंदा डान्स रिसोर्स सेंटर तिने नृत्याचं पुढील शिक्षण घेतलं. तर सध्या ती डॉ. अलका लाजमी यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवत आहे. आपल्याकडे असलेल्या नृत्य अभ्यासाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने कल्पिताने कल्पांगण सांस्कृतिक केंद्राची स्थापना 2001 साली केली आणि यंदा ही संस्था 18व्या वर्षात पदार्पण करत आहे हे विशेष. या संस्थेत आजवर 700 विद्यार्थ्यांनी विविध कलांचे धडे घेतले असून सध्या 90 विद्यार्थी इथे शिकत आहेत.
अभिनय आणि नृत्य या दोहोंची सांगड घालत असतानाच कल्पिताला मॉडेलिंग क्षेत्रानं खुणावलं. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या कल्पिताच्या घरी अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग यापैकी कसलीच पार्श्वभूमी नाही. एकत्रित कुटुंब पद्धतीचं तिचं माहेर. वडील एका कंपनीत नोकरीत रुजू तर आई गृहिणी. तिच्या लहानपणी अभिनय आणि नृत्य याला घरातून विरोध झालाही, परंतु कल्पिताच्या जिद्दीपुढे तो फार टिकला नाही. तर लग्नानंतर मॉडेलिंग क्षेत्रात उतरण्यास उलट तिच्या नवऱयाने प्रोत्साहन दिल्याचे ती सांगते. ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाईड 2017’ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत सहभागी झालेली कल्पिता 600 स्पर्धकांतून सर्वोत्कृष्ट 150 तर शेवटी टॉप 50च्या यादीत झळकली. व्हिएतनामला पार पडलेल्या विश्वविजेती या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱया कल्पिताला यावेळी ‘मिसेस टॅलेंटेड’ हा किताब देऊन गौरवण्यात आले. घरच्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे यश मिळवता आल्याचं ती सांगते. अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग या तिघांवर एकत्रित स्वार होणाऱया कल्पिताने आपला आदर्श नव्या पिढीसमोर घालून दिला आहे.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
डॉ. वरदा गोडबोले किराणा गायन शैलीतील एक आश्वासक नाव. सुरांच्या वाटेवर तिची वाटचाल सुरू आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची संस्कारसंपन्न गायकी अंगी बाळगलेल्या गायक आणि गायिकांची यादी फार तगडी आहे. किराणा घराण्याचे उस्ताद करीम खां यांच्या तालमीत के. डी. जावकर, सवाई गंधर्व आणि बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी हे दिग्गज गायक तयार झाले. पुढे सवाई गंधर्व यांच्याकडे पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी आणि श्रीमती गंगुबाई हनगल या तयार झाल्या, तर त्यानंतर पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे दिवंगत पं. ए. के. अभ्यंकर घडले. पं. ए. के. अभ्यंकर हे देशपरदेशात आपल्या गायकीमुळे सुप्रसिद्ध असे नाव. गेल्या आठवडय़ात पं. अभ्यंकरांचा हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाला.
‘आपल्या शिष्याने आळविलेले सूर’ हीच खरी गुरुदक्षिणा असं मानणाऱया पं. अभ्यंकरांनी अनेक शिष्य घडवले. या शिष्यांपैकी हिंदुस्थानी शास्त्र्ीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यात गुंतलेली आणि गुरू पं. अभ्यंकरांचा सुमारे ३५ वर्षांचा सहवास लाभलेली डॉ. वरदा गोडबोले ही एक संस्कारसंपन्न गायिका.
१६ मे २०१३3 रोजी मी पं. ए. के. अभ्यंकर ऊर्फ पं. अच्युत केशव अभ्यंकर यांच्या घरी गेलो होतो. पं. अभ्यंकर तेव्हा ७६ वर्षांचे होते. त्यांचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला कित्येक दशकांचा प्रवास तसच दिवेआगर ते ठाणे व्हाया गिरगाव या प्रवासात त्यांची नोकरी, शास्त्रीय संगीताचा अभ्यास, घरातले सदस्य आणि त्यांचे शिष्य अशा सगळ्या विषयांवर आम्ही सुमारे दोन – अडीच तास गप्पा मारत होतो. या दिग्गज गायकासोबत बोलता बोलता मध्येच त्यांना थांबवत त्यांची काही पोर्ट्रेट मी टिपली. त्यांच्या गायकीचा वारसा पुढे नेण्याचं काम त्यांची शिष्या डॉ. वरदा गोडबोले उत्तम करत असल्याची पावती खुद्द त्यांनीच मला दिली. याच विश्वासानं मी त्याच दिवशी डॉ. वरदा गोडबोले यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची वेळ घेऊन दुसऱयाच दिवशी त्यांच्या घरी पोहोचलो.
वयाच्या सातव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताच्या अभ्यासात गुंतून पुढे गांधर्व महाविद्यालयातून पहिल्या श्रेणीत संगीत अलंकार ही पदवी, तर त्यानंतर गांधर्व महाविद्यालयाच्या संगीताचार्य परीक्षेत देशातून पहिला येण्याचा मान पटकावणाऱया डॉ. वरदा गोडबोले या अभ्यासू गायिका. डॉ. वरदा यांना गायनाची आवड बालपणापासून होतीच. मात्र त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. संगीतासोबतच अभ्यासाची प्रगतीही त्यांनी समांतर गाठली. कला शाखेतल्या संस्कृत विषयाच्या पदवी परीक्षेत मुंबई विद्यापीठात सर्वाधिक गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक आणि सुवर्ण पदक पटकावणाऱया डॉ. वरदा यांनी हाच यशाचा आलेख कायम राखत मुंबई विद्यापीठाच्या एमए संगीताच्या परीक्षेतही सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला.
सुमारे दोन तास यशाचा हाच आलेख समजून घेत मी डॉ. वरदा गोडबोले यांचे पोर्ट्रेट टिपत होतो. यादरम्यान त्यांच्या गुरूंविषयी त्या बोलत होत्या. श्रीमती लीलाताई शेलारांकडून प्राथमिक शिक्षण तर त्यानंतर पं. अभ्यंकर यांच्याकडे किराणा घराण्याचं शिक्षण तब्बल बारा वर्षे घेतलं. पं. अभ्यंकरांकडच्या या बारा वर्षांत डॉ. वरदा यांच्या गायकीने आकार घेतल्याचं त्या मानतात. त्यानंतर आग्रा घराण्यातील पं. यशवंत महाले, ग्वाल्हेर घराण्यातील पं. मधुकरबुवा जोशी तसेच अजय पोहणकर आणि डॉ. सुशीलाताई पोहनकर यांच्याकडे पूर्ण केलं, तर माणिक वर्मा यांच्याकडे नाटय़ संगीताचा अभ्यास त्यांनी केला.
एरवी मॉडेल फोटोग्राफी करताना अनेक बाबी लक्षात घेऊन फोटो टिपण्याचा प्रयत्न करावा लागतो. मात्र गायक, गायिका यांच्या फोटोच्या वेळी त्यांचे हावभाव हे अधिक महत्त्वाचे असतात. त्यांच्या पोर्ट्रेटमध्ये त्यांच्या चेहऱयाचा तजेलपणा, डोळ्यांतली चमक, कलेबाबत असलेली ओढ, त्या कलेशी असलेली निष्ठा आणि त्यातला प्रामाणिकपणा या सगळ्यांची एकूण जुळणी करत टिपलेलं पोर्ट्रेट हे उत्तमच येत. इथे एरवी लागणाऱया मेकअप, हेअर, कॉस्च्यूम या बाबी तशा गौण ठरतात. डॉ. वरदा यांचे मी त्यांच्या घरी त्यांच्या तंबोऱयासोबत टिपलेले पोर्ट्रेट हे याचंच उत्तम उदाहरण.
यानंतरही डॉ. वरदा गोडबोले यांचे फोटोशूट करण्याची संधी मला अनेकदा आली. संगीत मैफलीत प्रत्यक्ष फोटोदेखील टिपण्याची संधी मला लाभली. मैफलीत उपलब्ध लाईटचा वापर करत कँडिड फोटो मी टिपले, तर विविध माध्यमांसाठी स्टुडिओतही फोटोशूट करायला मला मिळालं. स्टुडिओत लाइटींच्या सहाय्यानं फोटो टिपताना काही तास मला घालवायला लागले होते. केवळ फोटोशूटकरिता पोझेस न देता डॉ. वरदा यांनी त्या स्टुडिओतही आपला रियाझ सुरू केला आणि मला त्या रियाझावेळी फोटो टिपायला सांगितले होते.
डॉ. वरदा यांचा संगीत प्रवास मला मधूनमधून समजत होता. शास्त्रीय संगीताच्या ज्ञानाची शिदोरी आपल्याकडे जमा केल्यानंतर डॉ. वरदा यांनी देशभरात विविध ठिकाणी आपलं गायन सादर केलं, तर ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमातल्या ‘नाथ हा माझा…’ या लोकप्रिय गाण्याचा आवाजही डॉ. वरदा यांचा आहे. संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने डॉ. वरदा यांनी स्वरदायिनी ट्रस्टची स्थापना केली.
या संस्थेच्या अध्यक्षपदी पं. अभ्यंकर हे होते, तर डॉ. वरदा यांच्याकडे शिकायला येणाऱया शिष्यांसाठी तसेच गायन, कथ्थक आणि तबला यांचे शास्त्रोक्त धडे देण्यासाठी स्वरदा संगीतालयाची स्थापना केली. आज शेकडो विद्यार्थी या संगीतालयात शिकत आहेत हे विशेष. संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत विविध घराण्यांची गायकी त्याच ताकदीनं सादर करत आपल्याकडे असलेल्या संगीताचा गुणोत्तराने प्रचार आणि प्रसार करणाऱया डॉ. वरदा गोडबोले यांनी नव्या पिढीसमोर आपला स्वतःचा आदर्श घालून दिला आहे.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात 'सौभाग्यरमा' या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणाऱ्या दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी असाच बोलक्या चेहऱ्याचा, भारदस्त आवाजाचा व चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच 'सं. शारदम्' या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या.
त्यानंतर त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली. रंगभूमीवर वावरण्याचे व्यसन काही औरच असते व ते भलेभले सोडू शकत नाहीत.
पण नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला आणि १९९३ मध्ये गोव्यात संगीत सौभद्र मध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. १२ वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६ सालापासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांचे निधन झाले.
पं.नारायणराव बोडस यांचे चिरंजीव केदार बोडस त्यांचा वारसा पुढे नेत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पहिल्याच वर्षी हॉटमेलने सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन ऑनलाईन (AOL) या ई-मेल कंपनीलाही मागं टाकलं. अमेरिका ऑनलाइनला सहा वर्षांत जेवढे ग्राहक मिळाले त्यापेक्षाही जास्त ग्राहक हॉटमेलला दोन वर्षांत मिळाले!
प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा इरावती कर्वे यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या स्नुषा व फर्ग्युसनचे माची प्राचार्य दि. धों. कर्वे ह्यांच्या पत्नी होत. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात म्यिंजान येथे झाला. त्यांचे वडील त्यावेळी तेथे अभियंत्याचे काम करीत होते.
इरावती कर्वे यांचे यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. १९२२ साली त्या मॅट्रिक पास झाल्या, १९२६ साली फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) झाल्या. त्यावेळी त्यांना रँग्लर र. पु. परांजपे ह्यांचे बहुमोल साहाय्य लाभले. पुढे त्यांनी डॉ. घुर्ये ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ ह्या विषयावर प्रबंध लिहून एम्. ए. ची पदवी मिळविली व पुढील शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या.
‘मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता’ ह्या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी त्यांनी घेतली. तेथे असताना त्यांचा दि. धों. कर्व्यांशी परिचय झाला व त्याचे विवाहात रूपांतर झाले. काही वर्षे त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिवाचे काम केले.
१९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलजेमध्ये समाजशास्त्र व मानवशास्त्र ह्या विषयांच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ह्या विभागाच्या त्या अखेरपर्यंत विभागप्रमुख होत्या. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले. मानववंशशास्त्र या विषयावर त्यांनी बरेच अध्ययन केले. आणि कुटुंब संस्थेवर आधारलेला ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ जगन्मान्यता पावला.
‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगांत’, ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘महाराष्ट्र ’ एक अभ्यास इत्यादी सदंर्भातील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळ’ हे त्यांचे ललित संग्रह. इरावतीबाईंची भाषा साधी, सोपी, प्रसन्न आणि हलकासा विनोदाचा शिडकाव करणारी.
संवेदनक्षम, भावोत्कटता हे त्यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्य होते. तर टवटवीत तरलता ही वाचकाच्या मनाला प्रफुल्लित करते. मराठी लघुनिबंधाच्या विकासाचा एक टप्पा म्हणून इरावतीबाईंच्या लेखनाकडे पाहिले जाते.
इरावती कर्वे यांनी केवळ खोलीत बसून संशोधनात्मक अभ्यास किंवा लेखन केले असे नाही, तर त्यांनी संशोधनासाठी भारतभ्रमण केले, अनेक वर्षे पंढरीची वारीही केली, अनेक जत्रा-यात्रा जवळून अनुभवल्या.
समाजाला ’गोधडी’ची उपमा देऊन त्यांनी त्यामागील व्यापक अर्थ सांगितला. ‘वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या तुकड्यांनी मिळून गोधडी हे अखंड वस्त्र तयार होते, त्याप्रमाणेच समाजातील निरनिराळी माणसे एकत्र येऊन समाज निर्माण होतो, माणसे एकमेकांच्या जवळ येतात, जोडली जातात, एकमेकांच्यात मिसळतात, व पुन्हा तुटली जातात, तरीही त्यांची समाजातील वीण मात्र पक्की असते.’ असा समर्पक विचार त्यांनी मांडला.
ललित व संशोधनात्मक-वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे लेखन त्यांनी विपुलतेने केले. वैचारिक लेखनाबरोबरच स्त्रीची सहृदयता, तरल सौजन्यशीलता, चिंतन या गुणांसह ललितलेखनही त्यांनी तितक्याच ताकदीने केले आहे. ’परिपूर्ती’, ’भोवरा’ व ’गंगाजल’ ही काही उदाहरणे होत.
’ललितगद्याच्या अग्रदूत’ असे त्यांना म्हटले जाई. अतिशय लवचीक, स्वाभाविक भाषाशैलीमुळे त्यांचे गद्य अधिकच खुले. इरावतीबाईंनी मराठी व इंग्रजीतूनही लेखन केले. महाभारतावरील ’युगान्त’ या त्यांच्या ग्रंथास १९६८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ’युगान्त’ मध्ये त्यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा अद्वितीय दृष्टिकोनातून मांडल्या आहेत. या ग्रंथातून त्यांच्यातील स्त्री, संशोधिका व लेखिका एका वेगळ्याच उंचीवरून आपल्याला भेटते.
मराठी लोकांची संस्कृती, धर्म, हिंदूंची समाजरचना, महाराष्ट्र एक अभ्यास, Hindu Society An Interpretation, Maharashtra Its Land & People, Bhils of West Khandesh अशी मौल्यवान ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. एक ज्ञानभाषा म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व ओळखले होते. त्यांचा संस्कृत भाषेचाही मोठा अभ्यास होता. रामायण-महाभारताची संस्कृतमधील रचना, प्रसिद्ध कवींची संस्कृत काव्ये, असंख्य सुभाषिते – असे त्यांचे पाठांतर होते. इरावती कर्वे यांचे ११ ऑगस्ट १९७० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
तुमच्या दैनंदिन आयुष्यात अढळ स्थान पटकावलेले पण तुमच्या भावी पिढ्या संपवून टाकण्याची दाहकता जोपासणारे प्लॅस्टीक तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्दपार करू शकता?
‘प्लॅस्टीक’चे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय' या विषयावर शेकडो व्याख्याने घेऊन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या एका अवलियाला, ५८ वर्षाच्या तरुणाला, आज भेटूया, हे आहेत श्री. मिलिंद पगारे.
#Bharatiyans
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक गोष्ट आपल्या बरोबर नी:शब्दपणे वावरत असते. सणासुदीचे दिवस असो वा मुलांच्या शाळेची गडबड, भाजीला जायचे असो वा हॉटेलमधून पार्सल आणायचे असो, फ्रीजमध्ये भाज्या ठेवायच्या असो वा पिकनिक ला जायचे असो, प्रसंग काहीही असो, वाढदिवस, समारंभ, गणपती, दिवाळी एक वस्तू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे.
‘प्लॅस्टीक’
प्लॅस्टीकचा शोध १९ व्या शतकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क मध्ये लागला आणि काही दशकांमध्येच प्लॅस्टीकचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात होऊ लागला. होऊ लागला आणि आता तर प्लॅस्टीक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालंय.
पण ह्या प्लॅस्टिकचे जसे उपयोग आहेत त्यापेक्षा शतपटीने त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम आज सायन्सच्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या लक्षात आले आहेत.
आजघडीस प्लॅस्टीकचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि वारंवार होतो आहे की त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. आणि याचे अतोनात गंभीर परिणाम प्राणी आणि मनुष्याच्या आऱोग्यावर दिसून आले आहेत.
शासनाने प्लॉस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले असले तरी या आदेशाची सर्वत्र सर्रास पायमल्ली सुरू असून प्लास्टिकच्या अतिरेकी वापराने प्रदूषणात दिवसेंदिवस भयंकर वाढ होत आहे. अनेक नाल्या-गटारांमध्ये प्लॅस्टीक अडकून पडल्याने पावसाळ्यात सांडपाणी तुंबते आणि साचते. तसंच अनेकदा प्लॅस्टीकमधून शिळे खाद्य पदार्थ फेकण्यात येत असल्याने हे प्लॅस्टीक खाऊन गाय, म्हशीसारखी अनेक जनावरे सर्रास मृत्युमुखी पडत आहेत.
जितक्या सहजतेने प्लॅस्टिकने त्याचे जाळे पसरवले तितकेच कठीण होऊन बसले आहे त्याचे अस्तित्व मिटवणे आणि कमी करणे .
आज अनेक देशांनी प्लॅस्टिकवर काही अंशी बंदी आणली आहे. प्लॅस्टिकची गुणवत्ता ठरवून फक्त त्याच गुणवत्तेचे प्लॅस्टीक वापरण्याचे कायदेही निघालेत. प्लॅस्टीक अगदी माती, पाणी, हवा यांच्यातून थेट आपल्या रक्तात जाऊन मिसळले आहे.
मित्रानो, आज प्लॅस्टीकच्या या भस्मासुराने पृथ्वीला गिळायला सुरुवात केली आहे. अश्या प्लॅस्टीक विरोधी चळवळ उभारणारा, त्याचे दुष्परिणाम सांगून त्यावर पर्याय सांगणारा, जागृती करत फिरणारा ५८ वर्षाच्या मॅकेनिकल इंजिनिअर तरुण मिलिंद पांगारे.
“YES WE CAN” आपण करू शकतो, ह्या वाक्याने सुरुवात करत अफाट उत्साहाच्या जोरावर शेकडोहून अधिक व्याख्यान देत महाराष्ट्र पिंजून काढलाय यांनी आत्तापावेतो. गुजरात मधल्या जामनगर मध्ये मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून नोकरी करत असताना "प्लॅस्टीक हटाव, देश बचाव"चा नारा देत जनजागृती करता आहेत.
कॉलेज, कंपन्या, संस्थामार्फत आयोजित अनेक कार्यक्रमांत त्यांनी प्लॅस्टिकच्या दुष्परिणावर व्याख्याने केलीत ह्या व्याख्यानांसाठी ते पैसे घेत नाहीत. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाषांमधून ते व्याखाने करतात.
ते म्हणतात, "माझ्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे एक माणूस जरी जागा झाला तरी माझ्या प्रयत्नांचे चीज झाले असे मी समजेन."
आपण टाकलेल्या किंवा केलेल्या कचऱ्याचे पुढे काय? हा सततचा भेडसावणारा प्रश्न घेऊन उत्तर शोधण्यासाठी त्यांनी काही गोष्टीवर अभ्यास केला. अशावेळी आश्चर्यकारक पण चिंता वाढवणारे आकडेवारी त्यांच्या हाती लागली .
प्लॅस्टिक खाऊन मुक्या प्राण्यांचे किती जीव जातात? गटारे तुंबतात, वाढत्या घाणींने आणि दुर्गंधीने किती लोकांचे आरोग्य धोक्यात येते? कोणतेही व्यसन नसलेल्या किती व्यक्तींना कॅन्सर झाला? त्याचे कारण काय? अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे शोधत असतांना धक्कादायक आकडेवारी पाहून मिलिंद पगारे विचलित झाले.
अशातच त्यांचा एक जवळचा निर्व्यसनी मित्र कॅन्सर मुळे हे जग सोडून गेला आणि सुरु झाले त्यांचे युद्ध प्लॅस्टीक विरोधी चळवळीचे.
मिलिंदजींनी सुरु केलेल्या ह्या चळवळीने अनेक कंपन्यांमध्ये प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला आहे. प्लॅस्टीकच्या बॉटल्स , चहाचे कप आणि प्लेट जाऊन त्या जागी स्टील किंवा काचेच्या चिनीमातीच्या कुठेकुठे अगदी मातीच्या वस्तूंचा पर्याय निवडला गेलाय. अनेक लोकांनी दैनंदिन वापरातील प्लॅस्टीकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडाच्या पिशव्या, कागदाच्या पिशव्या वापरायला सुरुवात केलीय.
"भारतीयन्स"ने देखील जुन्या साड्यांपासून पिशव्या तयार करणाऱ्या महिलांची ओळख काही दिवसांपूर्वी एका लेखात करून दिली होती.
संशोधनाचा संग्रह, काही माहितपट, लॅपटॉप, प्रोजेक्टर असा लवाजमा घेऊन प्रवास करणारे किरकोळ शरीरयष्टीचे वार्धक्याकडे झुकलेले पण अंगी प्रचंड ऊर्जा असणारे मिलिंद पगारे.
मिलिंदजी म्हणतात, " एका माणसानं जरी स्वतःसाठी स्वतःपासून सुरुवात केली तर नजीकच्या काळात अनेक हात ह्या चळवळीत सहभागी होतील. चळवळ अखंडपणे टिकावी आणि निसर्गाला पर्यायाने स्वतःला वाचवायची वेळ आता आली आहे.
आपण सर्व ह्या चळवळीत सहभागी होऊ. दैनंदिन जीवनात किमान सहज टाळता येतील असे प्लॅस्टीक टाळू आणि त्याला सक्षम पर्याय शोधू.
मिलिंदजींच्या उत्साहाला आणि ह्या चळवळीला टीम भारतीयन्स’च्या शुभेच्छा.
आपण श्री. मिलिंद पगारे यांना व्याख्यानासाठी बोलावू इच्छित असाल तर संपर्क करा ७०१६२०४२७४ (7016204274)
वैशाली सागर- देवकर
टिम भारतीयन्स
१९८८ सालच्या पेस्तनजी ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या किरण खेर यांनी देवदास, हम तुम, वीर-झारा, फना, रंग दे बसंती, कभी अलविदा ना कहना, ओम शांती ओम इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १४ जून १९५५ रोजी झाला. १९८५ साली किरणने बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सोबत विवाह केला. २००९ मध्ये किरण खेरने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्या चंदीगड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. त्यांनी विद्यमान काँग्रेसचे खासदार पवनकुमार बन्सल व आम आदमी पार्टीची उमेदवार गुल पनाग ह्यांचा पराभव केला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
सुप्रसिद्ध मराठी नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म २९ जून १९३४ रोजी झाला.
चाळीस एक वर्षांपूर्वी नाटककार सुरेश खरे यांनी ‘आरोप’ नाटक लिहिले होते. त्यात लालन सारंग आणि जयराम हर्डीकर यांच्या भूमिका होत्या. मराठी प्रमाणे गुजराती रंगभूमीवरही याचे प्रयोग झाले. कमलाकर सारंग यांनी ‘आरोप’ नाटक दिमाखात रंगभूमीवर आणले होते. त्यांनी दिग्दर्शिन केलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली. मराठी नाट्यअभिनेत्री लालन सारंग या यांच्या पत्नी होत. सखाराम बाइंडर इत्यादी नाटकांतील या दोघांचा अभिनय विशेष नावाजला गेला.
विजय तेंडुलकर लिखित 'सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. लालन सारंग यांनी 'चंपा' आणि निळू फुले यांनी 'सखाराम' या भूमिका केल्या होत्या. या नाटकाने इतिहास घडविला. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे 'विवाह संस्था' संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. या संदर्भात लालन सारंग यांनी आपल्या लिखाणात म्हटलंय, ''सखाराम सुरू झालं आणि तेरा प्रयोगांतच नाटक अश्लील आहे, अशी बोंब उठली आणि ३३ कटसकट नाटक सेन्सॉर झालं. त्यानंतर त्यावर बंदी आली. आम्ही सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात गेलो. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले. पुन्हा तीन महिन्यांतच पुण्यातल्या 'लिंग निर्मूलन समितीनं' तेंडुलकरांच्या नाटकांवर बंदी म्हणून 'घाशीराम कोतवाल' व 'सखाराम बाइंडर' ही नाटके होऊ द्यायची नाहीत, असा फतवा काढला. पुन्हा एकदा लढा देऊन त्यातूनही आम्ही बाहेर पडलो..
या सगळ्यांतून जाताना मी व सारंग कळत-नकळत धीट होत गेलो.'' त्या म्हणतात, ''स्वत:चं सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्त्व पूर्ण बदलून एक गावरान, रांगडी, बिनधास्त चंपा उभी करताना खूप विचार करावा लागला होता.'' सारंगानी सखाराम बाइंडर नाटकाच्या वेळच्या आठवणींवर "बाइंडरचे दिवस" नावाचे पुस्तक लिहिले.
कमलाकर सारंग यांचे २५ सप्टेंबर १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti