(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • भालबा केळकर

    आज ६ नोव्हेंबर.. आज प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ मा.भालबा केळकर यांची पुण्यतिथी
    भालबा केळकर यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी झाला.
    हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले. मा.भालबा केळकर यांचे ६ नोव्हेंबर १९८७ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी लेखिका, कवयित्री – कविता महाजन

    गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांचे निकटचे स्नेही ‘प्रतिभानिकेतन’चे सेवानिवृत्त प्राचार्य स. दि. महाजन यांच्या त्या कन्या. कविता महाजन यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

  • सुलभा तेरणीकर यांचा सकाळ मधील अमीन सयानी यांच्या वरील लेख

    आपल्या सरल, सुस्पष्ट, सुमधुर निवेदन शैलीतून, सलग 41 वर्षे चालणाऱ्या गीतमालेतून भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील संगीतप्रेमी श्रोत्यांना एका सुरेल सूत्रात बांधून ठेवणारे सदाबहार आवाजाचे रेडिओसाथी अमीन सयानी 21 डिसेंबर या दिवशी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहेत. आजही कार्यमग्न असणाऱ्या अमीन सयानींच्या कार्याची, जीवनाची झलक, श्रोत्यांच्या शुभेच्छांसह...

    "भाईयों और बहनों‘ अशी अकृत्रिम स्वरात साद घालत, "अगले बुध की शाम फिर मिलेंगे‘ असा वादा करत "अगले पायदान‘पर असणारं गाणं कोणतं असा सवाल करत अमीन सयानी आपल्याला भेटत राहिले. आणि आपण चित्रपट संगीताच्या सोनेरी कालखंडात मुक्तपणे विहार करीत राहिलो. दूरदर्शन तर दूरच, पण त्याचा अभाव जाणवू न देणारं श्रवण आणि संवाद इतका उत्कट होता की ध्वनिलहरींनी मनाचं अवकाशही भरून राहिलं. संवादक, निवेदक, सूत्रधार अमीन सयानी आपल्या बालपणीचे जणू सवंगडी, दर बुधवारी भेटणारे मित्र आता ऐंशी वर्षांचे होत आहेत यावर विश्वा्स ठेवणं कठीण गेलं. आवडती "बिनाका गीतमाला‘ 3 डिसेंबर 1952 रोजी सुरू होऊन आज साठीची झाली हेही खरं वाटेना.

    गीतमालेची जन्मकथा सांगताना ते म्हणतात, ""साल 1952. एका तरुण ब्रॉडकास्टरला सांगण्यात आलं होतं की, एक प्रायोगिक तत्त्वावर गीतमालेचा कार्यक्रम लिहावा, सादर करावा, श्रोत्यांना उत्तरंही द्यावी, त्याचं मानधन रुपये पंचवीस प्रत्येक आठवड्याचे मिळतील.‘‘ तो तरुण ब्रॉडकास्टर मीच होतो... कार्यक्रम तयार केला. बुधवार 3 डिसेंबर 1952 रोजी रेडिओ सिलोनवरून रात्री 8 ते 8.30 या वेळात प्रसारित झाला आणि थेट श्रोत्यांच्या हृदयात पोचला. पहिल्याच आठवड्यात श्रोत्यांची 9000 पत्रं आली, नंतर 15000 आणि आकडा वाढतच गेला...‘ रेडिओ सिलोनचा ट्रान्समीटर अत्यंत प्रभावशाली असल्याने त्याचं प्रसारण दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व आफ्रिका येथे सर्वदूर स्पष्ट ऐकू येई. कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी वाढली की, 3 डिसेंबर 1952 रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता एप्रिल 1994 रोजी झाली. 41 वर्ष गीतमाला चालली. हा एक विश्वाविक्रमच होता.

    रेडिओ सिलोनच्या प्रभावी ट्रान्समीटर इतकाच प्रभावी, आकर्षक निवेदन शैलीचा, विशीचा युवा निवेदक एक इतिहास घडवीत होता. चित्रपट संगीताचं सुवर्णयुग तर उगवलं होतंच. नवे चित्रपट, तारे, तारकाही अवतरत होते. अमीन सयानी एका प्रभावी, परिणामकारक संवादशैलीतून अवघ्या भारतातल्या तरुणाईला बोलावीत होते, त्यांच्याशी साध्या, सरल हिंदीतून बात करीत होते. कोणताही भारतीय एकात्मता साधण्याचा तो राष्ट्रीय सरकारी कार्यक्रम नव्हता की हिंदी भाषेची प्रसारसभा नव्हती. आपलं उत्पादन विकणाऱ्या कंपनीसाठी तो एक व्यावसायिक कार्यक्रम होता, पण त्यात अमीन सयानींनी असे प्राण ओतले की एक पिढी हिंदी बोलू लागली, नव्हे हिंदी फार सोपी भाषा आहे. हे त्यातून भारतात कुठेही संचार शक्यल आहे, हे समजलं. या सोप्या भाषेचं श्रेय ते आपले वडील बंधू-गुरू व निवेदक हमीद सयानींना आणि म. गांधींच्या अनुयायी असलेल्या आपल्या मातोश्री कुलसुम सयानी यांना देतात.

    आई-वडिलांची दोन्ही घराण्यांची पार्श्विभूमी डॉक्टधर, समाज सेवकांची. 21 डिसेंबर 1932 रोजी कच्छी खोजा मुस्लिम घरात जन्मलेल्या अमीन सयानींचे वडील डॉक्टभर, आईचे वडील डॉ. रजबअली पटेल, महात्मा गांधींचे निकटवर्ती, मौलाना अबुल कलाम आझादांचे मित्र. दोन्ही कुटुंबं पुरोगामी विचारांची, शिक्षणाला महत्त्व देणारी. महात्माजींच्या आदेशानुसार कुलसुम सयानींनी प्रौढ शिक्षणाचं कार्य हाती घेतलेलं. 40 वर्षांपासून त्या "रहबर‘ (पथदर्शक) हे पाक्षिक चालवीत. हिंदी, ऊर्दू आणि गुजराती भाषा व लिपीतून. वयाच्या तेराव्या वर्षांपासून आईला मदत करणाऱ्या अमीन सयानींना उर्दू, गुजराती, हिंदीचा चांगला परिचय घडला.

    भारतातल्या साध्या माणसासाठी संभाषणाची भाषा, कशी असावी ते नकळत उमगलं. न्यू एरा हायस्कूलमध्ये गुजराती माध्यमातून, तर ग्वाल्हेरच्या सिंदिया हायस्कूलमध्ये इंग्रजीतून शिक्षण झालं. सेन्ट झेव्हियर्समध्ये छोटी नाटकं, एकांकिका लिहून करण्याचा छंद जडला. घरातलं वातावरण स्वातंत्रसैनिक, विचारवंत यांचा राबता असल्याने अतिशय मोकळं, सेक्युदलर. संस्कृत, अरेबिकची खास शिकवणी होती. आजूबाजूला मराठी गोतावळा. विजया मेहता, दामू केंकरे यांची प्रायोगिक नाटकं पाहायला जायचा उत्साह असे.

    संभाषणाच्या ओघात अमीन सयानी बिनचूकपणे गणपतीची आरती, संस्कृत सुभाषितंही आठवतात. वयाच्या सातव्या वर्षीच रेडिओच्या इंग्रजी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या छोट्या भावाला-अमीनला मोठ्या हमीदनं कानमंत्र दिला. "समोर असणाऱ्या व्यक्तीशी बोलशील तसा मायक्रोफोनमधून बोलत जा.‘

    सही म्हणजे बिनचूक, सत्य म्हणजे खरं, फसवाफसवी नको, स्पष्ट- संदिग्ध नको, सरल- समजेल असं, सभ्य- अश्लीजलता, उद्धटपणा, उथळपणा नको, सुंदर म्हणजे आकर्षक अशी सहासूत्रं अमीन सयानींनी पाळली आणि त्याला सहृदयतेची, प्रेमाची जोड दिली. निवेदन एका उंचीवर नेऊन ठेवलं.

    बालगोविंद श्रीवास्तव यांनी रेडिओ सिलोनच्या "फुलवारी‘ या नवोदितांच्या कार्यक्रमासाठी निवेदन करायला बोलावलं. तेव्हा कॉलेज झाल्यानंतर एलएलबी करून वकील होण्याचं घरच्यांचं स्वप्न तसंच राहिलं खरं, पण एक उमदा, हरहुन्नरी निवेदक रेडिओत दाखल झाला आणि त्यानं इतिहास घडवला.

    52 व्या वर्षीच्या 3 डिसेंबरपासून सुरू झालेल्या गीतमालेनं संगीतप्रेमी सिनेप्रेमी रसिकांच्या भावजीवनात एक रोमहर्षक पर्व सुरू केलं. त्यात खूप बदल झाले. 54 व्या वर्षापासून अर्ध्या तासाचा कार्यक्रम एक तासाचा करण्यात आला. खास लोकाग्रहास्तव! गीता दत्तनी "आसमान‘ या चित्रपटात गायलेल्या गाण्याची धून बिनाकाची सिग्नेचर ट्यून होती. ओ.पी. नय्यरच्या या संगीताची धून लोकांच्या हृदयात जाऊन बसलेली होती. ती 70 व्या वर्षांपर्यंत वाजत असे.

    प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊन गाण्याचा पसंतीक्रम अमीन सयानींनी लोकांवर, रसिकांवर सोपवला. देशभरात नियमित गाणी ऐकणारे श्रोतासंघ तयार झाले ते अमीन सयानींमुळे. श्रोते आणि चित्रपट निर्माते आणि रेकॉर्ड विक्रेते याच्या संयुक्त पसंतीनं निर्णय झाल्यामुळे संपूर्ण लोकशाही तत्त्वाचा आधार असलेला गीतमाला हा कार्यक्रम चांगलाच बहरला.

    गीतमालाचे अभ्यासक जयपूरचे अनिल भार्गव म्हणतात. ""41 वर्षांच्या प्रसारणात एकूण 2081 कार्यक्रमांत केवळ 80-85 कार्यक्रम काही कारणास्तव घडू शकले नाहीत. खुद्द अमीन सयानी काही अपरिहार्य कारणास्तव केवळ फक्त 30 वेळा हजर राहू शकले नाहीत.‘‘
    थोडं मागे वळून पाहिलं तर ज्या वेळी अमीन सयानींचा चिरपरिचित स्वर ऐकू आला नाही त्या वेळी श्रोत्यांच्या मनातही काही चुकल्यासारखे झाले होते, हे आठवते.

    अमीन सयानींचे अनेक रेडिओ प्रोग्रॅम्स गाजले.
    "सॅरिडॉन के साथी‘, "एस. कुमार्स का फिल्मी मुकद्दमा‘, "मराठा दरबार की महकती बातें "जोहर के जबाब‘ इत्यादी; पण खुद्द अमीन सयानी म्हणतात, ""मी कॉलेजात मुलींशी बोलत असे, मिसळत असे; पण तेवढंच. माझी खरी "स्वीटहार्ट म्हणजे गीतमाला. मी हा कार्यक्रम समरसून करीत असे. यावर माझं नितांत प्रेम आहे.‘‘

    अमीन सयानी त्यांना कामात मदत करणाऱ्या "इव्हज वीकली‘ची टॉप मॉडेल असलेल्या देखण्या काश्मियरी रमा मट्टूच्या खरोखरीच प्रेमात पडले. 58 व्या वर्षी विवाहबद्ध झालेल्या अमीन सयानींचं रमाबरोबरचं सहजीवन सुरेल, समाधानी ठरलं.

    2002 साली रमाच्या निधनानंतर एकाकी झालेल्या अमीन सयानींचे काम अखंडपणे सुरू आहेच. त्याचा मुलगा राजील त्यांना कामात मदत करतो.

    "फिल्म फेस्टिव्हल‘, "सौंदर्य स्पर्धा‘, "फॅशन शो‘ किंवा महत्त्वाचे प्रतिष्ठित कार्यक्रम अमीन सयानींनी शैलीदारपणे सादर केलेत. पसंतीच्या टॉप गाण्यात आपल्या गाण्यांचा समावेश नाही म्हणून नाराज झालेल्या काहींनी त्यांच्यावर आरोप केले; पण पारदर्शकता आणि निर्दोष कार्यप्रणालीमुळे अमीन सयानी आजही टिकून आहेत. "बिनाका‘ "सिबाका‘ अशी नावं बदलली, बुधवार बदलला, निवेदकही बदलले; पण गीतमाला आणि अमीन सयानी मात्र अजूनही लोकप्रियता टिकून आहेत.

    चित्रपटाचं आणि चित्रपट संगीताचं सुवर्णयुग ही त्यांची "मर्मबंधातली ठेव‘. अभिनेते, अभिनेत्री, गीतकार, संगीतकार यांच्या दिलखुलास मुलाखतींचं ध्वनिमुद्रण हा त्यांचा लाडका विषय. नर्मविनोदाची पखरण, स्पष्टता, खेळकरपणा यांचा सुंदर मिलाफ असलेल्या त्यांच्या मुलाखती केवळ श्रवणीय, बालकलाकार, रेडिओ, टीव्हीची सम्राज्ञी असलेल्या तबस्सूमची ओळख "मेरी छोटी और मोटी बहन‘ अशी कौतुकानं करून देतील. अशोककुमारना त्यांच्या पहिल्यावहिल्या "शॉट‘बदल विचारतील. लतीदीदींना त्यांच्या आशाताईंशी असलेल्या व्यावसायिक स्पर्धेबद्दल प्रश्नि विचारतील तर किशोरकुमारची फिरकी घेतील; पण संयमाचं सूत्र कधीच सुटत नाही.

    रेडिओ सिलोनचं "श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन‘ झालं. एकेकाळचा "पॉवरफुल‘ ट्रान्समीटर क्षीण, दुर्बल झाला. पण त्यांच्या सुस्पष्ट आवाजात ऐकू येणारा पत्ता "सेसिल कोर्ट, लॅन्सडाऊन रोड, मुंबई‘ मात्र तोच आहे. पहिल्यापासून असणारा रेकॉर्डिस्ट जॉन नियमित येतो. अमीन सयानी नेहमीप्रमाणे येतात. गीतमालेचा विषय निघाला की खुलतात.

    भाषा बिघडली, परस्परांतला भाईचारा, गोडवा हरवला म्हणून व्यथित होतात. रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेची आठवण त्यांना होते-where the mind is without fear... त्यावर "मन जहॉं न डरे, सर जहॉं न झुके ऐसा हो देश हमारा‘ अशा ओळी सुचतात.

    त्यांचं आवडतं गीत ही आठवतं "मन रे, तू काहे ना धीर धरे‘ पलीकडेच गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेलचा परिसर गजबजलेला असतो, समुद्राची गाज येते.

    अमीन सयानी मात्र कामात बुडून जातात. गीतमालाची सावली गडदही असते अन्‌ फार सुमधुरही.

    सुलभा तेरणीकर
    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर

    काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती.

  • जेष्ठ संगीतकार यशवंत देव

    यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
    यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे झाला. आजतागायत अनेक नाटके आणि चित्रपटासाठी गाणी लिहिली, संगीत दिले. त्याचप्रमाणे बालकविता, विडंबन, विनोदी काव्यप्रकारही लिहिले. यशवंत देवांनी हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज संगीतकार अनिल विश्वास यांना आपले गुरू मानले होते. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.

    यशवंत देव जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवीसुद्धा आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. जीवनात ही घडी अशीच राहू दे, श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे, अशी धरा असे गगन कधी दिसेल का?, कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे, तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी, अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात, अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा....अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी, तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत. मा.यशवंत देवांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते. चिंतनशील कलाकार असणारे यशवंत देव एका फार मोठय़ा सांगीतिक कालखंडाचे साक्षीदार आहेत. स्वत:सोबत अनेकांची कारकीर्द घडताना त्यांनी जवळून पाहिली आहे. १९५१ मध्ये ते सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले.

    लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात पुढे येत होती. हे सर्व देवांना जवळून बघायला मिळाले. एच. एम. व्ही. च्या नोकरीने देवांना अनुभवसमृद्ध केले. देव साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना लाभला होता. म्हणूनच ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची गाणी विलक्षण गाजली.

    एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नाहीत. तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगतात. त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर. (तेव्हाच्या सुमन हेमाडी!) त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली.

    या गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी होती, हेही देव विशद करताना म्हणतात, ‘गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दांतच ते दडलेले असतात हे जाणवलं. शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य विजेसारखं डोळ्यांसमोर आणि डोक्यात चमकलं!’’ म्हणूनच पुढच्या काळात देवांचं ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असतात. यातूनच ‘शब्दप्रधान गायकीचे उद्गाते’ हे बिरूद त्यांना बहाल झालं. 'दिवस तुझे हे फुलायचे', 'पाऊस कधीचा पडतो', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'क्षितिजावर खेळ विजेचा' अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, 'प्रिया आज माझी', 'स्वर आले दुरुनी', इ. गीतांचे कवी, 'शब्दप्रधान गायकी', 'रियाजाचा कानमंत्र', 'कृतज्ञतेच्या सरी', 'पत्नीची मुजोरी' अशा अनेक पुस्तकांचे लेखक मा. ‘प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव’ हे अशोक चिटणीस यांनी पुस्तक लिहिले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी लेखिका डॉ.सरोजिनी बाबर

    डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले.

    "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. डॉ.सरोजिनी बाबर यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता.

    अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..
    खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..
    गालात हासून, ओठात बोलून...
    हातानं खेळीत, काय ग म्हणालं...
    जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं ...
    सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं...
    रांगत रांगत, हअम डौलात...
    गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं ...
    फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून...
    कारंजं उडवीत, कसं ग रागावलं...
    झेप झेपावून, तोल सावरून...
    नाचून नाचून, पाय खुळखुळलं...
    काजळ तितीट, बाळाच्या मुठीत...
    माझ्या जीवाचं, सुख दाटलं...

  • जेष्ठ व्हायोलिन वादक पं.डी.के.दातार

    जेष्ठ व्हायोलिन वादक पं.डी.के.दातार यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला. पं. डी.के.दातार यांची व्हायोलिनची वादनशैली गायकी अंगाची म्हणजे गायनाशी नातं आणि इमान राखणारी आहे. खरेतर पंडितजींचे घराणे गायकाचे. त्यांचे वडील केशवराव आणि गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर हे गुरुबंधु. त्यामुळे पंडितजींकडे गायनाचा वारसा परंपरेने आलाच होता. मात्र पंडितजी अवघे सहा वर्षांचे असतानाच केशवरावांचे निधन झाले.

    परिणामी, त्यांच्याकडून गाण्याची संथा मिळालीच नाही. तरीही वडीलबंधु नारायणराव आणि मामा दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांनी पंडितजींवर लहानपणी गाण्याचे उत्तम संस्कार केले. या संस्कारांमुळेच पंडितजींनी लहानपणी गाण्यात उत्तम तयारी दाखवलीही. पण त्यांचे भाह्याच काही वेगळेच होते. ते गाण्यात रमलेले असतानाच एक दिवस नारायणरावांनी त्यांच्या हातात व्हायोलिन दिले. गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानून पंडितजींनी व्हायोलिन शिकायला सुरूवात केली.

    १९४३ मध्ये ते देवधर मास्तरांच्या 'स्कूल ऑफ इंडियन म्युझिक' मध्ये दाखल झाले. तिथे पंडित विघ्नेश्वरशास्त्री यांच्यासारखे व्हायोलिनवर कमालीचं प्रभुत्व असलेले गुरू त्यांना लाभले. विघ्नेश्वरशास्त्रींनी आपली सारी कला या प्रज्ञावंत शिष्याच्या झोळीत टाकली. मात्र पं. दातार यांनीही मिळालेले दान अंधपणाने स्वीकारले नाही. आपल्या प्रतिभेने त्यांनी ते अधिक झळझळीत केले. वास्तविक पं. दातार व्हायोलिन शिकत होते, तेव्हा श्रीधर पार्सेकर, गजाननबुवा जोशी यांनी व्हायोलिन वादनात चांगलेच नाव कमावले होते. परंतु तो पर्यंत व्हायोलिन हे फक्त वाद्याच्या अंगानेच वाजवले जायचे. परंतु डी. के. दातार गायन शिकलेले असल्यामुळे त्यांनी ते गायकीच्या अंगाने वाजवायला सुरुवात केली. त्यामुळेच त्यांचे व्हायोलिनवादन ऐकताना आपण गायनाची एखादी मेहफील ऐकत आहोत, असाच भास होतो.

    पं. डी. के. दातार यांच्या आधी १०० वर्षांची व्हायोलिन वादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. ती रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले. पं. डी.के.दातार यांनी निघ्नेश्वर शास्त्री पंडितांकडे व्हायोलिन वादनाचे धडे गिरविले. पं. दातार यांनी डी. व्ही. पलुस्कर यांना अनेक कार्यक्रमांमधून संगतही केली. पं. दातार यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमीचा सन्मानही मिळाला आहे. संगीत रिसर्च अकादमी आणि कुमार गंधर्व फाऊण्डेशन यांनीही पं. दातार यांचा गौरव केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • उत्तम निवेदिका अभिनेत्री रेणुका शहाणे

    ‘सुरभि’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमाने घराघरांत पोचलेले रेणुका शहाणे हे नाव घराघरात पोचले. त्यांचा जन्म २७ मार्च १९६५ रोजी झाला.त्यांचे ते दिलखुलास हसून ‘नमस्कार’ म्हणणे आजही लोकांच्या कानांत आणि डोळ्यांसमोर आहे. या कार्यक्रमातून त्या एक उत्तम निवेदिका दिसल्या तशी त्यापाठोपाठ आलेल्या मालिकांमधून अभिनय निपुणताही प्रेक्षकांनी वाखाणली. भारतीय दूरचित्रवाणीवर गाजलेल्या मालिकांपैकी अनेक रेणुका शहाणे यांच्या नावावर आहेत. सर्कस, सैलाब, इम्तिहान आदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.

    मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये आर्ट्स या विषयात पदवी प्राप्त केलेल्या रेणुका शहाणे यांनी १९९२ मध्ये 'हाच सुनबाईचा भाऊ' या मराठी सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरवात केली. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती १९९३ ते २००१ या काळात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'सुरभी' या कार्यक्रमाने. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या सुत्रसंचलनाने बहरलेला हा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला होता. त्यानंतर १९९४ मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन' या सिनेमातील भूमिकेने रेणुकाच्या लोकप्रियतेत वाढ केली. या सिनेमानंतर मुलगी, बहीण, बायको, सून, वहिनी असावी तर ती अगदी रेणुकासारखीच असे प्रत्येकाला वाटू लागले. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘हम आप के है कौन’मुळे ‘भाभी’ म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. 'हम आपके है कोन' नंतर रेणुका या फक्त महेश कोठारे दिग्दर्शित 'मासूम' या एकमेव हिंदी चित्रपटातून दिसल्या. रेणुका शहाणे या हिंदी चित्रपटातूनही, बराच काळ झाला तरी दिसल्या नाहीत,याबाबत त्या सांगत म्हणतात, 'हम आपके है कोन' चे दिग्दर्शक सुरज बडजात्या यांचे पिताजी राजकुमार बडजात्या यांनी मला त्यावेळी सांगितले की, या एकाच चित्रपटाने तुला अशी ओळख व लोकप्रियता मिळाली आहे, की तू यापुढे जास्त चित्रपटातून भूमिका साकारल्या नाहीस, तरी चालेल. १९९४ सालचा 'हम आपके है कोन' आजही झी सिनेमा वाहिनीवर सातत्याने दाखवला जात असून, तो आवर्जून पाहिला जातो. जोपर्यंत आपल्या देशात लग्नसंस्कृती कायम आहे, तोपर्यंत या चित्रपटाबाबतचे आकर्षण असेच कायम राहणार आहे. त्या लोकप्रिय प्रतिमेमध्ये न अडकता रेणुका शहाणे यांनी पुढील भूमिका सावधपणाने निवडल्या. नृत्य, खाद्यपदार्थ आणि विनोदाला वाहिलेल्या रिअॅमलिटी शोमधूनही त्या सहभागी झाल्या. आपली आई आणि प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांच्या कादंबरीवर आधारित ‘रिटा’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रेणुका शहाणे यांच्यातील दिग्दर्शिकेशी ओळख झाली. रेणुका शहाणे यांनी अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत लग्न केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री भानुप्रिया

    भानुप्रिया हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील असे एक नाव आहे, ज्याला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९६७ रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंदरी(रंगमपेटा गाव)येथे झाला. भानुप्रियाने तामिळ,तेलगु,कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे. भानुप्रियाचे खरे नाव मंगा भामा आहे. तिच्या घरी अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती. शाळेत असताना दिग्दर्शक भाग्यराजा गुरू एके दिवशी शाळेत आले. त्यांना त्यांचा सिनेमात एका टीन एज मुलीला घ्यायचे होते. त्यांनी भानुप्रियाची निवड केली.

    मात्र फोटोशूटवेळी भानुप्रिया खूप छोटी दिसली. त्यामुळे त्यांनी तिला सिनेमातून काढून टाकले. जेव्हा भानुप्रियाला हे समजले,तेव्हा ती पुन्हा शाळेत कधीच गेली नाही. कारण शाळेतील विद्यार्थी आपली थट्टा उडवतील असे तिला वाटले होते. वयाच्या १७ व्या वर्षी भानुप्रियाने अभिनय करिअरला सुरुवात केली.तिचा पहिला सिनेमा १९८३ मध्ये रिलीज झालेला'मेल्ला पेसुन्गल'आहे.हा एक तामिळ सिनेमा होता. ९० च्या दशकात बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेल्या भानुप्रियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये दीडशेहून अधिक सिनेमे केले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप

    मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप यांचा जन्म १५ जुलै १९३१ रोजी झाला. आपल्या भारूडाने समस्त मराठी रसिकांना वेड लावणा-या विठ्ठल उमप यांनी आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली होती. राज्याच्या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे.
    विठ्ठल उमप यांचा मूळचा गळा विदर्भाचा असला, तरी नगर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांच्या घराण्याने भेदिकाची परंपरा सुरू ठेवली. विठ्ठल उमप यांचे वडील भेदिकाचे गायक पण उमप यांच्यावर भेदिकापेक्षा आंबेडकरी जलसा आणि सत्यशोधकी तमाशाचा विशेष प्रभाव पडला होता. मुंबईला उदरनिर्वाहासाठी आलेल्या उमप यांनी कामगार वस्तीत मेळ्यातून कामे केली. विठ्ठल उमप हे लोकशाहीर असले तरी त्यांना 'कवाल' म्हणूनच लोक पूर्वी ओळखत. पण नंतर मात्र त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून, एक समर्थ लोककलावंत, अशी आपली ओळख निर्माण केली. लोकरंगभूमी, रंगभूमी, कव्वालीचे व्यासपीठ, काव्य संमेलने, रुपेरी पडदा, दूरचित्रवणीचा छोटा पडदा अशा अनेक माध्यमांमध्ये उमप यांचा सर्वत्र संचार होता.

    'आला कागुद कारभारणीचा' ही लावणी, 'ऐका मंडळी कान देऊनी तुम्हा सांगतो ठेचात कुडी आत्म्याचं भांडण झालं भारी जोरात', 'भूक लागलीया पाठी कशासाठी पोटासाठी', 'माझ्या आईचा गोंधळ', 'आईचा जोगवा', 'आरती श्रीगणेशा जगदीशा', 'वादळ वारा तुफान येऊ द्या', 'ये दादा आवर रे', 'फाटकी नोट मना घेवाची नाय', 'भाता मीठ नही टाक्या' अशा वेगवेगळ्या लोकगीतांच्या गायनाने विठ्ठल उमप यांनी आपला स्वतंत्र ठसा लोकगीताच्या क्षेत्रात उमटविला. 'माझी मैना गावाकडं राह्यली' या गाण्यानं तर अनेकांचे डोळे पाणावले.

    विठ्ठल उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. १९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता. विठ्ठल उमप केवळ लोकगीत गायनापाशी थांबले नाहीत. त्यांनी लोकरंगभूमीसोबतच नागर रंगभूमीवर संचार ठेवला. 'अरे रे संसार', 'अबक दुबक', 'विठो रखुमाय', 'खंडोबाचं लगीन', 'जांभुळाख्यान' या चाकोरीबाहेरच्या नाटकांसोबतच 'हैदोस', 'बुद्धम्‌ शरणम्‌'सारखी नाटके त्यांनी वर्ज्य मानली नाहीत.

    विहीर, टिंग्या, सुंबरान,या चित्रपटांमध्ये व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांनी काम केले होते.लोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

    विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आदेश, नंदेश आणि उदेश आता त्यांची परंपरा पुढे नेत आहेत. विठ्ठल उमप यांचे २६ नोव्हेंबर २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट