आपल्या करीयर मध्ये त्यांनी ११० हून अधिक चित्रपटात अभिनय केला. १९९८ साली आलेल्या ‘रामायण’मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत यांची व्यक्तिरेखा साकारली होती. चंद्रशेखर व रामानंद सागर चांगले मित्र होते. त्यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर यांनी आर्य सुमंतची भूमिका स्वीकारली होती.
बाळ कोल्हटकर यांना नऊ अक्षरांचा नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२६ रोजी सातारा येथे झाला. बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू. मा.बाळ कोल्हटकर यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी "जोहार" हे आपले पहिले नाटक लिहिले.
१९४७ पर्यंत ते रेल्वेत नोकरी करत होते. त्यानंतर लेखनासाठी आणि रंगभूमीसाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत. त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती. "दुरितांचे तिमिर जावो" या नाटकांचे पंधराशे प्रयोग, 'वाहतो ही दुर्वाची जुडी' या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे' याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर 'एखाद्यांचे नशीब' या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते.
बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात १९५९ ते १९७२ या काळात वास्तव्यास होते. त्यांनी खेर विभागातील प्रसिद्ध हेरंब मंदिरात 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'वेगळं व्हायचंय मला', अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली तसेच सीमेवरुन परत जा, लहानपणा देगा देवा, देव दीनाघरी घावला, देणाऱ्याचे हात हजार, उघडलं स्वर्गाचे दार, इत्यादी त्यांची गाजलेली नाटके. त्यांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'दुरितांचे तिमीर जावो', 'वेगळं व्हायचंय मला', अशा नाटकांनी तर गर्दीचे विक्रम रचले. त्यांनी एकंदर ३० हून अधिक नाटके लिहिली. शहरी मध्यमवर्गीय नाटकांबरोबरच कोल्हटकरांनी काही पौराणिक व ऐतिहासिक विषयही हाताळले. 'देव दीनाघरी धावला', 'सीमेवरून परत जा', 'शिवराय कवि भूषण' ही नाटकेही गाजली.
कोल्हटकर उत्तम कवी होते. त्यामुळे त्यांच्या नाटकांत पदेही असत. 'आई तुझी आठवण येते,' व 'निघाले आज तिकडच्या घरी' ही गाणी नाट्यगृहांत प्रेक्षकांना हमखास रडवीत असत. पंडित कुमार गंधर्व व वाणी जयराम यांच्या आवाजातील 'ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी' हे प्रेमद्वंद्वगीत अजरामर झाले. कुमार गंधर्वजींच्याच आवाजातील भूपाळी 'ऊठी ऊठी गोपाळा' आजही सकाळी ऐकू येते. मा.कोल्हटकरांच्या नाटकांच्या शीर्षकांचे एक वैशिष्टय होते की 'एखाद्याचं नशीब', 'आकाशगंगा' असा अपवाद सोडला तर त्यांच्या ३१ पैकी बहुतेक नाटकांची शीर्षके नऊ अक्षरी आहेत. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली.
प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. मा.बाळ कोल्हटकर यांचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस यांचा जन्म ८ डिसेंबर १९५९ रोजी झाला.
मुळचे कोल्हापूरचे असलेले उदय सबनीस यांनी “रंजन युवा मंच” ह्या संस्थेतून स्वत:च्या कारकिर्दीची सुरुवात केली. ठाण्यातील कलासरगम या नाट्यसंस्थेतून त्यांनी एकांकिका केल्या. हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा होता. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेतही सहभाग घेतला होता.
१९८८ साली त्यांचं पहिलं नाटक “सूर्याची पिल्ले” रंगभूमीवर आले. २५ नाटकं, ५० मालिका, ३० सिनेमे, व ५ हिंदी सिनेमे तसेच इंग्रजी व फ्रेंच सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी आपला अभिनय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. "बैंजो" आणि "अकीरा" या चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
उदय सबनीस यांनी कार्टून नेटवर्क, डिजनी, डिस्कव्हरी, हिस्टरी या चॅनेल्सवर व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं.फिरोज दस्तूर यांचा जन्म ३० सप्टेंबर १९१९ रोजी झाला.
पं. फिरोज दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. १९३० च्या दरम्यान पं.फिरोज दस्तूर हे भारतीय चित्रपट सृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते.
खरतर, जयदेवला "अपयशी" संगीतकार म्हणण तस योग्य नव्हे, कारण, त्याने असे स्वत: कधीच म्हटल्याचे मी तरी वाचलेले/ऐकलेले नाही. आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा सहाय्यक म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे, सतत त्यांच्या सावलीतच त्यांचे जीवन व्यतीत झाले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात, जेंव्हा, केंव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेंव्हा मात्र, त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला.
मला वाटत, त्यांच्या आयुष्याची सुरवातच मुळी "सहाय्यक" म्हणून झाली आणि त्यातच बरीचशी कारकीर्द झाकोळली गेली. अगदी, सुरवातीला, उस्ताद अली अकबर खान यांच्या समवेत, देव आनंदच्या "आन्धीया" या चित्रपटाला संगीत देताना, सहाय्यकाची भूमिका स्वीकारली आणि नंतर, एस.डी.बर्मन यांच्या समवेत ऐन भरातला काळ!! जयदेव यांचे खरे नाव झाले ते, "हम दोनो" या चित्रपटाने!! पण, दुर्दैवाने, या संगीताच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना अजुबत झाला नाही. एकदा, देव आनंद म्हणाला होता कि," जयदेव, सोपी चाल अवघड करायचा!!" अजब तर्कशास्त्र!! एक खरे कि, जयदेव यांच्या चाली अवघड असायच्या पण तो त्यांचा शैलीचा भाग होता, त्याला कोण काय करणार. पण, मग, मदन मोहन तरी काय फारसे वेगळे करायचा!! अर्थात, मदन मोहन देखील अपयशी संगीतकार म्हणूनच आयुष्यभर वावरला!! एखाद्या संगीतकाराची शैली जर का रूढ मार्गाने न जाता, वेगळ्या वाटेने जात असली तर, तो काय दोष मानायचा का? त्या अर्थाने मराठीतील, श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकर, हे देखील त्याच मार्गाचे वाटसरू म्हणायला हवेत!!
जयदेवला, "हम दोनो" व्यतिरिक्त कधीही, कुठल्याही चित्रपटाने लौकिकार्थाने यश दाखवले नाही. अगदी, "अंजली" पासून ते शेवटचा, "हीर रांझा" पर्यंतचा इतिहास, हेच उत्तर दर्शवतो. हा नशिबाचा खेळ म्हणायचा कि आपल्या तत्वांना आयुष्यभर चिकटून राहण्याची किमत मोजली, असे म्हणायचे!! संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि पाया पक्का असूनदेखील, केवळ स्वत:ची वेगळी ओळख ठेवण्याच्या नादापायी, जयदेवने आपल्या सांगीतिक आयुष्याची फार मोठी किमत मोजली. जयदेवने, इतर संगीतकारांच्या मानाने फारच तुरळक चित्रपट केले पण, त्यातील बहुतांशी चित्रपट केवळ अविस्मरणीय असेच होते, अगदी, बुद्धिनिष्ठ विचारप्रणालीच्या सहाय्याने सांगोपांग चिकित्सा केली तरीदेखील!! जयदेवची स्वत:ची अशी शैली होती.आयुष्यभर बहुश: त्यांनी भारतीय वाद्ये आणि ती देखील अत्यंत आवश्यक असतील तितकीच, त्यांनी आपल्या रचनेत वापरली. उगाच ५० ते १०० वादन्काचा ताफा पदरी बाळगण्याचा अविचारी हव्यास कधीही ठेवला नाही. एखादी बासरीची लकेर, संतूरचा नाजूक तुकडा, यातूनच त्यांच्या रचनेचे स्वरूप स्पष्ट होई. त्यांचा हाच विचार असायचा कि, जर का ४,५ व्हायोलीन वादक पुरेसे असतील तर, उगाचच ५० वादकांचा ताफा वापरण्याची काहीच गरज नाही आणि त्यामार्गे, फुटकळ लोकप्रियता मिळविण्याची गरज नाही. असला, अव्यवहारी विचारांचा संगीतकार होता.
आधी शब्द कि आधी चाल, हा भावगीत/चित्रपट गीतातील एक कधीही न संपणारा वाद आहे. अर्थात, आपल्या सारख्या रसिकांच्या दृष्टीने बघायचे झाल्यास, आपल्यापुढे जे गाणे सादर होते, ते महत्त्वाचे मग कुणी कुठली का पद्धत स्वीकारावी!! हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे. जेंव्हा आपल्यासमोर एखादे गाणे येते तेंव्हा, ते गाणे, १] कविता, २] संगीत रचना आणि ३] गायन, या तीनच घटकातून ऐकायचे, इतकाच भाग आपण स्वीकारू शकतो. अर्थात, हे तिन्हीही घटक, वाटतात तितके सहज व सोपे नाहीत. इथे, मी केवळ "अर्थपूर्ण" गाण्यांचाच विचार करीत आहे. कारण आजही, आपल्या समजत असाच विचार प्रचलित आहे कि, तीन मिनिटांचे गाणे, हे "संगीत" नव्हेच!! अर्थात, हा देखील एक खुळचट विचार आहे म्हणा. प्रत्येक, गाण्यान, वरील तिन्हीही घटक आवर्जूनपणे आवश्यकच असतात. यातील एक जरी घटक "दुबळा" राहिला तर, सगळी रचनाच "फोफशी" होते. जयदेवच्या गाण्यांत हीं जाणीव प्रखरपणे जाणवते. जयदेवचे कुठलेही गाणे घ्या, शब्द हा घटक त्यात आवर्जूनपणे ठळकरित्या जाणवतो. अर्थात, जयदेवने बहुतेकवेळा साहिरची साथ घेतली होती आणि साहीर तर मुळातला सक्षम कवी, नंतर गीतकार!! खरतर, हा देखील एक अत्यंत निष्फळ वाद आहे, कि गीतकार हा कवी असतो कि नाही? जेंव्हा आपण, साहीर, शकील यांच्यासारखे, किंवा मराठीतील, ग.दी. माडगुळकर घेतले तर, हेच आपल्या लक्ष्यात येईल कि, हे "गीतकार" मुळात प्रतिभावंत कवी आहेत कि ज्यांच्या कविता मुलत: अतिशय गेयबद्ध आहेत. शब्दच जर गेयतापूर्ण असतील तर संगीतकाराला एक वेगळाच हुरूप येतो, हे एक निखालस सत्य आहे. जयदेव यांच्या रचनेत, या विचाराचे नेहमीच भान असल्याचे दिसून येते. अर्थात, या संदर्भात, खूप काही लिहिता येईल पण खर तर हा एका वेगळ्या निबंधाचा विषय आहे.
"हम दोनो" मधील गाणी आपण, वानगीदाखल बघूया. "अल्ला तेरो नाम" पासून ते " कभी खुद पे" सारख्या गझल सदृश गाण्यांवर जरा नजर टाकली तर, माझा मुद्दा ध्यानात येईल. इथे, मला आणखी एक गमतीचा मुद्दा सुचला. "अल्ला तेरो नाम" हे गाणे तर अप्रतिम आहेच, यात वादच नाही, पण, मोठ्या झाडाच्या संपर्कात आजूबाजूच्या झाडांची वाढ जशी खुटते तसा प्रकार दुसऱ्या गाण्याबाबत झाला आहे. "अल्ला तेरो नाम" ची लोकप्रियता प्रचंडच आहे आणि आता तर ते लताचे एक classic गाणे म्हणूनच ओळखले जाते पण, याच चित्रपटातील, "प्रभू तेरो नाम" हे भजनदेखील तितकेच सुश्राव्य आहे, हे फारसे कुणी ध्यानातच घेत नाही आणि एक प्रकारे, या गाण्यावर थोडासा अन्यायच झाला आहे!! असाच प्रकार, सी. रामचंद्रांच्या "अनारकली" बाबत झाला आहे,. "ये जिंदगी उसीकी हैं" हे गाणे अजरामर झाले पण, त्याच चित्रपटातील, "मुहोब्बत ऐसी धडकन हैं" हे गाणे पार मागे पडले. खर तर, रचनेच्या दृष्टीकोनातून पहिले तर, "मुहोब्बत ऐसी धडकन" हे गाणे नितांत रमणीय आणि गोड गाणे आहे. थोडा वेगळा विचार केला तर, असे दिसेल कि, "ये जिंदगी उसीकी हैं" या गाण्यावर, "शारदा" नाटकातील, "मूर्तिमंत भीती उभी" या गाण्याची थोडी पडछाया आहे आणि हे खुद्द सी. रामचंद्रांनी देखील कबूल केलेले आहे तरी देखील लोकप्रियता कशी चंचल असते, हे बघण्यासारखे आहे. असो,
जयदेवने फक्त लताकडूनच अफलातून रचना गावून घेतल्या आहेत असे नव्हे तर, हरिहरन, सुरेश वाडकर, येशुदास आणि रुना लैला यांच्या गळ्यातून तितक्याच अप्रतिम रचना सासदार केलेल्या आहेत. रुना लैलाचे "बोलो बोलो कान्हा" हे गाणे कधी ऐकले आहे का? आवर्जूनपणे ऐकण्यासारखे आहे. सुरेश वाडकर तर, "सीनेमे जलन" या गाण्यातूनच लोकांच्या पुढे आला. जयदेवची खासियत अशी आहे कि, त्याची गाणी ऐकताना गोड वाटतात पण, प्रत्यक्ष्य ऐकताना त्यातील "अवघड" लयीचा अनुभव येतो. वानगीदाखल, लताचेच प्रसिद्ध, "ये दिल और उनकी" हे पहाडी रागातले गाणे ऐकावे आणि माझ्या वाक्याची प्रतीती घ्यावी. इतके लयबद्ध गाणे पण तितकेच गायला अवघड!! तसाच प्रकार, " तू चंदा मीन चांदनी" आणि "मै आज पवन बन जाऊ" या गाण्यांच्या बाबतीत येतो. "मै आज पवन" हे गाणे तर खास जयदेवच्या सगळ्या रचनाचा अर्कच आहे. त्यात वापरलेला राजस्थानी मांड राग तर, खास जयदेवची मुद्रा घेऊनच प्रकट होतो. "रात भी हैं कूच भिगी" सारखी रचना आणि त्यात वापरलेला कोरस, सगळेच इतके विलोभनीय आहे कि, अशी गाणी ऐकताना, आपणच आपल्या मनाशी आपल्या लेखणीचा पराभव स्वीकारावा!!
गाणी, आणखी अनेक सांगता येतील कि त्या योगे जयदेवची प्रतिभा निखरून मांडता येईल. पण, खर तर, गाण्यातील वाद्यमेळ, त्याचा कवितेशी जोडलेला बंध आणि गायकीतून सादर केलेली रचना, हा केवळ ऐकण्याचाच भाग आहे आणि तो फक्त, आपण एकटेच बसून शांतपणे अनुभवण्याचा भाग आहे. खर तर, कुठलेही संगीत हे फक्त आपण आणि ती रचना, इतकाच संवादाचा संदर्भ असतो. तिथे, दुसरे कुणीही उपरेच असतात. प्रत्येक गाणे हे, फक्त तुमच्याशीच संवाद साधत असते आणि त्यातूनच तुम्ही त्या गाण्याला प्रतिसाद देत असता. निदान, माझी तरी, गाणे ऐकण्याची अशीच प्रक्रिया आहे.
रात्र बरीच झालेली असते, आजूबाजूला, कसलाच आवाज नसतो. आपणही, विक्लान्तपणे आपल्या खोलीत बसलेलो असतो. अशाच वेळी, दूरवरून, लताचे, "किस किसको दीपक प्यार करे" हे अत्यंत अवघडल्या रचेनेचे सूर ऐकायला येतात आणि आपण, स्वत:च कधी अंतर्मुख व्हायला लागतो हेच कळत नाही.
- अनिल गोविलकर
त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६४ रोजी पुणे येथे झाला. डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. मराठी चित्रपट सृष्टीला वेगळे वळण देणाऱ्या "श्वास" आणि "डोम्बिवली फास्ट" या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'अवंतिका' मालिकेत त्यांनी काम केले होते. मराठी चित्रपटाला अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ते उत्तम चित्रकार ही आहेत.
बेधुंद, 'मी बाप', 'मेड इन चायना ' आणि 'साने गुरुजी' या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला. २००८ मध्ये नायजेरियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये कुलकर्णी यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
माया खुटेगावकर… अस्सल लावण्यवती नर्तिका… आई–बहिणीच्या मायेच्या पंखाखाली तिची लावणीबहरली…
अस्सल खानदानी लावणी सादर करण्यात मधू कांबीकर यांचा हातखंडा मानला जात असे. मधू कांबीकरांच्या लावणी समूहात रुक्मिणीबाई अंधारे या गायन, अभिनय आणि नृत्य सादर करीत. मधू कांबीकरांप्रमाणेच आपल्या मुलींनीही नावलौकिक मिळवावा, अभिनय, नृत्य अन् गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवावा असं रुक्मिणीबाई यांना नेहमीच वाटत असे. गायन क्षेत्रात विजया तर नृत्यात छाया आणि माया यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आणि अल्पावधीतच विजया-छाया-माया हे नाव लावणी वर्तुळात अदबीनं घेण्यास भाग पडलं.
लातूर गावातल्या खुटेगाव या छोटय़ाशा खेडय़ातून सुरू झालेला हा लावणीचा प्रवास पुढे सातासमुद्रापारही जाऊन पोहचला. आपल्या गावाचं नाव पुढे जगाच्या इतिहासात कोरलं जाईल हे हेरून रुक्मिणीबाईंनी आधीपासूनच आपल्या मुलींची ओळख अंधारे या आडनावाने न करता खुटेगावकर या नावाने करून दिली आणि पुढे विजयासोबतच छाया-माया खुटेगावकर या नावानं त्या जगप्रसिद्ध झाल्या.
छाया खुटेगावकरांचा लावणीचा हा प्रवास फार आधीच सुरू झाला होता, मात्र माया खुटेगावकर ही वयाच्या चौदा वर्षांपर्यंत यापासून वंचित राहिली होती. माया कुटुंबात सर्वात लहान आणि म्हणूनच लावणीपासून तिला दूर ठेवत शिक्षणासाठी पुण्यातील कर्वेनगर इथल्या हॉस्टेलला वेगळं ठेवण्यात आलं होतं. याउलट आपल्या आई आणि बहिणीप्रमाणेच आपणही या क्षेत्रात यावं असं मायाला वाटत असे. अखेर नववीपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचा या क्षेत्रात अपघातानेच श्रीगणेशा झाला. अपघाताने होण्याचं कारण म्हणजे मुंबईत षण्मुखानंद हॉलला लावणीचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि या कार्यक्रमाला एक नृत्यांगना काही कारणास्तव येऊ शिकली नाही. या मुलीची जागा भरून काढण्यासाठी मायाला या कार्यक्रमात घेण्यात आलं आणि इथेच मायाची नाळ लावणीशी जोडली गेली.
छाया आणि मायाचे फोटो काढण्याची संधी मला अनेकदा मिळाली. कालांतराने छायाच्या गुडघ्याच्या दुखण्याने डोकं वर काढलं आणि तिचा नृत्यप्रवासाचा वेग मंदावला. त्यातच ती मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना लावणी विषयाचे धडे देण्यात गुंग झाली. छाया-माया ही जोडी पुढे तुटली. यानंतर मग केवळ मायाचे फोटो काढण्याची संधी वारंवार मिळू लागली. पुणे, सातारा या ठिकाणी मायाचे अनेक कार्यक्रम सातत्याने होऊ लागले. त्यातच ‘नाद करायचा नाय’ या कार्यक्रमाला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. याच कार्यक्रमात मायाचे बॅकस्टेजला काही फोटो मला टिपता आले. मायाचे फोटो काढताना ती फार कमी बोलते. तिला बोलतं केल्यानंतर तिने तिचा जीवनप्रवास हळूहळू उलगडून सांगितला. ‘‘माझे वडील माळकरी होते. त्यांना आईने या क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांचा विरोध झुगारून आईने तिचा प्रवास सुरूच ठेवला. शेवटी आई घर सोडून आम्हा तिघा बहिणींना घेऊन निघून आली.’ माया सांगत होती.
पारंपरिक लावणी सादर करण्यासाठी माया ओळखली जाते. तसंच बैठकीची लावणी, अदाकारीच्या लावणीसाठीही ती प्रसिद्ध आहे. तिच्या कलेला कॅमेराबद्ध करण्यासाठी मी महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिचे कार्यक्रमात फोटो टिपले. कार्यक्रम, ठिकाण आणि तिच्या सादरीकरणावर यानुसार मायाच्या पेहरावात, शृंगारात बदल झालेला दिसला. बैठकीची लावणीसाठी पांढऱया रंगाची साडी, अदाकारीची लावणीसाठी हिरव्या, निळ्या, केशरी रंगाची तर विशेष कार्यक्रमात लाल, गुलाबी रंगाची साडी ती सहसा परिधान करत असल्याचं मला लक्षात आलं. त्यानुसार त्यावरचे दागिने आणि मेकअप, हेअर देखील बदलल्याचं लक्षात आलं. तिच्या याच विविध रूपांना कॅमेराबद्ध करण्यासाठी मी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली.
मायाचे या क्षेत्रातले नेमके गुरू कोण असं तिला विचारलं असता ती सांगते, ‘‘षण्मुखानंद हॉलला झालेल्या कार्यक्रमानंतर छायाताईने अभिनय आणि नृत्य यांचे धडे मला दिले, तर माझ्या आईने आणि पेटीवाले शंकर जावळकर यांनी गायनाचे धडे मला दिले. यानंतर याचं औपचारिक शिक्षण मला मिळावं म्हणून मला आईने साताऱयात एका शिबिरात घातलं. इथे भामिनाबाई आणि इतर गुरूंनी माझ्यावर संस्कार केले. सुरुवातीला छोटय़ा कार्यक्रमातून माझी सुरुवात झाली. नंतर हा प्रवास वेगाने सुरू झाला. या प्रवासात अनेक चढउतार मी पहिले. माझ्या आई आणि बहिणींमुळे मला दुःखाची झळ सोसावी लागली नसली तरीही त्यांच्यामुळे मला याची जाणीव कायम राहिली. आता छायाताई आजारामुळे या क्षेत्रात नाही तर विजयाताई सात वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली. याचं दुःख सांगावं तेवढं कमीच.’’
माया बोलता बोलता भावुक झाली. कलेने मायाला भरभरून दिलं असलं तरीही तिच्या मनाच्या कोपऱयात तिच्या आई आणि बहिणींसाठीची ‘माया’ कायमच असल्याचं तिच्या बोलण्यात दिसून येतं. अनेक भावना मनात दाटल्या असतानाही त्याचा मागमूसही लागू न देता माया तिच्या कंठानं अन् नृत्यानं नेहमीच रसिकमन जिंकत आल्याचं आजवरच्या तिच्या या प्रवासात पाहायला मिळालं आहे.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
सुप्रसिद्ध पटकथालेखक, गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा अशी फरहान अख्तर ची ओळख करून देणे म्हणजे त्याच्या कर्तृत्वाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९७४ रोजी झाला. दिल चाहता है या पहिल्याच चित्रपटाने त्याने आपल्या आगमनाची द्वाही फिरवली. २००१ मध्ये आलेल्या या चित्रपटाने अवघ्या तरूणाईला वेड लावले.त्यातील गाणी, तरूणांची जगण्याची पद्धत, त्यांच्या फॅशन यांचे मोठ्या प्रमाणात अनुकरण झाले. आणि फरहान अख्तरचे नाव देशभरातील तरूणाईला तोंडपाठ झाले. वेग व वेळेला त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आले. तरूणांची मानसिकता, त्यांच्या अंतर्मनात चालणारी वादळे, आधुनिकतेच्या रेट्यात होणारी संस्कृतीची गोची, त्यातून होणारी घुसमट, या सगळ्यांमुळे निर्माण झालेली जनरेशन गॅप. हे सगळं टिपून ते फरहानने दिल चाहता है मध्ये दाखवलं.तोपर्यंतचे चित्रपट केवळ वरवरचा बदल दाखवत होते. फरहानने याच्या आत घुसून ते विश्व लोकांपुढे आणले.
चाळीशीतील विधवेच्या प्रेमात पडणारा तरूण ही एरवी अशक्यप्राय वाटणारी कल्पना त्याने त्यात दाखवली. विशेष म्हणजे ती पाहणाऱ्यांनाही खटकली नाही. अन्यथा चित्रपट एवढा चाललाच नसता.पहिलाच चित्रपट असूनही फरहानने दाखवलेली समज त्याच्यातील विचारी दिग्दर्शकाची ओळख करून देणारी आहे. त्याच्या 'लक्ष्य' या चित्रपटात त्याने आयुष्यात ध्येयाची जाणीव नसल्याने आळशीपणाने व्यर्थ जीवन घालणाऱ्या तरूणास ध्येयाची जाणीव झाल्यानंतर ते साध्य करतानापर्यंतचा प्रवास दाखविला आहे.त्यानंतर शाहरूख खानला घेऊन केलेला 'डॉन' या चित्रपटाचा रिमेकही त्याच्या वेगळेपणाने गाजला. एकूणात फरहान अख्तर हा वेगळ्या वाटेचा प्रवासी आहे. त्याने आपल्या वेगळ्या हाताळणीने ठसा उमटविला आहे. त्यामुळे भविष्यात या सर्जनशील दिग्दर्शकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
भारतीय टपालखात्याच्या 'पिन कोड' प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचा जन्म २२ जून रोजी झाला.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांच्या पत्रव्यवहारासाठी १७२७ मध्ये कोलकात्यात पोस्टाची सेवा चालू केली. श्रीराम भिकाजी वेलणकर हे ब्रिटिशांच्या राज्यात आयसीएसंच्या लेखी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले तरीही त्यांना पोस्ट आणि टेलीग्राफ खात्याच्या तोंडी परीक्षेत ठरवून अनुत्तीर्ण करण्यात आले होते. कारण ह्या दोन परीक्षांमधील काळात रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्याकडून मागविलेल्या इतिवृत्तानुसार, सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना संध्याकाळी आपल्या घरी लहान मुलांना जमवून गोष्टी सांगत त्या ऐकायला श्रीराम भिकाजी वेलणकर नावाचा मुलगा जात होता अशी माहिती ब्रिटीश सरकारला कळली होती.
भारतातल्या वाढत्या पत्रसेवेचा भार सांभाळणं हे दिवसेंदिवस मोठं काम होऊ लागलं होतं. त्यातच निरनिराळ्या भाषा, अपुरे लिहिलेले पत्ते अशा इतर अडचणीही होत्या. नंतर आपल्या पोस्ट आणि टेलीग्राफ नोकरीत असताना मा.श्रीराम भिकाजी वेलणकर त्यावर उपाय म्हणून श्री. श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. श्री. श्रीराम भिकाजी वेलणकर यांना 'पिन कोड' प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं. श्रीराम भिकाजी वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासक होते. श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे १ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज दुदैवाने या श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे.
पद्मा खन्ना या ट्रेंड ड्रान्सर असून वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पंडीत बिरजू महाराज यांच्याकडे कथ्थकचे धडे गिरवले. त्यांचा जन्म १० मार्च १९४९ रोजी बनारस येथे झाला.अभिनेत्री पद्मिनी आणि वैजयंती माला यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. वयाच्या १२ व्या वर्षी त्या पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकल्या. १९६१ मध्ये 'भैय्या' या भोजपुरी सिनेमाद्वारे पद्मा यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरवात केली. १९७० मध्ये त्यांना बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळाली. 'जॉनी मेरा नाम' या सिनेमात त्यांनी कॅबरे डान्सरची भूमिका वठवली. त्यानंतर 'लोफर', 'जान-ए-बहार', 'पाकिजा', 'सौदागर', 'हेरा फेरी', 'यार मेरी जिंदगी', 'प्यार दिवाना', 'जोशिला', 'अनोखी अदा', 'रामपूर का लक्ष्मण' या सिनेमांमध्ये काम केले. पद्मा यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये कॅबरे डान्स केला. हिंदी सोबतच जवळजवळ १४ भोजपुरी सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला.याशिवाय १९७७ मध्ये 'घेर घेर माती ना चुली' या गुजराती आणि १९७८ मध्ये' आलेल्या जिन्द्रा यार दी' आणि' शेर पुत्तर' या पंजाबी सिनेमातही त्यांनी काम केले. १९८३ मध्ये आलेल्या 'देवता' या सिनेमातील 'खेळ कुणाला दैवाचा कळला' आणि १९८६ मध्ये 'माफिचा साक्षीदार'या सिनेमातील 'शमा ने जब आग. 'या गाण्यांमध्ये त्यांचा गेस्ट अपिअरन्स होता. १९८० च्या दशकात छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या 'रामायण' या मालिकेत पद्मा खन्ना यांनी राणी कैकयीची भूमिका साकारली.या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. २००४ मध्ये त्यांनी 'नाहीर हुताल जया' या भोजपूरी सिनेमाचे दिग्दर्शन केले. दिग्दर्शक जगदीश सिडना यांच्यासोबत पद्मा खन्ना विवाहबद्ध झाल्या.त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लग्नानंतर मा.पद्मा खन्ना या युएसए मधील न्यू जर्सी येथे स्थायिक झाल्या आहेत. तेथे त्या डान्स अकॅडमी चालवतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/shared?ci=oHntWZBPB1Y
https://www.youtube.com/shared?ci=y40aBf3QxLA
Copyright © 2025 | Marathisrushti