आज १२ सप्टेंबर... हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व यांची पुण्यतिथी
सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८६ रोजी झाला.
‘नर करनी करे तो नर का नारायण हो जाए’ या म्हणीचे प्रतीक म्हणजे ‘सवाई गंधर्व’. रामभाऊंचा आवाज लहानपणी गोड व हलका होता. त्यांना व घरातील मंडळींना गाण्याची आवड होती. वडील स्वत: तबल्याची साथही करत असत. घरातील आर्थिक सुबत्ता व सर्वांना असलेली गाण्याची आवड या अनुकूल परिस्थितीमुळे लहानपणी रामभाऊंना कुंदगोळ येथे बळवंतराव कोल्हटकर यांच्याकडे गाणे शिकण्याची संधी मिळाली. त्यांना त्यात सुमारे पंच्याहत्तर ध्रुवपदे व पंचवीस तराणे मिळाले. रामभाऊंचे वडील मुळचे कुळकर्णी. त्यामुळे मुलाने जहागीरदारांकडील वहिवाटदारी व पाटीलकी पुढे सांभाळावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु रामभाऊंचा जीव गाण्यात अडकला होता. लहानपणी जरी त्यांचा आवाज गोड व हलका होता, तरी ते वयात आल्यावर त्यांचा आवाज फुटला व तो बोजड झाला. त्यावर उपाय म्हणजे, चांगल्या गुरूंकडून तालीम मिळणे हाच होता.
त्या सुमारास म. अब्दुल करीमखाँसाहेब मिरज येथे येऊन स्थायिक झाले. खाँसाहेबांचे गाणे सुरेल व भावनाप्रधान. रामभाऊंना खाँसाहेबांकडे शिकण्याची ओढ निर्माण झाली. तेव्हा मोठ्या प्रयत्नांती वडिलांचे मन वळवून रामभाऊ अब्दुल करीमखाँसाहेबांकडे गाणे शिकण्यास गेले. आवाज फुटल्यामुळे व बोजड झाल्यामुळे खाँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊंनी त्यांचा स्वत:चा आवाज मोठ्या कष्टाने ताब्यात आणला. खाँसाहेबांकडे सुमारे सात-आठ वर्षे तालीम घेतल्यानंतर बीनच्या अंगाने कसे गावे याचे तंत्र रामभाऊंना अवगत झाले व त्यातून त्यांनी स्वत:ची विशेष आक्रमक गायकी बनवली. पुढे, सुमारे १९०८ पासून, त्यांनी संगीत नाटकांमध्ये कामे केली. त्यांना ‘नाट्यकला संगीत प्रवर्तक मंडळी’ या संस्थेतर्फे होणाऱ्या ‘सौभद्र’ नाटकातील सुभद्रेची भूमिका मिळाली. त्यांच्या सभ्य, सौम्य, प्रतिष्ठित व सुंदर व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची सुभद्रेची भूमिका लोकप्रिय होऊ लागली. मुख्य म्हणजे त्यांचा गाण्याचा ढंगही वेगळा व प्रेक्षकांवर छाप पाडणारा असायचा. एके दिवशी अमरावतीला ‘सौभद्र’चा प्रयोग चालू असताना त्या प्रयोगाला हजर असलेले पुढारी व वऱ्हाडचे अनभिषिक्त राजे दादासाहेब खापर्डे यांनी रामभाऊंच्या भूमिकेवर व गाण्यावर खुश होऊन ‘हे तर सवाई गंधर्व’ असे उत्स्फूर्तपणे उद्गार काढले! तेव्हापासून लोक रामभाऊ कुंदगोळकरांना ‘सवाई गंधर्व’ या नावाने ओळखू लागले.
सवाई गंधर्वांनी १९०८ ते १९३१ पर्यंत संगीत नाटकांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘विनोद’ या नाटकातील त्यांचे वामनरावाचे काम; तसेच, ‘मिराबाई’ नाटकातील दयानंदाची भूमिका व ‘सुखसाधना भजना गणा’ हे पद खूप गाजले. त्यांनी नाट्यजीवनाला १९३१ नंतर पूर्णविराम दिला. त्यानंतर ते फक्त खासगी बैठकीत गात असत. रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीला सामील झाले आणि लवकरच मराठी रंगभूमी क्षेत्रामधे त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. बालगंधर्व (उर्फ नारायण राजहंस) यांच्याप्रमाणे त्यांना देखील लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले.
त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेणार्याह आणि अधिकच उजळविणार्या. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या त्यांचे शिष्य यापैकी काही नावे म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगुबाई हंगल, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी ह्यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरविण्यास सुरवात केली.
सवाई गंधर्व यांचे १२ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया / thinkmaharashtra
September 12, 2016
छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी झाला.
संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराज यांचे वय अवघे १९ वर्षांचे होते. राजाराम महाराजांच्या वाट्याला फक्त तीस वर्षांचे आयुष्य आले. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर विस्कटलेले स्वराज्य सावरण्याचे महान कार्य राजाराम महाराजांनी केले. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मराठा साम्राज्याला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. मोगलांकडे गेलेल्या मराठा सरदारांना मराठ्यांच्या राज्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव करून देताना ते म्हणत, ""हे मऱ्हाठे राज्य तुम्ही आम्ही मऱ्हाठे लोकी इनामासी खता (लबाडी) न करिता मराठा धर्माची दुरे (ईर्ष्या-अभिमान) धरून स्वामिकार्य करावे.'' शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा धर्माचे रक्षण करणे ही तुमची- माझी सर्वांची प्रामाणिक जबाबदारी आहे, याची जाणीव त्यांनी या सरदारांना करून दिली.
राजाराम महाराजांनी सटवाजी डफळे, नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने, गणोजी शिर्के इत्यादी मोगलांकडील मराठा सरदारांना स्वराज्यात परत आणण्याचे काम केले. नावजी बलकवडे, विठोजी करके, बहिर्जी घोरपडे, हणमंतराव निंबाळकर, गंगाजी बाबर, अमृतराव निंबाळकर, गिरजोरी यादव, कृष्णाजी सावंत, चांदोजी व नागोजी पाटणकर, बडोजी ढमाले, मकाजी देवकाते, नामाजी गायकवाड इत्यादी सरदार या काळात नावारूपाला आले.
राजाराम महाराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे पराक्रमी सरदार उदयाला आले. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले. राजाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले होते, ""राजाराम मोगलशाही पालथी घालील.'' त्यांचा हा विश्वास राजाराम महाराजांनी सार्थ ठरविला. दिल्ली जिंकण्यासाठी घोरपडे बंधूंना त्यांनी प्रोत्साहन दिले, तर कृष्णा सावंत यांना फौज देऊन उत्तेरकडे पाठवले. नर्मदा पार करून लष्करी मोहीम काढणारे कृष्णा सावंत हे पहिले मराठा वीर होते. राजाराम महाराजांनी जिंजीवरून महाराष्ट्रातील लष्करी मोहिमांसाठी वेळोवेळी आर्थिक मदत पाठवली. विशेषतः १६९० मध्ये एक लाख होनांचा खजिना त्यांनी रायगडाकडे पाठवला होता.
स्वराज्याची अर्थव्यवस्था भक्कम असावी याकडे त्यांचे लक्ष होते. अर्थव्यवस्था, लष्करी यंत्रणा, प्रशासन यावर त्यांची उत्तम पकड होती. जिंजीच्या वेढ्यात असताना मोगलांचे संकट टाळण्यासाठी झुल्फिकार खानाबरोबर त्यांनी अंतःस्थ मैत्री प्रस्थापित केली, राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून "शिवचरित्र' लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले. राजाराम महाराज हे पराक्रमी, निर्भीड, मुत्सद्दी, समंजस, धोरणी, प्रजावत्सल राजे होते. मोगलांशी कडवी झुंज देत स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.
१६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले होते. महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी १६९८ मध्ये धनाजी जाधव, परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली. पण या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली, मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले.
छत्रपती राजाराम महाराज यांचे ३ मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 24, 2022
हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
April 23, 2019
सध्या नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध असत नाहीत. त्यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक : विक्रम गोखले!
विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना बाईंकडून मिळाले. ‘बॅरिस्टर’ ही त्याची उत्तम फलश्रुती.
विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. मा.विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले.
जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’सारख्या सिनेमातली का असेना. रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्या संदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी आहेत. म्हणूनच रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवले नाहीत.
दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला आहे. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात. विक्रम गोखले यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणारा पुरस्कार मिळाला आहे. मा.चंद्रकांत गोखले यांनाही भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 14, 2017
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या सुनील अभ्यंकर यांना नाटकात भूमिका करणेच अधिक आव्हानात्मक वाटते. अभिनयाचा खरा कस हा रंगमंचावरच लागतो असे त्यांचे मत आहे. त्यांच्या वाट्याला आता पर्यंत विनोदी अंगाने जाणाऱ्या भूमीकाच आल्या असल्यातरी त्यांना गंभीर भूमीका करणेही आवडते. एका गंभीर भूमिकेच्या प्रतीक्षेत ते आहेत. तसेच खलनायकी ढंगाची भूमिका करणेही त्यांना आवडते. मात्र अद्याप त्यांना तशी संधी मिळालेली नाही.
June 17, 2022
त्यांच्या प्रत्येक बॅनर मागे एक इतिहास होता, कहाणी होती. रामजोशी चित्रपटाच्या वेळी बाजारात मांजरपाट हे कापड मिळत नव्हते, तेव्हा शांतारामबापूनी मागचा पुढचा विचार न करता सर्व बॅनरसाठी रेशमी तागे मागवले. व रामजोशी चित्रपटाचे बॅनर रेशमी कापडावर रंगवले गेले. त्यावेळी कलायोगीनी रंगवलेला पेशव्यांचा दरबार अतीशय सुंदर रीत्या रेखाटला होता. पुढे मुंबईचे निर्माते पैसे घेऊन मागे लागले असताही कांबळे कोल्हापूरला गेले. तेथे त्यांनी सर्वस्वी पेंटींगला वाहून घेतले.
July 21, 2021
ऐश्वर्या नारकर या माहेरच्या पल्लवी आठल्ये. त्यांचा जन्म ८ डिसेंबर रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे पहिलं व्यावसायिक नाटक होतं ‘गंध निशिगंधाचा’! त्यात प्रभाकर पणशीकर, रेखाताई कामत, अविनाश नारकर, शरद पोंक्षे,अशी तगडी स्टारकास्ट होती. त्या नाटकाच्या दरम्यानच अविनाश नारकर यांच्या बरोबर प्रेम जमले. यानंतर त्यांनी विवाह केला.
तंबाखू विक्रीची नारकर कुटुंबाची लोअर परळ आणि डिलाइल स्ट्रीटवर दोन दुकानं होती. ३५० चौ. फुटांच्या जागेत, तेरा-चौदा जण राहत होते. अवीनाश नारकर घरातील सर्वात लहान. त्या वेळी अविनाश नारकर नाटक, चित्रपट, मालिका व डिबग करायचे. अनेक इंग्रजी मालिकांना त्यांनी हिंदी, मराठी आवाज दिलाय. ‘अल्लाद्दीन’ मालिकेतला इयागोचा आवाज अवीनाश नारकर यांचा आहे.
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या दोघांकडे मराठी सिनेसृष्टीतील अगदी सोज्वळ कपल म्हणून पाहिलं जातं. अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये हे दोघ आहेत. तसेच मालिकांमध्येही यांनी काम केली आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी या सुखांनो या, माझे मन तुझे झाले या मालिका, गंध निशिगंधाचा, तुमच्या आमच्या घरात, आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे ही नाटकं, तर बाबांची शाळा, सून लाडकी सासरची, समांतर, चॅम्पियन्स, यलो असे चित्रपट केले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 8, 2017
सिडने बार्न्स वयाच्या 21 व्या वर्षी 1894 मध्ये जलद गोलंदाज म्हणून नावारूपास येत होते तेव्हा ते स्टॅफोर्डशायर काउंटी क्रिकेट क्लबमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करू लागले. सिडने बार्न्स यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो 13 डिसेंबर 1901 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 26 धावा केल्या आणि 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या
April 26, 2021
आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैद्यानिक दिले आहेत. अश्या थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ तर आहेतच पण उत्तम लेखकही आहेत. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकेच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत. जयंत विष्णू नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.
July 19, 2021
रोशनलाल नागरथ ऊर्फ "रोशन" यांनी लहानपणीच प्रसिद्ध गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर बालगायक म्हणून संपूर्ण भारत दौरा केला. त्यांचा जन्म १४ जुलै १९१७ रोजी गुजरानवाला येथे झाला. पुढे रविशंकर, अली अकबर खाँ, तिमिरबरन भट्टाचार्य यांचे गुरू असलेल्या उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी वर्षभर काढले. पण अल्लाउद्दीन खाँ साहेबांची त्यांच्या शिकवण्याव्यतिरिक्त आठ तास रियाझ करण्याची कडक शिस्त न मानवल्याने पळ काढला. त्यानंतर लखनौच्या मॉरिस संगीत महाविद्यालयातून संगीतात एम. ए. केले आणि दिल्ली रेडिओ स्टेशनवर पियानोवादक म्हणून नोकरी सुरू केली. बडोदा रेडिओ स्टेशन वर नोकरी करत असताना प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आणि गीतकार केदार शर्मा यांचे लक्ष रोशनकडे गेले आणि त्यांच्या कंपनीमध्ये रोशन संगीतकार स्नेहल भाटकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागले.
१९४९ मध्ये "नेकी और बदी" चित्रपटाच्या वेळी रोशनच्या काही चाली आवडल्याने त्यांनी स्नेहल भाटकरांना तीन चार महिने रजा देऊन त्या चित्रपटाचे काम रोशन यांना दिले. चित्रपट आणि गाणी सपशेल अयशस्वी झाली. रोशन यांच्या १९४९ ते १९६७ अशा आपल्या कारकीर्दीत आपल्या पहिल्या १९४९ ते १९६० काळात अभिजात, शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी दिली. मात्र हे चित्रपट आणि गाणी गाजली नाहीत. या काळात आलेले मल्हार, अनहोनी, नौबहार, रागरंग, आगोश, बराती, रंगीन रातें, मधु, अजी बस शुक्रिया, अश्या चित्रपटातली गाणी ऐकली तर हे प्रकर्षाने लक्षात येते. आणि १९६० ते १९६७ काळात म्हणजेच दुसऱ्या भागावर मुख्यतः मुसलमानी संगीताचे वर्चस्व राहिले आहे. बरसात की रात, ताजमहल, बाबर, नूरजहाँ, बेदाग, वगैरे चित्रपटातली गाणी ऐकली तर हे लक्षात येईल. अर्थात आरती, ममता, भीगी रात असे मुसलमानी संगीत नसलेलेही चित्रपट या काळात आले. नवीन कवींना संधी देणारा संगीतकार अशी रोशन यांची प्रतिमा होती. नुसतेच नवीन नाही तर जुन्या काळातले "हम भोर के दिये है बुझतेही जा रहे है" असे अस्ताला चाललेल्या पिढीचे तनवीर नकवी, डी. एन. मधोक, खुमार बारा बंकवी, नक्षब यांच्यासारखे, त्या काळातले शैलेंद्र, मजरूह, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण यांच्यासारखे प्रस्थापित, इंदीवर, आनंद बक्षी, नक्ष ल्यालपुरी यांच्यासारखे संघर्ष करणारे आणि पुढे प्रस्थापित झालेले, सत्येंद्र, कैफ इर्फानी, उद्धवकुमार, वीर मोहंमद पुरी, शिवकुमार, राहिल गोरखपुरी असंख्य होतकरू गीतकार तसेच गीतकार नसूनही हौस म्हणून एखादे गाणे लिहिणारी संगीतकार उषा खन्ना यांच्यासारखे सर्व प्रकारचे गीतकार या काळात रोशनच्या संगीतात दिसतात.
इंदीवर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते" मी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून स्थिर झालो तो संगीतकार रोशनमुळे. रोशन आम्हाला तुमचे गीत हे रवींद्रनाथांच्या कवितेसारखे झाले पाहिले असे सांगत असे, एका एका गाण्याचे दहा दहा अंतरे लिहून घेऊन त्यातले सर्वोत्तम तीन अंतरे निवडत असे. "त्याच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे कवी आणि कवितांमधील विविधता. जरी संगीतकार रोशनचे नाव घेतल्यावर साहिर लुधियानवी आणि मजरूह सुलतानपुरी या दोनच गीतकारांची नावी प्रामुख्याने समोर येत असली तरी ५३ चित्रपटांसाठी रोशन यांनी ५२ गीतकारांबरोबर काम केले. रोशन हे संगीतकार राजेश रोशन व अभिनेते राकेश रोशन यांचे वडील व अभिनेते ऋतिकचे आजोबा. रोशन यांचे १६ नोव्हेंबर १९६७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
रोशन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=kh8PqtYUQCc
https://www.youtube.com/watch?v=EECgvIxsHCs
https://www.youtube.com/watch?v=q1RgtdfWTV0
November 27, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti