(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • ज्येष्ठ कला व नाटय़समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी

    मराठी व इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे कामगिरी केली. त्यांचा जन्म २१ मे १९२८ रोजी झाला. कला व नाटय़ क्षेत्रातील आस्वादपर समीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. इंग्रजीमध्ये एमए पूर्ण केल्यानंतर सन १९५१ मध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी लंडनच्या भारतीय दूतावासात रुजू झाले. दोन वर्षांतच ते भारतात परतले आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये १९५६ पर्यंत त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. त्यानंतरची चार वर्षे त्यांनी जाहिरातींचे कॉपीरायटिंग केले. प्रामुख्याने त्यांनी शिल्पी अॅयडव्हर्टायझिंगसाठी कॉपीरायटर काम पाहिले. याच काळात त्यांनी फ्री प्रेस जर्नल साठी सहसंपादक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. १९५९ ते १९६१ त्यांनी फ्री प्रेससाठी काम पाहिले तर १९६१ ते ६८ या काळात त्यांनी फिनान्शिअल एक्स्प्रेससाठी काम पाहिले. कलासमीक्षक या नात्याने त्यांनी इंग्रजी व मराठीत भरपूर लिखाण केले. साहित्य, चित्रकला, नाटक, चित्रपट आदी विविध कलाप्रकारांचा मागोवा घेताना याच काळात येऊ पाहणाऱ्या नवनव्या बदलांचा ते मनपूर्वक पाठपुरावा करीत असत. या विषयीचे लेखन त्यांनी भारतातील बहुतेक अग्रगण्य दैनिक व नियतकालिकांत सातत्याने केले. १९९६ साली त्यांच्या कलासमीक्षणाचा गौरव करणारे एक जंगी प्रदर्शन जहांगीर कलादालनात पार पडले. त्यावेळेस अनेक ज्येष्ठ- श्रेष्ठ कलावंतांनी त्यांच्या कलाकृती या प्रदर्शनासाठी त्यांच्या गौरवार्थ देऊ केल्या होत्या. त्यात एम. एफ. हुसेन, अकबर पदमसी यांचाही समावेश होता. याच प्रदर्शनप्रसंगी नाडकर्णीनी युवा कलाकांरांसाठी ज्येष्ठ कलावंतांच्या नावाने सुमारे १३ पारितोषिके जाहीर केली होती.

    त्यांच्या कलासमीक्षण लेखांना जगभर चांगला प्रतिसाद मिळाला. फ्रान्स सरकारने कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन १९८६ साली तर ब्रिटिश सरकारने १९९४ साली त्यांना गौरवचिन्ह बहाल केले. महत्त्वाचे म्हणजे शिल्पकलेच्या प्रांतात नवकलेचे वारे आणण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जगप्रसिद्ध शिल्पकार हेन्री मूर याच्या जन्मशताब्दी निमित्ताने ब्रिटिश सरकारने संपूर्ण वर्षभरासाठी एका महत्त्वपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीमध्ये नाडकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना त्यासाठी सरकारने खास ब्रिटनमध्ये पाचारण केले होते. आर्टिस्ट्स सेंटर व बॉम्बे आर्ट सोसायटी या कलाक्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांना फ्रेंच सरकारतर्फे ‘अक्षरांचे शिलेदार’ हा किताब बहाल करण्यात आला होता.

    ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी समीक्षक या नात्याने नियतकालिकांत जसे विपुल लिखाण केले; तसेच साहित्याच्या विविध प्रकारांतही त्यांच्या पुस्तकांनी आगळे स्थान मिळवले. पाऊस, भरती, चिद्घोष, प्रस्थान हे कथासंग्रह, दोन बहिणी, कोंडी, नजरबंदी, वलयांकित या कादंबऱ्या आदींबरोबरच विख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यावरील ‘अनवाणी’ तसेच पिकासो, गायतोंडे, डी. डी. दलाल व हिचकॉक यांच्यावरील चरित्रग्रंथांचे लेखनही त्यांनी केले. अश्वत्थाची सळसळ, अभिनय, प्रतिभेच्या पाऊलवाटा, प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप आदी समीक्षा ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. ‘विलायती वारी’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. बालगंधर्वावरील इंग्रजी चरित्राचे लेखन करून त्यांनी मराठीतील या बुजुर्ग कलावंताची जागतिक पटावर ओळख करून दिली.
    ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे २३ डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • गझलकार प्रदीप निफाडकर

    ‘द हिंदू’ या निष्पक्ष दैनिकाने ज्यांचा उल्लेख ‘गझलसम्राट सुरेश भट यांची मशाल घेऊन पथदर्शक बनलेले गझलकार,’ असा केला, झी चोवीस तास या वाहिनीचे व झी मराठी दिशा या आठवडापत्राचे मुख्य संपादक विजयजी कुवळेकर ज्यांना ‘भट यांचे अंतरंग शिष्य’ म्हणाले, ते गझलकार प्रदीप निफाडकर. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता- स्वप्नमेणा. ज्याची आता तिसरी आवृत्ती संपली आहे. त्यांनी ‘गझल’ या काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव ‘गझलदीप’ आहे. त्याचीही पहिली आवृत्ती संपली आहे.

  • अभ्यासू दिग्दर्शक – विजू माने

    विजू माने हे मराठी सिनेइंडस्ट्रीतलं जुनं-जाणतं नाव. एक अभ्यासू दिग्दर्शक म्हणून विजूची ओळख आहे. माझी आणि विजूची ओळख साधारणपणे बारा-पंधरा वर्षांपूर्वीची. विजूचा तेव्हा ‘डॉटर’ नावाचा सिनेमा येऊ घातला होता. एकदा वृत्तसंकलनाच्या निमित्ताने ही ओळख झाली आणि दिवसागणिक ती गुणोत्तराने वाढतच गेली.

  • अभिनेते सतीश दुभाषी

    अंमलदार, शांतता कोर्ट चालू आहे, नटसम्राट, आणि सूर राहू दे आणि सर्वात गाजलेले म्हणचे पु लं देशपांडे यांचे ती फुलराणी या नाटकांमधील त्यांचे काम अजरामर आहे.

  • कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रीकर

    साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला…

  • मराठी लेखक दिगंबर बाळकृष्ण मोकाशी उर्फ दि.बा. मोकाशी

    दि.बा. मोकाशी हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. मराठी नवकथेत मोलाची भर घालणाऱ्या प्रारंभीच्या आघाडीच्या कथाकारांत त्यांची गणना होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९१५ रोजी उरण येथे झाला. दि. बा. मोकाशी हे १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव. तीन कादंबऱ्या, तीन ललित व प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तके असा त्यांचा भरगच्च साहित्यसंभार आहे. लामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ' पहिली पावले' ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.

    संध्याकाळचे पुणे हे माणूस साप्ताहिकात ७९-८० च्या कालखंडात प्रसिध्द झालेले, पुण्यातील सांस्कृतिक हालचालींचे दर्शन घडवणारे लेख.पुण्यात रोज झडणाऱ्या उपक्रमांबद्दल, व्यक्तींबद्दल आणी संस्थांबद्दल अत्यंत रसिकतेने लिहिलेले हे लेख आहेत. प्रसन्नता आणि निर्व्याजता, चितनशीलता आणि ताजेपणा ही मोकाशी यांच्या साहित्यातील वैशिष्ट्ये या लेखांमध्ये आढळतील.

    आम्ही मराठी माणसं हा, १३ वैशिष्ट्यपूर्ण कथांचा हा संग्रह दि.बा.मोकाशींच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. आपल्या अवतीभवतीच्या माणसांचे नितळ विश्व सरळ साध्या पध्दतीने उभे करावे, ते नाट्यपूर्ण आणि शैलीदार पध्दतीने मांडण्यात त्यामागच्या वास्तवाची हानी होते असे त्यांना वाटे. या संग्रहातील हलक्या-फुलक्या कथा सामान्यांच्या सुप्तासुप्त भावनांचे खेळकर भूमिकेतून चित्र रेखाटणाऱ्या आहेत.

    त्यांच्या निधनानंतर साहित्य अकादमीने १९८८ मध्ये "दि. बा. मोकाशी यांची कथा " (निवडक कथांचा संग्रह) हे पुस्तक प्रसिद्ध केले. पण त्याच्या प्रस्तावनेत मोकाशींच्या इतर साहित्याचा परामर्श घेताना त्यांनी ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ या कादंबरीचा मात्र उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदार्शनाखाली सौ. माधुरी पणशीकर यांनी मोकाशी यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट घेतली. दि.बा. मोकाशी यांनी लामणदिवा, वणवा मिळून ११ कथासंग्रह. देव चालले, आनंद ओवरी, या कादंबऱ्या, तसेच पालखी, अठरा लक्ष पावलं अशी प्रवासवर्णने, संध्याकाळचे पुणे (ललित), रेडिओदुरुस्ती व्यवसाया-बद्दलचे पुस्तक व बालसाहित्यदेखील त्यांनी लिहिले. ‘अठरा लक्ष पावलं’मध्ये त्यांनी प्रवासवर्णनातून समाजजीवनाचा शोध घेतला. त्यांच्या ‘आनंद ओवरी’ या संत तुकारामाच्या जीवनावरील कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ‘ट्विटर’वर ठेवले आहे. त्यांच्या इतरही अनेक पुस्तकांची हिंदी व इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या पालखी या पुस्तकातून पंढरीच्या वारीवर विपुल लेखन केलंय. खरे म्हणजे "पालखी"च्या पार्श्वभूमीवर एखादी कादंबरी लिहावी अशी मोकाशींची फार इच्छा. त्यांच्या कल्पनेतल्या कादंबरीतील एका वारकर्यााच्या डॉक्टर मुलाला, वडिलांच्याऐवजी, वारीला जावं लागतं. पालखी सुरू होते तेव्हा कादंबरी सुरू होते आणि पालखीबरोबरच ती संपते. ही कादंबरी लिहिणे मोकाशींना शक्य झाले नाही. मात्र पालखीबाबतचे आकर्षण मनात मात्र कायम राहिले.

    एक महिना व्यवसाय बंद करून, महिन्याभरासाठी संसाराची रक्कम व पालखीबरोबरचा खर्च यांची तरतूद करून जावे लागेल या कारणाने काही वर्षे पालखीला जाण्याचे त्यांनी टाळले. मोकाशींच्याच भाषेत सांगायचे तर "यंदा तगमग अतिशय वाढली. काळे ढग आले. पाऊस कोसळू लागला. हवा कुंद झाली. वारकरी दिसू लागले. एके दिवशी लौकर दुकान बंद करून घरी आलो आणि जाहीर केलं - काही झालं तरी यंदा पालखीला जाणार!" ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ ही त्यांची १९७८ मध्ये प्रकाशित झालेली चरित्रात्मक कादंबरी. त्यांच्या या कादंबरीची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही. जानेवारी २०१४ मध्ये त्यांची कन्या ज्योती कानेटकर यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर अमेझॉनवर टाकले आहे. कामसूत्र हे पुस्तक कसं आहे ते अनुभवायचं असेल तर दि बा मोकाशी यांची वात्स्यायन ही कादंबरी वाचावी.

    दि. बा. मोकाशी यांचे २९ जून १९८१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर

    प्रभाकर पणशीकर उर्फ पंत यांचे नाव उच्चारताच डोळयांसमोर अनेक व्यक्तिरेखा उभ्या राहतात. त्यांचा जन्म १४ मार्च १९३१ रोजी झाला. लखोबा लोखंडे, औरंगजेब, प्रो. विद्यानंद अशा कितीतरी भूमिका पंतांनी आपल्या अभिनय सामर्थ्याने अजरामर करून ठेवल्या आहेत. प्रल्हाद केशव अत्रेलिखित 'तो मी नव्हेच' ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे मा.प्रभाकर पणशीकर हे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. 'इथे ओशाळला मृत्यू' ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिकादेखील पंतानी अजरामर केली. जवळजवळ ५० वर्षे मा.प्रभाकर पणशीकर यांनी रंगभूमीची इमाने-इतबारे सेवा केली. घरच्यांचा विरोध पत्करूनही पंत या क्षेत्रात उतरले होते. 'हा तोंडाला रंग फासून घरच्यांच्या तोंडाला काळं फासतो', असा घरच्यांनी आरोप करूनही पंतांचे चित्त विचलीत झाले नाही. सुरुवातीला मो. ग. रांगणेकर यांच्या 'नाटयनिकेतन' संस्थेत पंत पडेल ते काम करत राहिले. एखाद्या कलाकाराच्या गैरहजेरीत पंतांना त्या कलाकाराची भूमिका करणे भाग पडायचे. पण ह्या भूमिका अगदीच नगण्य होत्या आणि त्यामुळे त्या भूमिका करणारे प्रभाकर पणशीकर लोकांच्या लक्षात राहणे शक्यच नव्हते. तरीही पोटापाण्याकरता पंत पडेल ते काम करत राहिले. 'राणीचा बाग', 'कुलवधू' यांसारख्या नाटकांतून भूमिका केल्यावर मात्र पणशीकर नाटयनिकेतन मध्ये चांगलेच स्थिरावले. 'तो मी नव्हेच' हे आचार्य अत्रे लिखित नाटक जेव्हा नाटयनिकेतन संस्थेतर्फे करायचे ठरले. तेव्हा नाटकातील प्रमुख भूमिका करणारा नट हा संस्थेतला असावा म्हणजे तो आपल्या आवाक्यात राहील, अशा धोरणी भूमिकेतून पणशीकरांनीच ही भूमिका करावी असा रांगणेकरांनी हट्ट धरला. आचार्य अत्रेंना सुरुवातीला हा निर्णय मान्य नव्हता. पण रांगणेकरांच्या हट्टापुढे अत्रेंचे काही चालले नाही आणि ती भूमिका पणशीकरांना मिळाली. नंतर मात्र 'तो मी नव्हेच' मधला खलनायकी लखोबा लोखंडे पणशीकरांनी असा काही रंगवला की, लखोबा लोखंडे आणि पणशीकर यांचे घट्ट नातेच बनले. प्रभाकर पणशीकरांशिवाय 'तो मी नव्हेच' या नाटकाचा विचार करणे त्या काळीही कोणाला शक्य झाले नाही. 'तो मी नव्हेच'चा फिरता रंगमंच ही पंतांची कल्पना. भूतकाळातील कोणतीही घटना ते इतक्या तपशिलवार सांगत की जणू त्या घटना कालपरवाच घडल्या असाव्यात. बरोबरीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारे अशी पंतांची ख्याती होती. नाटकांच्या निमित्ताने त्यांनी अख्खा महाराष्ट्र पालथा घातला होता. वसंत कानेटकरांचं 'इथे ओशाळला मृत्यू' हे नाटक त्यांनी संभाजीला न्याय मिळावा याकरता लिहिलं. पण प्रत्यक्षात जेव्हा ते रंगभूमीवर उभं राहिलं तेव्हा मात्र नाटकाचा पूर्ण प्रकाशझोत औरंगजेबाच्या भूमिकेतील पंतांवर स्थिरावला. संभाजीपेक्षाही त्या नाटकात औरंगजेब प्रभावी ठरू लागला. याविषयी त्यांना विचारताच ते म्हणत की, औरंगजेबाची भूमिका करताना त्या भूमिकेचा प्रत्येक पैलू समजून घेऊन तो लोकांसमोर यावा याकरता मी प्रयत्न केला होता. 'अश्रूंची झाली फुले' या नाटकातील प्रो. विद्यानंद मा.पणशीकरांनी खूपच सुंदर साकार केला होता. ज्या काळी नाटकांचे दौरे करणं आजच्याइतकी सुखाची बाब नव्हती तेव्हापासून आत्तापर्यंत पंतांनी 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचे तब्बल ११११ प्रयोग केले आहेत. प्रा. विद्यानंद याची मानसिक द्विधावस्था खूप चांगल्या प्रकारे सादर केली होती. तसेच 'कटयार काळजात घुसली'च्या निमित्ताने संगीत नाटकाचं पुनरुज्जीवन हेही पंतांचं रंगभूमीला दिलेलं कॉन्ट्रीब्युशन.
    'तो मी नव्हेच'च्या अभूतपूर्व यशानंतर पणशीकरांनी मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या साथीने 'नाटयसंपदा' ही नाटय संस्था स्थापन केली. 'अश्रूंची झाली फुले', 'कटयार काळजात घुसली', 'इथे ओशाळला मृत्यू', 'थँक्यू मि. ग्लाड', 'मला काही सांगायचंय' यांसारखी नाटकं त्यांनी नाटयसंपदा या आपल्या संस्थेद्वारे रंगभूमीवर आणली. 'कट्यार काळजात घुसली' हे संगीत नाटक नाट्यरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दाखवली. चार मराठी चित्रपट, चार मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली. त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे राज्य रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. मा.प्रभाकर पणशीकर यांचे १३ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.

    प्रभाकर पणशीकर यांची नाटके
    मोहिनी, मदनाची मंजिरी, अमृत झाले जहराचे, सुवर्णतुला, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू. कट्यार काळजात घुसली, इथे ओशाळला मृत्यू, मला काही सांगायचंय, वीज म्हणाली धरतीला, संत तुकाराम, तो मी नव्हेच, विकत घेतला न्याय, महारामी पद्मिनी, लागी करेजवा कटार (हिंदी), होनाजी बाळा, बेईमान, प्रश्नक नाजूक आहे, तो राजहंस एक, त्या कातरवेळी, तीन लाखांची गोष्ट, थॅंक यू मि. ग्लाड, तुझी वाट वेगळी, राजसन्यास, भटाला दिली ओसरी, पुत्रकामेष्टी, मी मालक या देहाचा, निष्पाप, अवनु नानल्ला (कानडी-तो मी नव्हेच), जिथे गवतास भाले फुटतात, किमयागार, घर अण्णा देशपांडेंचं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट

  • ज्येष्ठ साहित्यकार सुमती क्षेत्रमाडे

    त्यांचा जन्म ७ मार्च १९१३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील झापडे या गावी झाला.

    ज्या काळात डॉक्टर आणि साहित्य यांचा फारसा संबंध येत नव्हता आणि साहित्यातही डॉक्टरेट मिळविणे ही तशी दुरापास्तच गोष्ट होती, त्या काळात डॉक्टर आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी ठरणारी ही लेखिका. व्यक्तीचे आणि समाजाचे जीवन कथांमध्ये जवळून हाताळता येते असा वैद्यकीय व्यवसाय त्यांनी स्वीकारलेला होता. मात्र, त्याचबरोबर मानवी वर्तनाचे अचूक ज्ञान, मानवी वर्तनाचे सूक्ष्म निरीक्षण आणि सहजसंवेदनशील मन यांमुळेच त्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच साहित्यातही यशस्वी ठरल्या.

    त्यांचे वडील बाळकृष्णपंत रेगे हे रेव्हेन्यू खात्यात इन्स्पेक्टर होते. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव रेगे, मात्र क्षेत्रमाडे हा त्यांना मिळालेला किताब होता. सुमतीबाईंनी आपल्या वडिलांप्रमाणेच ही पदवी स्वीकारली होती. सुमती क्षेत्रमाडे यांचे शालेय शिक्षण नाशिकला झाले. शालेय जीवनात त्या नेहमी प्रथम क्रमांकावरच असत. नाशिक सेंटरमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणार्या. त्या पहिल्याच विद्यार्थिनी होत्या.

    शाळेत असताना त्यांनी अनेक वेळा मासिकांमधून, हस्तलिखितांमधून लिखाण केले होते. मॅट्रिकला त्या मराठी विषयात सर्वप्रथम आल्याने स्वाभाविकपणे त्यांनी कलाशाखेकडे प्रवेश घ्यावा, असेच सर्वाचे म्हणणे होते. मात्र, डॉक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न असल्याने त्यांनी शास्त्रशाखेत प्रवेश घेतला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण पुण्यात झाले. घरच्या गरिबीमुळे त्यांचे सर्व शिक्षण शिष्यवृत्तीवरच झाले. आई वारल्याने लहान भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर लहान वयातच पडली. म्हणून एम.बी.बी.एस.पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ बडोदा संस्थानात नोकरी केली. १९४८ साली त्या पुढील शिक्षणासाठी आयर्लंडला गेल्या.

    १९५० साली परत येऊन त्यांनी कोल्हापूरला स्वतःचा दवाखाना थाटला. याच काळात त्यांची पहिली कथा ‘वादळ’ ही ‘स्त्री’ मासिकात प्रकाशित झाली होती. १९४७ साली झालेल्या किर्लोस्कर कथास्पर्धेत त्यांना दुसरा पुरस्कारही मिळालेला होता. बडोद्याला सयाजीराव महाराजांकडे त्या नोकरीला होत्या. ही त्यांची नोकरी फिरतीची होती. या काळात त्या बडोद्यातील दभोई, पादरा, कडी, अमरोली, नवसारी या ठिकाणी फिरल्या. त्यांच्या बडोदा वास्तव्यात त्यांचा मालतीबाई दांडेकरांशी परिचय होऊन लेखनप्रेम अधिक वाढीस लागले. गुजरातमध्ये असताना त्यांनी आपली पहिली ‘आधार’ ही कादंबरी लिहायला घेतली. त्यामुळेच या कादंबरीच्या स्थलकालनिर्मितीवर गुजरातच्या वातावरणाचा, चालीरीतींचा, परंपरांचा फार मोठा प्रभाव आढळतो. या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना लाभली आहे.

    खांडेकरांना त्या गुरुस्थानी मानत असत. ‘आधार’ ही एका असहाय, पतिप्रेमवंचित स्त्रीच्या जीवनावर आधारलेली कादंबरी आहे. स्वतःच्या हिमतीवर उभे राहून संकटांशी लढणारी नायिका रेखाटताना त्यांनी परंपरेत पिचणार्याक स्त्रीचे चित्रण केले आहे. गौरांग महाप्रभूंच्या जीवनावर आधारलेली त्यांची ‘अनुहार’ ही कादंबरी प्रत्यक्षात मात्र गौरांगपत्नी विष्णुप्रियेला केंद्रस्थानी ठेवून साकारली. ‘वृंदा’ या त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘सुखाची सावली’ हा चित्रपट त्या काळी गाजला होता. बंगाली साहित्यिक शरच्चंद्र चटर्जी यांच्या जीवनावर त्यांनी ‘जीवनस्वप्न’ ही कादंबरी लिहिली.

    पौराणिक व्यक्तिरेखांना कवेत घेऊन ‘मेघमल्हार’, ‘मैथिली’, ‘योगेश्वर श्रीकृष्ण’, ‘सत्यप्रिय गांधारी’, ‘नल-दमयंती’ अशा अनेक कादंबर्या त्यांच्या लेखणीतून साकारल्या. त्यांची ‘महाश्वेता’ ही कोड झालेल्या तरुणीच्या जीवनावरील कादंबरीही खूप लोकप्रिय झाली. यावर आधारित मालिकाही बनली होती. या कादंबरीने भारावून जाऊन त्या काळी अनेकांनी कोड झालेल्या तरुणींशी विवाह केल्याची उदाहरणे आहेत.

    काही कारणास्तव त्यांनी विवाह केला नव्हता. सुमतीबाईंनी विपुल साहित्यनिर्मिती केली. सुमारे ३१ कादंबऱ्या, २६ कथासंग्रह, २ नाटके आणि १ काव्यसंग्रह अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.मराठी खेरीज कानडी, गुजराती, हिंदी, इंग्रजी, बंगाली या भाषांवरही सुमतीबाईंचे विलक्षण प्रभुत्व होते. गुजरातेत केलेल्या दीर्घ वास्तव्यामुळे त्यांचा गुजराती संस्कृतीशी जवळून परिचय होता. त्यांच्या अनेक कादंबऱ्याची गुजराती भाषांतरे झालेली आहेत. अशा या यशस्वी लेखिकेचे विश्व शेवटपर्यंत लिखाण आणि प्रसूतिगृह एवढेच मर्यादित राहिले. वाचकांनी त्यांच्या लिखाणाला दिलेल्या भरघोस प्रतिसादात त्या कायम समाधानी होत्या. सुमती क्षेत्रमाडे यांचे ८ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • चिरतरुण, चतुरस्त्र पार्श्वगायिका आशा भोसले

    आजही एखाद्या विशीतल्या तरुणाला मागे पाडेल, एवढी प्रचंड ऊर्जा, लगबग त्यांच्यात आहे. ८४ व्या वर्षीही त्यांच्यात गाण्याची, स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की, ऐकणारे थक्कच होतील. ‘ऐंशी वर्षांची म्हातारी बुढी अन् वय काय सांगते सोळा? आंधळा मारतो डोळा...’ या दादा कोंडकेंच्या गाण्यातील मर्म आशाताईंनी कर्तृत्वाने सार्थ करून दाखवले आहे.

    आशाताई अघोषित भारतरत्न’च आहेत, हे कोणताही संगीतरसिक नाकारणार नाही. लतादीदींसोबत कुण्याही गायिकेची तुलना होऊच शकत नाही, हे एकवेळ मान्य केले तरी,लतादीदींच्या तुलनेत आशा भोसलेंचे गानकर्तृत्व कुठेही मागे नाही. उलट आशा भोसले यांच्या सुरांना जी ‘शार्प धार’ आहे, जे माधुर्य आहे, शब्दफेकीची अनोखी नजाकत आहे, ते अन्य कोणत्याही गायिकेकडे नाही. गाण्यांची जेवढी व्हेरायटी; मग ते शास्त्रीय गीत असो, गज़ल असो, मादकगीत असो, भक्तिगीत-भावगीत असो, पॉपगीत-कॅबरेगीत असो,लावणी-ठुमरी असो वा कव्वाली असो; सादरीकरणाची खास शैलीतील विलक्षण हातोटी आशा भोसलेंनी जोपासली आहे, जी अन्य कुठल्याही गायिकेच्या वाट्याला आली नाही, याची पावती तर दस्तुरखुद्द लतादीदीही देतात! स्वतंत्र छाप आशाताईंनी संगीतविश्वाीच्या सुरील्या दुनियेत उमटवली, तेही लतादीदींसह शमशाद बेगम, गीता दत्त, नूरजहॉं, सुरैया यांसारख्या पट्टीच्या गायिका फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असताना! सर्वांत मोठी गोष्ट अशी की, आशा भोसले यांना वैवाहिक जीवनात, चित्रपटसृष्टीत जो संघर्ष करावा लागला, तेवढा अन्य कुठल्याही गायिकेला नाही! तब्बल सहा दशके रसिकमनावर गारूड घालणार्याज व आज वय वर्षे ८४ असतानाही तोच मधुर स्वर आशाताईंकडे आजही कायम आहे. मात्र, ‘मेलोडी क्वीन’ आशाताई यांचा सहा दशकांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण, खडतर असाच राहिलेला आहे. प्रारंभी अतिशय वाईट दिवस त्यांनी आयुष्यात अनुभवलेले आहेत. वयाने जवळपास दुप्पट असलेल्या ज्या व्यक्तीवर नितांत प्रेम केले व लतादीदींसह घरातील सर्वांचाच कडाडून विरोध असताना त्यांचा रोष पत्करून आयुष्याचा जोडीदार म्हणून घरातून पळून जाऊन ज्याची मोठ्या विश्वारसाने निवड केली, त्याच्याचकडून म्हणजे गणपतराव भोसले यांच्याकडून विश्वाूसाला तडा गेल्यानंतर जिव्हाळ्याचे सर्वच लोक गमावल्याचे जे दिवस आशाताईंनी अनुभवले व त्यानंतरही त्या न डगमगता कुणाच्याही सहकार्याविना केवळ आपल्या गानकौशल्याच्या बळावर ज्या धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आणि प्रचंड यशस्वी झाल्या, त्याला खरोखरच तोड नाही! ‘संघर्षाचं प्रतीक’ म्हणूनही आशाताईंकडे पाहिल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण ती वस्तुस्थिती आहे. त्यांच्या जागी अन्य दुसरी कुठलीही महिला राहिली असती, तर कदाचित कधीच आत्महत्या करून मोकळी झाली असती. कारण, पदरात दोन मुले टाकून व गर्भात एक बाळ सोडून गणपतराव भोसले व त्यांचे बंधू आशाताईंच्या जिवावर उठले होते.अतिशय घाणेरडी वागणूक मिळाल्याने आशाताईंनी ६० साली गणपतराव भोसले यांच्याशी घटस्फोट घेतला होता, हा सत्य परंतु कटु असा खाजगी इतिहास आहे. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याच स्वीय सचिवासोबत लग्न केले म्हणून संपूर्ण मंगेशकर कुटुंबाच्या कर्त्याकरवित्या लतादीदी यांचीही साथ-जिव्हाळा त्या गमावून बसल्या होत्या. गणपतराव हे लतादीदींचे स्वीय सचिव होते.लग्नाच्या वेळी आशाताईंचं वय १६ तर गणपतराव ३१ वर्षांचे होते. अशा कठीण दिवसांत आशाताईंनी कारकीर्द घडवायला प्रारंभ केला तेव्हा त्यांना अनेक खडतर, कटु अनुभवांचा सामना करावा लागला. कुणी गाणे गाण्याची संधी देत नसत, अन्य गायिकेने नकार दिलेली गाणी त्यांच्या वाट्याला येत असत, अल्प मानधनावर त्यांना टुकार गाणी गावी लागत असत. बी ग्रेड, सी ग्रेड नायिकांवर चित्रित असलेली गाणी त्यांना गावी लागत असत. हे सर्व आशाताईंच्या वाटेला प्रारंभी येत गेलं व आशाताईंनीही नशिबाचे भोग समजून ते स्वीकारलं. स्वीकारण त्यांना भागच होतं, परिस्थितीच तशी होती! मात्र त्यांनी, मिळालेल्या या प्रत्येक संधीचं सोन्यात रूपांतर केलं, असं की ‘देखनेवाले देखतेईच रह्य गये!’ प्रत्येक गाणं तन-मन ओतून असं काही तडाखेबाज गायलं की बस्सं़! आशाताईंच्या वाईट दिवसांमध्ये गुरुदत्त यांची पत्नी गीता दत्त, शमशाद बेगम, लता मंगेशकर या फिल्म इंडस्ट्रीतील टॉपच्या गायिका होत्या. पुढे पंचमदांची साथ मिळाल्यानंतर आशाताईंनी एकापेक्षा एक अशा गाण्यांची ज्या गोडव्याने बरसात केली, त्याने ‘चिंब’ झालेले रसिकमन कधीच ‘कोरडे’ होत नाही. लावणी, भावगीतं-भक्तिगीतं, गज़ल, पॉप, उडत्या चालीतली गाणी, लोकगीतं, कव्वाली, रवींद्र संगीत आदी सर्वांमध्ये आशाताईंनी अमिट मुद्रा उमटवली.

    १९४३ साली ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. ४८ साली हंसराज बहल यांच्या ‘चुनरियॉं’ या चित्रपटात ‘सावन आया...’हे गीत गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.५३ साली बिमल रॉय यांनी ‘परिणीता’साठी आशाताईंना संधी दिली, ५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है...’ गायला दिलं. पुढे ओ. पी. नय्यर यांनी ५६ साली ‘सीआयडी’साठी संधी देऊन आशादीदींच्या पदरात मोठं यश दिलं.

    ५७ साली ‘नया दौर’मध्ये ओपींच्या उडत्या चालीवर रफीसाहाबसोबतचं ‘मॉंग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, हेमंतकुमार यांच्या संगीतातलं ‘जागृती’मधलं ‘दे दी हमे आझादी बिना खड्‌ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, सी. रामचंद्र यांचा संगीतसाज आणि भरत व्यास यांनी रचलेलं ‘नवरंग’मधलं ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘तू छुपी है कहॉंऽ मै तडपता यहॉं’, जयदेव यांचं संगीत असलेलं देव आनंद-साधनावरचं ‘हम दोनो’मधलं रोमॅण्टिक ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘काला पानी’तलं देव आनंदला विनंती करणारं मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’,मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मेरा साया’तलं ‘झुमका गिरा रे’, ओपी-कमर जलालाबादींचं ५८ सालच्या ‘फागून’मधलं ‘एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया’, ‘तिसरी कसम’चं लोकगीतं ‘पान खाये सैया हमारो, सावली सुरतीयॉं होठ लाल लाल’, ‘किस्मत’मधलं शमशाद बेगमसोबतचं ‘कजरा मोहोब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘पेईंग गेस्ट’मधलं चुलबुल्या नूतनला देव आनंद छेडतो तेव्हाचं ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘वक्त’मधलं ‘आगे भीऽ जाने ना तूऽ,पिछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है’, कोंबडी पकडणार्या’ ‘बांगडू’ किशोरदांसोबतचं ‘हाल कैसा है जनाब का’, ‘हावडा ब्रिज’मधलं ‘आईयेऽ मेहरबॉं’, झीनतवरचं ‘हरे रामा’तलं ‘दम मारो दम’, ओपींचं ‘चॉंद उस्मानी-किशोरदां यांच्यावरचं ‘बाप रे बाप’मधलं ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे’, शहरयार यांनी रचलेलं खय्याम यांनी संगीत दिलेलं ‘उमराव जान’मधलं ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगहा है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘तुमसा नही देखा’तलं ‘सर पे टोपी लाल, हाथ मे रेशम का रूमाल, हो तेरा क्या कहना’, ‘एक मुसाफिर एक हसीना’तलं ‘बहुत शुक्रिया बडी मेहरबानी’, नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझील’मधलं अतिशय गोड ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुंगी जान जुदा मत होना रे’, ‘ओ हसीना जुल्फोवाली जानेजहॉं’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आदमी और इन्सान’मधलं ‘जिंदगी इत्तफाक है’, ‘अनहोनी’मधलं ‘मैने होठो से लगाई तोऽऽ हंगामा हो गया’, ‘बांगडू’सोबतचं ‘आशा’मधलं ‘इना मिना डिका’, ‘काश्मीर की कली’तलं ‘इशारों इशारों मे दिल लेनेवाले’, गुलजार यांचं ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, हेलनच्या बहारदार नृत्यावरचं ‘कारवॉं’तलं ‘पिया तू अब तो आजा’, ‘मेरे सनम’चं ‘जाईये आप कहॉं जायेंगे, ये नजर लौटके फिर आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’चं ‘रात अकेली है, बुझ गए दिये’, ‘शिकार’चं ‘पर्दे मे रहनें दो पर्दा ना उठाओ’, ‘द ग्रेट गॅम्बलर’मधलं अमिताभ-झीनतवरचं फॉरेनमध्ये होडीतलं रोमॅण्टिक ‘दो लफ्जों की हैऽऽ दिल की कहानी’,‘पुकार’मधलं ‘बचके रहना रे बाबाऽऽ बच के रहना रे’, परवीनबॉबीचं नृत्य असलेलं ‘जवानी जानेमन हसीन दिलरूबा’,‘हम किसी से कम नही’तलं ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना’, ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जिना’, ‘लगान’चं ‘राधा कैसे ना जले’ अशी खूप मोठी गाणी आशाताईंची आहेत. मराठीत गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगडिणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’मधलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, हेमंतकुमार यांच्यासोबत गायलेलं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, सुधीर फडके उपाख्य बाबुजींसोबत गायलेलं खेबुडकरांचं ‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला’, भटांचं ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, शांता शेळके यांनी रचलेलं ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’,भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतसाजातलं बाबुजींसोबत गायलेलं ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’...

    'राष्ट्रीय पुरस्कार', असंख्य 'फिल्मफेअर पुरस्कार', मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' - हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने 'जीवनगौरव पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला.

    आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.

    आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ - इंटरनेट

  • गझल गायिका पिनाज मसानी

    डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.