(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ सिनेसमीक्षक अशोक उजळंबकर

    ‘अजिंठा’, ‘मराठवाडा’ या दैनिकांपासून त्यांनी चित्रपट समीक्षा लेखनास आरंभ केला. महाराष्ट्रातील विविध दैनिकांत चित्रपट, दूरदर्शन या विषयावर जसे दैनिक लोकमत, सकाळ, तरुण भारत, मराठवाडा, अजिंठा इत्यादी ठिकाणी त्यांनी विपुल प्रमाणात स्तंभ लेखन केले आहे. चित्रपट समीक्षक म्हणून आजवर त्यांनी तब्बल ३३६५ मुलाखती घेतल्या आहेत. चित्रपट विषयास वाहिलेला नवरंग रुपेरी नामक दिवाळी अंकाची स्थापना त्यांनी १९८७ साली केली व जवळपास ३० वर्षे त्याचे संपादन केले.

      June 10, 2022


  • भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील

    भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मा.प्रतिभा पाटील यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव येथे झाला. प्रतिभा पाटील यांचे वडिल सरकारी वकिल होते. एम.ए करत असतानाच त्यांची पावले राजकारणाकडे पडली. त्याला कारण ठरले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यांच्या एका कार्यक्रमाला प्रतिभाताई उपस्थित होत्या. महिलांनी राजकारणात यायला हवे. राजकारण स्वच्छ रहाण्यासाठी महिलांची उपस्थिती गरजेची आहे, अशा आशयाचे भाषण तेव्हा चव्हाणांनी केले होते. ते ऐकून प्रभावित झालेल्या प्रतिभाताई राजकारणात उतरल्या.

    पण राजकारणा उतरायचे तर काही लक्ष्य समोर हवे, असे नव्हते. योगायोगाने त्यांच्या तोपर्यंतच्या कामाची पावती आणि धडाडी पाहून त्यांन जळगाव मतदारसंघातून आमदारकीचे तिकिट मिळाले. आश्चर्य म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्या आमदार झाल्या. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे पंचवीस. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी आमदारकी भूषवली. आमदार असतानाच त्या वकील झाल्या. याच काळात त्यांचा विवाह झाला देवीसिंह शेखावत यांच्याशी. जळगावनंतर प्रतिभाताईंनी मतदारसंघ बदलला आणि त्या एदलाबाद (सध्याचा मुक्ताईनगर) मधून सलग पाचवेळा निवडणूक जिंकल्या.

    विधानसभेत प्रतिभाताईंनी अनेक पदांवर संधी मिळाली. त्यांचे त्यांनी सोने केले. १९६७ ते १९७७ या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर १९७८ ते १९८० या कालावधीत शरद पवार पुलोदचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले.

    कॉंग्रेसवरील निष्ठा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन १९८० मध्ये प्रतिभाताईंना मुख्यमंत्री बनविण्याचे कॉंग्रेसचे डावपेच होते. मात्र, ऐनवेळी अब्दुल रेहमान अंतुले यांनी बाजी मारली आणि पाटील यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. मात्र, पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. पण पक्षानेही त्यांच्या योग्यतेचा विचार करून राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली.

    तेथे त्यांची ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेऊन उपसभापती म्हणून निवड झाली. १९८६ ते ८८ या कालावधीत त्यांनी उपसभापतीपद भूषविले. पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत १९९१ साली त्या अमरावतीतून सहजपणे लोकसभेवर निवडून आल्या.

    प्रतिभाताई २००७ ते २०१२ या काळात राष्ट्रपती राहिल्या. राष्ट्रपतिपदाची कर्तव्ये पार पाडतानाच त्यांनी वायुसेनेच्या सुखोई, टी-10 या रणगाड्यावर स्वार होऊन, सुदर्शन शक्ती सैन्य अभ्यास दौ-यात सहभागी होऊन महिला शक्तीची प्रचिती आणून दिली होती. राष्ट्रपती असताना प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती भवनातील ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाविषयी रोशनी प्रकल्पाची संकल्पना अमलात आणली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 4, 2019


  • भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

    त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने ‘हवाईगंधर्व’ ही पदवी बहाल केली होती. भीमसेन जोशी यांनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

      January 24, 2022


  • लेखक, कवी, गोविंद विनायक तथा ‘विंदा’ करंदीकर

    विंदा' करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी रत्नागिरी जिल्यातील घालवली या गावी झाला.विंदा हे कोकणातील पोम्बुर्ल्याचे. तिकडचा टिपीकल कोकणी स्वभाव नि वृत्ती विंदांमध्येही उतरली होती. पण विंदा कोकणपट्टीतच अडकले नाहीत, ते वैश्विक झाले. त्यांच्या जगण्याचे भानही कायम वैश्विक राहिले. पण कोकण नि त्याची दरिद्री अवस्था हा त्यांच्या कायम चिंतेचा नि चिंतनाचा विषय राहिला. उच्च शिक्षण कोल्हापूरमध्ये झाल्यानंतर ते शिक्षण क्षेत्रात आले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. त्या आधी ते हैदराबाद मुक्तीसंग्रामातही सहभागी झाले होते. मा.विदांनी बालकविता, विरूपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद आणि लघुनिबंध असे मह्त्वाचे साहित्यप्रकार लिलया हाताळले. या सगळ्यांत विविध प्रयोग केले. मा.विंदांनी ‘स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका, संहिता’ असे कवितासंग्रह तर ‘राणीचा बाग, परी ग परी, सर्कसवाला’ यासारखे बालकवितासंग्रह दिले. १९४९ साली प्रथम प्रकाशित झालेल्या 'स्वेदगंगा' पासून सुरू मा.विंदांचा साहित्यिक प्रवास सुरु झाला. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. मराठीतील महत्वाचे समीक्षक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली होती. लघुनिबंधकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. गझल, गीत, मुक्तसुनीत, तालचित्रे, विरूपिका असे जुने काव्यप्रकारही त्यांनी हाताळले. विंदांच्या बालकविता हा त्यांचा एक वेगळाच पैलू आहे. एकदा काय झाले सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, अडम् तडम्, टॉप, सात एके सात, बागुलबोवा. हे त्यांचे बाल काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. या बालकविता अत्यंत वेगळ्या अशा आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना आणि विनोदाची छानशी फोडणी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. स्पर्शाची पालवी व आकाशाचा अर्थ हे त्यांचे लघुनिबंधसंग्रह, ज्ञानेस्वरांच्या अमृतानुवाचे अर्वाचिनीकरण हा त्यांचा अभिनव प्रयोग होता. स्वतःच्याच काही कवितांचा त्यांनी इंग्रजीतही अनुवाद केला होता. पण मा. विंदा आठवतात ते त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या काव्यवाचनामुळे. दर्जेदार मराठी कवितांना घरे मिळवून देण्याचा हा अफाट यशस्वी प्रयोग होता. काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ नसतानाही मा.वसंत बापट, मा.मंगेश पाडगावकर आणि मा.विंदा या तिघांनी काव्यवाचनाच्या जाहीर अनेक कार्यक्रम केले होते. मा.विंदा करंदीकर यांना साहित्य क्षेत्रातला सर्वोच्चअ प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान केला गेला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. मा. विंदांना सर्वोच्च पातळीवरील राष्ट्रीय कवी म्हणून ‘कबीर पुरस्कार’आणि ‘कालिदास पुरस्कार’ हे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. याशिवाय मा. विंदांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले होते. मार्क्स आणि गांधीवादावर अढळ निष्ठा असणाऱ्या मा.विंदांनी पुरस्कारापोटी मिळालेले लक्षावधी रुपये सामाजिक संस्थांना देऊन ‘देणार्या‍ने देत जावे’ चा अनुभव रसिकांना दिला. मा.विंदा ‘मानवाचे अंती गोत्र एक’ हे जसे लिहिले तसेच ‘सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी’ अशी भावगीतेही त्यांनी लिहिली. मा.विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, इतके देऊन टाकत हा कवी आपल्यातून निघून गेला. मा.'विं.दा' करंदीकर यांचे १४ मार्च २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    'विं.दा' करंदीकर यांची ग्रंथसंपदा
    स्वेदगंगा, जातक, विरुपिका, संहिता इत्यादी काव्यसंग्रह. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ इत्यादी ललित लेखसंग्रह. परी गं परी, राणीचा बाग, इत्यादी बालगीतसंग्रह. किंग लियर, फ़ाऊस्ट इत्यादी अनुवादित ग्रंथ.

    'विं.दा' करंदीकर यांची कविता
    https://www.youtube.com/watch?v=JRpJ9_pQKmQ
    'विं.दा' करंदीकर नक्षत्रांचे देणे
    https://www.youtube.com/watch?v=NHczZUq9rNY

    https://www.youtube.com/watch?v=Unea-KyPEdA

      March 15, 2017


  • दादा कोंडके

    नायगाव चाळीतच दादा कोंडके यांचे बालपण गेले. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. तरुणपणी पैशांची गरज भागवण्यासाठी अपना बाजार मध्ये त्यांना नोकरी करावी लागली. त्या काळात काही कारणांमुळे त्याचे स्वकीय व कुटूबीय त्यांच्या पासून दूर झाले, व दादा एकटे पडले. तेव्हा समाजात दु:खी असलेल्या लोकांना हसवण्याचा पण दादांनी केला. आणि हाच उद्देश धरून त्यांनी त्यांच्या भागतील बँड पथकात सहभाग घेतला. कोतुकाने त्यांना बडवाले दादा पुकारले जायचे.

    बँड मध्ये कार्यरत असताना , सेवा दलाच्या कार्यातून दादा सांस्कृतीक कार्यात सहभागी व्हायचे. त्यातून त्यांनी छोट्या - मोठ्या नाटकांत भाग घेण्यास सुरुवात केली. तेथे कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले.

    पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणा-या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. 'खणखणपुरचा राजा' मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फड उभारला. आता दादा कोंडके वसंत सबनिसांच्या 'विच्छा माझी पुरी करा' नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. 'विच्छा'चे १५०० हून अधिक प्रयोग झाले. आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारकरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले.

    विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. मा.दादा कोंडके यांनी 'भामाक्षी पीचर्स संस्थेची निर्मिती' केली. प्रमुख नायिका - उषा चव्हाण , संगीतकार - राम लक्ष्मण, गायक - जयवंत कुलकर्णी आणि महेंद्र कपूर, सहायक दिग्दर्शक - बाळ मोहिते यांनी या रुपात संस्थेचे काम पहिले होते. त्यांना चित्रपटासाठी सेन्सॉर मान्यता मिळण्यापासून ते राजकीय नेत्यांच्या संबंधीत अनेक अडचणी येत होत्या. दादा कोंडके यांची वादग्रस्त विषयात चर्चा असायची.

    प्रत्यक्ष आयुष्यात ते विवाहबद्ध होते, पण सिनेसृष्टीत एकटा जीव सदाशिव पणे वावरत असायचे. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. 'सोंगाड्या' ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले.

    अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. अनेक रजत्/सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले. खरे तर दादा कोंडके यांच्यासारखा सारखा कलाकार पुन्हा झाला नाहीच मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्णकाळ म्हणजे दादा कोंडके यांची कारकीर्द, दादांनी प्रेक्षकांना हसवले आणि प्रसंगी अगदी अलगद टचकन रडवले देखील … त्यांच्या काळातील सिनेसृष्टी आणि सध्याच्या काळातील सृष्टी यात प्रचंड तफावत आहे खूप अत्याधुनिक तंत्र आता उपलब्ध आहे.

    दादा कोंडके यांचे एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या, रामराम गंगाराम , पांडू हवालदार असे गाजलेले चित्रपट कुठे टी व्ही वर दिसत नाहीत ,जुन्या तंत्रात असलेल्या या चित्रपटांचे कोणी पुनरुज्जीवन केले नाही अनेक जुने चित्रपट, गाणी वारंवार टी व्ही वर दिसतात पण जणू दादा कोंडके यांचे चित्रपट रसिकांना बघायला मिळत नाहीत. मा. दादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे

      August 8, 2017


  • बार्बीचा वाढदिवस

    ९ मार्च १९५९ हा बार्बीचा जन्मदिन!
    आज बार्बी डॉल अठ्ठावन्न वर्षाची झाली.

    लहान माझी बाहुली, मोठी तिची साऊली
    घारे डोळे फिरवीते, लुकूलुकू ही पाहाते
    नकटे नाक उडवीते, गुबरे गाल फुगवीते

    कविवर्य दत्तांची ही कविता वाचताना त्यांनी बार्बीला पाहिले होते का, असा प्रश्न पडतो. त्यांनी बार्बीला पाहिले असण्याची शक्यता नाही. बार्बीला ज्यांनी जन्माला घातले त्यांनी दत्तांची ही कविता वाचली असण्याची शक्यताही नाही. अठ्ठावन्न वर्षांची झाली, तरी बार्बी अजून पहिल्यासारखीच दिसते, बदलली आहे ती वेषभूषा! बार्बी डॉल लाँच केली आणि तेव्हापासून तिचा प्रवास ‘ती आली, तिनं पाह्यलं आणि तिनं जिंकलं’ असाच झाला आहे. ‘अटकर बांधा, गोरा गोरा खांदा’ अशी बार्बी जगभरातील मुलींच्या दृष्टीने केवळ एक बाहुली नाही तर मैत्रीण आहे. मार्गदर्शक आहे. त्यांच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी आहे. टीन एजर्सच्या मनातल्या स्वप्नांचं, आकांक्षाचं ती मूर्त स्वरूप आहे. एवढंच नाही तर पन्नाशीत बहुतेकींच्या ‘चवळीच्या शेंगे’सारख्या बांध्याची जेव्हा ‘ऐशी की तैशी’ झालेली असते, त्या वयात बार्बीच्या शरीरावर मात्र वाढत्या वयाच्या खुणा नाहीत, त्यामुळे आज जुन्या पिढीचंही ती स्वप्न झाली आहे.

    बार्बी डॉलने फॅशन आयकॉन आणि पॉप संस्कृतीतील राजकन्या म्हणून पाच हून अधिक दशके गाजवली. बार्बीच्या जन्मदात्रीचे नाव रुथ हँडलर. रुथ यांची कन्या बार्बारा एक दिवस कागदाची बाहुली बनवत असताना त्यांनी पाहिले. त्यांच्या मनाने घेतले, की आपण बच्चे कंपनीसाठी एक सुरेखशी बाहुलीच का बनवू नये? १९५६ मध्ये युरोपच्या दौऱ्यावर असताना रुथ आणि त्यांचे पती एलियट यांनी ‘बिल्ड लिली’ ही जर्मन बाहुली पाहिली. त्यांच्यासमवेत चिरंजीव केनेथ आणि कन्या बार्बारा हेही होते. मुलांना बाहुली आवडताच रुथ यांनी तीन बाहुल्या विकत घेतल्या. बिल्ड लिली ही बाहुली म्हणजे त्या वेळी ‘दि बिल्ड झायटुंग’ या जर्मन वृत्तपत्रात रेनहार्ड ब्यूथिन या चित्रकाराने रेखाटलेल्या ‘कार्टून स्ट्रिप’मधली एक व्यक्तिरेखा! लिली जर्मनीत १९५५ मध्ये पहिल्यांदा विकली गेली. अमेरिकेला परतून रुथ आणि एलियट यांनी या बाहुलीसारखी बाहुली बनवायचा ध्यास घेतला. एलियट हँडलर यांचा खेळण्यातल्या छोटय़ा फर्निचरचा व्यवसाय होता. हँडलर यांच्या भागीदाराचे नाव होते हॅरॉल्ड मॅटसन. त्याच्या नावातले ‘मॅट’ आणि स्वत:च्या एलियट या नावातले ‘एल’ असे शब्द जुळवून त्यांनी कंपनी निर्माण केली- ‘मॅटेल’. रुथ यांच्या सांगण्यावरून या कंपनीतून बार्बीच्या निर्मितीला सुरुवात झाली . यंत्रसामग्री, साचे यांचा प्रश्न असल्याने पहिली बार्बी जपानमध्ये घरगुती पद्धतीने निर्माण झाली. ज्या काळात अगदी मोजक्याच खेळण्यांच्या वाटयाला टी व्ही जाहिरातीचे भाग्य येत असे, त्यात बार्बीचा समावेश होता. टी. व्ही.वरच्या या जाहिरातीचा बार्बीच्या यशात खूप मोठा वाटा आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे लाँच केलेल्या वर्षांतच साडेतीन लाखांचा विक्रमी खप या फॅशन डॉलच्या नावावर जमा झाला. आज १५० हून अधिक देशांतला बार्बी डॉल्सचा खप बिलियनच्या घरात आहे. लाँच केलेल्या वर्षांतच बार्बीनं खपचा विक्रम केला तेव्हाच या बाहुलीचं यश निश्चित झालं होतं. त्यामुळे मॅटेल टॉय कंपनीनं बिल्ड लिलीचे सर्व हक्क विकत घेतले आणि त्यानंतर बिल्ड लिली इतिहासजमा झाली. बार्बीच्या यशाचा आलेख सतत उंचावत राहावा, यासाठी मॅटेल कंपनी बार्बीच्या बाबतीत सतत प्रयोगशील राहिली. बार्बी हे ‘टीन एजर्स मॉडेल’ असल्याने बार्बीच्या माध्यमातून मुलींना सतत वेगवेगळे संदेश दिले गेले. मुली कोणत्याही क्षेत्रात पुढं जाऊ शकतात, त्यांचं ‘बाईपण’ त्यांच्या करियरच्या, प्रगतीच्या आड येत नाही हे दाखवण्यासाठी बार्बीला डॉक्टर, अॅंस्ट्रोनॉट, अमेरिकन आयडॉल, अॅलथलेट, प्रेसिडेन्शियल कँडीडेट, शेफ अशा वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखांमधून पेश केलं गेलं. बार्बी, तिची रूपं, तिच्याबरोबर मिळणाऱ्या अॅाक्सेसरीज सतत बदलत्या ठेवल्या. त्यानिमित्तानं नवनवीन स्वप्नं, वेगवेगळ्या दिशा मुलींसमोर ठेवल्या जाऊ लागल्या. बार्बीने समोर ठेवलेले पर्याय मुलीही स्वीकारू लागल्या. बार्बी हा जगातील एकमेव ब्रँड आहे की जो जगभरातील तरुण मुलींना हाऊस वाईफपासून राष्ट्राध्यक्षांपर्यंत कोणत्याही रूपात स्वत:ला पाहण्याची संधी देतो. बार्बीने मुलींच्या मनातील मैत्रिणीची जागा घेतली. मैत्री, कुटुंब, शौर्य, प्रामाणिकपणा अशी मूल्यं जपण्यासाठी बार्बीनं कायम पुढाकार घेतला. यासाठी तिने ‘बार्बी अॅ ण्ड दी डायमंड कॅसल’ या चित्रपटाचा माध्यम म्हणून उपयोग केला. बार्बी गर्ल्स डॉट कॉम ही सर्वात वेगाने वाढणारी वेबसाइट ठरली. या वेबसाइटच्या ५० दशलक्षाहून अधिक मैत्रिणी झाल्या. बार्बी ही हजारो यू टय़ूबच्या चॅनेल्सवर झळकली. बार्बी ही मुलींसाठी कायमच ट्रेन्डसेटर ठरली आहे. अगदी साठच्या दशकापासून ते नव्वदच्या दशकापर्यंत तिची फॅशन जगभरात प्रसिद्ध होती. फ्लॉवर पॉवर, फन इन द सन, निळ्या सनग्लासेस, मोठा बेल्ट, लेगीज, स्टायलिश स्क्रूनशिज, पिवळा बीच टॉवेल अशा विविध फॅशन्स आणि ट्रेन्डस् बार्बीने आणले आणि सेट केले. बार्बीच्या डायरेक्ट टू डीव्हीडीच्या चित्रपटांच्या माध्यमांतून होम व्हिडियो विभागातही बार्बीनं धुमाकूळ घातला. १४ टायटल्सच्या माध्यमातून बार्बीने लोकप्रियतेचे नवीन उच्चांक गाठले. प्रत्येक चित्रपटात एका वेगळ्याच रूपात दिसणाऱ्या आणि यशस्वी ठरणाऱ्या बार्बीने मुलींच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे बार्बी तरुण मुलींच्या गळ्यातली ताईतच बनली.

    आपला एखादा ‘बॉयफ्रेंड’ असावा, हे या वयातल्या प्रत्येक मुलीचं स्वप्नं. ते लक्षात घेऊन मॅटेलनं केनला आणलं ते बार्बीचा ‘बॉयफ्रेंड’ म्हणून. बार्बी हे नाव रुथनं बार्बारा या तिच्या मुलीच्या नावावरून ठेवलं होतं तर केन हे केनेथवरून ठेवण्यात आलं. बार्बी आणि केनच्या रोमान्सच्या चविष्ट आणि चटपटीत बातम्यांनी मॅटेलनं बार्बीला चांगलंच प्रकाशझोतात ठेवलं. प्रेमप्रकरण म्हटल्यानंतर भांडणं, रुसवेफुगवे, रुठना-मनाना, हे सगळं अपरिहार्यपणे आलंच. या सगळ्या रेडिमेड मालमसाल्याचा फायदा उठवण्यात मॅटेलनं काही कसूर सोडली नाही. ‘दुनियाकी कोई ताकद हमें जुदा नही कर सकती’ अशा आणाभाका घेणाऱ्या बार्बी-केनला एकमेकांना निरोप द्यायला लावला. त्यांच्या प्रेमप्रकरणात गुंतलेल्यांनी (मॅटेलला हवा तेवढा) गदारोळ माजवला. आपल्याकडच्या मालिकांमध्ये एखादं लोकप्रिय कॅरॅक्टर अचानक फोटोत जाऊन बसतं आणि त्यावर आवश्यक तो हल्लागुल्ला झाल्यावर अलगद फोटोतून बाहेर येऊन माणसात मिसळतं, ही ट्रीक बहुधा बार्बी-केन प्रकरणावरूनच ढापलेली असावी. कारण २००४ मध्ये बार्बी-केननं ‘तुझ्या-माझ्या वाटा आता वेगळ्या झाल्या’ असं ठरवल्यानंतर पुढं दोन र्वष हा गोंधळ मॅटेलनं चालू ठेवला आणि २००६ मध्ये त्यांचे पुनर्मीलन घडवून आणलं.

    बार्बीच्या आयुष्यात केनला विशेष स्थान असलं तरी टेरेसा, मिज, ख्रिस्ती आणि तिचा बॉयफ्रेंड स्टीव्हन, स्कीपर, टॉड, टट्री, स्टासी, केली, क्रीसी, फ्रॅन्सी, जॅझी असा बार्बीचा मित्र आणि भांवडं परिवार मोठा आहे. याशिवाय बार्बी पेटप्रेमी आहे. तिच्याकडे ४० पेटस् आहेत. गाडय़ांचीही ती चाहती आहे. त्यामुळे तिच्या गाडय़ांचा ताफाही मोठा आहे.

    अशी ही बार्बी भारतात आली ती साडी लेऊन, नववधूचा साजशृंगार घेऊन. साडीतल्या बार्बीला भारतीय तरुणींनीही पटकन् स्वीकारलं. बार्बीच्या आधी ठकीनं अशीच जनमानसावर भुरळ घातली होती. आजच्या पिढीला ठकी माहितीही नसेल. पण आज पन्नाशीतल्या पिढीचं बालपण ठकीच्या सहवासात गेलेलं आहे. बार्बीचा आखीव रेखीवपणा, नाजूकपणा ठकीत नसेल, पण तरीही जुन्या पिढीच्या भावविश्वात ठकीचं स्थान अढळ आहे. बार्बीला तिची जागा कधीच घेता आली नाही. तिनं आजच्या तरुण पिढीच्या मनात ते स्थान मिळवलं आहे.

    बार्बी फेमस आहे. मुलींची आवडती आहे. बार्बी डॉल आपल्याकडे असण्याचं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. बार्बीचा सेल तडाखेबंद आहे.. वगैरे वगैरे गोष्टी बार्बीबाबत वर्षांनुर्वष ऐकवल्या जात आहेत. पण त्याचबरोबर बार्बी अनेक वेळा टीकेचं लक्ष्यही झाली आहे. याची सुरुवात झाली ती बार्बी लाँच केली गेली तेव्हाच. कारण एकंदरीतच बार्बीच्या (अती)उभार बस्ट लाईवरून पालकांनी गदारोळ उठवलाच. त्यात तिचे कमी कपडेही पालकांच्या डोळ्याला खुपत होतेच. अशीच ‘अल्पवस्त्रांकिता’ बार्बी घरातल्या मुलींसाठी का त्यांच्या वडिलांसाठी, असा ( खवचट) प्रश्न विचारला जाऊ लागला. बार्बीच्या ‘चवळीच्या शेंगे’सारख्या बांध्यामुळे मुलींच्या मनातली ‘झिरो फिगर’ची स्वप्नं बळावत असून त्या ‘अॅळनोरेक्झिया’ची शिकार बनत आहेत, याबद्दलही अनेक पालकांनी तक्रार केली. तेव्हा १९९७ मध्ये बार्बीचा बॉडी मोल्ड बदलण्यात आला. सौदी अरेबियात तर बार्बीवर बंदीच घालण्यात आली. बाईचं नखही दिसू नये, अशी अपेक्षा करणाऱ्या मुस्लिम धर्माला बार्बी ‘कुछ रास नाहीं आयी’. त्यामुळं त्यांनी बार्बीवर बंदी आणली, पण बार्बीच्याच धर्तीवर ‘फुला’ नावाची बाहुली लाँच केली. फुला ही नखशिखांत कपडे घातलेली बाहुली आहे. ती बार्बीला पर्याय म्हणून विकली जात असली तरी ती मॅटेल कंपनीनं तयार केलेली नाही. सौदी अरेबियाच्या पावलावर पाऊल टाकून इराणनं ‘सारा आणि दारा’ या बाहुल्या बाजारात आणल्या. एकूण काय, बार्बीच्या यशानंतर बार्बीचे अनेक आविष्कार बाजारात आले.

    बार्बीच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्यासाठी अॅाक्वा नावाच्या एका डॅनिश नॉर्वेजियन ग्रुपनं ‘बार्बी गर्ल’ नावाचं गाणं केलं. त्यात ‘यू कॅन ब्रश माय हेअर, अनड्रेस मी एव्हरी व्हेअर’ यासारखे शब्द होते. या गाण्याबरोबर त्यांनी ग्राफिक वापरलं होतं, ते पिंक बार्बीशी साधम्र्य दर्शवणारं होतं. निस्सानने तयार केलेल्या जाहिरातीलाही मॅटेल कंपनीनं विरोध दर्शवत खटला भरला होता. ‘टीन टॉकी बार्बी’ ही बोलणारी बाहुलीही मॅटेलनं १९९२ मध्ये लाँच केली. ‘वान्ना हॅव अ पिझ्झा पार्टी?’ ‘आय लव शॉपिंग’ अशी वेगवेगळी वाक्यं ही बाहुली बोलत असे. एकूण २७० वाक्यांपैकी प्रत्येकी बाहुली चार वाक्यं बोलत असे. यातलंच एक वाक्य म्हणजे 'Math class is tough' पण या वाक्यामुळे बोलणारी बार्बी टीकेचं लक्ष्य झाली. अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी विमेन’ यांनी या वाक्याला विरोध केला. तेव्हा मॅटेलनं हे वाक्यच काढून टाकलं. एवढंच नाही तर ज्यांच्याकडे हे वाक्य बोलणाऱ्या बार्बी होत्या, त्यांना दुसऱ्या बाहुल्या दिल्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट /शुभदा रानडे

      March 9, 2017


  • लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके

    वास्तवाच्या अनुभवातून आलेले अस्वस्थपण मांडणे ही त्यांच्या कवितेची खासियत. जेव्हा जेव्हा हे मांडणे कवितेच्या चौकटीत सामावणारे नव्हते, तेव्हा तेव्हा त्यांनी कथात्म-वैचारिक लिखाणातील शक्यता अजमावल्या. ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या असोत वा ‘मालटेकडीवरून..’सारखे ललित लेखन असो किंवा ‘कवितेविषयी’, ‘कविता म्हणजे काय?’, ‘मराठी नाटक आणि रंगभूमी : विसावे शतक’ आदी समीक्षाग्रंथ असोत; डहाके यांच्या लेखनात विविध विषयांच्या तौलनिक अभ्यासातून आलेल्या मूल्यगर्भ चिंतनाची डूब जाणवते.

      March 30, 2022


  • प्रिय मित्र हेमंत करकरे

    २६ नोव्हेंबर, २००८ रोजी अतिरेक्यांच्या हल्ल्यात माझा जिवलग मित्र हेमंत करकरे शहीद झाला. दरवर्षी आजच्या दिवशी माझ्या जखमेवरची खपली निघून भावना भळाभळा वाहू लागतात.

    प्रिय हेमंत

    p-29676-Hemant-Karkareमी वर्गात शिरलो तेव्हा एका बेंचाच्या कोपऱ्यात स्वत:च्या अत्यंत कृश शरीराचं मुटकुळं करून खाली मान घालून तो बसला होता. कुपोषित बालक हा शब्द तेव्हा अस्तित्वात नसला तरी आज जाणवतं की मेळघाटातल्या एखाद्या कुपोषित बालकात आणि त्याच्या शरीरयष्टीत ‘काडी’चाही फरक नव्हता. अगदी आवर्जून त्याच्याशी बोलावं, त्याची मुद्दाम ओळख करून घ्यावी आणि मैत्री करावी असं त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीही नसल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तो अदखलपात्रच होता. माझ्या आक्रमक व बऱ्यापैकी भांडखोर स्वभावाला त्याच्या शांत स्वभावाचं प्रचंड आश्चर्य वाटत असे. माणसात कितीही वैगुण्ये असली तरी निसर्गाने त्यांची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भरपाई केलेली असते. त्याच्या बाबतीत ती भरपाई त्याच्या पाणीदार डोळ्यांच्या रूपाने झाली होती.

    मी त्याला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे समोरच्या व्यक्तीवर जरब बसवणारे तेजस्वी डोळे मला क्षणात नामोहरम करीत असत. माझ्यासकट सर्व मित्र मैदानावर खेळत असताना तो वर्गात एकटाच बसून काय करतो हे बघण्यासाठी मी एक दिवस हळूच वर्गात शिरलो तेव्हा चांदोबा नावाचं मासिक वाचण्यात तो एवढा तल्लीन झाला होता की मी त्याच्या शेजारी येऊन बसलो आहे हे त्याला कळलंही नाही. पण त्या क्षणी मला एक अत्यंत महत्त्वाची जाणीव झाली की आम्ही दोघेही समानधर्मी व अत्यंत व्यसनी आहोत. आम्हा दोघांनाही वाचनाचं जबरदस्त व्यसन होतं व त्या व्यसनामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने मित्र झालो. त्या मैत्रीतून वयाच्या अकराव्या वर्षी आमच्या दोघांच्याही घरात छोट्याशा ग्रंथालयांचा जन्म झाला. चांदोबाचे जुने अंक व चोरबाजारातून आणलेली कॉमिक्स ही आमच्या ग्रंथालयांची ग्रंथसंपदा होती व त्यांचा फडशा पाडण्यासाठी ती एक्सचेंज करणं हे आमचे नित्यकर्म झाले होते.

    दहावीच्या परीक्षेनंतर भेटी दुर्मिळ झाल्या. तो आयपीएस झाल्याची बातमी माझ्यासाठी केवळ धक्कादायकच नाही तर अविश्वसनीय होती. शिव्याच काय, पण साधे अबे-काबे हे शब्दही ज्याच्या तोंडातून कधी बाहेर पडले नाहीत असा खाली मान घालून सर्वत्र वावरणारा माझा एक सरळमार्गी मित्र चक्क पोलिस दलात काम करणार? मध्य प्रदेशात मी एका जर्मन कंपनीचा अधिकारी म्हणून कार्यरत असताना पोलिस दलातील त्याच्या प्रगतीच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. अनेक वर्षांच्या भटकंतीनंतर मी महाराष्ट्रात परत आलो व आमच्या बॅचच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने खूप वर्षांनंतर आमची भेट झाली. त्या कार्यक्रमात त्याचं आगमन झालं आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वात झालेला आमूलाग्र बदल बघून पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील ‘नंदा प्रधान’ साक्षात माझ्यासमोर अवतरल्याचा मला भास झाला. दीर्घ कालावधीनंतर आमची भेट झाल्यावर त्याचा पहिला प्रश्न होता - ‘काय म्हणते तुझी लायब्ररी?’ इतक्या वर्षांनंतर भेट झाल्यावरही त्याला उत्सुकता होती ती चांदोबा मासिकाच्या एका अंकापासून सुरू झालेल्या लायब्ररीच्या प्रगतीची ! त्याच्याजवळ असलेल्या सर्व पुस्तकांची विषयानुसार कशी मांडणी केली आहे याची माहिती एखाद्या शाळकरी मुलाच्या उत्साहाने मला पुरवून त्याच्या त्या कौतुकाच्या लायब्ररीचं दर्शन घेण्यासाठी येण्याचं आमंत्रण त्याने मला दिलं, पण आम्हा दोघांच्याही व्यग्रतेमुळे आमची प्रत्यक्ष भेट पुन्हा कधी झालीच नाही.

    पोलिस खात्यात एका मोठ्या व अत्यंत महत्त्वाच्या पदावर त्याची नियुक्ती झाल्यानंतर मला आनंद होण्याऐवजी माझ्या काळजाचा ठोका चुकला. केवळ दहशतवादाचेच नव्हे, तर शक्य तितक्या सर्व गोष्टींचे अत्यंत निर्लज्जपणे राजकारण करणाऱ्यांच्या या देशात राजकारण्यांच्या इशाऱ्यांवर नाचण्याची वेळ जर त्याच्यावर आली तर त्याच्यासारख्या प्रामाणिक व सरळमार्गी माणसाचा कसा काय निभाव लागणार या विचाराने माझी अस्वस्थता वाढू लागली. बॉम्बस्फोटांच्या चौकशीला सुरुवात झाल्यानंतर टीव्हीवर जवळपास रोज होणाऱ्या त्याच्या दर्शनाने माझ्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली आणि मी त्याला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सावध करण्यासाठी धडपड करत असतानाच २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एका मित्राने मला फोन करून एक हादरवून टाकणारी बातमी दिली -‘आपला मित्र हेमंत करकरे या जगात नाही. त्याला थोड्या वेळापूर्वी अतिरेक्यांनी ठार केलं.’ तो ज्या खुर्चीवर बसला होता तिचा प्रत्येक क्षणी मृत्यूशी अगदी जवळून संबंध येणार आहे याची पूर्ण जाणीव असूनही त्या बातमीचा अर्थ समजून घेण्याचा मी आजही निष्फळ प्रयत्न करतो आहे.

    कोणासाठी तू स्वत:ला मृत्यूच्या दाढेत झोकून दिलंस मित्रा? लोकल्सच्या डब्यांना लटकून रात्रंदिवस प्रवास करणाऱ्या मुंबईच्या असहाय्य नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी की निवडून आल्यानंतर कधीही पूर्ण न होणाऱ्या खोट्या आश्वासनांचा मतदारांवर पाऊस पाडून स्वत:च्या तुंबड्या भरण्यात धन्यता मानणाऱ्या पराकोटीच्या स्वार्थी लोकप्रतिनिधींसाठी? संसद भवनातील अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बहुसंख्येने अनुपस्थित राहिलेल्या कृतघ्न नेत्यांसाठी की दहशतवाद्यांचा पूर्ण बीमोड होण्याआधीच जाळपोळीच्या धगीने व गोळीबाराने तापलेल्या तव्यांवर अत्यंत गलिच्छ राजकारणाच्या पोळ्या शेकण्यासाठी गिधाडालाही लाजवणाऱ्या वेगाने तुटून पडलेल्या निर्लज्ज राजकारण्यांसाठी? तू या जगात असताना तुझ्या प्रामाणिकपणावर शंका घेऊन ज्या माकडांनी स्वत:च्या वैचारिक दिवाळखोरीचं जाहीर प्रदर्शन केलं त्याच माकडांच्या हाती तू या जगाचा निरोप घेताना कोलीत दिलं याची तुला कल्पना आहे?

    समवयस्क असूनही प्रत्येक भेटीत वडीलकीच्या नात्याने प्रत्येक मित्राची अत्यंत आस्थेने चौकशी करणारा तुझ्यासारखा मित्र आम्हा सर्व मित्रांना पोरकं करून गेला. दगड-विटांनी तयार होतात त्या साध्या इमारती, घरं नव्हेत. त्या निर्जीव इमारतींमध्ये राहणारी आपल्या सर्वांसारखी हाडामांसाची जिवंत माणसं खरी घरं जन्माला घालत असतात ! अशाच एका जिवंत घरात राहणाऱ्या सर्वांचा तू कर्तृत्वाच्या शिखरावर असताना अचानक कायमचा निरोप घेतलास. २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री तुझ्या हत्येची बातमी ऐकल्यानंतर डबडबलेल्या डोळ्यांमधून मी अश्रूंना अजूनही बाहेर पडू दिलेलं नाही. तुझ्यासारख्या धीरोदात्त मित्राच्या मृत्यूवर अश्रू ढाळणं हा तुझ्या उत्तुंग कर्तृत्वाचा सर्वात मोठा अपमान ठरेल. भ्रष्टाचाराने अंतर्बाह्य पोखरलेल्या व स्वार्थी राजकारणाने पूर्णत: सडवून टाकलेल्या आपल्या देशाने तुझ्या अत्यंत दुर्दैवी मृत्यूच्या निमित्ताने जर कात टाकली तर तू खऱ्या अर्थाने अजरामर होशील, अन्यथा दहशतवाद्यांपासून असंख्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:ला मृत्यूच्या खाईत झोकून देणारा तू केवळ आमचाच नव्हे, तर आपल्या देशाचा शेवटचा मित्र ठरशील!

    -- श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

      November 29, 2016


  • गीतकार आनंद बक्शी

    जब जब फुल खिले’ या चित्रपटापासून त्यांची गीतकार म्हणून खरी कारकीर्द सुरु झाली. त्यातील एक गाणे ‘एक था गुल एक थी बुलबुल.’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले .

      August 4, 2021


  • ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर

    ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच त्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

      April 24, 2021