चित्रकूटमधील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रकल्प हाती घेतला. चित्रकूटमध्ये त्यांनी गोशाळा स्थापन केली असून महिला सक्षमीकरणासाठी उद्यमकेंद्राची स्थापना केली आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पिकांवर संशोधन केले जाते. पिकांचे कोणते वाण वापरावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
मुन्शी प्रेमचंद यांचे धनपत राय हे खरे नाव होते. साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते.
तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली.
शिक्षण संपवून तब्बल पाच वर्षे अ.भा.वि.प. चे पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले. त्या काळातले त्यांचे गुरू व मार्गदर्शक प्रा.यशवंतराव केळकर, ह्यांना ते कधी विसरू शकणार नाहीत. ‘कार्यकर्ता म्हणून मी जो काही आहे त्याचे सगळे श्रेय केळकर ह्यांना आहे’ असे ते म्हणतात.
पं. डी. के. दातार यांच्या आधी १०० वर्षांची व्हयोलिनवादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. ती रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले.
बुलो सी रानी यांचे पूर्ण नाव बुलो चंदीराम रामचंदानी. त्यांचा जन्म ६ मे १९९२० रोजी हैद्राबाद पाकिस्तान येथे झाला. बुलो. सी. रानी यांच्या नावाची हकीगतही रंजक आहे. सिंधी समाजात जन्माला आलेल्या बुलो चंदी रमानी यांनी आडनावाचं इंग्रजी आद्याक्षर ‘सी’ वेगळं काढलं व ‘रमानी’चं ‘रानी’ करून टाकलं. त्यामुळं अनेकांना हा पुरुष संगीतकार की स्त्री संगीतकार असा प्रश्न पडे. बुलो सी रानी यांचे वडीलही संगीतकार होते. ४० ते ६० च्या दशकात त्यांनी संगीत दिले. बुलो सी रानी यांनी १९३९ रणजीत मोविटोन पासून आपली सुरवात केली. खेमचंद प्रकाश यांना असीस्टट म्हणून मदत करायला सुरवात केली. खेमचंद प्रकाश यांच्या तानसेन, चांदनी, सुखदुख या चित्रपटाना असीस्टट म्हणून काम केले. त्या काळी बुलो. सी. रानी अमीरबाई कर्नाटकी यांच्या आवाजाने इतके प्रभावित होते की आपल्या पुढील चित्रपटांसाठी इतर कोठल्या गायिकेचा विचार करण्यासाठी तयार नव्हते. त्यांच्या १९४४ साली आलेल्या ‘कारवाँ’ चित्रपटातील धिम्या लयीतील ‘सूनी पडी है प्यार की दुनिया तेरे बगैर जली हुई है दिल में तमन्ना, तेरे बगैर’ या गाण्यातील अमीरबाईचा एकेक स्वर मनात साठवून ठेवण्यासारखा आहे. तसेच १९४५ सालच्या ‘चांद चकोरी’ मध्ये तर त्यांनी सर्वच्या सर्व गाणी अमीरबाईच्या आवाजात स्वरबद्ध केली होती. बुलो सी रानी यांचे २४ मे १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार ज्यांचे विनोदी साहित्य आजही ताजेतवाने वाटते असे विनोदी साहित्याचे जनक म्हणजे चि.वि.जोशी. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी झाला. पुण्याच्या नूतन मराठी शाळेतून ते मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर फर्ग्यूसन कॉलेजमधून १९११ मध्ये बी. ए. आणि १९१६ मध्ये त्यांनी एम.ए. ची पदवी मिळविली. तसेच चि.वि.जोशी हे पाली भाषेचे पंडित होते, पाली भाषेवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. पदवी मिळविल्यानंतर काही वर्षे त्यांनी मुंबई येथे शिक्षण खात्यात नाकरी केली. १९२० सालापासून बडोदा येथे पाली, मराठी आणि इंग्रजीचे अध्यापन करु लागले. १९२८ पासून निवृत्त होईपर्यंत बडोदा संस्थानात ते रेकॉर्ड ऑफिसर म्हणून सेवेत होते. इतर भाषांप्रमाणेच बडोद्यातील वास्तव्यामुळे त्यांनी गुजराती भाषेवरसुध्दा प्रभूत्व मिळविले होते. पाली भाषेवरील प्राविण्यामुळे त्यांनी जातक कथांचा अनुवाद केला होता. शाक्यमुनी गौतम, बुध्द संप्रदाय व शिकवण हे पालीभाषेतील ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केले. अनुवादित साहित्याबरोबरच त्यांचे विनोदी लेखन प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे.
एरंडाचे गुऱहाळ, चिमणरावांचे चऱहाट, वायफळाचा मळा, आणखी चिमणराव, ओसाडवाडीचे देव , गुंडयाभाऊ, द्वादशी, गुदगुल्या, रहाटगाडगे, हास्य चिंतामणी, बोरीबाभळी, इत्यादी अनेक विनोदी कथासंग्रह प्रकाशित आहेत. अत्यंत दर्जेदार आणि कोटीबाज विनोद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय होते. मानवी स्वभावांतील विसंगती सुक्ष्मपणे हेरुन त्या विसंगतीतून भावनिक आणि शाब्दिक विनोद उभा करणे ही चि.वीं.ची खासियत होती, साधी, सोपी, सरळ भाषा, सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग त्यातून निर्मित विनोद, त्यामुळे त्यांचे लेखन आणि विनोदी भाव सर्वसामान्य माणसांपर्यंत चटकन पोहोचत असत. या त्यांच्या हातोटीमुळे त्यांना लोकप्रियता लाभली. मागील पिढीतील आणि सद्य काळातील लेखकांनी स्वतची अशी काही व्यक्तिचित्रे उभी केली, त्याचप्रमाणे चि.वी. नी उभे केलेले हास्यव्यक्तिमत्व म्हणजे चिमणराव` चिमणरावांचं व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीतून इतकं जीवंत झालं होतं की चिमणराव म्हणजे चि. वि. चा मानसपुत्र असे मानले जात असे. अनेकांच्या अनेक विनोदी पात्रांमधला एकमेव असे चिमणरावांचे वर्णन केले जात असे. भोळसट, हास्यकारक वर्तन करणारा असा हा चि.वि. चा चिमणराव मराठी साहित्यात अजरामर झाला आहे. त्या काळातील साहित्यिकांच्या लेखनावर पाश्चात्य लेखकांचा बहुतेक प्रभाव असे. इंग्रजी विनोदी पाश्चात्य लेखकांच्या बाबतीतही असेच म्हणता आले असते. परंतु या बाबतीत मात्र चि.विं. नी आपल्या व्यक्तीरेखेवर पाश्चात्य छाप पडू न देता चिमणरावांचे व्यक्तीत्व हे संपूर्ण ब्राम्हणी असे रंगविलेले आहे. ही त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचीच एक प्रतिमा आहे. मा.चि.वि.जोशी यांचे २१ नोव्हेंबर १९६३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
लौकिक अर्थाने संगीतकार रवी यांची कारकीर्द कोणत्याही संगीतकाराला हेवा वाटावा अशी होती. त्यांचा जन्म ३ मार्च १९२६ रोजी झाला.त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांनी बंपर यश मिळवले आणि त्यातील गाण्यांनाही अफाट लोकप्रियता मिळाली. रवी यांनी स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून काम सुरू केले तो काळ चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाचा उत्तरार्ध म्हणता येईल. अतिशय सोप्या आणि ओठांवर सहज रूळणाऱ्या चाली हे रवी यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या या गुणामुळेच त्यांची गाणी लोकप्रिय झाली. संगीतकारापेक्षा अधिक मानधन मागणाऱ्या साहिर लुधियानवीसारख्या गीतकाराशी त्यांनी जमवून घेतले. त्यामुळेच 'गुमराह', 'वक्त', 'हमराज'सारख्या चित्रपटांची गाणी जन्माला आली. 'चलो एकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो' सारखे अनवट गाणे रवी यांनी महेन्द कपूरकडून ज्या पद्धतीने गाऊन घेतले ते तिघांच्याही दृष्टीने इतिहास निर्माण करणारे ठरले. 'गरिबोंकी सुनो, वो तुम्हारी सूनेगा' या त्यांच्या गाण्याने लाखो भिकाऱ्यांच्या व्याकुळतेला स्वर दिला. तथाकथित श्रेष्ठ संगीतकार बदलत्या काळापुढे हतबल होत असताना रवी यांनी 'निकाह'सारखा यशस्वी चित्रपट देऊन चकित गेले. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले, ,महेन्द कपूर यांच्या गाण्यांचा इतिहास रवी यांच्या गाण्यांशिवाय अपूर्ण आहे, हे काळानेच सिद्ध केले. 'ऐ मेरे दिले नादाँ, तू गमसे ना घबराना' म्हणत त्यांनी टीकेकडे दुर्लक्ष केले. ५० वर्षांनंतरही त्यांची गाणी टिकून आहेत, यापेक्षा त्यांच्या अभिजाततेचा पुरावा काय असू शकतो? "वक्त‘, "गुमराह‘, "एक फूल दो माली‘, "दो बदन‘, "चौदहवी का चॉंद‘ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी दिलेले श्रवणीय संगीत लोकप्रिय झाले होते. सातत्याने दर्जेदार संगीत दिल्यानंतरही प्रसिद्धीपासून ते दोन हात लांबच होते. त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतलेखन केले होते. रवी यांचे ७ मार्च २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका अजोडपणे वठवणारे गणपतराव जोशी. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८६७ रोजी रत्नागिरी, राजापूर येथे झाला.
गणपतराव जोशी हे मराठी रंगभूमीवरील एक असामान्य नट. त्यांनी शाहूनगरवासी नाटक मंडळीची स्थापना १८८१ साली केली. तेव्हापासून ती मराठी रंगभूमीच्या गद्य शाखेतील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका अजोडपणे वठवून गणपतरावांनी अतिशय लोकप्रियता संपादन केली. चंद्रसेन (हॅम्लेट), झुंझारराव (ऑथेल्लो), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. एखाद्या अद्वितीय गायक नटाच्या आवाजासारखी, गद्य नाटकातून काम करणाऱ्या गणपतरावांच्या आवाजाची मोहिनी तत्कालीन प्रेक्षकांवर पडली होती. शेक्सपिअरच्या नाटकांतील नायकांच्या मनोजीवनाचे रहस्य समजावे या हेतूने महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या नाटकांना गर्दी करीत असत, तर इंग्रज प्रेक्षक केवळ अभियानाच्या आस्वादाचा आनंद घेऊन गणपतरावांच्या हॅम्लेाट (चंद्रसेन) सारख्या भूमिकेची मुक्तकंठाने प्रशंसा करीत असत. शेक्सपिअरच्या नाटकांतील नायकांच्या भूमिकांचे रहस्य व्यक्त करण्याचे शिक्षण गणपतरावांना वासुदेव बाळकृष्ण केळकर आणि गोविंद बल्लाळ देवल यांच्या कडून मिळाले होते.
राणा भीमदेव नाटकातील भीमदेव ह्या शूर योद्ध्याची भूमिका व तुकाराम व रामदास नाटकांतील अनुक्रमे तुकाराम वा रामदास यांसारख्या भगवद्भक्त संतांची भूमिका गणपतरावसारख्याच कौशल्याने वठवीत. इतकेच नव्हे, तर दातेकृत झोपी गेलेला जागा झाला (१९०९) ह्यासारख्या फार्समधील विनोदी भूमिकांतील त्यांची निपुणताही प्रेक्षकांना थक्क करणारी होती. मराठी रंगभूमीवरील स्त्रियांच्या भूमिका त्या काळात पुरुषच वठवीत असत.
गणपतरावांच्या कारकीर्दीच्या पुर्वार्धात त्यांना नायिकेच्या भूमिका करणारे बाळाभाऊ जोग यांची साथ लाभली होती. गणपतराव जोशी यांचे ७ मार्च १९२२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मा.अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली.
Copyright © 2025 | Marathisrushti