(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • कूचिपूडि, भरतनाट्यम् नर्तकी मल्लिका साराभाई

    मल्लिका साराभाई या नर्तकी मृणालिनी साराभाई व वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची कन्या. त्यांचा जन्म ९ मे १९५४ रोजी झाला. समांतर सिनेमा पासून आपल्या करीयरची त्यांनी सुरवात केली. मल्लिका साराभाई यांनी पीटर ब्रुक यांचे नाटक महाभारत मध्ये द्रोपदी ची भूमिका केली होती. याच नाटकावर नंतर चित्रपट बनवला गेला होता. मल्लिका साराभाई यांनी भारतात व परदेशात अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे. मल्लिका साराभाई यांनी हर्ष मन्दर यांच्या पुस्तकावर आधारित अनसुनी या नाटकाची पटकथा लिहिली आहे. मल्लिका साराभाई या दर्पणा अकादमी ऑफ आर्टस् (अहमदाबाद) च्या निदेशक आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’

    संगीत संशोधक आणि अभ्यासक विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. ग्रंथाचं नाव आहे, ‘वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’.

    केवळ हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार केला तर वसंत देसाई हे कधीच व्यावसायिकदृष्टय़ा आघाडीचे संगीतकार नव्हते. परंतु वसंतरावांच्या सांगितिक आयुष्याचा, हिंदी चित्रपट हा केवळ एक पैलू आहे. मराठी चित्रपट संगीत, नाटय़संगीत गैरफिल्मी संगीत असा त्यांच्या प्रतिभेचा व्याप मोठा आहे. अशा प्रत्येक क्षेत्रातील कामगिरीची विस्तृत माहिती मिळवून, त्याची वर्गवारी करून ते या ग्रंथात अतिशय आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहे. छायाचित्रांची नुसतीच संख्यात्मक रेलचेल नाही, तर ती चित्रे आणि त्यातील व्यक्ती पाहता पाहता अनेक दुर्मिळ क्षण जे कुठे कुठे विखुरले होते ते एकत्रितरीत्या गवसल्याचा आनंद मिळतो. ‘मराठी संस्कृती’चे जतन करण्यासाठी अलीकडे अनेकांचे हात शिवशिवत असतात, त्या सर्वाना असे ग्रंथ पाहिल्यावर ‘संस्कृती जतना’चा खरा अविष्कार म्हणजे काय, ते खरे तर लक्षात यायला हवे!

    कलावंताला, त्याच्या चाहत्यांना, कलावंताच्या वारसांना त्या कलावंताच्या कामगिरीचे चीज झाले अशी भावना हा देखणा ग्रंथ पाहताना होते. वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे. त्यात वसंतरावांच्या सुरुवातीच्या अभिनय प्रवासाची व संगीत कारकिर्दीची माहिती आहे. लेखक, गीतकार गुलजार यांनी ‘गुड्डी’, ‘आशीर्वाद’ या चित्रपटांच्या वेळी आलेले आपले अनुभव अतिशय मोजक्या परंतु भावपूर्ण शब्दात व्यक्त केलेले आहेत. ‘गुड्डी’साठी वसंतरावांनी संगीतबद्ध केलेली ‘हमको मन की शक्ती देना’ ही प्रार्थना ए. आर. रहमानलासुद्धा स्तिमित करते, हे गुलजार यांनी आवर्जून नमूद केले आहे. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये ‘सोयरी’ झालेल्या वाणी जयराम हिने अत्यंत आत्मियतेने वसंतरावांवर लेख लिहिला आहे. ‘आय वॉज लाईक ब्लॉटिंग पेपर, अॅाब्सर्बिग एव्हरीथिंग ही टॉट मी’ असे ती म्हणते तेव्हा वसंतरावांचे तिच्या कारकिर्दीतील स्थान अधोरेखित होते. विकास देसाई, वैजयंतीमाला, भालचंद्र पेंढारकर, सुलोचना चव्हाण, इनॉक डॅनिअल्स, डॉ. मंदार बिच्छू, जगदीश खेबुडकर, फैयाज, हेमंत पंडित, बाळ देशपांडे यांच्या लेखांमधून वसंतराव एक संगीतकार आणि एक व्यक्ती म्हणून म्हणून उलगडत जातात. चित्रपट संगीताचे आस्वादक-अभ्यासक राजू भारतन यांनी त्यांच्या ‘ही टय़ून्ड विथ गॉड’ या लेखात वसंतरावांच्या दैवी प्रतिभेचे मर्म उलगडून दाखविले आहे. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे.

    विश्लेषण, माहिती आणि आठवणींनी भरलेली ही सव्वाशे पाने संपली की मग सुरू होतो लेखा-जोखा! त्यात पहिल्या भागात हिंदी चित्रपट भेटतात. १९४२ साली ‘शोभा’ या चित्रपटापासून सुरू झालेला संगीतकार म्हणून प्रवास १९७६ साली ‘शक’ या चित्रपटाशी थांबला तो वसंतरावांच्या अकाली अपघाती मृत्युमुळे. या दरम्यान त्यांनी संगीतबद्ध केलेले ५२ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले तर ‘अमर समाधी’ आणि ‘कामदेव’ अप्रदर्शित राहिले. या चित्रपटांमधील कलावंत, गाणी, गायक असा सर्व तपशील यात आहे. याच पद्धतीने पुढील भागांमध्ये २१ मराठी चित्रपट (सात अप्रदर्शित मराठी चित्रपट), गुजराती, बंगाली चित्रपट, १४ संगीत नाटके, माहितीपट, गैरफिल्मी गीते, नृत्यनाटके यांची १९ तपशीलांसह नोंद आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची व्यवस्थित दखलही घेण्यात आली आहे.

    पुस्तकातील लेख आणि फोटोखालील ओळी इंग्रजीत तरी इतर सर्व तपशील आणि माहिती हिंदी/मराठी व इंग्रजीत देण्यात आली आहे. पुस्तकात सर्वत्र वसंतरावांचे विविध मूडस् टिपणारी आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व ठसठशीतपणे दाखविणारी छायाचित्रे आहेत. सहकाऱ्यांसमवेत गाण्यांची चर्चा करणाऱ्या भावमुद्रा आहेत. मासिकाच्या आकारातील पुठ्ठा बांधणीचे सुंदर मुखपृष्ठ, उत्तम दीर्घ-जीवी कागद आणि अप्रतिम छपाई यामुळे हे पुस्तक म्हणजे वसंतरावांच्या प्रतिभेला खरा सलाम ठरते. ‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे संगीत यात बंदिस्त आहे. अशा प्रतिभावंतांचे संगीत या मातीत जन्मते, हेच ‘ऋणानुबंधांच्या सुरेल गाठी’सारखे असते, याचा प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे! ‘वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’, संशोधन, संकलन, संपादन- विश्वास नेरूरकर, बिश्वनाथ चॅटर्जी, गायत्री पब्लिकेशन व स्वरयोग, पृष्ठे- ४०८, किंमत- ८०० रुपये!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.श्री.श्रीकांत बोजेवार

    वसंत देसाई यांनी संगीत दिलेली काही गाणी
    एक था बचपन
    रम्य ही स्वर्गाहून लंका
    हमको मनकी शक्ती देना
    उठी उठी गोपाला
    बोल रे पपी
    ऋणानुबंधाच्या जिथुन
    ए मलिक तेरे बंदे हम

  • खतरों के खिलाडी अक्षय कुमार

    अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी झाला. अक्षयचा बॉलीवूडमध्ये इथपर्यंत झालेला हा प्रवास त्याच्या निरंतर संघर्षाचे आणि मेहनतीचे फळ आहे. अन्यथा कोणतेही ग्लॅमरस आडनाव न लाभलेला अक्षय बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरलाच नसता.'शेफ' म्हणून कारकिर्दीची सुरवात करणारा अक्षय आता बॉलीवूडमधला 'सबसे बडा खिलाडी' ठरला आहे. सुरवातीला एक्शनपट करणारा अक्षय आता एक्शन-विनोद-थ्रिलर यांची उत्तम भेळ सादर करणारा कलावंत ठरला आहे. खिलाडी सिरीज, यह दिल्लगी, मोहरा, मै खिलाडी तू अनाडी, दिल तो पागल है, हेरा फेरी, खाकी, मुझसे शादी करोगी, नमस्ते लंडन, हे बेबी, भुल भुलय्या, सिंग इज किंग असे यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत. बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिध्द असलेल्या अभिनेत्याबाबतच्या काही रंजक गोष्टी .

    लहान असताना अक्षय अतिशय मस्तिखोर मुलगा म्हणून प्रसिध्द होता. अभ्यासात रस नसलेल्या अक्षयला क्रिकेट आणि व्हॉलिबॉलसारख्या खेळात प्राविण्य होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. तर, थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले.तेथे त्याने आचारी आणि वेटरचे कामदेखील केले. अक्षय कुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन आहे आणि विशेष म्हणजे एक जगप्रसिद्ध आचारी आहे. जो जिता वही सिकंदर’ चित्रपटातील दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारने ऑडिशन दिल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. परंतु या भूमिकेसाठी त्याला नाकारण्यात आले होते. अक्षय डब्ल्यूडब्ल्यूईचा फार मोठा चाहता आहे. २०१० साली डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार केनला अक्षयने आपल्या घरी आमंत्रित केले होते. त्वायकांडोमध्ये त्याने ब्लॅकबेल्ट मिळवला आहे.

    ‘स्पेशल २६’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करेल याबाबतची अनुपम खेरबरोबरची पैज हरल्यावर अक्षयला टेबलावर नृत्य करावे लागले होते.भारतीय चित्रपटसृष्टीतील अक्षयच्या योगदानासाठी २००८ साली ‘युनिर्व्हसिटी ऑफ विण्डसर’ने त्याला कायद्यातील मानद पदवी देऊन सन्मानित केले. ९ हा आकडा आपल्यासाठी भाग्यवान असल्याचा अक्षय कुमारचा विश्वास आहे. आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टीचा संबंध ९ संख्येशी असल्याचे त्याचे मानणे आहे. त्याच्या मुलांचा जन्म नवव्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील आहे. नियमित व्यायाम करणारा अक्षय दररोज सकाळी न चुकता मॉर्निंग वॉकला जातो. भारताबाहेर चित्रिकरण करत असताना तो नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती

    पं. अजय चक्रवर्ती यांच्या कन्या कौशिकी चक्रवर्ती. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९८० रोजी झाला. पतियाळा घराण्याचे गायक पंडित अजय चक्रवर्ती, आई चंदना चक्रवर्ती संगीत शिक्षक, घरातच गाणे, वयाच्या २ र्याी वर्षापासून तिने आपल्या वडिलांकडे संगीत शिकण्यास सुरूवात केली. ऋतुपर्ण घोष या रेनकोट, चोखेर बाली अश्या चित्रपटाचे प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाने केलेल्या प्रमुख नायिकेची ऑफर दिली होती.पण त्याला नकार देउन कौशिकी चक्रवर्ती ने शास्त्रीय संगीत शिकण्यास प्राधान्य दिले.

    कौशिकी २००६ मधील त्यांच्या पहिल्या मैफलीच्या आठवणी सांगताना म्हणते, एक दिवस मी घरी असताना दूरध्वनी वाजला. मी तो घेतला. ‘मैं भीमसेन जोशी बोल रहा हूँ. इस साल हमारे यहाँ पूना आना पडेगा’ असा पलीकडून आवाज आला. पंडितजी मला दिसत नसले तरी मी जागेवरच उभी राहिले होते. कौशिकीसारख्या गायिकांच्या हातात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुरक्षित आहे, अशी खुद्द पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली पावती हे कौशिकीचे यश आहे. आज तिचे नाव या क्षेत्रातील तपस्या तसेच सौंदर्य या दोन्ही मुळे देशविदेशात गाजत आहे.

    तिचे पती पार्थ देशीकान हे स्वतः उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या परंपरेतील उदयोन्मुख गायक असून त्यांनीही कौशिकीप्रमाणेच आपले सासरे पं.अजय चक्रवर्ती यांचेच शिष्यत्व पत्करले आहे. कौशिकीने देशात परदेशात अनेक मैफीली गाजवल्या आहेत. गाणारं सौंदर्यच हे! जे तिचे कार्यक्रम बघतात ते तिचे फॅन होतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जेष्ठ संगीतकार खेमचंद प्रकाश

    खेमचंद प्रकाश हे बिकानेर च्या राजमहलात गायक म्हणून होते. जेष्ठ संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म १२ डिसेंबर १९०७ रोजी झाला. नंतर ते नेपाल च्या राजघराण्यात गायक म्हणून होते. १९३९ साली ते मुम्बईला आले. अवघ्या १०-१२ वर्षात त्यांनी ४७ चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे पहिले दोन चित्रपट म्हणजे 'सुप्रीम पिक्चर्स'चे गाजी सलाऊद्दीन आणि मेरी ऑंखें. त्या सुमारास रणजित मूव्हीटोनच्या चंदुलाल शाह यांनी त्या कंपनीच्या संगीताची धुरा ज्ञान दत्त आणि खेमचन्द प्रकाश यांच्याकदे सोपवली, आणि नन्तरच्या पाच वर्षात या दोघांनी सिनेसंगीताच्या इतिहासात कायम मानाची नोन्द होईल असे संगीत दिले.

    खेमचन्दजीची काही गाणी त्यांच्या मृत्युनन्तर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांत ऐकायला मिळतात. 'स्ट्रीट सिंगर' हा सिनेमा त्यातल्या 'बाबुल मोरा' गाण्यासाठी प्रसिद्‌ध आहे. पण त्यात 'लो खा लो मॅडम खाना' हे विनोदी गाणे खेमचन्दजींच्या आवाज़ात आहे. ते त्यांच्यावरच चित्रित केले होते, आणि ते यू-ट्यूबवर पाहता येते. सैगल, खुर्शीद या ज़म बसलेल्या गायकांकडून तर त्यांनी बहारदार गाणी केलीच, पण पुढे लता मंगेशकर आणि किशोर कुमार हे कलाकार आपला ज़म बसवू पाहत असताना त्यांनाही चिरस्मरणीय गाणी दिलीत. त्यांची गाणी गायलेल्यांची यादी मोठी होईल. कमल दासगुप्ता हे थोर संगीतकार खेमचन्दजींचे समकालीन होते.

    कमल-दा खेमचन्दजींना सर्वश्रेष्ठ संगीतकार मानत. काही सिनेमांना त्यांनी 'खेमराज' नावाने संगीत दिले होते. संगीतकार खेमचन्द यांचे निधन १० ऑगस्ट १९५० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : विकिपिडीया

  • “बॅटरीचा” संशोधक अलेझांड्रो व्होल्टा

    त्यांचा जन्म १८ फ़ेब्रुवारी १७४५ रोजी इटलीमधील कोमो इथं झाला. त्याला लहानपणी चर्चमधील पाद्रयांनी शिकवलं. तो इतका हुशार होता की पुढे जाऊन त्यानंही पाद्रीच बनावं यासाठी त्याच्या शिक्षकांनी चक्क त्याला चॉकलेट्स वगैरेंची ‘लाच’ द्यायचा अयशस्वी प्रयत्न करून बघितला. पण त्याच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी त्याची शाळाच बदलून टाकली! शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला विजेशी संबंधित गोष्टीविषयी अभ्यास करावासा वाटला. वयाच्या २४ व्या वर्षी त्यानं यासंबंधीचा आपला पहिला प्रबंधही लिहून प्रकाशित केला. सुरुवातीचे त्याचे संशोधन हे प्रसिद्ध संशोधक लुई गॅव्हानी यांच्याबरोबर झाले. मात्र, सजीवांमध्ये असणार्याप विजेच्या अनुमानाविषयी गॅव्हानी यांनी केलेले प्रतिपादन त्याला तितकेसे रुचले नाही. त्यामुळे त्याने स्वतंत्रपणे विद्युतघटाविषयी संशोधन करण्याचा निश्चयय केला. दोन वस्तू एकत्र आणून घासून मग दूर करायच्या आणि हे असं सारखं करत राहायचं, की मग त्यातून वीज तयार होऊ शकते ही गोष्ट व्होल्टाच्या लक्षात अगदी लवकर आली होती. स्थिर प्रकारची वीज साठवून ठेवण्यासाठी त्यानं ओट्टो व्हॉन ग्यूरिकपेक्षा जास्त चांगलं यंत्र बनवलं, आणि त्याचं नाव ‘पर्पेच्युअल इलेक्ट्रोफोरस’ असं ठेवलं. ग्यूरिकच्या यंत्रात वीज साठवून ठेवण्यासाठी सतत ते चोळत राहावं लागे. पण व्होल्टाच्या यंत्रात अंबराचा तुकडा आणि सपाट आकाराच्या धातूचं आवरण अशा प्रकारे एकत्र केलं होतं की ते धातूचं आवरण अंबराच्या तुकडय़ाला घासे, आणि मग वेगळं होई; मग ते पुन्हा त्याला घासे, आणि पुन्हा वेगलं होई. या घर्षणक्रियेमुळे त्या यंत्रात सतत वीजनिर्मिती होत राही. ते व्हायचं कारण म्हणजे अंबराच्या तुकडय़ाला या यंत्रात बसवण्याच्या आधी एका केसाळ प्राण्याच्या कातडीवर घासलेलं असे. त्यामुळे त्या दोघांमधले धन आणि ऋण हे विद्युतभार एकाच संख्येचे केले जात. तेव्हा ही धातूची पट्टी त्या अंबराच्या तुकडय़ापासून वेगळी केली जाई, तेव्हा त्या अंबरावर धन आणि धातूच्या पट्टीवर ऋण विद्युतभार आलेला असे. झालं की मग या उपकरणाचं काम! या शोधाबद्दल व्होल्टाला कॉप्ले पुरस्कार आणि इंग्लंडच्या मानाच्या ‘द रॉयल सोसायटी’चं सदस्यत्व मिळालं. मग व्होल्टानं आपलं संशोधन पुढे न्यायचं ठरवलं. विद्युतघट अर्थात बॅटरी म्हणजे रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत रुपांतर करणारे साधन होय. हीच बॅटरी निर्माण करण्याच्या प्रयत्नात शास्रज्ञ अनेक वर्षे होते. सुरुवातीला त्यांनी त्यासाठी मिठाचे पाणी कपामध्ये घेऊन त्यामध्ये निरनिराळय़ा धातूंच्या सळया ठेवून त्याविषयी अभ्यास केला. हा प्रयोग खूपच प्राथमिक अवस्थेत होता. मात्र त्यांनी या अतिशय साध्या अशा उपकरणांच्या साहाय्याने वीजदाब आणि त्याचा विद्युतप्रवाहाशी असणारा संबंध प्रस्थापित केला. दोन वस्तू एकत्र आणून घासून मग दूर करायच्या आणि हे असं सारखं करत राहायचं, की मग त्यातून वीज तयार होऊ शकते ही गोष्ट व्होल्टाच्या लक्षात अगदी लवकर आली होती. १७९० च्या सुमारास त्याला असं आढळलं की, धातूच्या क्षारांच्या द्रावणात चांदी किंवा जस्ताच्या पट्टय़ा ठेवून त्यांना बाहेरून धातूची तार जोडली तर या तारेतून विद्युतप्रवाह जातो.

    त्यानं दोन भांडय़ांमध्ये मिठाचं पाणी भरलं आणि त्यांच्यामध्ये दोन वेगवेगळ्या धातूंची मिळून बनलेली प्रत्येकी एक पट्टी ठेवली. त्या पट्टीची एक बाजू तांब्याची तर दुसरी जस्ताची बनलेली होती. यामुळे या दोन भांडय़ांमधल्या विजेच्या प्रमाणात कसला तरी फरक तयार झाला आहे हे त्याला कळालं. (ज्याला आता आपण ‘व्होल्टेज’ असं म्हणतो). ही दोन भांडी आणि या पट्टय़ा मिळून बनलेलं हे एक उपकरण मानलं तर अशी अनेक उपकरणं एका रांगेत ठेवून आणि ती एकमेकांना जोडून मोठं व्होल्टेज तयार करता येईल हे त्याच्या लक्षात आलं. मग त्यानं अशी प्रत्येकी २० भांडी असलेले तीन संच तयार केले. मग त्यानं आपल्या डाव्या हाताचं एक बोट पहिल्या भांडय़ात बुडवून उजव्या हाताचं एक बोट दुसऱ्या भांडय़ात, मग तिसऱ्या भांडय़ात, मग चौथ्या भांडय़ात असं करत करत विसाव्या भांडय़ापर्यंत बुडवत नेलं. त्या वेळी सुरुवातीच्या ४-५ भांडय़ांमध्ये उजव्या हाताचं एक बोट बुडल्यावर त्याला फारसं काही जाणवलं नाही. पण जसजसं तो ते बोट आणखी पुढच्या भांडय़ात बुडवत राहिला, तसतसा त्याला आधीच्या पेक्षा जास्त प्रमाणात विजेचा झटका बसत गेला. विसाव्या भांडय़ात त्याला सगळ्यात मोठा झटका बसला. याचाच अर्थ, व्होल्टाने रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यात यश मिळवलं होतं. पण, व्होल्टाने ही गोष्ट जाहीरच केली नाही. रॉयल सोसायटीला आपला हा शोध त्याने बऱ्याच उशिरा कळवला. म्हणूनच बॅटरीचा "शोध" लागायला १८०० साल उजाडले होते. जगातला पहिला विद्युतघट तयार करण्याचं श्रेय व्होल्टा याला दिलं जातं. यात मग त्यानं आणखीही काही बदल करून सुधारणा केल्या. त्याला मग नेपोलियननं सुवर्णपदक आणि इतर सन्मानही बहाल केले.

    बॅटरीचा शोध लागेपर्यंत विजेचा वापर आणि त्याविषयीचं ज्ञान हे फक्त एकीकडून दुसरीकडे विजेच्या ठिणग्या जाऊ शकतात (‘स्टॅटिक डिसचार्जेस) या माहितीपुरतंच मर्यादित होतं. त्यामुळे त्याविषयीच्या प्रयोगांचा वापर मनोरंजन आणि संशयास्पदरित्या केले जाणारे वैद्यकीय उपचार यांच्यापुरताच मर्यादित असे.

    जस्त आणि तांब्याचा वापर करून विद्युतशक्ती साठवून ठेवण्याचे तंत्र व्होल्टाने विकसित केले आणि जगातला पहिला विद्युत घट (बॅटरी) बनवली. यालाच व्होल्टाचा विद्युत घट असे शास्त्रीय नाव आहे. म्हणूनच त्याच्या सन्मानार्थ विद्युतघटाचे विभवांतर (व्होल्टेज) मोजण्याच्या परिमाणाला "व्होल्ट" असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता अतिशय खात्रीशीररित्या वीज एके ठिकाणी साठवून सातत्यानं ती पुरवत राहण्याच्या व्होल्टाच्या बॅटरीमुळं इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्राची पाळंमुळंच रोवली गेली. यातूनच मग पुढे ‘इलेक्ट्रोकेमिस्ट्री’ आणि ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिझम’ यांच्यातले अनेक प्रयोग करणं शक्य झालं.व्होल्टाच्या कामगिरीचा वापर नंतर तारायंत्र (‘टेलिग्राफ’), दूरध्वनी (‘टेलिफोन’) आणि बिनतारी (‘वायरलेस’) या यंत्रणांच्या संबंधित तंत्रज्ञानांच्या संशोधनात होणार होता! त्यानं त्या काळात तयार केलेल्या ‘व्होल्टाईक पाईल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपकरणालाच आपण आज सगळीकडे वापरत असलेली बॅटरी म्हणून ओळखतो. अलेझांड्रो व्होल्टा यांचे ५ मार्च १८२७ रोजी निधन झाले..

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. अतुल कहाते / इंटरनेट

  • मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर

    भावगीताची राणी असा वंदना विटणकर यांचा लौकिक होता. मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले.

    वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. महंमद रफी यांनी त्यांच्या भावगीतांचा केलेला अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला. "हा रुसवा सोड सखे', "हा छंद जिवाला लावी पिसे', "हे मन आज' यासह वंदनाताईंची अनेक गाणी रफी यांनी गायली. कृष्णा कल्ले यांनी गायिलेले "परी कथेतील राजकुमारा', "नाते जुळले मनाचे' (सुधीर फडके) ही सतत आठवणीत राहणारी गाणी त्यांचीच. "अगं पोरी संबाळ दर्याला', "ऐ आई मला पावसात जावू दे',"कुहू कुहू येई साद', "चित्र जयाचे मनी रेखिले', "आम्ही दोघे राजा राणी', "पीर पीर पावसाची', "उजळू स्मृती कशाला', "स्वप्नामध्ये सत्य गवसले', "नको आरती नको पुष्पमाला', "नाते जुळले मनाचे', अशी सुरेल शब्दरचना करणाऱ्या वंदनाताईंच्या गीतांना सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे, अरुण पौडवाल, अनिल मोहिले यांच्यासह आघाडीच्या संगीतकारांनी संगीतसाज दिला होता.

    हेमंत कुमार, आशा भोसले, सुधीर फडके, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, सुलोचना चव्हाण, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी यांसह ख्यातनाम गायकांनी त्यांची भावगीते, भक्तीगीते गायिली आणि ती रसिकांत लोकप्रिय ठरली. मा.वंदना विटणकर यांचा पहिला विवाह चित्रकार चंद्रकांत विटणकर यांच्याशी झाला होता. चंद्रकांत विटणकरांच्या निधनानंतर १९८६ साली त्यांनी किशोर पनवेलकर यांच्याशी पुनर्विवाह केला होता. वंदना विटणकर यांचे ३१ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    वंदना विटणकर यांची लोकप्रिय गीते
    खेळ कुणाला दैवाचा कळला
    नाते जुळले मनाशी
    मी प्रेम नगरचा राजा
    परिकथेतील राजकुमारा
    राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली गं
    आज तुजसाठी या पावलांना
    अधिर याद तुझी जाळीतसे रे दिलवरा
    हा रुसवा सोड सखे
    हे मना आज कोणी
    अगं पोरी संबाल दर्याला
    तुझे सर्वरंगी रूप
    शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
    खेळ तुझा न्यारा

    वंदना विटणकर यांची गाणी.
    https://www.youtube.com/playlist…

  • लेखक केशवराव भोळे

    मराठीतील प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म २३ मे १८९६ रोजी अमरावती येथे झाला.

    मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा मा.केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे. मा.केशवराव भोळे १९२६ साली पुण्यात आले. गायक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या भोळ्यांनी गाण्यांना चाली बांधणेही आरंभले.

    १९३१ सालाच्या सुमारास मराठीत बोलपटांचे प्रमाण जसजसे वाढू लागले, तसतसे प्रसंगाच्या मांडणीस व पात्ररचनेस सुसंगत व उठावदार संगीत देण्याचे प्रयोग होऊ लागले. भोळ्यांनी त्या दृष्टीने सांगीतिक प्रयोग करून पाहिले. पार्श्वगायनाचा पहिला प्रयोग त्यांनी 'कृष्णावतार' या चित्रपटामध्ये केला. प्रभात फिल्म कंपनीमध्ये असताना त्यांनी 'अमृतमंथन', 'माझा मुलगा', 'संत तुकाराम', 'कुंकू' इत्यादी चित्रपटांना संगीत दिले. १९३२ साली त्यांचे दुर्गा केळेकरांशी लग्न झाले. लग्नानंतर त्या ज्योत्स्ना भोळे झाल्या. मा.केशवराव भोळे यांनी १९३३ साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते.

    पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला. त्या नाटकात नाटककार श्री.वि.वर्तक यांच्या पत्नी सौ पद्मावती वर्तक, म.रा. रानडे, पार्श्वनाथ आळतेकर, के.नारायण काळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर यांनी भूमिका केल्या होत्या. नायिका-बिंबाच्या भूमिकेत ज्योत्स्ना भोळे होत्या. ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ’ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्ना भोळे त्या नाटकाच्या वेळी फक्त १८ वर्षांच्या होत्या.

    ‘एकलव्य’ ह्या टोपणानावाने केशवराव भोळे ह्यांनी वसुंधरा ह्या साप्ताहिकात लिहिलेले अभिजात गायक-गायिकांविषयीचे अनेक लेख त्यांच्या रमणीय शैलीमुळे आणि माहितगारीमुळे विख्यात झाले. तेच लेख पुढे आजचे प्रसिद्ध गायक (१९३३) ह्या पुस्तकात संगृहीत करण्यात आले. ह्या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ती म्हणजे संगीताचे मानकरी (१९४९) होय. त्यांनी नंतर ‘शुद्धसारंग’ ह्याही टोपणनावाने लेख लिहिले. त्यांत त्याची चिकित्सावृत्ती, परखडपणा, बोचरेपणा इ. विशेष दिसून येतात. आवाजाची दुनिया (१९४८), अस्ताई (१९६२), वसंतकाकाची पत्रे (१९६४), माझे संगीत (१९६४), अंतरा (१९६७) आणि जे आठवते ते (१९७४) हे आत्मचरित्र ही त्यांची ग्रंथसंपदा.

    केशवराव भोळे यांचे ९ नोव्हेंबर १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनेत्री मृणाल दुसानिस

    तिनं एकता कपूरच्या पहिल्या मराठी मालिकेतून पदार्पण केलं, त्या मालिकेचं नाव होत “माझिया प्रियेला प्रीत कळेना”. त्यानंतर तिने चिन्मय मांडलेकरच्या “तू तिथे मी” ह्या पारिवारिक मालिकेत काम केलं.

  • विनोदी अभिनेता, खलनायक सदाशिव अमरापूरकर

    अमजद खान, अमरीश पुरी यांच्यानंतर चे सर्वात खतरनाक वाटणारे हिंदी - मराठी चित्रपटातील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांना आपल्या वडिलांचा व्यवसाय असतानाही, मात्र शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचा जन्म ११ मे १९५० रोजी अहमदनगर येथे झाला. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात नाट्य स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता.

    "हॅंडस्‌ अप', हे त्यांचे अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे यांच्या समवेतचे पहिले व्यावसायिक नाटक रंगमंचावर आले आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. या नाटकातल्या यशानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. याच नाटकातली त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक आणि निर्माते गोविंद निहलानी यांनी त्यांना "अर्धसत्य' या चित्रपटात ओम पुरी यांच्या समवेत भूमिका दिली होती. या चित्रपटातली त्यांनी केलेली बेरक्या आणि धूर्त, कटकारस्थानी "रामा शेट्टी'ची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या समर्थ अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडले.

    १९९१ मध्ये "सडक' या चित्रपटात त्यांनी तृतीय पंथियाची केलेली भूमिका गाजली होती. याच भूमिकेबद्दल त्यांना "फिल्मफेअर' पुरस्कारही मिळाला होता. रंगभूमीवरच्या नाटकात त्यांना भूमिका करणे विशेष आवडत असले, तरीही चित्रपटाच्या व्यवसायात गर्क झाल्यामुळे, पुढे त्यांना मोजक्याच नाटकात भूमिका करता आल्या. सदाशिव अमरापूरकर म्हणजे दुष्ट खलनायक असा शिक्का त्यांच्यावर बसला. पुराना मंदिर, नासूर, मुद्दत, विरू दादा, जवानी, फरिश्ते, या चित्रपटातल्या त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. अभिनेता धर्मेंद्र यांच्याबरोबर त्यांनी हुकूमत या चित्रपटात पहिला खलनायक रंगवला होता. त्यानंतर त्यांनी याच अभिनेत्याबरोबर अनेक चित्रपटात खलनायकाच्या हुकमी भूमिका केल्या.

    विविध प्रकारच्या खलनायकाच्या भूमिका रंगवणाऱ्या अमरापूरकर यांनी स्वत:ला त्याच चौकटीत अडकवून मात्र घेतले नाही. उत्तम चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, असा लौकिकही त्यांनी मिळवला. हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, ओरिया यासह अन्य भाषातल्या ३०० च्या वर चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘अर्धसत्य’, ‘सडक’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कारही त्यांनी प्राप्त केले होते. अहमदनगरच्या स्नेहालय, लोकशाही प्रबोधन व्यासपीठ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सामाजिक कृतज्ञता निधी, अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यासह अनेक संस्थात ते सक्रिय होते. या संस्थांना त्यांनी आर्थिक मदतही केली होती. सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट