नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणाऱ्या सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला. मी त्या नारायाणालाच प्रश्न केला.
” हे परमेश्वरा काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ? ” बघ किती माणसे दगावलीत, त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. ? काय बिचाऱ्यांचा दोष? तू तर ह्या जगाचा कर्ता करविता. ही तर क्षुलक बाब तुझ्यासाठी. कर ह्यावर काहीतरी उपाय. दे त्यांना आशिर्वाद.”
अचानक प्रकाशाचे तेज वाढल्याचे जाणवले. समोर काही तरी हालचाल जाणवली. आणि शब्द ऐकू येऊ लागले. मी एकाग्रतेने ऐकू लागलो.
” मीच ह्या सर्व विश्वाचा निर्माता. नदी नाले तलाव डोंगर वृक्ष वेली विविध वन्य प्राणी, आणि मानव. सर्वानीच आनंदाने जगावे ही योजना. माणसाला विचार करण्याची झेप बऱ्याच वरच्या दर्ज्याची दिली गेली. हेतू हा कि त्याने माझ्या निर्मितीला सहकार्य करावे. साह्य करावे. परंतु तो स्वार्थी वा अहंकारी बनत चालला. हे सारे जग त्याचाचसाठी असल्याचा त्याने गृह करून घेतला. सर्व नैसर्गिक योजनांना त्याने खीळ घालण्यास सुरवात केली. झाडे झुडपे, वृक्षलता, जीवप्राणी, ह्यांची बेसुमार कत्तल चालविली, हवा पाणी अन्न ह्यांचे संतुलन बिघडून टाकण्याचा सपाटा चालविला. पर्यावरण खलास होऊ पाहत आहे. एक जीव निर्माण केला गेला. त्यात कांही गुणधर्म दिले गेले. ते त्याच्या रक्त मास पेशीत घातले. त्यातून तसेच पुनर्निर्मिती करण्याची योजना दिली. परंतु ह्या सरळ साध्या मार्गाची वाट चालण्या ऐवजी मानवाने दिलेल्या ज्ञानाचा अहंकारी दुरुपयोग सुरु केला. त्याच रक्त मास पेशी यांच्या गुणधर्माचा गैर उपयोग करून, संमिश्र करून एक नवीन रक्त पेशी वा मास निर्माण करण्याचे दु:साहस केले. कोणत्याही पेशीचे एकत्रीकरण करून वेगळ्याच जीवाची निर्मिती केली. सर्वात जो सूक्ष्म विषाणू निर्मिला होता, त्याचे म्यूटेषण होत होत त्यापासून विविध विषाणूची निर्मिती होत गेली. ह्याच दुर्देवी मानवी दु:साहसात आणि त्याच्या निरनिराळ्या रासायनिक प्रयोगात स्वाईन फ्लूच्या विषाणूची निर्मिती झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तोच आता फोफावत आहे. ” - – -
“ मी एकदाच भस्मासुराला निर्माण केले होते, त्याची खंत आजही वाटते. पुन्हा तो तसा निर्माण झाला नाही. परंतु हा स्वार्थी अहंकारी मानव तर आपल्याच दुष्ट प्रवृतीने अनेक भस्मासुर निर्माण करीत आहे. जे ह्या माझ्या सुंदर निर्मित जगाचा नाश करतील. ह्याला मी पायबंध घालण्यास असमर्थ आहे. कारण जे मी ज्या नियमाच्या आधारे निर्मिले, त्यात बदल मुळीच केला जाणार नाही. पुढे काय होणार हे फक्त तो मानवच जाणे. “
अत्यंत निराश मानाने मी हे शब्द ऐकत होतो
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 23, 2020
आयटी क्षेत्रातील गतीमान घडामोडींवर ताज्या दमाचे लेखक चेतन भगत यांनी ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ‘वन नाईट ऽ द कॉल सेंटर’ या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. आयटी क्षेत्रातील युवकांच्या मानसिकतेचा मागोवा घेताना मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रतिबिब त्यात आढळते. शिवाय ‘पितृऋण’ या कादंबरीतून पारंपरिक संस्कृतीतील नातेसंबंध उलगडत जातात. दुयर्या महायुद्धानंतर ज्यूंवर झालेल्या अन्यायाची कहाणी ‘शिडलर्स लिस्ट’ या कादंबरीतून समोर येते.
March 24, 2010
चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव.त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. पुढच्याच महिन्यात ७ डिसेंबर १९६७ रोजी ‘गारंबीचा बापू’ ह्या नाटकाने ‘चंद्रलेखा’ची सुरुवात झाली.
November 23, 2021
सुरुवातीला ढगाळ्या पॅन्टमधला, केसांचा कोंबडा ठेवलेला देव, काळानुरूप बदलत गेला.
October 3, 2021
तसा मी मात्र शाकाहरी ह्या खाद्य सवयीला चिटकून राहण्याच्याच विचारधारणेत होतो. मी पहीले अंडे खाण्याचा प्रयत्न केला तो केवळ मित्र मारुती ह्याच्या आग्रहामुळे.. सुटीच्या दिवशी तो अभ्यासाला येत असे. त्याचा स्वतःचा खाण्याचा डबा घेऊन येई. बऱ्याच वेळा आम्ही जवळ बसुन जेवण घेत असू.
March 24, 2019
मी सातवीत असतानाची गोष्ट आहे. मंडईला भाजी आणायला जाताना मी शनिपार येथे लावलेला एक बोर्ड वाचला. त्यावरती ‘आज रात्री आफळेबुवांचं कीर्तन’ असल्याचा मजकूर होता. मी जेवण झाल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास कीर्तन ऐकण्यासाठी गेलो. पाहतो तर काय, स्त्री-पुरुषांची अफाट गर्दी!
July 11, 2021
काॅलेजमध्ये असताना एक सिनियर मित्र होता. काॅलेजमधील सांस्कृतिक कामाच्या निमित्ताने आम्ही एकत्र यायचो. तो बोलघेवडा असल्याने त्याच्या सर्व प्राध्यापकांशी ओळखी होत्या. त्याचा गैरवापर करून तो माझ्यावर दबाव आणू लागला.
November 24, 2021
आकाश अगदी निरभ्र आहे. दुधापेक्षाही शुभ्र चांदणं पड़लं आहे. बाकी सार शांत आहे. खेळून दमलेलं लहान मुलं झोपावं तसा अवखळ वारा विसावला आहे. किंचितसा गारवा मात्र मनमोकळेपणाने सा-या माळरानावरून भिरभिरतो आहे. आणी त्याला साद घालीत आहे एक टिटवी.
January 5, 2019
कामिनीच्या रखवालदाराने दरवाजा उघडला. मी घाबरत घाबरत त्याच्याकडे बघितले. बायको एकदम रुबाबात शिरली, रखवालदार जणू तिच्या दृष्टीने एखादे झुरळच! मी गुपचूप त्या भव्य आणि पॉश दुकानात, केविलवाणे पणाने इकडे तिकडे पांढरे कापड शोधीत होतो. सौ. ने आपला मोर्चा भरजरी साड्यांच्या काऊंटरकडे वळवला! मी घाबरत घाबरत म्हणालो, "अग, आपल्याला पांढरं कापड घ्यायचंय ना?"
"गप्प बसा हो! तुम्ही मुकाट्याने या माझ्या मागून ! मी बघते काय करायचे ते!"
काऊंटरवरच्या सेल्समनने स्वागत केले, "या या बाईसाहेब, काय दाखवू? पैठणी, कोईमतुरी, ब-हाणपुरी, संबळपुरी, नारायणपेठी, जिजामाता, इचलकरंजी, टिश्यू, गार्डन, शिफॉन, सिल्क, पोचमपल्ली, पॉलीएस्टर, ऑफीस वेअर, कॅज्युल वेअर, विपुल, कुंचर अजय, कल्पना सगळा लेटेस्ट माल आलाय."
आता तो पुणेरी लेंग्याचे कापड पण आहे असे म्हणतो की काय असे मला वाटले! पण हिला म्हणालो, "अगं आपल्याला लेंग्याचे कापड घ्यायचंय ना?"
"तुम्ही गप्प बसा हो! काय हो दुकानदार, तुमची काही हरकत नाही ना साड्या बघायला?"
"छे! छे! बाईसाहेब, अहो हे काय विचारणं झालं? अहो, मग आम्ही कशाला आहोत इथं? अहो गि-हाइकाचा संतोष हाच तर आमचा संतोष! बोला, काय दाखवू?"
"ती, तिकडे कोपऱ्यात आहे ना. तीच तीच, ती नाही हो, ती त्याच्या पलीकडे, त्याच्याच शेजारची, हां ती किरमिजीच हां, ती जरा दाखवा पाहू."
"काय आहे हो हे मटेरियल?"
'बाईसाहेब, फार लेटेस्ट फॅशन आहे. इचलकरंजी आणि बहाणपुरीचा मिक्स आहे. अलीकडे लग्नात फार चालते. पैठणी हिच्यापुढे फिक्की पडते. हा तुमचा चॉईसही फार मस्त आहे कलरचा.
"केवढ्याला बसेल हो?"
"फार नाही बाईसाहेब. फक्त दोन हजार. पण चीज काय आहे. पाच हजाराचा शो आहे मॅडम!"
"असं करा, ही राहू द्या बाजूला, ती वरच्या बाजूला आहे ना, ती तांबडी, हां ती काढा बरं जरा."
"वा! कित्ती छान! केवढ्याला हो?"
"फार नाही ताई, फक्त साडेतीन हजार! पटोला आणि नारायणपेठी दिमाख आहे. हा पल्लू पाहिलात बाईसाहेब? हे मोर पहा त्यावर. आणि तांबडा रंग फार खुलणार. कोणासाठी हव्यात मॅडम?"
"अहो, आता मुलाचं लग्न करायचंय ना, तेव्हा खरेदी करावी लागेल म्हणून ठेवतेय पाहून. आत लगेच काही घ्यायच्या नाहीत एवढ्या महागड्या."
"हो,हो, पहा ना बाईसाहेब. अहो पाहिल्याशिवाय कसे समजणार काय काय नवीन प्रकार आहेत ते? आम्ही बाईसाहेब, स्वतः जाऊन निवडक माल आणतो. नुसतं इथं बसल्या बसल्या नाही ऑर्डर देत. अख्या ठाण्यात फिरलात ना बाईसाहेब तरी आमच्यासारखी व्हारायटी मिळायची नाही कुठे. गि-हाइक एकदा आलं की पुन्हा यायलाच पाहिजे. बरे बाईसाहेब तुमचं साधारण बजेट काय. म्हणजे तसे दाखवायला बरं."
"हे पहा साधारण ५०० ते २००० च्या रेंजमध्ये दाखवा. त्यांच्यावरच्या पण दाखवा. पाहून ठेवते."
"अग,पण घ्यायच्या नाहीत तर कशाला उगाच त्यांना त्रास?"
"तुम्ही जरा गप्प बसा हो, ते दाखवताहेत तर तुम्ही कशाला नकारघंटा वाजवताहात?"
"साहेब, आपण जरा बसा इथं आरामात अरे गोविंद साहेबांना एखादं कोल्ड्रिंक आण बरं. आपण बसा साहेब." "हां, हे बरं झालं. तुम्ही बसा इथे आरामात. मी पहाते साड्या. अहो त्यांना नवीन सुरत पटोला आल्यात त्या त्यांचा एखादा नमुना दाखवाना."
'बाईसाहेब, त्या वरच्या मजल्यावर आहेत. अरे गोविंद, बाईसाहेबांना जरा वर प्रकाशकडे घेऊन जा बरं. साहेब तुम्ही बसा इथं. बाईसाहेब येतील जाऊन वर."
"तुम्ही बसा हो इथं, मी येते जाऊन वर. आणि बरं का हो दुकानवाले,
त्या साड्या ठेवल्यात ना बाजूला, त्या राहू द्या बरं का तशाच. मी येईपर्यंत देऊ नका कोणाला."
मला बसवून ती वर गेली. मी कोल्ड्रिंक पीत बसलो. ते आधुनिक चकचकीत दुकान बघत. खुर्ची आरामशीर होती. हवा थंडगार होती. बसल्या जागी माझ्या डोळा लागला. हिने हलवल्यावर मी जागा झालो!
"अहो उठा आता! झोपलात काय? चला झाली माझी खरेदी.'
"तुझी खरेदी? म्हणजे?"
"अहो, या दोन गार्डन शिफॉन, दोन कॅज्युअल वेअर आणि दोन नारायणपेठी घेतल्या. एका सुरत पटोला पण घेतली आणि कित्ती तरी प्रकार आहेत. सगळे पाहून ठेवले. आता राहुलच्या लग्नात खरेदी करायची ती इथेच!"
मी घड्याळात पाहिले. दोन तास होऊन गेले होते!
"आता आपण माझंपांढरं कापडघ्यायचं ना?"
"हो, ते आपण दीपकमधे घेऊ. साधं पांढरं कापड तर घ्यायचंय! त्यासाठी येवढं पॉश दुकान कशाला?"
"म्हणजे?"
"अहो इथं नाही मिळत ते!"
"अगं मघाशीच नाही का घ्यायचे? इकडे कशाला आणलं?"
"तुम्हाला किनई. कसली हौसच नाही मेली! कधी बघितलं होतं का येवलं चकाचक दुकान? मुद्दामच आणलं होतं तुम्हाला दाखवायला! चला जाऊ त्या दीपकमध्ये. तुमचं ते लेंग्याच कापड घेतलं ना की सुटले!"
"अग, पण मी म्हणत होतो ना तू कशाला त्रास घेतेस म्हणून? मी नसतं का आणलं? उगाच माझा वेळ मात्र गेला दोन तास! बरं किती झालं बिल?"
"काही नाही.फक्त पाच हजार!"
"काय? पाच हजार? अगंयेवढे पैसे नाहीत माझ्याकडे!'
"मला ठाऊक आहे. तुमचं नेहमीच असं असतं. कधी मार्केटिंगला निघालो तर पाकिटातून भरपूर पैसे घेणार नाहीत. ऐनवेळेला खाली पहायची वेळ येते.
"अगं, पण मला काय माहित तुला येवढ्या साड्या घ्यायच्यात ते? बरं थांब मी इथून राहूलला फोन करतोघरी आणि पैसे मागवून घेतो. तोपर्यंत बस इथं तूपण घे कोल्ड्रिंक."
"काही नको. येवढं घाबरू नका. मी करते सगळी सोय."
"म्हणजे?"
तिने पर्समधून क्रेडिटकार्ड काढून माझ्यापुढे धरले!!
--विनायक अत्रे
March 21, 2022
एक गायक म्हणून संपूर्ण कॅसेट गाण्याची माझी योग्यता आहे का, हे विचारण्यासाठी शंकर वैद्यांकडे गेलो. 'ही तुझ्या आवाजातील संपूर्ण कॅसेट आतापर्यंत रिलीज व्हायला हवी होती. थोडा उशीरच झालाय असे समजून कामाला लाग,' या शब्दात त्यांनी प्रोत्साहन दिले. कॅसेटच्या खर्चाचा अंदाज घेतला. तीस ते चाळीस हजार रुपये अपेक्षित खर्च होता. भाऊंनी कर्जाऊ पैसे देण्याचे मान्य केले. हे कर्ज दीड वर्ष काम करून माझ्या पगारातून फेडले जाणार होते. कॅसेटसाठी मी सर्व काही करायला तयार होतो. संगीतकार प्रभाकर पंडितांचा कॅसेटचा अनुभव दांडगा होता. त्यांनी खूप मार्गदर्शन केले. त्यांनाच कॅसेटचे संगीतकार म्हणून काम करण्याची विनंती केली. ते नामवंत संगीतकार असल्याने त्यांचे मानधन जास्त होते. ते कमी न करता त्यांनी टप्प्याटप्प्याने स्वीकारावे अशी विनंती केली. माझ्या एक एक गोष्टी ऐकून प्रभाकरजींना आणि पंडित वहिनींना खूप मजा वाटत असे. माझ्या अचाट साहसाचे त्यांना कौतुकही वाटत असे. शिवाजी पार्क, दादरमध्ये आता माझी तीन घरे अशी होती की जेथे मी कसलीही आगाऊ सूचना न देता बिनदिक्कत जेवायला जाऊ शकत असे. पहिले घर श्रीकांत ठाकरे यांचे व दुसरे घर प्रभाकर पंडितांचे आणि तिसरे घर यशवंत देवांचे. या तीनही महान संगीतकारांनी त्यांच्या गाण्यांबरोबरच मला जे प्रेम दिले, ते मी कधीही विसरू शकणार नाही.
'अरे, गाणी निवडली आहेस का कॅसेट करायला?' प्रभाकर पंडितांच्या शब्दांनी मी भानावर आलो. गमतीची गोष्ट ही होती की, कॅसेटच्या इतर कामांच्या नादात कॅसेटची गाणी कोणती असावीत हा विचारच मी केला नव्हता. मी त्यांनाच सल्ला विचारला. 'तुझी आणि तुझ्या कंपनीची पहिली कॅसेट विठ्ठलाच्या अभंगांची करू या.' प्रभाकर पंडितांनी सल्ला दिला. अभंगाच्या चाली बांधण्यात त्यांचा हातखंडा होता. भावनिकदृष्ट्या तर हा सल्ला बरोबरच होता, पण व्यावहारिकदृष्ट्याही तो योग्य होता. कारण विठ्ठलाच्या अभंगांची कॅसेट सीझनल नसते, ती बाराही महिने विकली जाते. ताबडतोब काही अभंग निवडून आम्ही रिहल्सलला सुरुवात केली. वरळीचा सिस्टीम रेकॉर्डिंग स्टुडिओ आम्ही निवडला. या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने एका अद्ययावत स्टुडिओच्या हाय डेफिनेशन माईकसमोर गाण्याची अग्नीपरीक्षा मला द्यायची होती. एरवीचे गाणे आणि या माईकसमोर गाणे यात जमीन अस्मानचे अंतर असते. तुमच्या गाण्यातील छोट्यातील छोटा दोषही हा माईक अचूक पकडतो. या स्टुडिओचे नामवंत रेकॉर्डिस्ट प्रमोद घैसास यांनी मनापासून मला याबाबतीत मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन. या रेकॉर्डिंग दरम्यान प्रमोद आणि मी चांगले मित्र बनलो. त्यानंतर माझ्या अनेक गाण्यांचे रेकॉर्डिंग प्रमोद घैसास यांनी केले. अनेक कार्यक्रमांसाठीही त्यांची साथ लाभली. आमची मैत्री आजही अतूट आहे.
१२ जानेवारी १९८७ रोजी सकाळी ठीक दहा वाजता माझे गुरु श्रीकांत ठाकरे यांनी आशीर्वाद देऊन रेकॉर्डिंगचा शुभारंभ केला आणि रेकॉर्डिंगला सुरुवात झाली. सकाळी दहाला सुरू झालेले रेकॉर्डिंग रात्री दहा वाजता संपले. त्या एकाच दिवसात मी आठही अभंग गायले. काम कठीण होते, पण रेकॉर्डिंगचा खर्च कमी करण्यासाठी ते आवश्यक होते. एका दिवशी दोनच गाणी अशी चैन मला परवडणारी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रभाकर पंडित आणि प्रमोद घैसास यांनी ट्रॅक मिक्स करून मास्टर तयार केला. त्यावेळी मास्टर स्पूलवर म्हणजे मोठ्या टेपवर होत असे. मग कॅसेटवर एक कॉपी घेऊन मी घरी आलो. आई-भाऊंबरोबर संपूर्ण कॅसेट ऐकली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. चार महिन्यांच्या अथक श्रमानंतर मलाही समाधान लाभले. यानंतर या कॅसेटचे कलात्मक मूल्यमापन टीकाकार आणि जाणकार रसिक करणार होतेच. पण ही संपूर्ण कॅसेट गाण्याची अवघड कामगिरी मी पूर्ण केली होती. आता कॅसेटचे कव्हर आणि त्याच्या कॉपीज करण्याचे काम होते. माझा आर्टिस्ट मित्र मिलिंद मोकाशी याने सुंदर कव्हर तयार केले. पण कॅसेट अॅसेम्बल करण्याचा खर्च मात्र माझ्या कॉपीज संख्येने कमी असल्याने फार वाटत होता. “अरे, तू स्वतः इंजिनीयर आहेस. कॅसेट अॅसेंब्लिंग तुला स्वतःलाच नाही का करता येणार?" भाऊंनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे नवा चॅलेंज टाकला. मी स्वीकारला. मुंबईला लॅमिंग्टन रोडला जाऊन मी कॅसेट अॅसेंब्लिंगचा पंधरा दिवसांचा कोर्स केला. नंतर आमच्या काही कामगारांना ट्रेनिंग दिले. कॅसेटचे सर्व पार्टस् बाजारातून विकत आणले आणि स्वर-मंचच्या पहिल्या कॅसेटच्या पाचशे कॉपीज तयार केल्या. लवकरच ४ फेब्रुवारी १९८७ या दिवशी कॅसेटचा प्रकाशन समारंभ आयोजित केला.
'गाऊ विठोबाचे नाम' या माझ्या पहिल्या संपूर्ण कॅसेटचे प्रकाशन माझे गुरू पं. विनायकराव काळे यांच्या हस्ते झाले. ख्यातनाम साहित्यिक वि. आ. बुवा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक चिटणीससर विशेष निमंत्रित होते. त्यांनी अतिशय परिणामकारक भाषण केले. आजही ते माझ्या स्मरणात आहे. कॅसेटमधील निवडक अभंगांचे मी गायन केले. कॅसेट निर्मितीच्या धडपडीत मनापासून सर्व प्रकारे मला मदत करणारा माझा जवळचा मित्र महेश वर्दे याने पहिली कॉपी विकत घेतली आणि नवीन कॅसेटच्या विक्रीला प्रारंभ झाला. मी माझी पहिली कॅसेट प्रकाशित झाल्यामुळे अतिशय आनंदात होतो पण या कॅसेटविक्रीचे काम किती कठीण असणार आहे, याची पुसटशी कल्पनादेखील मला नव्हती.
- अनिरुद्ध जोशी
July 10, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti