(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • संवाद आघाडीच्या उद्योजकांशी

    देशाच्या आर्थिक विकासात वेगवेगळ्या उद्योगांचा वाटा मोठा आहे. या उद्योजकांची वाटचाल कशी झाली याविषयी सर्वसामान्यांना कुतुहल असते. अनेक उद्योजकांची वाटचाल संघर्षमय होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी यश मिळवले आणि देशातील आघाडीचे उद्योजक म्हणून स्थान मिळवले. अशा काही आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधून ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्या लेखणीतून ‘नवभारताचे शिल्पकार’ हे पुस्तक साकारलं आहे.

  • जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार

    वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.

    मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो. चार दिवस त्याच्या कौटूंबिक जिव्हाळ्याचा पाहूणचार घेतला. खेड्यामधले घर कौलारु म्हणतात त्याप्रमाणे एक प्रशस्त जुन्या बांधणीचा वाडा. पुढे मागे मोठे अंगण व फुलबाग होती. वसंताची ह्या सत्तरीमधली दिनचर्या बघून मी हरकून गेलो. खूप गम्मत मौज आनंद वाटला. त्याच्या प्रत्येक हलचालीने मनाची बरीच करमणूक झाली. आणि कांही प्रश्नचिन्ह मनामध्ये उत्पन्न झाले.

    प्रातःसमयी चारचा सुमार असावा. माझी झोपमोड झाली, ती कानावर पडलेल्या भजनानी. वसंता तानपूरा घेवून संतांचे अभंग अतीशय तन्मयतेने ताना मारीत, आलापांत एकरुप होऊन पहाडी अवाजांत म्हणत होता. त्यानेच छेडलेले सतारीचे बोल, त्याला साथ करीत होते. मी गादीवर बसून ते सारे एकाग्रतेने ऐकत होतो. एक वेगळांच आनंद घेत होतो. वसंताची ही गायनकला माझ्यासाठी अपरिचीत होती. त्याने साठीनंतर ती आपल्यापरी आत्मसात करण्याचा प्रयत्न चालवला होता. प. भिमसेन जोशींचे आलाप व गायन त्याने तंतोतंत उभे केले होते. त्याच्या ईश्वराच्या भजनासाठी मी त्याला मनापासून धन्यवाद देत अभिवादन केले.

    संध्याकाळचा चहा अटोपून आम्ही मागील अंगणात गेलो. त्याचे दोघे नातू ७-८ वर्षाचे व त्यांचे तीघे मित्र गोट्या खेळत होते. मध्यभागी गल केलेली होती. त्याच्या भवती वर्तूळ केले होते. व प्रत्येकाची एक रंगीत गोटी विखूरलेली होती. प्रतिस्पर्ध्याची गोटी रिंगणाबाहेर गोटीच्याच सहाय्याने उडविणे, व आपली गोटी रिंगणात गलीमध्ये टाकणे हा प्रत्येकाचा प्रयत्न होता. बोटाच्या कांड्यावर गोटी ठेऊन बोटाला बाक देत स्प्रिंगचा आकार व गती ने समोरची गोटी उडविण्याची कला सर्वानी साधली होती. अचुकता आणि नेम यानी तो खेळ मनास करमणूक करीत होता. आम्ही अंगणात जाताच सर्वानी गलका केला.

    ״ आजोबा तुम्हीपण या तुमचीच आम्ही वाट बघत होतो. ״ हे पालूपद सर्वानी लावले.

    वसंताने मला बाकावर बसण्याची खून केली. व तो चक्क त्यांचा एक बालमित्र म्हणून खेळण्यांत सामिल झाला. आश्चर्य म्हणजे चार सहा गोट्या त्याच्या खिशांत आधीच होत्या. सर्वांचा खेळ खूप रंगला. वसंता आपले वय विसरुन त्यांच्यातला एक संवंगडी झाला होता. एकमेकावर आरोप करणे, ओरडणे, रागावणे, खोटेपणा करणे, खेळातील तथाकथीत नियमांना बगल देणे, व आपोआपच खरे कसे हे पटविण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत होता.

    वसंता आजोबा म्हणून मागे पडला नाही. तो पण त्याचा सुरांत, वादविवादांत, हमरीतुमरीवर येत असे. खेळ संपला, गोट्याचे वाटप झाले. आणि आजोबांनी सर्वाना भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा दिला.

    रात्रीच्या जेवणाची तयारी होत होती. गरम गरम कांदाभजी करण्याची सुचना दिली गेली होती. बैठकित मोठा गालीचा होता. मी मासिक चाळत बसलो होतो. माझे लक्ष कोपऱ्यांत बसलेल्या वसंताच्या तीन वर्षे वयाच्या नातीकडे गेले. ती तीच्या सहा वर्षाचा भाऊ दादू आणि वसंता सर्वजण समोरासमोर बसून आपडी थापडी खेळत होते. आपडी थापडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काढू, तेलंगीचा एकच कान, धर ग बेबी माझाच कान. धर त्या दादूचा कान. पुन्हा आपडी थापडी, आपडी थापडी गुळाची पापडी तेच पालूपद चालू. आणि दुसऱ्याचा कान धरल्या नंतर फिरण्याच्या हालचाली केल्या जातात. चाऊ म्याऊ पत्राळूतले पाणी पिऊ, हंडा पाणी गुडूप, म्हणत सर्वानी तोंडावर आपले दोन्ही हात ठेवले. किती मजेदार हलकी फुलकी आणि आनंद निर्माण करणारा हा शुशूखेळ होता.

    हसणे खिदळणे आणि ओरडणे, ह्यात छोट्या नातवंडासह वसंता एकरुप होऊन आनंद लूटत होता.

    " गरम गरम भजी वाढली, चला जेवायला हांक आली " आणि आम्ही सर्वजण उठलो.

    आज रविवार सुट्टीचा दिवस. वसंताचे दोन्ही मुले घरांतच होती. एक महाविद्यालयांत जाणारी नात अन्विता. सकाळचा फराळ झाला. अन्विता क्रिकेटचा पेहेराव घालून आमच्या समोर आली. ״ चला बाबा बाहेर पटांगणात ״ सर्वजण जमा झाले आहेत.

    ״ चला ״ म्हणत वसंता उठला व त्याने मला पण बाहेर येण्याचे सुचविले.

    ״ काय ? ह्या सत्तरीमध्येही तू क्रिकेट खेळणार. ? ״ मी विचारले

    ״ आफकोर्स परंतु खेळाडू म्हणून नव्हे, तर अँपायर म्हणून ״

    वसंता मला टाळी देत मोठ्याने हसला.

    दोन तासपर्यंत अन्विताच्या मैत्रीनी आणि वसंताच्या दोन्ही मुलांचे मित्रमंडळ, या सर्वानी कमीजास्त भिडूची टिम बनवत खेळांत रंगत आणली. पंचच्या भूमिकेंत वसंताने काटेकोर अट्टाहासी परंतु प्रेमळ स्वभावाने पंचगिरी चांगलीच केली. खेळ खुपच रंगला. सर्वानी त्याचा आनंद लुटला. घरांतून बेल वाजली. सर्वजण खेळ आटोपून जेवणासाठी या. बोलावले गेले.

    वसंता हा पेशाने डॉक्टर होता. सतत निरनीराळ्या रोग्यांच्या सहवासांत असे. एके काळी त्याला दैनंदिनीमधून इतर बाबीसाठी थोडीशी देखील उसंत मिळत नव्हती. आता वयानुसार तो दररोज सकाळी फक्त दोन तास प्रॅक्टीस करण्यांत घालवीत असे. सामाजिक कार्यांत आता त्याचा कल वाढला होता. वैद्यकिय शिबीरे आयोजीत करणे, गरीब गरजूना मदत करणे, ह्यात त्याचा बहूतेक वेळ जाई. शासनाच्या कुटुंब कल्याण योजना, पल्सपोलीओ, माताबाल शिबीरे, अशा कार्यक्रमांत तो हिरिरीने भाग घेत असे.

    आजचा माझ्या मुक्कामाचा वसंताच्या घरातील शेवटचा दिवस होता. दुपारचे जेवण आटोपून मी निघणार होतो. आज जेवणाचा स्पेशल व चमचमित बेत आखला असल्याचे कळले. त्याच बरोबर मी तेथील इतर मित्र मंडळीसमवेत गप्पागोष्टींत व्यस्त रहावे, ही वसंताची प्रेमळ सुचना होती. आज तो स्वयंपाक घरांत राहून, खाद्य पदार्थांचे मार्ग दर्शन करणार होता. मी हसतच त्याच्या उत्साहाला मान्यता दिली.

    दोन अडीच तास झाले, अजून वसंता कां आला नाही. काय करतो इतका वेळ त्या स्वयंपाक घरांत. मला उत्सुकते बरोबर गम्मतही वाटली. मी उठलो व स्वयंपाक घरांत जाऊन डोकावले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वयंपाक घरांत फक्त वसंता एकटाच होता. आणि तो जेवणातील पदार्थ करण्यात मग्न होता. One man's show. It was great Vasanta only. त्याच हेही रुप बघून मी चकीत झालो. भारावून गेलो. गरम गरम जिलेब्या तो तळत होता. भरलेल्या वांग्यांची भाजी, पुलाव, ताकाची अतिशय चवदार कढी हा अप्रतीम बेत त्याने एकट्याने यशस्वी केला होता.

    जीवन एक रंगभूमी आहे असे म्हणतात. आपण प्रत्येकजण फक्त नटाच्या भूमिकेंत असतो. नटाला वेळोवेळी, प्रसंगाप्रमाणे मुखवटे बदलावे लागतात. त्याच भूमिकेत इतके एकरुप व्हावे लागते की ते पात्र जीवंत वाटावे. परिणामकारक भासावे. कुणी संत सज्जन बनून व्यासपिठावर येतो. सर्वांची मने प्रेमाने वा आदराने भारवून टाकतो. तोच खलनायक या भूमिकेत सर्वांच्या मनामध्ये राग तिरस्कार ह्या भावना नीर्माण करतो.

    ह्याच ठिकाणी त्या कलाकाराच्या कलागुणांची कदर होते. त्यालाच प्रेक्षक नटसम्राट ही पदवी देतात. संसारातील त्याचे निजी जीवन आणि रंगभूमिवरचे जीवन ह्यात खूप तफावत असते. रंगभूमि ही नैसर्गिक जीवन कसे असते, हे दाखवितानाच, ते कसे असावे ही देखील अपेक्षा व्यक्त करते. येथेच नट वा कलाकार आपल्या भावना सुलभतेने बदलताना दिसतात. हे सारे बाह्यांगी घडत असते. बदल हा जणू मुखवटा ( Mask ) बदलण्या सारखे सहज होऊ शकते. निर्माण झालेल्या परिस्थितीची झळ त्याच्या अंतरात्म्यापर्यंत केंव्हांच पोहचत नसते. मनालाही फारसा धक्का बसत नसतो. सारे होत राहते ते वैचारीक स्थरावर. हा केवळ विचारांनी विचारांचा संवाद असतो. त्यानुसार चेहऱ्यावर भाव व हातवारे करुन भाव दर्शविले जातात. त्यांचा उगम बौद्धिक स्थरावरच असतो. त्यात खऱ्या भावनेचा ओलावा नसतो. येथे खरी भावनिक गुंतवणूक केंव्हांच नसते. हां हे मात्र सत्य असते की, व्यासपिठावर जो वैचारीक व भावनिक गुंता निर्माण केला जातो, तो कृतिम असतो. परंतु हुबेहुब नैसर्गिक वाटावा असा प्रयत्न होतो.

    सत्य जीवनातील व्यक्ती कशी असते. तीच बोलण, वागण, हालचाली, वेषभूषा, इत्यादी कशा असतात ? त्याच चित्रण केल जात. सार बौद्धीक वैचारीक स्थरावरच दर्शनी project केल जात, भावना विचार दिसतात. पण ती कढ वा खोली त्यात केव्हांच नसते. खरा भावनेचा अविष्कार हा मात्र त्याच्या सत्य आयुष्याचा रंगरुपांत कार्यांत दिसतो.

    वसंतानी हे भिन्नत्वाच स्वरुप साध्य करुन जीवन एक आगळ वेगळच केल होत. जीवन कस असावे, ह्यापेक्षा जीवन किती अंगांनी परिपूर्ण असावे ह्याच झलक दर्शन मला त्याच्या त्या चार दिवसाच्या सहवासांत झाले.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कूटकाव्य

    एक लावण्यवती तिच्या मैत्रिणीं सोबत पाणवठ्यावर गेली असतांना समोरून एक राजकुमार येतो आणि तिच्यावर मोहित होऊन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कसा दिसतोय मी ? तेव्हा राजकुमारी त्याला उत्तर देते …

  • बायकोचा मित्र

    संध्याकाळचे सव्वा पाच वाजत आले होते, आज वेळेवर निघावं असा विचार करून आकाश भराभर टेबल आवरत होता. ईतक्यात मोबाईलचा मेसेज टोन वाजला. एका हाताने टेबलचा ड्रॅावर बंद करीत आकाशने मेसेज उघडला, "I want you to do a favor for me. Will you become friend of my wife?" मेसेज अरविंदने पाठवला होता. आकाश थोडा गोंधळला. अरविंद त्याला दोन वर्ष सिनियर होता. एका प्रोजेक्टच्या निमित्ताने दोघांनी तीन महिने सोबत काम केलं होतं. दोघांचे विचार जुळले अन् तिथूनच त्यांची गट्टी जमली होती. हा काय प्रकार आहे असा विचार करून आकाशने नंबर डायल केला.

    "आकाश, मी थोडा कामात अडकलोय, १५-२० मिनिटे लागतील, थांबतोस?" पलीकडून अरविंदचा आवाज आला.

    "अरेsss., घरी काम आहे, मला लवकर जायचं होतं, असा मेसेज का पाठवलास? "

    "जमत असेल तर थांब नं प्लीज, बोलायचं आहे काही." अरविंद.

    आकाशने क्षणभर विचार केला, "ठीक आहे, थांबतो मी, भेटू आपण."

    आकाशने घरी फोन करून यायला उशीर होईल असा निरोप दिला अन अरविंदची वाट पहात तो ऑफिसच्या पोर्चमध्ये फेऱ्या मारू लागला."तुझी संध्याकाळ खराब तर नाही केली मी?" अरविंदचा आवाज ऐकून त्याने मागे पहिले.

    "नाही, नक्कीच नाही, काम होतं मला, पण ते उद्याही होऊ शकतं. असा कसा मेसेज पाठवलास? पुढचा बकरा मी तर नाही ना?" आकाश.

    अरविंदला थट्टा-मस्करीची भारी हौस, प्रत्येक वेळी एकेकाला गाठून तो त्या व्यक्तीची गंमत करायचा, मनात काही नसायचे पण चाबी भरायला त्याला मजा येई.

    "बकरा? नाही यार, तो मेसेज मी सिरीयसली पाठवला होता."

    "अच्छा? कि सिरीयसली गंमत करण्यासाठी पाठवला होता?" आकाशने थट्टेने विचारले. अरविंदला पूर्वी कधीही गंभीरपणे बोलतांना ऐकलेले नसल्याने आकाशचे समाधान होत नव्हते. "चल, निघूया का?" अरविंद चालत बस-स्टॅापकडे निघाला, आकाश त्याच्यासोबत चालू लागला.

    अरविंद एका प्रसन्न व्यक्तिमत्वाचा धनी होता, हसत-हसवत जगणं हा त्याचा पिंड होता, तो सिरीयस होऊ शकतो हे आकाशसाठी नवीन होतं. अरविंद अजूनहि विचारात दिसत होता. बहुदा शब्द जमवत असावा.

    "बोल, काय प्रॉब्लेम आहे?" अरविंदचा अबोला तोडत आकाशने विचारले.चालत-चालत ते दोघं एका गार्डन समोर आले. आतमध्ये लहान मुलं खेळत होती. काही वेळ त्यांना पाहण्यात अरविंद गढून गेला, आकाशची अस्वस्थता ताणली गेली.

    "ही लहान मुलं बघतोयस नं? केवढी एनर्जी असते त्यांच्यात?" अरविंद काहीसा हरवलेला वाटत होता.

    "खरय, मस्त हुंदडत असतात, एकदम नो-टेन्शन, आपण मोठं व्हायलाच नको होतं असं वाटतं कधी कधी." आकाश.

    "त्यांना टेन्शन का नसतं माहितीये?" अरविंद.

    "त्यांना उद्याचा विचार नसतो...." आकाश खांदे उडवत बोलला.

    "खरं आहे. समोर आहे तेच आणि तेवढंच त्याचं आयुष्य असतं. त्यातच तल्लीन होऊन त्यांचं सर्व काही सुरु असतं, आपोआपच इतर गोष्टी त्यांच्यासाठी गौण ठरतात. मग टेन्शन असं म्हणून काही उरत नाही. जस-जसे आपण मोठे होत जातो, हि तल्लीनता आपण गमाऊन बसतो. इतर गोष्टी, ज्या खरच तितक्या महत्वाच्या नसतात त्या आपल्या मनाचा पगडा घेऊ लागतात. हातात एक असतं अन् डोक्यात एक. मग जीवाची घालमेल सुरु होते आणि प्रत्येक क्षणातलं ते जगणं आपण हरवून बसतो." रस्त्याकडे तोंड करून असलेल्या गार्डनबाहेरच्या एका बाकावर अरविंद बसला. त्याला काही तरी बोचतंय याची एव्हाना आकाशला कल्पना आली होती. ओळख झाल्यापासूनचा अरविंद आणि आजचा अरविंद यांत खूप त्याला फरक जाणवत होता. आकाश शेजारी बसला, अरविंद शांतपणे रस्त्यावरची वर्दळ न्ह्याहाळत होता.

    "बघतोयस ना तू? रस्ता घरी जाणाऱ्या लोकांनी कसा भरलेला आहे. सर्वचजण घरी जाण्यासाठी धावपळ करत आहेत." थोडं थांबून अरविंद पुन्हा बोलला," मला रोज संध्याकाळ झाली कि पोटात गोळा येतो रे, घरी जायची भीती वाटते मला."

    "अरविंद?" आकाश जवळ-जवळ ओरडलाच, त्याचे डोळे विस्फारले. हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं.

    "लग्नाला सहा वर्ष झाली आहेत, बायको दिसायला सुंदर आहे. तीन वर्षांची गोड सई आहे, चार-चौघांसारखा वाटेल असा संसार आहे, तरीही..... .." अरविंद थबकला.

    आकाशचा आपल्या कानांवर विश्वासचं बसत नव्हता. क्षणातच त्याच्या डोळ्यासमोरून अरविंदची मागच्या दोन वर्षाची झलक गेली. ती मौज-मस्ती, खळाळून हसणं, इतरांना जगण्याची उमेद देत दिवसभराची काम उरकणं. हा तोच अरविंद आहे? आज हा असं का बोलतो आहे? याची दुखरी बाजू आहे तरी काय? आकाशच्या डोक्यात प्रश्नांची गर्दी जमू लागली.

    अरविंद पुन्हा बोलू लागला."लग्नाआधी जेंव्हा मी तिला पाहायला गेलो होतो, मी तिला एकचं प्रश्न विचारला होता, "तुला आयुष्यं कसं जगायचं आहे? तसं काही ठरवलं नाही, जसं समोर येईल तसं....” हे तिचं उत्तर होतं आणि ते ऐकून मला खूप आनंद झाला होता. त्या उत्तरात मला समोर खेळत असलेल्या ह्या मुलांची मानसिकता दिसली होती. वाटलं होतं कसलेही पूर्वग्रह मनात नं ठेवता जे समोर येईल त्याचा स्वीकार करत आनंदात जगायचं असं तिचं तत्वज्ञान असेल. माझ्यासारखं .." समोर विजेच्या खांबावर दोन पक्षी बसलेले होते. त्यांच्याकडे हरवलेल्या नजरेने पाहत अरविंद बोलला.

    "मग, ती खोटं बोलली होती का?" आकाश.

    "नाही... ते खरं होतं, खूप खरं होतं". अरविंदनं एक दीर्घ उसासा टाकला. रस्त्यावरची रहदारी थोडी कमी झाली होती, रिकाम्या रस्त्याकडे पाहतच तो पुन्हा बोलू लागला, "चॅाईस म्हणून काही तिच्या गावीच नाहीये आकाश. ती कुठलाच निर्णय घेऊ नाही शकत. कायम गोंधळलेली असते, त्यापेक्षा निर्णयच घेणं नको म्हणून तिचं उत्तर तसं होतं. मी मात्र उलटं समजलो."

    "ठीक आहे अरविंद, त्यात इतकं नाराज होण्यासारखं काय आहे? बऱ्याच मुलीना लग्नाआधी घरी एक्स्पोजर नसतो, त्यामुळे असा प्रॉब्लेम होऊ शकतो. तू तिला आत्मविश्वास दे, तिची तिला जबाबदारी घेऊ दे, जमेल तिला निर्णय घेणं." आकाश समजावणीच्या सुरात बोलला.

    "ते इतकं सोपं असतं तर तुला मेसेज का करावा लागला असता मित्रा? खरी अडचण तिथेच तर आहे." अरविंद.

    “मी नाही समजलो.” आकाश.

    “ती post-graduate आहे. पण फक्त डिग्री मिळवायची या हेतूनं शिकलेली. त्यामुळे अभ्यास कशाला म्हणायचं, ज्ञानाच्या साह्याने आपलं व्यक्तिमत्व कसं खुलवायचं याचा काहीच विचार तिच्याकडे नाही. कधीच अवांतर वाचन करणार नाही, वाचलं तरी काही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे जगात कुठे काय घडत आहे त्याचा आम्हाला पत्ताच नाही. मी यावर काही बोललो तर माझ्यावरच चिडते. पुस्तकात खोटं लिहीलेलं असतं हे तिचं तत्वज्ञान. घरात येणारी वर्तमानपत्रदेखील वाचत नाही. कोणताच छंद नाही कि काही आवड नाही.” दोन्ही गुढघ्यांवर हाताचे कोपरे टेकवून अरविंदनं आपला चेहरा तळव्यांमध्ये झाकून घेतला . काही क्षण शांततेत गेले.

    “तुला वाटत असेल मी जे काही बोलतो आहे ते सगळं सुखी संसारासाठी तितकंसं आवश्यक नाहीये , हो नं ? ” अरविंदनं मान वळवून आकाशच्या डोळ्यात पाहत विचारलं. आकाशच्या ह्रदयातून एक कळ उठली. रोज ऑफिसमध्ये दिसणारी अरविंदच्या डोळ्यातली ती चमक गायब होती. इतरांना आश्वासक वाटणारे , जगण्याची दिशा दाखवणारे डोळे आज मात्र स्वतःमध्येच हरवलेले दिसत होते.

    “होss, म्हणजे ….म्हटलं तर आवश्यक नाहीये अन म्हंटल तर खूप काही आहे....हे... सर्व ” आकाश खाकरत बोलला.

    “एकदम मान्य आहे. मी हेहि समजू शकतो कि प्रत्येकाची एक उपजत वृत्ती असते. प्रत्येकच जण जगण्याची आपली एक रीत घेऊन जन्माला येतो. त्यामुळे मी जे म्हणतो आहे ते सर्वं तिनं करावं असं मला वाटत असलं, तरी तिच्यावर मी ते कधीच लादलं नाही. खरी अडचण दुसरीच आहे .” संध्याकाळ ओसरू लागली होती, अंधाराने हळूहळू आपलं जाळं विणायला सुरुवात केली होती.

    "तिनं घराशी, घरातल्या माणसांशी, माझ्या मित्रांशी आणि तिच्याही मित्रांशी आपली बांधिलकी जपावी, सगळ्यांना लळा लावावा इतकीच माफक अपेक्षा आहे रे माझी. आजपर्यंत ती कोणाशीच नातं जुळवू नाही शकलीय. या अख्या जगात कोणीच नाहीये, ज्याला ती माया लावेल, जीवापाड जपेल, अगदी पोटच्या पोरीलासुद्धा. खूप आत्म -केंद्रित आयुष्यं जगतेय. घरात कोणाशीच तिचं पटत नाही, कोणी समजवायला गेलं तर उलटून बोलते. मी उभ्या आयुष्यात कधीच कोणाशी वाद घातलेला नाही, पण तिच्याशी मात्र माझा यावरून रोज वाद होतो.

    तुला तर माहिती आहे कि मला बोलायचा किती सोस आहे. दगडालाही बोलायला लावीन असा अभिमान बाळगून होतो मी; पण माझ्या घरी गेलो कि माझाच दगड होतो. माझी अक्षरश: वाचा बसते. तिला कितीही चांगलं बोला.. कितीहि सरळ बोला, ती त्याचा नेमका उलटा अर्थ घेते अन मग कुर-बुर सुरु होते." अरविंद थोडं थांबला, पुन्हा बोलू लागला, "मी ऑफिसमधून घरी गेलोय, तिनं बॅग माझ्या हातातून घेतली अन कसा होता दिवस असं मला विचारलं हे गेल्या सहा वर्षात एकदाही झालं नाही . उलट दारात बूट काढतो न काढतो तोच तिचा आवाज कानावर येतो, आज आई असं बोलल्या, आज बाबा असं म्हणाले, सई माझं ऐकतच नाही, कधी काही तर कधी काही. सततचे रुसवे -फुगवे , इतरांवर संशय ….. त्यातून होणारी वादा-वादी … मी आता कंटाळलोय रे. खुपवेळा समजून सांगितलं पण तिच्यात काहीच फरक पडत नाही. जसा मनमिळाऊपणा नाही तसंच समर्पणभावही नाही. तिचं समर्पण जसं किचनमध्ये दिसलं नाही तसच ते मला कधी बेडरूममध्येहि जाणवलं नाही. अरविंद हताशपणे बोलला.

    “तुम्ही शांतपणे समोरासमोर बसून कधी चर्चा नाही केलीत?” आकाशने विचारले.

    “आजवर फक्त चर्चाच तर केली. आपण सुशिक्षित घरात वाढलेलो. त्यामुळे, तिला समजावून सांगण्यापलीकडे दुसरं काही करू शकलो नाही अन् फक्त बोलून तिच्यात फरक काही पडत नाही. स्त्री -अत्याचारावर आवाज उठवणाऱ्या लोकांना माझ्यासारख्या पुरुषाचा कोंडमारा कधी समजेल का रे?” अरविंदच्या आवाजात कंप जाणवू लागला होता. त्याचे डोळे पाणावले.

    “शांत हो, अरविंद , मी समजू शकतो तुझी मनस्थिती .” आकाशला खुप वाईट वाटत होते. एका संवेदनशील मनाच्या माणसासोबत नियतीने विचित्र खेळ केला होता.

    “तू तो मेसेज पाठवलास त्याचा अर्थ काय होता? मी कशी मदत करू शकतो तुला ?” आकाश.

    अरविंदने दोन्ही हातानी आपले डोळे पुसले . “तिच्या मनाचा हा ग्रह आहे कि घरातल्या इतर लोकांचं ऐकून, त्यांना सोयीस्कर असच मी तिला वागायला लावतो. त्यामुळे मी समजावून सांगितलेलं काहीएक तिला ऐकायचं नसतं. लग्नानंतर 2-3 वर्षातच माझ्या लक्षात आलं कि माझ्याकडून तिला समजावणं शक्य नाही . तेंव्हापासून मी तिच्यासाठी एका मित्राच्या शोधात होतो. जो तिच्याशी ह्या गोष्टींवर चर्चा करू शकेल. तिच्या वागण्याने घरातल्या छोट्या छोट्या आनंदावर कसं विरजण पडतंय हे तिला उदाहरणासहीत समजावून सांगेल. तिला हे पटवून देईल कि इतरांवर प्रेम करण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःवर प्रेम करता आला पाहिजे. तिचा खरा प्रॅाब्लेम low self-esteem आहे. स्वतःवरच प्रेम नाही त्यामुळे विश्वास नाही. ती सतत कसली तरी भीती बाळगून असते. काही तरी गमावण्याची ती भीती तिला आनंदाने जगू देत नाही. मग इतरांपासुनही तो आनंद ती हिरावून घेत राहते. आयुष्यातल्या शाश्वततेचा प्रत्यय तिला येणं खूप आवश्यक आहे आकाश. ती शाश्वतताच तिला शांत आणि समाधानी करू शकेल.” अरविंदला थांबवून काही सुचवण्याचा प्रयत्न करावा असा एक विचार आकाशच्या मनात येऊन गेला. परंतु, अरविंदला मोकळं होऊ देणं गरजेचं होतं, म्हणून आकाश शांतच राहिला. अरविंद बोलत होता..

    “तिची सुद्धा काही दुःखं असतील, काही वेदना असतील. त्या जाणून घेण्याचा मी खुपदा प्रयत्न केला, पण तिने कधीच माझ्यासमोर स्वतःला उकललं नाही. ती अढी मला कधी सुटलीच नाही. व्यक्त होता आलं तर बहुधा ती थोडी खुलेल. म्हणूनच, मला असं वाटतं कि मन मोकळं करायला तिला एक मित्र असावा. जो तिला डोळसपणे जगाकडे पाहायला शिकवेल. तिला हे पटवून देईल कि जगात चांगल्या माणसांची काही कमी नाही पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या डोळ्याची भिंग adjust करता आली पाहिजे. सगळ्यांकडे आपण एकाच भिंगातून पहायचं नसतं. तू हे करू शकतोस आकाश." आकाशकडे पाहत अरविंद बोलायचे थांबला

    "तू म्हणतोस ते ठीक आहे. पण माझ्यापेक्षाही एक मुलगी हे काम चांगलं करू शकेल असं नाही वाटत तुला? म्हणजे ...त्या दोघी मन-मोकळी चर्चा करू शकतील. आपल्या ऑफिसमध्ये मृणाल आहे. आपण जर हे तिला सांगितलं तर? " आकाशने विचारलं.

    "मी पण तोच विचार केला होता आधी. माझ्या एका मित्राच्या लहान बहिणीला फार पूर्वी मी या बाबतीत बोललो होतो. मला मदत करायची ठरवून तिने प्रयत्नहि सुरु केले होते. अधून-मधून घरी यायची, हिच्याशी गप्पा मारायची, तिला घराबाहेर पडायला प्रोत्साहन द्यायची. नाही म्हणायला थोडा-फार परिणामहि दिसू लागला होता. ती घरी आल्यावर साहजिकच आमचहि बोलणं व्हायचं अन नेमका तिथच घात झाला. तिनं आमच्यावरच संशय घेणं सुरु केलं. रोज आदळ-आपट. मनात राग धरायचा आणि समोरच्यावर काढायचा. प्रसंगी रागाच्या भरात सईला मारहाण करायची. शेवटी कंटाळून मीच तिला घरी येऊ नको म्हणून विनंती केली. ती वाटदेखील बंद झाली." अरविंद आपल्या तळ-हातावरच्या रेषांकडे बघत बोलला. जणू नशिबात काय लिहिलं आहे हे शोधायचा तो प्रयत्न करत होता.

    आकाशला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. कोणी इतकं सूड बुद्धीने वागत असेल? इतका चांगला नवरा मिळाला तरी ही बाई असं का वागतेय? आकाश मनाशी विचार करू लागला.

    "आकाश, मला माझ्या घरात विसाव्यासाठी एक जागा तेवढी हवी आहे. खरंतर, पती आणि पत्नी या दोघांच्याहि आनंदाच्या जागा जर सारख्याच असतील तर तो संसार आयुष्यभरासाठी एक सोहळा होऊन जातो. असंच काहीसं स्वप्न मनात ठेऊन प्रत्येक जण लग्न करतो, मीदेखील तेच स्वप्न पाहिलं होतं. माझ्या नशिबी तो सोहळा नक्कीच नाही आला. तरी सईसाठी मला हा संसाराचा खेळ सुरु ठेवावाच लागेल. आणि त्यासाठी मला तुझी गरज आहे. माझं रोजचं जगणं थोडं सुसह्य व्हावं यासाठी तिच्यात improvement होणं गरजेचं आहे."

    "पण, अरविंद... मी?" आकाश गोंधळला होता.

    "आकाश, आपल्या दोघांच्या विचार प्रक्रियेत खूप साम्य आहे. त्यामुळे, आवाज जरी तुझा असला तरी विचार माझे असतील याची मला खात्री आहे. बोलत जा तिच्याशी. तुझ्यारूपाने एक संयमित मित्र अन मार्गदर्शक भेटला तर तिला जगण्याची एक नवी दिशा मिळेल. आणि हा विश्वासपण येईल कि स्त्री-पुरूषाच नातं ती विचार करते तितकं उथळ अन फक्त शारीरिक नसतं. चार दिवस साफ नाही केलं, तर सडणाऱ्या ह्या शरीराच्या जाणीवांईतकं मर्यादित तर मुळीच नसतं. पटू दे तिला की हे नातं निकोप आणि पवित्र सुद्धा असू शकतं.”अरविंदनं आकाशचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला, "बघ प्रयत्न करून. तुला माझ्या संसारातली कटुता थोडी जरी घालवता आली तर. करशील नं माझ्यासाठी इतकं ?" अरविंदने अजीजीने विचारले. आकाश सुन्न होता. भोवतालचा अंधार आता आणखीनच गडद झाला होता.

  • हे आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र आहे!

    दिवाळीच्या दिवसात, सं.शांतिब्रह्म, सं. घन अमृताचा, सं. ऐश्वर्यवती, यासारख्या माझ्या संगीत नाटकांचे, आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून झालेले प्रक्षेपण, केवळ रत्नागिरी केंद्रमुळेच शक्य झाले. आणि माझ्या आयुष्यातील यशाचा परमोच्च बिंदूसुद्धा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रमुळेच प्राप्त झाला.

  • मस्तीखोर फुगे

    आज वर्गात गेलो तर वर्ग एकदम शांत. माझ्यासाठी हे दृश्य नवीनच होतं. इतक्यात मिहिरने गाल फुगवून रोहनकडे बोट दाखवलं. सिमरनने पण तसंच केलं. तर शिल्पाने तोंड फुगवून प्रियाकडे बोट केलं. मला समजेना हा काय प्रकार आहे? प्रिया आणि रोहनला जवळ बोलावलं. तोंड फुगवून, हाताने खुण करुन विचारलं म्हणजे काय? प्रिया व रोहनने चुपचाप खिशातून फुगे काढून टेबलावर ठेवले.... आणि सगळा वर्ग फुगा फुटल्यासारखा ठॉपकन हसला.
    टेबलावर आता वेगवेगळ्या रंगाचे पाच फुगे होते. “काय करायचं या फुग्यांचं?” असं म्हणताच मुले एकदम उसळत म्हणाली,“फुगवूया... फोडूया.... उडवूया... त्यात पाणी भरुया... जादू करुया... काहीतरी धमाल प्रयोग करुया.” एकदम सही. आज आपण फुग्यांना मस्ती करायला लावूया... ढकलाढकली करायला लावूया.... नाचवूया... डोलवूया... एका जागेवर बसवूया...काय... चालेल? मुले ओरडली, चालेल काय म्हणता? हे तर मस्त धावेल. पण हे करायचं कसं?

    आम्ही फटाफट फुगे फुगवले. त्यातल्या दोन फुग्यांना दोरे बांधले आणि ते फळ्यावर अडकविले. हं चला, आता करु दे त्यांना मस्ती. “पण कशी ?” अस मिहिरने विचारताच त्याला जवळ बोलावलं. ते टांगलेले फुगे त्याच्या डोक्यावर खसाखसा घासले. आणि मग त्या दोन टांगलेल्या फुग्यांची आपापसात भांडणं सुरू झाली. त्यांची आपापसात ढकलाढकली सुरू झाली. त्यातला एक फुगा दुसऱ्याजवळ नेला की तो लांब पळायचा. सगळा वर्ग श्वस रोखून आणि डोळे मोठे करुन ही गंमत पाहात होता.

    आता आणखी एक गंमत पाहू. या भांडणाऱ्या फुग्यांमधे एक फुगवलेला साधा फुगा ठेवला. आणि काय मजा... त्या दोन भांडखोर फुग्यांनी या फुग्याला जाम धरुन ठेवलं. हे पाहून मुलांनी इतक्या जोर-जोरात आरडाओरडा केला की ते टांगलेले फुगे पण दचकले! व तो मधला फुगा घसरला. मग हा घसरलेला फुगा फळ्यावरच्या दुसऱ्या कोपऱ्यात बांधून ठेवला.
    मिहिरच्या डोक्यात मस्ती आहे म्हणून बहुधा या फुग्यांना मस्ती सुचली असावी. असं म्हणताच प्रिया म्हणाली, मग आता माझ्या डोक्यावर घासा पाहू हा दुसरा फुगा. पाहुया काय होतं? एक नवीनच फुगा प्रियाच्या डोक्यावर घासला. तो दुसऱ्या कोपऱ्यातल्या टांगलेल्या फुग्याजवळ नेला..... पण काहीही झाले नाही! मुले विचारात पडली. हे असं का झालं? हातात फुगा घेऊन प्रिया निरीक्षण करू लागली.

    मुलांना क्लू देण्यासाठी विचारलं, दोघांच्याही डोक्यावर ज्या ठिकाणी फुगा घासला त्या ठिकाणी तुम्हाला काय फरक दिसतोय पाहा बरं. “मिहिरपेक्षा प्रियाचे केस चकचकीत आहेत.” असं मुलांनी म्हणताच प्रिया म्हणाली, मी तेल लावलंय तेल!” “हां...! तेल लावल्याने जादू झाली नाही!!” असं मुले ओरडली त्याचवेळी सिमरन धावतच फळ्याजवळ आली.

    तिने प्रियाच्या हातातला फुगा हिसकावून घेतला. स्वत:च्या स्वेटरवर खसाखसा घासला. आता ती तो फुगा दुसऱ्या फुग्याजवळ नेणार इतक्यात प्रियाने तिला मागे खेचलं. सिमरनने आधारासाठी भिंत पकडण्याचा प्रयत्न केला,त्यावेळी तिच्या हातातला फुगा सुटला.... आणि काय हो चमत्कार... फुगा भिंतीला चिकटूनच बसला.
    वर्गातल्या सर्व शास्त्रज्ञांनी आनंदाने आरडाओरड करत टाळ्या वाजवल्या, कारण त्यांना हा एक नवीनच शोध लागला होता. मुले म्हणाली,“आता आम्ही सुध्दा घासाघिस करुन घरातल्या भिंतींवर चिकटवू की असे फुगे.”

    इतका वेळ रोहन अस्वस्थ होऊन पाहात होता. तो चटकन उठला आणि त्याने टेबलावरचा पाचवा फुगा उचलला. स्वत:च्या डोक्यावर घासला. फळ्यावरच्या दुसऱ्या कोपऱ्यात टांगलेल्या फुग्याकडे तो निघाला. फळ्याजवळ पोहोचला. आता रोहन आपल्या हातातला फुगा त्या टांगलेल्या फुग्याकडे नेणार इतक्यात सिमरन आणि प्रिया रोहनच्या दिशेने धावल्या. रोहनने टांगलेल्या फुग्याच्या दिशेने हात सरळ केला. त्याचवेळी प्रिया व सिमरनने त्याला मागे खेचलं आणि.... आणखी एक चमत्कार झाला! “इतकावेळ फळ्यावर लोळणारा फुगा एकदम हडबडून खडबडून जागा झाला. त्या फुग्याने रोहनच्या हातातल्या फुग्याकडे झेप मारली. रोहनच्या हातातला फुगा आणि हा फुगा यातले अंतर सुमारे दोन सेंटिमीटर होते.
    या अचानक झालेल्या हल्ल्याने रोहन दचकला व त्याने हात वर केला, इकडे तिकडे हलवला... आणि... तो टांगलेला दोरा अचानक ताठ झाला! रोहनच्या हातातल्या फुग्या समोर तो टांगू फुगा “ताठ दोऱ्याने व नाक वर करुन” नाचू लागला. हे दृश्य पाहून मुले टाळ्या वाजवायची पण विसरली.

    आता या मागचं रहस्य मुलांना सांगायचं ठरवलं.
    जेव्हा रबरी फुगा रेशमी, नायला दोन किंवा लोकरीच्या कपड्यावर घासला जातो तेव्हा कपड्यातील इलेक्ट्राॅन्स फुग्याच्या पृष्ठभागावर येतात आणि फुगा ऋणभारित होतो. असे दोन ऋणभारित फुगे जेव्हा एकमेकाजवळ आणले जातात तेव्हा ते एकमेकांना दूर ढकलतात. याला “अपसरण” म्हणतात. विद्युतभारित फुग्याजवळ जर साधा फुगा आणला तर तो मात्र आकर्षिला जातो. कारण दोन असमान विद्युतभार एकमेकांना आकर्षित करतात त्याला “आकर्षण” म्हणतात. भिंतीवर विद्युतभारित फुगा चिकटविला तर 'विषमभार आकर्षण' या तत्वामुळे फुगा भिंतीला चिकटतो. थोड्यावेळाने इलेक्ट्राॅन्स हवेत विरतात आणि भिंतीवरचा फुगा खाली पडतो.|

    आता आमच्या शालेतल्या मुलांनी नाच केला असेल की फुग्यांनी? आणि तुमच्या घरात फक्त तुम्हीच नाचता की टांगलेले फुगे? मला कळवाल?
    मी तुमच्या “मस्तीखोर पत्रांची” वाट पाहतोय.

    - राजीव तांबे.

  • अजब न्याय नियतीचा – भाग २

    नीलच्या ऑर्केस्ट्रा मध्ये येण्याने आरूच्या ऑर्केस्ट्राचा नावलौकिक वाढला होता. आरू आणि नील एकमेकांच्या प्रेमात पडले होते. एके दिवशी आरुला सिग्नलवरच्या दुकानात आवडलेला निळा ड्रेस आणि ज्वेलरी नीलने आरुला भेट दिली. एके रविवारी प्रॅक्टिसला सुट्टी होती. नीलने आरूला निळा ड्रेस घालून बीचवर भेटायला बोलावलं. नील तिला आज एक सरप्राईज देणार होता….

    चला तर बीचवर काय घडतंय ते पाहायला……

  • लॉकडाउन काळात आणि नंतर साहित्यात होणारे बदल

    लॉक डाउन मुळे प्रकाशन व्यवसायावर आणि प्रकाशित पुस्तका, काव्य संग्रह, कथासंग्रह वर चांगलाच परिणाम होणार आहे आणि झाला पण आहे. काहिं मासिकां च्या आवृत्या ज्या वर्षोपासुन नियमित निघायच्या त्यात खंड पडला. पण जे वेब मासिक निघत होते त्यांच्यावर असर झाला नाही.

  • एक आठवण – शांतिनिकेतनची

    मी 1977 ला  इस्टर्न कोलफिल्डस् लि. या कंपनीत  नोकरी करण्यासाठी  राणीगंज जवळच्या  परसिआ  या  खाणीत 18.1.1977 ला  जॉईन झालो.तो  दिवस मला  महत्वाचा  वाटला  होता ,माझ्याकरता.कारण एक चांगली वरचे पैसे  कमवू देऊ शकणारी  पीडब्ल्यूडी ची तीन वर्षांची महाराष्ट्रातील नोकरी  सोडून मी  इतक्या  दूर बंगालमध्यें आलो होतो.

  • भुजंगाची गर्लफ्रेंड! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ – १५

    आजचे त्यांचे ‘लक्ष्य’ होते ‘चार्मी!’ ‘चार्मी’ म्हणजे भुजंगरावांची लेटेस्ट गर्ल फ्रेंड! सुंदर, तरुण, स्मार्ट, मॉडर्न! (बाकी वर्णन तुमच्या कल्पना शक्तीवर सोडतो.)