(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • चाय’से पहेचान

    काहीजण माणसाच्या सहीवरुन, त्याचा स्वभाव ओळखतात तर काही जण चेहरा पाहून, स्वभाव ओळखतात.. आपण आता एकेकाच्या ‘चहा’वरुन स्वभाव ओळखायचा प्रयत्न करु.

  • सुरा मी वंदिले

    सदाशिव पेठेत असताना घरात रेडिओ नव्हता. समोरच्या जबरेश्वर हाॅटेलमध्ये बुधवारी ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम मोठ्या आवाजात लावला जात असे. तेव्हा अमीन सयानीच्या टिपीकल बोलीतून दहापासून पहिल्या ‘पायदान’पर्यंत एकेक गाणी ऐकलेला आशाताईंचा आवाज अजूनही कानात गुंजतो आहे.

  • एक आघात

    या नंतर मात्र पुढील महिन्यात मी एकही कार्यक्रम घेतला नव्हता. माझा सख्खा चुलत भाऊ प्रकाश याचे लग्न १ डिसेंबर १९९१ ला ठरले होते. त्यामुळे जोशी परिवारात प्रचंड धावपळ सुरू होती. लग्न भिवंडीला होते आणि दोनच दिवसांनी मोठ्या स्वागत समारंभाचे आयोजन पुण्याला करण्यात आले होते. दिवस गडबडीत जात होते. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे ३० नोव्हेंबरलाच आम्ही सर्वजण भिवंडीला रवाना झालो. माझ्या मामाकडेच आम्ही उतरलो होतो. १ डिसेंबरचा दिवस लग्नाच्या धामधुमीतच संपला. संध्याकाळी मी आणि माझी पत्नी प्रियांका स्वागत समारंभाच्या आयोजनात मदत करण्यासाठी काकाबरोबर पुण्याला निघालो. धावपळीने थकून गेल्यामुळे आई आणि भाऊ मात्र एक दिवस विश्रांती घेऊन मगच पुण्याला येणार होते. त्यामुळे ते ठाण्याला परत गेले. १ डिसेंबरला रात्री एक वाजता आम्ही पुण्याला पोहोचलो. हास्य, विनोद, चेष्टा, मस्करी सतत सुरू होती. त्यानंतर गप्पा रंगल्या. शेवटी रात्री अडीच वाजता निजानीज झाली. बरोबर पहाटे सव्वाचार वाजता पुण्याला फोन आला. भाऊंना हार्टअॅटॅक आला होता आणि त्यांना हॉस्पिटलला नेण्यात येणार होते. मी आणि प्रियांका तातडीने ठाण्याला परत निघालो. माझा धाकटा चुलतभाऊ प्रमोद त्याची इंजिनियरींगची परीक्षा सोडून आमच्याबरोबर निघाला. सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पुण्याहून निघण्यापूर्वीच माझ्या सासऱ्यांचा फोन आला. ते डॉक्टर होते. त्यांनी जे सांगितले ते माझ्यावर विलक्षण आघात करणारे होते. हॉस्पिटलमध्ये नेतानाच भाऊंची जीवनयात्रा संपली होती. फक्त ठाण्याला येईपर्यंत प्रियांकाला आणि इतर कुणालाच हे सांगू नका, अशी त्यांनी विनंती केली. गाडीमध्ये प्रियांका आणि प्रमोद मला समजावत होते की, आपण लवकरच ठाण्याला पोहोचू आणि भाऊही लवकरच ठीक होतील. मी काय बोलणार? मला नशीबाने एकदम पोरके करून टाकले होते. कायम त्यांच्याबरोबरच रहाणारे आम्ही भाऊ गेले त्या रात्री नेमके त्यांच्यासोबत नव्हतो. १ डिसेंबर १९९१ ला आमच्या घरचे लग्न आणि मग २ डिसेंबर १९९१ हा माझ्या आयुष्याला धक्का देणारा दिवस ठरला.स्मशानात जमलेल्या तमाम लोकांसमवेत आम्हां सर्वांना माझे भाऊ निरोप देत होते. त्यांचे असे अचानक निघून जाणे आम्हा सर्वांनाच अत्यंत धक्कादायक होते. मला ते नेहमी सांगत, "आज मी उभा असल्यामुळे माझ्या सावलीत तुला सगळे कसं छान छान दिसतेय. पण एके दिवशी मी नसेन आणि मग तुला सगळं कसं स्वच्छ-स्वच्छं, खरं-खरं दिसायला लागेल." आज तो दिवस आला होता. या एका दिवसाने सारे बदलले. आमचे घर बदलले. माझी आई बदलली. व्यवसाय बदलला. सर्वात लहान प्रियांका एकदम मोठी, कर्ती झाली. भाऊंच्या सावलीत खेळणारे, बागडणारे माझे व्यक्तिमत्त्व, माझे गाणे, माझे बोलणे एकदम प्रौढ झाले.

    भाऊ असताना अनेक सामाजिक संस्थांमध्ये भाऊंशी वादावादी करणारे लोक, भाऊ किती मोठे होते, ते मला सांगायला लागले. भाऊंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये अडचणी आणणारे लोक त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी आग्रह धरू लागले. भाऊंनी सांगितलेली एक एक गोष्ट आता मला पटायला लागली. ते अनेकदा म्हणत, “आज तुला कदाचित माझे बोलणे पटणार नाही, पण काही वर्षांनी तुला ते नक्कीच पटेल. फरक इतकाच असेल की, ज्या दिवशी तुला ते पटेल आणि तू मला सांगायला येशील, तेव्हा ते ऐकायला मी नसेन."

    भाऊंनी मला काय दिले? या जगात स्वतःच्या हिंमतीवर उभे राहण्याचा आत्मविश्वास दिला. एक भक्कम असा पाया दिला. त्यांनी केलेल्या अनेक सामाजिक कामांमधून जोडलेल्या माणसांचा मदतीचा हात दिला. त्यांचा मी एकुलता एक मुलगा असलो, तरी आई-भाऊंनी माझ्या मागे एक जिवलगांचा प्रचंड परिवार उभा केला. त्यामुळे मला कधीच एकटे वाटले नाही. आज परत भेटले तर भाऊ मला काय सांगतील? सुरेश भटांच्या गझलचा एक शेर ऐकवतील,

    काय सांगावे तुला मी, काय मी बोलू तुझ्याशी,
    राख मी झाल्यावरी, गीते तुला माझी स्मरावी...

    -अनिरुद्ध जोशी

  • नायगारा … निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार !

    भारतातील सर्वच प्रमुख नद्यांच्यामागे एखादी लोककथा (दंतकथा) दडलेली आहे. अशीच लोककथा नायगारा धबधब्याच्या बाबतीत असेल का याचा मी विचार करीत होतो. अमेरिका, कॅनडा ही प्रगत राष्ट्रे ! विज्ञान क्षेत्रात त्यांची प्रगती उल्लेखनिय ! त्यामुळे अशा निराधार दंत कथांवर त्यांचा विश्वास नसावा, अशीच माझी भावना! त्यामुळे नदी किंवा धबधब्याबाबत अशी एखादी लोककथा प्रचलित असेल असे मला वाटले नाही. परंतु बोटीत बसून धबधब्याजवळ जाताना कुणीतरी ‘मेड ऑफ दी मिस्ट’ असा शब्दोच्चार  केल्याचे मी ऐकले. ही ‘मेड ऑफ दी मिस्ट’ काय भानगड आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली; अधिक चौकशीअंती ती एक लोककथा असल्याचे समजले.

  • रुसू नको गऽ ताई (बालकाव्य)

    को रागवू ताई , होती गंमत ही खेळामधली चिडले कोणी तर डावातिल मजा निघुन जाते सगळी
    राग कधी नाकाच्या नकट्या शेंड्यावरती नये असू ।।
    फुगा फुटू दे रुसव्याचा हा, अन् ओठी येउ दे हसू ।।

  • एका कुटुंबाची करूण गोष्ट – भाग २ (आठवणींची मिसळ २८)

    तो भय्या इमानदार होता. वखारीचे उत्पन्न वर्षानुवर्षे तो त्यांना आणून द्यायचा. घर त्याच्यावर सोपवून बाळ दिल्लीला गेला. बाळला आतां त्या घरांत परत यावं असं वाटत असेल ? त्या घराचं भाडे भरायचा प्रश्नच नाही कारण विनाभाडे फक्त देवांची पूजा करण्याच्या अटीवर ते त्याच्या आजोबांकडे आले आहे. त्यामुळे ते विकताही येत नाही कारण त्यांच्याकडे मालकी हक्कच नाही. कोणी म्हणत त्या देवांमुळेच त्या कुटुंबाची वाताहत झाली. सुरूवातीला देवांची पूजा व्यवस्थित होई. कुटुंबावरची संकटे वाढली तशी त्यांना शंका यायला लागली. मग घरांतली देवांची खोली दिवसातून दोनदाच उघडू लागले. एकदा सकाळी पूजेसाठी आणि एकदा संध्याकाळी उदबत्त्या लावण्यासाठी. इतरवेळी दार बंद करून ठेवत. पण फार कांही फरक पडला नाही.

  • वरची खोली (कथा)

    मी एका बांधकाम कंपनीच्या भल्यामोठ्या कार्यक्षेत्रात नोकरी करणारा एक सामान्य  इंजिनियर होतो , आमच्या कंपनीला या गावाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाचे काम मिळाले आणि , या कामाची बातमी स्टाफ मध्ये पसरली …मी पण  साहेबांच्या मागे लागून .नव्हे अगदी हट्ट करून  प्रोजेक्ट करणाऱ्या टीम मध्ये मी  माझा समावेश करून घेतला महिन्यापूर्वी या  साईटवर आलो.

  • मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग १

    लोकसत्ताच्या दि. १७ फेब्रुवारी च्या ‘लोकरंग’ पुरवणीमधील गुलजार यांचा लेख सुंदर आहे, पण तो ललित लेख स्वरूपाचा आहे. हा लेख म्हणजे गुलजार यांच्या गालिब समजून घेण्याचा पुन:प्रारंभ आहे, असें लोकसत्ता म्हणताहे. तेव्हां पुढील लेखांची वाट पहावी लागेल. मात्र हेंही खरें की प्रस्तुतचा लेख वाचून बराचसा अपेक्षाभंग झाला. गुलजार यांच्याबद्दल पूर्ण आदर राखूनही असें म्हणावेसें वाटतें की, ‘मिर्झा गालिब’ ही आपली टी. व्ही. मालिका काढायच्या वेळीं गुलजार यांनी जी पटकथा, स्क्रिप्ट लिहिलें असणार, त्या ‘पोतडीतून’ हा ललित लेख बाहेर काढलेला आहे.

  • पाश्चात्य संस्कृती

    ( बर्‍याच दिवसानंतर विजय आणि अजय हे दोन मित्र भेटलेले असतात आणि हॉटेलातील एका टेबलावर बसून चहा पिता-पिता गप्पा मारत असतात तेंव्हा त्याच्यात झालेला नाट्यमय संवाद )

    विजय – ( अजयकडे पाहत ) मध्यंतरी गोव्याला गेला होतास का ?

    अजय – ( आश्चर्याने ) तुला कसं काय कळल ?

    विजय – अरे ! कसं काय ? फेसबुकवर तू गोव्याला काढलेले फोटो ‘अपलोड’ नाही का केलेस ? तेच मी पाहिले .

    अजय – अच्छा ! ते तू पाहिलेस का ?

    विजय – अरे ! तू गोव्याला जावून नक्की केलस काय ? तू ना दारू पित, ना मच्छी मटन खात , ना तुला पोहता येत, तिकडे जावून काय समुद्रावर कविता वगैरे लिहल्यास की काय ?

    अजय – अरे ! तुला कोणी सांगितल की फक्त दारूडेच जातात गोव्याला सहलीला ? गोव्याला इतरही बर्‍याच गोष्टी आहेत की पाहण्या सारख्या.

    विजय – हो ! आहेत ना अर्धनग्न स्त्रिया समुद्राच्या किणार्‍यावर उन खात पडलेल्या, पाहिला तुझा फोटो पाहिला समद्र किणार्‍यावर त्या अर्धनग्न पाश्चात्य तरूणीसोबत काढलेला.

    अजय – हो ! त्या अर्धनग्न तरूणीमुळेच माझा पाश्चात्य संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. त्या फ्क्त शरीराने अर्धनग्न असतात पण मनाने निर्मळ आणि पवित्र असतात पण आपण मनाने आणि दृष्टीनेच अर्धनग्न असतो. अश्लीलता आपल्या नजरेत भरलेली असते ती अर्धनग्न तरूणी किती सहज गोड हसत माझ्या सोबत फोटो काढायला उभी राहिली होती. तिने माझ्या भावनांचा आदर केला होता तिच्या मनात तेंव्हा विचारही आला नाही की हया माणसाला कदाचित आपल्या अर्ध नग्नतेत रस असेल म्ह्णून. आज तिच्यासोबतचा फोटो मी पाहतो तेंव्हा चुकूनही माझे मन तिच्या अर्धनग्नतेकडे नाही तर तिच्या चेहर्‍यावरील निरागस आणि निर्मळ हस्याकडे आकर्षित होते.

    विजय – आता तुला पाश्चात्य संस्कृती आवडायला लागलेली दिसतेय ?

    अजय – संस्कृती पाश्चात्य काय आणि भारतीय काय ? ती फक्त माणणार्‍यांसाठीच मह्त्वाची असते. मला माझ्या भारतीय संस्कृतीबद्द्ल नितांन्त आदर आहे म्ह्णूनच तर त्या फोटोत मी समुद्र किणार्‍यावरही पूर्ण कपडयात तिच्यापासून किंचित अंतर ठेवूनच उभा असलेला दिसतोय ना ? ती माझ्या संस्कृतीचा आदर म्ह्णूनच माझ्या सोबत फोटो काढायला तयार झाली होती उद्या ती माझ्या सोबतचा तिचा फोटो तिच्या देशात कोणाला दाखवेल तेंव्हा त्यांनाही आपली संस्कृती कळेलच की. मला फक्त इतकच वाटत ती जर आपल्या संस्कृतीचा आदर करत असेल तर मी ही तिच्या संस्कृतीचा आदरच करायला हवा ! तिच्या संस्कृतीकडे अश्लिलता म्ह्णून पाहता कामा नये.

    विजय – बरोबर आहे तुझ ! या दृष्टीने मी कधी विचारच केला नाही. आपण सतत पाश्चात्य संस्कृतीकडे अश्लीलतेचा चष्मा लावूनच पाहतो त्यामुळे आपल्याला त्यांच्या संस्कृतीतील फक्त अश्लीलताच दिसते. त्यांना जर आपल्या भारतीय संस्कृतीबद्द्ल आदर वाटत असेल तर आपणही त्यांच्या संस्कृतीचा आदरच करायला हवा !

    अजय – आता कसं बोललास ? प्रत्येक संस्कृती ही आपल्या जागी बरोबरच असते म्हणून आपली संस्कृती सोडून दूसर्‍या संस्कृतीचा स्विकार करणे योग्य होत नाही पाश्चात्य संस्कृतीचा आदर करणे आणि तिचा स्विकार करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. दुसर्‍या संस्कृतीतील काही गोष्टीचा आपण स्विकार जरी केला तरी तो डोळसपणे करायला हवा !

    विजय – हो ! तू अगदी योग्य तेच बोललास , चल आता निघूया मला घरी जायला उशिर झालाय !

    ( दोघेही टेबलावरून उटून हॉटेलच्या बाहेर पडतात.)

    -- निलेश बामणे

  • आणीबाणी

    पुण्यातल्या तरुण भारत या दैनिकामध्ये त्यावेळी मी काम करीत होतो. नेमकेपणानं सांगायचं तर २६ जून १९७५ रोजी रात्रपाळीचा उपसंपादक म्हणून माझं काम सुरू होतं. त्याआदल्या दिवशी पहाटे चारपर्यंत ऑफिसमध्येच होतो. इंदिरा गांधींनी काही विरोधी नेत्यांची धरपकड केल्याचं छोटं वृत्त त्यादिवशीच्या अंकात प्रसिद्धही केलं होतं; पण खरी सुरुवात झाली ती २६ जून रोजी. देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. अटकसत्र सुरू होतं. घटना अत्यंत वेगानं घडत होत्या. आता विचार केला तर वाटतं आणीबाणीचं गांभीर्य त्यावेळी तरी तेवढ्या प्रमाणात जाणवलेलं नव्हतं. लोकशाहीवर संकट, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा याबाबी कळत होत्या; पण त्याहीपेक्षा आपण पत्रकारितेत आहोत आणि या सर्वांचा थेट अनुभव घेत आहोत याचं थ्रील अधिक होतं. कामापेक्षाही गप्पा, चर्चा, प्रतिक्रिया अधिक येत होत्या. मी ज्या दैनिकात काम करीत होतो त्याच्या ध्येयधोरणाला पाठिंबा द्यावा किवा विरोध करावा. अशी मानसिकताही नव्हती. मात्र, देशातल्या या घडामोडीमुळं सार्वत्रिक अस्वस्थता मात्र होती. आणीबाणीचा पत्रकारितेवरचा थेट परिणाम म्हणून सेन्सॉरशिपचा विषय पुढे येत होता आणि आता बातम्या द्यायच्या काय, कशा अन् किती असे प्रश्न पुढे येत होते. त्यावेळी मी या क्षेत्रामध्ये इतका नवा होतो, की त्याच्या परिणामाची कल्पना करता येऊ नये. मला आठवतं त्यादिवशी एस. एस. सी.चा निकाल होता आणि आणीबाणीतल्या घटना-घडामोडी होत्या. जयप्रकाशांपासून अडवाणींपर्यंत अन् जॉर्ज फर्नांडिसांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अटकसत्र सुरू होतं. बातम्यांना कमतरता नव्हती. आणीबाणीचा निषेध म्हणून अग्रलेखाची जागा कोरी ठेवण्याचा निर्णय घेतला गेला होता. एकूण काम सुरू होतं. रात्री अकरा-साडेअकराची वेळ असावी, एक फोन आला की सेन्सॉरचं काम आजपासूनु सुरू होणार. रात्री बारानंतर त्यावेळचे पोलीस उपायुक्त वसंतराव पारसनीस आपल्या ताफ्यासह कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी सोलापूरसाठीचा अंक छापून तयार होता. तो अंक त्यांनी पाहिला अन् कोणत्या बातम्या द्यायला नकोत याच्या खुणा ते करू लागले. एक, दोन, तीन, पाच अशा विविध बातम्यांवर लाल रेघा उमटत होत्या. आपल्या अधिकार्‍यांना सूचना देऊन ते निघून गेले. रात्रीच्या वेळी माझ्या दोन ज्येष्ठ सहकार्‍यांशिवाय अन्य कोणी नव्हते. या बातम्या काढून टाका, असा आदेश अधिकार्‍यांनी दिला. या बातम्या काढून टाकणं अशक्य आहे, कारण त्या बातम्या काढल्या, तर तिथे कोणत्या बातम्या टाकणार, हा प्रश्न होता. त्यावेळी मोनो किवा लायनो कास्टिंग पद्धतीनं कंपोज तयार केला जायचा. या बातम्या एकमेकाजवळ एका पानात रचून त्याचा छाप एका जाडसर कागदावर घेतला जायचा अन् त्यानंतर मशीनवर बसविता येईल असा अर्धगोलाकार साचा तयार व्हायचा. फ्लाँग, स्टिरिओ अशी नावं त्याला होती. या बातम्या काढून टाकणं किती अवघड आहे हे सांगण्याचं काम माझ्यावर आलं. पोलीस अधिकार्‍याला यंत्रणा आणि वास्तव मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. त्या बातम्या काढल्या नाही तर अंक प्रसिद्ध होऊ देणार नाही अशी त्याची भूमिका होती. याचवेळी मला राऊटिग यंत्राची आठवण आली. मी म्हणालो, ‘‘जो अंकाचा, पानाचा साचा तयार झाला आहे. तेथून या बातम्या काढून टाकता येतील. एका अर्थाने पानात लिहिलेला मजकूर नको असेल तो खोडता येईल.’’ झाले, अधिकार्‍याला त्या बातम्या येऊ नयेत एवढेच हवे होते. त्याचे काम झाले होते. त्यानं माझ्या समवेत उभं राहून नको त्या बातम्या खोडायला सांगितल्या. राऊटिग मशीनमधला खोडकाम करणारा भाग त्या सयार्‍यावरची उमटणारी अक्षरं खोडत गेला आणि असं पान तयार झालं की जे प्रसिद्ध होणं सरकारला नको होतं. दुसर्‍या दिवशी विविध अंक प्रकाशित झाले ते तरुण भारतपेक्षा वेगळे नव्हते. त्यात एस. एस. सी.चा निकाला होता; पण दिल्लीतील वीज गायब हे वृत्त नव्हतं. सेन्सॉरशिपची चौकट होती; पण धरपकडीतलं नाट्य नव्हतं. २६ जून रोजी दिल्लीत किवा भारतात काय घडलं. याचं चित्रण पूर्णपणे पुसलं गेलं होतं. मात्र, अंकाचा तो चेहरा पाहून या रिकाम्या जागांवर काय, काय असू शकेल याचा अंदाज येत होता. आणीबाणीचा विरोध लोकांपर्यंत जाऊ नये असं शासनाला वाटत होतं अन् तो रिकाम्या जागातून अधिक तीव्रपणे व्यक्त होत होता. आणीबाणीच्या पहिल्या टप्प्यात सहभागी होतांना आपण वृत्तपत्राच्या इतिहासातल्या महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार झालो याचा आनंद होता. आज जाणवतं, मौन हा केवळ रुकार असत नाही, तो नकारही असतो. निषेधही असतो अन् क्षोभही! त्यादिवशी सर्वच वृत्तपत्रे यार्‍या अर्थानं अभिव्यक्त झाली होती. काहीही न सांगता रिकामी असतानाही!

    -- किशोर कुलकर्णी