नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मनात कोणा विषयी शंका असेल, कोणाबद्दल खात्री नसेल तर ते पहिले त्या व्यक्तीशी बोलावे, इतर कोणाशी बोलून अजून पिळ देऊ नये.
August 31, 2021

तिला काय अपेक्षित होते ते माहित नाही पण मी बोलून गेलो. मला माझीच मजा वाटली कारण हे उत्तर मी कसे दिले .
June 20, 2021

वाघाला रक्ताची चटक लागली की जस होत, तस आमच्या परिसरातील लोकाना झाल होत. निम्म्या किमतीत वस्तू मिळतात म्हणजे काय? तीन महिने दुकान सुरु होऊन झाले होते. त्यामुळे निम्म्या किमतीत मिळालेल्या वस्तू लोकांच्या घरोघरी दिसू लागल्या होत्या.
July 5, 2022
गेल्या ३४ वर्षामध्ये पोलीस खात्यात वेगवेगळ्या जिल्हयांत, विभागांत आणि पोलीस ठाण्यांत काम करीत असतांना अनेक प्रसंग पहायला मिळाले. त्या प्रसंगांतून खूप काही शिकायला मिळालं. ते प्रसंग प्रत्यक्षात समोर घडल्यामुळे अनुभवाच्या शिदोरीचे गाठोडे मोठेच्या मोठे कधी झाले, ते कळलचं नाही. पोलिस खात्यात काम करतांना काही वेळेस जे पोलिसांचे काम नाही किंवा ज्या कामाचा पोलिसांशी काही संबंध नाही, अशा प्रकारचे कामसुध्दा पोलिसांना करावे लागते.
May 30, 2024
आताही रविवार येतात पण आवडत नाही कारण या दिवशी आईबाबा मुलांना घेऊन एक तर फिरायला म्हणजे गावाला जाणे. किंवा जे सकाळी जातात ते रात्रीचे जेवण करूनच येतात. घरात कामे नसतात. मुलगी जर जवळपास असेल तर तिच्या कडे पण हेच असेल कदाचित. थोडा फार फरक असेल पण रविवारी येत नाहीत.
January 8, 2022
साहित्य संमेलन हे एक महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य आहे. ग्रंथकारांनी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती करावी, कांनी ग्रंथ विकत घेण्याची हमी द्यावी, मराठी भाषा वीना अवगत होण्याचे प्रयत्न करावेत यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी ११ मे १८७८ रोजी प्रथम ‘ग्रंथकार संमेलन’ पुण्यात भरविले होते. हे ‘ग्रंथकार संमेलन’ म्हणजेच आताच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आणि कालप्रवाहात निर्माण झालेल्या प्रांतिक, उपनगरीय, दलित, ग्रामीण, बालकुमार, नवोदित, होतकरू व अलिकडेच साक्री येथे झालेले दलित, आदिवासी आणि ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन या सर्वोची गंगोत्री आहे.
September 1, 2023
माझी दिवंगत पत्नी डॉ. स्नेहलता, जी एक social scientist होती, म्हणत असे की, प्रसूती म्हणजे स्त्रियांसाठी mini-death च आहे ; पूर्वी तर अनेक स्त्रियांना प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर (‘बाळंतरोगा’नें) मरण येत असे.
August 9, 2017
माझ्या दोन्ही बाहुल्यांनी, यावेळच्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच, स्पर्धेत भाग घेतला! आमच्या सोसायटीमध्येच कार्यक्रम होता. त्यामुळे खरंतर प्रेक्षक म्हणून बसलेले सगळे चेहेरे तसे ओळखीचे होते, तरीही ह्यांच्यासाठी हातात माईक धरून, सर्वांसमोर उभं राहून काही करून दाखवण्याचा अनुभव हा पहिलाच होता.
September 14, 2019
चिणक्या,गोल्या,रवी आन चेंड्या लहानपणापसुनच जिगरी दोस्तं व्हते.एकाच वयाचे अन एकाच शाळतं शिकल्यान तेह्यचा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.ते चौघबी लयच ईपितर व्हते.काम धंदा त काय करायचे नाही पण घरच्यायच्या जिवावरं मस्तपैकी जगुन दिसभर गावात काड्या करत हूंदडायचे.नको तिथं नाक खुपसण्याच्या तेह्यच्या सलयीधं सगळं गाव परेशान व्हतं.एकदिवस आसचं चौघं दोस्त पारावर बसले व्हते.लय दिवसाचं तेह्यच्या जिवनात एंजायमेंटच नवती.गावातबी तेह्यच्या कुरापती चालयण गेलत्या.चौघंबी शांत बसले व्हते.तेव्हड्यात गोल्या मनला,“व्हयं रं चंड्या आपण लय दिसाचं मटनबी खाल्ल नाही आन नरडंबी वल्ल केलं नाही.तव्हा मी काय मंतो आज सुकीरवार हे तं आपण पार्टी करायची का...?”
पार्टीच नाव ऐकताच रवी,चंड्या आन चिणक्याच्या तोंडालं पाणी सुटलं.तेह्यलंबी आसच कायतरी करावं आसं वाटत व्हतं.
“हो पण पार्टी कुठं आण कशी करायची?” रवी मनला.
तसं चंड्या मनला,“आपण रवीच्या खारीत पार्टी करू की.कालच आंधाचा शिरप्या मनत व्हता की त्यानं त्यानं आत्ताच भट्टी लावलीय आन पाच सहा बिसलेर्या भरून पह्यल्या धारचा मालं तयार हाये मनुन...”
तसं गोल्या मनला ते व्हयील पण बकर्याचं कायं.खाटकाच्या दुकानाऊन मटन आणल्यापक्शा आपण एखांद लहानस बकरच आणु.पोकभर खायालंबी व्हयील आन सस्तबी पडल.उरलेल्या पैशात नरडबी वल्ल व्हयील.काय मंता.?”
तसं रवी मनाला मह्याकडं बकर हाये पण लयच मोठं आन जरगट हे.त्यापक्षा आपल्या चिणकु दाजीचं बकर लहान हे.आपण तेच आणायच का?”
रविचंबोलनं ऐकताच चिनक्या उसळुन मनला ,“मह्याघरी बकरं हाये खरं पण मथारीचा लय जीव हे त्याच्यावरं.ईकायच नाही मंते.”
चिणक्याच बोलन मंधातच ताडत चंड्या मनला ,“मथारीलं काय ईचारायच.घरचा कारभारी तं तु हे नं.आसं बायायच्या सल्ल्यानं कारभार करतु व्हयं रं”
चेंड्याच बोलन ऐकुन चिणक्याचा पुरशी आहंकार जागी झाला.त्यानं बकर द्यायचं कबुल केलं.मंग ततीन हजार रूपयात बकर्याचा सौदा करून टाकला.चंड्यानं शिरप्या आंधाकुण मव्हाची दारू आणायच कबुल केलतं.तं रविन आन गोल्यानं भांडेकुंडे आन मसाला आणायच कबुल केलं.चिणक्यानं मोठेपणाचा आव आनत बकर्याचा सौदा तं केलता पण त्यालं आत्ता मथारीलं कसं पटवावं समजयनं गेलतं.
आत्ता चिनक्या,,चंड्या आन रविलं संध्याकाळच्या पार्टीचा वेध लागला व्हता. चिनक्यानं दोस्तायसंग कालच बकर्याचा सौदा केलता.चिणक्याच्या मथारीजवळ एक लहान बोकड्या व्हता.चिणक्यानं मायच्या मांघार्याच दोस्तायसंगं बोकड्याचा सौदा केलता.तीन हजार रूपयात सौदा पक्का झालता. त्यात त्याचा साडेसातशे रुपये वाटा काटुन त्यानं बाविसशे पन्नास रूपये भेटणार व्हते. मंग काय सगळे दोस्तं संद्याकाळच्या पार्टीसाठी उतावळे झालते.ठरल्याप्रमाणं संध्याकाळचं माल मसाला घेऊन सगळेजणं खारीत जमले व्हते.तेह्यनं मव्हाच्या पह्यल्या धारच्या दोन चार बिसलेल्या भरून आणल्या व्हत्या.चिणक्याच्या मथारीलं बोकड्या ईकायचा नवता.तं चिनक्या त्या बोकड्यालं ईकायच्या मांघ लागला व्हता.
संध्याकाळ झाली.सगळ्या दोस्तांनी बिसलेरीच्या बाटल्या रिकाम्या केल्या.थोड्याच वेळात मव्हाच्या पह्यल्या धारच्या मालानं अंमल दाखवायल सुरवात केलती.मंग काय चिनकु आन दोस्तायचा मेंदू गरगरू लागला.ते हूडदंग करू लागले.पार्टी चांगलीच रंगात आलती.आता पोटात भकभक आग लागली व्हती.मंग गोल्यानं चिणक्यालं मनलं कि,“ चला चिणकु दाजी टाका मटन शिजवायलं.” हे ऐकुण चिणक्याचातं चेहरा ढवळा शिपतच पडला.काय बोलावं त्यालं कायबी कळेनं गत्यालं चुप पाहुन रवी अन चंड्या चिणक्यावर आंजुकच चिडायलं लागले.चिणक्यानं आंधीच पैसे घेतल्यानं ते कानकोंडा झालता.तसं पाह्यलं तं चिणक्यानं पहाटचं मथारीलं पटवण्यासाठी खडा टाकुन पाह्यला व्हता पण मथारीनं बकरं ईकायलं साफ नकार देलता.आन वरून,“मुडद्या सगळं घर गिळलं अन आत्ता तुलं मव्ह बकर डोळ्यातं सलायलय व्हयं.चाल निंघ ईथुन आत्ता मनला तं मनला पुन्हा मनला तं मुडदाच शेकते तुव्हा.” चिणक्यानं कचरत कचरत गोल्या,रवी अन चंड्यालं घरी पाहाटं घडलेलं रामायण सांगतलं.हे ऐकुण तिघबी चवताळुन चिणक्याच्या आंगावर धाऊन गेले.गोल्यानं तं चिणक्यालं दम देऊन सांगल की,“आत्ता तं तुलं तेच बकर आणावं लागलं नायतं डबल पैसे वापस देवावं लागतील.”संगच्या दोस्तायचे तेवर पाहुन चिणक्या वरमला.त्यानं तिघायलबी शांत बसायलं सांगत एक प्लॅन समजाऊन सांगतला.चिणक्याचा प्लॅन ऐकुन बाकी तिघंबी तयार झाले.तेह्यणं उरलेली एक बाटली संपवली आन चिणक्याच्या मथारीचं बकरं चोरायच्या मोहीमेवर निंघाले.ठरलेल्या प्लॅन परमानं चिणक्या आन रवीनं आंगावर घोंगड्या पांघरून घेतल्या आन चिणक्याच्या घराकडं निंघाले.तं गोल्या अन चंड्या गावातल्या डिपुकडं फ्युज काढायलं निंघाले.घराजवळ पव्हचलकी तिनदा बॅटरीची टिकमिक करून ईशारा देयाचं तेह्यच्यात ठरलं व्हतं.ईकड चिणक्या आन रवी चिणक्याच्या घराच्या जवळ जवळ जात व्हते.चिणक्याच्या घरी एक काळं कुत्र व्हतं.चिणक्याची मथारी त्यालं बकर्यासंगच आंगणात बांधायची.त्या कुत्र्यालं घराच्या परसात आजब हालचाली जाणवु लागल्या.कायतरी ईपरीत घडायलय या भनकनं ते कुत्र केकाटु लागलं.कान टवकारू टवकारू मोठमोठ्याण भुकु लगलं.कुत्र्याचं केकाटन ऐकुन चिणक्याची माय अन बायको सावध व्हवुन घरातुन आवाज देवू लागल्या.तेवढ्यात रविनं डिपुच्या दिशेनं तिनदा बॅटरीची टिकमीक केली.तसं मागावरच आसलेल्या गोल्या आन चंड्यानं ताबडतोब लाईट बंद केली.लाईट गेल्या गेल्या चिनक्यानं पळतच जात गपकन खुट्याची शिकार सोडुन शिकारीच्या अंगावर घोंगडी टाकली आन शिकार घेऊन रानाच्या दिशेनं पळाले.चिणक्यालं त्याचे धरून शिकारीचे तीन हजार भेटले होते.तेह्यनं शिकारीचे खांडं खांडं केले.मालमसाला लावुन मस्त रस्सा भाजी बनवली.सगळ्या शिवारात भाजीचा गंध दरवळु लागला.मंग काय सगळ्या दोस्तायनं मिळुन रातभर मस्त पार्टी करत एन्जॉय केलं.पहाट पहाट चिनक्या घरी आला.रातची धुंदी आंजुकबी त्याच्या चेहर्यावर दिसत व्हती.रातचं चिनक्यानं माय आन बायकोलं काहिच सांगलं नवतं मनुन मंग ते दबकतच घरी येवु लागला.ते घरी आल्या आल्या त्याची बायको आन माय त्याच्या नावानं बोंबलू लागल्या.मायन मोठ मोठे डोळे टवकारत चिणक्याकडं पाह्यलं.तसा चिनक्या टरकलाच.चिणक्याची माय चिनक्यालं मनली,“मेल्या,मुडद्या,तुव्हा खानाखरोबा व्हवो,कुठं उलथला व्हता रातभर.आन व्हय रं रातच्याला घोंगडी घालून चोरासारखा काहून आलता आणि रातपसून आपलं कुत्र दिसयनं तू कशाला ते कुत्र घेऊन गेलता.व्हय रं मुडद्या.” जसयं चिनक्यानं मथारीचे शब्द ऐकले तसा त्यो हैरान झाला.त्यानं हैराणीनचं बकर्याच्या खुट्याकडं पाह्यलं तं ते बकरं चिणक्याकडं पाहुन बेऽऽअं..ऽऽ आसं वरडु लागलं.चिणक्यालं ते पाहुन कसकान्नुच झालं.त्याच्या मनात मळकी भरली.तो तसाच पळत पळत मोरीजवळ गेला आन भडाभडा वकाया लागला.त्याल व्हयालेल्या वकार्या पाहुन त्याच्या मायलं आन बायकोलं काहीच समजयनं गेलत.त्या बिचार्या घायबरून गेल्या.
चिनक्याच्या मायनं शेजारच्या पिंट्यालं बलवुन चिणक्याचे दोस्त रवी,गोल्या आन चंड्यालं बलवलं.ते तिघबी तिथं आले तं तेह्यलं चिणक्या पोट खड्डोस्तोर वकायलेला दिसला.काय झालं तेह्यलं कळयनं गेलं.तेव्हड्यात तेह्यनं चिणक्याच्या खुट्यावरच्या बोकड्याचा“बेऽऽ....अंऽऽ“ आसा आवाज ऐकला. आवाज ऐकताच तेह्यच्या डोस्क्यात तडखन उजेडच पडला.राती तेह्यनं बोकड्याच्या जागी कुत्र्यालं नेलं व्हतं.आन बकर मनुन कुत्र्यालच खाल्ल व्हतं.दारूच्या नशेत तेह्यलं काहीच कळालं नाही.ते पिऊन टुंग व्हते.आत्ता त्या तिघायलबी मळमळुन आलं,आन तेबी भडं भडं वकु लागले.काय व्हयालं कोणालचं काय कळणं झालतं.मंग थोड्यायेळानं सगळा खुलासा झाल्यावर चिणक्याच्या मायलं अन बायकोलं रडावं का हासावं काहीच कळयन झालतं.
सांगोवांगी ही खबर सगळ्या गावात पसरली.आत्ता सगळं गांव चिणक्या आन दोस्तायची पार्टी यावरं हासू लागलं.चिणक्या आन त्याच्या दोस्तायलं घराबाहीर निंघनं बी मुस्कील झालतं.घराबाहीर पडलं की जे ते ईचारायचं ,“काय मंग कशी झाली पार्टी”.तसं चिणक्या आन त्याच्या दोस्तायलं कसकान्नु व्हयाचं.पडलेल्या चेहर्यानं ते आपले मुकाट्यानं निंघुन जायाचे.
©गोडाती बबनराव काळे,हाताळा,हिंगोली.
9405807079
January 23, 2024

पुणे जंक्शनहून पुणे-कोल्हापूर पॅसेंजर गाडी नुकतीच सुटली होती.
सेकंड क्लासमधे पाच प्रवासी अजून डुलक्या देत होते.
नुकतेच त्यांचे भोजन झाले होते, त्यामुळे ते आता झोंप काढण्याच्या प्रयत्नात होते.
सर्व कसं शांत होतं.
अचानक दरवाजा उघडला गेला आणि एक ताडासारखा सरळ, उंच आणि नीटनेटका पोशाख केलेला, अंगात जाकीट घातल्यामुळे पत्रकार वाटणारा माणूस आंत शिरला.
धाप लागल्यामुळे डब्यात मधेच तो थोडा वेळ नुसता उभाच होता.
त्याचे डोळे बसायला जागा शोधत होते.
मग तो उद्गारला, “परत चुकीचाच डबा मिळालेला दिसतोय. कमाल आहे !
एखादा वैतागेल अशाने.”
त्याला पाहून प्रवाश्यांमधला एकजण आनंदाने ओरडला, “श्याम आठवले, तू इकडे कसा ? श्यामच ना तू ?”
नव्या प्रवाशाने प्रथम भकास नजरेने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं मग तोही आनंदाने ओरडला, “राम हेगडे, अरे किती वर्षांनी भेटतो आहेस !
कुठे होतास ? मला माहित नव्हतं तूही ह्या गाडीतच आहेस.”
रामने विचारलं. “कसं चाललंय तुझं, श्याम ?”
“अरे यार, मी ठीक आहे रे !
फक्त माझा डबा चुकलाय आणि कांही केल्या तो मला सांपडत नाही.
काय मूर्ख आहे मी ! मला कोणीतरी बडवला पाहिजे !”
गाडीबरोबर एक हेलकावा घेऊन श्याम पुढे म्हणाला, “विचित्र गोष्टी होत असतात.
मी गाडीतून उतरून जरा पुढे जाऊन एक छोटा पेग घेत होतो आणि दुसरी घंटा वाजली.
एकाने कसं बरं वाटणार ?
मग आणखी एक पेग मी घाईघाईत घेत असतांनाच तिसरी बेल झाली.”
“मी कसाबसा तो संपवून गाडीकडे धांव घेतली आणि वेड्यासारखा समोर येईल त्या डब्यात उडी मारून चढलो.
मूर्खपणाच झाला तो !”
राम म्हणाला, “पण तू तर मजेत दिसतोयस ? इथे भरपूर जागा आहे. ये बस इथे !”
“नाही रे बाबा ! मला माझा डबा शोधला पाहिजे. अच्छा !” श्यामने स्पष्टीकरण केले.
राम म्हणाला, “ऐक माझं ! असा डबा शोधतांना जरा चूक झाली तर दोन डब्यांच्या मधे पडशील !
आता इथे बस. स्टेशन आलं की शोध तुझा डब्बा.”
श्यामने एक मोठ्ठा सुस्कारा सोडला आणि कांटेरी पाटावर बसल्यासारखा चुळबुळ करत तो रामच्या समोरच्या मोकळ्या जागेवर बसला.
राम हेगडेने विचारले, “तू कुठे निघाला आहेस ?”
श्याम आठवले म्हणाला, “मी अवकाशाच्या प्रवासाला निघालोय. माझ्या डोक्यात गोंधळ आहे की मी कुठे चाललोय तें मीच सांगू शकत नाही.
जिथे नशीब नेईल तिथे जायचं.
तू कधी सुखी मूर्ख पाहिला आहेस ? नाही ?
मग सर्वात सुखी माणूस पहा.
माझा चेहरा पाहून काय वाटतं तुला ?
राम हेगडे त्याच्याकडे पहात म्हणाला, “विशेष कांही नाही दिसत वेगळं ! आहेस नेहमीसारखाच.”
श्याम आठवले म्हणाला, “मी खरंच सांगतो तुला.
मी आरशात पाहिलेलं नाही पण आतां मी अगदी येडपट दिसत असेन ना !
मी वेडाच होतोय बहुदा.
तुला माहित आहे, राम, अरे मी लग्न केलंय. काय समजलास !”
राम हेगडे आश्चर्याने ओरडला, “म्हणजे तू शेवटी लग्न केलसं !”
श्याम म्हणाला, “केलं म्हणजे काय ? आजच केलं.
लग्न केलं, देवळातून बाहेर आलो आणि थेट गाडी पकडली.”
रामने श्यामचे अभिनंदन वगैरे केले.
मग तो म्हणाला, “तू तर छुपा रूस्तुम निघालास !
म्हणून तू असा सजलायस आणि ताजातवाना वाटतोयस !”
श्याम म्हणाला, “ हो रे मित्रा ! स्वप्न पुरं करायला, मी अगदी अत्तराचा फवारा सुध्दा अंगावर आणि कपड्यांवर मारलाय.
ह्या क्षणी मी माझ्यावरच खूष आहे.
स्वर्गसुख, स्वर्गसुख म्हणतात, ते हेच असावं !
माझ्या आयुष्यात मी कधी एवढा आनंदी नव्हतो.”
श्यामने डोळे मिटून मान हलवली.
“मी अत्यानंदात आहे. विचार कर, दोन मिनिटांत मी माझ्या डब्ब्यात पोहोचेन.
तिथे खिडकीशी मला आपलं सर्वस्व देऊ केलेली, सुंदर गोल चेहरा अन् सुंदर नाक डोळे असलेली माझी देवता, माझी प्रिया, माझी बायको बसलेली असेल.
एखादी परीच आहे असं वाटणारी सुंदरी, माझी लाडकी.. !
पण हे सर्व तुला सांगून काय उपयोग. तू व्यवहारी, अरसिक, अविवाहीत.
प्रेम वगैरे झूठ वाटणारा तू ! तुला नाही समजणार.
तू जर कधी विवाह केलास तर माझी आठवण येईल तुला.
मी आता एक दोन मिनिटांत तिच्या बाजूला बसलो असेन आणि तिची हनुवटी हातात धरून तिचं सौंदर्यपान करेन.”
पुन्हा श्याम आठवलेने डोळे मिटले अन् मान हलवली.
तो परत बोलू लागला, “मी माझी मान तिच्या खांद्यावर ठेवून झोपेन.
ह्या अशा आनंदाच्या क्षणी सगळं जग कवेंत घ्यावसं वाटतं.
राम, मित्रा, ये, तुला कडकडून भेटू दे.”
राम म्हणाला, “ये, तुझा आनंद साजरा करू.”
दोघे कडकडून मिठी मारतात.
आजूबाजूला बसलेले प्रवासी मोठ्या आवाजांत चाललेला हा संवाद ऐकत असतात.
दोघे कडकडून भेटतांच सर्व एकत्र हंसतात.
श्याम पुढे बोलू लागतो, “मग चित्र पूर्ण करण्यासाठी पॅंट्रीमधे जाऊन कांही खानपान करणार. मजा करणार.”
आता श्यामचे बोलणं ऐकायला पांच श्रोते होते.
त्याच्या बोलण्याला, त्याच्या हावभावांना ते सर्वच दाद देत होते.
त्यांची झोप आता उडाली होती.
तो बडबडतच होता.
तो हंसला की सर्व हंसत होते.
तो म्हणाला, “सद्गृहस्थहो, कधी दारू प्यावीशी वाटली तर प्या.
ती पिणं चांगली की वाईट ह्याचं तत्त्वज्ञान बनवण्याची गरज नाही.
ते तत्त्वज्ञान आणि ते मानसशास्त्र अगदी गुंडाळून ठेवा."
तेवढ्यात एक तिकीट चेकर तिथून जात होता, त्याला उद्देशून तो म्हणाला, “साहेब, तुम्ही जेव्हां डब्बा नंबर २०९ मधे जाल तेव्हां तिथे एक हिरव्या रंगाची पांचवारी साडी नेसलेली स्त्री दिसेल, तिला सांगा की मी इथे आहे."
चेकर म्हणाला, "जरूर सांगेन पण डब्बा नंबर २०९ ह्या गाडीला जोडलेल्या डब्ब्यांत नाही. २१९ नंबरचा डब्बा मात्र आहे."
श्याम म्हणाला, “ ठीक आहे. मग २१९ असेल. तिला सांगा की तिचा नवरा इथे आहे आणि ठीक आहे.”
मग तो डोक्याला हात लावत म्हणाला, “काय मजा आहे. नवरा, बायको, एक छोटा विधी झाला आणि कांही मिनिटांत आम्ही पती-पत्नी झालो. माझं ठीक आहे हो !
पण तिचा विचार करा. काल ती मुलगी होती, लहान होती आणि आज लागलीच पत्नी झाली. कमाल आहे !”
एक प्रवासी मधेच म्हणाला, “आज काल कोणी सुखी असणं फार कठीण झालं आहे.
पांढरा हत्ती पहायला मिळणं जसं कठीण आहे, तसंच ते कठीण आहे.”
“बरोबर आहे पण ह्यात दोष कुणाचा आहे ?” श्यामने बसल्या जागीच पाय लांब करत विचारलं.
तो पुढे म्हणाला, “तुम्ही जर सुखी नसाल तर तो तुमचा दोष आहे.
तुम्हाला नाही वाटत असं ?
माणूस स्वतःच सुख स्वतःच निर्माण करतो.
तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्ही सुखी होऊ शकता.
नाही तर तुम्हीच सुखाकडे पाठ फिरवतां.”
“पण पुढे काय होणार, ते तुम्हाला कसं कळतं ?” कोणीतरी विचारलं.
श्याम म्हणाला, “ अगदी सोप्पं आहे.
निसर्गाने माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे भाग ठेवलेत.
त्या त्या वेळी माणसाने आपल्या त्या स्थितीवर प्रेम करावे.
मात्र तसं न करतां तुम्ही जर दुसऱ्याच अपेक्षा ठेवल्यात तर तुम्हाला दुःखच मिळणार.
तरूण झालात की विवाह करावा, ही निसर्गाचीच आज्ञा आहे.
त्या वयांत विवाहाविना आनंद नाही.
योग्य वेळ येताच विवाह करावा.
चालढकल करू नये पण तुम्ही लग्न करत नाही.
दुसऱ्याच कशाची तरी वाट पहाता.
तसं केल्याने दुःखी होता.
विवाह करावा, मद्य प्यावसं वाटलं तर मद्य प्यावं.
आनंद साजरा करावा.
‘महाजनो येन गता: स पन्थ:’ हे मला अगदी योग्य वाटतं.
सर्व जण जातात, तोच म्हणजे मध्यम मार्ग म्हणजेच राजमार्ग.
म्हणूनच मी सुखी आहे.”
“तुम्ही म्हणतां की माणूस स्वतःचा आनंद निर्माण करतो पण मला सांगा की दांत दुखत असला किंवा एखादीला वाईट सासू छळत असली तर त्या व्यक्तींना आनंद कसा होणार ? सांगा !
सर्व कांही दैवावर अवलंबून असतं.
योगायोग असतो.
समजा, आता आपल्या गाडीला अपघात झाला तर तुम्ही ताबडतोब सूर बदलाल.” एक प्रवासी म्हणाला.
“एकदम चुकीचे उदाहरण.
गाडीला अपघात वर्षा-दोन वर्षात एखादा होतो. मला अपघात होईल अशी भिती मुळीच वाटत नाही.
मला अपघात या विषयावर मुळीच बोलायचं नाही.
आपली गाडीची गती मंद झाली.
बहुदा एखादं स्टेशन जवळ आलं असावं !“
रामने विचारलं, “तू आता पुढे कुठे जाणार आहेस ? कोल्हापूरला की बेळगावला ?”
श्याम म्हणाला, “कोल्हापूरलाही नाही आणि बेळगांवलाही नाही.
मी सांगलीहून आलो आणि धुळ्याला चाललोय.
कोल्हापूर, बेळगांव उलट्या दिशेला आहेत. मी उत्तरेला चाललोय.”
राम म्हणाला, “अरे पण ही गाडी मिरजेहून कोल्हापूर किंवा बेळगांवकडे जाणारी आहे.”
“अरे मी चाललोय नाशिकमार्गे धुळ्याला.
परत उलट कशाला जाऊ ?” श्यामने ठामपणे सांगितले.
“मी तर बेळगांवला चाललोय. आता सातारा येत असेल.” राम म्हणाला.
“म्हणजे ही दिल्लीकडे जाणारी गाडी नाही ?”
“श्याम, तू पुण्याला बहुदा चुकीच्या गाडीत चढलास.
तू परत सांगलीकडे जाऊ शकशील पण धुळ्याला नाही.” राम म्हणाला.
बाकीच्या प्रवाशांनीही त्याला दुजोरा दिला.
“अरे बापरे ! मी ही किती मूर्ख आहे.
मग तो चक्क रडू लागला.
अरे माझी नवखी पत्नी त्या पॅसेंजर गाडींतून गेली आहे.
बिचारी एकटीच काळजी करत बसली असेल.
आता काय करू ?”
तो तोंडावर हात घेऊन रडत म्हणाला, “मी एक दुःखी, दुर्दैवी माणूस आहे. आता काय करू ?”
“अरेरे ! कठीण आहे खरं !
पण तुम्ही साताऱ्याहून तिला तार पाठवा आणि थोड्या वेळाने मागून येणाऱ्या कलकत्ता एक्सप्रेसने धुळ्याला जा.
तुम्ही कदाचित थोडे आधीच पोहोचाल आणि तिला धुळे स्टेशनवरच गांठू शकाल.”
“कलकत्ता एक्सप्रेस ! आणि मी त्या कलकत्ता एक्स्प्रेसचे तिकीट कसे काढू ? माझ्याकडे पैसेच नाहीत.
माझे पैसे पत्नीकडेच आहेत.”
सर्व प्रवासी हंसतात.
आपापसात कांही बोलतात आणि हंसत हंसतच थोड्या वेळापूर्वी स्वतःला सुखी म्हणवणाऱ्या त्या दुःखी माणसाच्या तिकीटासाठी पैसे जमवू लागतात.
- अरविंद खानोलकर.
मूळ कथा - हॅपी मॅन
मूळ लेखक - ॲंटन चेकॉव्ह
तळटीप - ही गोष्ट वाचून सुप्रसिध्द मराठी लेखक चिं. वि. जोशी ह्यांच्या वायफळाचा मळा मधल्या एका गोष्टीची आठवण झाली.
चिं. वि.जोशींची गोष्ट सरस आहे.
तिचा उल्लेख मी माझ्या आठवणींची मिसळमधे केला आहे.
तोच भाग पुन्हा सादर करतो.
“चिं. वि. जोशींच्या "वायफळाचा मळा" या पुस्तकांत एक लेख आहे.
"स्मरणशक्तीचे प्रोफेसर".
लेखकाला गाडीत एक प्रोफेसर भेटतात. प्रोफेसर साहेब लेखकाला स्मरणशक्ती कशी वाढवावी, लहान सहान गोष्टी कशा लक्षात ठेवाव्यात ह्याबद्दल उदाहरणासहीत लेक्चर देतात.
त्यांचे एक उदाहरण पहा.
ते म्हणतात, "मला अहमदनगर जायचे आहे.
अहमदनगर हे नांव लक्षांत ठेवण्यासाठी मी एक कारिका रचली आहे.
ती अशी "दिवस गर्व विष नसे ज्या पुरी" (अह + मद + न गर).
पद्यमय कारिका पटकन् लक्षात रहाते आणि गांवाचे नांव लक्षात ठेवणे सोपे जाते."
लेखक त्यांना विचारतो, "आपण अहमदनगरला कोणत्या कामासाठी निघाला आहेत ?"
तर प्रोफेसर म्हणाले, "अहो, अहमदनगरला माझ्या बहिणीला स्थळासाठी दाखवण्याचा कार्यक्रम आहे."
लेखकांने विचारले,"पण बहिण कुठे दिसली नाही तुमच्या बरोबर."
प्रोफेसर त्या प्रश्नाने गडबडले आणि म्हणाले, "अरेच्चा, म्हणजे ती मनमाड स्टेशनवर गाडी बदलताना तिथेच राहिली वाटते !"
-- अरविंद खानोलकर.
मूळ लेखक- ॲंटोन चेकॉव्ह.
August 1, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti