(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • संपत्तीचा मोह

    प्राचीन काळची ही कथा आहे. एका नगरात रामरतन नावाचा एक धनाढ्य व्यापारी राहात होता. व्यापारधंद्यात त्याने इतकी संपत्ती मिळवली होती की, त्या नगरीच्या राज्याच्या खजिन्यातदेखील इतकी संपत्ती नसावी. एकदा रामरतनला वाटले की, राजाला आपली संपत्ती दाखवावी व त्याची मर्जी प्राप्त करून घ्यावी म्हणून त्याने राजाला बोलावण्याचा निर्णय घेतला.

    रामरतनला एकूण तीन मुले होती. त्यापैकी धाकट्या मुलाने मात्र याला विरोध केला. कारण तो हुशार होता. रामरतनला तो म्हणाला राजाला बोलावून तुम्ही आपल्या घरावर संकट ओढवून घेत आहात. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत रामरतनने राजाला एके दिवशी घरी बोलावले. राजा आल्यावर त्याला आपली सर्व संपत्ती दाखवली. तळघरात ठेवलेले सोने-चांदी, हिरे, पावू माणके व अगणित सोन्या-चांदीची नाणी पाहून राजाचेही डोळे दीपले. मात्र एवढी संपत्ती आपल्या खजिन्यात आली तर फार चांगले होईल असाही त्याच्या मनात विचार आला.

    राजवाड्यात परतल्यानंतर त्याने प्रधानाशी चर्चा केली. प्रधान म्हणाला, रामरतनची संपत्ती तुमची होऊ शकते. तुम्ही त्याला राजवाड्यात बोलावून असा एक प्रश्र विचारा की, त्याचे उत्तर त्याला देता येणार नाही व 'ज्याच्याकडे धन आहे, परंतु बुद्धी नाही, तो धन बाळगायला लायक नाही' असे सांगून त्याची सर्व संपत्ती तुम्ही जप्त करू शकता.

    त्याप्रमाणे राजाने रामरतनला बोलावून प्रधानाने पढविल्याप्रमाणे सांगितले व 'सतत काय वाढत जाते व काय कमी होत जाते', या प्रश्राचे उत्तर तू एका दिवसात दिले नाही तर छी सर्व संपत्ती सरकारी खजिन्यात जमा होईल, असे सांगितले. राजाची ती अट ऐकून रामरतन बेशुद्ध होण्याच्याच मार्गावर होता. परंतु कसाबसा स्वताला सावरत घरी आला व त्याने घरातील सर्वांना राजाची ही अट सांगितली. त्यामुळे घरातील सर्वजण काळजीत पडले. धाकट्या मुलाने मात्र रामरतनला धीर दिला व त्याने रामरतनच्या कानात या प्रश्राचे उत्तर सांगितले.

    दुसऱ्या दिवशी रामरतन आनंदाने राजाकडे गेला व आदल्या दिवशी त्याने विचारलेल्या प्रश्राला उत्तर देताना म्हणाला, तृष्णा (वासना) ही अशी एकच गोष्ट आहे जी सतत वाढत जाते व माणसाचे आयुष्य सतत कमी होत जाते. त्याचे उत्तर ऐकून राजाही खूष झाला व त्याने रामरतनला संपत्ती तुझीच आहे, तूच त्याचा चांगला वापर कर, असे सांगून परत पाठविले.

    रामरतनने घरी आल्यावर धाकट्या मुलाचे कौतुक केले व त्या संपत्तीचा चांगल्या प्रकारे विनियोग करण्याचे धाकट्या मुलालाच अधिकार दिले.

  • हसणे

    हसणं हे नेहमीच संसर्गजन्य असतं.. दुःखाचं असं नाही ते एकट्याचं असतं… ते शेअर करावं लागतं.. म्हणूनच अनादी कालापासून दुःखापेक्षा हसणं श्रेष्ठ आहे…

  • तीन मूर्तींचे रहस्य

    भोजराजा कलेचा भोक्ता असल्यामुळे त्याच्या पदरी अनेक विद्वान होते. कालिदासासारखे 'नवरत्न'ही दरबारात होते. त्यामुळे दूरदूरहून आलेले अनेक कलावंत आपली कला सादर करायचे व राजाकडून बिदागी घेऊन जायचे.

    एकदा एक सुवर्णकार सोन्याच्या तीन मूर्ती घेऊन भोजराजाच्या दरबारी आला. त्या तिन्ही मूर्तीची किंमत वेगवेगळी होती. एका मूर्तीची किंमत होती दहा सुवर्णमुद्रा, दुसरीची होती शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसरीची होती हजार सुवर्णमुद्रा. तिन्ही मूर्ती शुद्ध सोन्याच्या, समान वजनाच्या मात्र त्यांच्या किमती वेगवेगळ्या का, याचे कोडे भोजराजासह सर्व दरबारी लोकांना पडले. मात्र नेमके रहस्य सुवर्णकाराखेरीज कोणालाच माहिती नव्हते व ते ओळखावे म्हणून सुवर्णकार दरबारात आला होता. मात्र कोणालाच त्या मूर्तीच्या किमतीचे रहस्य सांगता येईना. शेवटी भोजराजाने कालिदासाला पाचारण केले.

    कालिदासाने तिन्ही मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केले. तिन्ही मूर्ती शुद्ध सोन्याच्या, समान वजनाच्या व दिसायला सारख्याच होत्या. बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्या मूर्तीमधील रहस्याची गोम कालिदासाच्या लक्षात आली.

    त्याने एक मोठी काडी घेतली व पहिल्या मूर्तीच्या डाव्या कानात घातली व सरळ पुढे नेली तर ती उजव्या कानातून बाहेर पडली. तीच काडी त्याने दुसऱ्या मूर्तीच्या डाव्या कानात घातली तर ती त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. नंतर त्याने ती काडी तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, तर ती पोटातच राहिली.

    कालिदासाने पहिल्या मूर्तीची (म्हणजे एका कानाने ऐकणे व दुसऱ्याने सोडून देणे) किंमत दहा सुवर्णमुद्रा, दुसऱ्या मूर्तीची (म्हणजे कानाने ऐकलेले लगेच दुसऱ्याला सांगणे) किंमत शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसऱ्या मूर्तीची (म्हणजे कानाने ऐकलेले आपल्या पोटातच ठेवणे) किंमत हजार सुवर्णमुद्रा असल्याचे सांगितले.

    त्या तिन्ही मूर्तीची किंमत कालिदासाने बरोबर ओळखल्यामुळे त्या सुवर्णकाराने खूष होऊन कालिदासाची प्रशंसा केली. नंतर भोजराजानेही माणसातील स्वभाव वैशिष्ठ्ये सांगणाऱ्या मूर्ती तयार केल्याबद्दल त्या सुवर्णकाराचा यथोचित सत्कार करून त्याला परत पाठविले.

  • सेनापतीची हुशारी

    एका राजाच्या कोषागार विभागात दोन सेवक होते. एकाचे नाव होते धनीराम, तर दुसऱ्याचे मस्तीराम. मस्तीराम नावाप्रमाणेच मस्तवाल होता. कोषागार विभागात काम करताना अनेकदा राजाच्या खजिन्याचे दर्शन त्याला घडे. त्यामुळे त्याचा खजिन्यावर डोळा होता. खजिन्याचा किती दिवस नुसता पहाराच करायचा? संधी मिळाली तर खजिन्यातील मौल्यवान वस्तू चोरून दूर कोठेतरी पळून जाण्याचा व आरामात राहण्याचा त्याचा विचार होता. आपला हा विचार त्याने धनीरामलाही बोलून दाखविला. धनीराम सरळ स्वभावाचा व प्रामाणिक असल्यामुळे त्याने त्याला विरोध केला; परंतु एक दिवस धनीराम पहाऱ्यावर असतानाच मस्तीरामने संधी साधली व खजिन्यावर डल्ला मारला.

    राजवाड्यात चोरी झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. सेनापतीने पहाऱ्यावरील सेवकाला पकडून आणण्याचे आदेश दिले व सैनिकांनी धनीरामलाच पकडले. मात्र धनीरामने चोरीचा इन्कार करताना मस्तीरामचे नाव सांगितले. त्यामुळे मस्तीरामलाही पकडण्यात आले. त्याने धनीरामनेच चोरी केल्याचे सांगितले. दोघेही एकमेकांचे नाव घेत होते. त्यामुळे खरा चोर कोण, असा सेनापतीला प्रश्र पडला. सेनापती हुशार होता. त्याने त्या दोघांनाही सोडून दिले, मात्र जाताना त्यांच्याजवळ राजवाड्यातील बागेतील दोन-दोन हिरवे आंबे दिले व त्यांना सांगितले की, ज्याने चोरी केली नाही त्याच्याजवळील एका आंब्याचा रंग रात्रीतून पिवळा होईल.

    धनीराम व मस्तीराम दोघेही आपल्या घरी गेले. धनीरामने चोरी केलीच नव्हती, त्यामुळे तो घरी निवांत झोपला. मात्र मस्तीरामला झोप येईना. आंब्याचा रंग पिवळा (म्हणजे पिकलेला) झाला नाही तर आपली चोरी उघडकीस येईल या भीतीने त्याने मध्यरात्री दोनपैकी एका आंब्याला पिवळा रंग लावला व तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच सैनिक त्या दोघांच्या घरी गेले व त्यांच्याजवळील आंब्यासह त्या दोघांना सेनापतीपुढे उभे केले.

    धनीरामजवळील दोन्ही आंबे हिरवे होते, मात्र मस्तीरामजवळील एक आंबा हिरवा तर दुसरा पिवळा दिसत होता. सेनापतीने सैनिकांना मस्तीरामच्या मुसक्या बांधण्यास सांगितले. शेवटी मस्तीरामने चोरी केल्याची कबुली दिली.

    सेनापतीच्या धूर्तपणामुळे धनीरामसारख्या प्रामाणिक सेवकावरील चोरीचा आळ दूर झाला होता. त्यामुळे धनीरामने सेनापतीचे आभार मानले.

  • वक्तशीरपणाचे महत्त्व

    ठरलेल्या वेळेत ठरलेली कामे व्यवस्थित पूर्ण करण्याचा अनेकांचा अट्टहास असतो. त्यालाच वक्तशीरपणा म्हणतात.

    जगातील अनेक मोठे नेते वक्तशीरपणाबद्दल फारच आग्रही होते. ते त्यांच्या कार्यपद्धतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे.

    अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे देखील त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल फार प्रसिद्ध होते. कोणतेही काम त्या-त्या वेळी पूर्ण करण्याचे बंधन त्यांनी स्वतःवर घालून घेतले होते. त्यामुळे वेळेच्या बाबतीत ते अतिशय काटेकोरपणे वागत असत.

    अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी एक सचिव नेमला व त्याची नियुक्ती करतानाच त्यांनी त्या सचिवाला आपण वेळेबाबत किती आग्रही आहोत हे स्पष्टपणे सांगितले तसेच त्यानेही वेळेचे बंधन पाळावे म्हणून त्याला त्यांनी स्वत: एक खास सोनेरी घड्याळ भेट म्हणून दिले. ते सोनेरी घड्याळ पाहून तो सचिव खूष झाला.

    सुरुवातीचे काही दिवस त्या सचिवाने वेळेचा काटेकोरपणा बऱ्यापैकी सांभाळला. मात्र नंतर नंतर वेळेच्या बाबतीत त्याचा हलगर्जीपणा सुरू झाला. जॉर्ज वाशिंग्टन यांच्या ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी त्याला बोलावून घेतले व दिलेली वेळ पाळण्याचा सल्ला दिला.

    त्या वेळी सचिवाने आपल्या हातातील त्या सोनेरी घड्याळाकडे पाहात घड्याळ मागे पडत असल्याची तक्रार केली तर दुसऱ्या वेळेला चावी देऊनही घड्याळच बंद पडले असे सांगितले.

    त्यावर जॉर्ज वॉशिंग्टन म्हणाले की, घड्याळाविषयी तुझी तक्रार असेल तर तू तुझे घड्याळ बदल किंवा मी माझा सचिव बदलतो.

    त्यांच्या या उत्तरामुळे सचिव वरमला व वॉशिंग्टनना नेमके काय म्हणायचे आहे ते समजला. त्यानंतर त्याचे ते घड्याळ कधीच मागेही पडले नाही वा बंदही राहिले नाही. सचिवही नंतर वक्तशीरपणा काटेकोरपणे पाळू लागला.

  • स्वर्गाचे सरकार

    जगातल्या सर्वच देशांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेलीही. मात्र अनंत काळापासून सकल ब्रम्हांडावर राज्य करणारे, संपूर्ण बहुमत असलेले, अलौकिक, एकमेवाद्वितीय अढळ व स्थिर सरकार म्हणजेच “स्वर्गाचे सरकार”. या सरकारमधील मंत्रीमंडळाचे खातेवाटप एकदाच झालेय. त्यात पुन्हापुन्हा बदल होत नाही. कोणताही मंत्री दुसर्‍या मंत्र्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही. सगळेच मंत्री कार्यक्षम असल्यामुळे एकमेकांच्या तक्रारीसुद्धा करत नाहीत.

  • बाजरं पाहिलं पेरून…

    कसं हाय भाऊ कोणालेही वाटते की, शेती करणे फार सोपे आहे. पण प्रत्यक्षात शेती करणे किती कठीण आहे, हे ज्याचे त्यालाच समजते. "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' अशी परिस्थिती आहे. टोले एवढे पडतात की, सांगता सोय नाही. दिवस निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत काहीना काही टोले घेणे सुरूच असते. त्याले घडीची फुरसत नसते. तरीही बाकीच्यांना शेती मात्र सोपी वाटते. शेतकऱ्यांना किती टेन्शन असते, हे नोकरीवाल्यांना कसं समजणारं? इथे महिना संपला की, तारखेची वाट पाहणे सुरू असते. दरमहा ठरलेली रक्कम ठरलेल्या तारखेला हमखास मिळते. दुसरे म्हणजे, भविष्याचे काहीच टेन्शन नसते. त्यामुळे सगळं कसं हिरवं हिरवं दिसते.
    शेतकऱ्याला काही समजत नाही आणि आपणच किती हुशार आहो, हे दाखवायचे असते. आपल्या मनाचे मांडे मांडून तो शेतकऱ्याचे गणित कसे चुकते आणि मला शेतीबद्दल किती माहिती आहे, असे अक्कल पाजळून जो- तो सांगताना दिसतो. पण भल्या-भल्यांना हे ठाऊक नाही की, शेतकऱ्यांचं गणित हे निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. पाणी नाही, पाऊस नाही म्हटलं की, शेतकऱ्यांना रात्र-रात्र झोप लागत नाही. इकडे नोकरदार, व्यापारी मात्र निर्धास्त, ढाराढूर झोपा काढत असतात. शेत पिकलं नाही तर वर्ष कसं काढायचं ? हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा असतो. आई-वडिलांचं पालन-पोषण, मुलांचं शिक्षण, मुलीचे लग्न आणि दवाखान्याचा खर्च तसेच वेळेवर येणारे दुसरे विषय, हॅन्डल करताना कशी फजिती होते? हे खेड्यात गेल्याशिवाय शहरी बाबूला समजू शकणार नाही. जे लोक शेती करतात ते प्रत्यक्ष जाऊन पाहिल्याशिवाय कळणार नाही. इकडून तिकडून निसर्गाने साथ दिली आणि चांगले पीक आले तर शेतमालाला भावही मिळत नाही. हे एक प्रकारचे सुलतानी संकट शेतकऱ्याच्या बोकांडीवर दरवर्षी बसलेले असते. कोणतेही सरकार सत्तेत आले तरीही शेतमालाच्या भावाकडे लक्ष देत नाही. "शेतकऱ्यांचे शोषण हेच आमचे शासन' असा खाक्या सत्ताधिकारी पूर्वापार चालवत आलेले आहेत. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही आशा उरली नाही. ज्याला सगळ्या मार्गाने रोखल्या जाऊ शकते, जागोजागी शोषण होते, असा थट्टा,मस्करीचा विषय ठरलेला एकमेव प्राणी म्हणजे शेतकरी आहे. त्याला घडीघडी ठोकरा खाव्या लागतात. कुठेही अपमानच सहन करावा लागतो. त्याला प्रतिष्ठा नाही. जी मुले "शेतकरीपुत्र' म्हणून शेखी मिरवितात, त्यांचीही अक्कल पुढे पुढे आणखी वाढत जाते. ते सुद्धा आपल्या शेतकरी बापाला मूर्खातच काढतात. म्हणजे त्यांनी काबाडकष्ट करायचे, मला शिकवायचं, मोठा करायचं, नोकरीवर लावायचे. आणि उलट त्यांना उपदेशाचे डोस पाजणार की, तुम्हाला काहीही कळत नाही. व्वाह रे बेट्या. खूप हुशार झाला.
    बरं जाऊ द्या. आमच्याकडेही शेती आहे. खामगाव तालुक्यात आंबेटाकळी हे आमचं गाव. आजोबा पूर्वीपासून शेतीच करत होते. "उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी' असा समज त्या काळात होता. म्हणून आपल्या मुलानेही शेतीच करावी असे आबांना वाटत होते. वडिलांचे प्राथमिक शिक्षण त्या काळात गावातील शाळेत आणि पुढील शिक्षण गावापासून जवळच म्हणजे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरला नेमाने येथे झाले. सातवी पास झाल्यानंतर मॅट्रीकसाठी वडिलांना खामगाव येथील नॅशनल हायस्कूलमध्ये टाकण्यात आले. त्यावेळी वडील खामगावपासून जवळच असलेल्या घाटपुरी येथे आपल्या बहिणीकडे राहत होते. तेथून दररोज पायी शाळेत जाणे- येणे करत होते. त्या काळात आमच्या गावात बहुतेक मोजके लोक शिकलेले होते. सातवी पास झालेलेसुद्धा नोकरीवर लागले होते. मास्तरची नोकरी सहज मिळत होती. असे असताना पण नोकरीवर जाण्यासाठी किंवा गाव सोडण्यासाठी कुणीच सहजासहजी तयार होत नव्हते. मुलाला नोकरीवर पाठवले तर आपलं कसं होईल, शेतीवाडी कोण पाहील? हा प्रश्न माझ्या आबासमोरही होता. म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना नोकरी करू दिली नाही. त्यामुळे वडीलही शेतातच काम करू लागले. घरी गाडी-जोडी होतीच.
    या काळात गावात फारसे शिकलेले कोणी नव्हते. पण आमच्या गावाच्या बाजूला असलेल्या बोथाकाजी येथे गावंडेसाहेब हे नामांकित व्यक्ती होते. ते आमच्या आंबेटाकळी गावातील शिकलेल्या तरुणांना नोकरीवर लावण्यासाठी वेळोवेळी निरोप पाठवायचे. पण नोकरीला जाण्यासाठी कोणी सहजासहजी तयार होत नव्हते. माझे आई-वडील सांगतात की, त्यावेळेस सहजच मास्तरची नोकरी लागत होती, पण केली नाही. दरम्यानच्या काळात वडिलांचे लग्न झाल्यानंतर १९७८ मध्ये एसटीची ऑर्डर आली म्हणून खामगाव डेपोत फक्त एकच महिना काम केले. नंतर नोकरी सोडून पुन्हा शेती करणे सुरू केली. आमच्याकडे त्यावेळी एक शिवचे वावर आणि दुसरे म्हणजे टेंभुर्णीचे वावर होते. शिवचे वावर तिकडे दूर बोरीअडगाव शिवारात होते. टेंभुर्णीचे वावर रेंगटीच्या माथ्यावर म्हणजे अलिकडेच होते. या वावराच्या बाजूला म्हणजे, धुऱ्याले धुरा लागूनच घोगरे मामांचे वावर आहे. माझ्या वडिलांचे ते वर्गमित्र आहेत. पुढे पुंडलिकराव घोगरे मामा हे खामगाव पंचायत समितीचे सभापतीही बनले होते. पण लहानपणापासूनचे मित्र असल्याने वडिलांसोबत शेतात जात, सोबतच काम करत आणि सोबतच घरीही येत. त्यांच्यात गप्पा टप्पा चालत. "शेतीत काही पडेल नाही गड्या' असं मत त्याचं झालं. मग घोगरेमामांनी पुन्हा सल्ला दिला. "जमत असीन त नोकरीचं पाह्य गड्या गोविंदा'. म्हणून नांदा लावायचे. मग वडिलांनी नोकरीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. एसटी महामंडळाकडून नोकरीची ऑर्डर आली. पण तरीही आबा त्यांना नोकरीवर जाऊ देण्यास तयार नव्हते. "आपल्या घरचे कसे होईल, मुलाबाळांचे कसे होईल, एकुलता एक पोरगा तू आणि आम्ही थकलेले म्हातारे. मग आमचं कोण करणार? आपली शेतीच बरी आहे गड्या' असे म्हणत होते. पण यावेळी वडिलांनी शेतात करावे लागणारे काबाडकष्ट पाहीले. आणि नोकरीवर जायला परवडते काय? याबाबत गावातल्या दोस्तमित्रांचा, वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतला आणि एसटी वाहकाची नोकरी स्वीकारली. सुरुवातीला बरीच वर्षे त्यांनी मेहकर आगारात ड्युटी केली. नंतर १९८४ मध्ये जळगाव जामोद डेपो अस्तित्वात आला, त्यावेळी त्यांची बदली जळगाव जामोद येथे झाली, तेथे काही वर्षे काम केल्यानंतर पुन्हा ते मेहकरला बदलून आले.
    दरम्यान, १९९१ साली आम्ही काही कारणास्तव गाव सोडण्याचे ठरवले आणि खामगावला राहण्यासाठी छोटेसे घर विकत घेतले. चांदमारी भागातील त्या कुडाच्या घरात राहायला गेलो, नंतर सिमेंट-विटाचे घर बांधून त्यावर टीनपत्रे टाकले आणि तिथलेच झालो. याचकाळात आजोबांचे निधनही खामगाव येथेच झाले. आम्ही चारही भावंडे शाळा-कॉलेजात खामगावला शिकत होतो. वडील एसटीची ड्युटी करत होते. मग शेती कोण पाहणार ? हा प्रश्न निर्माण झाला होता. खामगाव येथून शेती पाहणे होत नसल्यामुळे बटाईने किंवा ठोक्याने दिल्याशिवाय पर्याय नव्हता. पण पीक काही हाती लागत नव्हते. तरीही शेती करणे परवडत नव्हते म्हणून मग मी स्वतःच शेती करण्याचे ठरवले. म्हटले, खामगाववरून पाहतो, आणि त्या वर्षी शिवच्या वावरात फक्त बाजरी पेरण्याचे ठरवले. उन्हाळ्यात शेती तयार केली आणि पावसाळ्यात नुसती बाजरीच पेरून घातली. आजूबाजूचे शेतकरी म्हणत की, "एवढी साजरी जमीन आहे. तू लेका बाजरीचं पेरली, तुहा आबा होता तेव्हा या वावराने कधी बाजरं पाहिलं नाही. बुडा चांगला माल काढत होता'. मी म्हणालो वावर पडित राह्यल्यापेक्षा बरं आहे.
    पहिला पाऊस पडला. पण शेतात मागच्या वर्षीचे हायब्रीडचे फनकटं तसेच होते. ते काड्या फणं उचलण्यासाठी बाया सांगितल्या. शेतातील हा केरकचरा जमा करून धुऱ्यावर न्यावा लागत असे. नुकताच पाऊस पडल्यामुळे त्यावेळी या कचऱ्याच्या एका ढिगाखाली विंचू असावेत, याचा साधा अंदाजही येत नव्हता. आणि तुम्हीही काढू शकत नाही जमा केलेल्या कचऱ्याखाली किती विंचू असावेत.? शेतात जागोजागी जमा केलेले हे फणकटं शिंदाड्या टोपल्यात डोक्यावर घेऊन धुऱ्यावर नेऊन टाकणे म्हणजे डेंजर काम होते. एका-एका टोपल्यांमध्ये मी त्यावेळी साधारण १५ ते २० जिवंत विंचू डोक्यावर वाहून नेले असावे. पण एकानेही दणका दिला नाही, त्यामुळे तो अनुभव माझ्या वाट्याला आला नाही.
    पाऊस पडल्यानंतर बाजरीचे पीक बहरले होते. पण ते पतले झाले होते. शेती करण्याचे ठरवले पण मी आंबेटाकळी गावात कधी नेटाने राहिलो नाही. दररोज खामगांव येथून येणे-जाणे करत होतो. आमचं हे शेतही अलिकडच्या स्टॉपजवळ होते. गवंढाळा फाट्यावर उतरून पूर्वेस पायी गेल्यास अगदी जवळ होते. त्यामुळे मी शक्यतो आंबेटाकळी गावात जात नव्हतो. इकडच्या इकडे खामगावला परत येत होतो. फक्त मजूर सांगण्यासाठी कधीमधी गावात जात होतो. मला त्या काळी आमची आत्या सरुबाई भाकरे यांची फार मदत मिळायची. शेतात कामासाठी बाया-माणसं सांगणे आणि इतर चिल्लर वस्तू गावातून, घरून आणणे हे सर्व त्याच करत होत्या. मी नुसता खामगाववरून जाऊन "वर वर' हल्लमटल्लम करत होतो. १९८५ साली सातवी पास झालो अन मी गाव सोडलं. आठवीपासून दहावीपर्यंत पंचगव्हाण येथे शाळा शिकलो. नंतर खामगाव येथे कॉलेज केले. त्यामुळे मला गावात कुणी फारसं ओळखत नव्हतं. आणि शेतातलंही काही जमत नव्हतं, तरी म्हटलं यंदा बाजरं पेरूनच पाहावं. पण ते पतलं झालं होतं. तरी झडती चांगली येईल असे वाटत होते.
    कोणत्या पिकावर कोणता रोग येईल, कोणती किड पडेल? हे सांगता येत नाही. बाजरीचेही तसेच झाले. या पिकावर वसई आली होती. वसई ही कातिणीसारखी असते. असं म्हणतात की, ती अंगावर मुतल्यास फोड येतात आणि पिकाचे नुकसानही करते. त्यामुळे पिकाचे कसे करावे हा प्रश्न होता. शेजारच्या वावरावाल्यांनी सल्ला दिला की, रात्रीच्या वेळी शेतात जाऊन रॉकेलचे टेंभे मिरवा. रात्रीच्या अंधारात आजूबाजूला असलेली वसई आपोआप टेंभ्यावर येऊन पडते आणि जळते. त्यामुळे होणारे नुकसान टळेल, असे सांगितले. त्यानुसार मी गावातल्या काही मित्रांना घेऊन रात्री शेतात जात होतो. रात्री अंधारात टेंभे लावण्याचा प्रकार एकदम भुतासारखा वाटत होता. पण आमच्यापैकी कुणालाही कशाचीही भीती वाटली नाही. किर्र अंधारात आम्ही कल्ला करत शिवच्या वावरात टेंभे मिरवत होतो.
    ही बहुतेक १९९४ सालची गोष्ट आहे. बाजरीचे पीक चांगले आले होते. पण मी तेव्हा दवाखान्यात होतो. बाजरी खुडणे आणि काढण्यासाठी काही दिवस मला आंबेटाकळीला राहावे लागले होते. दरम्यानच्या काळात पोळ्याचा सण आला. त्यामुळे मला तेथील शेगोकार टेलर यांनी त्यांच्या घरी जेवणासाठी सांगितले होते. तेव्हा मी मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या दामटल्या. हरभऱ्याच्या डाळीचे गोड पुरण खाल्ल्याने दाढदुखी सुरू झाली.आणि रात्री दात ठणकणे सुरू झाले. त्रास वावढा वाढला की, मला ताबडतोब खामगावला येणे भाग पडले. तेथे डॉ. सुषमा सरोदे मॅडमकडे उपचार घेऊन थेट अकोला येथे भरती व्हावे लागले. दाढ आतून सुजल्यामुळे तोंड उघडणे कठीण झाले होते. खाणेच काय चहा, दूध पिणेही बंद झाले होते. कारण दाढ एवढी सुजली की उजवा गाल टम्म फुगला होता. त्यामुळे तोंड उघडणेही जमत नव्हते. सगळं डोकं ठणठण करत होते. रात्रभर झोप लागत नव्हती. त्यामुळे अकोला येथील डॉक्टर मापारी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये मला भरती करण्यात आले. शस्त्रक्रिया करून दाढ काढावी लागली. सांगायचे हेच की, त्या क्षणाला मला विंचू डसण्यापेक्षाही दाढीचे दुखणे वेदनादायक वाटत होते. आणि या दाढीच्या दुखण्यापेक्षाही शेती करणे अधिक त्रासदायक, कठीण आहे. असे आता वाटते.
    आजही माझे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र आणि इतर सर्व कागदपत्रांवर चांदमारी खामगावचाच पत्ता आहे. एवढंच नाही तर मुलांच्या सर्व कागदपत्रांवरही हाच कायमचा पत्ता आहे. सध्या खामगावच्या त्या घरात लहान भाऊ गणेश आणि त्याचा परिवार राहात आहे तर आई-वडील आणि सर्वात लहान भाऊ ज्ञानेश्वर व त्याचा परिवार हे सगळे आता आंबेटाकळी येथे राहतात, पण नवीन जागेत. विशेष म्हणजे, आंबेटाकळीतील जुने वडिलोपार्जित घर ओसाड पडले आहे आणि वडिलोपार्जित असलेले शिवचे वावर विकले आहे. त्या बदल्यात गावाजवळील भवानी मायच्या देवळाजवळ खाल्त दुसरे शेत विकत घेतलेले आहे. आता एखादे वेळी आंबेटाकळी गावात जातो आणि शेतात गेलो की, सरुबाई भाकरे आत्या भेटते आणि अजूनही आठवणीनं विचारते ? यंदा बाजरं पेरतं का?
    -- जनार्दन गव्हाळे, औरंगाबाद

  • खरे दुःख

    इतरांपेक्षा स्व-बांधवांनी दिलेले दुःख जास्त तापदायक असते हे त्या दिवशी त्या सोन्याच्या कणालाही कळले.

  • व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा

    प्रेम’ या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे.. त्याचा हेतू हि फार उदात्तह.. प्रेमाची व्याख्या करून त्याला शब्दात सामविणे जवळजवळ अशक्यच, एव्हढी त्याची व्याप्ती आहे. प्रेम केवळ जोडीदारांमध्ये असते असे नाही तर समाजाच्या, कुटुंबाच्या प्रत्येक घटकावर आपल्याला प्रेम करता येते… ते कुठेही आणि कसही करता येत. प्रेमभावना काय असते याचे सुरेख वर्णन मंगेश पाडगावकरांनी केलं आहे.

  • प्रतिभावंत कवी, तत्त्वचिंतक विं.दा.करंदीकर

    विंदा करंदीकर हे धालवली खारेपाटण ता. देवगड गावचे सुपुत्र, महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवी, जेष्ठ लेखक, अभ्यासू आणि जाणकार समीक्षक, बाल नाटककार, संस्कृत आणि मराठी वाङ्‌मय गाढे अभ्यासक .एक चोखंदळ वाचक, विध्यार्त्यांचे मार्गदर्शक. असे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्व. विंदाच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो..!