(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • हुशार नोकर

    एक महापंडित होते. सर्व शास्त्रांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्या जोरावर त्यांनी अनेक सभा जिंकल्या होत्या. मात्र महापंडित असूनही राजा आपल्याला 'राजगुरु' करीत नाही, ही त्याची खंत होती.

    एकदा ते राजाकडे गेले व आपणास “राजगुरू” करावे म्हणून साकडे घातले. राजा म्हणाला. माझ्या तीन प्रश्रांची उत्तरे दिलीत तर मी तुम्हाला राजगुरू करीन. उत्तरे पटली नाहीत तर मात्र मृत्युदंडाची शिक्षा देईन.

    परमेश्वर कोठे असतो? तो कोणत्या दिशेकडे पाहतो आणि तो नेमके काय काम करतो? हे राजाचे तीन प्रश्र होते.

    खरे तर या प्रश्रांची उत्तरे पंडिताला माहीत होती. मात्र, जर राजाला ती पटली नाहीत तर आपला बळी जाईल या कल्पनेनेच ते धास्तावले. त्यांनी उत्तरासाठी तीन दिवसाची मुदत मागितली. महापंडित घरी आले

    त्यांचा नोकर खूपच हुशार होता. दरबारातली घटना कळली तेव्हा तो म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. तीन दिवसांनंतर मीच राजाकडे जाईन व बळी गेला तर माझाच जाईल. तीन दिवसांनंतर तो नोकर राजाकडे गेला व त्याने महापंडितांऐवजी मीच तुमच्या प्रश्रांची उत्तरे देईन व ती पटली नाहीत तर मृत्युदंडही स्वीकारीन, असे म्हणाला.

    “परमेश्वर कोठे राहतो?” या पहिल्या प्रश्नासाठी, त्याने पेलाभर दुध मागविले. मग म्हणाला “हे दूध आहे मात्र त्याच्या कणाकणात असलेले लोणी दिसत नाही. तसेंच प्रत्येक अणू-रेणूत परमेश्वर असूनही तो दिसत नाही.”

    “परमेश्वर कोणत्या दिशेला पाहतो?” या उत्तरासाठी त्याने एक पेटलेली मेणबत्ती मागवली. ती दाखवत तो म्हणाला, “ही मेणबत्ती कोणत्याही विशिष्ट दिशेकडे पाहात नाही. तिचा प्रकाश मात्र चारही दिशांना पसरला आहे. परमेश्वरही चारही दिशांना सदैव पाहतो त्यामुळे तो सगळीकडे आहे.”

    आता तिसरा प्रश्र. “परमेश्वर काय करतो?” तर राजा म्हणून तुम्ही जे करता तेच! म्हणजे एखाद्याला वर चढविणे, खाली ढकलणे, कोणाला जीवनदान तर कोणाला मृत्युदंड देणे. ही जशी कामे तुम्ही करता तसेच परमेश्वरही अशी कामे करतो. म्हणजे, तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देतो.

    राजाला ही तिन्ही उत्तरे लगेच पटली व त्यालाच त्याने राजगुरू होण्याची विनंती केली. मात्र नोकर म्हणाला, त्या जागेसाठी माझे मालकच योग्य आहेत. राजानेही विचार केला की, नोकरच एवढा हुशार तर महापंडित खरेच ज्ञानी असावेत. त्यामुळे त्यांना बोलावून त्वांनी त्यांची राजगुरू पदावर नियुक्ती केली..

  • मंगळ – एक लघुकथा

    नाना हे गावातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व. नानांच्या नावातच दोनदा ‘ना’ असल्यामुळे त्यानी कधी कोणाला नंतर ना म्हटलेच नाही. नानांच वय साधारण 60 वर्षे पण नाना आजही 10 वर्ष वयाच्या बालकांपासुन तर मरणासक्त झालेल्या म्हाताऱ्यां पर्यंत उत्तम पध्दतीने जुळवून घेतात ते नानांच मोठ कौशल्यच म्हणाव लागेल.

  • कालिदासाचा न्याय

    भोज राजाच्या पदरी असलेला कालिदास चांगला कवी होताच. परंतु इतर कवी व कलावंतांचीही त्यालाचांगली कदर होती. गोरगरीबांनाही तो राजाकरवी मदत देई.

    एकदा एक दरिद्री शेतकरी कालिदासला भेटला व त्याने आपले दारिद्रय करण्याची विनंती केली. कालिदासाने दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात येण्यास सांगितले. मात्र, येताना रिकाम्या हाताने न येता राजासाठी ऐपतीप्रमाणे कोणतीही भेटवस्तू घेऊन ये, अशी सूचना केली. त्या शेतकऱ्याने येताना आठ-दहा उसाची कांडकी आणली होती. कालिदासानेही ती घेऊन दुसऱ्या दिवशी दरबारात येण्यास सांगितले.

    शेतकरी रात्रीच्या मुक्कामासाठी एका धर्मशाळेत गेला. दमूनभागून आल्यामुळे रात्री त्याला गाढ झोप लागली. त्या शेतकऱ्याचे गाठोडे काही लबाड माणसांनी पाहिले होते. रात्री शेतकरी झोपल्यावर त्यांनी गाठोड्यातील सर्व उसाची कांडकी पळविली व गाठोडे रिकामे दिसल्यास शेतकरी चोरीची तक्रार करील म्हणून त्या गाठोड्यात अर्धवट जळालेल्या काटक्या ठेवून गाठोडे बांधून जसेच्या तसे ठेवून दिले.

    त्या शेतकऱ्याला याची काहीच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो गाठोडे घेऊन राजदरबारात आला व त्याने भोजराजाला नम्रपणे नमस्कार करून आपल्याजवळचे गाठोडे भेट म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. सेवकांनी गाठोडे उघडले तर आत अर्धवट जळालेल्या काटक्या होत्या. ते पाहून शेतकरी घाबरून थरथर कापू लागला. शेजारीच उभ्या असलेल्या कालिसादालाही त्या काटक्या पाहून आश्चर्य वाटले. त्या जळक्या काटक्या पाहून दरबारातील काही लोक संतप्त झाले. त्यांना राजाचा हा अपमान वाटला म्हणून त्यांनी त्या शेतकऱ्याला कडक शिक्षा करण्याची मागणी केली.

    मात्र कालिदासाने सर्वांना शांत केले. तो राजाला म्हणाला की, महाराज, त्या शेतकऱ्याला तुम्हाला जे नेमके सांगायचे आहे तेच त्याने त्याच्या भेटवस्तूतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची परिस्थितीच अशी आहे की, तो जगूही शकत नाही आणि मरुही शकत नाही. त्यामुळेच त्याने अर्धवट जळालेल्या काटक्या आपल्याला भेट म्हणून सादर केल्या आहेत.

    कालिदासाचा तो युक्तिवाद ऐकून भोज राजा खूश झाला व त्याने त्याच गाठोड्यात आपल्या हाताने ओंजळभर सुवर्णमोहरा त्या शेतकऱ्याला दिल्या. क्षणात सधन झालेला शेतकरी कालिदासाला मनोमन धन्यवाद देऊन राजदरबारातून निघून गेला.

  • एक सवारी डांग बागलाणची

    नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील डांग बागलाणचे महत्व

  • वेळेनंतरची उपरती

    एक न्यायमूर्ती होते. अतिशय निःस्पृह व कर्तव्यकठोर म्हणून त्यांची ख्याती होती. खुनाचा आरोप सिद्ध झालेल्या प्रत्येक खुन्याला कोणीतीही दयामाया न दाखविता त्यांनी फाशीची शिक्षा ठोठावली होती. कोणताही खून खटला त्यांच्या न्यायालयात असला की, आरोपीला फाशी होणारच हे जवळजवळ निश्चित झालेले असायचे.

    आपल्या कर्तव्यकठोर स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती घरातही तसेच वागायचे. त्यामुळे त्यांच्या मुलाला लहानपणापासून प्रेम मिळाले नाही. त्यामुळे तरुणपणी मुलगा वाईट संगतीने बिघडला. त्याच्याच हातून एकाचा खून झाला व तो खटला चालविण्यासाठी नेमका याच न्यायमूर्ती समोर आला.

    एरवी प्रत्येक खुन्याला फाशी देणारे हे न्यायमूर्ती समोर आपला मुलगा आरोपी असल्याचे पाहून कचरले. त्यांची कर्तव्यकठोरता कमी झाली. त्यांचे मुलाविषयीचे ' ममत्व' एकदम जागे झाले. त्यामुळे न्यायदान करताना ते आता बुद्धिवादाची भाषा बोलू लागले.

    सध्याच्या काळात फाशीची शिक्षा अमानुष आहे. एकाने दुसऱ्याचा जीव घेतला म्हणून त्याचा पुन्हा आपण जीव घ्यायचा का? अशी भाषा त्यांनी सुरू केली. मात्र मुलानेच त्यांना अडविले. तो म्हणाला, ''माझ्यावरील ममत्वामुळे तुम्ही आता हे बोलत आहात. मात्र खुनाचा गुन्हा मला मान्य आहे. त्यामुळे तुम्ही मला फाशी दिलीच तरच ती योग्य होईल व तुमच्याही न्यायदानास 'कलंक' लागणार नाही.

    मात्र न्यायमूर्तीना आपल्या मुलाकडून घडलेल्या अपकृत्यात आपणही थोडेफार वाटेकरी आहोत, असे वाटू लागले. त्यांना उपरती झाली, परंतु आता खूप उशीर झाला होता.

    आपल्या हातून या खटल्याचा योग्य निकाल लागणार नाही हे ओळखून त्यांनी हा खटला दुसऱ्या न्यायमूर्तीकडे चालवावा, अशी शिफारस केली व आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते न्यायालयातून बाहेर पडले.

  • संपत्तीचा मोह

    प्राचीन काळची ही कथा आहे. एका नगरात रामरतन नावाचा एक धनाढ्य व्यापारी राहात होता. व्यापारधंद्यात त्याने इतकी संपत्ती मिळवली होती की, त्या नगरीच्या राज्याच्या खजिन्यातदेखील इतकी संपत्ती नसावी. एकदा रामरतनला वाटले की, राजाला आपली संपत्ती दाखवावी व त्याची मर्जी प्राप्त करून घ्यावी म्हणून त्याने राजाला बोलावण्याचा निर्णय घेतला.

    रामरतनला एकूण तीन मुले होती. त्यापैकी धाकट्या मुलाने मात्र याला विरोध केला. कारण तो हुशार होता. रामरतनला तो म्हणाला राजाला बोलावून तुम्ही आपल्या घरावर संकट ओढवून घेत आहात. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत रामरतनने राजाला एके दिवशी घरी बोलावले. राजा आल्यावर त्याला आपली सर्व संपत्ती दाखवली. तळघरात ठेवलेले सोने-चांदी, हिरे, पावू माणके व अगणित सोन्या-चांदीची नाणी पाहून राजाचेही डोळे दीपले. मात्र एवढी संपत्ती आपल्या खजिन्यात आली तर फार चांगले होईल असाही त्याच्या मनात विचार आला.

    राजवाड्यात परतल्यानंतर त्याने प्रधानाशी चर्चा केली. प्रधान म्हणाला, रामरतनची संपत्ती तुमची होऊ शकते. तुम्ही त्याला राजवाड्यात बोलावून असा एक प्रश्र विचारा की, त्याचे उत्तर त्याला देता येणार नाही व 'ज्याच्याकडे धन आहे, परंतु बुद्धी नाही, तो धन बाळगायला लायक नाही' असे सांगून त्याची सर्व संपत्ती तुम्ही जप्त करू शकता.

    त्याप्रमाणे राजाने रामरतनला बोलावून प्रधानाने पढविल्याप्रमाणे सांगितले व 'सतत काय वाढत जाते व काय कमी होत जाते', या प्रश्राचे उत्तर तू एका दिवसात दिले नाही तर छी सर्व संपत्ती सरकारी खजिन्यात जमा होईल, असे सांगितले. राजाची ती अट ऐकून रामरतन बेशुद्ध होण्याच्याच मार्गावर होता. परंतु कसाबसा स्वताला सावरत घरी आला व त्याने घरातील सर्वांना राजाची ही अट सांगितली. त्यामुळे घरातील सर्वजण काळजीत पडले. धाकट्या मुलाने मात्र रामरतनला धीर दिला व त्याने रामरतनच्या कानात या प्रश्राचे उत्तर सांगितले.

    दुसऱ्या दिवशी रामरतन आनंदाने राजाकडे गेला व आदल्या दिवशी त्याने विचारलेल्या प्रश्राला उत्तर देताना म्हणाला, तृष्णा (वासना) ही अशी एकच गोष्ट आहे जी सतत वाढत जाते व माणसाचे आयुष्य सतत कमी होत जाते. त्याचे उत्तर ऐकून राजाही खूष झाला व त्याने रामरतनला संपत्ती तुझीच आहे, तूच त्याचा चांगला वापर कर, असे सांगून परत पाठविले.

    रामरतनने घरी आल्यावर धाकट्या मुलाचे कौतुक केले व त्या संपत्तीचा चांगल्या प्रकारे विनियोग करण्याचे धाकट्या मुलालाच अधिकार दिले.

  • हसणे

    हसणं हे नेहमीच संसर्गजन्य असतं.. दुःखाचं असं नाही ते एकट्याचं असतं… ते शेअर करावं लागतं.. म्हणूनच अनादी कालापासून दुःखापेक्षा हसणं श्रेष्ठ आहे…

  • तीन मूर्तींचे रहस्य

    भोजराजा कलेचा भोक्ता असल्यामुळे त्याच्या पदरी अनेक विद्वान होते. कालिदासासारखे 'नवरत्न'ही दरबारात होते. त्यामुळे दूरदूरहून आलेले अनेक कलावंत आपली कला सादर करायचे व राजाकडून बिदागी घेऊन जायचे.

    एकदा एक सुवर्णकार सोन्याच्या तीन मूर्ती घेऊन भोजराजाच्या दरबारी आला. त्या तिन्ही मूर्तीची किंमत वेगवेगळी होती. एका मूर्तीची किंमत होती दहा सुवर्णमुद्रा, दुसरीची होती शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसरीची होती हजार सुवर्णमुद्रा. तिन्ही मूर्ती शुद्ध सोन्याच्या, समान वजनाच्या मात्र त्यांच्या किमती वेगवेगळ्या का, याचे कोडे भोजराजासह सर्व दरबारी लोकांना पडले. मात्र नेमके रहस्य सुवर्णकाराखेरीज कोणालाच माहिती नव्हते व ते ओळखावे म्हणून सुवर्णकार दरबारात आला होता. मात्र कोणालाच त्या मूर्तीच्या किमतीचे रहस्य सांगता येईना. शेवटी भोजराजाने कालिदासाला पाचारण केले.

    कालिदासाने तिन्ही मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केले. तिन्ही मूर्ती शुद्ध सोन्याच्या, समान वजनाच्या व दिसायला सारख्याच होत्या. बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्या मूर्तीमधील रहस्याची गोम कालिदासाच्या लक्षात आली.

    त्याने एक मोठी काडी घेतली व पहिल्या मूर्तीच्या डाव्या कानात घातली व सरळ पुढे नेली तर ती उजव्या कानातून बाहेर पडली. तीच काडी त्याने दुसऱ्या मूर्तीच्या डाव्या कानात घातली तर ती त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. नंतर त्याने ती काडी तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, तर ती पोटातच राहिली.

    कालिदासाने पहिल्या मूर्तीची (म्हणजे एका कानाने ऐकणे व दुसऱ्याने सोडून देणे) किंमत दहा सुवर्णमुद्रा, दुसऱ्या मूर्तीची (म्हणजे कानाने ऐकलेले लगेच दुसऱ्याला सांगणे) किंमत शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसऱ्या मूर्तीची (म्हणजे कानाने ऐकलेले आपल्या पोटातच ठेवणे) किंमत हजार सुवर्णमुद्रा असल्याचे सांगितले.

    त्या तिन्ही मूर्तीची किंमत कालिदासाने बरोबर ओळखल्यामुळे त्या सुवर्णकाराने खूष होऊन कालिदासाची प्रशंसा केली. नंतर भोजराजानेही माणसातील स्वभाव वैशिष्ठ्ये सांगणाऱ्या मूर्ती तयार केल्याबद्दल त्या सुवर्णकाराचा यथोचित सत्कार करून त्याला परत पाठविले.

  • सेनापतीची हुशारी

    एका राजाच्या कोषागार विभागात दोन सेवक होते. एकाचे नाव होते धनीराम, तर दुसऱ्याचे मस्तीराम. मस्तीराम नावाप्रमाणेच मस्तवाल होता. कोषागार विभागात काम करताना अनेकदा राजाच्या खजिन्याचे दर्शन त्याला घडे. त्यामुळे त्याचा खजिन्यावर डोळा होता. खजिन्याचा किती दिवस नुसता पहाराच करायचा? संधी मिळाली तर खजिन्यातील मौल्यवान वस्तू चोरून दूर कोठेतरी पळून जाण्याचा व आरामात राहण्याचा त्याचा विचार होता. आपला हा विचार त्याने धनीरामलाही बोलून दाखविला. धनीराम सरळ स्वभावाचा व प्रामाणिक असल्यामुळे त्याने त्याला विरोध केला; परंतु एक दिवस धनीराम पहाऱ्यावर असतानाच मस्तीरामने संधी साधली व खजिन्यावर डल्ला मारला.

    राजवाड्यात चोरी झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. सेनापतीने पहाऱ्यावरील सेवकाला पकडून आणण्याचे आदेश दिले व सैनिकांनी धनीरामलाच पकडले. मात्र धनीरामने चोरीचा इन्कार करताना मस्तीरामचे नाव सांगितले. त्यामुळे मस्तीरामलाही पकडण्यात आले. त्याने धनीरामनेच चोरी केल्याचे सांगितले. दोघेही एकमेकांचे नाव घेत होते. त्यामुळे खरा चोर कोण, असा सेनापतीला प्रश्र पडला. सेनापती हुशार होता. त्याने त्या दोघांनाही सोडून दिले, मात्र जाताना त्यांच्याजवळ राजवाड्यातील बागेतील दोन-दोन हिरवे आंबे दिले व त्यांना सांगितले की, ज्याने चोरी केली नाही त्याच्याजवळील एका आंब्याचा रंग रात्रीतून पिवळा होईल.

    धनीराम व मस्तीराम दोघेही आपल्या घरी गेले. धनीरामने चोरी केलीच नव्हती, त्यामुळे तो घरी निवांत झोपला. मात्र मस्तीरामला झोप येईना. आंब्याचा रंग पिवळा (म्हणजे पिकलेला) झाला नाही तर आपली चोरी उघडकीस येईल या भीतीने त्याने मध्यरात्री दोनपैकी एका आंब्याला पिवळा रंग लावला व तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच सैनिक त्या दोघांच्या घरी गेले व त्यांच्याजवळील आंब्यासह त्या दोघांना सेनापतीपुढे उभे केले.

    धनीरामजवळील दोन्ही आंबे हिरवे होते, मात्र मस्तीरामजवळील एक आंबा हिरवा तर दुसरा पिवळा दिसत होता. सेनापतीने सैनिकांना मस्तीरामच्या मुसक्या बांधण्यास सांगितले. शेवटी मस्तीरामने चोरी केल्याची कबुली दिली.

    सेनापतीच्या धूर्तपणामुळे धनीरामसारख्या प्रामाणिक सेवकावरील चोरीचा आळ दूर झाला होता. त्यामुळे धनीरामने सेनापतीचे आभार मानले.

  • वक्तशीरपणाचे महत्त्व

    ठरलेल्या वेळेत ठरलेली कामे व्यवस्थित पूर्ण करण्याचा अनेकांचा अट्टहास असतो. त्यालाच वक्तशीरपणा म्हणतात.

    जगातील अनेक मोठे नेते वक्तशीरपणाबद्दल फारच आग्रही होते. ते त्यांच्या कार्यपद्धतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे.

    अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे देखील त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल फार प्रसिद्ध होते. कोणतेही काम त्या-त्या वेळी पूर्ण करण्याचे बंधन त्यांनी स्वतःवर घालून घेतले होते. त्यामुळे वेळेच्या बाबतीत ते अतिशय काटेकोरपणे वागत असत.

    अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी एक सचिव नेमला व त्याची नियुक्ती करतानाच त्यांनी त्या सचिवाला आपण वेळेबाबत किती आग्रही आहोत हे स्पष्टपणे सांगितले तसेच त्यानेही वेळेचे बंधन पाळावे म्हणून त्याला त्यांनी स्वत: एक खास सोनेरी घड्याळ भेट म्हणून दिले. ते सोनेरी घड्याळ पाहून तो सचिव खूष झाला.

    सुरुवातीचे काही दिवस त्या सचिवाने वेळेचा काटेकोरपणा बऱ्यापैकी सांभाळला. मात्र नंतर नंतर वेळेच्या बाबतीत त्याचा हलगर्जीपणा सुरू झाला. जॉर्ज वाशिंग्टन यांच्या ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी त्याला बोलावून घेतले व दिलेली वेळ पाळण्याचा सल्ला दिला.

    त्या वेळी सचिवाने आपल्या हातातील त्या सोनेरी घड्याळाकडे पाहात घड्याळ मागे पडत असल्याची तक्रार केली तर दुसऱ्या वेळेला चावी देऊनही घड्याळच बंद पडले असे सांगितले.

    त्यावर जॉर्ज वॉशिंग्टन म्हणाले की, घड्याळाविषयी तुझी तक्रार असेल तर तू तुझे घड्याळ बदल किंवा मी माझा सचिव बदलतो.

    त्यांच्या या उत्तरामुळे सचिव वरमला व वॉशिंग्टनना नेमके काय म्हणायचे आहे ते समजला. त्यानंतर त्याचे ते घड्याळ कधीच मागेही पडले नाही वा बंदही राहिले नाही. सचिवही नंतर वक्तशीरपणा काटेकोरपणे पाळू लागला.