(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सहृदयता हवी

    थोर तत्त्वज्ञ कन्फ्युनिअस याची साधी राहणी व उच्च विचारसरणी हे खास वैशिष्ट्य होते. त्याला बासरी वाजवायचा फार नाद होता. अनेकदा तो बासरी वाजवत एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असे. पैसा आणि संपत्तीपेक्षा त्याला मानवता जास्त प्रिय होती. त्यामुळे साहजिकच त्याच्याजवळ फारसा पैसा नव्हता. त्याची त्यालाही कधी खंत वाटली नाही.

    एकदा कन्फ्युनिअस असाच एके ठिकाणी बासरी वाजवत उभा असताना तेथे एक भिकारी आला व त्याला म्हणाला, ' 'मला काहीतरी खायला द्या. मी दोन-तीन दिवस उपाशी आहे. '' त्याची स्थिती पाहून कन्फ्युनिअसला दया आली आणि त्याने आपल्या सदर्‍याचे खिसे चाचपले. खिशात अर्थातच काहीही नव्हते.

    कन्फ्युनिअस विचारात पडला. त्या भिकार्‍याला घरी घेऊन जावं व जेवू घालावं असे एकदा त्याला वाटले. मात्र घर खूपच लांब होते आणि त्या भिकार्‍याची अवस्था पाहता तो घरापर्यंत चालत कसा येईल हाही प्रश्रच होता.

    कन्फ्युनिअसने त्या भिकार्‍याचा हात हातात घेतला व तो त्याला म्हणाला, '' हे मित्रा, मला माफ कर. तुला द्यायला आत्ता माझ्याजवळ काहीही नाही. तुझी अवस्था माझ्या घरी येण्यासारखी नाही. त्यामुळे तू येथेच थांब. मी आता लगेच घरी जाऊन येतो व तुझ्यासाठी काही तरी खायला घेऊन येतो. ''

    त्या भिकार्‍याला कन्फ्युनिअसच्या स्पर्शाची थोरवी जाणवली. तो व्याकूळ नजरेने त्याला म्हणाला, “तुझी सहृदयता मला जाणवली. त्यामुळे माझे पोट केव्हाच भरले. मला पैसे कोणीही देतं मात्र तुझ्यासारखी सहृदयता मला अद्याप कोणीही दिलेली नाही. त्यामुळे इतरांच्या दानापेक्षा तुझे हे दान केव्हाही श्रेष्ठ आहे. माझी भूक भागली.”

    असे म्हणून तो भिकारी तेधून आनंदाने निघून गेला.

  • अविस्मरणीय गांधीजयंती सप्ताह

    आठवणींमध्ये रमण्याचा छंद सगळ्यांनाच असतो. 'गुजरा हुआ जमाना' आपल्याला नेहमीच वर्तमानापेक्षा अधिक रमणीय भासतो, कारण त्यात आठवणींचे गहिरे रंग भरलेले असतात. सुख-दुःखाचे प्रसंग, जुनी माणसं आठवताना आपलं मन भरून येतं.पण अप्रूप वाटावं त्या उत्सवाचं अर्थात हुतात्मा बाबू गेनू यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घोडपदेव विभागातील श्रीकापरेश्वर मंदिराच्या प्रांगणात होत असलेल्या महात्मा गांधी जयंती सप्ताहाचं. मराठी मातीत वाढलेल्या, रुजलेल्या माणसासाठी *"महात्मा गांधी जयंती सप्ताह’* म्हणजे निव्वळ शब्दात व्यक्त न करता येणारा जिव्हाळ्याचा विषय. *‘वसुधैव कुटुंबकम‘* हे मानणारी आपली भारतीय संस्कृती. अशाच काही व्रतस्थानी,मराठमोळी माणसं या भागात राहतात. त्यातल्याच काही उत्साही आणि रसिक लोकांनी एकत्र येऊन सुरु केलेला हा सप्ताह म्हणजे ‘आकाशी झेप घेरे पाखरा ....!’ समस्ताना प्रेरणा देणारा गांधी सप्ताह. बापुजींना मानणारे आणि न मानणारे दोन ही घटक होते. मलाही महात्मा गांधीविषयी आणि त्यांच्या आडमुठ्या हट्टापायी भारताला जे सोसावे लागत आहे त्या विषयी घृणा आहे. पण मला त्यात आत्मीयता नाही म्हणून इतरांची मते वेगळी असतात. असे काही अहिंसेच्या मार्गावरचे पुजारी या विभागात राहत होते. त्यांच्या योगदानामुळे हा सप्ताह मुंबई शहरात नावारूपाला आला. एक दिवशीय औपचारिकता म्हणून गांधी जयंती साजरी करणारे शासनासहित विविध सामाजिक संस्था किंवा पक्ष आदिंनी गांधी सप्ताह कधी केला नाही. असो माझा विभाग या मध्ये आघाडीवर होता. याचा मला अभिमान आहे.

    मला आठवतय लहान असताना सप्ताहात एक दर्जेदार नाटकातील एक संवाद आठवतोय ‘"गेले ते सुखाचे दिवस, आता ते परत कधीही येणार नाहीत‘. एक खिन्न आर्तता त्याच्या त्या सुस्कारा टाकून काढलेल्या उद्‌गाराचे प्रतीत आज मला कळतंय. खरोखर गेले ते गांधी सप्ताहाचे दिवस. किती सामर्थ्य ! किती चैतन्य ! तो सप्ताह म्हणजे बालमनावर सुसंस्कार करणारा उत्सव....! हुंदडण्याबरोबर ज्ञानार्जन देणारा उत्सव...! याच उत्सवात गीतगायन,नाटक, वकृत्व स्पर्धा होत होत्या. विविध नाट्यमंडळे नाटक सादर करीत असत. दर्जेदार सादरीकरण .... त्या लाकडी फळ्यांच्या धडधडणाऱ्या रंगमंचावर धमाल यायची. पाहतच रहायचं.

    भारतीय बेकरीच्या बाजूला राहणाऱ्या एक हांडे नावाच्या मुलीने मधुर आवाजात गायलेले ‘दो आँखे बारह हाथ’ मधील ‘ए मालिक तेरे बंदे हम’ गीतांनी समस्ताना रडविले होते. ‘गवताला जेव्हा भाले फुटतात’ या ऐतिहासिक नाटकात यशवंत तळेकर नावाच्या कलावंताने व्यासपीठावर यवनांशी लढाई करणाऱ्या प्रसंगात अशी गोल उडी जागच्या जागी मारली ते पाहून टाळ्यांचा कडकडाट कितीतरी वेळ चालला होता. या प्रसंगाचे वर्णन करायचं म्हणजे त्या कलाकाराला रसिक प्रेक्षकातून ५ रुपयाचं बक्षीस दिले. त्यावेळेचे ५ रुपये कमी नाहीत.तेव्हा मिल कामगारांना महिना ६० रुपये पगार होता. दुर्लक्षित ऐतिहासिक आणि काव्यमय असे वेगळे विषय अतिशय कल्पकतेने हाताळणारी नाट्यमंडळे आणि त्यांचा नाटक दर्जा, उत्कृष्ट अभिनय व्यावसायिक नाटकांना देखील मागे टाकत असे.वकृत्व स्पर्धेत अरुण पवार नावाच्या विद्यार्थ्याने इंग्लिश मध्ये भाषण करून नवा पायंडा पाडला होता. विशेष म्हणजे घराघरातून माणसं या स्पर्धकांना प्रोत्साहन द्यायला यायची. बक्षीसही देऊ करीत होती.

    या सप्ताहात सात दिवस दारूबंदी असायची. सतत काहींना काही कारणास्तव होणाऱ्या राडेबाजीला मज्जाव म्हणजे गांधी सप्ताह. जेथे दारूचे धंदेच बंद तेथे मारामारी होत नसे. भांडण तंटे नव्हते. तरीही काही जन घराघरात भूश्याच्या गोणीतून दारू आणून विकायचा प्रयत्न करीत पण पोलीस ठाणे अशा मंडळींची वरात काढीत होते. नशाबंदी मंडळाचे दर्जेदार कौटुंबिक, राष्ट्राभिमान जागृत करणारे चित्रपट पाहायला मिळत होते. यामुळे बाल्यावस्थेतील दैनंदिन वर्तनात परिवर्तन घडून येत होतं. मुलांना त्यावेळेस शाळा एके शाळा... कोचिंग क्लास नाहीत आणि घरी शिकवणी नाही कारण घरातलेच शिकलेले नव्हते त्यामुळे ते अभ्यास काही घेत नसत. मग आपल्याला मस्त उंडारण्याशिवाय दुसरं काम काय...! त्या उंडारण्यात मजा होती. विविध प्रकारचे खेळ खेळायला मिळत. अशा वेळी बालकांचे विविध कलागुण गांधी सप्ताहात पहायला मिळत. आपल्यातला कलावंत, बुद्धिवंत विभागात दिसू लागला.

    ते अहिंसेचे मार्गावरचे पुजारी पिकल्या पानाप्रमाणे गळून पडू लागले आणि या उत्सवाची शान हळूहळू लोप पावत गेली. आज गांधी सप्ताह होत नाही. पण धाकु प्रभुजी वाडी सार्वजनिक मंडळाने महात्मा गांधी जयंती अव्याहतपणे सुरु ठेवली आहे. खरं तर या गांधी सप्ताह बंद होण्यामागे राजकारण आहे . कुटनीती रचली गेली.पण त्या फंदात मला पडायचे नाही.

    त्या मान्यवरांचे कष्टाचे,योगदानाचे, कौशल्याचे, आंनद देणारे क्षण अविस्मरणीयच म्हणजे अंधार फार झाला असतना पणती जपून ठेवतो त्याप्रमाणे माझ्याच नव्हे तर आजही क्रित्येकांच्या हृदयात तेवत आहेत.

    अशोक भेके

  • पंढरीच्या वाटेवर

    महाराष्ट्राला वारकरी सांप्रदाय ही खूप मोठी अध्यात्मिक देणगी लाभलेली आहे.त्यातील वारी हा अविभाज्य भाग. दर आषाढ- कार्तिक महिन्यात असंख्य दिंड्या निघतात. पताका खांद्यावर घेऊन , टाळ आणि मृदंगाच्या गजरात ह्या दिंड्या पंढरीकडे आगेकुच करतात. हरिनामाचा घोष होतो. उत्साही वातावरण असते. मजूर, शेतकरी, व्यावसायिक सर्वच स्तरातील माणसं वारीत सहभागी होतात.आनंदाचे डोही, आनंद तरंग ची अनुभुति घेत.मुलांसाठी हा औत्सुक्याचा विषय. आमच्या लहानपणी अनेक दिंड्या, पालखी आमच्या गाव परिसरातून जायच्या.पैठणचे शांतीब्रम्ह संत एकनाथांची पालखी पंढरपूरला जाते. ती गावापासून दोन कि.मी. अंतरावरून. पोरांना दुपारी शाळेला सुट्टी असायची. मायबापाच्या मागं टुमणं लावायचं. चारदोन रूपये मिळावयाचे. तेही 'लेकरू देवाच्या पाया पडाया जातय' म्हणत द्यायचे. बरेच अंतरावर नाथांची पालखी थांबलेली असे.फूगेवाले, स्टेशनरीवाले , शिट्टी विकणारे मुलांना आकर्षित करत असत. रंगीबेरंगी फूगे पाहिले की मग कोणता घ्यायचा यावर खल व्हायचा.काही आत्राब पोर्ह लहान लेकरांचे फूगेवाले फोडण्यासाठी टपलेली. फूगा वार्यानं लांब गेला अथवा फुटला त् पोर्ह मोठ्यानं भोकाड पसरायचे. मोठ्यानं , भेसूर आवाज काढणारे भोंगे विकायला यायचे. तो घेऊन कुणाच्यातरी जवळ जाऊन गपकन् वाजवायच. ते दचकायच्. मग आनंद.मोकळा हशा. लहान थोर सगळे च या उत्साहात सहभागी होत.कपाळी बुक्का लावत.उभा गंध लावणारेही भेटत. त्यांच्याकडून गंध लावून घेण्याचं नवखेपण होतं. नेमकी एकादशीच्या दिवशी ही पालखी बंडावर यायची. भाविक मग भूईमुगाच्या शेंगा आलेल्या वारकर्यांना वाटायचे. पोर्ह लटकेच वारकरी बनून समोर शेंगा घेण्यासाठी हात पसरायचे.' आम्हाला द्या.आम्हाला द्या.' म्हणायचे. ओरडायचे.गर्दी झाली की वाटणारे शेंगा उधळून द्यायचे. मग वेचायला मजा यायची. नांगरची रानं तुडवायची.पण शेंगा वेचायच्याच. गावचं भजनीमंडळ पालखीला वाटं लावायचं. सोबत मुस्लिम बांधवांचा बँड असायचा. एकता आणि सहिष्णूता ओतप्रोत भरलेली. पालखी मुक्कामी गावाच्या दिशेने प्रस्थान करी. मनाला हुरहूर लागे.

    दिंड्या परत कधी येतात. याची वाट पहायची. भगवानगडाची दिंडी पंढरीवरून परत येताना गावातून जायची. दिंडीचं स्वागत खूप आदराने होई. भिमसिंह महाराजांचे दर्शन घेणे. पादुकांचे दर्शन. गावात दवंडी व्हायची. प्रत्येक घरच्या दहा भाकरी दहा रूपये आणि दाळ. गावात मग ढक्कू ( अनेक दाळींची एकत्र फोडणीची भाजी) बनवला जाई.त्याची चव पंचतारांकितमध्ये सुद्धा मिळणार नाही अशी.तुळशीच्या माळा. पिपाण्या, खुळखूळे, पिना,ट्रक अशा खेळण्यात मुलं रमत.हट्ट करीत. मोबाईलच्या दुनियेत तो अध्यात्मिक सहवास असलेला आनंद काही औरच.

    © विठ्ठल जाधव
    शिरूरकासार ( बीड)

    सकाळ मध्ये प्रकाशित लेख

  • एका चिमण्याची गोष्ट

    (काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसात एक झाड जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. सहज निरखून पहिले, एक चिमणा हि जमिनीवर पडलेला दिसला. मनात विचार आला, कसे गेले असेल त्याचे आयुष्य ....

    वासंतिक वार्यात एका अनामिक गंधाने बैचैन होऊन चिमण्याणे घरट्यातून उड्डाण भरली. आकाशात विहरताना त्याला त्याची चिवताई भेटली. दोघांनी एका दुसर्याकडे पहिले. चिमण्याला पाहून चिवताई गालात हसली. जणू जादूच झाली. क्षणभरातच ते जगाला विसरले. एका दुसर्याच्या पंखात पंख घालून आकाशात विहार करू लागले. आकाशात विहरताना त्यांना एक वडाचे झाड दिसले. वडाच्या झाडने हि पाने हलवीत त्यांचे स्वागत केले. वडाच्या झाडाच्या एका फांदीवर त्यांनी एक घरटे बांधले. अश्यारितीने चिमणा चिमणीचा संसार सुरु झाला.

    पण संसार काही पोरखेळ नव्हे. कित्येकदा वादळामुळे त्यांचे घरटे नष्ट झाले. चिवताईने दिलेली अंडी नष्ट झाली. तर कधी-कधी आकाशात उडणार्या ससाण्याची नजर त्यांच्या घरट्यावर पडली. डोळ्यांदेखत त्यांच्या छोट्या पिल्लांची कत्तल झाली. सर्व संकटांमध्ये एका-दुसर्याची साथ देत मोठ्या जिकरीने चिमणा संसाराची गाडी पुढे रेटू लागला. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. चिमण्याचे घरटे पिल्लांच्या चिव-चिवने गुंजायमान झाले. चिमणा दूर-दूर जाऊन पिल्लांसाठी जेवण घेऊन येत असे. घरट्यात चिवताई हि डोळ्यांत तेल घालून पिल्लांची देखरेख करीत असे. पिल्लांच्या लालन-पालन करण्यात त्यांचा वेळ कसा गेला त्यांना हि कळले नाही. काळ पुढे सरकत गेला. त्यांची पिल्ले मोठी झाली. त्यांना पंख फुटले. शेवटी त्यांच्या अथक कष्टाचे फळ त्यांना मिळाले, असे चिमण्याला वाटले.असेच एका वासंतिक दिवशी त्यांची पिल्ले घरटे सोडून नेहमीसाठी उडून गेली. आता घरट्यात चिमणा आणि चिवताई दोघेच उरले. संसाराच्या कडू आणि गोड त्यांच्या सोबत होत्या. एक दिवस अचानक चिवताई हि चिमण्याला नेहमीसाठी सोडून गेली.

    वडाचे झाड हि आता म्हातारे झाले होते. झाडाचा बुंधा हि वाळवींनी पोखरून टाकला होता. उरल्या होत्या फक्त काही वाळक्या फांद्या. सर्व पक्षी झाडाला सोडून निघून गेले होते. फक्त चिमणाच त्या झाडावर उरला होता. एक दिवस वडाचे झाड चिमण्याला म्हणाले, तू हि येथून निघून जा, माझा काही भरवसा नाही. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे, आकाशात विजा चमकतात आहे. या वयात वादळ-वार्या समोर माझा टिकाव लागेल, काही सांगता येत नाही. चिमणा म्हणाला, याच झाडावर माझी पिल्ले लहानाची मोठी झाली. झाडाच्या फांदी-फांदीवर संसाराच्या आठवणी दडलेल्या आहेत. चिवताईच्या सोबत घालविलेल्या सुखद आठवणी... कसा सोडून जाऊ मी तुला.

    त्याच रात्री जोरात वादळ आले, मुसळधार पाऊस सुरु झाला. झाड उन्मळून खाली पडले. त्या सोबत चिमणा हि खाली पडला. त्याने डोळे बंद केले. दूर आकाशात चिमण्याची चिवताई त्याला बोलवीत होती. किती वाट पहिली तुझी.... चिमणा तिच्याकडे बघून हसला आणि त्याने डोळे बंद केले. काही क्षणात दोघे पुन्हा एका दुसर्याच्या पंखात पंख घालून आकाशात विहार करू लागले. कधी न विलग होण्यासाठी.....

  • बहुरुप्याचे राजेपण

    गजानन महाराजांच्या पोथीची पारायण मी काहीवेळा केली आहेत . दररोज त्याचा एक तरी अध्याय वाचायचा असेही कितीतरी वेळा केले आहे . त्याची CD अखंडपणे ऐकत कितीतरी वेळा प्रवासही केला आहे . पण याआधी कधी झाले नाही असे आज़ झाले . मी आत्ता यातले काहीही करत नसतानाही अचानक माझ्या मनात आले की संतकवी श्री दासगणू महाराज क्रुत " श्री गजानन विजय " या पोथी मधल्या अनेक ओव्या शेअर - बाजारांच्या संदर्भात लागू पडतात .

    आता हेच बघा ना ! या पोथिच्या दहाव्या अध्यायाच्या १६१ व्या ओवीत एक ओळ आहे . . .

    " बहुरुप्याचे राजेपण ¦

    कोठून टिके बाजारी "

    ही ओळ आता अचानक आठवली आणि असं पटकन मनात आले की हे कोणत्याही काळातील , कोणत्याही स्थितितील , कोणत्याही देशातील शेअर - बाजाराचे हे किती चपखल वर्णन आहे . आजमितिला आपल्या शेअर - बाजाराचा निर्देशांक अशा पातळीवर आहे की त्याबाबत जरा नीट विचार करा असे कोणी कोणाला सांगायला गेले तर लगेचच त्याची संभावना " नतद्रष्ट " अशी केली जाईल . पण अशा बाजारात हौशी - नवशे - गवशे असे शेअर्स आणि गुंतवणूकदार असे दोघेही एकदम दिमाखात , तोर्यात मिरवत असतात . कारण अशा बाजारात इंद्राचा ऐरावत आणि श्यामभटाची तटानी या दोघांचेही भाव चढे असतात . त्यामुळे एखादा शेअर घेताना जरी चूक झाली तरी ती चूक अशा बाजारात निस्तरताना सुध्दा नफा पदरी पडतो . आणि म्हणूनच अशा बाजारात वावरताना याच पोथिच्या तिसऱ्या अध्यायातील ९९ व्या ओवितिल एक ओळ लक्षात ठेवणे आवश्यक आहे . ती ओळ अशी :

    " उगीच पाहून पिवळेपण

    सोने पितळेस मानू नका " .

    कारण उतरत्या बाजारात सोने आणि पितळ यातला फरक उघड होत राहतो . तेजिच्या बाजारात पितळ बहुरुप्यासारख सोने म्हणून कितीही वावरले तरी याच ओविचा पूर्वार्ध आठवावा लागतो . तो पूर्वार्ध असा :

    " म्हणून बहुरुप्या कारण

    जपण आहे अवश्य जाण " .

    अशी जाणीव आपल्याला होत राहण्यासाठी अनेकदा तद्न्य सल्लागारांची मदत घ्यावी असे सांगितले जाते . ते योग्यच आहे . पण असा सल्लागार निवडताना त्याबाबतचे निकष काय असावेत याचे विवेचन गजानन महाराजांच्या पोथिच्या तिसऱ्या अध्यायातील ८८ व्या ओवित फार छान पध्दतीने सांगितले आहे . ती ओवी अशी :

    " मात्र औषधी देणारा

    शास्त्रात असला पाहीजे पुरा

    औषधीचा पसारा

    आहे अवगत जयासी " .

    कदाचित अशा मदतीची या क्षेत्रातील माहिर माणसांना आवश्यकता वाटत नसेलही . कारण त्यांची अवस्था या पोथिच्या चौदाव्या अध्यायातील १४५ व्या ओविच्या

    " स्वानुभवाच्या ठायी जाणा

    वाव न तर्काकारणे "

    अशी तरी असते नाहीतर याच पोथिच्या एकोणिसाव्या अध्यायातील १०६ व्या ओविच्या

    " मुक्कामास गेल्यावर

    मार्गांचा न उरे विचार "

    अशी असते . पण " अर्थ " असो नाहीतर " परमार्थ " अशी चांगल्या अर्थाने " पोचलेली " माणसे कमीच असतात . बाकी सगळेच तुमच्या - माझ्यासारखे . रास्ता शोधणारे . त्यामुळे याच पोथीत एकोणिसाव्या अध्यायाच्या १२३ व्या ओवित म्हणले आहे तसे

    " जो मुक्कामास जाई

    त्याचे कौतुक करणे असे "

    अशीच भूमिका स्वीकारने योग्यच असते . पण हे कौतुक केवळ शाब्दिक असून पुरत नाहि . तसे प्रयत्न ही करावे लागतात .

    हे लिहीत असताना मला " यश हे प्रयत्नांती असते ; वाच्यान्ती नव्हे " या लोकमान्य टिळकांच्या विधानाची अतिशय आठवण होत आहे . नाहीतरी या पोथीच्या पंधराव्या अध्यायाचा जवळजवळ निम्मा भाग लोकमान्य टिळक यान्च्याविशयीच आहे ना ! एखाद्या आध्यात्मिक पोथीत असे स्थान मिळवणारा लोकमान्य टिळक सोडले तर दुसरा कोणताही भारतीय राजकीय नेता नसेल . असो .

    असे क्रुतिशील प्रयत्न न करणाऱ्या मंडळी विषयी ( अर्थात पोथी तील ओविला शेअर - बाजार अपेक्षित नाही ) या पोथीच्या पाचव्या अध्यायातील १०६ व्या श्लोकात एकदम झणझणते अंजन घालण्यात आले आहे . ती ओवी अशी :

    " तुझ्यासारखे निरुद्योगी

    जन्मले आमच्यात जागजागी

    म्हणून झालो अभागी

    आम्ही चहू खंडात " .

    त्यामुळे हे किटाळ टाळण्यासाठी काय मार्गाने जायचे याचा विचार करावा लागतो . मुक्कामाला पोचलेल्याला मार्गाचे महत्व नसले तरी इतरांना असतेच असते . या पोथीच्या एकोणिसाव्या अध्यायाच्या १०६ व्या ओवीत याचे वर्णन अशा शब्दांत केले आहे :

    " जो मार्गी चालतो नर

    महत्व त्याचे त्यास

    मार्ग असो कोणताही

    त्याचे मुळी महत्व नाही . "

    असा मार्ग कसा आणि काय असावा याचे अतिशय मार्मिक वर्णन या पोथीच्या अनेक ओव्यात जागोजागी येत राहते . याची काही उदाहरणे खालील - प्रमाणे :

    १ . " शक्याशक्य विचार ¦सुद्न्ये करावा निरंतर

    उगीच पूल सागरावर ¦ बांधवया जाऊ नये "

    ( अध्याय विसावा , ओवी १४९ . )

    २ . " कोल्हा न राही उपोशीत ¦ उसाचिया फडामधे

    वा पाहून बाटूकाला ¦ बैल नाही पुढे गेला "

    ३ . " हीरे गारा एक्या ठायी ¦ मिसळल्या असती जगा ठायी

    पारखी तो निवडूनी घेई ¦ गार टाकून हिर्याते " .

    (पहिला अध्याय , १०७ वी ओवी )

    ४ . " स्थान एक आहे म्हणुनी ¦ किंमत नाही समान

    तेज हिर्याचे हिर्यालागून ¦ भूषवी न गारेला "

    ( तिसरा अध्याय , ११३ वी ओवी ) .

    ५ . " मोगरा , निवडूनग आणि शेर ¦ ही जमिनीची लेकर

    परी किंमतीचा प्रकार ¦ निरनिराळ तो तिघांचा "

    (तिसरा अध्याय , १४५ वी ओवी ) .

    असो .

    हा झाला संकल्पनात्मक भाग .

    गुंतवणूक क्षेत्रात सहभागी होत असताना , कार्यरत राहताना बाळगायच्या " आचार - संहिता " ( Code of Conduct ) किंवा " क्रुति - आराखडा " ( Action Plan ) याचा विचार केला तर . . . .

    अर्थातच संतकवी श्री दासगनू महाराज यांच्या " श्री गजानन विजय " या पोथीच्या आधारे .

    असा विचार करत असताना आपण एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रात , त्यातही विशेषतः शेअर - बाजारात , सहभागी होत असताना या बाजारात तर राहायचे पण आपली वैचारिक तटस्थता सोडायची नाही हे पथ्थ्य न विसरता सांभाळत राहावे लागते . तरच या क्षेत्रात यशस्वी होता येते आणि यशस्वी राहताही येते . याबाबतचा अतिशय सुंदर द्रुश्तान्त या पोथीच्या सहाव्या अध्यायातील ६८ व्या ओवीत दिला आहे . ती ओवी अशी आहे :

    " गार पाण्यात राहते ¦ परी न पाणी शिरू देते

    तैसेचि वागते साचे ¦ या प्रपंच माझारी "

    ही ओवी इतकी स्वयं - प्रकाशित आहे की त्याचे आणखी विवरण करण्याची आवश्यकताच उरत नाही .

    हे जमवून आणणे सहज - सोप निश्चितच नाही . निदान आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी तर नाहीच नाही . कारण आपल्या सगळ्यांचीच अवस्था " आऊ गेली देवापाशी , चित्त तिचे चपलान्पाशी " अशीच असते . एकनाथ महाराजांच्या अनेक भारुडातही त्याच मोठ बोलके वर्णन वारंवार येत असते . पण हे जमणारच नाही असंही नसतं ना ! त्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र करत राहावं लागते . त्याचं पहिले पाऊल म्हणजे काम करत राहणे . हा पैलू या पोथीच्या सहाव्या अध्यायातील ११९ व्या ओवीत असा शब्दबद्ध होतो :

    " कर्ममार्ग सोडू नको ¦ विधि निरर्थक मानू नको

    मात्र त्यात होऊ नको ¦ लिप्त बाळा केंव्हाही . "

    यात असणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपले स्वतचे मन . अगदी

    " मन सदा आशाळभूत ¦ ते ना कदा स्थिर होत

    नाना विकल्प मनात ¦ येऊ लागती वरच्यावरी . "

    ( अध्याय सातवा , सातवीं ओवी ) अशीच परिस्थिति .

    हे शेअर - बाजारात तर सततच होत असते . कारण तिथे गन्मतीने म्हणायचे तर लोकशाहीचा अतिरेक सुरू असतोच असतो . " नाना मति , नाना रीति " अशी सदा स्थिति . पण यावर आपले मत अभ्यासांती तयार करून त्यावर स्थिर राहावे असे सांगताना या पोथीची सातव्या अध्यायातील ५२ वी ओवी सहजच म्हणते की :

    " जन्बुकाच्या चेष्टला ¦ गजपती न मानी भला

    श्वानाचिया भुंकणयाला ¦ व्याघ्र न दे किंमत " .

    हे जमले नाही तर " दारिद्रयाचे मनीच्या मनी , जाती जिरोनि मनोरथ " हे विधिलिखितच !

    अर्थातच अशा ओव्या लिहिताना संतकवी श्री दासगनू महाराजांना गुंतवणूक क्षेत्र किंवा शेअर - बाजार अभिप्रेत नव्हता हे उघडच आहेत . पण वेळ ही गोष्ट , आणि त्यातही वेळ साधणे ही गोष्ट , आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि तेही प्रत्येक क्षेत्रात महत्वाची ठरते . " Time is essence of contract " हा गुंतवणूक क्षेत्राचा पायाभूत सिध्दांत आहे . त्याचं समर्पक वर्णन याच पोथीच्या चौथ्या अध्यायाच्या ११४ व्या आणि ११५ व्या ओवित अशा शब्दांत येते :

    " तरूणपणी ब्रम्हचारी ¦ म्हातारपनी करसी नारी

    अरे वेळ गेल्यावरी ¦ नाही उपयोग साधनाचा

    जे करणे ते वेळेवर ¦ करावे की साचार

    घर एकदा पेटल्यावर ¦ कूप खणण निरर्थक . "

    असे प्रयत्न करतांना वेळ जशी आणि जितकी महत्वाची आहे आणि असते , तेवढीच आणि तितकीच अपेक्षा वास्तव असण्याची नितांत गरज असते . हे संपूर्ण आयुष्याबाबतीत लागू पडनारे आहे . याला शब्दान्कीत करतांना या पोथीच्या २० व्या अध्यायातील १४९ वी ओवी सांगत राहाते :

    " शक्याशक्य विचार ¦ सुद्न्ये करावे निरंतर

    उगीच पूल सागरावर ¦ बांधावया जाऊ नये " .

    हे जमवायचे असले तर " अहो साजेल ते बोलावे , जे का पचेल तेच खावे ; उसने ना कधी आणावे , अवसान ते अंगात " ( अध्याय अकरावा , ओवी १५३ ) हे जसे खरे तसेच असे वास्तव अपेक्शान्चे अविरत प्रयत्न कुठे करायचे तेही ठरवणे महत्वाचे निश्चितच असते . कारण

    " बीज पेरता खडकावरी ¦ ते वाया जाते साचार

    त्यास कधी ना येणार ¦ मोड हे ध्यानी धरावे . "

    ( तेरावा अध्याय , चोविसावी ओवी . )

    अशा प्रयत्नातून मिळणाऱ्या यशाची अपेक्षा मोठी ठेवण्यास काहीच आडकाठी नाही हे सांगायला ना गुंतवणूक क्षेत्र विसरत ; ना ही पोथी . श्री गजानन विजय या संतकवी श्री दासगनू महाराज विरचित या पोथिची १५० वी ओवी निःसंदिग्ध पणे सांगते कि

    " कल्पवृक्षाच्या तळवटी ¦ बसून इच्चिली गारगोटी

    वा मागितली करवनटी ¦ कामधेनूपासून . " .

    सदा - सर्वकाळ , तिन्ही - त्रिकाल या कसोट्यांवर उतरतो तो राजा .

    बाकीचे सगळे बहुरूपी .

    बहुरूपी एखाद्या क्षणाला असं काही बेमालूम काम करून जातो कि तो त्या क्षणाला खरंच राजा वाटतो .

    तो राजा " वाटतो . " ; राजा " नसतो " .

    तो असतो फक्त बहुरूपी .

    शेअर - बाजार तर स्वतःच एक बहुरूपी आहे .

    " बहुरुप्याचे राजेपण ¦ कोठून टिके बाजारी " .

    चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) .
    पिन . . . ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    E-mail : tilakc@nsdl.co.in

  • नाव असे अजरामर होते

    गौतम बुद्धाने बौद्ध धर्म स्थापन केल्यानंतर असंख्य लोक या नव्या धर्माकडे आकर्षित झाले. हळूहळू गौतम बुद्धाचा शिष्यपरिवार वाढत गेला. प्रत्येक शिष्याला वाटे स्वतः गौतम बुद्धांनी आपल्याला काही तरी काम सांगावे.

    एका शिष्याला स्वतःच्या नावाचा फार अभिमान होता. ते लक्षात घेऊन गौतम बुद्धांनी एकदा त्याला 'तू तुझे नाव अजरामर कर' अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे तो शिष्य स्वतःचे नाव अजरामर करण्यासाठी निघाला. फिरत फिरत तो समुद्र किनाऱ्यावर आला. तो विशाल समुद्र आणि त्याचा भव्य किनारा पाहून त्याला आनंद झाला. त्याने त्या समुद्राच्या किनार्‍यावरील वाळूत आपले नाव कोरले. त्या किनार्‍यावर माणसांची फारशी ये-जा नव्हती म्हणून काही दिवस त्याचे नाव वाळूत राहिले. परंतु एकदा समुद्राला मोठी भरती आली व मोठ्या वेगाने आलेल्या लाटांमुळे त्याचे नाव नष्ट झाले.

    त्यानंतर तो शिष्य पुढे निघाला. एके ठिकाणी मातीचा प्रचंड मोठा ढीग होता. त्यावर त्याने आपले नाव कोरले. मात्र थोड्याच दिवसांनी मुसळधार पाऊस आला व तो मातीचा ढीग वाहून गेला.

    त्या शिष्याने मग एका मोठ्या झाडावरील बुंध्यावर आपले नाव कोरले. त्याला वाटले हे नाव आता कायम टिकणार. मात्र एके दिवशी एक लाकूडतोड्या आला व त्याने ते मोठे झाड तोडून टाकले. त्यामुळे नाव नष्ट झाले.

    शेवटी त्या शिष्याने डोंगरावर एका खडकावर आपले नाव मोठ्या कष्टाने कोरले. परंतु थोड्याच दिवसांत त्या भागात मोठा भूकंप झाला व त्यात पूर्ण डोंगरच नाहीसा झाला.

    शेवटी तो शिष्य कंटाळून गौतम बुद्धाकडे आला व त्याने आपले एकेक प्रयत्न सांगून ते कसे वाया गेले ते सांगितले. त्यावर गौतम बुद्ध त्याला म्हणाले, 'तुझी विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे. नाव असे अजरामर होत नसते. त्यासाठी लोककल्याणाचे कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे.'

    शिष्याला उपरती झाली व त्याने दुसर्‍या दिवसापासून लोककल्याणाचे काम सुरू केले.

  • पाऊस

    मंडळी , पहाटेचे ४.३० वाजलेले, सिंहगडाच्या पायथ्याशी कोंढणपूर नामक एका गावात निर्मिती फार्म्च्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर अविरत बरसणारा पाऊस अाणि रातकिड्यांची किरकिर..... कधी कधी असा एकांत अापल्याला अंतर्मुख करून जातो......अख्खा जन्म पुरणार नाहि इतकं निसर्ग सौंदर्य अापल्या अाजूबाजूला असतं , पण निव्वळ ऐहिक सुखाच्या मागे लागून अापण असे क्षण जगायचंच विसरून जातो.....बघा कधीतरी असं पहाटेचं शांत बसून.....निसर्ग खूप काहि शिकवून जातो अाणि निसर्गापुढे अापण किती खुजे अाहोत याची जाणीव करून देणार्‍या विधात्यासमोर अापण अापोअाप नतमस्तक होतो !

    इथे माझी कल्पनाशक्ति संपली मित्र—मैत्रिणिंनो.....जे अाणि जसं सुचलं तसं पाठवतोय.....बघा अावडतंय का.....

    कधी बरसतो धो धो पाऊस
    मरगळ जाते दूर निघून
    कधी परंतू अखंड रिपरिप
    दूरदेशीची ती येई समीप

    कधी अचानक झोडपतो मग
    जशी अाठवण तुझी नी...तगमग
    निरभ्र सारे अासमंत मग
    अवतरते बघ थंडी होऊन

    कळकटलेल्या किटलीमधला
    घोट चहाचा अमृत होतो
    शब्दहि येती अवचित ओठी
    कॅनव्हास मग.....जिवंत होतो!

    श्रेय कुणाचे , मिळते कोणा ?
    निसर्ग असतो थोर गुरु
    बांधून इमले शब्दांचे मग
    कुणीही लागतो कविता करू

    जलबिंदूंचा खारट साठा...
    डोळ्यांमधूनी अवतरतो
    अखंड उरतो तुझाच अाठव
    तूमय तन्मय ..... उदय उरतो......

    उदय गंगाधर सप्रेम—ठाणे
    २ जुलै २०१७..०५.२०वा.

  • आलास..? ये, दार उघडंच आहे

    ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता आणि तिचा अनुवाद. अनुवादक माहित नाही...

    आ गए तुम?
    द्वार खुला है, अंदर आओ..!

    पर तनिक ठहरो..
    ड्योढी पर पड़े पायदान पर,
    अपना अहं झाड़ आना..!

    मधुमालती लिपटी है मुंडेर से,
    अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..!

    तुलसी के क्यारे में,
    मन की चटकन चढ़ा आना..!

    अपनी व्यस्ततायें, बाहर खूंटी पर ही टांग आना..!

    जूतों संग, हर नकारात्मकता उतार आना..!

    बाहर किलोलते बच्चों से,
    थोड़ी शरारत माँग लाना..!

    वो गुलाब के गमले में, मुस्कान लगी है..
    तोड़ कर पहन आना..!

    लाओ, अपनी उलझनें मुझे थमा दो..
    तुम्हारी थकान पर, मनुहारों का पँखा झुला दूँ..!

    देखो, शाम बिछाई है मैंने,
    सूरज क्षितिज पर बाँधा है,
    लाली छिड़की है नभ पर..!

    प्रेम और विश्वास की मद्धम आंच पर, चाय चढ़ाई है,
    घूँट घूँट पीना..!
    सुनो, इतना मुश्किल भी नहीं हैं जीना..!!

    ...महाश्वेता देवी.

    अनुवाद...

    आलास..?
    ये, दार उघडंच आहे ...आत ये
    पण क्षणभर थांब....

    दारातील पायपुसण्यावर
    अहंकार झटकून ये...

    भिंतीला बिलगून वर चढलेल्या
    मधुमालतीच्या वेलावर
    नाराजी सोडून ये...

    तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये...
    बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये...

    पायातल्या चपलांबरोबर
    मनातली नकारात्मकताही काढून ठेव ..

    बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून
    थोडा खेळकरपणा मागून आण..
    गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू
    चेहेऱ्याला लावून आण...

    ये...
    तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न
    माझ्यावर सोपव...
    तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला
    प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते...

    ही बघ....
    तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी..
    सूर्य क्षितिजाला बांधलाय
    आणि
    आकाशी गुलालाची उधळण केलीयं...

    प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर
    चहा उकळत ठेवलाय...
    तो घोट घोट घे....

    ऐक ना ...
    इतकंही अवघड नाहीये रे जगणं ...

    --

  • वाचनवेडे अरविंद घोष

    प्रारंभी जहाल क्रांतिकारक बनलेले परंतु नंतर अनेकांचे आध्यात्मिक गुरु झालेले अरविंद घोष यांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण होते. डॉक्टर असलेले त्यांचे वडील डॉ. कृष्णधन घोष हे इंग्लंडला जाऊन शिकून आले होते. त्यामुळे त्यांच्या राहणीवर तसेच विचारसरणीवर पाश्चात्यांचा फार प्रभाव होता. आपल्याही मुलांनी संपूर्णपणे इंग्लिश लोकांसारखे राहिले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. इंग्रजी आमदानीत वाढलेले डॉ. कृष्णधन घोष नास्तिक होते. आपल्या मुलांना भारतीय संस्कृतीचे वारे लागू नये म्हणून त्यांनी बंगाली राष्ट्रीय शाळेत न पाठविता दार्जिलिंग येथे खास इंग्रजांच्या मुलांसाठी असलेल्या शाळेत शिकण्यासाठी ठेवले. परंतु अरविंद घोष यांची भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ इतकी घट्ट होती, की पुढे ते इंग्लंडला शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती व अध्यात्मावरील सर्व पुस्तके वाचून काढली.

    एकाग्रचित होऊन वाचन करणे ही अरविंद घोष यांची सवयच होती. त्यामुळे ते एकपाठीही होते. त्यांच्या या वाचनाच्या सवयीबद्दल त्यांचे एक सहकारी मित्र चारुचंद्र दत्त यांनी सांगितलेली हकिकत अशी, की अरविंद घोष याना वाचनाची खूपच आवड होती. महाविद्यालयातून घरी आल्यावर आधी ते खोलीत समोर दिसेल ते पुस्तक वाचायला सुरुवात करीत. आम्ही त्यांचे मित्र खोलीत गडबड, गोंधळ करीत असू मात्र त्याकडे अरविंद घोष यांचे मुळीच लक्ष नसायचे. वाचताना त्यांच्यासमोर चहाचा कप नेऊन ठेवला, तरी वाचन पूर्ण झाल्यानंतरच तो चहा ते घेत असत.

    एकदा आम्ही मित्रांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. महिनाभरापूर्वी त्यांनी वाचलेल्या एका पुस्तकाचे मधलेच एक पान उघडून मी ते वाचायला सुरुवात केली व थांबून त्यानंतर पुढे काय? असे अरविंदांना विचारले, त्यावेळी त्यांनी लगेच त्या पानावरचा सगळा मजकूर धडाधड म्हणून दाखविला आणि आम्हाला आश्चर्यचकित केले.

    एकदा अरविंदांच्या नावाने एका प्रचंड मोठे पार्सल आले. आम्ही ते उत्सुकतेने फोडून पाहिले तर आतमध्ये सर्व पुस्तकेच होती.

    अरविंद घोष यांचे वाचनवेड असे अफाट होते.

  • तुलनेचे बळी

    का वागतो आम्ही असे? या जगात दोन व्यक्तींची तुलना होऊ शकते? प्रत्येक व्यक्तीत एक पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लपलेलं असतं व त्याला किंवा तिला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची पूर्ण मुभा असायला हवी, असं तुम्हाला नाही वाटत? जोपर्यंत या जगातील दोन व्यक्तींच्या अंगठ्यांचे ठसे तंतोतंत जुळत नाहीत, तोपर्यंत दोघांमध्ये तुलना करण्याचा या पृथ्वीवर कोणालाही अधिकार नाही. अगदी जन्मदात्यांनाही!