नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांच्या सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याबद्दल एक विशेष आठवण सांगितली!!
जरी "सुन्या सुन्या" हे गाणे "उंबरठा" चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते. जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबाना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबाना सांगीतले कि गीतकार तुम्ही निवडा. बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे). त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले. १-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक हि गाणे लिहिले नाही. पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "कुछ सुंझ नाही राहा है तो क्या लिखू!!!"( ते बाळासाहेबांशी नेहमी हिंदीत बोलत असत). ४ दिवस झाले पण नो चेंज !! जयश्री बाई थोड्या अस्वथ होवू लागल्या कारण हॉटेलचे बिल वाढतंय आणि चित्रपटाचे बझेट कमी. पण भट साहेब जैसे थे !! ७ दिवस झाल्यावर जयश्री बाई म्हणाल्या "मला नको तुमचे हे भट साहेब. जावू द्या त्यांना परत नागपूरला " बाळासाहेबांनी हे सांगितल्यावर भट साहेब थोडे नाराज झाले पण म्हणाले "ठीक है , मेरा रेल्वे का टिकट दो, मै निकलता हू "
बाळासाहेबांनी त्यांचे तिकीट काढून आणून दिले रूम खाली केली, जयश्री बाई हॉटेल चे बिल भरू लागल्या तेव्हा ते म्हणाले " आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल ". बाळासाहेबांनी हॉटेलचा बिल भरला आणि ट्याक्षि बोलाविली. टॅक्सीत बसल्यावर भट साहेबांनी अचानक पणे बाळासाहेबांकडे एक कागद मागितला. ते म्हणाले माझ्याकडे नाही. भट साहेब म्हणाले त्या हॉटेल वाल्याकडून एक कागद आण. बाळासाहेबांनी हॉटेलात परत जावून एक जुने बिल आणले त्या बिलाच्या मागे भट साहेबांनी फक्त १५ सेकंदात एक गाणे लिहिले अगदी झरझर … शब्द होते
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की
अजूनही चांद रात् आहे!!
सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांना थोडे शांत वाटले. त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे दिला. बाळासाहेब ती कविता वाचून स्तब्ध झाले. त्यांनी ती कविता लगेच जयश्री बाईना आणि धुरी साहेबाना दाखविली. जयश्री बाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यांनी १५००० रुपयांचा चेक फाडून भट साहेबांच्या हातात ठेवला पण भट साहेबांनी त्याचा स्वीकार केला नाही. ते म्हणाले "यह मेरी अमानत है और मै मेरी अमानत कभी बेचता नही, रखो आप इसे". भट साहेब तसेच निघून गेले. पुढे जयश्री बाईंचा तो चित्रपट काही बनला नाही आणि ते गाणे बाळासाहेबांकडे राहिले.
कालांतराने जब्बार पटेल यांनी "उंबरठा" हा चित्रपट बनवायला घेतला. त्याचे संगीत बाळासाहेबांकडे दिले आणि गीते दिली भटांना. बाळासाहेबांनी भटांना हे गाणे दाखवले आणि त्यांना विचारले "हे गाणे वापरू या का?" भट साहेब म्हणाले "तुम्हारी इच्छा". ते गाणे मग जब्बार पटेलांना ऐकवले आणि त्यांना पण आवडले. फक्त त्यांनी एका शब्दावर आक्षेप घेतला. शब्द होते...
कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
कुणीतरी आरश्यात आहे
पटेलांनी भटांना सांगितले की तो "कुणीतरी" शब्द नको मला कारण ती एक विवाहित स्त्री आहे (चित्रपटाची नायिका). लोक काय म्हणतील?
परत गाडी अडकली. बाळासाहेबांनी २-३ शब्द सुचविले पण त्यावर भट साहेब रागावून म्हणाले "तुम अपना काम करो. मेरे काम मे दखल अंदाजी न करो".
रेकॉर्डिंग ची वेळ आली. भट साहेबाना शब्द सुचेना आणि जब्बार पटेल तयार होईनात. चाल, सेटअप आणि लता दीदी सगळे तयार होते . इतक्यात शांता शेळके लता दीदींना भेटायला स्टुडिओ मध्ये आल्या त्यांनी थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळले कि एका शब्दाची अडचण आहे. त्या लगेच म्हणाल्या "अरे काय कठीण आहे त्यात. "कुणीतरी " ऐंवजी "तुझे हसू" घल. त्या क्षणाला सुरेश भटांनी "वाह , शांता वाह " असे उदगार काढले. शांता बाईंचे ते शब्द गझलच्या त्या ठेक्यात एकदम चपलख बसले.
कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरश्यात आहे
एका टेक मध्ये बाळासाहेबांनी आणि लता दिदींनी ते गाणे रेकॉर्ड केले आणि अजरामर गाण्याचा जन्म झाला .
हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर स्मिता पाटील लता दीदींच्या पायावर धाय मोकलून रड्ल्याची आठवण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितली.
अशी उत्स्फूर्त कविता करणारा कवी महान, सहज शब्द सुचविणारी ती कवयित्री महान. अजरामर चाल आणि अजरामर आवाज. एका शब्दासाठी गाणे अडवून ठेवणारा तो दिग्दशर्क महान आणि पडदया वरची ती नायिका आणि तो नायक केवळ महान महान आणि महानच ……….
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या !!
https://youtu.be/QyXOuEF8wVw
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठी भाषा अफाट आहे आणि पुलंसारख्यांनी तिची गोडी आणखीनच वाढवलेय.. एखादा शब्द किंवा क्रियापद घेउन किती सुंदर वाक्यरचना केली जाऊ शकते याचे हे उदाहरण
…. असा संकल्प मी सांप्रत, नुकत्याच चालू झालेल्या, वर्षासाठी केला आहे.
जहाल क्रांतिकारक श्री अरविंद यांच्याविरोधात ब्रिटिशांनी कारवाईची तयारी सुरू केली तेव्हा त्यांच्या अंतर्मनात माणसाच्या आत्मिक स्वातंत्र्याचा विचार प्रकटला. त्याकरिता योगाभ्यासासाठी म्हणून ते फ्रेंचांची वसाहत असलेल्या पॉंडिचेरीला आले. तिथला त्यांचा मुक्काम म्हणजे खरे तर प्रथम अज्ञातवासच होता. तरी त्यांचे वास्तव्य ब्रिटिश गुप्तचरांच्या लक्षात आले आणि त्यांच्या हेतूंबद्दल संशय असल्याने ब्रिटिश तसेच फ्रेंच गुप्तहेरांची त्यांच्यावर पाळतही होती.
नंतर अरविंदांनी आपले वास्तव्य उघड केले आणि अनेक मान्यवर त्यांच्या भेटीलाही जाऊ लागले. त्यामुळे अरविंदांविरुध्द काही पुरावा उभा करावा आणि त्यांना ताब्यात घ्यावे, यासाठी ब्रिटिशांनी कट रचला. ब्रिटिश गुप्तहेरांनी काही बनावट छायाचित्रे, नकाशे तसेच काही पत्रे एका पत्र्याच्या डब्यात भरली व तो डबा अरविंदांचे मित्र सी.व्ही.व्ही.एस अय्यर यांच्या घरातील विहिरीत टाकून दिला आणि फ्रेंच पोलिसांना धाड टाकण्यास सांगितले. मात्र त्याआधीच अय्यर यांची मोलकरीण विहिरीतून पाणी काढत असताना तो डबा वर आला. त्या डब्याबाबत अरविंदांनीच फ्रेंच पोलिसांना वर्दी दिली. फ्रेंच पोलीस आले व त्यांनी अरविंदांच्या खोलीची झडती सुरू केली. त्या खोलीत बरीच पुस्तके कागदपत्रे होती. त्यातील काही कागदपत्रांवर ग्रीक तसेच लॅटिन भाषेत लिहिलेले आढळले. अरविंदांना या भाषादेखील येतात, हे पाहून त्या फ्रेंच अधिकार्याला आश्चर्य वाटले. योगी अरविंदांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन निघून गेला.
पण या धाडीमुळे अरविंदांनी अल्जेरियासारख्या देशात जाऊन राहावे, असे काही जणांचे मत पडले. तमीळ राष्ट्रकवी सुब्रह्मण्यम भारती यांनीही तसा आग्रह केला. अरविंदबाबू शांतपणे म्हणाले, कितीही धाडी पडल्या तरी मी येथून क्षणभरही हलणार नाही.
पॉंडिचेरी फ्रेंचाच्या ताब्यात का असेना पण परक्या अल्जेरियापेक्षा आपल्या मायभूमीतील हा वनवास ही त्यांना प्रिय होता. मातृभूमीवरचे हे प्रेम पाहून सार्यांचीच अंत:करणे हेलावली.
अत्यंत रोमहर्षक, उत्कंठावर्धक कादंबरी...
उत्कंठावर्धक कादंबरी लिहिण्यासाठी खजिन्याचा शोध हा रुळलेला प्रकार बघावयास मिळतो. हॉलिवुड पटांमधली निकोलस केजची नॅशनल ट्रेजर सिरीज किंवा हैरिसन फोर्डची इंडियाना जोन्स सिरीज अश्याच पठडितल्या कथांची उदाहरणे...
अशीच एक उत्कंठा लावणारी कथा ती पण मराठी मध्ये नाशिकच्या मुरलीधर खैरणार यांनी लिहिली आहे.
शोध...राजहंस प्रकाशन..
या कादंबरीचे मुखपृष्ठच इतके सरस आहे की कादंबरीचे नाव आणि मुखपृष्ठ बघुन वाचकाने ते हाताळले नाही तर नवलच...
हि कथा आहे छत्रपतींच्या काळातील आणि आजच्या काळातील..
महाराजांनी सुरतेवर अनुक्रमे १६६४ आणि १६७० अश्या दोन वेळा लूट केली. पैकी पहिली लूट जशीच्या तशी स्वराज्यात आली पण दूसरी लूट आलीच नाही..दुसऱ्या लुटीनंतर माघारी येत असताना गनिमांना हूल देत महाराज खजिन्याचा एक भाग घेऊन स्वराज्यात पोहचले पण दुसरा भाग घेऊन येत असलेले गोंदाजी पोहचलेच नाही. गोंदाजींकडे तब्बल ११०० टन वजनाचा खजिना होता त्याची आजची किंमत २५ लाख कोटी रुपये इतकी..त्यावेळी गोंदाजीच्या मागे गनीम लागले आणि गोंदाजीने ठरलेला रस्ता बदलून खजिना कोठेतरी दडवून ठेवला.
कुठे ठेवला हा खजिना..?
बस्स... याच तुम्हाआम्हाला पडलेला प्रश्न केतकीला देखील पडतो..या खजिन्याचा माग तरी कसा काढायचा हा एकच प्रश्न तीला सतावतो...केतकी...गेली तीन शतके तिच्या पिढ्या या खजीन्याच्या शोधात आहे.
काही करुन हा खजिना तिला मिळवायचा असतो... का?
त्याचप्रमाणे इतिहास संशोधक शौनक आणि काका.. यांना देखील खजिना शोधयचा असतो यासाठी ते फेसबुक चा इष्टतम वापर करतात.
एकीकडे हे तिघे....
आणि दुसरीकडे अजित आणि आबाजी... पैकी अजित देशातील एका मोठ्या कंपनीचा मालक.. तो ही या खजिन्यामागे...आणि विशेष म्हणजे देशातील सर्व सुप्रीमो शक्ती या खजिन्यासाठी वापरतो.
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये काय दडलंय. खास करून सप्तशृंगी, धोडप, अहिवंत, रावळ्या- जावळ्या इ. किल्ल्यांची माहिती संशोधन करून लेखकाने लिहिली आहे.यामध्ये येणारी ठिकाणे आपल्याच म्हणजे नाशिकच्या आजुबाजूची आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना समजते की आपल्या आजुबाजूच्या वास्तुंना एवढा मोठा इतिहास आहे.तसेच कळवण आणि त्याच्या आजुबाजुचा परिसर, तिथे होणारे आदिवासी लोकांचे सण, उत्सव...भाया, माऊली, डोंगरादेव, देवखळा यांचे वर्णन लेखनाने खुबिने केलेले आहे.
जवळपास ७५% पुस्तक वाचून होत तरी देखील या कथेचा नायक समजत नाही. प्रचंड उत्सुकता आणि वाचकाला खिळवून ठेवण्याची जबरदस्त क्षमता असलेले हे एक पुस्तक आहे..
ट्रेकिंग, खजिना शोधण्यासाठी वापरण्यात येणारे सिकोरस्की जातीचे हेलीकॉप्टर व् मेल डिटेक्टर ड्रोन...यांचा वापर लेखकाने केलेला आहे. त्याचबरोबर लेखक फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा वापर करतात. आपण आपली सर्व वैयक्तिक माहिती फेसबुक सारख्या मिडिया वर पेरल्याने आपण खरच सुरक्षित आहोत का? हा प्रश्न देखील पडतो.
या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे अगदी सोप्या शब्दात साडे तीनशे वर्षपूर्वीची गोष्ट लेखकाने प्रकाशात आणलेली आहे. नुसतीच् प्रकाशात न आणता त्या गोष्टीचा शोध लावला आहे. अर्थात हा शोध वाचकांच्या दृष्टिकोणावर अवलंबून आहे.
कादंबरीने अनेक जुनाट विचार पुसून काढले..उदा. नाशिकचे तेव्हाचे कलेक्टर जॅक्सन यंबद्दल खरी माहिती या मध्ये सापड़ते. ते कलेच्या बाबतीत किती दर्दी होते. इतिहास जतन करण्यात त्यांचा किती मोठा हात आहे. तेव्हाच्या लेखकांनी त्या परिस्थितीमुळे त्यांच्याबद्दल असे लिहिले...अर्थात तेव्हा आपले प्रथम उद्दिष्ट हे स्वतंत्र मिळविने हेच होते.त्याचप्रमाणे आदिवासींचे सण उत्सव यांची माहिती खजिना शोधताना वाचकाला अडकवून ठेवते..
केतकी आणि शौनक ही जोड़ी खजिन्यापर्यन्त पोहचते का?
आबाजी अजित कोणकोणत्या रणनिति आखतात..अखेरीस खजिना कोणाला सापड़तो...?
या कादंबरीचा नायक कोण? याचे उत्तर पुस्तक एकाग्रतेने वाचल्यावर ते ही अगदी शेवटी समजते...
शौनक असेल..नाही केतकी...केतकी तर तिच्या पूर्वजांसाठी काम करत होती...आबाजी असावे पण आबाजी तर अजितच्या सांगण्यावरुण काम करत होते...नाही मग इतिहास संशोधक काका असावे....जॅक्सनच्या खाजगी व्यक्तीसंदर्भात इतिहासप्रेमी काकांकडे शौनक आणि केतकी गेले असता केतकीला समजू न देता शौनक काकांसाठी एका कागदावर काहीतरी लिहितो..ते का? आणि असे काय लिहितो...आणि काकांची भूमिका अगदी शेवटी लक्षात येते ती कशी....???
नक्की वाचा
नाव -: शोध
लेखक -: मुरलीधर खैरनार
प्रकाशक -: राजहंस प्रकाशन
गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात 'ए.क.कवडा' या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती,त्या वेळच्या प्रसंगानूसार किंव्हा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते,ती खूप गाजली व हा 'ए.क.कवडा' नक्की कोण अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या,संपादकांना विचारणा झाल्या,पण नाव काही कोणाला कळाले नाही,डिसेंबर १९७७ मध्ये गदिमांचे निधन झाल्यावर संपादकांनी शोकसभेत जाहिर केले की 'ए.क.कवडा' म्हणजे ग.दि.माडगूळकरांचे हे लेखन होते.यातली काही स्मरणात असलेली निवडक बिंगचित्रे तुमच्यासाठी खास!.
पु.ल.देशपांडे मराठीतील एक दिग्गज लेखक,त्यांचे बंगाली भाषेवर पण तितकेच प्रेम होते,त्यावर गदिमा भाष्य करतात
"पाया पडती राजकारणी,करणी ऐसी थोर
मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर"
गो.नी.दांडेकर तर दुर्गप्रेमी,चालायची पण त्यांना विलक्षण आवड होती,त्यांच्या बद्दल
"चाले त्याचे दैव चालते,चढतो,त्याचे चढते
माळ तुळशीची आणि दाढी कोठे कोठे नडते!"
कविवर्य मंगेश पाडगावकर,काव्यवाचनाची त्यांची एक वेगळीच शैली आहे,त्याकाळात त्यांच्या काही कविता लिज्जत पापडाच्या जाहिरातीत झळकत असत त्यावर गदिमा चिमटा काढतात
"तुझ्या वाचने काव्यच अवघे वीररसात्मक झाले
घेऊ धजती इज्जत कैसी 'लिज्जत पापडवाले'"
दुर्गाबाई भागवतांबद्दल...
"जागविले तू शांत झोपल्या वाड़मयीन जगतां
दुर्गे,दुर्गे,सरले दुर्घट,आता हो शान्ता"
गोमंतक निवासी कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या ज्येष्ठ कन्येने एका मद्रासी युवकासी प्रेमविवाह केला होता,त्यावर
"बोरीच्या रे बोरकरा,लेक तुझी चांगली
गोव्याहून मद्रदेशी सांग कशी पांगली?"
राजा निलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली सुंदर कविता होती पण खाली लेखकाचे नाव होते 'रा.नि.बढे' आधी गदिमांना लक्षात येईना की हे कोण लेखक,मग आठवले की अरे हे तर आपले 'राजा बढे',पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले,त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे 'राधे तुझा सैल अंबाडा' हे गाणे गाजत होते त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदार पणे मान डोलावत म्हणू लागले...
"कुणी ग बाई केला? कसा ग बाई केला?
आज कसा राजा बढे,रानी बढे झाला?"
रविकिरणी कवितेची थट्टा करीत गदिमा म्हणत
"गिरीशांची ही गर्द 'आमराई'
त्यात उघडी यशवंत पाणपोई"
स्व:तालाही त्यांनी सोडले नाही!,गदिमांना गीतरामायणामुळे 'आधुनिक वाल्मिकी' म्हणत असत,शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते,त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते,म्हणून स्वतः बद्दलच त्यांनी बिंगचित्र लिहिलं,गदिमांच्या हातात कुर्हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..
"कथा नाही की कविता नाही,नाही लेखही साधा
काय वाल्मिके,स्विकारिसी तू पुन:श्व पहिला धंदा?"
-- सुमित्र माडगूळकर
लवकरंच बाजारात येणारी नवीन पुस्तके. आजच आपली प्रत राखून ठेवा. यातील काही पुस्तके हातोहात खपतील तर काही कदाचित आंदोलकांकडून जाळली जातील...
छगन भुजबळ - अनुभव :- "बारामतीच्या करामती"
विजय मल्ल्या :- "विश्व कर्जाचे - कर्ज तुमचे सल्ला माझा"
शरदचंद्र पवार - व्यक्तिचित्रे :- "मी टिपलेली माणसे"
निखील वागळे - नाटक :- "मालकाची जात
अजित पवार - आत्मकथा- "स्वत:ची मोरी"
कुमार केतकर - लघुकथा :- "अर्णब - एक दुःस्वप्न आणि इतर"
राज ठाकरे -
1) "जाळाईदेवी माहात्म्य" (पोथी)
2) गगनभेदी थापा
उद्धव ठाकरे - रहस्यकथा :- "कमळाबाईचे प्रेम"
पंकजा मुंडे - "चिक्कित पडली मक्खी" (लहान मुलांच्या कविता)
नारायण राणे - "च्या राण्या ची कोंबडी"
किरीट सोमय्या - कादंबरी :- "छगनवेध"
देवेंद्र फडणवीस - मानसशास्त्र :- "शून्यातून विश्व"
एकनाथ खडसे - "आल अंगावर बेतलं शिंगावर"
पृथ्वीराज चव्हाण - लोकनाट्य अनुवाद (मूळ लेखिका: सोनिया गांधी) :- पोरान लावला घोर
आणि ...
विनोद तावडे - शिक्षणाच्या आयचा घो Part-II
रामदास आठवले - कवितासंग्रह (हिंदी) :- "ढाणेवाघ की बेडूक उडी"
स्मिता पाटील (जन्म : पुणे, ऑक्टोबर १७, इ.स. १९५५; मृत्यू : मुंबई डिसेंबर १३, इ.स. १९८६) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्या मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. प्रतीक बब्बर हा त्यांचा मुलगा. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे डिसेंबर १३, इ.स. १९८६ला त्यांचे निधन झाले.
स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) शिक्षण घेतले. त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.
स्मिता पाटील यांच्या जीवनावर आधारलेला ‘महाराष्ट्राची अस्मिता स्मिता’ नावाचा एक दृक्श्राव्य कार्यक्रम आहे.
स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ पुण्यात इ.स. २०१२ सालापासून दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव (SPIFF-Smita Patil International Film Festival) होतो. ५ वा महोत्सव १०-११ डिसेंबर २०१६ या काळात झाला; त्याला ५० देशांतून एकूण १६५ लघुपट-माहितीपट आले होते, प्रेक्षकांना त्यांतले ६० दाखवले गेले.. .
-- विनय महाले
एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूस ठेवला .
काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे .
दुसरा मात्र उडेचना.
राजा काळजीत पडला ,
अगदी सारखे दोन पक्षी. एक भरारी घेतोय दुसरा थंड.
काय करावे.. काय करावे..?
राजाने दवंडी पिटविली, गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून .
दुसऱ्या दिवशी पहाटेस राजा बागेत आला, बघतो तो दुसरा गरुड पहिल्या पेक्षाही उंच गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .
राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. हे अजब घडले कसे ? आणि केले तरी कोणी !
एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला, "महाराज मी केले."
राजा : अरे पण कसे ?
शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली,
दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघत आहातच.
तात्पर्य :-
आपली फांदी कधीतरी सोडून बघा.
सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका.
कदाचित बाहेर अधिक सुंदर
खुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल.
Change ur thought.....
May change ur life....
"विचार बदला, आयुष्य बदलेल"
comfort zone मधुन बाहेर पडा. आहे त्या परीस्थीतीत जीवनाचा आनंद घ्या ....
जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत "मोह" म्हंटले आहे.
जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत "लोभ" म्हंटले आहे.
कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो त्याला गीतेत " इर्षा" म्हंटले आहे.
काही वेळेस कुल्फी संपण्याच्या अधिक दांडी हातात राहून कॅल्फी गाळून जमीनी वर पडते त्याला गीतेत " क्रोध" म्हंटले आहे.
झोप पूर्ण होऊन सुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात त्याला गीतेत"आळस"असे म्हंटले आहे.
हॉटेल मध्ये भोजन झाल्यावर, ओंजळ भर बडीशोप व साखर खातो त्याला गीते मध्ये " भिकारी" पणाचे लक्षण म्हंटले आहे.
बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पाहाणे ह्याला गीतेत "भय" म्हंटले आहे.
आपण व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवल्या वर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहतो त्याला गीतेत "उतावळेपण" म्हंटले आहे.
पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी साधी पुरी, कधी शेवपुरी, कधी गोड पुरी दे रे " भय्या" असे म्हणतो त्याला गीतेत "शोषण " म्हंटले आहे.
फ्रुटी पिऊन झाल्या नंतर स्ट्रॉने शेवटच्या थेंबा पर्यंत फ्रुटी ओढत राहणे ह्याला गीतेत " मृगतृष्णा"म्हंटले आहे.
चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे ह्याला गीतेत " अक्षम्य अपराध " असे म्हंटले आहे.
जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा वाढणारा येत आहे हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन घेतो त्याला गीतेत "छळवाद" असे म्हंटले आहे.
ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे " मोक्ष"
Copyright © 2025 | Marathisrushti