नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
ब्रह्मदेशाचा (सध्याचा म्यानमार) राजा बोडायाया हा विशेष प्रसिद्ध होता. तो कुशल प्रशासक तर होताच, पण त्याचे सैन्यही बलाढ्य होते. त्याचे राज्य सर्वात बलिष्ठ समजले जाई. या शूर राजाचे अंतःकरण दयाळू होते. त्याने अनेक पॅगोडे बांधले आणि देशभरातील धर्मगुरूंची बडदास्त राखली.
बालपणाच्या मित्रांचीदेखील त्याने चांगली दखल घेतली. यु पॉ हा त्याचा मित्र. त्याच्याबरोबर एकाच धर्मगुरूकडे तो सहाध्यायी होता. बालपणापासून त्यांचे संबंध मैत्रीचे राहिले होते.
एक दिवस राजेसाहेब आपल्या लवाजम्यासह इरावद्दी नदीवर सहलीसाठी गेले. ब्रह्मदेशातील या सर्वांत मोठ्या नदीला ब्रह्मी लोक 'इतरावत्ती माता' म्हणतात. ते जिथे गेले होते, तिथे नदीचे पात्र विस्तीर्ण, नजरेच्या टप्प्यात न भरणारे होते. दिवस मावळला. राजाला कंटाळा आला. त्याला यु पॉ ची थट्टा करायची लहर आली. यु पॉ आता दरबारी खूशमस्कर्या होता. त्याला मंत्र्याचा दर्जा होता.
'यु पॉ ही नदी ओलांडून जाशील का ?'
'होय महाराज !' त्याने तत्काळ उत्तर दिले.
'तू मला खूश करण्यासाठी हे म्हणतोयस, हे मला ठाऊक आहे; पण ही थट्टा नाही.'
'महाराज, खरंच मी नदी पार करून दाखवतो.'
'मग आताच्या आता नदी ओलांड पाहू ।'
हे ऐकल्यावर यु पॉने आपला सॅरॉग वर उचलला आणि तो किनार्यावर येरझारा घालू लागला. बर्याच वेळाने राजाने विचारले,
' अरे, तू थांबलास का ?'
'महाराज, मी बोटीची वाट पाहतोय.''
'बोटीने तर कोणीही सामान्य माणूस जाईल, मग तूच कशाला हवा ?'!
युपॉने राजापुढे गुडघे टेकले. जमिनीवर डोके टेकवून तो म्हणाला,
'महाराज, त्या सामान्यांतला मी एक सामान्य माणूस आहे.'
राजेसाहेब त्यावर खळखळून हसले, झालं!
आयुष्याचा चक्रव्यूह समर्थपणे पेलवणाऱ्या पण काही कारणास्तव असह्य झाल्यामुळं हाताच्या ओंजळीत डोकं लपवून एकटाच ओक्साबोक्शी रडणारा तो बापमाणूस पाहिला, अन मन हेलावल. काळोखलेल्या आकाशात कडाडणाऱ्या वीजेसारखे विचार एकामागोमाग सुरू झाले …विचारांचं थैमान थांबायला हवं पण विचारांचा प्रवाह मनाच्या खोलवर सैरावैरा फिरत राहिला. पुरुषाच्या सहनशीलतेचा बंध ( काही अपवाद वगळता ) फुटतो आणि तो असहाय होऊन टाहो फोडतो, तेव्हा परमेश्वर सुध्दा त्याच्या पीडा आणि यातनाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण परमेश्वर माणसाच्या सहनशक्तीपेक्षा अती भार माणसावर टाकत नाही. त्या बापमाणसाला मी वेगवेगळ्या रुपात पाहिले होते. आज तो का रडत होता, हे कळत नव्हते.वडिलकीचे नाते जपणे सोपे नाही. पण बापाने जाहीर पणे रडणे म्हणजे ते बायकी ठरते. त्यांचा भावनांचा आवेग थांबत नव्हता. भावनांचा कोलाहल माजला होता. खूप काही तरी सांगायचं होतं रितं व्हावसं वाटत होते. पण त्यांच्या हुंदक्यातून शब्द फुटत नव्हते.वाटलं होतं त्यांचं भावनांच्या लाटा त्या थकलेल्या मनातून मुसळधार वृष्टीप्रमाणे बरसतील.ते मौनाचं महासागर एकही शब्द व्यक्त करायला तयार नव्हता. पण मला ती मौनाची भाषा बरंचं काही सांगून गेली. वासराच्या वात्सल्याचे तपशील गायीच्या डोळ्यात डोळाभरून वाचता येतात. त्या प्रमाणे या थकलेल्या बापमाणसाच्या डोळ्यात वाचता आले.
कोवळ्या वयात मुलाची आई अकाली गेल्यानंतर त्यांचं पालनपोषण, डबा, शाळा, कपडे इथंपासून सर्वकाही करणारा, वयात आल्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा, जन्मभर खाली मान घालून काबाडकष्ट करीत त्यांच्या लग्नासाठी काडी-काडी जमवणारा बाप.. मुलाच्या पालन पोषणाची जबाबदारी आई होऊन त्यानेच घेतली. दुसरे लग्न न करण्याच्या निर्णयावर नातलगांनी मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण त्या बापमाणसापुढे आपल्या बच्छड्याचा चेहरा समोर उभा राही आणि तो भविष्यात डोकावून पाहत लग्नास नकार देई. आईविना बाळाची पुरुषाने पालकत्वाची जबाबदारी घेऊन जन्मापासून बाळ वाढविणे हे आपल्या समाजाला सवयीचे झाले आहे. पण एका बापमाणसाने समाज लग्न करण्याचा सल्ला देत असताना न ऐकणे म्हणजे हा परग्रहावरचा प्राणी म्हणजे हाच तितका शहाणा... अशाच नजरेतून बघणे,हे कितपत योग्य. असा एक बाप पाहिला की, समाजाचे चेहरे चिंता आणि प्रश्नांकित होतात. आता एखादी महिला विधवा अथवा विभक्त असेल तर समाजाकडून किती कौतुक आणि सहानुभूती... ! शिकला सवरलेल्या मुलगा मोठा होत गेला. आपण जपलेल्या रोपट्याचा विकास जोमाने होत चालला तर कुणाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहणार नाही. लग्न केले आणि सुनबाई घरी आल्या आणि काही दिवसातच आदळआपट सुरु झाली. बिचारा आयुष्याच्या उतरंडीला घरात अडगळ झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांची झालर चढली होती. दिवसभर काही तरी काम अन संध्याकाळी टाळ मृदुंग सोबत पांडुरंगाचे नाम.आलेल्या परिस्थितीशी सामना करीत व्हरांड्यात जिने जगत होता. वय झालं शारीरिक व्याधींनी त्रस्त असूनही मानाने खंबीर, आनंदी उत्साही असून ही मनाने खंगला होता.सुनबाईचे चिडचिडेपण तिरकस पण धारदार बोल हृदयावर आघात करीत होते.जिव्हारी लागे. मुलाचा या विषयावर अबोला होता. साधं खाकरण्यावरून अद्वातद्वा बोलणे हे केवळ सुनबाईचा आडमुठेपणा काही संपत नव्हता. त्याचे जीने असह्य झाले होते. त्याच्या कुशीत दडलेली रहस्य हे कुणालाही सांगत नव्हता. मनातल्या आशाआकांशाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या होत्या. एका सामान्य बाप माणसाची आस्था धुळीस मिळाली होती. त्यामुळे तो रडून आपले मन मोकळे करीत असावा. ते दिवस मुली लग्न होऊन सासरी गेल्यानंतर चुलीसारख्या जळायच्या, भातासारख्या रटरटायच्या, गाठोड्यासारख्या कोपऱ्यात पडून राहायच्या. ते दिवस कधीच संपले. आता हुंदके नाहीत, की भुणभुण देखील नाही. नवी पिढी आली आणि केवळ घरात राजा राणीचा संसार हवा. या विचाराने झपाटले गेले. स्वच्छंद आणि आनंदी जीवन हवे होते.
ही बाप माणसं कायम वेठबिगारी हमालासारखी जगतात. कोणी ऑफिसात तर कोणी शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करतात. त्यांच्या रोजंदारीवर मुलं शिकतात पुढे जातात. मोठी होतात अन त्यांनाच म्हणतात, काय केले तुम्ही. तुमच्या पेक्षा आम्ही कर्तुत्ववान आहोत....! याच बाप माणसाने याला शिकविण्यासाठी अंगावरच्या कपड्यांना भोक पडले तरी थिगळ लावून वावरत असे. मुलाच्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून स्वत: घामात भिजणारा बाप. मुलाला चांगले बुट मिळावेत म्हणून फाटक्या चपला वापरणारा बाप. मुलगा आजारी पडला रात्री अपरात्री पाठीवर घेऊन दवाखान्यात नेणारा बाप. स्वत: उपाशी पोटी राहून मुलांच्या गरजा पुरविणारा बाप. ATM मशीन म्हणजे बाप. आयुष्यातली दोन शक्तीपिठे आपल्या घरात असतात आई आणि वडील .... त्यामुळे अन्य शक्तीपीठाचे दर्शन घेण्याची गरज भासत नाही. आई आणि बाप हे नातं स्त्री आणि पुरुष या पातळीपेक्षा उंच नेऊन समजून घ्यायला हवं. तसं झालं, तर एखाद्या प्रसंगात स्त्री जशी वागते, तसाच पुरुष वागेल, हा खोटा आशावाद राहणार नाही. विधात्यानं निर्माण केलेली ही दोन भिन्न आणि अतुलनीय शक्तिपीठं आहेत! स्त्री आणि पुरुष ही एकाच रथाची दोन चाकं आहेत. कुणीही कुणापेक्षा उंचीनं कमी अथवा जास्त नाही.
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या सारखं खूप काही आई विषयावर भरपूर लिहिले जाते पण बाप म्हणजे कठोर .... असं चित्र डोळ्यांसमोर उभं केल्यामुळे फणसाला कितीही काटे असले तरी आत किती गरे गोड असतात. त्यासाठी या बापमाणसाला समजावून घ्यायला हवं. बाप वरून शिस्तप्रिय असले तरी स्वत:च्या आवडी निवडी व्यक्त न करता मुलांच्या आवडी निवडीची हट्ट पुरविणारा, जपणारा कुटुंबात उपेक्षित राहत असतो.जणू काही मुलाचा शत्रूच. आपल्यातून निघून गेल्यानंतर त्याची किमंत कळते. बाप हा असा मोठा आधार आहे की, शब्दात सांगता येणे कठीणच. आईची थोरवी सर्वजन सांगतात पण कृष्णाला टोपलीत घेऊन सुरक्षित स्थळी नेणारा वसुदेव आपण का विसरतो....? पुत्र प्रेमासाठी ही बाप माणसं किती खस्ता खातात, हे आजच्या पिढीला कळनार कधी. आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व आहे . साधी सुई टोचली तर मुखातून ‘आई गं...’ येतं अन बाजूने सुसाट वेगाने जाणाऱ्या ट्रक ला पाहून ‘बाप रे’. हे आजच्या विचारधारेतील गणित कळत नाही.
दिवसभर मान मोडून काम केल्यावर भाजीवाल्याशी घासाघीस करून घेतलेली मेथीची जुडी एका हातात घेऊन चार-चार किलोमीटर चालत येणारा पूर्वीचा बाप टॅक्सीचे दहा रुपये वाचवण्याचा प्रयत्न करायचा. आजचा बाप दहा मिनिटं वाचवविण्यासाठी तीस रुपयांची रिक्षा अथवा टँकसी सहज करतो. ही गणितं बदलली की बदलत गेली, याचा स्वच्छ मनानं कधी तरी विचार करायला हवा! अनेक आघाड्या सांभाळत असलेल्या या पुरुषाला स्वत:ची राहून गेलेली अगदी छोटी इच्छा पूर्ण करण्यासाठी कधीतरी निवांत वेळ हवा असतो. अशाच वेळेस मूल आशेनं त्याच्याकडं पाहत असतं. त्याला बागेत फिरायला नेण्यासाठी! अशा प्रसंगी स्वार्थी विचार करीत स्वत:च मौज करणारा पुरुष मी तरी अजून पाहिलेला नाही.
एक विदेशी कंपनीत पदविभूषित असलेला मुलगा कार्यालयीन कामांकरिता एका कंपनीत गेला. त्याच्या स्वागत तयारीत सदर कंपनीतील संचालक उभे होते. दरवाज्याजवळ असलेल्या वृध्द गृहस्थाने मुजरा करीत दरवाजा उघडला. वीज चमकावी तसा मुलगा चमकला. नजरानजर झाली. दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळले.बाबा.....! नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले. तुम्ही इथे...! बराच वेळ बापलेक गळ्यातगळा घालून रडत होते. सभोवतालच्या लोकांना या प्रसंगाने गहिवरून आले. पण त्या बापाच्या डोळ्यात अश्रू होते त्याला आनंदाची किनार होती. अभिमान वाटत होत. मुलगा आपले नाते विसरला नव्हता. मनुष्याचे मोठेपण त्याच्या विचार आणि कर्तुत्वावर अवलंबुन असते.असाही बापमाणूस आणि त्याच्यावर प्रेम करणारा मुलगा.
गावाकडची ही बाप माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात. आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे . गालावर मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी बंडी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी. पायातल्या झिझलेल्या वाहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणारया अशाच. डोळ्यांवरचा चष्मा किमान दोन तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला कडदोरा हीच काय ती संपत्ती. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की शेतात अजूनही नांगर धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत. ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजुन शाबूत ; शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी जोडीला कोरड्यास संगतीला लालबुंद कांद्याच्या दोनचार पाकळ्या - लसणाच्या दोन तीन चण्या हेच अमृत जेवण.चतकोर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती. मग पारावर गप्पा. असा त्यांचा दिनक्रम.
बाबा लहानपणी गोष्ट सांगत असत . ती एकच गोष्ट दररोज आपल्याला ऐकावी लागत असे. पण ते ती इतकी रंगवून सांगत, की दर खेपेस नवीनच वाटे! गोष्ट सांगताना त्या त्या प्रसंगानुसार ते आडवेतिडवे लोळायचे. चित्रविचित्र चेहरे करायचे. निरनिराळ्या पात्रांचे आवाज काढायचे. जीभ बाहेर काढून त्या गोष्टीत आपला प्राण ओतणारे बाबा. त्याचं अस्तित्व आहे तो पर्यंत त्यांची किमंत कळत नाही पण ते गेले की, पोकळी निर्माण झाल्याचे दिसून येते. आपण दशक्रिया विधीला पाहतो बाप मेला तर पंचपकवान्नाचे जेवण ठेवतात. पण जिवंत असताना दवाखान्यात न्यायची तसदी घेतली असती तर ईश्वराने निर्माण केलेल्या विश्वात एक माणूस आणखीन काही काळ राहिला असता, ह्याचा विचार का करीत नाहीत. आजच्या पिढीच्या गळ्यातला मफलर ही फँशन आहे पण बापाच्या गळ्यातली मफलर ही त्यांची गरज होती, हे कोणी समजावूनच घेत नाहीत. बापाची चप्पल पायात यायला लागली तर मी फार मोठा झालो. ही विचारधारा आजच्या पिढीत फोफावलेली दिसून येते. ही बापमाणसं म्हणजे अनुभवाची महासागरे. अनुभवाच्या शिदोरीच्या झोळीतून घ्यायचं असतं. विशेष म्हणजे त्यांची झोळी कधी रीती होतच नाही.
कसं का असेना... घरात बापमाणूस हा आधारच....!
बाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं...
आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणार तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणार...
पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर...
आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर...
लिंबू-मिरची ला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन...
एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबड मुख असू देत की कमी ऐकू येणारे कान...
ज्या झाडाला फळ-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसेल तरी निदान सावली तर देते, त्या सावलीत आपली अनेक कामे सहज होतात
म्हणून बाप हे नातं उंच पातळीवर न्यायला हवं.
घरातील बापमाणसं ही तशीच असतात...त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. घरातून बाहेर पडतांना डोक ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहीजेच.
अशोक भेके
त्यावर ती गोड आवाजात मी कविता ! म्हणताच मला चक्कर येऊन मी जमिनीवर कोसळलो ! जाग आली तेव्हा ती माझ्या समोर उभी होती आमच्या मागच्या जन्मातील अपूर्ण कामाची यादी हातात घेऊन… लेखक – निलेश बामणे
दगड'
'दगड' म्हणजे 'देव' असतो. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो. पाहीलं तर दिसतो.
अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो.
हायवे वर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो.
घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो.
स्वैयंपाक घरात आईला वाटण करून देतो.
मुलांना झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडून देतो.
कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो.
माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर, काचा फोडून त्याचा राग शांत करतो.
रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वत:ला फोडुन घेतो.
शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी छिन्निचे घाव सहन करतो.
शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो.
बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो.
सतत आपल्या मदतीला धावून येतो, "देवा'सारखा.
मला सांगा, " 'देव' सोडून कोणी करेल का आपल्यासाठी एवढं ??"
बाई म्हणतात, "तू 'दगड' आहेस . तुला गणित येत नाही. आई म्हणते, "काही हरकत नाही, तू माझा लाडका 'दगड' आहेस. देवाला तरी कुठे गणित येतं? नाहीतर त्याने फायदा-तोटा बघितला असता. तो व्यापारी झाला असता."
आई म्हणते , "दगडाला शेंदुर फासून त्यात भाव ठेवला की, त्याचा 'देव' होतो."
म्हणजे, 'दगड'च 'देव' असतो.
Moral :-
"Be positive.
Every one is good.
But
It's Position matters"
-- वसंत चरमळ
महाराष्ट्राने ज्या लाडक्या व्यक्तिमत्वावर जीव ओवाळून टाकला त्या पु.ल. उर्फ भाईंचा जन्मदिवस येताच मी आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलो.
माझं वय होतं अकरा वर्षे. इयत्ता सहावी. एक दिवस आईने माझ्या हातात एक चिटोरा दिला व मला म्हणाली जोग काकांकडे जा आणि त्यांच्याकडे उतरलेल्या पाव्हण्यांची सही घेऊन ये. सही कशाला म्हणतात, ती कशासाठी घ्यायची असते हे न कळण्याच्या वयात अत्यंत अनिच्छेने मी जाण्यासाठी निघालो. जाता जाता आई ओरडली, ‘आणि हो, त्यांच्यासमोर शुंभासारखा उभा राहू नको, त्यांना काका म्हण आणि सही देण्याची विनंती कर.’ आमच्या घरापासून जोगांचं घर अगदी जवळ असल्यामुळे मी काही मिनिटातच तिथे पोहोचलो. पांढरा पायजामा आणि फिकट निळ्या रंगाचा झब्बा परिधान केलेले पाव्हणे कोणतं तरी गाणं गुणगुणण्यात तल्लीन होऊन झोपाळ्यावर झकास झोके घेत होते. सही घेण्याच्या भानगडीत त्यांची तंद्री भंग पावली तर काय होईल या कल्पनेने मला घाम फुटला. पण तरीही धीर एकवटून मी हळूच म्हणालो – ‘काका’. त्याचं माझ्याकडे लक्ष जाताच ते तत्परतेने म्हणाले ‘बोल पुतण्या’! ते मला पुतण्या वगैरे म्हणतील याची कल्पना नसल्यामुळे मी बावळटासारखा त्यांच्या तोंडाकडे बघू लागलो. त्यांनी मला झोपाळ्यावर त्यांच्या शेजारी बसवून घेतलं व म्हणाले ‘बोल कसा काय आलास?’ मी थोडाही वेळ वाया न घालवता त्यांच्यासमोर आईने दिलेला कागदाचा चिटोरा धरला व त्यावर सही देण्याची विनंती केली. मला त्या धर्मसंकटातून स्वतःची शक्य तितक्या लवकर सुटका करून घ्यायची होती. पण पाव्हणे काही मला सोडायला तयार नव्हते. त्यांनी मला विचारलं ‘ काय होतं असतं रे कुणाची सही घेऊन?’ माझा रडवेला झालेला चेहरा बघून त्यांना माझी कीव आली आणि त्यांनी सही देऊन व माझ्या पाठीवर थाप मारून मला पिटाळलं.
मित्रांनो, काही वर्षांनंतर कागदाच्या त्या छोट्याशा तुकड्याचं मोल मला कळल्यानंतर मी तो तुकडा आजपर्यंत प्राणपणाने जपून ठेवला आहे कारण त्यावर सही करणारे ते पाव्हणे होते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थातच अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे !
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
अंगात नम्रता, विनयशीलता असली, की आपले कोणतेही काम सुकर होतेच. शिवाय आपलेही महत्त्व वाढते. नम्रतेची किंमत किती आणि कशी असते या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते...
एक राजा एकदा त्याच्या प्रधानासह राजधानीचा फेरफटका मारायला निघाला. हा राजा खरोखरच अतिशय नम्र व प्रजाहितदक्ष होता. प्रजेची काळजी घेण्यात तो कोठेही स्वतःला कमीपणा मानत नसे. प्रधान आणि इतर मंत्रिजनांबरोबर जात असताना राजाला रस्त्यात एक साधू भेटला. साधू आपल्याच तंद्रीत जात होता. तरीही राजाने त्याचे लक्ष वेधून घेतले व त्याला नम्रपणे खाली वाकून नमस्कार केला. आणखी पुढे गेल्यावर राजाला काही ज्येष्ठ नागरिक भेटले. त्यांनाही राजाने अतिशय नम्रतेने नमस्कार केला.
प्रधान हे सारे पाहत होता. त्याला अर्थातच राजाची ही गोष्ट आवडली नाही. तो राजाला म्हणाला, 'हे राजन, तुम्ही या राज्याचे सम्राट आहात. तुम्हाला इतके नम्रपणे वागणे शोभत नाही. त्यातून नागरिक वेगळा अर्थ काढू शकतात.'
राजाने त्यावर लगेच भाष्य केले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी दरबारात त्याने प्रधानाला बोलावून घेतले व त्याचाजवळ एका सिंहाचे. एक वाघाचे व एका माणसाचे तयार केलेले मस्तक (डोके) दिले व सांगितले, की ही तिन्ही मस्तके बाजारात जाऊन मिळेल त्या किमतीत विकून यावीत.
राजाची आज्ञा प्रमाण मानून प्रधान आपल्या काही नोकरांना घेऊन ती तिन्ही डोकी विकायला गेला. सिंहाचे आणि वाघाचे मस्तक लगेच विकले गेले: मात्र माणसाचे मस्तक कोणीच विकत घेईना.
शेवटी सायंकाळपर्यंत वाट पाहून प्रधान माणसाच्या मस्तकासह दरबारात परतला व राजाला म्हणाला, 'सिंहाचे व वाघाचे मस्तक लगेच विकल्या गेले. मात्र माणसाचे मस्तक विकत घेण्यासाठी कोणाचीही तयारी नाही. '
त्यावर राजा म्हणाला, 'प्रधानजी, माणसाच्या डोक्याची किंमत किती आहे हे एव्हाना तुम्हाला कळलेच असेल. मग कसलीही किंमत नसलेले हे माझे डोकं मी काही जणांपुढे वाकविले तर त्यात कमीपणा कसला?'
राजाचे उत्तर ऐकून प्रधानाला आपली चूक कळली व त्याने राजाची क्षमा मागितली. नम्रतेची किंमत त्याला आता कळली होती.
दत्ता आरेकर म्हणजे कायदा, असेच त्यांच्या बाबत समीकरण आहे. बाबा हा आमचा शक्तीस्रोत आहे.
जगण्याचा खरा आनंद हा बालपणीचाच. गावखेड्यातलं जगणं म्हणजे मुक्त छंदातील कविता! मोकाट भटकायचं.मनसोक्त पोहायचं. वाट्टेल तसं जगायचं.गावात जशी माळवदाची घर तशी रानात खळं-दळं, बोंदरी बारदाना आलाच. शिवळाट-जोते, चाढं-ओटी , इळे-खुर्पे, सुतळी दाभण, डांभमेखी. जगातील कोणत्याच शब्दकोशात न सापडणारी शब्दसंपदा. जवळची वाटणारी. ऊन्हाळ्यात रानं निपचित पडल्याली. दिवसभर उन्हाच्या झळायांचा आलेख खालीवर होणारा.खळं आणि जागली ठरलेल्या. आंब्याच्या कैर्या आणि चिंचेचे बोटूक म्हणजे त्या काळातले वडापावच !
कारण असे की , खळं करणे हा शेतजीवनातील महत्वाचा टप्पा. रानात एका ठिकाणी माती सारत, वर्तुळ तयार करणे. मध्यभागी तिवढा रोवणे, त्यावर पाणी शिंपडणे, जनावरांच्या पायान खुरतणे, मोगरी वा दगडाने थापटणे , सारवणे. बर्याच प्रक्रियेतून खळं तयार होतं.
उपनेर नावाचं यंत्र नविनच आलेलं. कणसांपासून धान्य बाजूला काढण्यासाठी.त्या उपनेरास पाणी लागायच. तेही दोनतीन टिपाड. पाणी आणायला विहिरीवर जावं लागायचं. विहीर अर्धा ते दीड किलोमीटर लांब. तिथं जाऊन पाणी शेंदायचं. तेही दिव्यच.ढेंभीवर उभा र्हाऊन गडीमाणसं शेंदून द्यायची. आम्ही डोक्यावर कळशी, हंडे नाहीतर हातात बादल्या घेऊन पळत सुटायचो. इतकं पाणी वहायचं की वाटच ओली व्हायची. वाटातच गाड्या-गाड्या सुरू व्हायच्या. डाव्या बाजुनं गाडी न्यायची याची नकळत शिकवण मिळत असे. सुर्यफुलाच्या वाळलेल्या काड्या, फाटलेल्या बुटात ऊसाच्या चिवट्या नाहीतर चिपाडं घालून त्याच्याही गाड्या! हे गाडीवेड ! तसं उपनेरला लागणार्या पाण्यासाठी गाडीचीच भाषा. उपनेरचा मालक ऐटीत सारे आदेश एका जागी बसून सोडणार. पाणी भरा!
माणसं पाणी वाहून दमून जात.तो नारळ फोडून उपनेर चालू करी. मध्येच इंजिन बिघडायच. इंजिनचा पार्ट आणायला जातो म्हणायचा . तालुक्याच्या गावाला जाऊन भेळभत्ता खायचा.रातभर खळ्याची राखण करायची.चांदणं मोजायचं. आईनं आणलेलं पिठलं भाकरी अन् तव्यावर रगडलेला ठेचा. नव्या कैर्याचं लोणचं. भन्नाट डाव रंगायचा. निम्मी पोरं पेंगायची.कणसं आणि माणसं जवळ असली की सर्वात श्रीमंत आपणचं. दुसरा दिवस उजाडला. पुनः उपनेरला पाणी भरायचं. खळं पुर्ण झालं की मग पोते भरून घरी आणायचे. तिथंच मोडणी करणाराचं,सगळ्याच मिटवायच्या. गाडी जुपून धान्य घराकडं आणायच.पायावर पाणी टाकत, कपाळी कुंकू लावत, गोड घास देऊन आलेल्या धान्यलक्ष्मीच स्वागत करायचे. आता तळवटावर खळं करण्याच फॅड आलेल. मी जेव्हा रानात जातो तेव्हा हे सारं आठवत जातो, मन दाटते.आपण कोणत्या जंगलात वाढतोय ?
विठ्ठल जाधव, शिरूरकासार (बीड)
संपर्कः 9421442995
vitthalj5@gmail.com
दै.सकाळ मध्ये प्रकाशित लेख
दिनांक ५.८.२०१६ रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे. पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही. पण जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर BSESवाले अशी बदमाशी करतात. आपल्या इमानदार माणसाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलाच पाहिचे.
वीज गेली. पंखा हि बंद झाला. इमरजेन्सी लाईट लाऊन वीज येण्याची वाट पाहू लागलो. एक तर पावसाळी महिना आणि त्यात भरपूर उमस. सौ. ने दरवाजे खिडक्या उघडल्या वारा आत येण्यासाठी. अचानक उजव्या हातावर खाज सुटल्या वाटले. बघितले एक डास हातावर बसून माझे रक्त पिण्यात मग्न होता. मनात विचार आला, नर डास मानवाचे रक्त पीत नाही. बहुतेक हि मादी असावी. आता रक्त पितेच आहे, तर पोटभरून पिऊ द्या. एक दोन रक्त्याच्या थेंबानीं आपले काय बिघडणार. अचानक थांक्यु आवाज ऐकू आला, कोण थांक्यु म्हणाले म्हणून इकडे तिकडे पाहू लागलो. अरे इकडे तिकडे का पाहतो आहे, मी डासांची राणी तुला थांक्यु म्हणते आहे. मी विचारले, थांक्यु कशाला राणी साहिबा? डासांची राणी म्हणाली तू पहिलाच मानव आहे, ज्याने मला पोटभरून रक्त पिऊ दिले, हाकलण्याचा प्रयत्न केला नाही. मी तिला विचारले, मी तुला रक्त पिऊ दिले, बदल्यास तू काय देणार मला, डेंगू कि मलेरिया. हा!हा! हा! चक्क हासली ती आणि म्हणाली, आम्ही डास काही डेंगू, मलेरिया पसरवित नाही, ते कार्य परजीवी/ विषाणूंचे आहे. मी म्हणालो तेच ते, तुम्ही डास त्यांना आपल्या शरीरात आश्रय देतात आणि आमच्या शरीरात सोडतात. आम्ही आजारी पडतो. लाखोंच्या संख्येने दरवर्षी लोक मरतात. डासराणी हि चिडून म्हणाली, तुम्ही माणसे हि काही कमी क्रूर नाही. रासायनिक पदार्थांचा वापर करून अब्जावधी डासांची कत्तल करतात. त्याचा सूड म्हणून आम्ही डासांनी काही लक्ष मानवांना परजीवींचा उपयोग करून मारले तर त्यात गैर काय.
डासराणीला चिडलेले पाहून मी विषय बदलत म्हणालो, तू माझे रक्त प्याली त्याचे मला काही वाटत नाही. पण मी आजारी पडलो, मला ताप आला तर उद्या सकाळचा रियो ऑलम्पिकचा भव्यदिव्य कार्यक्रम बघता येणार नाही. डास राणी कानाजवळ येऊन हळूच पुटपुटली, भव्यदिव्य, अSSच्छा, अर्धनग्न सांबा नर्तकी पाहता येणार नाही, याचे दुख होते आहे का? थेरड्या कुठला काही वयाचा विचार कर? च्यायला हिला माझ्या मनातले कसे कळले, मी निरुतरच राहिलो. डासराणी सांत्वना देत म्हणाली, अरे शंभर एक माणसांचे रक्त पिल्यावर एखाद-दुसरा आजारी पडतो. काही एक होणार नाही तुला उद्या सकाळी उठून खुशाल बघ त्या नागड्या नर्तिका. मी चिडून म्हणालो काही हाड आहे का तुझ्या जिभेला. डास राणी मिस्कीलपणे म्हणाली, माणसांच्या जिभेला नसते, तर आमच्या जिभेला कुठून येणार. एवढीच सुंदर स्त्रियांना पाहण्याची इच्छा असेल तर आज संध्याकाळीच मी गल्लीतल्या डबक्यात अंडी दिली आहे. तुला माहित असेलच जास्तीस्जास्त एका आठवड्याचे आमचे आयुष्य. उद्या संध्याकाळी पर्यंत अंड्यातून निघालेल्या माझ्या कन्या काय म्हणतात ते, तुमच्या मानवांच्या भाषेत षोडशी रूपवती होतील. पाठवून देईन त्यांना उद्या रात्री तुझ्या गालाचे मुके घ्यायला. क्षणभरातच माझ्या डोळ्यांसमोर गालावर जागोजागी डासांनी चावल्याचे व्रण दिसू लागले. जोरात ओरडलो, दुष्टा चूक झाली माझी, तुला हातानी चिरडून टाकायला पाहिजे होते. तुला काय माहित आम्ही माणसे काय चीज आहोत ते, आमच्याशी पंगा महागात पडेल, पहाच एक दिवस जगातले सर्व डास नाहीसे होतील. तिने रावणा सारखा अट्टाहास केला व म्हणाली, तुम्ही मूर्ख मानवानी आम्हा डासांना मारण्यासाठी काय काय उपाय केले आहे, सर्व माहित आहे मला. पहिले कासव छाप आणली. आमचे काही बिघडले नाही.तुम्हीच खोकलू लागला. मग goodnight आणली आम्हाला दूर ठेवण्यासाठी. काही उपयोग झाला का? धूरवाली गाडी आणली. धूर पाहताच आम्ही धूम ठोकून देतो. त्या रासायनिक धुर्याचा त्रास तुम्हालाच होतो. बाकी एक मला कळत नाही?
मी स्वत:ला वाद विवादात प्रवीण समजत होतो,पण या घटकेला डासराणी समोर पूर्णपणे निशस्त्र झालेलो होतो, मरगळलेल्या आवाजात म्हणालो, काय कळत नाही. डासराणी म्हणाली, हेच ते जागो जागी पाणी साचवून, डबके निर्माण करून तुम्ही माणसे आमच्या साठी घरे बांधतात. आमची पैदास वाढली कि आम्हाला मारण्याचे प्रयत्न करतात, या मूर्खपणाला काय म्हणावे. आत्ताच रियोचे घ्या मी ऐकले आहे, तिथे अब्जावधी डासांना यमसदनी पाठविले आहे. पण आमचे बंधू हि काही कमी नाही. त्यांनी हि निश्चय केला आहे याच मौक्याचा फायदा घेऊन जिका नावाच्या दुष्ट परजीवीला जगभर पोहचविण्याचा. किती मजा येईल ना, तुला जिका झाला तर. आता मात्र हद झाली, पाणी डोक्यावरून गेले होते, त्या दुष्ट राणीला सबक शिकविण्यासाठी मी ताडकन बिस्तारावरून उठलो, बघतो काय समोर टीवी सुरु होता, एक-एक करून विभिन्न देशांचे खेळाडू मैदानात प्रवेश करत होते. सौ. शांतपणे बसून टीवी पाहत होती. माझे डोके सटकले, तिच्यावर डाफरलो. मला का उठविले नाही. सौ. मिस्कीलपणे म्हणाली, अहो, किती प्रयत्न केला तुम्हाला उठविण्याचा. ज्या वेळी सांबा नर्तकी येत होत्या, तुम्हाला चिमटा हि काढला होता उठविण्यासाठी. मी आश्चर्याने विचारले, तर तू चिमटा काढला होता तर, मला वाटले.... सौ: काय वाटले.... अहो पण तुमच्या गालावर हे काय. डास चावला वाटतो. मी नकळत म्हंटले, डास नाही डासराणी चावली. सौ.: काय काय स्वप्न बघता तुम्ही, काहीच कळत नाही. मी समोर टीवी कडे बघितले, स्क्रीनवर एक डास दिसत होतो, जवळ गेलो निरखून बघितले, मानवी रक्ताने त्या डासाचे शरीर फुगलेले होते. मनात विचार आला, चिरडून टाकले पाहिजे याला, पण थांबलो, कदाचित हीच डासांची राणी असेल. स्त्रियांवर हात उगारणे पुरुषांना शोभत नाही. शिवाय एका राणीने डासांची का होईना माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या गालाचा मुका हि घेतला होतता.....
मनात गुणगुणत हात तोंड धुवण्यासाठी वाशबेसिन जवळ गेलो.
जगू द्या सर्वांना
डास असो वा माशी
मच्छरदाणी पांघरून
शांत झोपतो आम्ही.
सत्ता आणि संपत्तीपेक्षा मनापासून केलेल्या कोणत्याही कार्यातील समाधान व आनंद सर्वश्रेष्ठ असतो. कारण लक्ष्मी ही चंचल असते असे म्हणतात. सत्तेच्या सहकार्याने मिळविलेली संपत्तीही अशीच असते.
चीनचा तत्त्वज्ञ कन्फ्युशिअस हा असाच सत्तासंपत्तीपेक्षा सामान्य माणसाच्या समाधानात आनंद मानत असे. चीनच्या तत्कालीन सम्राटाने या ककशिअसला एका राज्याचा मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त केले. परंतु कन्फ्युशिअसला सत्ता आणि संपत्तीमध्ये कसलाही रस नव्हता. मात्र मिळालेल्या अधिकारपदाचा त्याने सामान्य माणसाच्या हितासाठी उपयोग करून घ्यायचे ठरविले. राज्याच्या कारभारातील भ्रष्टाचार, लांगुलचालन आदी गोष्टी त्याने कठोरपणे मोडून काढल्या.
अर्थातच त्याच्या या गोष्टी काही भ्रष्ट व सत्तालोलुप अधिकाऱ्यांना आवडल्या नाहीत. त्यांनी सम्राटाकडे कागाळ्या केल्या. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सम्राटाने त्याचे सर्व अधिकार काढून घेतले. जी थोडीफार सक्ती होती तीही त्याने जप्त केली.
कन्फ्युशिअस कफल्लक झाला. मात्र तरीही तो आनंदी होता. गावोगावी जाऊन तो लोकांसमोर व्याख्याने देई. त्यामुळे लवकरच त्याचा मोठा शिष्यवर्ग तयार झाला.
एकदा एका शिष्याने त्याला विचारले, की 'तुमचे पद गेले, सत्ता गेली, संपलीही गेली तरीही तुम्ही आनंदी कसे?' त्यावर कन्फ्युशिअस त्याला म्हणाला, सत्ता काय किवा संपत्ती काय, आज आहे तर उद्या नाहीत. त्या नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. सत्ता वा संपत्ती आपल्या बुद्धीला केव्हाही भ्रष्ट करू शकतात. मग त्या हव्यातच कक्षाला? उलट सामान्य माणसाच्या हितासाठी केलेल्या कार्यात जे समाधान व आनंद आहे, तो चिरकाल टिकणारा आहे. तो माझ्यापासून कधीही कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.
त्याच्या या उत्तराने तो शिष्य भारावला अन त्याने कन्फ्युशिअसच्याच मार्गाने जाण्याचा निश्चय केला.....
Copyright © 2025 | Marathisrushti