नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सर , अमक्या बँकेतून बोलतोय… लोन हवंय का ?’ असं विचारणाऱ्या किंवा प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमार्केटर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा… हे कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी
अजून उजाडलं ही नव्हतं.
इतक्यात डुकरुची हुसहूस सुरू झाली.
इकडे तोंड खुपस, तिकडचा वास घे.
इकडे लाथा मार, तिकडे लोळण घे.
डुकरुच्या ह्या हुसहुशीमुळे त्याची बाकीची भावंडं पण चाळवली.
डुकरीण आई रागावली. “फर्रऽऽफूऽऽक” करत आईने डुकरूला हाक मारली.
आईचा आवाज ऐकताच, मान खाली घालून डुकरू जोरात धावतच आला.
आईने पटकन त्याला कुशीत घेतलं.
पण डुकरुने आईला अशी काही ढुशी मारली की...
आई आणि डुकरुने चिखलात एक लोळण फुगडी घातली.
डुकरुला प्रेमाने फटका मारत आई म्हणाली,“काय रे हे? पडले ना मी!”
कान उडवत डुकरू चिरचीरत म्हणाला,“आई माझं कालपासून पोट दुखतंय.”
आई म्हणाली,“काल चांगली ताजी-ताजी घाण न खाता, तू गेलास उकीरड्यावर. तिकडे शिळं अन्न खाल्लं असशील.ते तुला बाधलं असेल.
डुकऱ्या पुकऱ्या, मी तुला हज्जारदा सांगितलंय, माणसांकडून एक शिकावं, “ताजं-ताजं खावं, शिळं-शिळं फेकावं.'कळलं.”
डुकरू कळवळत म्हणाला, “अग आयेऽऽ, खाऊ खाऊन नव्हे, तर मार खाऊन माझं पोट दुखतंय! काल मी समोरच्या घरात गेलो होतो.तर त्या माणसाने मलाच काठी मारली ग आई.”
डुकरुच्या पोटावर सावकाश नाक घासत आई म्हणाली,“ह्या शिकल्या-सवरलेल्या माणसांना लहान-मोठं काही कळतंच नाही.
'छोट्या बाळांना काठी मारू नये'हे पण आम्ही डुकरांनी शिकवायचं की काय ह्या भल्या माणसांना?”
डुकरुची भावंडं म्हणाली,“आई-आई त्या माणसाची मुलं, आपल्या उकीरड्यावर आली ना की आम्ही त्यांना चिखलात पाडणार. त्यांना धपाधप लाथा मारणार!”
डुकरीण आई चिडून म्हणाली,“नाही!नाही!! आपण नाही माणसां सारखं वागायचं. आपण डुक्कर आहोत! डुक्कर!! आपण लहान मुलांना कधीच मारत नाही.कुणालाही लाथा मारत नाही.कुणालही त्रास देत नाही!!
आपण कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही! ”
डुकरुचा लहान भाऊ शेपटी उडवत म्हणाला,“म्हणजे आपण डुकरं त्या दुष्ट माणसांपेक्षा चांगले आहोत ना? आपण..... आपण सगळ्यांचे मित्र आहोत ना!”
आई लहानू डुकरुला कुरवाळत म्हणाली,“हो रे माझ्या डुकऱ्या!
अरे माणसं फक्त घरात राहतात. आपण अख्ख्या गावात राहतो.
माणसं फक्त त्यांचच घर स्वच्छं ठेवतात. आपण तर अख्खा गाव स्वच्छं करतो.
माणसांना खाण्यापिण्याच्या हज्जार खोड्या असतात.हे हवं तर ते नको,हे खा आणि ते फेक! घराचे नुसते उकिरडे करून टाकतात.
आपल्याला कुठल्याच खोड्या नाहीत बघ! आपण मिळेल ते आनंदाने गोड मानून खातो. आपण गावभर फिरतो,उकीरडे फुंकतो.मजेत राहतो.”
'हां,म्हणूनच,'चवीने खाणार तो डुक्कर होणार!' असं आपल्यात म्हणतात ते काही उगीच नाही!” असं डुकरुच्या भावाने म्हणताच आई खूश झाली!
आईने त्याला प्रेमाने पोटाशी घेतलं आणि मायेने त्याचा कान चाटला.
इतक्यात...
डुकरुचे बाबा तोंडात कुठलसं गवत घेऊन तुडू-तुडू आले.
आईने फुस्स फूस करून त्याचा वास घेतला.मग ते चावून-चावून डुकरुला भरवलं.
तोंड वेडंवाकडं करत,ते गवत खाण्याचा डुकरू प्रयत्न करु लागला.
कसबसं तो ते गीळू लागला.पण त्याला ते काही गिळता येईना.
आईचं लक्ष नाहीसं पाहून डुकरु तोंडातला तो गवताचा चोथा थुकणारच होता.
पण
समोरच शेपटी हलवत बाबा उभे होते!
डोळे बारीक करुन ते त्याच्याकडेच पाहात होते.मग.....
डुकरुने भावाच्या पाठीवर हात ठेवून मान उंच करत,तो गवताचा चोथा कसाबसा गिळला.
थोड्याच वेळात, डुकरुचं पोट दुखणं थोडं कमी झालं. त्याला बरं वाटलं.
जवळच्याच मऊ मऊ बरबरीत,गार गार गुळगुळीत चिखलात डुकरू आडवा झाला.
त्याने हात पाय ताणून आळस दिला.
मस्त मजेत शेपटी तुड-तुड उडवत,शांत पडून राहिला.
इतक्यात त्याच्या बाजूला 'धप्प' असा आवाज झाला!
त्याने दचकून पाहिलं.
त्या समोरच्या माणसाच्या मुलाचा चेंडू डुकरूच्या बाजूलाच पडला होता.
तो मुलगा अंगणात उभा राहून डुकरूकडे प्रेमाने पाहात होता.
डुकरुने चेंडूला एकच जोरदार फटका मारला.
चेंडू ऊंऽऽऽऽऽऽच उडाला,आणि................
मुलाच्या अंगणातच जाऊन पडला.
मुलाने आनंदाने टाळ्या वाजवल्या! हात हलवून मित्राला शाबासकी दिली!
त्याने आपल्या मित्राकडे पुन्हा चेंडू टाकला.....
डुकरू आणि तो मुलगा आता रोजच हा खेळ खेळू लागले.
ते एकमेकांचे 'खेळ मित्र' झाले!!
- राजीव तांबे.
करा सर्वस्व ईश्वरासी अर्पण त्यांतच मिळेल समाधान,
जीवन अग्नी पेटत राही उर्जा निघे त्याचे ठायीं ।
उर्जेचे होते रुपांतर साधत असे कार्य त्यातून,
भावनेचा आविष्कार देई जीवना आकार ।
व्यक्त करण्या भावना उर्जा लागे त्यांना,
एकाग्र करा मना सोडूनी सारी भावना ।
एकाग्र चित्त हेच ध्यान प्रभू मिळण्याचे साधन,
सारी उर्जा ध्यानांत जाई तीच ईश्वरार्पण होई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
मराठी ब्लॉगची पध्दत, संगणाकावर नुकतीच सुरु झाली होती. थोडक्यांत वर्णन करायाचे म्हणजे हे एक प्रकारे आपल्या नावाचे एक खाते काढणे असते. ह्य़ाला करआकारणी वा फी नव्हती. आपल्या नावाचा ई-मेल काढून ब्लॉग काढणे. एक प्रकारे वेबसाईट काढण्यासारखेच आहे. ह्य़ा खात्यावर तूम्ही लेख, कविता, माहिती, फोटो इत्यादी देऊ शकतात. वाचक वर्ग ती वाचतात. जर कुणी प्रतिक्रीया दिल्या तर त्या तुम्हास कळतात. कोणता लेख, वा साहित्य किती जणानी वाचले, ह्य़ाची जाणीव येते. मी हे सर्व जाणल्या नंतर आपणही आपल्या नावाने एक ब्लॉग काढवा ही ईच्छा प्रदर्षीत केली. वाचन लेखन ह्य़ांची आवड मनाच्या विरंगुळ्या बरोबर उतारवयांत वेळ घालविणे व ते कारणी लागणे हा हेतू.
" आता वय सत्तरीच्यापुढे गेलेले, तेव्हां ह्या गोष्टींत कशाला अडकवून घेता, मनाला अशांत कराल. " मुलानी माझ्या हलचाली बघून टोकले.
ईश्वरी चिंतन व वाचण्याचा मार्ग सुचविला.
कोणत्या वयामध्ये कोणते काम करावे ह्य़ाचे नियम नसले तरी शारीरिक क्षमता न मानसिक संतूलन हे त्या कार्यावर मर्यादा टाकतात. हे एक सत्य असते. त्या सर्वांचा विचार होवूनच कोणतेही कार्य हाती घ्यावे. मी माझ्या जीवन आराखड्यातील अनेक छोट्या मोठ्या कर्याचा आढावा घेवू लगलो. तरुणपणी कोणतीही गोष्ट मनांत येतांच ती केली जात असे. तीची योजना, कारवाई, व परिणाम ह्याचा कोणताच गंभीरतेने विचार केला नव्हता. तडफ होती, धडपड होती. प्रौढत्व आले, तेव्हां कोणतीही गोष्ट करायची म्हणजे प्रथम त्या विचारावरच खूप विचार केला जायी. योजना आखल्या जात होत्या. सर्व अंगानी म्हणजे शारीरिक,मानसिक,आर्थिक, कौटुंबीक आणि सामाजीक, तो होइ. केव्हां यश केव्हां अपयश येत होते. मात्र हे सत्य होते की काम, प्रयत्न आणि यश ह्य़ाविषयी एक जिद्द मनात होती. त्या धडपडीत त्या कामाचे अपेक्षीत परिणाम मिळवीण्याचीच चेतना होती. त्यामुळे समाधान व निराशा ह्याना सामोरे जावेच लागत असे. एक कथा वाचली होती. कुण्या एका नव्वदीच्या माणसाने झाडाचे बी शेतांत लावले होते. हे महीत असून की तो स्वतःचे वय व आयुष्य मर्यादा जाणून त्याचे फळ उपभोगणार नाही. स्वतःसाठी नाही तर इतरासाठी, हीच त्याची प्रेरणा होती. फळाची अपेक्षा नसल्यामूळे फक्त आनंद होता.
सत्तरीच्या पुढे गेलेल्या वयांत संगणकावर ब्लॉग काढणे, लिखाण करणे, त्यासाठी वाचन करणे, हे सारे सर्व साधारण अपेक्षित नसले तरी ते गैर वाटत नव्हते. येथे कोणतीही गोष्ट, वा यश मिळवण्याची धडपड नव्हती, अपेक्षा नव्हती. आगदी फळाची इच्छा न बाळगता केले जाणारे काम. ह्य़ात मला मिळणार होता फक्त एक आनंद, समाधान आणि व्यस्त राहण्याची कला वा सवय. शरीर ज्येष्ठत्वाकडे झुकताना त्याच्या गुणधर्मा प्रमाणे ते व्याधींचे शिकार बनणारच. वेळ पुढे ढकलता येते, परंतु काळाला कुणीच रोखू शकत नाही. हे सत्य आहे.
जे कराचचे होते, ज्याची क्षमता होती, ते पुर्ण झाले ही भावना ज्येष्ठ म्हणून पक्की करावी. जे होवू शकले नाही, त्या बद्दल आपण कमी पडलो कां ? हे समजले पाहीजे.
ज्याना काळ-वेळेचे भान, स्वताः च्या क्षमतेची आणि वयाच्या मर्यादाची जाण, हे सारे समजते, तोच जीवनांत खूपसे साध्य करतो. गरीबाना पैशाची किम्मत कळते, असे म्हणतात. त्याच प्रमाणे ज्येष्ठांना वेळेच महत्व कळलेले असते. ते आपल्या उर्वरीत आयुष्याचे अंदाज वर्षे, हाताच्या बोटावरुन हेरतात. दिनदर्शीकेकडे त्यांचे लक्ष नसते. जे राहून गेले त्याबद्दल खंत न करता, उरलेल्या आयुषांचा काळ कोणत्याही चांगल्या योजनेत व्यतीत करण्याचा प्रयत्न व्हावा. नामस्मरण, ईश्वरी चिंतन, ध्यान धारणा, चांगले वाचन, लेखन, अहार, निद्रा (विश्रांति ), आणि बौद्धिक चर्चा, व्यायाम ह्य़ा अपेक्षित कार्यक्रमा शिवाय एखादा छंद जोपावा. जो मनास आनंद, समाधान, व शांतता देणारा असेल. त्यांत कोणतेही ध्येय वा फलाशा नसावी. मराठी ब्लॉग, त्यावरचे लिखाण, चर्चा, आणि रसगृहण हे मजसाठी असेच असणार नाही कां ? तो फक्त व्यस्त राहण्याचा मार्ग असावा.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एका गावाच्या बाजूला एक मोठा डोंगर होता.
या डोंगरावर वेगवेगळ्या फळांच्या फळबागा होत्या.
सुंदर सुवासिक फुलांच्या फुलबागा होत्या.
भाज्यांचे तरारलेले मळे होते.
मलांसाठी खेळायला मस्त प्रशस्त बाग होती.
बागेत थुईथुई उडणारं कारंजं होतं.
या बागेतून त्या बागेत जायला लाल नागमोडी रस्ते होते.
डोंगराच्या वरच्या बाजूला घनदाट जंगल होतं.
या डोंगरावर झुळझुळणारे झरे होते.
तुडुंब भरलेल्या विहिरी होत्या.
एक छोटसं पण काठोकाट भरलेलं तळं होतं. तळ्यात सुळसुळणारे मासे होते.
आणि फक्त पावसाळ्यातच कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा होता.
सगळ्या गावाचं या डोंगरावर फार प्रेम होतं.
गावात आलेले पाहुणे मुद्दामहून हा डोंगर पाहायला जायचे.
पाहुणे जंगलात फिरायचे.
रानमेवा खायचे. विहिरीत पोहायचे.
फळबागेत फळं खाऊन झाडांखाली निवांत झोपायचे.
झऱ्यातलं गोड गार पाणी पिऊन ताजेतवाने व्हायचे.
डोंगर उतरताना सोबत फळं फुलं घेऊन यायचे.
मुलं बागेत खेळायची.
कारंज्यात भिजायची.
मजा करायची.
सगळे म्हणत हा, तर अजबच डोंगर आहे!
पण. . .
हा डोंगर मात्र मनातून नाराजच होता. बेचैन होता.
डोंगराला वाटे :
छोटी छोटी झाडं मोठी झाली की त्यांचं जंगल होतं. त्यांच्या फळबागा होतात.
लहान लहान झरे मोठे झाले, एकत्र आले की त्यांची नदी होते.
पाणी ऊंच उडू लागलं तर त्याचं कारंजं होतं.
पायवाट मोठी झाली की त्याचा मोठा रस्ता होतो.
पण . . .
आपण कधीच मोठं होत नाही!
आपली कधीच वाढ होत नाही.
आपण सगळ्यांना मदत करायची. सगळ्यांना ऊर्जा पुरवायची.
सगळ्या-सगळ्यांना आनंदी करायचं.
पण तरीही . . .
आपली होते झीज आणि फक्त झीजच!
मी अशाने हळू हळू खचूनच जाईन.
. . . माझी कुणालाच काळजी नाही.
हे असं का? . . .
डोंगर आपल्याच विचारात गढून गेला.
डोंगरावरच्या झाडांना..
डोंगरावरच्या झऱ्यांना..
डोंगरावरच्या रस्त्यांना
डोंगराच्या मनातलं कळलं.
डोंगरावरची झाडं हसली.
झाडं सळसळली.
झाडं म्हणाली,
“अरे डोंगरा, असं काय करतोस? तुझ्यामुळे तर आम्ही आहोत.
आम्ही आमच्या मुळांनी तुला असं घट्ट धरुन ठेवलंय की तुझी होणारच नाही झीज!
आणि हे डोंगरा...
आम्हाला आहे रे तुझी काळजी.
कडक उन्हाळ्यात जेव्हा ऊन तापू लागतं, तेव्हा आम्ही आमची सारी पानं तुझ्यावर अंथरतो आणि आम्ही मात्र . . .
निष्पर्ण होऊन उन्हात तापत राहातो . . अतिशय आनंदाने!
तुझ्या पोटातलं थोडसं पाणी पितो आम्ही, पण तशीच सावली ही देतो तुला.”
हे ऐकून डोंगराचं मन भरुन आलं.
डोंगरावरचा झरा जरा खळाळला.
दगडाजवळ बुडबुडला.
झरा डोंगराला म्हणाला,
“अरे डोंगरा, तुझ्याच अंगाखांद्यावरुन आम्ही वाहतो, बागडतो.
आम्हाला आहेच की तुझी काळजी.
र डोंगरा...
आम्ही म्हणजे, तू पाणी पिऊन तृप्त झाल्यावर टाकलेल्या चुळा.
भर उन्हाळ्यात तुला गारवा वाटावा, म्हणून तर त्यावेळी आम्ही तुझ्या पोटात असतो.
आणि पावसाळ्यात, तुझ्यावरचा सगळा कचरा,गाळ वाहून नेतो.
तुला चांगलं स्वच्छं करतो.
आणि पुढच्या उन्हाळ्यासाठी...
तुझ्यावरच्या विहिरी भरुन ठेवतो. तळं भरुन ठेवतो.”
हे ऐकून डोंगराचे डोळे पाणावले.
डोंगरावरचा रस्ता उधळला.
डोंगराला बिलगला.
रस्ता डोंगराला म्हणाला,
अरे डोंगरा, असं काय करतोस?
अरे आम्ही,तुझ्यावरच चालतो, तुझ्यातुनच वळतो, त्यातुनच वाट काढतो . .
आणि वाटसरुंना वाट दाखवितो.
मग ते फळं खाऊन, पाणी पिऊन समाधानी होतात.
फुलांचा वास घेऊन ताजेतवाने होतात. तव्हा . . .
ते सारे तुझंच कौतुक करतात ना?
तुलाच आशीर्वाद देतात ना?
आम्हीच काय...
पण हा सारा गाव सुध्दा तुझ्यावरच प्रेम करतो ना,रे डोंगरा?
हे ऐकून डोंगराला थोडासाच आनंद झाला!
भल्यामोठ्या डोंगराचा इवलासा आनंद
डोंगरावरच्या झाडांना..
डोंगरावरच्या झऱ्यांना..
डोंगरावरच्या रस्त्यांना समजला.
कसं कुणास ठाऊक..पण
गावातल्या मुलांना पण कळला!
मुले नाचत नाचत डोंगरावर गेली.
बागेत खेळली. मातीत लोळली.
विहिरीत पोहोली.
आणि मग...
फुलबागेतली फुलं घेऊन मुलांनी तो अख्खा डोंगर फुलांनी सजवला!
हे पाहायला सारा गाव जमा झाला.
तेव्हाच डोंगराला मनापासून..
अगदी मनातल्या मातीपासून त्याला खूप आनंद झाला!
सगळे म्हणाले,अजबच आहे हा फूल डोंगर!
-- राजीव तांबे.
रंगबिरंगी सुंदर ठिपके, पंखावरी
आकर्षक छटा त्या, मनास मोहीत करी...१,
नृत्य पहा कसे चालते, तालबद्ध होवूनी
फूलपाखरे बागडती, फुलाफुला वरूनी...२,
नृत्याचे आंगण त्यांचे, ते ही सुंदर नि मोहक
मखमालीच्या पाय घड्या, दरवाळताती सुवासिक...३,
दोघांमधली चढाओढ, नर्तक आणि नृत्यांगणा
कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
(कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत).
सातव्या वेतन आयोगाची रिपोर्ट आली. वेतन आयोगाने सरकारी कर्मचार्यांना निराशच केले. घरभाडे न घेणाऱ्या लाला दुखी चंद (LDC)च्या पगारात तर चक्क बामुश्कील १ टक्का वाढ झाली आहे. विम्याची रकम वजा केल्यास फक्त ५ रुपये. इतरांच्या बाबतीत जास्तीस्जास्त ४ टक्का. [(http://www. govtempdiary.com/2015/12/7cpc-pay-net-increase from-1-to-4/ 17400) The 7th CPC has cheated the 35 lakhs Central Government Employees and 50 lakhs pensioners, by announcing meagre 14.29% wage hike, in actual term of increase for serving employees after deduction of Income tax, enhanced subscription of CGEIS, licence fee, CGHS etc the net increase is actually varies from 1% to 4 % increase] असो.
हत्ती पाळणे भारी खर्चाचे काम. पण एकदा हत्ती मेला कि त्या मेलेल्या हत्तीच्या दाताला बाजारात भारी किमंत मिळते. म्हणूनच म्हणतात ‘मरा हाथी सव्वा लाख का’. सातव्या आयोगाच्या अनुसार कार्यरत कर्मचारी मेला तर त्याच्या आश्रितांना विम्याचे १५-५० लाखापर्यंत रकम मिळेल.
कालचीच गोष्ट ऊन खाण्यासाठी दुपारी लंच मध्ये खाली उतरलो. रस्त्यावर एका झाडाखाली खाली सुनील आणि मेथ्यु उभे होते, त्यांना पाहून कपाळावर आठ्या आल्या. शिकारीसाठी दबा धरून बसलेले हिंस्त्र जनावर आणि या दोघांमध्ये काहीही फरक नाही. त्यांची नजर चुकवून जाऊ लागलो. पण कसले-काय. डोळ्यांवर चष्मा असला तरी सुनीलची नजर उल्लू प्रमाणे दूरचा भक्ष्य ओळखण्यास समर्थ. त्याने दुरूनच आवाज दिली, पटाईत, नजर चुकवून कुठे पळतोस, आम्ही इथे तुझीस वाट पाहतो आहे. कपाळावर आलेल्या आठ्या दिसू न देण्याचा प्रयत्न करीत मी विचारले ‘माझ्यावर एवढी कृपा का?"
काहीही झाले तरी आम्ही तुझे सहकर्मी, तुझी काळजी आम्हाला राहणारच. कशी प्रकृती आहे तुझी.
‘मस्त’.
छाती वैगरेह तर दुखत नाही न?
‘नाही’.
दवा-दारू वेळच्या-वेळी घेतोस न.
‘हो’.
सुनील अत्यंत केविलवाणा चेहरा करून म्हणाला दारू घेणे तुझ्या प्रकृतीस योग्य नाही. तुला तर वास हि घेतला नाही पाहिजे.
मी रागानेच म्हणालो, तुला माहित आहे, मी दारूला स्पर्श हि करीत नाही. सुनील: स्ट्राने दारू पिणार्यांना, दारूला स्पर्श करण्याची गरज नसते.
आता मात्र तळपायाची आग मस्तकात पोहचली, मी त्याला खडसावले, तुला म्हणायचे तरी काय आहे? परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे पाहून, मेथ्यु मध्ये टपकला, अरे पटाईत आम्ही तुझे सच्चे दोस्त, आम्हाला तुझी काळजी आहे, कालच चर्चमध्ये तुझ्यासाठी दुआ मागितली. गाॅड, पटाईतला निदान सातवे वेतन आयोग लागू होयेस्तो जिवंत ठेव, नंतर बेशक त्याला जहनुमला डीस्पेच केले तरी चालेल.
या पेक्षा अधिक काय अपेक्षा तुमच्या सारख्या मित्रांकडून ..
सुनील माझे वाक्य तोडत म्हणाला, पटाईत तुला कळत कसे नाही, तुझ्या सारखा टूटा-फूटा जिगरवाला जवळपास निकामी पुरुष आज गेला कि उद्या गेला कुणाला काहीही फरक पडणार नाही. आम्हाला तर वहिनीची काळजी आहे, जर तू आत्ता वर गेला तर वहिनीला विम्याचे जास्तीस्जास्त लाख रुपया मिळेल. पण पे कमिशन नंतर गेला तर, विचार कर, मोटी पेंशन, gratuty दहा लाखांपेक्षा जास्त आणि विम्याचे पन्नाssस लाख. पाहिले आहे का कधी? एवढे पैशे असले तर वहिनींना या वयात हि निदान तुझ्या पेक्षा चांगला नवरा भेटेल. शिवाय आमच्या सारखे देवर....
आता माझी सटकलीच. उगारायला हात वर केला. पण काय करणार दोघेही पसार झाले आणि दूर उभे राहून दात दाखवत माकडांसारखे खी-खी हसू लागले. माझे सहकर्मी मित्र म्हणजे एकापेक्षा एक नमुने. यांचे काय करावे कधी-कधी मलाच समजत नाही.
पण एकमात्र खरे, सातव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचार्यांना निराश केले असले तरी हि वाढलेल्या विम्याच्या रकमे मुळे ‘मरा बाबू पन्नास लाखाचा’ होणार हे निश्चित'.
-- विवेक पटाईत
व्यसनांच्या दिशेने जर स्त्रियांची पावले वळ्त असतील तर त्यांना वेळीच आवर घालावा लागेल अन्यता आपल्या समाजाचं, देशाचं, आपल्या देशातील भावी पिढीचं आणि पर्यायाने स्त्रियांच भविष्यही धोक्यात येईल. त्याहूनही दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे गुन्हेगारी आणि व्यसनाधिनता यांचा फारच जवळ्चा संबंध असतो त्यामुळे गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मध्यमवर्गीय माणसांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची आणि स्मरणात ठेवण्याजोगी कोणती घटना असील तर ती घटना म्ह्णजे लग्न ! मध्यमवर्गीय माणसाच संपूर्ण जीवनच म्ह्णा ना ! लग्न या संकल्पनेच्या आवती – भोवतीच गुंफलेलं असतं. मध्यमवर्गीय माणसाची लग्न या विषयापर्यत पोहचल्यावर सर्वसाधारणतः विचार करण्याची क्षमताच नष्ट होते. त्याची बुध्दी निषक्रीय होते. मध्यमवर्गीय माणसांनीच आजकाल लग्नाचा बाजार मांडलाय आणि त्या बाजाराला काही जोडधंदयांचा आधार ही दिलेला आहे.
आज वर्गात गेलो तर वर्ग एकदम शांत. माझ्यासाठी हे दृश्य नवीनच होतं. इतक्यात मिहिरने गाल फुगवून रोहनकडे बोट दाखवलं. सिमरनने पण तसंच केलं. तर शिल्पाने तोंड फुगवून प्रियाकडे बोट केलं. मला समजेना हा काय प्रकार आहे? प्रिया आणि रोहनला जवळ बोलावलं. तोंड फुगवून, हाताने खुण करुन विचारलं म्हणजे काय? प्रिया व रोहनने चुपचाप खिशातून फुगे काढून टेबलावर ठेवले.... आणि सगळा वर्ग फुगा फुटल्यासारखा ठॉपकन हसला.
टेबलावर आता वेगवेगळ्या रंगाचे पाच फुगे होते. “काय करायचं या फुग्यांचं?” असं म्हणताच मुले एकदम उसळत म्हणाली,“फुगवूया... फोडूया.... उडवूया... त्यात पाणी भरुया... जादू करुया... काहीतरी धमाल प्रयोग करुया.” एकदम सही. आज आपण फुग्यांना मस्ती करायला लावूया... ढकलाढकली करायला लावूया.... नाचवूया... डोलवूया... एका जागेवर बसवूया...काय... चालेल? मुले ओरडली, चालेल काय म्हणता? हे तर मस्त धावेल. पण हे करायचं कसं?
आम्ही फटाफट फुगे फुगवले. त्यातल्या दोन फुग्यांना दोरे बांधले आणि ते फळ्यावर अडकविले. हं चला, आता करु दे त्यांना मस्ती. “पण कशी ?” अस मिहिरने विचारताच त्याला जवळ बोलावलं. ते टांगलेले फुगे त्याच्या डोक्यावर खसाखसा घासले. आणि मग त्या दोन टांगलेल्या फुग्यांची आपापसात भांडणं सुरू झाली. त्यांची आपापसात ढकलाढकली सुरू झाली. त्यातला एक फुगा दुसऱ्याजवळ नेला की तो लांब पळायचा. सगळा वर्ग श्वस रोखून आणि डोळे मोठे करुन ही गंमत पाहात होता.
आता आणखी एक गंमत पाहू. या भांडणाऱ्या फुग्यांमधे एक फुगवलेला साधा फुगा ठेवला. आणि काय मजा... त्या दोन भांडखोर फुग्यांनी या फुग्याला जाम धरुन ठेवलं. हे पाहून मुलांनी इतक्या जोर-जोरात आरडाओरडा केला की ते टांगलेले फुगे पण दचकले! व तो मधला फुगा घसरला. मग हा घसरलेला फुगा फळ्यावरच्या दुसऱ्या कोपऱ्यात बांधून ठेवला.
मिहिरच्या डोक्यात मस्ती आहे म्हणून बहुधा या फुग्यांना मस्ती सुचली असावी. असं म्हणताच प्रिया म्हणाली, मग आता माझ्या डोक्यावर घासा पाहू हा दुसरा फुगा. पाहुया काय होतं? एक नवीनच फुगा प्रियाच्या डोक्यावर घासला. तो दुसऱ्या कोपऱ्यातल्या टांगलेल्या फुग्याजवळ नेला..... पण काहीही झाले नाही! मुले विचारात पडली. हे असं का झालं? हातात फुगा घेऊन प्रिया निरीक्षण करू लागली.
मुलांना क्लू देण्यासाठी विचारलं, दोघांच्याही डोक्यावर ज्या ठिकाणी फुगा घासला त्या ठिकाणी तुम्हाला काय फरक दिसतोय पाहा बरं. “मिहिरपेक्षा प्रियाचे केस चकचकीत आहेत.” असं मुलांनी म्हणताच प्रिया म्हणाली, मी तेल लावलंय तेल!” “हां...! तेल लावल्याने जादू झाली नाही!!” असं मुले ओरडली त्याचवेळी सिमरन धावतच फळ्याजवळ आली.
तिने प्रियाच्या हातातला फुगा हिसकावून घेतला. स्वत:च्या स्वेटरवर खसाखसा घासला. आता ती तो फुगा दुसऱ्या फुग्याजवळ नेणार इतक्यात प्रियाने तिला मागे खेचलं. सिमरनने आधारासाठी भिंत पकडण्याचा प्रयत्न केला,त्यावेळी तिच्या हातातला फुगा सुटला.... आणि काय हो चमत्कार... फुगा भिंतीला चिकटूनच बसला.
वर्गातल्या सर्व शास्त्रज्ञांनी आनंदाने आरडाओरड करत टाळ्या वाजवल्या, कारण त्यांना हा एक नवीनच शोध लागला होता. मुले म्हणाली,“आता आम्ही सुध्दा घासाघिस करुन घरातल्या भिंतींवर चिकटवू की असे फुगे.”
इतका वेळ रोहन अस्वस्थ होऊन पाहात होता. तो चटकन उठला आणि त्याने टेबलावरचा पाचवा फुगा उचलला. स्वत:च्या डोक्यावर घासला. फळ्यावरच्या दुसऱ्या कोपऱ्यात टांगलेल्या फुग्याकडे तो निघाला. फळ्याजवळ पोहोचला. आता रोहन आपल्या हातातला फुगा त्या टांगलेल्या फुग्याकडे नेणार इतक्यात सिमरन आणि प्रिया रोहनच्या दिशेने धावल्या. रोहनने टांगलेल्या फुग्याच्या दिशेने हात सरळ केला. त्याचवेळी प्रिया व सिमरनने त्याला मागे खेचलं आणि.... आणखी एक चमत्कार झाला! “इतकावेळ फळ्यावर लोळणारा फुगा एकदम हडबडून खडबडून जागा झाला. त्या फुग्याने रोहनच्या हातातल्या फुग्याकडे झेप मारली. रोहनच्या हातातला फुगा आणि हा फुगा यातले अंतर सुमारे दोन सेंटिमीटर होते.
या अचानक झालेल्या हल्ल्याने रोहन दचकला व त्याने हात वर केला, इकडे तिकडे हलवला... आणि... तो टांगलेला दोरा अचानक ताठ झाला! रोहनच्या हातातल्या फुग्या समोर तो टांगू फुगा “ताठ दोऱ्याने व नाक वर करुन” नाचू लागला. हे दृश्य पाहून मुले टाळ्या वाजवायची पण विसरली.
आता या मागचं रहस्य मुलांना सांगायचं ठरवलं.
जेव्हा रबरी फुगा रेशमी, नायला दोन किंवा लोकरीच्या कपड्यावर घासला जातो तेव्हा कपड्यातील इलेक्ट्राॅन्स फुग्याच्या पृष्ठभागावर येतात आणि फुगा ऋणभारित होतो. असे दोन ऋणभारित फुगे जेव्हा एकमेकाजवळ आणले जातात तेव्हा ते एकमेकांना दूर ढकलतात. याला “अपसरण” म्हणतात. विद्युतभारित फुग्याजवळ जर साधा फुगा आणला तर तो मात्र आकर्षिला जातो. कारण दोन असमान विद्युतभार एकमेकांना आकर्षित करतात त्याला “आकर्षण” म्हणतात. भिंतीवर विद्युतभारित फुगा चिकटविला तर 'विषमभार आकर्षण' या तत्वामुळे फुगा भिंतीला चिकटतो. थोड्यावेळाने इलेक्ट्राॅन्स हवेत विरतात आणि भिंतीवरचा फुगा खाली पडतो.|
आता आमच्या शालेतल्या मुलांनी नाच केला असेल की फुग्यांनी? आणि तुमच्या घरात फक्त तुम्हीच नाचता की टांगलेले फुगे? मला कळवाल?
मी तुमच्या “मस्तीखोर पत्रांची” वाट पाहतोय.
- राजीव तांबे.
Copyright © 2025 | Marathisrushti