(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • ज्ञान साठा

    ज्ञान साठा

    जमीन खोदतां पाणी लागते,

    हीच किमया निसर्गाची,

    कमी अधिक त्या खोलवरती,

    साठवण असे जलाशयाची ।।१।।

    प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी,

    समानता तो दाखवितो,

    अज्ञानाचा थर सांचवूनी,

    आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।।

    एक किरण तो पूरे जाहला,

    अंधकार तो नष्ट करण्या,

    ज्ञान किरण तो चमकूनी जातां,

    फुलून येते ज्ञान वाहण्या.....३

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • पॉवर ऑफ चॉइस

    सुप्रसिद्ध साहित्यीक चेतन भागत याने सांगीतलेला हा किस्सा आहे.

    मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहीली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालुन माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’

    ‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षीतपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’

    मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती.

    वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’ कॉफी आहे!’

    मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’

    ‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’

    ‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेर्याावरचे आश्चर्य काही लपत नव्हते.

    माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’

    माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’

    मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टाक्सी सुरु करातताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’

    वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगीतले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहीती दिली.

    ‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’ वासु म्हणाला.

    ‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’

    वासुच्या चेहेर्याेवर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासुनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’ बद्दल कळले!’

    ‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले

    ‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’ करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणार्याी सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’ वासु म्हणाला
    ‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजुबाजुला निरिक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.

    ‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.

    ‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगु लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले. या वर्षी कदाचीत माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’

    गरुड व्हा, बगळा होऊ नका!

    वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.

    बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत!

    आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का?

    तुम्हाला काय वाटते?

    उल्हास हरी जोशी
    (श्री. अतुल सुळे यांच्या सौजन्याने)

  • का चिंतामणी जालिया हाती। सदा विजयवृत्ति मनोरथीं। ……. ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी २२

    गुरू अनेक प्रकारचे असतात व ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी उभे असतात. आपण घेतलेल्या श्वासाच्या पहिल्या क्षणी आपल्याला, आपला पहिला गुरू भेटतो- मातृगुरू! आपली आई. आई श्वास घ्यायला शिकवते, बोलायला शब्द देते, जगण्याची मूल्ये देते.

  • नेत्रहीनता !

    ठाण्याहून नाशिकला महत्वाच्या कामासाठी चाललो होतो. हायवेवर गाड्यांची प्रचंड प्रमाणात जा ये चालू होती. लवकर पोहचणे जरुरी होते. त्यामुळे गाडी वेगातच चालली होती. अचानक माझी नजर दूर अंतरावरील एका गाव फाट्यावर गेली. एक माणूस हलके हलके मुख्य रस्ता ओलाड्ताना दिसला. तो एकटाच असून, बेफिकीर भासत होता. कोणत्या क्षणी एखादे वाहन जवळ येऊन धडकेल ह्याचा भरवसा नव्हता. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती हायवे क्रॉसिंग करताना डावीकडे उजवीकडे बघेल, स्वत:ला विश्वासात घेईल, व मग रस्ता ओलांडेल. परंतु हा कसलीही तमा न बाळगता शांतपणे इकडे तिकडे नजर न टाकता, रस्ता ओलांडत होता. दररोज पेपरमध्ये अनेक अपघतांच्या बातम्या वाचण्यात येतात. अशाच बेफिकीर वृतीमुळे व वाहन चालकाच्या नजर चुकामुळे त्याक्षणाला काहीही होण्याची शक्यता असते. काळजी अर्थात दोघानीही घ्यावयाची असते. क्षणार्धात अनेक विचारांचे काहूर मनांत येऊन गेले. मला भासणाऱ्या त्या मूर्ख माणसाला चांगलीच हडसून खडसून समज द्यावी, झापावे, हा विचार आला. एकदम मी ब्रेक दाबून गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. अगदी मुठ वळून त्या माणसाच्या पाठीमागे घावलो. प्रथम त्याला ग्राम्य भाषेत एक शिवी हासडली. ” ये साले तुमको क्या मरना है हायवेपर. शरम नही आती, इस बेफिकीर ढंगसे रस्ता क्रॉस करते हो.” मी त्याचा जवळ धाऊन गेलो. त्याला एक लाफा देण्याच्याच पोज मध्ये होतो. माझा आवाज एकूण ऐकून तो थांबला. त्याने माझ्या आवाजाच्या दिशेने मान वळविली. मला एकदम धक्का बसला. तो माणूस नेत्रहीन होता. क्षणात माझा राग पूर्ण विरघळून गेला. आपल्याच विक्षिप्त विचारांची लाज वाटू लागली.

    प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच. नेत्रहीन असला, द्रीष्टीहीन असला तरी मनाने केव्हांच जगण्याच्या प्रक्रीयेमध्ये बेफिकीर नसतो. आपण डोळस असूनही आपल्या विचारीनी अंध असतो. ही जाणीव झाली. मी चटकन शंभर रुपयाची एक नोट त्याचा हाती ठेवली.

    ” हे काय आहे?” हे तो विचारत असतानाच मी त्याचा द्रीष्टीहीनतेचा फायदा उठवत हळूच माघारी फिरलो.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कावळू

    जरासं कुठे उजाडलं तर,लगेचच कावळ्याच्या पिल्लाची “कावकाव किवकीव” सुरू झाली.।
    इकडे तिकडे हुसहुस सुरू झाली. चळवळ वळवळ सुरू झाली.
    “आईच्या पायाला चोचीने खाजव. नाहीतर घरट्याच्या काड्या चोचीने उपस.”
    कावळूच्या ह्या कावकावीने आणि असल्या उद्योगाने कावळीण जाम करवादली.
    कावळीणीने आपली चोच घरट्यांच्या काड्यांवर कराकरा घासली. मान डावीकडे करुन पंखात चोच खुपसली. उजवा पाय वर घेऊन त्यावर पण चोच घासली.
    मग चोचीने आपल्या कावळूचं डोकं खजवत ती कुरकुरत म्हणाली,“जरा कुठे डोळा लागला होता आत्ता.. .. तर सुरू झाली तुझी कावकीव! !
    हे म्हणजे अगदी त्या माणसांच्या छोट्या मुलां सारखं! दिवसभर गारेगार झोपायचं आणि पहाटे-पहाटे टँऽऽ टँऽऽ रडायचं. आमच्या झोपेचं नुसतं सुकं गवत करुन टाकायचं.
    अं.. काय बरं पाहिजे आहे माझ्या कुकुल्या कावळू बाळूला?”
    आईच्या असल्या बोलण्याचा कावळूला भारी राग आला. त्याने रागारागाने आईला पिसं फुलवून दाखवली.
    आईनं दचकून मान वाकडी करुन एका डोळ्याने कावळूकडे पाहिलं.
    कावळू कुरकूरत म्हणाला,“आऽऽई मला जाऽऽम भूक लागलीय हां. आणि मला व्हेज खाऊन-खाऊन पण कंटाळा आलाय ग. रोजच ती सडलेली भाजी, मरगळलेली पानं आणि शिळ्या भाताची शितं खाऊन मी जाम फन गेलोय.
    बाबांना सांग, “आज मला प्लीऽऽज,काहीतरी नॉन-व्हेज घेऊन या. एकदम चमचमीत!
    चमचमीत म्हणजे अगदी मेक्सिकन फूडच पाहिजे असं काही नाही. ते परवा सारखं साधं चायनीज चालेल. पण मंचूरीयन किंवा शेजवान आणि सोबत कोवळा-कोवळा उंदीर कबाब.”
    कर्कश आवाजात कावळीण म्हणाली,“हे बघ कावळू, हे जरा फारच होतंय! उजाडल्या-उजाडल्या उगाच माणसांच्या मुलंासारखे हट्ट करू नकोस. आणि “हे दे आणि ते दे सांगत मला हॉटेलची मेन्यू काड़र् वाचून दाखवू नकोस.“
    अरे कावळू, उद्या महिन्याचा पहिला रविवार आहे. म्हणजे, त्या समोरच्या जोशी काकू नक्की नॉन व्हेज आणतील. मग काहीतरी गडबड करत त्या ते नॉनव्हेज साफ करतील. नंतर त्या त्यातलं थोडसं खातील आणि खूपसं टाकतील! त्यातलंच मी तुला घेऊन येईन बरं.....”
    “पण आई तुला काय माहित? उद्याच्या रविवारी असं काही झालंच नाही तर? जोशी काकूंनी नॉन व्हेज आणलंच नाही तर?” असं म्हणत कावळूने मान टाकली. त्याचा चेहरा रडवेला झाला.
    कावळूला पंखाने थोपटत आई म्हणाली,“अरे वेडा की काय तू? अरे इतके दिवस या फांदीवर बसून एका डोळ्याने मी रोज पाहतेय ते काय? माझं जजमेंट चुकणार नाही! अरे ते जोशी काका अगदी तुझ्या बाबांसारखे आहेत. एकदम “शाना कौआ“ आहेत ते!!”

    बायकोची कावळू सोबतची किर्रकुर्र ऐकून,समोरच्या फांदीवर बसलेले कावळे बाबा झपकन आले.
    कावळे बाबांनी पंख फडफडवले. कावळूची पिसं थरथरली.
    बाबा येताच,कावळू बाबांजवळ सरकला.
    कावळूने बाबांच्या पंखावर हळूच चोच घासली. बाबांच्या मानेवरुन हळूवार चोच फिरवली.
    बाबा कावळूच्या कानात उगाचंच “किर्रऽऽऽऽऽऽ काऽऽऽव” करून कुसकन ओरडले.
    कावळू घाबरला! त्याची मान थरथरली. त्याच्या चोचीचा “चाऽऽ“ झाला!
    तो पटकन लांब सरकला. घाबरुन मान तिरकी करुन बाबांकडे पाहू लागला.
    नवऱ्याला पंखाने ढकलत कावळीण म्हणाली,“काय हे ओरडणं? काय हे वागणं? दचकलं ना माझं पोर!
    शोभतं का तुम्हाला हे असं वागणं?
    आणि म्हंटलं, लेकाचा आजचा नवीन हट्ट ऐकलात का?..”

    कावळे बाबा कौतुकाने कावळूकडे पाहू लागले.
    कावळूने बाबांना पिसं फुलवून दाखवली. एका पायावर उभं राहून दाखवलं. मग..
    कावळूने खास लाडीक आवाजात,मघाचचीच नॉन व्हेजची कुरकूर पुन्हा बाबांकडे केली.

    बाबा म्हणाले,“किर्रऽऽ कावकाव कॅव! अरे एव्हढंच ना माझ्या कावळू? त्या रविवार पर्यंत कोण कशाला थांबेल? आणि रविवारी हवं तर स्पायसी खा पण आज फ्रेशच खा!
    थांब, आत्ताच घेऊन येतो,तुझ्यासाठी फक्कड फ्रेश नॉन व्हेज!
    अरे, “फ्रेश नॉन व्हेज खाशील तर स्पायसी फूड विसरशील“ असं आपल्यात म्हणतात ते काय उगीच नाही बरं!...”
    एक डोळा बारीक करून मान तिरकी करत कावळीण म्हणाली, “हे पाहा,उगाच ते मेनरोडवरचं घाणेरडं, उघड्यावरचं,गटारातलं काही-बाही आणू नका.
    रस्त्यावरचं ते स्पायसी चायनीज तर अजिबात आणू नका.
    अहो, मोठा झाला की खाईल तो हे सर्व.पण उगाच आत्तापासून ह्या भलत्या सवयी नकोत.
    नाहीतर आपल्या कावळूची तब्येत नाही का बिघडायची?
    “लहान पिल्लांना थोडचं द्यावं पण चांगलं फ्रेश द्यावं“ असं आपल्यात म्हणतात ते जरा लक्षात असू द्या.

    म्हणून म्हणते, कुणाच्या तरी घरातून नाहीतर चांगल्या हॉटेलातूनच घेऊन या. आणि... . आणणारच आहात तर.... थोडसं जास्तीच आणा की.....म्हणजे....!”

    “कावकाऽऽव, कावकाऽऽव!! कळलं मलाठमान तिरकी करत कावळा प्रेमाने म्हणाला.

    कावळूला काही कळलंच नाही!
    तो आळीपाळीने आई बाबांकडे पाहातच राहिला.
    त्याने बाबांच्या चोचीला चोच घासली. आणि तो आईच्या जवळ सरकला.

    कावळा कावकावला,“हे बघ,मी बाळासाठी नॉन व्हेज मेनरोडवरून आणणार नाही. गटारातलं घाणेरडं आणणार नाही.
    रस्त्यावरचं स्पायसी चायनीज आणणार नाही.
    कुणाच्या ही घरातून पळवून आणणार नाही.
    आणि कुठल्याही चांगल्या हॉटेल मधून सुध्दा अजिबात आणणार नाही.
    समजलं?”

    कावळीण रागाने काळी-जांभळी झाली!!
    तिने पिसं फुलवली.
    घरट्यावर कराकरा चोच घासली.
    जराशी वर उडून पुन्हा घरट्यावर बसली.
    तिने रागावून मान तिरकी करत घशातून “ कूर्रऽऽकाऽऽव, कूर्रऽऽकाऽऽव” असा करकरीत आवाज काढला.
    आई जवळ बसलेला कावळू दचकला!
    घाबरुन बाबांकडे सरकत आणि चोचीचा चाऽऽव करून तो आईकडे पाहू लागला.
    कावळीण कावळ्यावर कावणारच होती.

    इतक्यात कावळूच्या चोचीवर चोच घासून कावळा म्हणाला,“अगं तू आपल्या कावळूला काही बावळट समजू नकोस!
    तेऽऽऽ बघ,तिकडे समोर पाहा.”
    कावळीणीने मान तिरकी-तिरकी करून पाहिलं. पुन्हा-पुन्हा पाहिलं.
    पण तिला काहीच दिसलं नाही!!
    तिने रागारागाने मान उडवली आणि चोच उघडली!
    कावळा बायकोला समजावत म्हणाला,“अगं समोर म्हणजे आपल्या कावळू बाळाच्या समोर आणि तुझ्या पाठीमागे! हं... आता दिसलं का?”

    कावळीण उडी मारुन घरट्याच्या कडेवर बसली.
    मग मागे मान वळवून तिने पानांच्या मधून पाहिलं .
    झाडांच्या पलिकडे पाहिलं.
    समोरच्या रस्त्यावर पाहिलं.
    आणि ती खूप खूप आनंदाने कावकावली!!

    समोरच्या रस्त्यावर एक नवीनच दुकान सुरू झालं होतं.
    त्या दुकानात काळे मासे.
    पांढरे मासे.
    रंगीत मासे.
    छोटे मासे,
    मोठे मासे व्यवस्थित मांडून ठेवले होते.
    दुकान नवीनच असल्याने फार गर्दी पण नव्हती.

    गेले चार दिवस आईचं सगळं लक्ष बाळाकडे. म्हणजे कावळूकडे.
    म्हणजे आईचं तोंड कावळूकडे आणि आईची शेपटी दुकानाकडे! तिला तर इकडे तिकडे पाहायला वेळच नाही. टाइमपास करायला टाइमच नाही.
    त्यामुळे हे नवीन दुकान सुरू झाल्याचं तिला माहीतच नाही.
    आणि गंमत म्हणजे,
    कावळूचं सारं लक्षं मात्र त्या दुकानाकडेच.
    त्यामुळे त्याच्या चोचीला सारखं पाणी सुटायचं!
    “नॉन व्हेज खातोय,फ्रेश खातोय“ असली स्वप्नं त्याला पडायची!

    कावळूचे बाबा कावळूला म्हणाले,“हं कावकाव. आत्ता जातो आणि एक मस्त ताजा-ताजा फडफडीत मोठा रंगीत फ्रेश मासा घेऊनच येतो.
    ओळख पाहू कावळू,हा फ्रेश फडफडीत मासा कुणासाठी?”

    कावळू जोरात ओरडला, “माझ्यासाठी... आणि.... माझ्या-माझ्या लाडक्या आईसाठी!!”
    राजीव तांबे.

  • शिक्षणाचे वास्तव आणि शिक्षकाचे मत

    युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते.

    त्या दोन जिल्ह्यात आधी सुरू असणाऱ्या प्रशिक्षणाबाबत चौकशी केली तेव्हा कळलं की 'शिक्षकांच्या अध्ययन आणि अध्यापनातील अडचणींचा त्यात समावेशच नाही.' त्यामुळे प्रशिक्षणानंतर ही शिक्षकांच्या अडचणी कायमच राहात. आणि विशेष म्हणजे फारच कमी शिक्षकांना याबाबत खंत वाटत होती. असले प्रशिक्षण काय कामाचे?
    दोन्ही जिल्ह्यातील विशेष गती असणाऱ्या 100 शिक्षकांची दोन दिवसांची कार्यशाळा घेतली. यावेळी त्यांना अध्ययनात व अध्यापनात येणाऱ्या विषय निहाय व इयत्ता निहाय अडचणींची यादी तयार केली. अशी यादी तयार करताना शिक्षकांनी यादीवर त्यांचे नाव लिहिणे अपेक्षित नसल्याने शिक्षकांनी आपले काम निर्भयपणे केले. गणित, भाषा, विज्ञान, परिसर अभ्यास, इतिहास व भूगोल अशा सर्व विषयांच्या इयत्तानिहाय अडचणींच्या याद्या तयार झाल्या. या 100 याद्यांपैकी अडचणींची वारंवारिता आणि प्राथमिकता ठरवून प्रत्येक विषयाच्या 20 अडचणींची अंतीम यादी तयार केली. उदा.गणितातल्या अडचणी होत्या : मुलांना '3003' लिहायला सांगितल्यास काही मुले '30003 किंवा 300003' असेही लिहितात. (कारण आपण लिहितो डावीकडून उजवीकडे व मोजतो मात्र उजवीकडून डावीकडे! त्यामुळे मुलांचा गोंधळ होतो.) तसेच, 36 आणि 63 किंवा 49 व 59 हे अंक लिहिताना मुलांचा गोंधळ होतो. अर्धा,पाव,पाऊण या संकल्पना समजणे, त्याचा व्यवहारात उपयोग करणे या बाबत मुलांचा गोंधळ होतो. पाढे पाठ कसे करावेत. वगैरे.
    भाषेतल्या अडचणी : जोडाक्षरं आणि रफार शिकविताना गोंधळ. 'बैल' असे न लिहिता काही मुले 'बइल' असे लिहितात. मुलांचे अक्षर वळणदार होण्यासाठी व लेखनाची आवड निर्माण होण्यासाठी काय करावे? मुलांना बोली भाषेकडून प्रमाणित भाषेकडे कसे आणावे? इत्यादीं

    यानुसार शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला.
    शिक्षकांना सक्षम करण्याअगोदर शिक्षकाचे मूल्यमापन होणे ही गरजेचे होते. कारण शिक्षकाला जर अध्ययन व अध्यापनातील स्वत:ची अडचण ओळखता आली व ती निर्भयपणे मांडता आली तरच त्याला त्याचे उपयोजन करणे सोपे होईल. पर्यायाने मुलांसोबत शिकण्याची गती ही वाढेल. त्यासाठी तीन पायऱ्या तयार केल्या. एक,शिक्षकाला मुलाची अडचण ओळखता येते का? दोन,मुलाची अडचण ओळखता आल्यानंतर, ती सोडविण्यात शिक्षकाला काय अडचण आहे, हे त्याला समजतंय का? तीन, मुलाचा प्रश्न सोडविण्यात शिक्षकाला काय अडचण आहे, हे त्याला समजले आहे.पण आता, ही अडचण सोडविण्यासाठी त्या शिक्षकाने कोणत्या संसाधन व्यक्तीची, अधिकाऱ्याची, संस्थेची मदत घ्यायची हे त्याला माहित आहे का? आणि माहित असल्यास तो त्यासाठी उपयोजन करतो आहे का? या साखळीतील कुठलाही एक दुवा जरी निखळला तरी त्या मुलाच्या शिक्षणातला व्यत्यय कायमच राहतो.
    या साऱ्या गोष्टींचा विचार करुन, जे 'मास्टर टिचर्स' इतर शिक्षकांच्या कार्यशाळा घेणार त्यांच्यासाठी आधी 'व्हिजनिंग कार्यशाळा' आयोजित केल्या. आणि एकदा व्हिजनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यातूनच तयार झाली दोन दिवशीय 'अध्यापन कौशल्य कार्यशाळा.'

    शिक्षकांनीच मांडलेल्या अध्यापनातील अडचणी सुटू शकतील असे गरजाभिमूख 'शून्य खर्चाचे खेळ' तयार केले. असे हे सुमारे 89 खेळ. यातला प्रत्येक खेळ किमान दहा प्रकारे खेळता येतो. यातील काही खेळ भाषेचे आहेत पण विशिष्ट भाषेचे नाहीत. त्यामुळे ते खेळ मराठी, हिंदी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही भाषेसाठी खेळता येतात. त्याचप्रमाणे अनेक खेळ हे युनिव्हर्सल आहेत. ते कुठल्याही विषयासाठी खेळता येतात. या खेळांचे तीन प्रकार आहेत. एक,संकल्पना स्पष्ट होण्यासाठी काही खेळ. दोन, उजळणी करण्यासाठी खेळ. तीन, मूल्यांकनासाठी खेळ. याचप्रमाणे भाषिक कौशल्ये विकसित होण्यासाठी काही प्रयोग केले. निबंध लेखनाच्या किमान सहा पध्दती विकसित केल्या. उदा. : पावसाळ्यात मुले त्यांच्या शालेय परंपरेनुसार 'पावसाळ्यातील एक दिवस'हा निबंध लिहित असत. आम्ही मग पावसाळ्याचे तीन गट केले.गावातला पावसाळा, शहरातला पावसाळा आणि झोपडपट्टीतला पावसाळा. वर्तमान पत्रातील फोटो, बातम्या, शाळेजवळच्या झोपडपट्टीत जाऊन मुलाखती, शेजाऱ्यांची व पालकांची मदत आणि त्यांच्या गटांची निरीक्षणे ह्यांची मदत घेऊन मुलांनी धमाल निबंध लिहिले. एका मुलाने निबंधात लिहिले होते, 'माझ्या घराच्या बाजूला गॅरेज आहे.पाऊस आला की रस्त्यावर विचित्र आकाराची इंद्रधनुष्ये वाहात असतात. हातात काठी घेऊन आम्ही वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ खेळतो!' 'वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ!!'ही उत्तुंग कल्पना केवळ मुलेच करू शकतात. मुलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना जर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले तरच हे शक्य होऊ शकते.

    खेळता खेळता मुलांचे पाढे पाठ होऊ लागले. तोंडी गणितं, सम विषम संख्यांची उजळणी, शब्दांचा वाक्यात उपयोग करण्यासाठी खेळ, जोडाक्षरासाठी खेळ, शब्दांचे खेळ, वाक्यांचे खेळ, संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी खेळ, आलेखाचा खेळ, नकाशाचा खेळ, पूर्णांक अपूर्णांकाचा धमाल मस्ती खेळ असे अनेक खेळ रोज शाळेत खेळले जाऊ लागले. शाळेत खेळ खेळायला मिळतात यामुळे मुलांमधे उत्साह संचारला. आणि या खेळांमुळे मुलांच्या गणिताच्या, भाषेच्या अडचणी सुटतात म्हणून शिक्षकांचा हुरुप वाढला. बालभारतीवर फार अवलंबून राहायचं नाही अस ठरवलं होतं. कारण बालभारती मधील धड्यांचा मुलांच्या भावविश्चाशी काडिमात्र संबंध नाही. मुलांच्या बुध्दीला चालना व आव्हान मिळेल असे त्यात काही नाही. कल्पकता शून्य पुस्तकाचे नाव 'बालभारती.' यातील भाषा, आणि धड्याखालील स्वाध्याय हा तर इतका रटाळ प्रकार आहे की मुलांमधे मातृभाषेविषयी अरुची निर्माण करण्यात बालभारतीचाच सिंहाचा वाटा आहे! रवींद्रनाथांचे बालसाहित्य आणि आजचे आपले 'बालभारतीय बालसाहित्य' (काही सन्मानीय अपवाद वगळून) ह्याच्या मूळ संकल्पनेतच प्रचंड फरक आहे.

    आपल्या बालसाहित्यात उपदेश,शिकवण,संस्कार,तात्पर्य हे सारं ठासून भरलेलं. इतकंच नव्हे तर, समोरचा मुलगा हा 'अडाणी किंवा मातीचा गोळा' आहे असं समजूनच जबरदस्तीने त्याच्यावर शिकण्याचा बोजा टाकलेला. शरीर गोष्टीचं किंवा कवितेचं पण त्याचा आत्मा मात्र 'मुलांना काहीतरी शिकवणं!' बिचारी मुले 'त्या शरीराला' फसून गोष्ट किंवा कविता वाचायला जातात आणि मग त्यातील 'आत्मा' मुलांवर शिकवणीचा मारा करत!! त्यामुळे अवांतर वाचनाविषयी एक नफरत मुलांच्या मनात नकळत निर्माण होते. रवींद्रनाथांचं सर्वात मोठं योगदान हे की,त्यांनी शिक्षणातच बालसाहित्याचा समावेश केला. बालसाहित्य आणि मुलांचं शिकणं ह्याचा अतिशय गंभीरपणे विचार करुन,त्याबाबत प्रयोग करुन त्याचा अनोखा समन्वय साधला! त्यामुळे शरीर शिक्षणाचे पण त्याचा आत्मा म्हणजे गोष्टी,गाणी,कविता,संगीत आणि गमती जमती!! 'मुलांचं नातं हे आत्म्याशी असतं,शरीराशी नाही' ह्याची रवींद्रनाथांना जाणीव होती. मुले गोष्टी वाचत, कविता- गाणी म्हणत,गमती जमती करत नकळत कधी शिकली हे त्या मुलांना कळतच नसे. (संदर्भ : सहज पाठ.)
    रवींद्रनाथांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला. बंगाली भाषा शिकण्यास मदत करणाऱ्या 'सहज पाठ' ह्या तीन पुस्तिका लिहिल्या, त्यानंतर लिहिली अंकलिपी. बंगालमधील प्रत्येक मुलाच्या हे सहज पाठ, तोंडपाठ आहेत ते शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे तर ते मुलांना आपले वाटतात म्हणून!!
    'करी मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयाचे' असा रवींद्रनाथांचा दृष्टीकोन होता.

    स्वाध्यायातील प्रश्न हे बहुआयामी असायला हवेत.त्या प्रश्नांना अनेक उत्तरे असायला हवीत.मुलांच्या विचाराला चालना मिळणे,त्याच्यातील सूप्त सर्जशीलता जागी होणे,विचार करण्याच्या विविध पध्दतींची त्यांना ओळख होणे आणि मी स्त:हून शिकू शकतो/नवीन शोधू शकतो हा विश्वास त्याच्या मनात निर्माण होणे हे स्वाध्यायाचे मुख्य उद्दीष्ट असले पाहिजे. म्हणूनच, अध्यापन कौशल्य कार्यशाळांच्या यशस्वीतेनंतर मात्र 'बहुआायामी स्वाध्याय निर्मिती' कार्यशाळांचं आयोजन सुरू केलं. आणि शाळेतल्या प्रश्नपत्रिकांचं स्वरुपच बदललं.
    मी शाळेत असताना कधीच प्रयोग केले नव्हते. आणि प्रयोग न करताच पुस्तकात पाहून प्रयोगाचे निष्कर्ष लिहिले होते. किमान या मुलांवर तरी अशी पाळी येऊ नये यासाठी प्राथमिक शाळांतून 'शून्य खर्चाच्या प्रयोग शाळा' सुरू केल्या.

    दैनंदिन जीवन व विज्ञान याचा सहसंबंध मुलांना उलगडावा, त्यांना स्वत: प्रयोग करुन पाहाता यावा हा त्यामागचा हेतू होता. शून्य खर्चाचे किमान 49 प्रयोग तयार केले. मुले चुकतील पण त्यातूनच शिकतील अशी पॉलीसी ठेवली. पहिलीतली मुले सुध्दा प्रयोग करू लागली. त्यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि वेगवेगळ्या प्रयोगातून ती नवं काही शोधू लागली!! वानगी दाखल एक छोटा प्रयोग सांगतो. (आणि मला खात्री आहे आत्तापर्यंत हा प्रयोग तुम्हीसुध्दा कधी केला नसेल.) इयत्ता तिसरीला विज्ञानाच्या पुस्तकात ज्ञानेंद्रियांची ओळख आहे व त्याखाली बालभारतीय स्वाध्याय आहेत. नाकाने वास समजतो व हाताला स्पर्श समजतो असे एक वाक्य आहे. हे नेमकेपणानं उमजण्यासाठी व विज्ञान आणि दैनंदिन जीवन यांच्यातील सहसंबंध उलगडण्यासाठी एका प्रयोगाचे आयोजन केलं. एक जुना सुती रुमाल आणला त्याचे तीन सारखे तुकडे केले. मग मेणबत्ती पेटवली.

    एक तुकडा हातात घेऊन मुलांना विचारलं,हा तुकडा जळायला किती वेळ लागेल? मुलांनी काहीही उत्तरे दिली. 'एक तास,अर्धा तास, दहा मिनिटं वगैरे'. प्रत्येकाने आपापले अनुमान वहीत लिहून ठेवले. आत्तापर्यंत कापड जाळण्याची मुलांना मुभा नसल्याने कापड जळण्यासाठी किती वेळ लागेल हे मुलांन सांगणे अपेक्षितच नव्हते. तो तुकडा अकरा सेकंदात जळला.
    मग आम्ही सर्वांनी जळलेल्या कापडाचा वास घेतला. दुसरा तुकडा पाण्यात भिजवला व पिळला. आता हा तुकडा जळायला किती वेळ लागेल? या प्रश्नाला सगळ्या मुलांनी आता 'सेकंदात' उत्तरे दिली. हा तुकडा जळण्यासाठी वीस सेकंद लागले. आम्ही सर्वांनी मिळून पाण्यात भिजून जळलेल्या कापडाचा वास घेतला. तो पहिल्यापेक्षा वेगळा होता.
    तिसरा तुकडा तेलात भिजवून मग मेणबत्तीवर धरला. हा तुकडा जळायला बत्तीस सेकंद लागली. कारण तेल आधी जळले मग कापड. हा वास ही वेगळाच होता.
    मग मुलांनी अशा पदार्थांची यादी केली जे सुके,ओले व तेलात भिजून जळले असता वेगवेगळा वास येतो. त्यानंतर अशा पदार्थांची यादी केली की, पदार्थ एकच पण वेगवेगळ्या स्टेजेसवर त्याचे वेगवेगळे वास येतात. उदा. ऊतू जाणारं दूध, लागलेलं दूध, आटणारं दूध इ. त्याचप्रमाणे डोळे बंद करुन ओळखता येणारे वास. मुलांनी सुमारे 82 वासांची यादी तयार केली. नाकाने आपल्याला फक्त वास समजत नाही तर त्या वासामुळे आपल्याला खूप माहिती समजू शकते, आणि तीच खरी महत्वपूर्ण असते. अशी विविध प्रकारची माहिती मिळविण्यासाठी वास हे केवळ एक माध्यम आहे आणि त्यासाठी नाक हे एक साधन आहे. पण त्या वासामागे दडलेली माहिती शोधणं हे आपलं खरं साध्य आहे. आपण मुलांवर विश्वास ठेवायला घाबरतो, त्यांना कमी लेखतो म्हणून मुले शिकत नाहीत असंच मला वाटतं.

    पण हे सारं काही इतक्या सहजतेने घडलेलं नाही. पैसे खर्च करुन तर नाहीच नाही! वर्ग खोल्या बांधून, शैक्षणिक साधनांचा पुरवठा करुन किंवा दुपारी जेवायला देऊन प्रश्न सुटत नाही तर तो क्षणिक सुटल्यासारखा वाटतो. खरा प्रश्न हा मानसिकता आणि दृष्टीकोन याच्याशी निगडित आहे! शिक्षकांची मानसिकता बदलवणं,त्यांना शाळा, शिक्षण आणि शिकणं याबाबत नवा दृष्टीकोन देणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि बदललेल्या दृष्टीकोनानुसार त्याचे उपयोजन करण्यासाठी त्यांना सक्षम करणं म्हणजे मूल शिकण्याच्या प्रक्रीयेला गती देणं. (यासाठी आम्ही व्हिजनिंग कार्यशाळा व अध्यापन कौशल्य कार्यशाळा यांचं एकत्रिकरण करुन तीन दिवसांच्या 'कार्यवेध कार्यशाळा' सुरू केल्या.) त्यासाठी तुम्हाला दोन किस्से सांगणं आवश्यक आहरी एक. सर्व शाळांतून मुलींसाठी लंगडीच्या व रांगोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. याचे कारण काय असं विचारल्यावर शिक्षक म्हणाले,'शासनाचे पत्रकच आहे की मुलींच्या लंगडीच्या स्पर्धा घ्या. 'पण त्या पत्रकाखाली असं तर लिहिलेलं नाही ना, जर का शिक्षकांनी मुलांच्या पण लंगडीच्या स्पर्धा घेतल्या तर त्याला निलंबित करण्यात येईल? मी विचारलं.
    त्यावर शिक्षक म्हणाले : “पण पत्रकाप्रमाणे वागलं तर काय झालं?”
    “पण आमच्या इथे तर अशीच पध्दत आहे!”
    “मुलं कशापायी लंगडी घालणार”
    “मुलांनी रांगोळ्या काढल्या तर सारा गाव त्यांना हसेल ते?”
    “ग्रामीण भागात मुलीच लंगडी घालतात. रांगोळी काढतात.”
    “तुम्हा शहरी लोकांना काय कळणार? इकडे असं चालत नाय!”

    आता मी बोलायला सुरुवात केली, “तुमचं मत आणि तुमचा विश्वास हे वास्तव बदलू शकतात! महात्मा फुलेंच्या वेळी बायका शिकत नव्हत्या हे वास्तव होतं. पण फुलेंचं मत होतं की बायकांनी शिकलं पाहिजे आणि त्यांचा विश्वास होता की त्या शिकू शकतील. आणि त्यांनी वास्तव बदललं! मुले पण लंगडी घालू शकतात आणि सुंदर रांगोळी पण काढू शकतात.याबाबत तुमचं मत काय? आणि तुमचा विश्वास काय? हे आधी ठरवा. मला खात्री आहे आजपासून आपण वास्तव बदलू शकतो. सर्व खेळ आणि सर्व स्पर्धा सर्वांसाठी ठेवू शकतो.” असं सांगितल्यावर किमान 15 टक्के शाळांतून काही वेगळं करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दोन. एका प्रशिक्षण कार्यक्रमात मी पिशवीतून पत्यांचा जोड बाहेर काढला आणि शिक्षकांना विचारलं, “हे शैक्षणिक साधन तुम्ही वर्गात वापरता का?” जीवंत भूत पाहिल्याप्रमाणे शिक्षक माझ्याकडे पाहू लागले. काही शिक्षिकांचा चेहरा तर लकवा भरल्याप्रमाणे वेडावाकडा झाला. एका शिक्षिकेच्या हातात मी पत्ते देऊ लागलो तेव्हा दोन पावलं मागे सरत ती म्हणाली, “म..माफ करा! मी पत्यांना हात लावत नाही. माझ्यावर लहानपणीच चांगले संस्कार झाले आहेत!” शिक्षक वर्गात पत्ते वापरत नाहीत कारण 'पत्ते म्हणजे जुगार' याविषयी सर्व शिक्षकांचं एकमत होतं.

    जुगार ही वृत्ती आहे किंवा जुगार हा डोक्यात असतो आणि तो पत्ते नसताना ही खेळता येतो. आपण पत्यांचा वापर कसा करतो यावर सारे अवलंबून असते. ही वरवर साधी वाटणारी गोष्ट कुणालाच माहित नव्हती. बदाम म्हणजे एकक,किलवर म्हणजे दशक व चौकट म्हणजे शतक असं जर आपण गृहित धरलं तर..815 ही संख्या कशी सांगता येईल? सोपं आहे,चौकट अठ्ठी,किलवर एक्का व बदाम पंजी ज्यांच्याकडे आहे ती मुले उभी राहतील. पत्ते हे अंकपत्ते आहेत असं समजलं तर त्यातून शिकवणं सोपं होईल. प्रत्येक गोष्ट हेच शैक्षणिक साधन आहे. त्यामुळे पैसे खर्च करून नवीन काही करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आजूबाजूला जे काही उपलब्ध आहे त्याचा कल्पकपणे वापर करणं आणि त्याचा वापर करुन मुलांना शिकवणं नाही तर ते स्वत:हून शिकू शकतील यासाठी प्रोग्रॅम तयार करणं हे शिक्षक म्हणून आपलं काम आहे! विश्वास ठेवा, त्याप्रशिक्षणात आम्ही सर्वांनी मिळून गणिताचे नवीन 19 खेळ तयार केले. हे खेळ सर्वजण मिळून आणि पत्ते वापरून खेळलो. त्यावेळी आमच्या बरोबर त्या 'सुसंस्कारी शिक्षिका' पण सहभागी झाल्या होत्या.

    'शिक्षण-विचार' या विनोबांच्या पुस्तकात 'गुरुचा अधिकार : मार्गदर्शन' असा एक परिच्छेद आहे. तोच इथे मांडतो. 'एका प्राचीन वचनात असे सांगितले आहे की, प्रसंगी ज्याचा सल्ला आपण घेऊ असा सर्वात जवळचा माणूस म्हणजे गुरू. जीवनात कधी एखादी समस्या उद्भवली, कठीण प्रश्न समोर उभा राहिला, तर सल्ला कोणाचा घ्यावा? शास्त्रकारांनी सांगितले आहे की तटस्थ गुरुजनांचा घ्या. आज आपली स्थिती काय आहे? संपूर्ण नोकरीच्या काळात हजारो विद्यार्थी आपल्या हातातून पार होतात.आपण त्यांना शिक्षण दिले,संस्कार दिले यात शंका नाही. परंतु त्यातले किती विद्यार्थी त्यांच्या जीवनातील समस्या घेऊन तुमचा सल्ला मागण्यासाठी आले? ते आईचा सल्ला घेतात, वडिलांचा घेतात, पत्नीचा किंवा पतीचा घेतात. भावाचा किंवा मित्राचा सल्ला घेतात; परंतु शिक्षकाला मात्र दूर ठेवतात. हा, शिक्षक म्हणून आपला केव्हढा मोठा पराभव आहे! वास्तविक शिक्षकाचा सल्ला हा सर्वात श्रेष्ट मानला गेला पाहिजे. परंतु आज ही स्थिती नाही. याचे कारण एकच आणि ते म्हणजे शिक्षकाला सामान्य नोकरापेक्षा आज वेगळे स्थान नाही.' काही प्रमाणात हे आजचे वास्तव आहे हे नाकारता येत नाही. पण शिक्षकांचे म्हणजेच पर्यायाने समाजाचे मत आणि त्यांचा विश्वास हे वास्तव बदलू शकतात! तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि तुमचा विश्वास जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. मी तुमच्या ध्यास पत्रांची वाट पाहतोय.
    ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

    - राजीव तांबे.

  • काळाची काठी !

    एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलून बागेतल्या एका छोट्या झाडावर नेऊन ठेवले. मानसिक समाधान वाटले, की आपण त्याला त्यावेळी तरी मृत्यूपासून दूर नेले. पण केवळ कांही क्षणच गेले असतील, एक पक्षी तेथे झेपावून आला व त्याने त्या किड्याला अलगद उचलून नेले. एका जीवाचा अंत होताना दिसला. माझे मन खंतावले. माझा तर्काधीष्टीत हिशोब चूक वा बरोबर? समाधान हे देखील एक मानसिक शास्त्र असते. निर्माण झालेली परिस्थिती माणूस बदलू शकत नाही. परंतु त्याला वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारांचे जे स्तर असतील त्याप्रमाणे तो योजना आखण्याचा विचार करतो. निसर्गाला मात्र तसेच अभिप्रेत असेल असे नाही. निसर्ग आपली चाल त्याच्याच पद्धतीने चालू ठेवतो. येथेच वैचरिक विविधता निर्माण होते. काळाच्या हाती एक दंडक (काठी) असतो असे म्हणतात . ज्याच्या एका टोकावर स्थळ व दुसऱ्या टोकावर वेळ ही कोरलेली असते. जेंव्हा एक टोक स्थळ निर्देश करते, त्याच वेळी दुसरे टोक वेळेची चाहूल टिपते. जीवनाच्या अंतिम मार्गावर स्थळ आणि वेळ यांची विधात्याने नोंद केलेली असते. म्हणूनच ते प्रत्येकाला अनिश्चित घटना परंतु निश्चत सत्याकडे नेते. काळाचा दंडक स्थळ व वेळ ह्याची जेथे गांठ पडेल तेथेच आघात करतो.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • भिक्षापात्र

    राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता.
    जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.

    प्रसंगच तसा होता.

    त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली
    भिक्षा मागण्यासाठी आला होता.

    राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला.
    काय हवं ते माग. मिळेल.

    भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे.
    त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.
    पण, वचन देण्याआधी विचार कर.
    जमेल का?

    भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,
    अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,
    माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.

    राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले
    आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...

    ...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...
    ...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,
    आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,
    म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.

    रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,
    महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.

    भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला.
    सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.

    पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.

    राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,
    भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात
    माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही.
    असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?

    भिकारी म्हणाला,
    ते मलाही माहिती नाही.
    हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे.
    त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात.
    आणि
    ते
    कशानेही भरत नाही.

  • जरी सरिताओघ समस्त। परिपूर्ण होऊनि मिळत। …… (ज्ञानेश्वरी, अ.२. ओवी ५८)

    संयम व मर्यादा या मोठ्या गोष्टी आहेत. तुमच्या हातात सर्व प्रकारची साधनसामग्री असते, तेव्हा त्या साधनसामग्रीच्या आधारे नवी साधनसामग्री तुमच्या हाती येऊन मिळते, पण तिचा उपयोग व्यक्तिगत व सामुदायिक विकासासाठी करणे महत्वाचे. एक गोष्ट आपल्या नेहमी लक्ष्यात येते ती म्हणजे बर्‍याचदा सत्तेकडे सत्ता जाते व संपत्तीकडे संपत्ती; पण सत्तेमुळे उर्मट होऊ नये व संपत्तीमुळे माजू नये.

  • दोन बहिणी

    तसा विचार केला तर त्या दोघी बहिणीच.
    एकाच घरात पण बाजू बाजूच्या खोलीत राहणाऱ्या.
    सकाळ झाली की त्या हातपाय ताणून आळस द्यायच्या. त्याचवेळी घरातून बाहेर डोकवायच्या.
    मग दिवसभर तशाच अवस्थेत दोघींच्या गप्पा आणि टिंगल टवाळ्या सुरूच. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांकडे त्या दोघी अगदी बारीक लक्ष ठेवायच्या. “हा कधी जातो? आणि तो कधी येतो? ही काय करते? आणि ते काय करतात?” हेच दिवसभर पाहात बसायचं... टाइमपास करत.
    कुणी येवो न येवो, याचं लक्ष सतत रस्त्याकडे!
    कधी कधी यांच्या डोक्यावर कावळे,चिमण्या किंवा कबुतरं येऊन बसत. पण त्यांना याची पर्वाच नाही. त्या ढीम्मच!
    काहीवेळा चिमण्या जाता-जाता त्यांच्या डोक्यावर दोन गरम-गरम मऊ-मऊ ठिफ टाकून जात. पण त्या दोघी बहिणी त्या चिमण्यांशी कधीही भांडल्या नाहीत. किंवा डोकं हलवून त्यांना उडवलं पण नाही. त्यांचे आपले परिसर निरीक्षण सुरूच!
    संध्याकाळ झाली. अंधारुन आलं की, त्या दोघी जणी आपापल्या खोल्यात स्वत:ला बंद करुन घेत.
    सकाळ झाली की पुन्हा या दोघींचा बाहेर डोकावून टाइमपास सुरू.
    पण अचानक एके दवशी.. .. एक बहिण बोलेच ना. एकदम खीन्न! उदास!
    दुसऱ्या बहिणीला तिची काळजी वाटू लागली. तिला कळेना हिला झालं काय?

    इतक्यात ती पहिली म्हणाली,“ताई, उद्यापासून मी बाहेर डोकावणार नाही.
    तुला पाहणार नाही.
    तुझ्याशी एक शब्द ही बोलणार नाही.
    आपण आता पुन्हा कधी-कधी भेटणार नाही ग.
    आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस!! ”
    हे बोलताना तिला खूप भरुन आलं.
    तिच्या काचा थंड पडल्या.

    काळजीने धुरकट झाल्या.

    हे पहिलीचं बोलणं सताड उघड्या तोंडाने दुसरी ऐकत होती.
    भीतीने तिच्या काचा तापल्या.
    कसबंसं स्वत:ला सावरत दुसरीने स्वत:ची कडी घट्ट केली.
    उघड्या तोंडातून भरपूर हवा आत घेतली.
    आणि.. ..धीर करुन तिने विचारलं,“मला नीट सांग, उद्या नक्की काय होणार आहे?”

    “उद्या माझा मेकओव्हर आहे!
    यू नो, पूर्वीची ती दिवाणखाना ही कनसेप्ट आता गेली. आता त्याचं लिाव्हिंग रुम मधे रुपांतर झालं! एव्हरीथींग इज नाऊ अल्ट्रा मॉडर्न!!..”
    “काय ग, ही कुठली भाषा? काल पर्यंत तर तू ठीक होतीस! आणि हे मेक ओव्हर म्हणजे काय?”
    “गेले आठ दिवस मी रोज हीच भाषा ऐकतेय.
    अगं मेकओव्हर म्हणजे, सोप्या सुटसुटीत गोष्टी मोडून टाकून विचित्र अवजड गोष्टी आणायच्या!
    आता त्या फोल्डींगच्या खूर्च्या किती छान आहेत! ती छोटी मुलं त्यावर उभं राहून आपल्यातून डोकावतात आणि आई बाबांना टाटा करतात तेव्हा किती बरं वाटतं ना? आता त्या मोडून त्याच्या बदली म्हणे “बीन बॅग्ज” आणणार आहेत!
    ट्यूब लाइटशी गप्पा मारताना संध्याकाळ कशी निघून जायची ते कळायचं पण नाही.
    पण आता म्हणे भिंतीत फिट्ट बसणाऱ्या काचेमागे दिवे लावणार आहेत.”

    “अगं ताई, हे तर भयानकच बाई!! या दिव्यांची तोंडच अशी भितींत लिंपून टाकली तर घरात बोलायचं कुणी कुणाशी? आपले पंखेराव तरी आहेत ना?”
    “नाही ग. माझ्या तोंडात एसी लावणार आहेत म्हणे. त्यातच असतो पंखा!”
    “म्हणजे आता आयुष्यभर तू तोंडात एसी धरुन बसणार? कमाल आहे!! आमच्या तोंडात वाटेल त्या गोष्टी कोंबणारे हे कोण शहाणे?”
    “रागावू नकोस ताई. उद्यापासून माझी लाइफस्टाइलच चेंज होणार आहे.”
    “अगं मला नीट समजेल असं सांग गं..”

    “उद्यापासून उघडणं, बाहेर डोकावणं, बिजागऱ्यांनी किरकिरणं हे सारं बंद!
    आता फक्त गरगरत एका रेषेत सरकणं.
    उद्यापासून मी स्लायडिंग होणारे ना!”

    “व्वा! आणखी काय-काय होणारे?”
    “तुला माहितंच आहे की.. या पांढऱ्या स्वच्छं काचांमुळे आपल्याला दुपारी त्या उन्हाचा किती त्रास होतो! पण उद्या मला रंगीत काचा लावणार आहेत. मस्त डार्क चॉकलेटी काचा!
    आता उद्यापासून सकाळ नंतर डायरेक्ट संध्याकाळं! नो दुपार!!
    एकदम कू।़।़ल!! ”

    “मला सांग हे सगळं तुला आवडतंय?
    अगं त्या चॉकलेटी काचांमुळे रंगांधळी होशील तू!
    आणि त्या एसीमुळे घरातली माणसं जरी थंड झाली तरी तुझं डोकं नेहमीच तापलेलं असेल!
    काळजी घे स्वत:ची..”
    “ताई तू म्हणतेस ते खरंय!
    मला बाहेरुन कुणीही कसंही बदलवलं तरी मी आतून तशीच राहीन! सकाळी सकाळी स्वत:तून बाहेर डोकावणारी! आणि संध्याकाळी अंतर्मूख होणारी!!”

    हे ऐकल्यार ताई स्वच्छं काचेने हसली आणि म्हणाली,“उघडा,मिटा किंवा सरका पण स्वत:तून बाहेर डोकवा, हे ज्यांना जमलं त्यांनाच खरं जग दिसलं” ही चिनी म्हण तू ऐकलीच असशील की?”

    हे ऐकताच पहिली समाधानाने हसली.
    यातूनच दुसरी काय ते समजली!

    -राजीव तांबे.