(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • हिरवळ

    HIRWALLLL123

  • पश्चाताप – एक जाणीव

    संध्याकाळची वेळ होती. दारावरची बेल वाजली. दारासमोर डॉक्टर देशमुख यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी ते घडणे म्हणजे केवळ चमत्कार होता. डॉक्टर देशमुख शासनाचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना निवृत्त होऊनही दहा वर्षे झाली होती. बरेच प्रशासकीय अधिकार प्राप्त. ते स्वत: एक कर्तबगार, हुशार, प्रामाणिक आणि अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. सर्व संबधित त्यांना वचकून होते.

    मला एक प्रसंग आठवला. त्यावेळी ” कैलास मानसरोवर “ ही यात्रा केवळ भारतीय शासन आयोजित असे. वर्षातून फक्त तीन महिने ती यात्रा चाले. ३० दिवसाची यात्रा. वर्तमानपत्रे, दूरदर्शन ह्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशातून अर्ज मागविले जात. यात्रेला जाण्यासाठी थोड्याच लोकांना प्रवेश मिळे. किचकट नियमातून प्रवेश मिळणे अत्यंत अवघड होते. मी पण अर्ज केला होता. नशिब चांगले म्हणून नंबर लागला. तार मिळाली ” कैलास मानसरोवर यात्रेसाठी तुमचा अर्ज मंजूर केला गेला. १५ दिवसात फार्म भरून अनामत रक्कम पाठविणे.” धावपळ सुरु झाली. यात्रा दोन महिन्या नंतर सुरु होणार होती. संबंधित बाबींची पूर्तता करण्याची गरज होती. शासकीय नोकरी. तेंव्हा ३० दिवसाची रजा मंजूर करून घेणे महत्वाचे होते.

    डॉक्टर देशमुख त्यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना भेटलो व परिस्थिती समजावून सांगितली. रजेचा अर्ज दिला. माझ्यासाठी नशिबाने ही एक मिळालेली संधी असल्याचे सांगितले. त्यांनी क्षणभर विचार केला. प्रशासकीय कारण देत अर्ज नामंजूर केला. मी खूप निराश झालो. विनंत्या केल्या. वेळ पडल्यास बिनपगारी राजा द्यावी, हे ही मागितले. परंतु डॉक्टर देशमुख यांनी निर्णय बदलला नाही. माझा अर्ज फेटाळून लावला. मिळालेली संधी वरिष्ठांच्या हट्टापाई गमावून बसलो.

    १२ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग, मी केंव्हाच विसरलो होतो. आणि आज अचानक ज्याचा विचार केव्हाच मनांत येणार नाही ते घडले होते. डॉक्टर देशमुख माझे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांचे मी स्वागत केले. खूप आनंद व समाधान व्यक्त केले. मी देखील निवृत झालो होतो.

    डॉक्टर देशमुख सांगू लागले. ” मी खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. माझ्या जीवनात मी अनेक वरिष्ठ जागा भुषविल्या. अनेक निर्णय घेतले. शकतो नियमानुसार काम करण्याचा प्रयत्न केला. नियम हे फक्त मार्ग दर्शक असतात.

    निर्णय मात्र तुम्हाला सारासार विचार करून, परिस्थितीचा अभ्यास करून, त्याच्या परिणामाचा विचार करून, घ्यावा लागतो. त्यात असते तुमचे ज्ञान, अनुभव, कार्याची क्षमता, आणि तुमचा स्वत:चा स्वभाव गुणधर्म. निर्णयात स्वभावाचा सहभाग अल्पसा असला तरी अनेक निकालांची तो उलट सुलट करु शकतो. तुमचे राग लोभ अहंकार, कुणाबद्दलचे समाज, गैरसमज ह्या बाबी तुमच्या स्वभावाला बंदिस्त चाकोरीत टाकतात. अजाणतेपणाने तुमच्या निर्णयामध्ये त्याचा अप्रत्यक्ष सहभाग होऊन जातो. अशाच कांही मी घेतलेल्या निर्णयाचे आज मी विश्लेषण करीत आहे. कांही निर्णया बाबतीत, मला खंत वाटते. तो भूत काळ होता. मी आता कांहीच करु शकत नाही.

    पश्चात्ताप होणे हेच एक प्रायश्चित असते. चुका करणे हा मानवी स्वाभव. परंतु त्याची तीव्रतेने जाणीव होणे हा निसर्ग. त्याला मानणे हे त्या दुष्ट चक्रातून केलेले बचवात्मक समाधान. ज्या ज्या निर्णयामध्ये जर कुणाची हानी झाली असेल तर आणि त्यांत मला स्वत: ची चूक उमगली असेल, तर त्याची क्षमा मागण्यासाठी मी आलो आहे. वेळ गेली, काळ गेला. भोगनाऱ्याने जे भोगले, त्यांच्या दु:ख निर्मितीत माझा अप्रत्यक्ष सहभाग होता. क्षमा व्यक्त करून मी मनाचे सांत्वन इच्छितो.”

    डॉक्टर देशमुख भावनीक झालेले दिसले. चुका सुधारण्यासाठी आता वेळ नसली, तरीं अंत:करणातून निर्माण झालेल्या प्रायश्चिताची जाणीव, हीच खरी शांतता. हाच निसर्ग व ईश्वरी संदेश नव्हे काय ?डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

  • बोल अबोल

    जीवनाच्या एका वळणावर जेंव्हा आपल धावण थांबत आणि आता जीवनात मिळविण्याची इच्छा शिल्लकच राहिले नाही असे वाटते आणि आपल्या जीवनात फक्त शांतता उरलेली असते तेंव्हा आपण आपल्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागतो . तो संवाद साधल्यावर आपल्याला जी सापडते ती म्ह्णजे आपल्या मनात कोठेतरी खोलवर दडलेली एखादी खंत असते. प्रत्येकाच्या मनात आपल्या जीवनात काही तरी करायचं राहून गेल्याची खंत ही असतेच. माझ्या आयुष्यात जेंव्हा मी मागे वळून पाहतो तेंव्हा मी जिच्यावर मनापासून प्रेम केल तिच्याकडे माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त न केल्याबद्दलची खंत मला आजही अस्वस्थ करते. कदाचित त्यावेळी मी जो विचार केला तो बरोबर नव्हता हे मला आज वाटते आहे कारण आज मी विचारवंत झाल्याचा मला साक्षात्कार झालेला आहे पण त्या वेळची माझी जगाकडे पाहणारी दृष्टी आणि माझी आजची जगाकडे पाहण्याची दृष्टी यांच्यात बरेच अंतर निर्माण झालेले आहे. हे खरं होत की माझे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिचे चालणे, बोलणे, हसणे, नावणे, गाणे, रूसणे आणि रडणे ही मला आवडत होते. पण सर्वात महत्वाचे म्ह्णजे तिच्या अचाट बुध्दीमत्तेवर माझे खरे प्रेम होते. तिला ही माझ्यातील कला गुणांबद्दल आदर होता. त्यावेळच्या माझ्या कुटूंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि माझ्या खाद्यावर मी स्वतःहून घेतलेल्या माझ्या कौटूंबिक जबादार्‍यांमुळे मी माझं तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही. मला ती नाही म्ह्णण्याची भिती वाटत नव्ह्ती पण जर ती हो म्ह्णाली तर तिला माझ्यासाठी थांबायला मी कोणत्या तोंडाने सांगणार होतो ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्ह्ते कारण काही तरी जगावेगळे मिळविण्याच्या दिशेने केव्हांच माझा प्रवास सुरू झाला होता.

    या प्रवासात मला अनेक जणी भेटल्या पण त्यापैकी एकही तिची बरोबरी करू शकत नव्हती. अजून काही वर्षे ती थांबली असती तर कदाचित मी माझं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलच असत. पण कदाचित ते नियतीलाच मान्य नसावे बहूदा. तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला मी तिच्या या निर्णयाच समर्थनच केल कारण तेंव्हा मला माझं ध्येय खुणावत होत. पण तिला गमावल्यावर थोड्याच वर्षात मी काय चूक केली हे माझ्या लक्षात येऊ लागले. आज मी मिळविलेल्या यशावर फक्त तिचा आणि तिचाच अधिकार आहे. माझे यश हे मला फक्त तिच्यासोबत साजरं करायला आवडलं असतं म्ह्णूनच मी माझ्या यशाचा आनंद आजही कोणासोबत कधीच साजरा करीत नाही. मी माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही याची मला सर्वात जास्त खंत जाणवते कारण मी जर तस केल असत तर कदाचित माझ्या जीवनाला एक वेगळच वळ्ण मिळाल असत आणि मी तिच्या ही जगण्यालाही एक अर्थ प्राप्त करून देऊ शकलो असतो. आज तिच्या वाट्याला आलेले एका सर्वसामान्य गृहीणीचे जीवन माझ्या मनात खर्‍या अर्थाने खंत निर्माण करून जाते. माझं प्रेम अबोल न ठेवता बोलून व्यक्त केल असत तर कदाचित माझ्या आयुष्यातील ही एकमेव खंत ही दूर झाली असती.

    -- निलेश बामणे

  • मी आणि परी

    गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी. सहजा-सहजी कुणाकडे न जाणारी ती परी पटकन माझ्या कडेवर आली. तिच्या आईला ही आश्चर्य वाटले.

    आजकाल दररोज संध्याकाळ सात- आठच्या सुमारास मी कधी ही घरी पोहचतो. मी घरी पोहचल्याच्या १५-२० मिनिटातच तिची दारावर थाप ऐकू येते. मला ही आश्चर्य वाटते, परीला कसे कळते मी घरी पोहचलो ते. दार उघडल्या बरोबर आपल्या लटपटत्या पायांनी दुडदुड धावत दादा-दादा म्हणत सरळ माझ्या अंगावर येऊन धड्कते. तिच्या पायातल्या पैजणांच्या रुणझुण आवाज ऐकल्यावर, माझ्या शरीरात ही एक चैतन्य संचारते. दिवसभराचा थकवा आणि तणाव क्षणात दूर होतो. माझा हात पकडून लटपटत जिने चढत मला गच्ची वर घेऊन जाते. एकदा गच्ची पोहचल्यावर आमचा चोर-शिपायाचा खेळ सुरु होतो. दमल्यावर पुन्हा आम्ही जोडी खाली येते. तिच्या साठी खास काजू आणून ठेवले आहे. ते काजू कुठल्या डब्ब्यात आहे. तिला पक्के ठाऊक झाले आहे. दादा खाऊ (तिच्या बरोबर मी मराठीतच बोलतो. आणि तिला कळते ही). डब्बा तिच्या जवळ दिल्यावर मोजून ४-५ काजू आपल्या हाताने काढून मला देते. नखरेल एवढी कि एक-एक करून काजू तिला भरवावा लागतो. तीही गुणी मुलासारखे शांतीने काजू खाते. पण शेवटचा काजू तिच्या तोंडात भरवताना न चुकता ती खट्याळ, शैतान आपल्या सळसळत्या दातांनी कडकडून चावा घेते. तिच्याकडे डोळे वटारून बघितल्यावर, आपले डोळे बंद करून, नाक मुरडीत नुकतेच निघालेले दात दाखवत इतक्या जोरात हसते. काय म्हणावे, तिला रागवताच येत नाही. आजकाल तर परीने माझ्या शरीरावरच कब्जा केला आहे असे म्हंटले तरी गैर नाही. कधी पोटावर बसून तबला वाजवते, तर कधी पाठीवर चढून जोरात केस ओढते. रागवल्या बरोबर तिचे खट्याळ मुली सारखे हसणे. संध्याकाळचा तासभराचा वेळ कसा निघून जातो कळतच नाही. (त्या मुळे आजकाल लिहायला ही वेळ मिळत नाही).

    गेल्या रविवारी सकाळी भुरका-भुरका पाऊस सुरु होता. नेहमीप्रमाणे आमची जोडी गच्ची वर पोहचली. परी प्रथमच वादळाने भरलेले आकाश पाहत होती. आकाशाकडे आश्चर्याने पाहत, आपल्या इवल्याशा हातात पावसाच्या छोट्या-छोट्या थेम्बाना गोळा करत आनंदाने खिदळू लागली. माझ्या अवती-भवती पाय जमिनीवर आदळत परी नृत्य करू लागली. तिच्या पैंजणाचा रुणझुण आवाज, त्यात पावसाचा हलका मृदू स्वर. स्वर्गीय दृश्य होते. तिचे ते नृत्य पाहून मोराला ही लाज वाटली असती. खरंच! पाऊस आल्याबरोबर, सर्व सृष्टी आनंदित होते. सर्वत्र चैतन्याचा संचार होतो. परी ही त्याला अपवाद कशी ठरणार. पावसाचा जोर थोडा वाढला. मी परीला कडेवर उचलले, आणि म्हणालो परी चला खाली, जास्त वेळ पावसात भिजलो आणि तुला सर्दी पडसे झाले तर तुझी ममा मला मारेल. ममा मारेल, हे शब्द ऐकल्यावर, ती इतक्या जोरात हसली कि काय सांगू, कदाचित कल्पना करत असेल, ममा, दादाला मारणार, कसे दृश्य असेल ते.

    कधी कधी मला वाटते, निराशाच्या गर्तेतून मला बाहेर काढण्यासाठीच तर देवाने परी बरोबर माझी भेट घडविली असेल. एखाद दिवस जर ती घरी आली नाही तर माझे मन बैचैन होऊन जाते. पण काही ही म्हणा, तिच्या संगतीत आजकाल माझा वेळ मस्त जातो.

  • खरं गणित

    नेहमी शेवटचा पेपर गणिताचा असतो. रैना, प्रिया, अर्णव आणि राधा या चौघांनी ठरवलं की यावेळी आपण गणिताचा सॉलीड अभ्यास करायचा आणि भरपूर मार्क मिळवायचे.

  • समत्व बुद्धी

    समत्व बुद्धी

    एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें,

    विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।।

    जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती,

    बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।।

    समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग,

    त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।

    जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते,

    दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते ।।४।।

    संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी,

    टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी ।।५।।

    मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची,

    स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • एकाच वाक्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची नावे

    मराठी भाषेतील एक अद्भुत गंमत बघा. एकाच वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांची नावे कशी आली आहेत ते बघा....

    अगं कमल, उठ, पाय धु, रस, भजॆ, चहा बनव.

    अ :- अकोला, अमरावती, अौरंगाबाद, अहमदनगर
    ग :- गडचिरोली, गोंदिया
    क :- कोल्हापूर
    म :- मुंबई
    ल :- लातूर
    उ :- उस्मानाबाद
    ठ :- ठाणे
    प :- पालघर, पुणे, परभणी
    य :- यवतमाळ
    धु :- धुळे
    र :- रायगड, रत्नागिरी
    स :- सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
    भ :- भंडारा
    ज :- जळगाव, जालना
    च :- चंद्रपूर
    ह :- हिंगोली
    ब :- बीड, बुलढाणा
    न :- नांदेड, नागपूर, नाशिक, नंदुरबार
    व :- वर्धा, वाशिम

  • पाश्चात्य संस्कृती

    ( बर्‍याच दिवसानंतर विजय आणि अजय हे दोन मित्र भेटलेले असतात आणि हॉटेलातील एका टेबलावर बसून चहा पिता-पिता गप्पा मारत असतात तेंव्हा त्याच्यात झालेला नाट्यमय संवाद )

    विजय – ( अजयकडे पाहत ) मध्यंतरी गोव्याला गेला होतास का ?

    अजय – ( आश्चर्याने ) तुला कसं काय कळल ?

    विजय – अरे ! कसं काय ? फेसबुकवर तू गोव्याला काढलेले फोटो ‘अपलोड’ नाही का केलेस ? तेच मी पाहिले .

    अजय – अच्छा ! ते तू पाहिलेस का ?

    विजय – अरे ! तू गोव्याला जावून नक्की केलस काय ? तू ना दारू पित, ना मच्छी मटन खात , ना तुला पोहता येत, तिकडे जावून काय समुद्रावर कविता वगैरे लिहल्यास की काय ?

    अजय – अरे ! तुला कोणी सांगितल की फक्त दारूडेच जातात गोव्याला सहलीला ? गोव्याला इतरही बर्‍याच गोष्टी आहेत की पाहण्या सारख्या.

    विजय – हो ! आहेत ना अर्धनग्न स्त्रिया समुद्राच्या किणार्‍यावर उन खात पडलेल्या, पाहिला तुझा फोटो पाहिला समद्र किणार्‍यावर त्या अर्धनग्न पाश्चात्य तरूणीसोबत काढलेला.

    अजय – हो ! त्या अर्धनग्न तरूणीमुळेच माझा पाश्चात्य संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. त्या फ्क्त शरीराने अर्धनग्न असतात पण मनाने निर्मळ आणि पवित्र असतात पण आपण मनाने आणि दृष्टीनेच अर्धनग्न असतो. अश्लीलता आपल्या नजरेत भरलेली असते ती अर्धनग्न तरूणी किती सहज गोड हसत माझ्या सोबत फोटो काढायला उभी राहिली होती. तिने माझ्या भावनांचा आदर केला होता तिच्या मनात तेंव्हा विचारही आला नाही की हया माणसाला कदाचित आपल्या अर्ध नग्नतेत रस असेल म्ह्णून. आज तिच्यासोबतचा फोटो मी पाहतो तेंव्हा चुकूनही माझे मन तिच्या अर्धनग्नतेकडे नाही तर तिच्या चेहर्‍यावरील निरागस आणि निर्मळ हस्याकडे आकर्षित होते.

    विजय – आता तुला पाश्चात्य संस्कृती आवडायला लागलेली दिसतेय ?

    अजय – संस्कृती पाश्चात्य काय आणि भारतीय काय ? ती फक्त माणणार्‍यांसाठीच मह्त्वाची असते. मला माझ्या भारतीय संस्कृतीबद्द्ल नितांन्त आदर आहे म्ह्णूनच तर त्या फोटोत मी समुद्र किणार्‍यावरही पूर्ण कपडयात तिच्यापासून किंचित अंतर ठेवूनच उभा असलेला दिसतोय ना ? ती माझ्या संस्कृतीचा आदर म्ह्णूनच माझ्या सोबत फोटो काढायला तयार झाली होती उद्या ती माझ्या सोबतचा तिचा फोटो तिच्या देशात कोणाला दाखवेल तेंव्हा त्यांनाही आपली संस्कृती कळेलच की. मला फक्त इतकच वाटत ती जर आपल्या संस्कृतीचा आदर करत असेल तर मी ही तिच्या संस्कृतीचा आदरच करायला हवा ! तिच्या संस्कृतीकडे अश्लिलता म्ह्णून पाहता कामा नये.

    विजय – बरोबर आहे तुझ ! या दृष्टीने मी कधी विचारच केला नाही. आपण सतत पाश्चात्य संस्कृतीकडे अश्लीलतेचा चष्मा लावूनच पाहतो त्यामुळे आपल्याला त्यांच्या संस्कृतीतील फक्त अश्लीलताच दिसते. त्यांना जर आपल्या भारतीय संस्कृतीबद्द्ल आदर वाटत असेल तर आपणही त्यांच्या संस्कृतीचा आदरच करायला हवा !

    अजय – आता कसं बोललास ? प्रत्येक संस्कृती ही आपल्या जागी बरोबरच असते म्हणून आपली संस्कृती सोडून दूसर्‍या संस्कृतीचा स्विकार करणे योग्य होत नाही पाश्चात्य संस्कृतीचा आदर करणे आणि तिचा स्विकार करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. दुसर्‍या संस्कृतीतील काही गोष्टीचा आपण स्विकार जरी केला तरी तो डोळसपणे करायला हवा !

    विजय – हो ! तू अगदी योग्य तेच बोललास , चल आता निघूया मला घरी जायला उशिर झालाय !

    ( दोघेही टेबलावरून उटून हॉटेलच्या बाहेर पडतात.)

    -- निलेश बामणे

  • शिल्पा

    त्या दिवशी सकाळी - सकाळी कोणीतरी गेल्याची बातमी कानावर आली. ती कुजबुज ऐकण्यासाठी मी झोपेतच माझे कान टवकारले असता दोन दिवसापुर्वी शिल्पा गेल्याची बातमी कळ्ली. शिल्पा कोणी लहान मुलगी नव्ह्ती पंच्चविशीतील एक विवाहित स्त्री होती. आमच्या चाळीतील लहान- थोर सारेच तिला प्रेमाने शिल्पा या एकेरी नावानेच हाक मारत. मी व्यक्तीशः तिला फारसा ओळखतही नव्ह्तो कारण खासकरून अनोळ्खी व्यक्तीशी मी फारसा स्वतःहून ओळ्ख काढून संवाद साधन्याचा प्रयत्न करीत नाही. तिची आमची ओळख झाली कारण सध्या आंम्ही राहण्यासाठी या चाळीतील जे घर भाडयाने घेतले आहे. त्या घरात ती जवळ- जवळ चार वर्षे भाड्याने राहात होती. पण तिच्या घरमालकाने हे घर दुरूस्त करून जास्त भाड्याच्या आशीने आंम्हाला भाड्याने दिले होते. त्यामुळे तिला नाईलाजाने बाजुच्या चाळीत दुसरे घर भाड्याने घ्यावे लागले होते. तरी मला व्यक्तीशः तिच्या बोलण्यावरून तिचा आम्ही सध्या राहात असलेल्या घरात जीव गुंतला असल्याचे मला बर्यावचदा जाणवले होते. माझ्या दृष्टीने ती एक भोळ्सट स्त्री होती. का कोणास जाणे लोकांप्रती अती सहानुभूती, प्रेम दाखविणार्याय आणि स्वतःपेक्षा ही इतरांची काळजी अधिक वाहणार्याए स्त्रियां माझ्या डोक्यात जातात. तश्या दोन स्त्रिया आमच्याच घरात होत्या म्ह्णून असेल कदाचित एक आमची आई आणि दुसरी आमची लाडकी बहिण. त्याबाबतीत मी थोडा कोडगा आणि कोरडा होतो. माझ्या ठायी मुर्खपणाला अजिबात थारा नव्हता. आमच्या मालकीच्या घराच्या जागी इमारत होत असल्यामुळे आमच्यावर कधी नव्हे ती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती. पुर्वी कधी ही भाड्याच्या घरात न राहिलेल्या मला व्यक्तीशः भड्याच्या घरात राहण ही एक प्रकारची शिक्षाच वाटत होती. आमचे जुने घर सोडतानाच मी मनाशी पक्क ठरवून टाकलं होतं दुसर्याा जागी राहायला गेल्यावर तेथे कोणत्याही प्रकारचे नवे बंध निर्माण करायचे नाहीत आणि मी ठरविल्याप्रमाणे ते केले ही ! म्ह्णूनच मी शिल्पाकडे तटस्थपणे पाहू शकलो, तिचं निरीक्षण करू शकलो. काही महिन्यापुर्वी मी जेंव्हा शिल्पाला पहिल्यांदा पाहिले तेंव्हा ती तिसर्यांलदा गरोदर होती. तिची दुसरी मुलगी जन्मा नंतर महिन्याभरातच वारली होती. शिल्पाच निरीक्षण करतेवेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली जगाच्या दृष्टीने ती भोळ्सट, स्वछंदी जीवन जगणारी एक अल्लड बाई असली तरी माझ्या दृष्टीने नाईलाजाने परिस्थितीपासून, समस्यांपासून पळणारी, जगण्यात फारसा रस नसलेली आणि स्वतःबाबत अत्यंत बेफीकीर झालली किंचित भोळसट झालेली स्त्री होती. जी जगाला आपण किती सुखी आहोत हे दाखविण्याचा जीवाच्या अकांताने प्रयत्न करू पाहत होती.

    शिल्पा गेल्याची बातमी झाली होती पण ही बातमी आमच्या चाळीपुरती मर्यादित होती. तिच्या जाण्याची दखल कोणी गंभीरपणे घेतल्याची शक्यता तशी कमीच होती कारण सर्वांना ती लक्षात होती कारण त्यांनी सांगितलेली कामे तिने जरा ही का ! कू ! न करता निमूटपणे केलेली होती म्ह्णून. शिल्पा सारख्या स्त्रिया आपल्या देशात रोज हजारोच्या संख्येने मरत असतात पण त्यांची दखल समाज कधीच घेत नसतो. शिल्पा अचानक कशी गेली ? काहींच्या मते तिच्या जाण्याला तिचा गाढवपणा आणि हेकेखोर स्वभाव कारणीभूत होता. काही दिवसापूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दवाखान्यातून घरी आल्या आल्या ती थंडीच्या दिवसात थंड पाण्यात बादलीभर कपडे घेऊन धुवायला बसली होती घरात सासू असतानाही. सासूचा तिच्यावर फार जीव नसावा आणि नवर्याथलाही तिची फिकर नसावी. त्यानंतर तिला ताप भरला तो वाढतच गेला. त्यानंतर तिला दवाखान्यात भरती करताच तासाभरात तिचा जीव गेला होता. तिच्या दुसर्यात मुलीला तिच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला होता कारण ती मुलगीला एकटीला घरात रडत सोडून बाहेर भटकायला जात असे. हे लोकांचे निरीक्षण पण वरवरचे माझा जितका अभ्यास आहे त्यानुसार ती त्या मुलीच्या दुधाची व स्वतःच्या लहान मुलाच्या आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याची व्यवस्था नसल्यामुळे ती करण्यासाठी भटकत असावी. तिचा नवरा कामाला होता पण त्याला वेळच्या वेळी पगार मिळत नव्हता. जेंव्हा मिळायचा तेंव्हा तो घरभाडे आणि उसणवारी देण्यातच खर्च व्हायचा त्यामुळे त्यांना एका मुलाचेच हट्ट पुरविणे शक्य नसताना तीच्यावर आणखी दोन बाळंतपणं लादण्यात आली होती कदाचित तिच्या मनाविरूध्द ! तिला सारचं कळत होत कारण ती बर्या पैकी शिकलेली होती पण परिस्थितीची गुलाम झाल्यामुळे आणि आपल्या हातात करण्यासारखे काहीच नसल्यामुळे परिस्थितासमोर तिने अक्षरशः गुडगे टेकले होते. त्यानंतर आपण कसे दिसतो, कसे वागतो, कसे राहतो आणि आपल्या मागे लोक आपल्या बद्दल काय चर्चा करतात या बाबत ती बेफीकीर झाली होती. अत्यंत हुशार असतानाही आपण भोळसट आहोत हे जगाला पटवून देण्यात ती यशस्वी झाली होती. दररोज लोकांशी खोट बोलण्याचा हातात दमडी नसताना लाखाच्या बडाया मारण्याचा आणि पोटात अन्नाचा कण ही नसताना ढेकर देण्याचा तिला कंटाळा आला होता. कदाचित तिला या सर्वांतून मुक्ती हवी होती पण नैसर्गिक...

    शिल्पा गेली नव्ह्ती तर आपल्या समाज व्यवस्थेने तिचा बळी घेतला होता. आपल्या चांगल्या शिकलेल्या मुलीचा तिच्या पालकांनी स्वतःच मुंबईला घरदार नसणार्या् अल्पशिक्षीत मुलाशी फक्त हुंडा दयायला नको म्ह्णून विवाह करून दिला होता, ज्याने स्वतःच्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना एका मुलाला जन्म देण्याचा गाढवपणा केला होता. त्यात भर म्ह्णून त्याने बायकोला नोकरी करण्याची परवानगी ही दिली नव्हती. शिल्पाने ही स्वतः स्वतःच जीवनमान सुधारण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी स्वतःला परिस्थितीच्या स्वाधीन केल होत कारण तिला नवर्याशच्या विरोधात जायच नव्हतं. शिल्पाने आमच्या चाळीत आपल्या गोड स्वभावाने लोकांना त्यांच्या छोट्या – मोठ्या कामात मदत करून त्यांची मने जिंकली होती. त्यामुळे प्रसंगी पोठाची खळगी भरण्यासाठी ती त्यांच्याकडे हक्कने हात पसरू शकत होती. तिचे ते हात पसरणे मला तिच्यासोबतच्या पहिल्या भेटीतच खटकले होते. तिच्या नवर्या चे गावी मालकीचे घर होते त्यामुळे स्वतःसोबत तिची फरफट करण्याची त्याला काही गरजच नव्ह्ती. पण तो हे करीत होता कारण काय तर त्याला दोन वेळच गरम – गरम जेवन मिळावं म्हणून पण त्याची व्यवस्था ही प्रसंगी लोकांपुढे हात पसरून तिलाच करावी लागत होती. पण तरीही शिल्पा प्रचंड आशावादी होती त्याचे मला कौतुक वाटे कारण हा आशावाद तिच्यात तिच्या शिक्षणामुळे आला होता. पण तरी ही तिला जगण्यात फारसा रस राहिला नव्हता हे सत्य होत. तिच्या जाण्याला तो साधा ताप कारणीभूत नक्कीच नव्हता. ती गरोदर असताना तिच्या तब्बेतीकडे केले गेलेले प्रचंड दुर्लक्ष त्याला कारणीभूत होते. आजही आपल्या समाजात पुरूषांकडून स्त्रियांच्या तब्बेती बाबत दाखविला जाणारा निष्काळजीपणा ही शिल्पाच्याच नव्हे तर शिल्पासारख्या हजारो स्त्रियांच्या अकाली जाण्याला कारणीभूत असतो. शिल्पासारख्या स्त्रियांची होणारी कुचंबना समाजाला दिसत असते, ती दूर करण्यास समाज सक्षम ही असतो पण डोळ्यावर गेंडयाच्या चामडीचे झापडं घेतलेला समाज घोड्यासारखा समोरच पाहत राहतो. सतत चार वर्षे अगदी निमुठपणे समाजाच ओझ वाहणार्याच शिल्पाच्या जाण्याची समाजाने काय दखल घेतली तर एका चाळीतील दहा खोळ्यात तिच्या जाण्यावर दहा मिनिटे चर्चा झाली आणि त्यानंतर दहा - पंदरा दिवस निवांत गप्पा मारताना तिच्या जाण्याच्या कारणांवर पोकळ चर्चा झाल्या त्या चर्चा ही काळांतराने त्या चाळीतील हवेत विरगळून गेल्या, आता तर शिल्पाच्या आठवणीही त्या चाळीतील हवेत विरगळून नष्ट झालेल्या आहेत आणि अनेक शिल्पा जशा या पुर्वी समाज मनाच्या विस्मृतीत गेल्या होत्या तशी आणखी एक शिल्पा विस्मृतीत गेली....

    लेखक – निलेश बामणे.

  • अशोक आणि अमिन

    रेहमानपाडा हा मुंबईतला मिश्र लोकवस्तीचा भाग.रेल्वेलाईनच्या कडेकडेने अजगरासारखा पसरलेला.

    नोकरी मिळेल,रोजगार मिळेल,पोटाची टिचभर खळगी भरेल ह्या आशेने भारतातल्या अनेक भागातून कामसू, जिद्दी माणसं मुंबईत येतात. आणि मग, अगदी अडचणीच्या ठिकाणी पण झोपडी बांधून राहतात.दिवस-रात्र कष्ट उपसतात. थकल्यावर अंग टाकायला घराचा सहारा घेतात. रेहमानपाडा पण असाच वाढत गेलेला.

    इथे अनेक वाकडे तिकडे गल्लीबोळ.त्यात दाटीवाटीने झोपड्या,बैठी घरं, दवाखाने, दुकानं,पानाच्या-चहाच्या टपऱ्या,वेगवेगळी देवळं,गोदामं आणि छोटे-छोटे कारखाने.त्यातूनच वाहणारी उघडी गटारं. घरात, दुकानात जायचं म्हणजे,गटार ओलांडूनच जावं लागतं. रेहमानपाड्यात एका कोपऱ्यात एका बाजूला एक मोठी कचरा कुंडी आहे.त्याच्या बाजूलाच एका रांगेत,सतरा सार्वजनिक संडास.विशेषत: बायका, मुलं, आजारी आणि वृध्द माणसं ह्याचा वापर करतात. पुरुषमंडळी दिवस उजाडण्या आधीच रेल्वे लाईनचा आसरा घेतात.

    रेहमानपाड्यात हिंदू, मुसलमान, बौध्द, शीख, मल्याळी, कानडी, बंगाली असली अनेक जाती, जमाती, धर्माची विविध माणसं एकत्र राहातात. अधे-मधे छोटी मोठी भांडणं होतात, पाण्यावरून तंटे होतात,पण ते तेव्हढ्यापूरतंच. दुसऱ्या दिवशी पुन्हा सारे एक!. रेहमानपाडा म्हणजे कष्टकरी लोकांचं एक विशाल कुटूंबच आहे! त्यांच्यात एकोपा आहे. त्यांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि म्हणूनच ते गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. आपला धर्म आणि आपला देव आपापल्या घरातच ठेवतात.

    ही गोष्ट आहे 1993 सालातली.

    मुंबईत पेटलेल्या दंगली नुकत्याच थंडावल्या होत्या.
    रेहमान पाड्यातील सर्वधर्मीयांनी मिळून,एक शांतता समिती बनविली होती. त्यामुळे रेहमानपाड्यात अजून तरी काही अनुचित प्रकार घडला नव्हता. पण तरीही सगळेच घाबरलेले. मनातून धास्तावलेले.

    रेल्वे लाईनच्या पलीकडे जी वस्ती होती,त्याठिकाणी विशिष्ट जमातीची माणसे अधिक प्रमाणात राहात होती. आणि तिथे ही शांतता होती.काही गडबड नव्हती.
    इकडच्या वस्तीत रोज निरनिराळ्या अफवा ऐकू येत. कधी,'काही माणसं आपल्या वस्तीवर हल्ला करणार.' तर कधी,'समोरच्या म्हणजे रेल्वे लाईन पलीकडच्या वस्तीतली माणसं,आपल्या घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकून आपली घरे जाळून टाकणार. आपली वस्ती बेचिराख करणार!' काही अफवा ह्याहूनही भयंकर!!
    त्यामुळे,कधीही काहीही होईल ही प्रत्येकालाच धास्ती!

    मुलांचा आरडाओरडा, दंगामस्ती, खेळणं, बायकांची भांडणं, चहा टपरीवर सदासर्वकाळ चालणारा कल्ला, गोदामातील-कारखान्यातील धावपळ हे सगळं आपोआप बंद झालेलं.

    जो तो भेदरलेला. जबरदस्त घाबरलेला. संध्याकाळी सहा वाजले की दुकानं, कारखाने,चहाच्या टपऱ्या बंद होत. सर्वजण आपापल्या घरात दारं खिडक्या बंद करून चिडीचूप! संध्याकाळी सहा वाजताच सगळीकडे शांतता! रस्त्यावर शुकशुकाट. जणू काही,संचारबंदीच जारी केली आहे. घराघरात प्रचंड तणाव आणि रस्त्यावर भितीदायक सन्नाटा!!

    ह्याच दिवसातली ही गोष्ट आहे.

    रात्रीची वेळ होती.
    आकाश ढगाळ झालं होतं. गार झोंबरा वारा भणाणत होता.
    रेल्वे लाईन जवळच्या पिंपळाची सळसळ ऐकू येत होती. रस्त्यावर सामसूम होती. म्युनसिपालटीच्या दिव्यातून फिकट पिवळा प्रकाश झिरपत होता.सगळीकडे भयाण शांतता; आणि ही शांतता कापत जाणारा, धडाडत जाणाऱ्या रेल्वेचा आवाज. त्याचवेळी एका घरातले दिवे बंद झाले.

    दार उघडलं.
    एक मुलगा घरातून बाहेर आला.
    दाराला कुलूप लावलं. किल्ली खिशात टाकली. अंधारातून लपतछपत, घरांचा आडोसा घेत, तो मुलगा, कचरा कुंडीच्या दिशेने निघाला.

    चालताना पायाचा आवाज होऊ नये म्हणून तो झपाझप चवड्यावर चालत होता. उड्या मारत, उघडी गटारं ओलांडत होता. चार-पाच वळणं घेत, तो एका घराजवळ आला.
    त्याने दारावर हलकेच तीन टिचक्या मारल्या. हळू आवाजात त्याने हाक मारली, “अम्मीऽऽऽऽ,अम्मीऽऽ”

    अमिन आणि अमिनची आई अम्मी,अशोकची वाटच पाहात होते.
    दार उघडत अम्मी म्हणाली, “आ,अशोक अंदर आ. अशोक बेटे खाना खाया?”
    अशोकने फक्त होकारार्थी मान हलवली.
    अमिनच्या खिडकीतून ती कचरा कुंडी आणि ते संडास दिसायचे. दिवे बंद करुन, अशोक आणि अमिन खिडकीला डोळे लावून बसले.
    अम्मी अंधारात जपमाळ घेऊन बसली. अशोक आणि अमिन आता घरातच असल्याने ती आता निश्चिंत होती.

    अमिन आणि अशोक लहानपणापासून एकाच वर्गात होते.
    वर्गातसुध्दा एकाच बाकावर बसायचे. मधल्यासुटीत दोघे मिळून एकत्र डबा खायचे. एकच डबा खायचे! दोघे एकमेकांचे खास दोस्त!
    दोघांना एकमेकाशिवाय अजिबात करमत नसे. जिथे अशोक तिथे अमिन असे!
    अशोकचे आई वडील कोकणात असत. अशोक त्याच्या काकांकडे राही. घरात अशोक आणि काका, दोघंच. काका सकाळी गिरणीत कामाला जात. संध्याकाळी अशोक काकांना स्वयंपाक करायला मदत करी. काकांना रात्रपाळी असली की, अशोक अमिनकडे झोपायला जाई.
    अशोकचा मधल्यावेळचा डबा अमिनच आणत असे. अशोकचा अभ्यास, त्याचं आजारपण,त्याला काय हवं? काय नको? हे सुध्दा अम्मीच पाहात असे.
    अम्मी नेहमी म्हणत असे, “मुझे ये दो प्यारे बच्चे है अशोक और अमिन! अशोक मेरा सबसे लाडला है!!”

    उन्हाळ्याच्या सुटीत अमिन, अशोक बरोबर कोकणात जाई.
    त्यावेळी, अशोकची आई, अमिनची 'मां'होत असे, अमिनची अम्मी होत असे! ती कौतुकाने अमिनची प्रत्येक गोष्ट ऐकायची. त्याचे भारी लाड करायची.
    महिनाभर अशोक आणि अमिन मजा करत.
    सकाळी नदीत डुंबणं, दिवसभर भटकणं, खेळणं,गोष्टींची पुस्तकं वाचणं, आंबे-फणस मटकावणं, झाडावर चढून जांभळे खाणं असा कार्यक्रम.
    अशोकच्या घरी अमिनची चंगळ असे.
    सुटी संपूच नये असं त्यांना वाटे.

    अमिन आणि अशोक खिडकीतून पाहून-पाहून कंटाळले.
    अंधारात पाहायचं म्हणजे,डोळे ताणून पाहावं लागतं. खूप सावध असावं लागतं. अगदी बारीक सारीक आवाज सुध्दा कानाने टिपावे लागतात.
    पण कुठेच काही घडेना.
    अमिन वैतागून म्हणाला, “अशोक कुठे रे काय?तुला उगाच संशय.
    तस्सं काही नसणारंच रे.”
    “नही यार.माझा अंदाज चुकणार नाही.” अमिनच्या खांद्यावर हात ठेवत,अशोक हलकेच पुढे बोलू लागला; “अरे कालपण माझ्या काकांना रात्रपाळी होती. काल काकांनी कामावर जाताना पाहिलं की,'चार-पाच माणसं खांद्यावर पोती घेऊन कचरा कुंडीत टाकत होती.' एव्हढ्या रात्री अचानक इतका कचरा कुठून आला? म्हणजे, नक्कीच तो कचरा नसणार...!...”
    अमिन पुढे सरकत भीत-भीत म्हणाला, “हाय अल्ला! मग काय असेल त्यात? काही भयानक तर नसेल ना?
    आणि हे तुला सगळं कधी समजलं?
    कुणी सांगितलं?
    तो फिर मैं क्या करू?”
    “आधी माझं ऐक सारं. आज सकाळी मला काकांनी सांगितलं. हे सगळं ऐकल्यावर मला संशय आला. मी सकाळी उगाचच कचरा कुंडी जवळ फेरी मारली. तर तिथे फक्त कचराच! पण...........” अशोक बोलता-बोलता गप्प झाला.
    अमिन अशोक कडे रोखून पाहात म्हणाला, “पण?....पण... काय अशोक? कुछ दगा फटका तर नाही ना?”
    ठअजून तरी नक्की सांगता येत नाही.
    पण,सकाळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. “आज शेवटच्या तीन संडासांना कुलुपं लावली होती. आणि त्याच्या बाहेर दोन अनोळखी माणसं पाहारा करत बसली होती.”
    मी कचरा कुंडी जवळ उगाचच घुटमळतो आहे हे लक्षात आल्यावर, त्यातल्या एकाने मला दटावलं. उगाचच आवाज चढवून झापलं. त्यामुळे अमिन, माझी खात्रीच झालीय की, आज रात्री काही तरी होणार!!
    काहीतरी भयानक घटना घडणार!
    आपण अतिशय सावध राहायला हवं.ठ
    अशोकं बोलणं ऐकून,अमिन कापऱ्या आवाजात म्हणाला, “आज....आज.. अब्बाजान असते तर बरं झालं असतं रे! पण ते तर चार दिवसापूर्वीच लखनौला गेलेत. तिकडे दादाजी खूप आजारी आहेत ना.
    आता...आात आपण काय करायचं रे अशोक? मला थोडीशी भीती वाटतेय.. आणि मला काही सूचत पण नाहिए रे.”
    अमिनला समजावत अशोक म्हणाला, “घाबरू नकोस. आत्ता मी जे तुला सांगिन, ते तू अम्मीला सांगू नकोस. मला भिती वाटते, एखादवेळेस अम्मी घाबरेल.
    आणि एक लक्षात ठेव, “तू एकटा नाहीस, आपण दोघे आहोत! आपण दोघे मिळून कुठलही कठीण काम सहजी करू शकतो!”
    तोच, कचरा कुंडी जवळ त्यांना काही हालचाल दिसू लागली.
    काळे कपडे घातलेली ती सात-आठ माणसं होती. काहींनी तोंडावर रुमाल बांधले होते.
    दोघांनी कुंडीतला कचरा खणायला सुरुवात केली.
    थोड्याच वेळात त्यांनी कुंडीतून चार पोती आणि दोन पेट्या बाहेर काढल्या. त्याचवेळी अंधारातून लपत छपत आणखी चार माणसं आली. त्यांच्या खांद्यावर जड पोती होती.
    एकाने झटकन पुढे होऊन,शेवटून तिसऱ्या संडासाचे कुलुप उघडले.
    ती जड पोती संडासात ठेवली. पुन्हा दाराला कुलुप लावले.
    मग एकाने सावकाश पेटी उघडली.
    दुसऱ्याने बॅटरी पेटवली.
    चार दिशांना चार माणसे पाळत ठेवून होती.
    बाकीचे सारे पेटीच्या सभोवार उभे राहिले.
    बॅटरीच्या प्रकाशात काहीतरी खुडबूड-कूडबूड सुरू झाले. बाटलीवर बाटली आपटल्याचे आवाज अधून मधून ऐकू येऊ लागले. फनेल घेऊन बाटलीत काहीतरी भरलं जातंय, इतकंच कळत होतं.
    इतक्यात,बाटली फुटल्याचा खळकन आवाज आला!
    आणि त्यापाठोपाठ फाडकन कानफटात मारल्याचा आवाज घुमला!!
    क्षणभर काम थांबलं.
    लागोपाठच्या ह्या दोन खतरनाक आवाजांनी,खिडकीतून लपून पाहणाऱ्या 'त्या दोघांच्या' अंगावर भितीने सरसरून काटा आला.
    ते दोघे खिडकीपासून क्षणभर लांब झाले. त्यांनी दचकून अम्मीकडे पाहिलं.
    पण अम्मी एकाग्रपणे जपमाळ घेऊन जप करत होती.

    थांबलेलं काम पुन्हा सुरू झालं.
    अशोक आणि अमिनला त्या माणसांचे चेहरे दिसत नव्हते.ती माणसं ओळखीची आहेत की अनोळखी आहेत हे पण समजत नव्हतं.
    पण ते सगळे गुंड आहेत, मवाली आहेत आणि त्यांचं आता जे काही चाललं आहे ते भयानक आहे,हे मात्र त्या दोघांना समजत होतं.
    ह्यामुळे फक्त आपल्यालाच नव्हे तर,साऱ्या रेहमानपाड्यालाच धोका आहे,हे ही त्यांनी ओळखलं होतं.
    आता काहीतरी करायलाच हवं होतं!!

    अमिन अशोकला कही बोलणार, तोच....... अशोकने अमिनचा हात घट्ट धरला आणि कुजबूजला, “मला कळतंय सारं! आपण बाहेर जाऊन पोलिसांना ह्याची खबर देऊ.
    आपण हा रेहमानपाडा वाचवलाच पाहिजे!
    ह्या गुंडांना धडा शिकवलाच पाहिजे!!”
    “खरंय तुझं! पण.... एव्हढ्या रात्री, अम्मी आपल्याला घराबाहेर एकटं पाठवणार नाही.
    आणि....
    आपल्याला का जायचंय त्याचं खरं कारण आपण अम्मीला सांगू पण शकत नाही.
    बाहेर जाण्यासाठी काहीतरी आयडीया करावीच लागेल. मुझे जरा सोचने दो यार. “अमिन भराभर एव्हढं बोलला. पण केव्हाच त्याच्या डोक्यात विचार चक्र फिरू लागली होती.
    अशोक पण आपलं डोकं चालवत होता. पण छे! अम्मीला पटेल असं कारण त्याला काहीकेल्या सूचत नव्हतं.तो अगदी अस्वस्थ झाला होता.
    एकदा खिडकीतून बाहेर तर एकदा अमिनकडे तो हताशपणे पाहात होता. हाताच्या मुठी वळत तो रागाने थरतरत होता.
    तोच अमिन म्हणाला, “जय भारत! मिळाली आयडीया!!
    अरे यार,आपण अम्मीला सांगूया की,तू घर बंद करून येताना,घरातले दिवे बंद करायला विसरला आहेस. आपण दोघे जाऊ आणि दिवे बंद करून पटकन परत येऊ. क्या...? कैसी है ये थाप..?”
    “थाप तो अच्छी ही है! लेकीन अमिन, आपल्याला अम्मीशी खोटं बोलायला लागणार रे. मला त्याचं वाईट वाटतंय.
    आपण खोटं बोललो, हे कळल्यावर तिला काय वाटेल?
    कुछ दुसरी आयडीया नही क्या? तुम जरा फिरसे सोचो तो.....?” अशोकने असं म्हणताच अमिन सावरला.
    अशोककडे रोखून पाहात, अत्यंत विश्वासाने अमिन म्हणाला, “नही अशोक! अब वेळ खूप कमी आहे.
    आता थोडा जरी उशीर झाला, तरी हा रेहमानपाडा पेटेल.
    इथे दंगल उसळेल.
    माणसांची कत्तल होईल.
    गरीबांची घरं बेचिराख होतील.
    आपण काही अम्मीला फसवत नाही. आपण आल्यावर तिला नीट समजावून सांगू की.
    तिची माफी ही मागू.
    पण अभी........
    अभी हम मजबूर है अशोक!!
    आता एक क्षण ही वाया घालवून चालणार नाही. प्लीज मेरी बात मान जाओ अशोक.”
    अशोकने मान हलवली. अम्मीला थाप मारून अमिन आणि अशोक निघाले.

    “नीट जा. उगाच इकडे तिकडे जाऊ नका. मला काळजी करायला लावू नका. झटकन जा,पटकन या.” असं त्यांना पुन्हा-पुन्हा बजावत अम्मीने अशोकला बॅटरी दिली.
    बाहेर परिस्थिती काय आहे? कितीशी गंभीर आहे? ह्याची नीटशी कल्पना तिला नव्हती. “आता दंगल थांबली आहे. वातावरण निवळले आहे; असाच तिचा समज होता.
    नाहीतर अम्मीने ह्या दोघांना असं एकटं पाठवलंच नसतं. ती स्वत: त्या दोघांबरोबर गेली असती. अम्मी काही डरपोक नव्हती. अम्मी मोठी धीराची बाई होती!

    अलगदपणे दार उघडून अमिन अशोक बाहेर आले. दार बंद केलं.
    पावलांचा आवाज न करता,सावकाश चालत, त्यांनी दोन गटारं ओलांडली.
    एका घराजवळ ते आडोशाला थांबले.
    त्यावेळी भयाण शांतता त्रासदायक वाटत होती.
    अशोक अमिनच्या कानात म्हणाला, “हे बघ अमिन,तू इथेच थांब. इथे म्हणजे, ह्या भिंतीला चिकटूनच उभा राहा. अजिबात हालचाल करायची नाहीस तू.
    हे गुंडलोक त्या मोठ्या पेट्या,पोती कुठं ठेवतात? हे तू पाहायचंस. त्यांचं बोलणं ऐकू आलं तर, कान देऊन ऐकायचं,लक्षात ठेवायचं. हे गुंड जर कुठे निघाले, तर त्यांचा हळूच पाठलाग करायचा. आणि जर... ...
    त्या गुंडांनी, आत्ताच काही घातक प्रकार करायला, हिंसक गोष्टी करायला, आगी लावायला सुरूवात केली........
    तर...... ही बॅटरी घेऊन तू दगडी भिंती जवळ सरळ यायचंस. आणि पोलीस चौकीच्या दिशेने, बॅटरी सतत चालू-बंद करून, तू मला सिग्नल द्यायचा!
    मी आता सरळ स्स्त्याने जाणार नाही.
    बाजूची गटारं ओलांडून मी त्या दगडी भिंतीजवळ जाईन. भिंतीवर चढून रेल्वे लाईनमधे उडी मारीन. तिथून धावतच, रेल्वे लाईन क्रॉस करून समोरच्या पोलीस चौकीत जाईन.
    तू दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ इथे थांबू नकोस. अतिशय सावध राहा. उगाच हालचाल करू नकोस.
    त्या गुंडांनी चुकून जरी तुला पाहिलं, तरी ते तुला जीवंत सोडणार नाहीत!!
    माझी वाट पाहू नकोस. माझ्या अम्मीला सांभाळ.
    जगलोच तर पुन्हा भेटू.
    खुदा हाफिज!”
    अमिनला काही एक बोलू न देता, अशोकने त्याच्या डोळ्यातलं पाणी टिपलं. त्याने प्रेमाने, मायेने त्याचा हात क्षणभर गच्च धरला.
    आणि क्षणांत, दगडी भिंतीच्या दिशेने अशोक सुसाट धावत सुटला.
    काळोखात मिसळून गेला. दिसेनासा झाला.

    अमिन रडवेला होऊन तसाच भिंतीजवळ उभा होता.
    अशोकचं बोलणं ऐकून तो सुन्नं झाला होता!
    गुंडांचं काम जोरात सुरू होतं.
    बाटलीत पेट्रोल भरुन,बुचात वात बसवून त्यांनी पेट्रोल बॉम्ब तयार केले.
    काचेच्या नळकांड्यात अॅसीड आणि इतर विषारी रसायनं ओतून, त्यांनी अॅसीड बॉम्ब तयार केले.
    हे बॉम्ब त्यांनी व्यवस्थित पेटीत ठेवले.
    एका पोत्यात अत्याधुनिक स्वयंचलित रायफली होत्या.
    दोघा गुंडांनी दोन रायफली खांद्यावर लटकवल्या. काहींच्या हातात तलवारी आणि चॉपर होते.
    अॅसीड बॉम्ब तयार करून ते पेटीत व्यवस्थित ठेवण्याचे काम,जोरात सुरू होते. अॅसीड आणि पेट्रोल मुळे तयार झालेला विचित्र चरचरीत-जळजळीत वास सगळीकडे पसरला होता.
    अमिन श्वास रोखून हे सारं पाहात होता. अशोकचं बोलणं त्याच्या डोक्यात घुमत होतं. अम्मीची काळजी वाटत होती.
    त्याची छाती धडधडत होती.
    भितीने त्याच्या पोटात गोळा आला होता.
    पाय लटलटू लागले होते.
    नाकाला झोंबणाऱ्या अॅसीडच्या वासाने तो अस्वस्थ झाला.
    त्याच्या घशाला कोरड पडली.
    आवंढा गिळताना त्रास होऊ लागला.
    त्याचे तळहात गारठले. घामाने चिप्प भिजले आणि.............
    आणि जे होऊ नये तेच झाले!!
    अमिनच्या हातातली बॅटरी धपकन जमिनीवर पडली.
    बॅटरी सुरू झाली...!
    आणि.....
    बॅटरीचा झगझगीत प्रकाश झोत गुंडांच्या अंगावर पडला!!!

    क्षणभर गुंड घाबरले!

    त्यांना वाटलं पोलीसच आले.
    त्यांनी वळून पाहिलं तर...... अमिन थरथरत भिंती जवळ उभा होता.
    अमिनने प्रसंगावधान राखले. त्याने भीत-भीत डाव्या हाताची मूठ बंद करून, करंगळी वर केली. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता.
    तरीपण एका गुंडाने त्याला दरडावले.
    हातातल्या तलवारीनेच त्याने अमिनला घरी जाण्याची खूण केली.
    बॅटरीच्या झोतात,ती तळपणारी तलवार आणि तोंडावर बांधलेल्या रुमालामागून डोकावणारे त्या गुंडाचे तांबरलेले डोळे पाहून अमिन भीतीने गारठलाच.
    बॅटरी बंद करून अमिन निमूटपणे घरी गेला.

    अम्मी घरी वाटच पाहात होती. अमिन एकटाच आलेला पाहून,अम्मीचे डोळे मोठे झाले. 'अशोक किधर है?' असं तिने खुणेनेच विचारलं.
    अम्मीला काय सांगावं हेच त्याला सूचेना.
    भितीने त्याची बोबडी वळली. अमिन काही बोलूच शकला नाही.
    त्याने तोंड फिरवलं आणि उगाचच हवेत हात फिरवला.
    अम्मीला निटसं काही कळलंच नाही. अमिन घाबरलाय हे ही तिला समजलं नाही.
    अमिनने बॅटरी गादीवर फेकली आणि तो अम्मीला बिलगला.
    अम्मी अमिनला थोपटत विचार करू लागली.
    अशोक येण्याचा कानोसा घेऊ लागली.

    गुंडांचं खूपसं काम आटोपलं होतं.
    आता त्यांना, त्यातल्या दोन पेट्या आणि काही हत्यारे घेऊन, रेल्वे लाईनच्या पलीकडे असणाऱ्या वस्तीवर हल्ला करण्यासाठी जायचं होतं.
    पेट्रोल बॉम्ब फेकून आगी लावणं आणि अॅसिड बॉम्बने माणसांना जखमी करणं, असा त्यांचा बेत होता.

    ते पूर्ण तयारीनिशी, सावधपणे दगडी भिंतीच्या दिशेने सरकत होते.
    काही जण मागे राहून, हातात तलवारी, चॅापर घेऊन पहारा करत होते.
    काहीजण बंद संडासाच्या पायरीवर बसून होते.
    समोरच्या वस्तीत आगी लागल्या की पुढच्या गोष्टींचा पुरवठा करण्याची जवाबदारी ह्यांच्यावर होती.

    अशोक पोलीस चौकीत गेला तेव्हा इन्स्पेक्टर प्रधान तिथे होते. त्यांनी अशोकचं बोलणं काळजीपूर्वक ऐकलं.
    अशोकचं धाडस आणि धडाडी पाहून इन्स.प्रधान क्षणभर चकित झाले!
    इन्स.प्रधानांनी ताबडतोब राज्य राखीव पोलीस दलाशी संपर्क साधला. आणि...“आतापासून फक्त पंधरा मिनिटात आम्ही तेथे पोहोचतो. संपूर्ण रेहमानपाड्याला आम्ही वेढा घालतो.
    आमच्या सोबत आठशे बंदूकधारी जवान आहेत. ओव्हर.” असा संदेश त्यांना बिनतारी संदेशवाहकावर मिळाला.
    त्याबरोबर इन्स.प्रधान जीप मधे बसले.
    एक हवालदार अशोकला शोधू लागला.
    'अम्मी काळजी करतेय, मला गेलंच पाहिजे' असं म्हणत एक मुलगा आत्ताच पळाला, असं दारावरचा हवालदार म्हणाला.
    इन्सपेक्टर प्रधानांनी सोबत चार हवालदार घेतले.
    अंधार कापत जीप रेहमानपाड्याच्या दिशेने सुसाट निघाली.

    इन्स.प्रधान विचार करू लागले की, “अशोक तसा हुशार चुणचुणीत मुलगा वाटला. पण मग तो, खबर देऊन पळाला का?
    अम्मी काळजी करेल म्हणजे काय?
    ही अम्मी म्हणजे अमिनची आई असू शकेल का?
    अशोकने सांगितल्याप्रमाणे, अमिन अजून तिथेच उभा असेल? की त्याच्यावरच हल्ला झाला असेल?
    आपण राज्य राखीव दलाशी संपर्क तर साधला आहेच,
    पण......... ही खबरच जर खोटी निघाली तर...?”
    असे एक ना अनेक प्रश्न इन्स.प्रधानांच्या डोक्यात थैमान घालू लागले.
    रेहमानपाड्यापासून थोड्या अंतरावर जीप थांबली.
    काळोखातून लपत-छपत इन्स.प्रधान आणि हवालदार कचरा कुंडीच्या जवळ आले. तिथेच अंधारात आडोशाला दबा धरून बसले.
    इन्स.प्रधान अस्वस्थपणे हातातल्या पिस्तुलाशी चाळा करत होते.पंधरा मिनिटात येणाऱ्या मदतीची ते वाट पाहात होते.
    वेळ संपता संपत नव्हता.

    पोलीसांना गुंगारा देऊन, अशोक पोलीस चौकीतून पळाला. तो दगडी भिंतीच्या दिशेने धावत निघाला. पोलीसांनी अशोकला शोधण्याचा प्रयत्न केला,पण व्यर्थ!
    अंधारात एका दगडावर अशोक चांगलाच ठेचकाळला.
    त्याच्या उजव्या पायाच्या ढोपराला सणकून मार लागला. मस्तकात कळ गेली. ढोपर खरचटलं. रक्त भळभळू लागलं.
    त्यावेळी डाव्या पायावर तोल सावरण्याच्या प्रयत्नात, डावा पाय ही मुरगळला.
    अशोकने खिशातून रुमाल काढून, उजव्या ढोपराला गच्च बांधला. सावकाश उजव्या पायावर उभं राहात, त्याने डावा पाय दोन-तीनदा झटकला.
    लंगडत-लंगडत, उड्या मारत, पायातल्या वेदना सहन करत,वाटेतले दगड-खड्डे चुकवत अशोक धावण्याचा प्रयत्न करत होता.
    उजव्या पायाचा रक्ताने भिजलेला रुमाल धावताना थांबून तो घट्ट करत होता.
    'अम्मी काळजी करत असेल. अम्मी घाबरेल.
    अमिनचं काय झालं असेल?
    गुंडांनी अमिनला पाहिलं तर नसेल ना?
    आणि.... ....
    आणि अम्मी आम्हाला शोधायला बाहेर पडली तर...?' असे अनेक विचार अशोकच्या डोक्यात घोळत होते.
    अशोक, अमिन आणि अम्मीच्या काळजीने बेचैन झाला होता.

    अशोक दगडी भिंतीजवळ पोहोचला.
    दुखऱ्या पायाने त्याला भिंतीवर चढता येईना. सैल झालेला रुमाल त्याने घट्ट बांधला.
    डावा पाय दगडावर घट्ट रोवला. एक खोल श्वास घेऊन, दोन्ही हाताने, ताकदीने त्याने आपलं शरीर वर उचललं. हवेतच कोलांटी उडी मारून, त्याने रेहमानपाड्यात धाडकन उडी मारली!!
    पेट्रोल बॉम्ब, अॅसीड बॉम्ब आणि हत्यारं घेऊन रेहमानपाड्यातून काही गुंड,त्याचवेळी दगडी भिंतीवर चढण्याच्या प्रयत्नात होते.
    अशोक दाणकन त्यांच्या अंगावरच पडला!!!

    काळोखात, हे काय झालं? हे कुणालाच नीटसं समजलं नाही.
    पण अशोक सावध होता. तो टुणकन उठला.
    तोच,एका गुंडाने सुरा सरसावत त्याचा हात धरला!
    पण अशोक काही भ्याड नव्हता. तो ताठ उभा राहीला.
    एकंदर काय प्रकार झालाय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने सावधपणे आजूबाजूला पाहिलं.परिस्थितीचा अंदाज घेतला.
    अशोक जरा जोरातच म्हणाला, “मला माझ्या अम्मीकडे जाऊदे. ती काळजीत असेल. चला,बाजूला व्हा...”
    तोच तो गुंड, अशोकला दरडावून म्हणाला,“एऽऽऽऽ गप्प बस रे पोरट्या. एव्हढ्या रात्री कुठे गेला होतास?
    खरं सांग...... नाहीतर आत्ताच कापून टाकीन!”
    “पोलीस चौकीत गेलो होतो, तुमचे हे उद्योग सांगायला” असं म्हणत,अशोकने एकच सणसणीत ठोसा, त्या बेसावध गुंडाच्या पोटात हाणला.
    त्याबरोबर ठऊऽऽऽफ,ऊंऽऽऽऽ ऊंफ...ठकरत तो गुंड विव्हळला. त्याच्या हातातला सुरा खाली पडला.
    त्या गुंडाचा हात झटकून, लंगडत-उड्या मारत अशोक अंधारात पळाला.
    ते सगळेच गुंड आता अशोकचा पाठलाग करू लागले.

    अशोकला पळताना गुडघ्यात वेदना होत होत्या.
    डावा पाय चांगलाच ठणकत होता.
    रक्ताने भिजलेला रूमाल खाली घसरत होता.
    प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.
    तरीही अशोक लंगडत धावत होता.

    अशोकला गुंडांची भिती वाटत नव्हती तर त्याला अम्मीची काळजी वाटत होती.
    पाठलाग करणारे गुंड काही रेहमानपाड्यातले नव्हते. त्यामुळे गटारे ओलांडताना, वळचणीतून पळताना, अधे-मधे वळताना त्यांची तारांबळ होई.
    पण,
    “कुछ भी करके,हम उस बच्चेको खलास करेंगे,काट डालेंगे” असं ओरडत, ते अशोकच्या पाठी सुरे सरसावर, तलवारी उगारत धावत होते.
    त्या गुंडांची डोकी फिरली होती.
    ते बेभान झाले होते.
    वेड्यासारखं वागणं त्यांना शहाणपणाचं वाटत होतं.
    हातात शस्त्र घेऊन ते मतीमंद झाले होते.

    अम्मीचं घर जवळ येताच,एका वळणावर,अशोकने त्यागुंडांना चकवलं.
    खाली वाकत,दुखऱ्या पायावर थोडा जोर देत,अशोक वेगात पळाला;आणि अम्मीच्या दारावर जाऊन जोरात धडकला!
    तिथेच कोसळला.
    झटक्यात अम्मी उठली.
    तिने दरवाजा उघडला.
    अशोकला उचलून घरात घेतलं.
    अशोकला पोटाशी धरलं. त्याला मायेने कुरवाळलं.
    अमिनही आनंदाने अशोकपाशी आला. त्याच्या शेजारी बसला.

    दार मात्र तसंच उघडं राहीलं!!

    काळे कपडे घातलेले,तोंडावर रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी,सुरे व चॉपर घेतलेले गुंड ,सताड उघड्या दारातून धाडकन आत घुसले.
    गळ्यात ताईत घातलेला त्या गुंडांचा बॉस, एक पाऊल पुढे आला.
    खोलीभर नजर फिरवत त्याने अंदाज घेतला.
    घोगऱ्या आवाजात,तांबरलेल्या डोळ्यांनी अशोककडे पाहात तो अम्मीला म्हणाला, “दे दो उसे! ये सालेको हम काट डालेंगे! बहुत होशियार समझता है खुदको. एक चॉपर की फटकसे पूरी होशीयारी खतम हो जाएगी.”

    एका गुंडाने, तलवारीने खिडकीची काच उगाचच फोडली.
    काच खळकन फुटली!
    भयाण शांततेवर ह्या आवाजाने चरा उमटला!!
    वातावरणात विचित्र तणाव निर्माण झाला.

    आता कुठल्या क्षणी काय होईल ते सांगता येत नव्हतं!!
    त्या गुंडांना, नव्हे, त्या जनावरांना लहान मुलाच्या रक्ताची तहान लागली होती. त्यांच्या हातातल्या तलवारी, चॉपर, सुरे रक्तासाठी आसुसले होते.
    खून.... आणि केवळ खून!! इतकंच त्यांना त्यावेळी समजत होतं.

    अशोक आणि अमिन,अम्मीच्या मागे घाबरून न लपता, हातात हात धरून ते ताठपणे, त्या गुंडांसमोर उभे राहीले.
    त्या गुंडांच्या बॉसने तर तलवार हवेत उगारून धरली होती.
    अमिन त्या बॉसला ठणकावून म्हणाला, “एक पाऊल मागे व्हा. हा माझ्या आजोबांचा फोटो आहे.”

    अमिनचे आजोबा म्हणजे अम्मीचे वडील.
    ते स्वातंत्र्य सैनिक होते.
    भारतासाठी लढताना त्यांना प्राण गमवावा लागला होता.

    त्या खतरनाक गुंडांचा तो बॉस गुरकावला, “चूप्प बस बे. हमे उनसे क्या मतलब? ये लडका कौन है? ये तुम्हारे धरम का नही है! छोड दो उसका हाथ, वरना..., तुम भी उसके साथ मरोगे. हा हा हाऽऽऽ़”
    दुसरा गुंड मधेच केकाटला, “तुम्हारा भी फोटो लगेगा उधर. ही ही हीऽऽ...”
    त्यांच बोलणं ऐकून अम्मी संतापली, भयंकर चिडली. मुलांना मागे ढकलत, त्वेशाने बोलली, “उसकाही क्या,हम तिनोंका फोटो भी उधर लगने दो! हमे कोई दिक्कत नही!!
    याद रखो, वो फोटो कोई फालतू फिल्म स्टार का फोटो नही.
    ते माझे वडील आहेत.
    गांधीजींच्या दांडी यात्रेत असताना त्यांनी आनंदाने, अभिमानाने डोक्यावर लाठ्या झेलल्यात!
    स्वातंत्र्य युध्दात भाग घेऊन, त्यांनी हसत-हसत इंग्रजांच्या गोळ्या खाल्यात!!
    मी त्यांची मुलगी आहे; आणि ही दोन माझी मुले आहेत.
    मरणाला भिणारी भेकड माणसं, आम्ही नाही!
    खुशाल तुमच्या तलवारी आमच्यावर चालवा; पण.... ....
    पण, तुम्ही धर्माचं बोललात म्हणून एक सांगते, माझे वडील देशासाठी लढले, ते भारतीय होते म्हणून! फळणी नंतर आम्ही इथेच राहीलो, कारण आम्ही भारतीय आहोत म्हणून!
    निळ्या, भगव्या किंवा हिरव्या झेंड्यापेक्षा आम्हाला प्रिय आहे तिरंगा झेंडा! कारण आम्ही भारतीय आहोत म्हणून!!
    आणि,
    आम्हा तिघांचाच काय पण सर्व राष्ट्रप्रेमींचा धर्म एकच आहे, तो म्हणजे भारतीय आणि भारतीयच!!
    करा..... करा तुकडे आमचे! करून टाका खांडोळी.
    ह्या तुमच्या तलवारी,चॉपरना आमचं भारतीय रक्त लागू दे.
    तुमच्यासारख्या चक्रम गुंडांना भिऊन पळणारा, भारतीय नाही, हे ही तुम्हाला समजू दे.
    आणि...... .......
    नि:शस्त्रावर तलवारी घेऊन हल्ला करणाऱ्या तुझा.... आणि ह्या जमावाचा धर्म तरी कुठला आहे, हे मला समजू दे.....
    अशोक आणि अमिन पुढे येत म्हणाले, “हे शुरांनो, आम्ही भारतीय असणं हा जर गुन्हा असेल, तर आम्ही आनंदाने मरायला तयार आहोत.”

    अम्मी रागाने,त्वेषाने थरथरत होती.
    तिचे डोळे आग ओकत होते.
    दोन मुलांच्या ”खांद्याव आपले दोन हात ठेवून ती निर्भीडपणे ताठ उभी होती.

    तिचा हा चंडीका अवतार पाहून, ते आक्रमक बेभान गुंड थिजून गेले. वार करण्याचं बळ त्यांच्यात राहीलं नाही.
    आपला धर्म कुठला? हे सांगण्याचं साहस त्यांना झालं नाही.
    ते अवाक होऊन पुतळ्यासारखे उभेच होते.
    बॉस अस्वस्थपणे अम्मीची नजर चुकवू लागला.
    नकळत त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत होता. त्यांच्यातली माणूसकी जागी होत होती.

    अम्मी मृदू आवाजात, त्या गुंडांना आणि हातात तलवार घेतलेल्या त्या गुंडांच्या बॉसला म्हणाली, “मुलांनो,एक लक्षात ठेवा; शस्त्र उगारून कधी प्रश्न सुटत नाही. तुम्ही मुळात चांगली माणसं आहात.
    कुणीतरी तुमच्या डोक्यात भलतं-सलतं भरवलंय. आणि तुम्ही आपल्या मातृभूमीशी बेईमानी करत आहात.
    तुम्ही चांगले असूनही, फार वाईट वागत आहात.
    पण, तुम्हाला भडकवणारे मात्र समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत. तुम्हाला पायदळी तुडवून,तुम्हाला बदनाम करून ते मजा करत आहेत.
    एक सांगते,
    आज सारा समाज तुम्हाला गुंड म्हणून, मवाली म्हणून ओळखतो. तुमची नफरत करतो.
    इतकंच काय....... ...........
    तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सुध्दा नकोसे वाटता!!
    “माझे वडील खूनी आहेत! माझे वडील गुंड आहेत,राष्ट्राशी गद्दारी करणारे आहेत” असं तुमच्या मुलांनी इतरांना सांगताना, त्यांची मान शरमेने खाली जाते! रागाने त्यांचा चेहरा लाल होतो.
    त्यांना लाऽऽऽज वाटते तुमची!!
    अरे, आम्ही घरी आलो की, मायेने-प्रेमाने मुलं आम्हाला धावत येऊन बिलगतात. पण, तुमची मुलं?....
    ...... तुमची मुलं तुम्हाला भिऊन दूर पळतात!
    हो ना? काऽऽय.”
    एक क्षणभरच अम्मी बोलायची थांबली.
    दोन पावलं पुढे सरकली.
    त्या गुंडांच्या बॉसच्या पाठीवर थोपटत म्हणाली, “तुम्हाला पटतंय की तुमचं चुकतंय. चूक कबूल करायला लाजू नका.
    चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा.
    मी तुम्हाला मदत करीन. आपण सारे मिळून प्रयत्न करू.”

    एक भयाण शांतता त्या खोलीत पसरली.

    'त्या तिघांची खांडोळी करून तिथून पळणं...
    अशोकचा खून करणं...
    पेट्रोल ओतून ते घरंच पेटवून देणं...
    किंवा... ...
    शरण येणं....'
    ह्यापैकी काहीही घडणं आता शक्यं होतं.
    होय! काहीही घडणं!!

    ते गुंड चुळबूळ करू लागले.
    माना खाली घालून ते एकमेकांशी नजरेनेच बोलू लागले.
    कमालीचे बेचैन झाले ते.
    आता नेमकं काय करावं, हेच त्यांना कळेना.

    त्या गुंडांचा तो खतरनाक बॉस प्रथम चाचरत म्हणाला, “अं... अं..।़ होय! आमचं चुकलंच काहीतरी.
    होय आई, आम्ही गुंडच आहोत.
    पण आता, आम्ही सुधारू शकतो? चांगला माणूस म्हणून जगू शकतो?

    दुसरा गुंड म्हणाला,“सच.... सच... कहता हूँ माँ....हमने इतना कभी सोचा ही नही. लेकीन....
    लेकीन..... हम अब गुंडे बन चुके है माँ!!
    पहले हम भी अच्छे आदमी थे माँ.
    लेकीन अब वहाँ वापस जानेका रास्ता नही है माँ..!
    अब हम जिंदगीभर गुंडे ही रहेंगे.....”

    तिसरा गुंड मधेच घाइघाईत म्हणाला, “हां हां माँ,ये बिलकूल सच कहा रहा है.
    लेकीन.. .. क्या हम फिरसे अच्छे आदमी बन सकते है?
    क्या सचमुच तुम हमे मदद करोगी?”

    अम्मी प्रेमाने, त्या गुंडांना म्हणाली, “क्यों नही? मैं तुम्हे जरुर जरुर मदद करुंगी.
    अभी भी मौका गया नही है.
    अरे, आपण जर चूक कबूल केली, आणि चुकल्याबद्दल जर आनंदाने शिक्षा घेतली; तर.... तर ती चूक,चूक राहात नाही मुलांनो!

    तुम्ही ही शस्त्र टाकून द्या.
    पोलीसांच्या स्वाधीन व्हा. जेलमधे जाऊन शिक्षा भोगा.
    जेव्हा तुम्ही सुटून परत याल, तेव्हा तुम्ही गुंड नसाल!
    तेव्हा..
    तुम्हाला जर कुणी काही बोललं, तर त्यांना मी ठणकावून सांगीन.
    माझ्यावर विश्वास ठेवा.

    क्षणभरच एक अनामिक शांतता घरभर पसरली.
    गुंडांचा बॉस पुढे आला.....
    त्याने आपली तलवार, अम्मीच्या पायाजवळ ठेवली......
    आणि.............
    तो गुडघ्यावर बसून ओक्साबोक्सी रडू लागला!!
    त्याने अशोकला घट्ट मिठी मारली.
    त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं.
    डोळे पुसत तो अम्मीला म्हणाला, “मेरा....मेरा...लडका ऐसा ही है माँ! लेकीन अब...अब...वो मुझे गुंडादादा नही कहेगा ना माँ?
    अपने दोस्तोंसे नही कहेगा ना, की मेरा बाप खूनी है.
    नही कहेगा ना, की मैं गद्दार का लडका हूँ.
    नही कहेगा ना की, मेरे हाथोंको किसी का खून लगा है.
    मैं घर लौटने के बाद, आएगा ना मेरे पास?
    नही भागेगा ना मुझसे दूर?
    नही डरेगा ना मुझसे वो...?

    माँऽऽ.....हम सब हमारे बच्चोंका प्यार वापस चाहते हैं माँ!
    माँ....
    हम सब अच्छे आदमी बनना चाहते है! तुम्हारे जैसे सच्चे भारतीय!!
    माँ...
    अब मैं जेल से लौटनेके बाद, मेरा बेटा मुझै गुंडादादा नही... ...
    प्यारेदादा कहेगा! प्यारेदादा!!
    हां माँ,
    अब मैं सबका प्यारा-दादा होऊँगा.

    माँ..माँ..सचमूच तुमने हमारी आँखे खोल दी.”
    प्यारेदादाला इतकं गहिवरुन आलं की, त्याला पुढे बोलताच येईना.
    त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळघळू लागले.

    अम्मीला सुध्दा आपले आनंदाश्रू अनावर झाले.
    तिच्या पायाशी ठेवलेली तलवार रक्ताने माखण्या ऐवजी आनंदाश्रूंनी चिंब भिजून गेली!!

    प्यारेदादाने अम्मीच्या पायाला हात लावून नमस्कार केला.
    अम्मीने त्याला आशीर्वाद दिला.
    त्यावेळी दुसरा गुंड म्हणाला, ”माँ हम गलत रास्तेपर फस गए थे.
    अब हम जान गये,इन्सानियत ही असली धरम है!”
    “सही है मेरे बेटे!
    आपण सारे भारतीय आहोत, आणि माणुसकी हाच आपला धर्म आहे.” अम्मी असं बोलत असतानाच, बाहेर पोलीसांच्या शिट्या वाजल्या.

    इन्सपेक्टर प्रधान बाहेरूनच ओरडून म्हणाले, “खबरदार, हॅण्डस् अप, हात वर करा.
    हातातली शस्त्र खाली टाका.
    हालचाल केलीत तर गोळ्या घालू.
    आम्ही तुमच्या बाहेरच्या साथीदारांना आधीच पकडलं आहे.”

    पोलीस आले आहेत असं कळल्यावर,एक ही गुंड घाबरला नाही, कारण...
    आता ते गुंड राहीलेच नव्हते.
    आपली चूक सुधारण्यासाठी,चांगलं माणूस म्हणून जगण्यासाठी,ते खूशीने पोलीसांच्या स्वाधीन होणार होते.

    इन्स.प्रधान हातात पिस्तूल घेऊनच धाडकन घरात आले.

    आणि......त्यांचा, त्यांच्या डोळ्यावरच विश्वास बसेना!!...

    'दगडा सारखं काळीज असणाऱ्या त्या गुंडांचे डोळे पाणावलेले होते.
    त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता.
    अम्मीच्या पायाजवळ, तलवारी आणि चॉपर पडले होते.
    तर गुंडांचा खतरनाक बॉस,अशोकच्या जखमेवर स्वत:चा रुमाल बांधत होता!!'.......
    हे दृश्य पाहताना इन्स.प्रधानांना क्षणभर वाटलं, आपण स्वप्नं तर पाहात नाही ना?
    त्यांनी लगेचच स्वत:ला सावरलं आणि अम्मीला विचारलं, ”हा काय प्रकार आहे? काही दगा फटका तर नाही ना?”
    अम्मी प्रसन्नपणे हसत म्हणाली, ”छे छे प्रधान साहेब, त्यांना पश्चाताप झालाय! आता त्यांना ह्या पुढे गुंड म्हणून नव्हे तर चांगला माणूस म्हणून जगायचं आहे.
    प्रधान साहेब, ह्यांनी सुधारण्यासाठी, आपण सर्वांनीच त्यांना मदत करायला हवी, नाही का?”
    इन्स.प्रधान खळखळून हसत म्हणाले, “निश्चितच!! ह्यांना कमी शिक्षा व्हावी ह्यासाठी मी प्रयत्न करीन. त्यात मला आनंदच आहे.

    प्यारेदादा अम्मीला हात जोडून म्हणाला, “मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, पुन्हा कध्धी कध्धी आम्ही वाईट वागणार नाही.
    मातृभूमीशी बेईमानी करणार नाही.
    माणूसकी विसरणार नाही.
    तुमच्या सारखाच आम्हाला ही अभिमान आहे की आम्ही भारतीय आहोत!
    पण अम्मी... ...
    ही आमची गोष्ट तू इतर मुलांना सांग. म्हणजे,आम्ही जसे चुकलो,तशी चूक ही मुले करणार नाहीत. आम्ही जसे फसलो, तसे ही मुले फसणार नाहीत.
    आणि अम्मी.. .. ..
    माझं आणखी एक छोटं काम कर,
    माझ्या मुलाला सांग, मला एकदाच माफ कर.
    मैं घर लौटूंगा प्यारेदादा बनकर.......”

    प्यारेदादाला पुढे बोलणंच अशक्य झालं.
    त्याला भरून आलं.
    त्याला आवंढा गिळताना ही त्रास होऊ लागला.
    त्याचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले.
    इन्स.प्रधानांसोबत सगळेच हसत आणि निश्चिंत मनाने जेलकडे रवाना झाले.

    खरं म्हणजे, जेलमधे जाण्या अगोदरच,
    फक्त गुंडादादाच काय...तर, त्याचे साथीदार सुध्दा,
    सगळ्यांचेच......
    प्या रे दा दा झाले होते!!

    -- राजीव तांबे.