सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
June 3, 2012
हात अनेक भवती एक काळजाला भिडत नाही
नाती झाली उदंड, तरी जिवाभावाची साथ नाही
गर्दीचे संमेलन केवढे, पण कोण कुणाला सामील नाही
भेटीगाठींचा वर्षाव सारा, आतड्याला कुणाच्या पीळ नाही
विलगणारे ओठ अगणित. पण हास्याची लकेर नाही
बिलगणाऱ्या शरीरांचा कधी अंत:करणाला स्पर्श नाही
शब्दांचा पाऊस भरपूर पण भिजलेला एकही नाही
विचारांचा वर्षाव तरीही मनाला स्पर्शून नाही.
आण्यांचे व्यवहार सारे त्यात मनाचा व्यापार नाही
सगळे केवळ उपचार त्यात जीवनाचे सार नाही
संपन्नतेचे पेटारे मुबलक त्यात समाधानाची चादर नाही
आपुलकीच्या शोधात फिरणाऱ्या अंतरात्म्याचा आदर नाही
- यतीन सामंत
August 25, 2022
आनंद मोजता येत नाही
जवळ असलेल्या नोटांमध्ये
श्रीमंती मोजता येत नाही
आलिशान फ्लॅटच्या भव्यतेमध्ये
किती ही पैसा असला
तरी तो कमीच भासतो
दुसऱ्याचा महाल बघून
आपला फ्लॅट छोटा वाटतो
दुःख भोगल्यावर कळतं
की सुख काय असतं
दुसऱ्यांच्या वेदना पाहिल्या की कळतं
आपण खरं तर किती श्रीमंत असतो
-- दिप्ती गोगटे
December 13, 2022
शेतकरी व त्यांच्या प्रश्नवर फक्त राजकारण करणा-यावर उपरोधिक शैलीत प्रहार करणारी कविता
April 6, 2017
आता क्षणक्षण येणारा
नित्य आनंदात जगावा
जन्म हीच कृपा ईश्वरी
प्रारब्धा झेलित जगावा
जे भोगले तेच सुख होते
दुःखाचा लवलेश नसावा
जरी कुणी कसे वागले
संयम विचारी राखावा
समजावित मनांतराला
विवके, जन्म सावरावा
संचिताचा, कर्मसोहळा
याची देही डोळी पहावा
जन्मासवेच अटळ मृत्यु
अर्थ जीवनाचा जाणावा
सृष्टितील श्वास मर्त्य सारे
एक आत्मा सत्य जाणावा
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४६
२४/९/२०२२
September 27, 2022
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी लिहिलेल्या ‘लेट्स किल गांधी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच बाजारात आला. या पुस्तकाच्या निमित्ताने गांधीहत्येचे कारस्थान, घटनेचा तपास आणि खटल्याविषयीच्या नोंदी तपशिलाने पुढे आल्या आहेत. या नोंदी मांडताना लेखकाने गांधीजींच्या शेवटच्या दिवसातील घटना मांडताना त्यांच्या विचारांचीही मार्मिक मिमांसा केली आहे.
November 19, 2010
January 2, 2014
खारेपणा हा अंगी असतां, कोण खाईल केवळ मीठ
परि पदार्थाला चव येई, मिसळत असता तेच नीट....१,
जीवन सारे खडतर ते, भासते मिठासम मजला
केवळ जीवन बघता तुम्हीं, पेलणें अवघड सर्वाला..२,
तेच जीवन सुसह्य होई, ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते
हर घडीच्या प्रसंगामध्ये, समाधानाचे अंकूर फूटते....३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 27, 2019
रंग बदलले ढंग बदलले, साऱ्या जीवनाचे
बदलणाऱ्या परिस्थितीने, तत्व शिकवले जगण्याचे....१,
कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे
यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं आनंदे....२,
धुंदीमध्यें असता एका, अर्थ न कळला जीवनाचा
आले संकट दाखवूनी देयी, खरा हेतू जगण्याचा....३,
दु:खामध्ये होरपळून जाता, धावलो इतरांपाठीं
अनेक दु:खे दिसून येता, झालो अतिशय कष्टी....४,
दु:ख आपले निवारण्याते, आनंद वाटे मनीं
इतर जणांची दु:खे हाटविता, द्विगुणीत गेला होऊनी....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 29, 2019
आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.
मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.
बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतात
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतात.
त्यांना कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतात
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतात .
तुमचा शब्द ते कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.
तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
पेलत सगळी आव्हाने
घडवतात तुमचा भविष्यकाळ..
तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबाही खचत असतात
आधार देता तरी
मन मारून हसत असतात..
तुमच्याकडूनं तसं त्यांना
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्यांचं
अवघं पोट भरत असतं.
त्यांच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाहीत
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाहीत.”
त्यांच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.
एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल
तेव्हा म्हणाल, “ आपले बाबा
खरंच कधी चुकत नव्हते
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होते.”
तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.
आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..
आजच्या जागतिक कुटुंब दिवसाला सुंदर सलामी...
September 22, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti