खिडकीमधूनी टिपत होतो
बाह्य जगाचे द्दष्य आगळे
लोभसवाणें चित्र बघण्या
आतूर होऊन गेले डोळे
नयन नव्हते बघत ते
बघत होतो मीच खरा
खिडकीसम नयनातूनी
द्दष्य उमटते आंत जरा
संगीताचे सूर निनादूनी
लहरी त्यांच्या उठताती
कर्णा मधल्या पडद्यायोगे
आनंद मजला देवून जाती
मालक असूनी मी देहाचा
इंद्रिये सारी असती सेवक
ती केवळ साधने असूनी
आंतील 'मीच' असे साधक
मालक असूनी ताबा नसणें
स्वच्छंदी बनवी सेवकाला
इंद्रिये ती गोंधळ घालती
जागृकता नसतां मनाला
सोडून द्यावी वृत्ति मनाची
अरोप करणें इंद्रियावरी
ती तर केवळ सेवक असूनी
मनाची इच्छा पूर्ण करी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
क्षण तोच धुंद , बेभान
अस्तित्वा हरवुनी गेला
मी , तू सहज विसरूनी
मिठितच गुंतवुनी गेला
तो सोहळाच प्रीतस्पर्शी
अंतरंगी विर्घळूनी गेला
तादात्म्य ! भाव निर्मळी
स्वत्वास ! समर्पूनी गेला
तोच अवीट स्पर्शानंद
श्वासास सजवुनी गेला
खेळ साराच संचिताचा
जन्म , हा कृतार्थ झाला
--वि.ग.सातपुते ( भावकवी )
9766544908
रचना क्र.१८६
३/८/२०२२
दवडू नका आयुष्य तुम्ही, वेळ घालूनी असा तसा,
पदरी येई निराशा तुमच्या, गेला क्षण तो येईल कसा....१,
मर्यादेतच जीवन असूनी, गतीमान ते असते बघा,
स्वत: भोवती केंद्रीत होता, कसे जाणाल इतर जगा....२,
इच्छा असते वाया न जावे, आयुष्य सारे विनाकारण
हर घडीला विचार असावा, इतरांसाठी असते जीवन....३,
जेंव्हां तुम्ही सेवा करिता, इतर मनाचे भाव जाणूनी
तेच अर्पण होत असते, सारे एकत्र ईश्वर चरणी .....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
असं म्हणतात ना...
आपली शांतता समजून घेणारं एखादं मन भेटलं,
तर दुःखाला शब्दांची गरजच उरत नाही.
काही नाती अशी असतात,
जिथे नजरा बोलतात,
आणि मनाच्या खोल कप्प्यात दडलेले हुंदके
न बोलताही ऐकू येतात.
तो विचारत नाही,
"काय झालं?"
तो फक्त जवळ असतो...
आणि त्याच्या त्या निःशब्द सहवासात
मन हळूहळू हलकं होत जातं.
अश्रूंना स्पष्टीकरण द्यावं लागत नाही,
हसऱ्या चेहऱ्यामागची वेदना लपवावी लागत नाही,
कारण त्याला आपल्या शांततेत दडलेलं
प्रत्येक वादळ ओळखता येतं.
जगाला भावना समजण्यासाठी
शब्दांची गरज भासते,
पण प्रेमाला
फक्त समजूत पुरेशी असते.
आणि जेव्हा मन थकून जातं,
डोळे नकळत ओले होतात,
तेव्हा तो अलगद हात हातात घेत म्हणतो,
"काळजी करू नकोस...
मी आहे ना...
तुझ्या प्रत्येक शांततेसोबत,
तुझ्या प्रत्येक वादळासोबत."
त्या चार शब्दांतच
साऱ्या वेदनांना आधार मिळतो,
आणि दुःखही
हळूच शांत होतं.
कारण...
काही नाती शब्दांनी जपली जात नाहीत,
ती जपली जातात
समजुतीने,
विश्वासाने,
आणि न बोलताही एकमेकांना
पूर्णपणे ऐकण्याच्या अद्भुत क्षमतेने.
ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
मो:- 9011841212
चालणे सुरु तर कर ....पोहोचणार नाही कशावरुन ?
बोलणे सुरु तर कर ...टाळ्या पडणार नाही कशावरुन ?
टिम्ब काढ रेषा होतील...रेषारेषांचे चित्र जाईलच बनून
आवड तयार होईल ...कलाकृती छान घडणार नाही कशावरुन ?
लिहिणे सुरु तर कर.. कविता होईल ओळी मिळून
जमणार नक्की ...लाईक मिळणार नाही कशावरुन ?
हे जमत नाही ते जमत नाही...सोड सांगणं( गाऱ्हाणं) फिरून फिरून
गाणं सुरु तर कर ...सूर सापडणार नाही कशावरुन ?
घाबरतो उगाच आपण...रुपडं बघून वरुन वरुन
अंतरंगात बघ गुण शोधून ...जगणं जमणार नाही कशावरून ?
# कौशल
-- श्रीकांत पेटकर
निराशेचे बीज पेरतो, आम्हीच आमच्या गुणानें,
विचारांना ताण देवूनी, जगा पाही त्याच दिशेने ।।१।।
जाणूनी ईश्वरी स्वरूप, प्रतिमा ती मनीं बसवी,
धडपड चालते सतत, तशीच प्रतीमा दिसावी ।।२।।
तपसाधना ती बघूनी, कित्येकदा मिळे दर्शन,
परि केवळ अज्ञानाने, न होई त्याचे अवलोकन ।।३।।
सभोवतालच्या वस्तूंमध्यें, जाण तयाची येते,
निसर्ग रम्य सौंदर्यात, भावना तशी उमटते ।।४।।
अस्तित्वाची जाणीव देतो, हर एक घडीचा ठेवा,
ध्यास लागतो आम्ही, परी कल्पिलेल्या रूपी दिसावा ।।५।।
निराशा राहते सदैव, दर्शन न मिळता त्याचे,
पाण्यात राहून देखील, तहानलेला असे याचे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सांगा किती किती सावरावे
किती समजवावे या मनाला
प्रवाहा विरुद्ध, पोहणारा मी
कां? विसरू भोगल्या क्षणाला
सद्गुणी सहवासातची जगलो
जगी अर्थ जगण्याचा उमजला
सोबतीला, थवे जरी निंदकांचे
दुर्लक्षूनी, मी सावरले स्वतःला
विवेके, संयमे या जगी जगावे
सांभाळीत साऱ्या मनामनाला
दिशाहीन वाऱ्याचेच ते वाहणे
पंचमहाभूतांची सोबत सृष्टीला
सोहळे, ऋतुचक्रांचेच त्रिलोकी
दृष्टांत! ईश्वरी दाविती मानवाला
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ३५.
४ - २ - २०२२.
सारे दुर्गुण अंगी असूनी, गुंड होता तो
इतर जनांना त्रास देत, तुच्छ लेखितो
शक्ति सामर्थ्य त्यांत असतां, फार मातला
आया बहिणीना अपमानुनी, त्रासू लागला
बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता
हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता
केवळ त्याच्या अस्तित्वाने, सारे घाबरती
पिसाट संबोधूनी तयाला, दुर्लक्ष करिती
एके दिवशीं अवचित ती, दुर्घटना झाली
उंचावरनी त्याची स्कूटर, खाली कोसळली
त्याच्या देहा भोवती जमले, सारे गांवकरी
आज शब्द जे बाहेर पडती, स्तुती त्याची करी
निच वृत्तीची पकड होती, त्याच्या देहाला
देहाबरोबर दुष्टपणा तो, नाश पावला
सुटका झाली आत्म्याची, त्याच्या हीन देहातूनी
स्तुति सुमनें उधळली गेली, हेच जाणोनी
जेव्हां कुणाचा मृत्यु होई, गुण गातो त्याचे
रुप ईश्वरी उरते जातां, वेष्टन देहाचे
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
वर्णती जयगाथा ऋषि व्यास
स्वयं गजानन बसला पुढती लिखित रूप देण्यांस ।। १
नाम कृष्णद्वैपायन यांचें
ज्येष्ठ पुत्र हे सत्यवतीचे
ज्ञानानें अभिधान मिळालें
‘वेदव्यास’ हें त्यांस ।। २
ऋषिवर ज्याचे स्वत:च साक्षी
कुरु नामक ख्यातकीर्त वंशीं
घटित-अघटितातून मूर्त
‘जय’ नांवाचा इतिहास ।। ३
पर्वांमधुनी घटना-वर्णन
घडे तर्क्य-अतर्क्य प्रदर्शन
पिढ्यापिढ्यांचा, संबंधांचा
एक अखंड प्रवास ।। ४
धृतराष्ट्राचे सुत, शत-कौरव
पंडूचे पुत्र, पांच-पांडव
राज्यावर अधिकार कुणाचा
हें कारण कलहास ।। ५
राज्यासाठी बंधु भांडले
सत्तेसाठी रक्त सांडलें
भावांच्या वादातुन झाला
कुरुवंशाचा र्हास ।। ६
युधिष्ठिराचे जरी सत्वगुण,
परंतु अभिमानी दुर्योधन
पूर्ण हस्तिनापुर-राज्याचा
धरीतसे हव्यास ।। ७
वैरातुन लाक्षागृह जळलें
दुष्ट-हेतु नीचांचे कळले
सुप्त द्वेष उघड्यावर येउन
भस्म करी स्नेहास ।। ८
राज्य मिळे दोहोंस विभागुन
मिळे पांडवांना खांडववन
दिलें मयानें, अमरपुरीसम
रूप इंद्रप्रस्थास ।। ९
द्यूत घडे कपटी चालींचें
वस्त्रहरण मग पांचालीचें
द्यूतातुन आला भाळीं
अज्ञातवास-वनवास ।। १०
कणही भूमि न देती कौरव
समेट घडवूं शके न केशव
अटळच जें, तें टाळायाचा
झाला व्यर्थ, प्रयास ।। ११
कौरव, पांडव, नृपती नाना
अक्षहौणी अठरांची सेना
एका वा दुसर्या पक्षातुन
झाले सिद्ध रणास ।। १२
कुरुक्षेत्रावर आप्त-गुरूजन
बघुन संभ्रमित होई अर्जुन
गीता सांगुन, बोध द्यावया
लागे श्रीकृष्णास ।। १३
मित्र-बंधु लागले लढाया
स्वकीयांस लागले वधाया
कुरुक्षेत्रावर पडली चहुंवर
हताहतांची रास ।। १४
दिवस अष्टदश, युद्ध चालले
लाखो मेले, विश्व हालले
हरलेले, शोकाकुल सारे,
विजयी सर्व, उदास ।। १५
प्रलयंकारी युद्ध भयंकर
नच दुसरें होईल धरेवर
असा पराक्रम महारथींचा,
ऐसा महा-विनाश ।। १६
झाला येथें अंत युगाचा
नाश जाहला ज्ञात-जगाचा
काळानेंही क्षणभर थांबुन
सोडियला निश्वास ।। १७
या धरतीवर, युगांयुगांतिल
पिढ्या शेकडो येतिल-जातिल
त्या सर्वांनी धडा शिकावा
हा व्यासांचा ध्यास ।। १८
- - -
(माझ्या, ‘गा जयगाथा पंडुसुतांची’ या
आगामी गीत-संग्रहातून )
-
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik
Copyright © 2025 | Marathisrushti