खोटंच का विकलं जातं, हातोहात?
अन खऱ्यालाच का गुंडाळलं जातं बासनात?
किती द्याव्यात परीक्षा खऱ्याने
खऱ्यापणाच्या?
आणि किती उडवाव्यात चिंध्या
असत्याने सत्यपणाच्या?
खोटंच का विराजमान होतंय
आत्मसन्मानाची गळचेपी करून
फाटक्या तुटक्या सिंहासनावर?
खऱ्यालाच का सोसावे लागतात
हाल दारोदार?
बाजार खोट्याचाच बहरलेला दिसतोय विक्षिप्तपणे सर्वत्र
अन खऱ्यालाच घरघर लागलेली
दिसतेय गळलित गलीतगात्र.
खोट्याची सत्ता लौकिक
तर खऱ्याची सत्ता आहे अलौकिक.
सर्व शक्यतांचे सिद्धांत मोडीत काढून
उसळी मारून वर येते ते सत्य असते
आणि काळाच्या जजमेंटल ओघात
मोडीत निघते ते असत्य असते.
खोट्याला तर जगात अनेक मालक पालक असतात
खऱ्याचा मालकच काळ असतो
खोट्याचे मालक पालक काळाच्या ओघात अस्तित्वहीन
होत जातात,संपून जातात,मिटतात,उन्मळून पडतात, तहस नहस होतात
खऱ्याला पाठबळच काळाचे असते
खरं काळासोबत चालते, किंवा काळाच्याही पुढे धावते
ते काळाच्या अनंत प्रवाहासोबत चकाकते, उजाडते,दिशा देते,चांगले काही पेरते
Copyright:- कवी सुभाष पवार
मराठीसृष्टीच्या फेसबुक पेजवरुन