(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • मानवता आहे जगात

    मानवता आहे जगात,-?
    प्रश्न खूपदा पडे,
    आई बापा टाकून देतात,
    कोणते पुण्य मग मिळे,--?

    संसारी रममाण होतात, भूतकाळाचा पडे विसर,
    उभे ज्यांनी केले ते,
    वृद्धाश्रमी सापडतात,--!!!

    हेच संस्कार मुलांवर,
    का बरे करतात,--?
    आईबापाला अंतर देऊन,
    कोणते समाधान मिळवतात,?

    वरील चित्रफितीतुनी,
    कोणता मिळे संदेश,
    वागणे प्राण्यांचे पहा,
    प्रेम केवढे हे विशेष,--!!!

    जिने त्यांना सांभाळले,
    माया ममता दाखवून,
    इतकी वर्षे गेली मध्ये,
    तरी ना गेले ते विसरून,--!!!

    हिंस्त्र प्राणी म्हणत म्हणत,
    जग त्यांना हिणवते,
    माणसांहून भावना थोर प्राणिजगत सांभाळते,--!!!

    *प्रेम त्यांचे असते मूक,
    तरीही किती बोलके,
    अनुभव घ्यावा त्यांचा,
    ठरतील श्रेष्ठ ते शेलके*,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • काव्य कलश

    ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा ।

    उपसतो जरी सतत, होत नसे निचरा ।।

    गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे ।

    पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे ।।

    पेला पेला जमवूनी, कलश भरून आला ।

    नाहून जाता त्यात, देह भान विसरला ।।

    सांडता पाणी वाहे, परसते चोहीकडे ।

    आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • खरे सुख अंतरी

    सुख हे मृगजळ, फसविते सर्वांला

    खेळ चालतो त्याचे, चकविणे मनाला ...१,

    बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक ते असते,

    मोहून जाता सर्व, लक्ष्य तेच वेधते...२,

    खरे सुख अंतरी, परि शोधी बाहेरी,

    चुकीचा हा हिशोब, निराशा मग करी...३,

    अंतरातील सुख, नितांत ते असते

    एकाच अनुभवाने, जग विसरविते...४

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मजुरीनं मारलं

    यावर्षी बळीराजाला,
    सोयाबिननं तारलं !
    पण जगाच्या पोशिंद्याले,
    मजुरीनं मारलं !!१
    ...
    हजार रुपय एकरानं,
    मागील वर्षी सोंगलं !
    दोन हजार एकरानं,
    मजुर यंदा बोंबलं !!२
    ...
    मळणीवाला म्हणतो मला,
    दोनशे रुपये पोतं !
    मी म्हटलं त्याचा काय,
    आता जीव घेतं !!३
    ...
    आलं आभाळ, झाकण्यासाठी,
    ताडपत्री नेतो !
    दोन हजारानं इथे त्याचा,
    खिसा कापला जातो !!४
    ...
    एवढ सार करुन सोयाबीन,
    बाजारात नेतो !
    ओलं आहे म्हणून भाव,
    सोळाशाचा येतो !! ५
    ...
    घरी आल्यावर सारा हिशेब,
    चुकता करुन देतो !
    हाती नाही राह्यलं काही,
    म्हणून रोगर घेवून घेतो !!६
    ...
    यासाठीचं म्हणतो शेतक-याचा,
    वाली कोणी व्हा रे !
    नका देवू दुजे काही,
    हिंमत तरी द्या रे !! ७
    ...
    असाचं जर बळीराजा,
    जहेर पिऊन मेला !
    आपलाही पुढे समजा,
    खेळ खलास झाला !!८
    ...
    सरकारच्या दरबारी,
    आवाज उठला पाहिजे !
    त्याच्यासाठी प्रतिनिधी,
    आमचा झटला पाहिजे !!९
    ...
    जय किसान जय जवान,
    आठवा आता नारा !
    दोघांसाठी खरचं आता,
    काहितरी करा !!१०
    ...

    फेसबुकवरुन आलेली ही कविता... कवी अज्ञात
    प्रेषक - विनय साटम

  • मी उशाला तुझी आठवण ठेवतो

    रोज स्वप्नामधे तोच क्षण ठेवतो
    मी उशाला तुझी आठवण ठेवतो

    रोज म्हणतो तिला "हे प्रिये ! मी तुझा "
    आणि त्याच्यापुढे एक "पण...." ठेवतो

    प्रेम म्हणजे जणू एक असतो हिरा
    एकजण फेकतो एकजण ठेवतो

    पाहिजे तर उभा जन्म देतो तुला
    फक्त माझ्याकडे बालपण ठेवतो

    सर्व नेतो लुटुन एक 'तो' शेवटी
    फक्त देहामधे ताठपण ठेवतो

    -- महेश मोरे (स्वच्छंदी)

  • सार्थकी जीवन

    सारे जीवन जाते आपले, अन्न शोधण्याकडे ।

    काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।।

    जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे ।

    आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।।

    धडपड करी आम्ही सारी, देह सुखापाठी ।

    विचार ही मनांत नसतो, इतरांच्यासाठी ।।३।।

    वेळ काढावा जीवनामधूनी, इतरांकरीता थोडा,

    सार्थकी लावा आयुष्य, जीवन शिकवी धडा ।।४।।
    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • आपलं गोजिरवाणं बिर्ढ

    आपल्या सीकेपींच्या पद्धती, जिन्नस सगळंच कसं खास, छान छान
    त्यातून कडव्या वालांना लाभलय एक विशिष्ट प्रमुख स्थान ॥1॥

    "वालाचं बिर्ढ" नेहमीच "नंबर वन", त्याचा पहिला मान
    दिमाखात वाटीत खुलतं आणि वाढवतं जेवणाची शान ॥2॥

    चवीष्ट लोभसवाणं "बिर्ढ" खाणा-यांची भूकही वाढवतं
    ताटातल्या इतर पदार्थांपुढे स्वत:चा सुंदर ठसा उमटवतं ॥3॥

    कडवे वाल येताच इथला तिथला भाव, क्वालिटी चा सर्व्हे करत सुटायचं
    काकीला/मावशीला/मामीला, "तुझ्या यादीत माझे पण 5 किलो लिहून टाक", हक्कानी सांगायचं ॥4॥

    वाळवणं, तेल लावणं, भरणं हे सगळे सोपस्कार करणं सास्वा-सुनांचं आवडीचं काम,वालाचं मनासारखं कोडकौतुक झाल्याशिवाय हातांना त्यांच्या नसतोच आराम ॥5॥

    तेवढ्याच प्रेमाने भिजवून, ऊपसून, सोलून शिजवून, गृहिणीला मिळतं आगळं समाधान,खवय्ये मंडऴींबरोबर जणू काही गोंडस स्मित करतं भरलेलं पान ॥6॥

    चपाती-प्रेमी मंडळी, "बिर्ढ" केलं की मात्र शेवटी पुन्हा बिर्ढ-भात घेणारच
    भरपेट जेऊन, "वाह मस्त" अशी ऊत्स्फूर्त तारीफ हमखास तोंडातून काढणारच ॥7॥

    रूचीपालट म्हणून अधूनमधून मुगाचं, चवळीचं, चण्याचं बिर्ढही आपल्याकडे असतं,नाॅनव्हेजचा वार नसला तरी आपलं हे "बिर्ढ" सगळं निभावून नेतं ॥8॥

    संकष्टीला, सणावाराला बिना कांदा-लसणाचंही सगळे आवडीने खातात
    शिल्लक राहिलेलं दुस-या दिवशीही "बिर्ढ आहे नं गं, वाढ नं," म्हणून आवर्जून मागून घेतात ॥9॥

    मनापासून करतो, उत्साहाने, आवडीने व आग्रहाने खाऊ घालतो
    आनंदी चेहरे बघून तृप्त होतो, म्हणूनच कदाचित आपण स्वत:ला कायस्थ म्हणवतो ॥10॥

    -----सौ.वर्षा कुळकर्णी खोपकर-----

  • कोंडमारा

    बरेच काही म्हणावयाचे अजून बाकी मनात आहे
    कुठे तरी एक कोंडमारा म्हणे मजा थांबण्यात आहे

    फिकाफिकासा ... उदासवाणा... मलूल आहे असा बिचारा...
    अजून चाफा अबोल आहे... अजूनही दु:खं आत आहे

    खरेच ती एक चूक माझी मलाच होती नडून गेली
    तसा कुणाचाच ह्यात काही म्हणावयाला न हात आहे

    जरी असा मी निवांत आहे तरी जिवालाच घोर लागे
    तसा इथे सावलीतसुद्धा उभा खरा मी उन्हात आहे

    तसे मला वाटले खरे ते मला कधी बोलता न आले
    अजूनही जीभ चावण्याचा जुनाच माझा प्रघात आहे

    पुन्हा पुन्हा युद्ध जिंकताना पुन्हा पुन्हा युद्ध हारलो मी
    रणात मी धूळ चारलेली अजूनही संभ्रमात आहे !

    अजून तू पान पान माझे कुठे तसे वाचलेस आहे ...?
    अजूनही ओळ ओळ माझी कुठे तुझ्या काळजात आहे?

    मनाप्रमाणे जगावयाचा विचारही दूर ठेवला मी !
    मनातले मी मनात माझ्या तसेच ठेवून जात आहे ...

    .... देवीदास हरिश्चंद्र पाटील

  • दोन क्षणिका : दिल्लीचा वारा

    दिल्लीचा वारा

    विषाहून विखार

    जणू यमाचा पाश.

    काळ्या-कुट्ट स्मागात

    दिसला यमाचा चेहरा

    कासावीस झाला प्राण.

  • चिमण्यांनो शिकवा.

    चिव् चिव् करित बोलतां तुम्ही सारी भाषा

    दोन स्वरातून विचारांना देत असता दिशा

    शब्द आमचे सप्तसुरांतून येती बाहेरी

    व्यक्त करिती भाव सारे असती जे अंतरी

    दोन अक्षरी किमया सारी तुमच्या भाषेची

    त्याच चिव चिवे समजुन घेता धडधड ह्रद्धयाची

    भाव मनीचे टिपून घेण्या शब्द लागती थोडे

    चेहऱ्यावरल्या हलचालीनी प्रश्न उकलूनी पडे.

    समज तुमची आपसांतली कौतूक करणारी

    शब्द मोजके असून देखील भाव दाखविणारी

    चिमण्यानो तुम्ही शिकवा सारे मानव जातीला

    व्यर्थ बडबड करुन सारी वाहूनी तो गेला

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com