जन्मच जर सोसण्यासाठी, तर दुःख कशाचे करावे,--?
आयुष्याला तारण्यासाठी,
का सुखाचे आधार घ्यावे,--?
इथे कुणी ना आपल्यासाठी, कळवळून मग काय मिळवावे,
फक्त मग जगण्यासाठी,
शरीरही का झिजवावे,--?
थोडा उजेड दिसण्यासाठी,
कितीदा डोळे मिटून घ्यावे,
पार अंधारा करण्यासाठी,
सतत सारखे ठेचकळावे,
जखमी मन लपवण्यासाठी, जिद्दीला किती उभारावे,
घायाळ जिणे झाकण्यासाठी, डोळेझाक करत राहावे,
येतो तो वार करण्यासाठी,
कसे त्याला सारखे आवरावे,
हात उठतो थोपवण्यासाठी, अनामिक ओझे किती पेलावे,
जो तो फक्त आपल्यासाठी, मतलबाला कसे *आंकळावे,
अशा नि:स्वार्थी मनासाठी,
केवढे आणि किती झुरावे,-?
© हिमगौरी कर्वे.
March 19, 2020
वैशाखमासी प्रतिवर्षि येती,
आकाशमार्गे नव मेघपंक्ती;
नेमेचि येतो मग पावसाळा,
हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा ।॥१॥।
पेरुनियां ते मण धान्य एक,
खंडीस घे शेतकरी अनेक;
पुष्पे फळे देति तरु कसे रे?
हे सृष्टिचे कौतुक होय सारे ! ।।२॥।
क्र्तू बसंतादिक येति, जाती,
तैसेचि तेही दिन आणि राती;
अचूक चाले क्रम जो असा रे,
हे सृष्टिचे कौतुक, जाण सारे ।1३।।
पाणी पहा मेघ पितात खारे,
देती परी गोड फिरुनि सारे;
तेणेंचि हा होय सुकाळ लोकी,
हे सृष्टिचे कौतुक, बा, विलोकी ।।४।।
ते तापले डोंगर उष्णकाळी
पाने तृणें वाळुनि शुष्क झाली;
तथापि तेथे जळ गार वाहे
झऱ्यातुनी, कौतुक थोर, बा, हे ! ।।५॥।
वठोनि गेल्या तरुलागि पाणी
घालावया जात न कोणि रानी;
वसंति ते पालवतात सारे,
हे सृष्टिचे कौतुक होय, बा, रे ! ॥६॥
June 11, 2026
तू तर काहीच कसे बोलत नाही
ना सुख, ना दुःख सांगत नाही
मन, नेहमी मुक्त मोकळे करावे
भावनांचा उद्वेग त्रस्त करत नाही
जगती जगणे हे क्रमप्राप्त आहे
तटस्थतेत, मना मन:शांती नाही
सहोदरी भावनांच निश्चिंती आहे
अलिप्ततेत जीवनी सुखदा नाही
पराधीनता हा जीवाला शाप आहे
भोग भोगण्या दूजा उ:शाप नाही
तो एक अनामिक सृष्टिचा निर्माता
त्या शरण जाण्यावीण पर्याय नाही
मित्रत्वाचा सुखद संवाद चैतन्यदायी
त्यावीण इथे जगण्यासही अर्थ नाही
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र १३९.
२२ - ५ - २०२२.
June 8, 2022
आला श्रावण मेघ नभातील दूर दूर चालले
येता हळुच सर मेघांमधूनी मी ईंद्रधनु पाहिले ।
कधी ऊन तर कधी पाऊस हा खेळ असे चालला
पाहूनी हिरवळ भासे कुणी शालू हिरवा तो नेसला ।
तुडुंब भरूनी नदी निघाली प्रिय सागर भेटीला
ओढ लागली मीलनाची आता दिसे न काही तिला ।
तरारली पिके शिवारी शेतकरी बहू हरखला
अती आनंदे त्यास पाहता मम जीव सुखावला ।
ऊन पावसाचा खेळ हे लक्षण श्रावण मासाचे
त्यास जोडून येती दिवस किती गोड आनंदाचे ।
माहेरवाशीण कुणी वाट पाहते या श्रावणमासाची
मंगळागौर अन् नागपंचमी ही पर्वणी माहेरपणाची ।
असाच श्रावण सदा बहरु दे माझीया हो अंगणी
पियासंगे मग गाईन सखे मी मंजुळ गोड गाणी ।
सुरेश काळे
सातारा
मो. 9860307752
दि. २ सप्टेंबर २०१८
September 2, 2018
आवडीने भाव हरि-नाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।
नको खेळ करु कोणत्या गोष्टीचा ।
पति तो लक्ष्मीचा जाणतसे ।
संकळ जीवांचा करितो सांभाळ ।।
तुज मोकलील ऐसे नाही ।।
जैसी स्थिती आहे तैशा परि राहे ।
कौतुक तू पाहे संचिताचे ।।
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा ।
हरिकृपे त्याचा नाश झाला ।।
June 11, 2026
चांदणी मी गगनांतील,चमचम,चमचम चकाकती,
कोण आहे तोडीस तोड,
पुढे यावे अंतराळातुनी,---
न कुठला नखरा,
न कुठली रंगरंगोटी,
का न मानावे देवा,
ही त्याचीच किमया मोठी,--!!!
रंग आमुचा नैसर्गिक,
दुधी म्हणू की पांढरा,
लखलखतांना,पुढे-मागे,
कसा दिसे आमुचा तोरा,--!!!
जेव्हा उगवतो आम्ही,
थोडा प्रकाश अवती,
चंद्रराजाचा डामडौल पहा,
चांदण्या त्यात किती रंगती,--!!!
इतरही त्याच्या सर्व सख्या,
पट्टराणी त्याची पौर्णिमा,
कधी--कधीच उगवते ना,
रात्रींमांजी साथ द्याया,--?
आमुचा जथा येई रोज ,
चंद्रम्याच्या बरोबरी,--
त्याविना कसे भागवील,,---
सांगा,तुम्ही आता तरी,--?
© हिमगौरी कर्वे.
January 1, 2020
खेळत होता बाळ अंगणीं इकडूनी तिकडे
मेघनृत्य ते बघत असतां दृष्टी लागे नभाकडे
उलटी सुलटी कशी पाऊले घनांची पडत होती
लय लागून हास्य चमकले त्याच्या मुखावरती
तोच अचानक गडगडाट झाला एक नभांत
दचकून गेले बाळ तत्क्षणी होऊन भयभीत
धावत जावून घरामध्यें आईला बिलगले
वाचविण्या त्या भीतीपासून पदराखालीं दडले
जरी थांबला गडगडाट भीती कायम होती
आवाजाचे नाद अद्यपि कानीं त्याच्या घुमती
भीतीने नजिक चिकटला आईच्या जवळीं
धडकन ऐकूं आली त्याला पुनरपि त्यावेळीं
गडगड धडधड आवाजाचा धसका घेवूनी मनीं
तोंड लपविले हळूंच जाऊन गादीमध्यें त्यानी
पिच्छा न सोडी आवाज अजूनी बसली ज्याची भिती
श्वास वाढूनी, स्वह्रदयाची धडकन होती ती
तगमग बघूनी बाळाची ती थोपटे मांडीवर आई
निद्रेच्या तो अधीन झाला ऐकून मधूर अंगाई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 18, 2021
Shabdaraanjan.blogspot.in
January 7, 2017
ती आल्यावर
बाग बहरली ,घेत उखाणे ती आल्यावर
सुरू जाहले ,नवे तराणे ती आल्यावर
मीच टाळतो,पितही नाही,पाजत नाही
सरले सारे ,जुने बहाणे ती आल्यावर
मुलगा गेला हातामधुनी माय सांगते
चालू झाले हे गाऱ्हाणे ती आल्यावर
पदरी पडले रत्न देखणे तिच्या सारखे
घरही झाले असे शहाणे,ती आल्यावर
किती जाळले सूर्याने मज ती नसताना
नभात जमले मेघ दिवाणे ती आल्यावर
मनात माझ्या गीत हरघडी नवे जन्मते
सहज बोलणे,होते गाणे,ती आल्यावर
ती आली अन सुचू लागली मला शायरी
पंख लाभलेली उड्डाणे,ती आल्यावर
© जयवंत वानखडे,कोरपना
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५
December 19, 2018
नको रायगडा, तू रडू नकोस
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
शिवस्पर्शाची पावन धूळ मी मस्तकी लावताना
तू विषण्णपणे हसला होतास
अन् काळजाला हात घातल्यागत तुझी जखम वाहू लागली
तुझ्या तोंडच्या शिवकथा ऐकताना
ढासळणारी मातीही जीव गोळा करुन थांबली होती
गादीवरच्या खादीमध्ये गहाणलेली मराठी अस्मिता
पाहून तू वेडापिसा झाला होतास
तुझ्या असहाय नजरेत तरळणाऱ्या अश्रूंना
केवळ मीच साक्षीदार होतो
पण नको, रायगडा तू रडू नकोस
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
डोळ्यांत घुमारे, गळा दाटलेला नि मी निर्धारलो
धुमसती आग 'हरहर महादेव' नाही अजूनी विझली
पवित्र तुझ्या मातीशपथ ती मी जागवीन
निद्रिस्त निखाऱ्यावरील राख प्राणपणाने फुंकीन
शिंपणाने रक्ताच्या, स्वाभिमान मराठी फडकत ठेवीन
अन् तुजवरला एक पत्थर जिवंत पाहून तू कृतार्थलास
आतातरी रायगडा, तू रडू नकोस
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
न पाहवे बेईमानी पिढीची तुझ्याच, तुझ्याशी
न साहवे तुला मराठी रक्ताची उदासीनता
तुला जाणवे नाद टापांचा अजूनी
व्याकुळसी तू भारावसी फिरुनी फिरुनी
जिथे नित्यनेमे मिरवलेस पाऊल भाळी जयाचे
कुठे स्मरण कोणा इथे त्या महामानवाचे
तुझ्या वृद्ध डोळ्यांत अजून साकारे
तुला न अप्रूप ना अपूर्वाई तीनशेव्या सोहळ्याची
शल्य तुझे असावे- कारण तुला ठावे
पुनः स्मरणासाठी अजून वर्षे तीनशे जावयाची
पण आता आश्वस्त रायगडा तू रडू नको
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
-- यतीन सामंत
October 25, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti