(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • आनंदाच्या हिंदोळ्यावर (लावणी)

    आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलते साल नवं नवं
    राजसा प्रीत पाखरांचे उडवा हो तुम्ही थवं ।।धृ।।

    नव्या सालातील नवी सांज ,नटून बसले हो मी।।
    अजून सजणा नाही आले,घायाळ हरणी हो मी।।
    उगाच कावं उशीर केला,मनास या होती घावं।।
    राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।१।।

    साज सरली रात्र झाली, भेटीलागी मी आतुरली।।
    विरहणीची व्यथा न्यारी,
    अजून तुम्हा ना कळली ।।
    उर धडधडे काया थरथरे, नका टाकू डावं
    ।।
    राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।२।।

    रात्र सरली पहाट झाली,एकलीच मी झुरली।।
    जडावलेल्या पापणीला,
    ओढ तुमचीच लागली।।
    नको छळणे प्रीतीत रमणे,नाही तुम्हा का ठावं।।
    राजसाप्रीत पाखरांचे उडवा हो तुम्ही थवं ।। ३।।

    हुरहुर माझ्या मनी दाटली,प्रियतम हा कुठं
    ।।
    प्रीतीत कुणाच्या अडकला का,प्रश्न मनी या उठं।।
    माझ्या प्रीतीचा नजराणा,कमी पडला का हो रावं।।
    राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।४।।

    -- सौ.माणिक शुरजोशी

  • प्राणवायू – शिवशक्ती

    सारेच आहे प्रभूमय,
    अणूपासून ब्रह्मांड होय...१,

    ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा,
    आकाश भाग हा ब्रह्मांडाचा....२,

    सर्वत्र व्यापले आकाश,
    न जाणती त्याचे पाश, ....३,

    वायूचा होवून संचार,
    जीव जंतू जगविणार....४

    वायू असे शक्तीचे रूप,
    पेटवी तो प्राणदीप....५,

    प्राण आपल्या अंतरी,
    तेच असे रूप ईश्वरी....६

    जसे शिव आणि शक्ती,
    तसे प्राण व वायू असती...७,

    बाहेरची वायू शक्ती,
    अंतरिच्या प्राणास भेटती....८,

    जाता दोन्ही एक होवूनी,
    चेतना मिळते जीवनी...९
    - डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कधी वाटते

    कधी वाटते,
    कोसळता पाऊस व्हावे,
    रपरप पडत धरणीला,
    सर्वकाळ बहरत ठेवावे,---

    कधी वाटते
    उसळणारा दर्या व्हावे,
    विशाल रूप बघणार्‍यांना,
    चकित करून सोडावे,---

    कधी वाटते
    लख्खकन आभाळी चमकावे, प्रचंड मोठी वीज होऊनी,
    पृथ्वीला भारावून टाकावे,---

    कधी वाटते
    घनगर्द अरण्य व्हावे,
    भयभीत आकार पाहुनी,
    इतरांनी गर्भगळीत व्हावे,---

    कधी वाटते,
    झुळझुळणारा झरा व्हावे, आपल्याच धुंदीत मस्तमौला, सगळीकडे थेंब लुटावे,---

    कधी वाटते,
    वळसेदार नदी व्हावे, गावाला कुशीत घेऊनी,
    त्याची प्रेमळ आई बनावे,---

    कधी वाटते,
    गगनांगणी मेघडंबरी व्हावे, विविधरंगी पंचमी खेळत,
    धरेवरील सृष्टीला न्याहाळावे,--!!!

    हिमगौरी कर्वे ©

  • खरा आस्तिक

    नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं
    विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी //

    चार पुस्तके वाचूनी त्याचे, तर्कज्ञान वाढले
    दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले //

    नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी
    समजूनी ह्याला "अंध विश्वास" , देई फेटाळूनी //

    आधुनिक होते विचार त्याचे, कलाकार तो होता
    पृथ्वीवरील घटणाना परि , योग म्हणत होता //

    काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति, देखील ती
    नाव प्रभुचे त्या वातावरणी, कुणी न घेती //

    प्रेमळ त्याचा स्वभाव असूनी, चित्त तयाचे स्वछंदी
    रहात होता सुंदर बंगलीं, अतिशय आनंदी //

    छंद तयाला फुलझाडांचा, बाग केली छान
    विविधतेची झाडे झुडपे, दिसे शोभावान //

    दिवसभराचे कष्ट करुनी, फुलवित असे बाग
    सुवास सारा दरवळूनी, डोलती तेथे नाग //

    पक्षी आणि प्राणी जमवूनी, संग्रहालय दिसले
    आवाजांचे सूर निघूनी मग, मधूर ते भासले //

    मोर नाचे थुई थुई तेथे, नभी येता ढग
    आनंदाला सिमा पडेल, कशी तेथे मग //

    सारे होते नयन मनोहर, त्या वातावरणीं
    संबोधित होता त्या वास्तूला "निसर्ग " तो म्हणूनी //

    वेड लागुनी तन्मय झाला, सौंदर्याच्या ठायीं
    निसर्गातील रस सदैव, शोषित तो राही //

    नास्तिक तो अन् ईश्रर नसे, ही त्याची धारणा
    परि तोच भासला खरा आस्तिक समरस होतांना //

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • उघडेल कधी दरवाजा

    उघडेल कधी दरवाजा,पक्षी पिंजऱ्यातून उडेल,
    संपतील तणाव चिंता,
    स्वातंत्र्य असे उपभोगेल आनंदाच्या त्या क्षणा, ----
    मोल देत कसा नाचेल ,
    भरारी घेत आभाळा,
    उराशी आपुल्या कवटाळेल, स्वातंत्र्याची नुसती कल्पना,
    सतत रुंजी घालत राहील,--- इवल्याशा त्याच्या मनात,
    *मुक्तीचा आनंद भरेल,
    विश्वास ठेवू तरी कसा,
    मनी भावना उफांळेल,---
    सुटली ही भयानक कारा
    ज्याक्षणी त्याला आंकळेल, भोवतालच्या साऱ्या जगां,
    आता आपल्या कवेत घेईल, झुगारून तुटक्या बंधनांना,
    जगावर साऱ्या राज्य करेल,---
    आता कशा असंख्य वाटा,
    जीव कसा आनंदेल,
    स्वर्गीय स्वरूपीं समाधानां,
    हृदयात तो सांभाळेल,---
    अवलोकत पूर्ण क्षितिजा ,
    कसा‌ मग तो भिरभिरेल,
    पाहून येईल मोक्षद्वारा ,
    जिथे जाणे अंती असेल,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

  • राधेचे मुरली प्रेम

  • पुढाऱ्याचा शब्द

    वर्षानुवर्षे आम्ही संघर्षच करतोय
    पुढाऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवतोय ----

    उद्योग धंद्यावर मंदीचे सावट
    आहे त्याच रोजगारात घट
    हाताला काम नाही
    बेकारांचा आकडा फुगतोय
    वास्तवाचं भान हरवलेला तरुण
    आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
    दोन कोटी रोजगाराचा शब्द
    मेघा भरतीवर टळतोय --------

    दुनियेचा पोशिंदा
    मुठीने पेरून रास उभारतो
    विस्कटता पुन्हा सावरतो
    भाव मिळेल औन्दा
    सोन्याचं पीक कवडीमोल विकतोय
    आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
    हमीभावाचा शब्द
    कर्जमाफीवर टळतोय -------

    जातीधर्माचा नामानिराळा
    सारेच एकीने वसती
    इतिहास आहे साक्षी
    सारेच इमान मातीशी राखती
    सर्व धर्म समभावाचा मानस
    आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
    साऱ्यांच्या विकासाचा शब्द
    आरक्षणावर टळतोय -------

    लिंक रोड समृद्धी महामार्ग
    मेट्रोचा गवगवा
    डोईवर घागर घशाला कोरड
    भर पावसाळ्यातही तहानलेला
    थेंबा थेंबा साठी आरड
    टँकरची वाट पाहणारा
    आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
    जलयुक्त शिवाराचा शब्द
    दुष्काळावर टळतोय --------

    कर्ज बुडव्यांना पळवाट
    जगाच्या पाठीवर कुठेही वहिवाट
    गरिबास आट
    नुसत्या जाहिरातीचा घाट
    भांडवलासाठी कौशल्य झिजवतोय
    आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
    पंधरा लाखाचा शब्द
    चुनावी जुमला म्हणून टळतोय ------

    वासनांध भर दिवसा
    देहाची लक्तरे ओरबाडतो
    फाशीची शिक्षा होणाराही
    दिरंगाईमुळे सुटतो
    न्याया पुढे नथमस्तक देह
    आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
    सुरक्षतेचा शब्द
    चौकीदारावर टळतोय --------

    सळसळत्या रक्ताला
    शिवरायांचे वरदान
    जन्म महाराष्ट्राच्या मातीतला
    जगण्याचा अभिमान
    सागरी तटही आसलावूनी
    आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
    शिव स्मारकाचा शब्द
    आराखड्यावर टळतोय ---------

    -- असलम अंबर शेख

  • पाऊस आणि ती

    खूप भूक लागलेली आहे.
    पाऊस सुद्धा खूप पडत आहे.
    तिचं घर सुद्धा दूर आहे.

    नाईलाज म्हणून पावसात भिजत घरी जावं !
    घरातून कांदे भजी चा वास यावा .
    त्या वासात चहा चा सुद्धा वास मिसळलेला असावा.
    आत मधून आपली "ती" गप्पाटप्पात रमलेले खिडकीतून दिसावी .....

    आपण door bell वाजवत रहावी .......
    नंतर, कड़ी वाजवत रहावी ........
    नंतर, दार वाजवत रहावं .......

    तरी ही "तीने" दार उघडू नये ........

    पोटात आग !
    अंगावर पाऊस !
    "तिच्या" वागण्याने ह्रुदयlला वेदना ....!!!

    अगदी अस्सचं होतं बघा ......

    जेंव्हा "ती" Online असूनही Reply देत नाही तेंव्हा ...!!!!

    -- विनोद डावरे, परभणी.
    9765 998 999

  • माणसं अन माणुसकी नसलेली घरे

    कुणीच कुणाच्या जवळ नाही,
    हीच खरी समस्या आहे,
    म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी,
    आणि अमावस्या जास्त आहे .

    हल्ली माणसं पहिल्या सारखं,
    दुःख कुणाला सांगत नाहीत,
    मनाचा कोंडमारा होतोय,
    म्हणून आनंदी दिसत नाहीत .

    एवढंच काय,एका छता खाली राहणारी तरी ,
    माणसं जवळ राहिलीत का ?,
    हसत खेळत गप्पा मारणारी ,
    कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?

    अपवाद म्हणून असतील काही,
    पण प्रमाण खूप कमी झालंय,
    पैश्याच्या मागे धावता धावता,
    दुःख खूप वाट्याला आलंय.

    नातेवाईक व कुटुंबातले,
    फक्त एकमेकाला बघतात,
    एखाद दुसरा शब्द बोलतात,
    पण काळजातलं दुःख दाबतात.

    जाणे येणे न ठेवणे,न भेटणे , न बोलणे,
    या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका ,
    गाठी उकलायचा प्रयत्न करा ,
    जास्त गच्च होऊ देऊ नका.

    धावपळ करून काय मिळवतो ,
    याचा जरा विचार करा ,
    बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा ,
    आपल्या माणसांची मनं भरा .

    एकमेका जवळ बसावं बोलावं,
    आणि नेहमी नेहमी,
    तिरपं चालण्याच्या ऐवजी,
    थोडं सरळ रेषेत चालावं

    समुद्री चोहीकडे पाणी ,
    आणि पिण्याला थेंबही नाही,
    अशी अवस्था झालीय माणसाची ,
    यातून लवकर बाहेर पडा.

    चर्चा करून उपाय शोधा,
    नसता Convent , CBSE,MBA , IIT , MS ,पॅकेज,
    Business & managements skill, Second Home , Europe Tour, Registry , Dimond Jwelary ,
    याला काहीही अर्थ उरणार नाही

    माणसं अन माणुसकी नसलेली घरे,
    अन देव नसलेले देव्हारे ,
    कितीही पॉश असले ,
    तरी त्याचा काय उपयोग ..

  • गवाक्ष

    जीवनप्रवाहात खूप काही मागे सुटतं. पूढे पूढे चालतांना जरी वाट दिसत असली तरी नियती चा मोठ्ठा धोंडा आला की प्रवाह भरकटतो. आणी जे हवंय ते मागे ,खूप मागे सुटून जातं. पण सतत प्रवाहीत असणे हा निसर्ग नियम पाळायलाच हवा.