कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ?
मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ?
खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ?
ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ?
पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ?
पैसा मुलांसाठी ठेवून ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ?
सारे कळूनी वळत नसते, तत्व हे जाणून घ्याल कां ?
उपयोग करूनी ज्ञानाचा, जीवन चांगले कराल कां ?
सारे आहे प्रभूचे समजून, शांत चित्ताने जगाल कां ?
दया क्षमा शांती हे गुण, अंगी आपुल्या बाणाल कां ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तो जेवण करत नाही,
तो आठवणी तयार करतो.
जिथे शब्द फिकट होतात,
तिथे चवीतून कथा बोलतात.
आचेवर ठेवलेलं भांडं
हळूहळू उकळत राहतं,
तसंच काहीतरी
त्याच्या आतही शिजत राहतं.
तो शब्द न वापरता सांगतो,
प्रेम आणि आठवणी हळू हळू गुंतत जातात.
चवीत मिसळलेले प्रेम,
शब्द न बोलता हसतं, रडतं, जिवंत राहतं.
लोक येतात, खातात,
“खूप छान आहे” म्हणतात,
पण कुणी विचारत नाही
तो इतका शांत का आहे?
तो न बोलता बरंच काही सांगतो,
ताटात मिसळलेल्या प्रेमाने,
जगण्यात गोडवा येतो,
आणि
शांततेच्या तृप्ततेची अनुभूती मिळते.
कारण त्याला समजलंय,
येथे भावना शब्द नसतात,
त्या चवीत मिसळून,
लोकांच्या हृदयात जिवंत राहतात..
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
पर्यावरणविषयक लघुकाव्ये….
बागेतील तारका –
उचंबळूनी येतील शब्द, हृदयामध्ये दडले जे ।
संदेश असता सर्वांसाठी, कुणी न म्हणतील ते माझे ।।१
जे जे काही स्फूरूनी येते, जेव्हा अवचित समयी ।
हृदयामधली हाक असे, ठरते आनंद दायी ।।२
‘आनंद’ आहे कोणता हा, अन् येई कोठूनी ।
अंतर्यामी सर्वांच्या , सदैव राही बैसूनी ।।३
बाहेर पडूनी झेप घेई दूजा हृदयावरी ।
तेथेही जो आनंद बैसला. स्वागत त्याचे करी ।।४
पटे मनाला विचार , रूचणारा जो असे ।
हृदयामधला हाच आनंद, स्फूर्ती देवता भासे ।।५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मह्या शेतातलं पिकं,
कस डौलतया तोर्यातं,
शेतं हिरव हिरवं,
मन हारके सुखानं.
नभ ढगाळ ढगाळ,
झोंबी झोंबाडं गारवा,
मना सुखवी शिळानं,
पिक नाचे शहारून.
ढगं बरसती थेंब थेंब,
मोती पखरले शेतातं,
त्याचा लेऊन शिंगार,
पिकं डौलते डौलात.
हिरवले रानं वनं,
गेली सृष्टि गोंजारूनं,
पशु पक्षी चहकती,
कोकिळं करीते गुंजनं.
पशु,पक्षी,झाडं,वेली,
अवघी धरा उल्हासली,
आला महेरचा पाऊस,
वसु गेली हारकुनं......!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
भगवान श्रीकृष्ण
-- स्वाती ठोंबरे.
लाट उसळतां क्रोधाची, बळी घेतले कित्येकांचे,
हिंसाचाराच्या लाटेमध्यें, सर्वस्व गमविले कांहींचे ।।१।।
फार पुरातन काळीं आम्हीं, चालत होतो एक दिशेनें,
कुणीतरी पाडुनी वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने ।।२।।
त्याच क्षणाला बीज रूजले, धर्मामधल्या विषमतेचे,
ईश्वराकडे जाण्याकरितां, मार्ग पडती विविधतेचे ।।३।।
विविधतेनें संघर्ष आणिला, भेदभावाची भिंत उभारूनी,
विवेकाला गाडून टाकले, उफाळणाऱ्या भावनांनी ।।४।।
चूक कुणाची सजा कुणाला, कालचक्राची रीत न्यारी,
धर्म पंथांचे मार्ग आखूनी, सलोख्यात निर्मिली दरी ।।५।।
कमी न होईल अंतर हे, केवळ दुजा धर्म जाणतां,
एकत्र येवूं तेव्हांच सारे, ईश्वरास तो एक समजतां ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti