येता तुझ्या चरणांशी,
पंढरीनाथा,वेगळी प्रचिती,
लौकिकाचे काटे बोचती,
पण अद्वैताचीच अनुभूती,--!!!
अलौकिकाचे आम्ही प्रवासी,
स्वर्ग आमुचा पंढरी,
जन्मोजन्मी आंस तुझी,
अनंतकाळाचे रे वारकरी,--!!!
हिमगौरी कर्वे. ©
August 23, 2019
November 29, 2021
वेलीवरचा मोगरा आजही गंध वाहतो
तुझ्या रूपाचे अजून गीत गातो..
तुझ्याच गंधित आठवणी साठवत
निरोप घेताना दरवळून जातो..
ओंजळीत घेता दव पाकळ्यांचे
अत्तर ह्दयीचे शिंपून जातो..
तू नसतानाही असण्याची साक्ष
सुगंधीत मोगरा देवून जातो.
July 15, 2026
July 7, 2012
सतत फिरत राही, चक्र जीवनाचे
विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१
सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी
देह आणि मना, परिणाम करी ।।२
लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार
आनंद समाधान आशा, करी भावना साकार ।।३
जीवन विषयाचे, बनत असे वलय
रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय ।।४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 28, 2020
April 16, 2012
गुंतू नकोस, प्रीतीत वेडया जीवा
निस्वार्थी! नूरली प्रीती ही मानवा ।।धृ।।
वनांतरी सीता, सुख त्यागी रघुराजा
हनुमंत दावी, हृदयीचे रूप रघुराया
रक्ताळला हरि, काटे बोचता सुदामा
पांचालीची, लज्जा राखे मुरलीवाला
भाव भक्तीप्रीतीचा हा कुणा सांगावा ।।१।।
अर्थ प्रीतीचा अर्थ! अर्थची रे गुणवत्ता
नटली प्रीती नाटकी, बेगडी हसूं आता
औपचारिक, पोकळ प्रीतीभाव आता
नका दुःख ते सांगु, सुख तेवढेच सांगा
निष्पाप! भाव प्रितीचा कसा जाणावा ।।२।।
जोवरी शिजती शिते, तोवरी येती भुते
यौवनी, दाटते मिठी, वृद्धत्वे रे दुरावा
नसता माया,नसे माया, रुक्ष जिव्हाळा
प्रीत, सारी विखुरलेली मृगजळी आता
निष्प्राण प्रीतीत, काय सुखदा मानवा ।।३।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ७.
७ - १ - २०२२.
January 23, 2022
आजकाल प्रत्येक गृहिनीला संध्याकाळी कोणती भाजी करावी. किंवा कोणता स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न असतो.शहरात तर सुट्टी असेल तर सर्रास लोक ढाब्यावर जेवायला जातात. त्यात मीही एक.
ढाब्यावर जायला नकोच वाटते.त्याच त्या पनीरच्या भाज्या?? कोल्हापुरी व्हेज,व्हेज तिरंगा,स्टार्टरला पनीर चिल्ली,सोयाबीन चिल्ली,मसाला पापड. ... . नुसता विचार जरी आला तरी असलेली भुक निघुन जाते.परंतु घराच्या किंवा मित्रांच्या आग्रहामूळे जावेच लागते.
पूर्वी लोकांना खायला नीट मिळत नव्हते.आणि आता सुग्रास ? भोजन असूनही भुक लागत नाही.
एकदा असाच निवांत बसलो असता लहानपनाच्या अनेक आठवणी डोळ्या समोरून तरळून गेल्या.
मला आठवतंय ग्रामीण भाग तेव्हा स्वयंपूर्ण होता.आमच्या कडे भाताची व नाचणीची लावणी झाल्यावर लोक बऱ्या पैकी निवांत असायचे. गणपती मध्ये पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असायचा.माझा नाना व इतर गावातील लोक मुरमाड असलेली किंवा डोंगर उतारावरील जमीन नांगरून त्यामध्ये हूलगे पेरत असत.कुणी उडीद,खुरासनी (काळे तीळ),भुईमुग पेरत असत. तर भात निघाल्यावर हरभरा,वाटाणा,मसूर,गहू पेरत असत.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे भाता बरोबरच भरपूर कडधान्ये होत असे.
गावाकडे हूलग्याच्या पिठापासून शेंगोळी सर्रास बनवली जात असत.माझी आई परातीच्या बूडावर खुप छान शेंगोळीचे वेढे बनवत असे.शेंगोळीच्या वेढ्याचे झणझणीत कालवण,भाकरी व कांदा ही एक वेगळीच फर्माईश असे.शेंगोळयाचा रस्सा भाताबरोबरही तितकाच चविष्ट लागत असे.दोन घास सरस अन्न पोटात जात असे.
हूलग्याचे कढाण (वरण) नुसते मीठ टाकून देखील छान चव लागायची.
अजून एक चविष्ट पदार्थ गावाकडे हमखास असायचा.तो म्हणजे हरबरा डाळ भिजत घालायची.नंतर पाट्यावर सरभरीत वाटायची.तव्यावर त्याचे छोटे छोटे सांडगे थोड्या तेलात परतायचे. नंतर त्याचे कालवण (रस्सा) बनवायचे.खूपच अप्रतिम चव असायची.
शेतातील कामासाठी जर माणसे असतील तर दुपारच्या जेवणाची मोठी लगबग असायची.मसूराची झणझणीत घट्ट आमटी,नाचणी किंवा तांदळाच्या भाकरी,गावाकडील बनवलेले पापड,कांदा आणि खडक्या किंवा रायभोग तांदळाचा भात हे जेवण मोठ्या पाटीतून शेतातील झाडाखाली आणले जाई.
लोक काम थांबवून ओढ्यात हातपाय धुऊन झाडाच्या थंडगार सवलीत पंगती करुन बसत असत.पितळीमध्ये भरपूर आमटी वाढली जाई.सोबतीला कांदा,लसणाची चटणी,पापड असे.लोक आमटीत भाकरी चुरुन खात असत.शेतात झाडाच्या सावलीला पंगतीत जेवण्याची मजा काही औरच असायची.
त्या काळी गरिबी असल्यामूळे अनेक महिला घरात अगदीच काही नसल्यास नुसत्या कांद्याचे (कांदवणी) कालवण करत असत. काही लोक मुद्दाम घरधनीनला आठवण करुन देत असत.आज कांदवणी कर बरका !.कांदा चिरायचा. तो तेलात तळायचा. त्यात मीठ मसाला घालायचा. पाणी घालायचे दोन उकळ्या आल्यावर कालवण तयार.तर मला हे कांदवणी खूपच आवडायचे.
हरबरे भिजत घालून ते भिजले की तव्यावर मीठ घालून परतायचे. चांगले खरपूस भाजायचे. हे भाजलेले हरबरे खाताना खुप चविष्ट लागायचे. खाक्या चड्डीच्या खिश्यात हारबरे भरून मी चवीचवीने हारबरे खात असे.
हे हरबरे खाता खाता मोठ्या माणसांच्या गप्पांच्या मैफली रंगत. त्यात रात्री भुतांच्या गप्पा ऐकताना मी भेदरुन जात असे. तरीही भुतांच्या गप्पा संपूच नयेत असे वाटे.
गावी रात्री आम्ही खेकडे पकडायला जात असू.नदीच्या किंवा ओढ्याच्या भल्या भल्या काळ्या खेकडी आम्ही आणत असू. काही खेकडाच्या कुड्या व नांगोडे तव्यात मिठाच्या पाण्यात शिजवून आम्ही सर्वजण त्यावर ताव मारत असू.ह्या कुड्या नांगोड्याची अप्रतिम चव अद्यापही जशीच्या तशी आहे.
नागपंचमीला महिला वरईच्या पीठाचे गुळाचे पाणी घालून लाडू करत. हे लाडू सुध्दा खुप चविष्ट लागत असत.
सर्वात आवडता पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे पेजवळया. (घावने) तांदूळ भिजवून सावलीत वाळत घालायचे.नंतर ते जात्यावर दळायचे.पेजवळ्या करण्यासाठी एक खास लोखंडी भांडे असायचे त्याला कहाल म्हणत असत. या कहाली मध्ये पेजवळ्या बनवल्या जाई. मटणाचा रस्सा बोंबील किंवा वाकटीचे कालवण पेजवळ्यां बरोबर खूपच छान लागत असे. काही लोक गुळवण्या बरोबर पेजवळ्या खात असत.
गावाकडे त्याकाळी अनेक देवलशी असत.कुणावरूंन तरी बकरे कोंबड्या ठरलेल्या असत. शिवाय लोक देवाला,शेतात किंवा रानात दरवर्षी कोंबड्या,बकरे कापत असत. रात्री बेरात्री आम्ही त्याठिकाणी जात असू.
भगताच्या अंगातील देव लोकाना सूचना देत असे. त्याप्रमाणे उतारा ठेवला जाई. पोटात भुकेचा डोंब उसळे. कधी एकदा जेवतोय असे होई. सर्व आटोपल्यावर पंगती बसत.त्या भयाण अंधाऱ्या रात्री नीरव शांततेत आम्ही मटणाचा रस्सा भरपूर मटनासह भाताबरोबर खात असू.काय सांगू? या रानातल्या रश्शाची चव काही औरच असायची.
गावाला सगळ्याकडे बोंबील,वाकट,सुकट,ढोमेली व खारामासा हे सर्रासअसायचे. दर आठवडयाला काही बाया हे सर्व विकायला घेऊन येत असत. हे सर्व भातावर खरेदी केले जाई.
बोंबलाची चटणी खुपच टेस्टी असायची.आम्ही बोंबलाचे तुकडे चुलीतल्या आहारात भाजून खात असू.शिवाय तव्यावर तळलेला खारामासा भाकरी बरोबर खाताना वेगळीच चव रेंगाळत असायची.
लसणाची चटणी हा एक फेवरेट atam असायचा. लसणाच्या पाकळ्या व लाल मिरची व मीठ पाट्यावर बारीक वाटून ते मिश्रण अगदी थोड्याशा तेलात तव्यावर तळायचे. झाली लसणाची चटणी तयार.खूपच छान चव होती.
गावात लग्न किंवा पूजा असेल तर आमटी भात व जोडीला शाकभाजी असायची. गावठी हारबरे,वाटणे,बटाट्याच्या फोडी इत्यादी पासून बनवलेली शाकभाजी आमटी भाताबरोबर छानच लागायची.
तव्यावर केलेली डाळीच्या पिठाची वाटोळी भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर खाताना वेगळीच मजा यायची.
उखळ।त काळे तीळ,लाल मिरची व मीठ कुटून बनवलेली कोंड तोंडी लावण्यासाठी छानच असायची.
तव्यावर केलेले मोकळं (सुक्क) बेसन हा एक अप्रतिम चवीचा पदार्थ असायचा.
उकडलेल्या अंड्यांचे कालवण सुध्दा beshच असायचे.
पूर्वी दुपार नंतर कातकरनी नदीचे मासे गावात विकायला घेऊन यायच्या. छोट्या पानावर वाटा असायचा. त्यावर नदीचे छोटे छोटे (चिंगळया) मासे असायचे. हे मासे तव्यावर बनवले जात असत. या माशांची चटणी भाकरी बरोबर छानच लागत असे.
हळद मीठ लाऊन मडक्यात मुरत ठेवलेल्या कैऱ्या भाकरी बरोबर खाण्यात वेगळीच खुमारी होती.
गावाला अनेक भाज्या केल्या जात असत.कौदरीच्या सोंडग्याची भाजी,भोकरीच्या कोवळ्या पानांची मुटकी,कुर्डूची भाजी,वाळवलेल्या भोकराची भाजी,चिलुची भाजी,सायरीच्या फुलांची भाजी,ते-याची भाजी,चैताची भाजी अशा अनेक रानभाज्याची चव छानच असायची.
गावात लहान मुलाचे नाव ठेवायच्या वेळी किंवा वीर (देव) नाचवायच्या वेळी मीठ घालून उकडलेले गहू सुध्दा छानच चवदार लागायचे.
पूर्वी लोक घराच्या पाठीमागे भाज्या लावत.अळू,डांगर भोपळा,दोडका,कारली,घोषाळी,काकडी यांचे बी पेरत.यापैकी कोवळया काकडीचे कळे खायची मजा औरच असायची.शिवाय भोपाळघारी,भोकाचे वडे,काकडीचा गर तांदळाच्या पिठात गुळ कालऊन हाळदीच्या पानात बनवलेले पातोळे खुपच छान असायचे.
फास्ट फूडच्या जमान्यात मात्र हे सर्व पदार्थ नामशेष झाले किंवा होत आहेत.त्यामुळे मात्र हार्ड,रक्तदाब,बद्धकोष्ठ,शुगर अपचन वेगवेगळे पोटाचे आजार मात्र ओढऊन घेत आहोत. कळतंय पण वळत नाही.असेच म्हणावे लागेल.
श्री.रामदास तळपे मंदोशी
July 27, 2024
अरे संसार संसार, मालिकांच्या काट्यावर
आधी नारी सोफ्यावर, ब्रेकमधे मग कुकर
अरे संसार संसार, गोजीरवाण्या ह्या घरांत
एकापेक्षा एक इथे, अग्रिहोत्री जे वाडयात
अरे संसार संसार, चार दिवस सासूचा,
आहे मग कुलवधूच्या, भाग्यलक्ष्मीच्या कुंकवाचा
अरे संसार संसार, ह्याला जीवन ऐसे नाव,
पिंजरा त्याले म्हणू नये, तिथे वारसाचा ठाव
अरे संसार संसार, लज्जतदारशा मेजवानीचा
चारचौघी सुगरणींचा आणि सार्या खवय्यांचा
अरे संसार संसार, असंभवही घडण्याचा,
वादळवाट आली तरी, अनुबंध ठेवण्याचा
अरे संसार संसार, अवघाची हा संसार
सारेगमप सारखा, सूर-लय-तालावर
-- सौ. अलका वढावकर
February 16, 2016
सखया तुझ्याचसाठी,
मन माझे अंथरले,
पायरवाने रे तुझ्या,
हर्षभरित ते जाहले,
सखया तुझ्याचसाठी,
डोळ्यात दिवे लावले,
पंचप्राणांच्या ज्योतींनीं,
मनोमन तुझं ओवाळले,
सख्या तुझ्याचसाठी,
हृदयाचे सिंहासन केले,
विराजमानी त्यावर तुला,
स्वप्न डोळा पाहिले,
सख्या तुझ्याचसाठी,
ओठी गीत स्फुरले,
शब्दांचे हार करुनी,
फक्त तुज अर्पियले,
सखया तुझ्याचसाठी,
चित्ती उगा थरारले,
नवथर भावना कल्लोळी,
रात्रंदिन बघ हिंदोळले,
सखया तुझ्याचसाठी,
प्रेमरस ना उफाळले, शृंगाराच्या कल्पनांनी
अंगांग माझे शहारले,
सखया, तुझ्याचसाठी,
स्त्रीत्त्व सार्थ वाटले,
सर्वस्व रे अर्पायला,
"सिद्ध" मी जाहले,---!!!!
हिमगौरी कर्वे.©
February 15, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti