जरी मी संपलो इथे
प्रवास संपणार नाही
चार लाकडांसोबत
माझा ध्यास जळणार नाही
राख निजेल मातीच्या कुशीत
स्वप्ने निजणार नाही
राहतील रेंगाळत येथेच
पण सावली दिसणार नाही...
मायमराठीचे काव्यरत्न
कविवर्य मंगेश पाडगावकर
प्रथम पुण्यस्मरण
३० डिसेंबर २०१६
प्रेमाची शांतता'
प्रेमानंतरची शांतता
ती आणि तो
यांच्यामधील शांतता...
वादळापुर्वीची शांतता...
वादळानंतरची शांतत...
.....आणि मग आपण दोघे
जेव्हा उरतो तेव्हाची शांतता...
कधी कधी आपण एकमेकांना
एकत्र असताना विसरतो
तेव्हाची शांतता.....
खुप प्रकारआहेत शांततेचे..
पण ' प्रेम ' हे एकच असते..
जे शांतता निर्माण करते
आणि 'बि' घडवते देखील...
ती....मी...प्रेम...आणि
..शांतता...
एकाच त्रिकोणाची चौथी
बाजू..
म्हणजेच..
शांतता...
शोधू नका
अपोआप सापडेल....
-- सतीश चाफेकर.
जीवनांतले चित्र पालटूनी, रंग ते बदलले
जनी जनार्दन ठरविले, सारे काय मिळविले ।१।
सुंदर तसबीर एक आणली, देवी श्री लक्ष्मीची
श्रद्धेचे भाव गुंतविले, पूजा करूनी तिची ।२।
शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले, कष्टानें सारे
शरीर होते चैतन्यमय, आणि धडपडणारे ।३।
रंग बधितले जीवनांतील, विविध छटांचे
सजविण्यास लागते त्या छटांना, बळ संपत्तीचे ।४।
ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां, एक ठिकाणी असे
प्रसन्न करण्या धन लक्ष्मीला, अडचण येत नसे ।५।
शक्ति, युक्ति, बुद्धी एकटवूनी, परिश्रम केले
धनराशीचे अल्प भांडार, त्याने जमविले ।६।
तेज चमकले त्याच्या जीवनीं, धन लक्ष्मीचे
समजूं लागला फार सुखी, क्षण कर्तृत्वाचे ।७।
माहीत नव्हते लक्ष्मी असते, चंचल स्वभावी
केव्हां येईल जाईल कशी, भंरवसा तो नाहीं ।८।
चालत असतो खेळ नियतीचा, गमतीनें सदा
कुणाचे फांस कसे पडतील, कळेना अनेकदां ।९।
कमाईस त्याच्या ओहोटी लागली, व्यवहारामध्यें ती
प्रयत्न सारे फोल ठरूनी, अपयश येती ।१०।
निराश बनले जीवन सारे, अंध:कार झाला
दु:खाच्या त्या चटक्यामध्यें, जीव होरपळला ।११।
मार्ग बदलले पूर्ण तयानें, आपल्या जीवनाचे
धन कमविणें लक्ष नव्हते, त्याच्या प्रयत्नांचे ।१२।
वाचन करूनी चिंतन केले, मन रमविण्या चित्ताला
ध्यान साधना देवूं लागली, आनंद त्याला ।१३।
विसरूनी गेला हलके हलके, दु:ख निर्धनतेचे
काव्य लेखनानें उघडले द्वार, नव जीवनाचे ।१४।
चकीत झाला एके दिवशीं, बघूनी तसबिरीला
श्री लक्ष्मीचे ठिकाणी सरस्वतीचा, बदल कुणी केला ? ।१५।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये ।
तेल नाही म्हणून पाण्याऐवजी मेणबत्ती लावू नये ।
पारिजातकाच्या सड्यासारखे रक्ताचे थेंब पडताना ।
बाँबस्फोटचे आवाज, तलवारी नाचताना ।
भ्यायलेल्या हरिणीसारखे घरात लपताना ।
रोषणाईच्या माळा मला भावतच नाही ।
असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये ।।१।।
पु़ढार्यांच्या भूलथापांना भाळून जाण्यासाठी ।
करंट्याचा जन्म आमुचा असतो मरण्यासाठी ।
त्यांच्या खुर्चीखाली असते जीवन सरण्यासाठी ।
ते मात्र निर्लज्जपणे दारोदारी फिरतात मतांसाठी ।
असे वाटते की... ।।२।।
एन्रॉनचे फुगे उडताना आमच्या घरी रॉकेल नाही ।
भ्रष्टाचार करताना यांची पोटे फुटत नाही ।
करंज्या कडबोळी खायला आमच्या घशात दात नाही ।
गरीबांना घरे देताना घरांवर नांगर फिरल्याशिवाय रहात नाही ।
असे वाटते की... ।।३।।
-- चंदाराणी कोंडाळकर
वरसगांव, कोलाड
न पेलवी अर्थ
न पेलवी शब्द
लक्ष्यभेद न करी
बरेचदा अर्थ...
अर्थबोध न होता
मनव्यापी मन शांतता
मन तरंग शोषुन
व्यर्थ उरतो प्रत्येकदा
शोधित फिरतो
त्या प्रेमळ जागा
जया न विस्कटती
तरल आकृतीबंध
न करती त्रागा....
खरी कविता गवसते
जेथे लयबध्द श्वास
अन् मनाचे मौन वसते !
--डाॅ.दीपक सवालाखे,
यवतमाळ,
सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं
सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी....१,
भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा,
काळाची ती भूक असूनी, माहीत असते सर्वांना....२,
अविरत चालू लपंडाव , जगण्या मरण्याचा
शेवट हा जरी निश्चीत असला, हक्क तुम्हां खेळण्याचा....३,
खेळती काही तन्मयतेने, रिझविती इतरजणां,
खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां....४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
श्रीरामा, घन:श्यामा,sssss---घनघोर या काननी,
किती पुकारु तुमच्या नावा,ssss-
लक्ष्मण भावजी गेले सोडुनी,--!!! .
अयोध्येस परतल्यावरी,
बसले मी राणीपदी,
आदर्श जोडप्याचा मान देऊनी जनतेने केले धन्य जीवनी,--
त्यातच आणखी गोड बातमी,
स्वर्गच दोन बोटे राहिला,--!!!
कुणाची नजर लागली,
ग्रहस्थिती विपरीत फिरली,
तुम्ही का सोडले मज रानी,
जावे कुठे एकाकी मी आता,--!!!
मनोरथे सगळी संपली तुमची सेवा मनी राहिली,
असे काय घडले सांगा तरी,
काय चुकले माझे, पुरुषोत्तमा--!!!
या रानीवनी मी एकटी,
काट्यांत कोवळी कळी, हिंडताना-- भरकटलेली,
या भयानक अरण्यी,
नाही मज कुणीच त्राता,--!!!
कुळाचा आपुल्या वंश पोटी,--
जीव वाढे, माझिया ओटी,--
पतीने पण सोडल्यावरी,--
काय सांगू त्या लेकराला,-!!!
उद्ध्वस्त सीता, उध्वस्त जानकी उध्वस्तताच या तिन्ही लोकी,
कुठले राज्य कुठला पती,
अर्थच जीवनात न राहिला,--!!!
हिमगौरी कर्वे©
तुझा कोपही वाटतो मज प्रणय!
तुझी हर अदा आणते बघ, प्रलय!!
हृदयही तुझे, स्पंदनेही तुझी
किती गोड माझा-तुझा हा विलय!
तुझी नस नि नस जाणतो मी सखे
तुझे चित्त, मन मी, तुझे मी हृदय!
असे काय माझ्यातले डाचते?
तुझे माझिया भोवतीचे वलय!
जगाला कसा कमकुवत वाटलो?
असे कारणीभूत माझा विनय!
अता लागली जिंदगानी कलू....
कधी व्हायचा सांग, माझा उदय!
दिवेलागणीला हरवतोच मी
तुझी रोज येतेच हटकून सय!
अता या वयाला कशाला फुले?
मला कंटकांचीच झाली सवय!
कसे लोक होणार निर्भय तरी?
दवंडीच देऊन देती अभय!
असे ज्ञान पान्हावते रोज का?
मला मूल प्रत्येक वाटे तनय!
प्रोफेसर
प्रा.सतीश देवपूरकर
जगती, नित्य सदविवेके
चालत रहा, चालत रहा
मुलमंत्र, हाच जीवनाचा
सत्कर्म, सदा करीत रहा।।
विधिलिखित सारे जीवन
प्राक्तनाच हा भोग आम्हा
सुखदु:खांच्या सावलीतूनी
स्वानंद,समाधान घेत रहा।।
जन्मी, भाळी जे जे लाभले
त्यात समाधान मानीत रहा
निराशावादी कधी राहु नये
मनी, आशावाद जपत रहा।।
सत्संगे, पापांचे होते क्षालन
उतम सहवासात, सदा रहा
जीवन, खेळ कठपुतळीचा
प्रभुरामाचे रामनाम घेत रहा।।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०९.
१० - ४ - २०२२
फळ आज हे मधूर भासते,
तपोबलातील अर्क असे
कष्ट सोसले शरिर मनानें,
चिज तयाचे झाले दिसे.....
बसत होतो सांज सकाळी,
व्यवसाय करण्या नियमाने
यश ना पडले पदरी.
केव्हा मान फिरविता नशीबाने....
निराश मन सदैव राहूनी,
मनीं भावना लहरी उठती
शब्दांना आकार देवूनी,
लेखणी मधूनी वाहू लागती...
लिहीता असता भाव बदलले,
त्यात गुरफटलो पुरता
छंद लागूनी नशाच चढली,
जीवनामधील रंग बघता...
त्या रंगाच्या छटा उमटल्या,
फुला फुलातूनी दिसूनी येती
सप्त रंगाचे मिलन दिसले,
आकाशाच्या क्षीतीजावरती....
काव्यावरती जगेल कोण,
हवी भाकरी जगण्यासाठी
मानहानी ती सदैव होई,
केवळ अल्पशा पैशापोटी...
मदत कुणाची मिळत होती,
आला दिवस निघून जाई
काव्यातील आनंदात परि,
डुबता सारे विसरून जाई
विवंचना आणि सुख दु:खे,
बनली होती स्फर्ती देवता
अनुभवले जे जे आजवरी,
चित्रीत झाले बनूनी कविता,
अनुभव होता तना मनाचा,
म्हणूनी भासले सत्य काव्य ते
उचलून घेतले जनसामान्यांनी,
मनास त्यांच्या पटले होते....
लपली असती कला एक ती,
सर्व जणांच्या अंतरंगी
परिस्थितीशी झगडा देवूनी,
बाहेर आणती कुणी प्रसंगी....
गेलो विसरूनी उदास दिन ते,
आज उमटले चित्र निराळे
सरस्वती आणि लक्ष्मी दोघी,
आशीर्वाद त्यांचा मजला मिळे
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti