प्रकाश आणि अध:कार , दोन बाजू नाण्याच्या
सत्व आणि तमोगुणातील शक्ती, ठरती त्या प्रभूच्या....१
सृष्टी दिसे समोर आपल्या, नयन ठेवूनी उघडे
अध:कार वाटे आम्हां, त्याच मिटलेल्या डोळ्याकडे...२
जाण देई आंतून कुणी, प्रकाश तमाच्या आस्तित्वाची
आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं, कल्पना ती केवळ विचारांची...३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
धागा धागा मिळून,बांधले,खास घरटे,
फांदीचा आधार घेऊन,
उभ्या झाडास लटकवले,
एक चोंच करी किमया,
केवढी मोठी कारागिरी,
पिल्लांस सुरक्षित करण्यां,
माय बापाची चाले हेरगिरी,
घर मोठे प्रशस्त हवेशीर,
वारा चारी बाजूंनी वाहे,
निसर्ग सान्निध्यातले,
वाटते मोठे आरामशीर,
अंडी घालून ती उबवती,
वाट जन्माची पाहती,
कारागीरच ते नव्या उमेदी,
दार घरट्याचे असे बांधले,
सहजी कोणी उतरू नये,
पण साप नागांचा दहशतीने,
रक्षणास तत्पर दोन पाखरे,
चहूबाजूंनी घरट्याला चौकोनी,
असे जाळीदार नक्षी,
आखीवरेखीव जाळ्याला ,
केले कसे त्रिशंकूकृती ,
दुनिया सारी घरातच वसे,
संसार मांडला आगळा,
समर्थ नर मादी दोघे,
परंतु नशिबाचा खेळ वेगळा,--!
हिमगौरी कर्वे.©
आमच्यासाठी घर हेच
आमचं संपूर्ण विश्व होतं
विश्वाच्या पसाऱ्यात यांना मग
आमचंच घर कसं दिसत नाही
आसूसून यांच्यासाठी आम्ही
किती जमवले आनंदाचे कवडसे
नाही खिजगणतीतही त्यांच्या
आम्ही किंवा आमचे उसासे
उमेद होती तेव्हा कशाकशाची
तमा नाही बाळगली श्रमाची
उमजत नाही बाळगावी का
उमेदही यांच्या तारतम्याची
केवढा ध्यास आम्हाला, यांचे
हात लागावेत गगनाला
पाय तरी ठरतील जमिनीत का
वाटते आता शंका मनाला
घ्यावी भरारी त्यांनी म्हणून
धावलो घेऊन वेड्यागत आपण
दिशा हुकली की आशाच चुकली
वाटतं पाहून आता रिकामं अंगण
कळकळ नि काळजी आमच्या
असायची काळजात घर करुन
आता नशिबी आहे रहाणं
काळजाला पडलेली घरं मोजून
काळजातले झरे आमच्या
वाहले प्रसंगी प्रवाही बनून
कातळात खडखडाट यांच्या
नसावा पाझर जराही काहून
सदैव अवतीभोवती यांच्या
करत आम्ही बाळ, बाळ
त्यांना फुरसत नसावी पुसाया
का असाही आता यावा काळ?
व्यापात कामाच्या आपण
तरीही घेत होतो यांची चाहूल
गुंग हे स्वतःतच कायम
विश्वात आपल्या होऊन मश्गूल
यांच्या हुसक्याच्याही धसक्याने
जागलो कितीकदा दचकून आपण
धसका अजूनही बसतो हृदयाला
हाक आमची कुठंवर पोचेल
कानावर यांच्या की पल्याड होऊन
आमच्या अपेक्षांची तुम्ही
करा भले उपेक्षा, केवळ
उपेक्षेचीच तुमच्या करायला
लावू नका आम्हाला अपेक्षा
एकंदरीत हे जगच सारा आहे केवळ भास
तेव्हाही, जेव्हा वाटलं आपण होतो मुलांचे
आताही, अन्... जेव्हा जाणवतं मुलं नव्हतीच आपली
-संगोपनास समर्पण
(आईच्या, आईच्या पिढीच्या आशंकित भावनांना शब्दरुप)
--यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(९/१२/२००१)
गुलाब कशाला मी देवू , उद्याच ते सुकणारे
काव्य गुंफले मी गं, सदाच ते टिकणारे!
भाव चालतो येथे, असली का अपुली प्रिती?
बसले चौकाचौकावर, फुलास ते विकणारे !
येती अनंत अडथळे,त्यांचा मार्ग हा असावा
जाणेच भाग त्यावरुनी,नाहीच ते चुकणारे!
हारलो नाही संपलो,सुरुवात ही तर खरी
कटाक्ष तिरका मारी,उगाच ते जिंकणारे!
नकोच विचार सुडाचा,युध्दाने वाढते युध्द
लावूच नये ते बीज, नाहीच जे पिकणारे !
प्रभात झाली रवी उगवला
दाही दिशा उजळल्या
रात्रीचा अंधार जावूनी
नवीन आशा अंकूरल्या १
बरसत आहे सूर्यकिरणे
पृथ्वीच्या भूतली
आनंदाने पुलकित होवून
धरणीमाता शहारली २
निघूनी गेला रात्रीचा गारवा
त्याच्या आगमानाने
उल्हासीत होवून प्राणी जीवन
नाचत राही ऊबेने ३
पुनरपि आता झाले सुरु
चक्र जीवनाचे
मिळवू आज काही तरी
किरण चमकती आशेचे ४
काळोखाची भयाणता
आता गेली निघूनी
प्रकाशाच्या मदतीने
कामास लागती जोमानी ५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चाललो पंढरीला पायी
पाहतो विठ्ठलरखुमाई ।।धृ।।
वेचूनी संतांच्या सद्गुणी
गुंफितो मी भावफुलांची वेंणी ।।१।।
रांगलो , खेळलो , धावलो
या तुझ्या विश्वाच्या अंगणी ।।२।।
नुमजे मजला गाथा ज्ञानेश्वरी
मी अज्ञानी ऐकतो संतांची वैखरी ।।३।।
लावूनी टिळा गंध कपाळी
दंगलो दिंडी, किर्तनी टाळ मृदंगी ।।४।।
गायली मी , जीवनाची भैरवी
आता लागली ब्रह्मानंदी टाळी ।।५।।
लोचनी विठाई सावळी विटेवरी
जय हरी विठ्ठल , पांडुरंग हरी । ६।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र.४१
दिनांक:- १६-३-२०२१
दोन्हीं दारीं मारामारी
खानेसुमारी पानसुपारी.
खालीवर तागडी जुळली फुगडी
हुशारला गडी फुशारला गडी.
आतां झाली पक्की आतां मिळेल नक्की
लाल-दिव्याची गाडी !
- सुभाष स. नाईक
ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा,
उपसतो जरी सतत, होत नसे निचरा....१,
गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे,
पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे....२,
पेला पेला जमवूनी, कलश भरून आला,
नाहून जाता त्यात, देह भान विसरला....३,
सांडता पाणी वाहे, पसरते चोहीकडे,
आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे....४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
समोर ये तूं केंव्हा तरी,
बघण्याची मज ओढ लागली,
फुलूनी गेली बाग कशी ही,
बीजे जयांची तूच पेरीली ।।१।।
कल्पकता ही अंगी असूनी,
दूरद्दष्टीचा लाभ वसे,
अंधारातील दुःखी जनांची,
चाहूल तुज झाली असे ।।२।।
शीतल करुनी दुःख तयांचे,
जगण्याचा तो मार्ग दाखविला,
सोडूनी सारे वाटेवरी,
आकस्मित तू निघूनी गेला ।।३।।
आस्तित्वाची चाहूल येते,
आज इथे केंव्हातरी,
तव आशीर्वादे जगतो सारे,
हीच पावती त्याची खरी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
काळ येतां वृद्धपणाचा, विरक्तींची येई भावना
निरोप घेण्या जगताचा, तयार करीत असे मना
वेड्यापरी आकर्षण होते, सर्व जगातील वस्तूंवरी
नाशवंत त्या, माहित असूनी, प्रेम करितो जीवन भरी
जीवनांतील ढळत्या वेळीं, जेव्हां वळूनी बघतो मागें
मृगजळासाठीं धावत होतो, जाणून घेण्या सुखाची अंगे
प्रयत्न केले जरी बहूत, हातीं न लागे काहीं
पूर्ण कल्पना येई मनीं, जगण्यात आंता तथ्य नाहीं
उर्वरीत आयुष्याची रेखा, मर्यादेतच आखूनी काढी
समज येतां प्रभूचे सारे, समर्पण करीत जग सोडी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti