माळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार,
अर्पित जातो ते, प्रभू चरणांवर....१,
राम नाम जपत, कुणी एक येतात
घटकाभरासाठी, विश्रांती ते घेतात....२,
रोज देती मजला, ओंजळभर फूले
कोणत्या बागेतली, कधी न सांगीतले....३,
त्यांच्याच सांगण्याने, हार मी गुंफीतो
बघतात कौतुकें कसा मी अर्पितो....४,
फूलांची ओंजळ ती नव्हे, शब्दांचा ठेवा,
कवितेच्या रचनी, उपयोगी पडावा....५,
शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे मिळतो
विषय तो मिळूनी, काव्य मी रचीतो....६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
प्रयत्न करिता जीव तोडून, जेव्हा यश तुम्हा न येई
सोडून देता त्याला तुम्ही, नशिबास दोष देत राही..१
दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे
का न मिळाले यश तुम्हा, मूल्यमापन करा प्रयत्नाचे...२
चूक दिशेने प्रयत्न होता, वाहून जातो सदा आपण
यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन...३
पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले तुमचे हाती
प्रयत्नाची दिशा बदलता, जुळून सहजच सारे येती...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.
मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.
बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतात
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतात.
त्यांना कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतात
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतात .
तुमचा शब्द ते कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.
तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
पेलत सगळी आव्हाने
घडवतात तुमचा भविष्यकाळ..
तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबाही खचत असतात
आधार देता तरी
मन मारून हसत असतात..
तुमच्याकडूनं तसं त्यांना
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्यांचं
अवघं पोट भरत असतं.
त्यांच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाहीत
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाहीत.”
त्यांच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.
एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल
तेव्हा म्हणाल, “ आपले बाबा
खरंच कधी चुकत नव्हते
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होते.”
तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.
आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..
आजच्या जागतिक कुटुंब दिवसाला सुंदर सलामी
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.
कोणते हे रस्ते
कुठले हे वळण
कसल्या या जाणीवा
कसले हे स्पंदन
पहाटेचे दवबिंदू
हळूच जातील घसरून
ओंजळीतल्या रेतीचे
कण जातील निसटून
माहित आहे जरी
स्वप्न हे नाही खरे
तुझ्या सोबतीचे
स्वप्नही असते पुरे...
-- आनंद पाटणकर.
रुजला पाहीजे विचार मनांत
सारेच प्रभुचे असे ह्या जगांत
जो वरी आहे मी माझे येथे असे
त्या क्षणापर्यंत स्वार्थ मनीं वसे
स्वार्थयुक्त मन मुक्त होत नसे
मुक्ती येई पर्यंत पुनर्जन्म असे
बिंबता मनांत माझे नाहीं कांहीं
प्रभूचे समजता आत्मा मुक्त होई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कितीही सारी धडपड करशी
लाचार ठरतो अखेरी
जाण माणसा मर्यादा तव
आपल्या जीवनी परी ... ।।
क्षणाक्षणाला अवलंबूनी
जीवन असे तुझे सारे
पतंगा परि उडत राहते
जसे सुटत असे वारे... ।।
निसर्गाच्याच दये वरती
जागत राहतो सदैव
कृतघ्न असूनी मनाचा तूं
विसरून जातो ती ठेव... ।।
निसर्गाच्या मदती वाचूनी
जगणे शक्य नसे तुजला
जीवन कर्में करीत असतां
आठवित जा त्या प्रभूला... ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कर पडले चरणीं
भाव जाण तू देवा ।।धृ।।
देह झुकला तुझ्या पुढती
लिनतेनें मान वाकती
मनाची करूनी एकाग्रता
भावनेला वाट देतां
अश्रू दाटले नयनी अंतरीचा दिसे ओलावा १
कर पडले चरणी भाव जाण तू देवा,
प्रथम येई भावना,
जागृत करते ती मनां
मनाचा ताबा देहावरी
तोच तुजला प्रणाम करी
घे प्रभू तू जाणूनी अत:करणातील ठेवा २
कर पडले चरणी भाव जाण तू देवा
मुखीं नाम तुझे घेई
देह सारा शहारून जाई
आनंदाची फूटते उकळी
नाचते मन सर्व काळी
मनाचा चंचल स्वभाव समजोनी तूं घ्यावा ३
कर पडले चरणी भाव जाण तू देवा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दिग्वीजयाच्या स्वारीवरती, निघे सिकंदर सैन्य घेवूनी
जग जिंकण्या ध्येय मनाशीं, महान आशा उरी बाळगूनी
आश्वा रुढ ते सैनिक सारे, सिकंदराच्या मागें धावती
लगाम खेचूनी वृक्षा पाशीं, एक साधू तो बघूनी थांवती
पृच्छां करितां साधू म्हणाला, शांत चित्त तो बसला असे
मिळविण्यास ते कांहीं नसतां, शोध प्रभूचा घेत दिसे
सिकंदर वदे देश जिंकूनी, संपत्ती घेई लुटून सारी
जगत् जेता नांव कमवूनी, जाईन माझ्या देश दरबारी,
काय करशील नंतर तू गे? प्रश्न विचारी तो साधू जन
"शांत राहण्या प्रयत्न करित, अखेरचा मी काळ घालविन”
मिस्कीलतेने साधू विचारी, मी तर आजच शांत आहे
धडपड सारी करूनी एवढी, माझ्याच मार्गे तुम्ही जाए
ध्येय विसरूनी सारे आपण, धावत असतो वेड्या परी
प्रभू मिलनाचे कार्य खरे, ते मनास जागविते केंव्हां तरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
करा सर्वस्व प्रभूसी अर्पण त्यांतच मिळेल समाधान
जीवन अग्नी पेटत राही उर्जा निघे त्याचे ठायीं
उर्जेचे होते रुपांतरण साधत असे कार्य त्यातून
भावनेचा आविष्कार देई जीवना आकार
व्यक्त करण्या भावना उर्जा लागे त्यांना
एकाग्र करा मना सोडूनी सारी भावना
एकाग्र चित्त हेच ध्यान प्रभू मिळण्याचे साधन
सारी उर्जा ध्यानांत जाई तीच प्रभूसी अर्पण होई
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
Copyright © 2025 | Marathisrushti