(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • नातं

    रेशमाच्या लडीसारखे, नात्याचे पदर,
    प्रत्येक नात्याचा वेगळा आदर

    आईच्या गर्भात नात्याची रुजवात,
    जन्माला आल्यावर गुंफायला सुरुवात

    भावनांच्या धाग्यात गुंफली जातात नाती,
    नात्यांच्या गोफात, ऋणानुबंधाच्या गाठी

    आयुष्याच्या प्रत्येक, वळणावर एकेक
    नात नव जुळत असतं,
    जन्मभराच्या प्रवासात, ते आपली सोबत करतं

    म्हणून तळहाताच्या फोडासारख,
    जपाव लागत नात,
    अन् कळीसारख अलवार,
    फुलवाव ते लागत

    नात्यामध्ये श्रेष्ठ, माणूसकीच नातं,
    गरीब- श्रीमंत, जात-धर्म, बंधन त्याला नसतं

    सरणावरती जळतो,
    तरी जळत नसत नातं,
    नावासारख मागे उरत
    तेच खर नातं, तेच खर नातं

    -- सौ. अलका वढावकर

  • उभारी

    कोपऱ्यांत तो पडला होता,
    शरिर जर्जर होऊन
    जरी झाला हतबल देह,
    सदैव उत्साही त्याचे मन...१,

    झगडा देवूनी आयुष्याशीं,
    जीवनाचे घरकूल बांधले
    सुख दु:खाच्या विटा चढवूनी,
    त्याग श्रमाचे लिंपन केले...२,

    कर्तृत्वाचे शब्द उमटती,
    घरकूलाच्या भिंती मधूनी
    जगण्यासाठी उभारी देती,
    इच्छा शक्तीस जागवूनी...३,

    गतकाळाच्या आठवणी त्या,
    जगण्याचा तो ठेवा बनला
    सार्थकतेच्या जाणीवेनें,
    अंत दशेतील क्लेश विसरला...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पणजीचा पहिला मान

    गोरं गोरं पान फुला सारखं छान
    घरी येणार आहे आता गोडूल सान

    बाळाला आणायला बाबाची नवी गाडी
    गाडीत बसणार आज्जी आजोबाची जोडी
    गाडीची लकेर आणि सुंदर पाहून ती शान
    घरी येणार आहे गोडूल सान

    बाळाला घालायला रेशमी कुंची मी शिवणार
    बारीक मोत्याची सुंदर सुबक झालर लावणार
    कपाळावर येईलच मग सोन्याचे पिंपळपान
    घरी येणार आहे गोडूल सान

    बारश्याला दोन्ही घरचे गणगोत जमणार
    पाळण्यात वाकून वाकून सगळेच पाहणार
    बाळाला मांडीवर घेण्याचा माझाच असेल पहिला मान

    पणजी होऊ इच्छिणारी पणजीचे मनोगत

    -- सौ कुमुद ढवळेकर.

  • जेव्हा लेखणी बोलते

    (१)
    जेव्हा लेखणी बोलते
    भाव मनीचे सांगते
    सत्य प्रकाशी करते
    नवे साहित्य योजते

    (२)
    जेव्हा लेखणी बोलते
    शस्त्रा सम ती भासते
    गुपित उलगडते
    मनीची व्यथा मांडते
    (३)
    जेव्हा लेखणी बोलते
    साहित्य शब्दी डोलते अंतरंगी झेपावते
    स्वैर नभी संचरते
    (४)
    जेव्हा लेखणी बोलते
    शब्दबाग फुलवते
    स्व-गंधी दरवळते
    सारस्वतात धुंदते
    (५)
    जेव्हा लेखणी बोलते
    काव्यसरिता वाहते
    हक्कासाठी ती झुंजते
    माझ्यातच सामावते

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक
    १३/१/२०

  • बंद खिडकी

    चालताना त्या रस्त्यावर आज
    का अडखळली मम पाऊले
    तोच रस्ता मीही तोच परी
    का सर्व अनोळखी भासले ।
    त्याच रस्त्यावरील तेच घर
    परी आज अपरिचित वाटले
    बंद खिडकी ती पाहून घराची
    मम नयनी अश्रु का दाटले ।
    अजूनही वाटते कधीतरी
    ऊघडेल ती खिडकी कुणीतरी
    पुन्हा तो ओळखीचा चेहरा
    पाहील वाकून त्या खिडकीतूनी ।

    सुरेश काळे
    मो.9860307752
    सातारा.
    २५ सप्टेंबर २०१८

  • लाटांचा न्यारा स्वभाव

    लाटांचा न्यारा स्वभाव ,उंच उंच उचंबळती,
    खडी एक भिंत बनवत,
    सागरात उभ्या राहती,
    थेंबांची नक्षी हालती,
    पुढेमागे होती मोती,--!!!

    पुन्हा पुन्हा खेळत खेळत ,
    मजेत धुंदीतनाचत-- नाचत, एकमेकींवर आदळत आपटत,
    किती संख्येने उभ्या राहती,--!!!

    सागर मात्र शांत राही,
    लेकींचा आपल्या खेळ पाही त्याचीच मजा लुटत लुटत,
    कसा काय तटस्थ राही,--!!!

    शांतता धीरगंभीरता,
    आणतो तरी कुठून एवढी,
    इतकी मोठी स्थितप्रज्ञता,
    राखून असतो कशी केवढी,--!!!

    पाण्याचे असीम प्रवाह,
    सारखे जाती पुढेमागे,
    तरीही एवढा मोठा सागर, धरणीशी आपले नाते सांगे,--!!!

    निसर्गातील प्रत्येक घटक,
    पाय जमिनीवर ठेवे,
    जात-पात ठाऊक नाही,
    न कुठले हेवेदावे,--!!!

    कुठली नसतेच अहंता,---
    न कसला दुराभिमान,
    घटक कुठलाही असो,
    कर्तव्याचेच दिसते भान,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • महानायिका

    हो!!!!
    हो मी महानायिका बोलतेय
    नाव माझे सावित्रीबाई
    माझी जन्मदात्री लक्ष्मीआई
    ३जानेवारीला सुदिन उगवला
    खन्दोजी नेवसे यांच्याघरी कन्यारत्नास "पहिली धनाची पेटी"चा मान मिळाला.
    आजच्या सारखा गर्भपाताचा शाप नाही मिळाला.

    हो !!!!!!!
    हो मी महानायिका बोलतेय
    उपवर होताच १८४०सात ज्योतिरावांच्या घरचा उंबरठा ओलांडला.
    संरक्षक,समर्थक गुरू लाभता साक्षरतेचा वसा घेतला.

    हो!!!!
    हो मी महानायिका बोलतेय
    मी तर ज्ञानदानाचा झेंडा रोविला
    कर्मभुमी माझी युद्धभुमी
    प्रतिकुलतेत अनुकुलतेसाठी लढा दिला
    विधवा विवाह,अस्पृश्यता,
    महिला स्वातंत्र्य,दिलीत महिलांचे साक्षरीकरण
    यासाठी मी विष्ठेचा नि दगडांचा मार सोसला

    हो!!!!!!
    हो मी महानायिका बोलतेय
    सामाजिक सुधारक,पहिली महिला शिक्षक होण्या स्वातंत्र्याचा पायंडा रचला
    पण माझा पोषाख मी नाही पाश्चिमात्य केला
    आधुनिक बाला स्वातंत्र्याला नको लागू दे स्वैराचाराची बाधा

    हो!!!!!
    हो मी महानायिका बोलते
    नको मजला देवत्व इथे
    नको माझ्या फोटोस हारतुरे
    मला माझे स्वप्न हवे
    अजूनही बऱ्याच निरक्षर दिसतात इथे
    त्यांच्यासाठी थोडा वेळ द्या की गडे

    हो!!!
    हो मी महानायिका बोलतेय
    आपल्या उत्कृष्ट मार्गावर चालत राहू
    मृत्यूलाही घाबरवू

    हो!!!!!!
    हो मी महानायिकाच आहे
    मी महानायिकाच बोलतेय
    कारण.....................
    १०मार्च १८९७ला महामारीत प्लेग ऋग्णांची सेवा करता करता प्लेगग्रस्त होऊनच ही क्रांतीज्योत समाजासाठी विझली असेल
    पण ...................
    पण ही धगधगती ज्ञानमशाल सावित्रीच्या लेकींनो तुमच्या रुपात धगधगत आहे
    उठा..........
    उठा अन् माझा ज्ञानयज्ञात प्रयत्नांच्या पराकाष्ठेची आहूती द्या
    आहूती द्या

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • असामान्य व्यक्ती

    सामान्यांतूनी असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे,
    कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे.....१,

    उदार होवूनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा,
    परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा......२,

    जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना
    व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा......३,

    जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी
    अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी....४,

    निर्जीव सजीव सर्वांचि मिळूनी, उभारला संसार
    हर घटकाने सहभागी व्हावे, लावूनी हातभार....५,

    सर्व जगापरी जगत असतां, जगे इतरांसाठी
    सामान्यातील असामान्य ठरेतो, ह्याच विश्वापाठीं......६

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सांजाळ

    किती, कसे, कुठे शोधू तुला
    अशी कुठे? तूं हरवुनी गेली...
    लोचनी रूप तुझेच लाघवी
    पापणी, नित्य पाणावलेली...
    प्रतीक्षेत हरविले दिन ते सारे
    क्षितिजी सांजाळ थबकलेली...
    निलांबरी, मोहोळ आठवांचे
    निमिषात तूंच उठवूनी गेली...
    हे सारे, आज कसे विसरावे
    अशी कुठे गं तूच हरवून गेली..
    प्रीतिवीण कां? जगणे असते
    धुंद श्वासात, गंधाळते बकुळी
    शीणलो तरी वाटते तुला पहावे
    सांजाळलेल्या या कातरवेळी

    रचना क्र. ११२

    २२/८/२०२३

    - वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

  • तू फक्त तुझे चंद्र आवर …

    खुसखुशीत भाषेत नेमके व्यक्त करण्यात हातखंडा आहे ह्यांचा !