नशीब नाही
म्हणून ओरडू नको
नशीब आहे
म्हणून मान उंचावू नको
पैसा नाही
म्हणून रडू नको
पैसा आहे
म्हणून जास्त खर्च करू नको
घरदार नाही
म्हणून भिक्षा मागू नको
घरदार आहे
म्हणून भटकू नको
दुःख आले आहे
म्हणून खचू नको
सुख आले आहे
म्हणून जास्त उडू नको
हे माणसा.....!
काही गोष्टी मिळतात
काही गोष्टी मिळत नाहीत
पण तू त्या गोष्टींची जास्त हाव ठेवू नको
- कौस्तुभ प्रभु
ती आत्महत्त्या करताच समाज तिच्याच
चारित्र्यावर प्रश्न चिन्ह लावून मोकळा होत असतो...
पण तिने आत्महत्त्या करण्यापूर्वी
किती रात्री जागून काढल्या असतील,
किती उश्या तिच्या अश्रुंनी ओल्या झाल्या असतील,
कित्येकदा मनातल्या मनात ती मेलीही असेल
याचा विचार कोणी कधीच करीत नाही...
प्रत्येकाला तिच्या मृत्यूचे कारण जाणण्यात रस असतो...
ती गेल्याचे दु:ख फारच थोड्यांना असतं ...
बाकीच्यांना तो मनस्तापच वाटत असतो...
कोण म्हणतं तिचं प्रेमप्रकरण असेल,
कोण म्हणतं तिचा प्रेमभंग झाला असेल,
कोण म्हणतं ती गरोदर असेल,
कोण म्हणतं तिचे लग्न ठरत नव्हतं,
कोण म्हणतं तिच मन फारच हळवं होतं...
पण खरंच हिच कारणे असतात का तिच्या आत्महत्तेमागे ..?
तिच्या आत्महत्तेची खरी कारणे कधीच येत नाहीत का जगासमोर...
पुरुषांना जन्माला घालणारी स्त्री
त्याच पुरुषांच्या अहंकाराची बळी ठरत असते का ?
ठरत असेल तर हे वेळीच थांबायला हवे !
तिची आत्महत्त्या टाळायला हवी !
नाहीतर... तिच्या अभावी...
भविष्यात कित्येक पुरुषच
आत्महत्त्या करताना दिसतील...
©कवी – निलेश बामणे ( एन.डी.) 18-02-24
कवितेचा कवी
कविते
आहेस प्राण तू
या वेडया कविचा
कवितेविणा
चालेल कसा श्वास
या वेडया कविचा
कवितेसाठीच
आहे देह जगी
या वेडया कविचा
कवितेमुळेच
होतो कवितेचा कवी
म्ह्णोनी सन्मान कविचा !
© कवी – निलेश बामणे ( एन.डी. )
श्रीकृष्ण सांगतो सुभद्रेला,
चक्रव्युंहामधली रचना,
हुंकार मिळे त्याला,
सुभद्रा झोपली असताना ।।१।।
गर्भामधले तेजस्वी बाळ,
ऐकत होते सारे काही,
जाण आली त्याची कृष्णाला,
वळूनी जेव्हा तो पाही ।।२।।
चक्रव्यूहांत शिरावे कसे,
हेच कळले अभिमन्यूला,
अपूरे ज्ञान मिळोनी,
घात तयाचा झाला ।।३।।
गर्भामधला जीव देखील,
जागृत केंव्हां होवू शकतो,
खरा ज्ञानी तोच असूनी,
सुप्तावस्थेत सदैव असतो ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
जीवनात सदैव तू
पुढे बघून चालशील
अडखळलेल्या खड्ड्यांची
जाणीव ठेवुन वागशील
कर्तव्यापासून तू कधी
दूर नको पळू
तुटलेल्या त्या स्वप्नांसाठी
आसु नको ढाळू
सर्व काही मनासारखे होइल
अशी अपेक्षा नको धरूस
पण तुझ्या आवडी निवडींना
कधी नकोस पुरूस
संसार हि तारेवरची कसरत
नंतर तुला कळेल
इतकी ही तडजोड नको करूस
कि मन तुझं जळेल
माहित आहे मला तुला
सारं कसं निटनेटक लागतं
जास्त हट्ट नको करूस
चुकून नातं ते फाटतं
जीवन आहे ते बाळा
कधी वादळ यायचं
आयुष्य थोड विस्कटलं
तर नाराज नाही व्हायचं
शपथ आहे तुला बाळा
माझं थोडं तू ऐकायचं
विरहाची जाणीव नको
अगदी आनंदाने तू जगायचं
सर्वांची खूप काळजी करतेस
स्वभाव आहे तुझा
स्वतःसाठी पण जग बाळा
आशिर्वाद आहे माझा.
- डॉ. सुभाष कटकदौंड
दिल्लीचा वारा
विषाहून विखार
जणू यमाचा पाश.
काळ्या-कुट्ट स्मागात
दिसला यमाचा चेहरा
कासावीस झाला प्राण.
अस्तित्वशक्तीला बाधा येणें,
अति भयंकर घटना ती
तयांना मृत्यूची वाटे भीति....।।धृ।।
गरिबीत जगती कित्येक,
भ्रांत पाडे ती भाकरी एक
जगण्यासाठीं झगडा देती,
तयांना मृत्यूची वाटे भीति....१,
आरोग्याला धक्का बसतां
शरिर जर्जर होवूनी जातां
देह तारण्या धडपड होती,
तयांना मृत्यूची वाटे भीति....२,
समाज रचना बघा कशी,
लौकिक जाई तो राही उपाशी
कुणी न दाखवी सहानुभूती,
तयांना मृत्यूची वाटे भीति...३,
प्रवास करिता वाहनातूनी
अपघात शंका येई मनी
अवलंबून जे दुजावरती,
तयांना मृत्यूची वाटे भीती....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
स्नान करूनी निर्मळ मनीं, दर्पणापुढे येऊन बसला ।
जटा साऱ्या एकत्र बांधूनी, भस्म लाविले सर्वांगाला ।।
ओंकाराचा शब्द कोरला, चंदन लावूनी भाळावरती ।
रूद्राक्षाच्या माळा बांधल्या, गळा हात नि शिरावरती ।।
वेळेचे भान विसरूनी, तन्मय झाला रूप रंगविण्या ।
प्रभू नाम घेत मुखानें, नयन आतूर छबी टिपण्यां ।।
पवित्र आणि मंगलमय, वाटत होते स्वरूप बघूनी ।
सजविला होता देह त्यानें, प्रभूचेच एक रूप समजूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti