ध्यावा गानिं दिसावा विठ्ठल
कायम मनीं वसावा विठ्ठल ।।
नच जाणत मी निर्गुण ब्रह्मा
मजला केवळ ठावा विठ्ठल ।।
जगतीं ऊन नि खड्डे काटे
वाटेवरी विसावा विठ्ठल ।।
अंध पुरा मी, मार्ग दिसेना
तडफड ही – कवळावा विठ्ठल ।।
थांबायाचें जेव्हां हृदया
तेव्हां मुखीं असावा विठ्ठल ।।
सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
भावमनीचे उमटूनी पडती ज्याचे सहवासे
काव्यामधला ईश्वर मजला तोच परि भासे
शब्द तयाचे ऐकत असता मन येते भरूनी
शब्दांना त्या बांध घालता काव्य पडे उमटूनी
अनूभव ज्याचा वदला जातो कंठा मधूनी
भोगलेला असे परि तो एके काळी त्यांनी
सत्य सारे तेथे असता दिव्यत्वाची जाण
म्हणूनच पटते मनास तेंव्हां हेच खरे जीवन
वाचित गेलो धर्मामधूनी जे जे सारे काही
शिक्षीत नसूनी स्वानूभवे तेच व्यक्त होई
हेच भासले काव्य मजला साऱ्या जीवनाचे
उतरत होते लेखणीतूनी बोल अनूभवाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मिळता मजला बाह्य एकांत,
छळते गर्दी विचारांची
मन गुंतविण्या कुणी नसता,
चलबिचल होते भावनांची...१,
शब्द वर्णांचा घेवून आधार,
भावना काढी मार्ग आपला
आविष्कार घडविण्यासाठी,
विचार करितो मदत तिला...२,
शब्दांना नटवी थटवी,
ध्वनी लहरी नि सूर गेयता
अलंकार मिळता अंगी,
रचली जाते एक कविता...३
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येते,
सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असते...१,
या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,
अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही....२,
हेच तत्त्व निसर्गाचे , तीन गुणांनी बनले,
उत्पत्ती लय स्थिती, यांनी सर्वत्र व्यापिले...३,
ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे
अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे...४,
याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,
अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ग्राहकाला शिलाईचे कपडे देताना टेलर
वारंवार हेच करीत असतो
कुठे टाका, कुठे बटण
तो शिवतच राहतो,
परीक्षक हातातील उत्तरपत्रिका
हिसकावून घेई पर्यंत
काही खरे,कुठे चुकीचे
काही न काही तरी
परीक्षार्थी लिहीतच राहतो,
शेवटचा श्वास आहे तोपर्यंत
चूक-अचूक निशाणा
तो सैनिक साधित
शेवट पर्यंत लढत राहतो,
कोणीही शस्त्र खाली
खाली ठेवत नाही
कोणीही आशा सोडीत नाही
अंतिम श्वास तुटे पर्यंत
*****
मूळ हिंदी कविता- अलका सिन्हा
मराठी अनुवाद- विजय नगरकर
जिथे नसावा गलबला, गलका, कोलाहल काही
काळालाही शाप नसावा, लगबग वा घिसाडघाई
मनस्ताप वा कसली चिंता, गोंगाटही नाही
शांततेला मग धीर यावा, नीरवता जिवंत व्हावी ॥
असावी शांततेला एक वात्सल्याची झाक
काळालाही नसावा वेळेचा काही धाक
ऐकू यावी अंतरीची केवळ हळूवार हाक
समाधि लागावी या जगाची न उरे जाग ।।
जिथे विहरावा वारा मुक्त आपुलकीचा आज
जिथे सागरा उधाण यावे चैतन्याचा हो स्पर्श
जिथे व्हावे मोकळे आकाश, विसरुनी सारे पाश
गर्भरेशमी हिरव्यापानी, लेवून लवावी लाज ॥
जिथे नसावी घरांना द्वारे मोकळे व्हावे कोंडले श्वास
संकोचाचे संदर्भ सुटावे आकारुनी यावे अपूर्ण ध्यास
स्वर्गाचा तो तोल ढळूनी, तादात्म्याचे ताल जुळावे
द्वैताचे मग भान हरपूनी, धरिणीमध्ये आभाळ मिळावे ॥
जिथे नसावी जुनी जळमटे, उमेदीला वा भगदाडे
ममत्वाच्या भासाने खुलावी, मनामनाची हळू कवाडे
शांत सनातन शांतीच्या मग कुशीत होऊन अधीन
आसमंतात विरघळत जावे, व्हावे निसर्गाशी तल्लीन ॥
(जगभरच्या वाढत्या कोलाहलात, गर्दीत दुर्मिळ झालेल्या शांततेचा कधी अनिवार ध्यास लागतो. काही नको फक्त आपण व आपली शांतता एवढंच हवं असं वाटू लागतं)
-यतीन सामंत
भेटीची आस तुझ्या,
नित्य मज छळते ,
तुझ्यासाठी सखया,
रात्रंदिन मी झुरते,--!!!
चित्र पाहूनी तुझे,
जिवाची ओढ लागते, जन्मोजन्मीचे नाते असता,
कशी हुरहुर वाढते,--!!!
थेट अंतरातुनी मला,
जसे तुझे बोलावणे,
घालमेल होता जीवा,
आतल्या आत लपवते,--!!!
जेव्हा कल्पते एकांता,
माझी न मी राहते,
तुझ्यासंगे भान हरपता, वास्तवालाच मी विसरते,--!!!
मनाचा हा ओढा,
कसाबसा रे दडवते,
आतल्या आत प्रवास सारा,
आत्मिक करून टाकते,--!!!
जीवांचे हे मैत्र राहता,
हातात जणू काही नसते,
तुजविण जीवनाचा साऱ्या
डांव, ना कधी मांडते,--!!!
तुला वाटतां मला वाटतां,
अंतर आपल्यात केवढे,
दोन समांतर रेषा,
एकजीव होणे नसते,--!!!
अशक्याची ना पर्वा,
ना कुठलेही देणे-घेणे,
कशी टाळावी एकरूपता,
प्रश्न किती जीवघेणे ,--???
हिमगौरी कर्वे.©
दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने ।
तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने ।।
कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी ।
प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी ।।
शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी ।
आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी ।।
खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो ।
सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
एका तासात केलेली
कविता...लोकांना आवडते
एका दिवसात केलेली
कविता...डोक्यावरून जाते
एका महिन्यात केलेली
कविता...कविता वाटते
एका वर्षात केलेली
कविता...कविताच नसते
एका आयुष्यात केलेली
कविता...जीवन असते
एका तासात केलेली
कविता...मला आवडते
एका दिवसात केलेली
कविता तिला आवडते
एका महिन्यात केलेली
कविता...त्यांना आवडते
एका वर्षात केलेली
कविता...कवितेलाच आवडते
एका आयुष्यात केलेली
कविता...मृत्यूला आवडते
मृत्यूला आवडणारी कविता
प्रेम कविताच असते....
© कवी- निलेश बामणे ( एन. डी. )
Copyright © 2025 | Marathisrushti