सारे धर्म मानव निर्मीत
त्यांतच आणली जात पात ।।
सर्व धर्म महान
तत्वज्ञानाची असे खाण ।।
प्रत्येकाचा धर्म निराळा
जन्मताचि मिळाला ।।
व्यर्थ का भांडता धर्मावरुन
तो तर मिळाला जन्मापासून ।।
भेदभाव जावे विसरुन
त्यातच सर्वांचे कल्याण ।।
स्वधर्म तत्वे पाळा घरांत
बाहेर एक मानवधर्म सर्वांत ।।
मानवधर्म फक्त मानवता
त्यांतची मानवाची श्रेष्ठता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दुःख असे मानव निर्मित
जाणती हे सगळे
परि दुःखात शोक करिती
हे कुणा न कळे ।।१।।
आपण कर्म केलेले
आपणचि भोगतो
फळ कर्माचे आलेले
तेच आपण चाखतो ।।२।।
आहे तुजसी हे ज्ञान
माहीत सर्वाना
खंत द्यावी सोडून
नको दाखवूं भावना ।।३।।
इतरांसाठीं आहे
ती भावना उदरीं
सहानुभूती पाहे
इतर जनांचे पदरी ।।४।।
शोक भावना दाखवी
तुझ्या दुःखाची
नसतां तुज निर्दयी ठरवी
हीच भीति जनाची ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
-- सुभाष ञ्यंबक दुष्यंत.
निसर्गाचा अप्रतिम ठेवा, नदीकाठच्या पर्वत शिखरीं ।
बाह्य जगाचे वातावरण, धुंदी आणिते मनास भारी ।।
त्याच वनी एकटे असतां, परि न लाभे एकांत तुम्हांला ।
चित्तामध्यें वादळ उठतां, महत्त्व नव्हते बाह्यांगाला ।।
खडखडाट सारा होता, दैनंदिनीच्या नित्य जीवनी ।
समाधानी जर तुम्हीं असतां, शांतता दिसते त्याच मनीं ।।
एकांततेची खरी कल्पना, मनावरती अवलंबूनी ।
अंतर्मन शांत असतां, बाह्य एकांत बघेना कुणी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आली आली थंडी आली
बोबडी माझी वळाली।।धृ।।
स्वेटर ना नवा हवा
कानटोपी हवी बुवा
थंडी लगेच पळाली
बोबडी माझी वळाली ।।१।।
नको शाळा सकाळची
दांडी मला मारायची
आई-बाबा हो म्हणाली
बोबडी माझी वळाली ।।२।।
गोधडीत गुडीगुप
चिंचा खाल्या गुपचुप
खोकल्याची ढास आली
बोबडी माझी वळाली ।।३।।
प्रश्न एक माझा ऐका
शाळेचा कशास हेका
शक्कल माझी निराळी
बोबडी माझी वळाली ।।३।।
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
मन माझे हिंदोळ्यावरी
बघते धरू आभाळ,
विहरते किती उंच
ठाऊक खितीज मृगजळ !
मना मनाच्या साखळ्या
गुंतता गुंती गुंता,
सोडविण्या त्या सगळ्या
हैराण जीव पुरता !
मना मनाचे द्वैत
भांडते आतल्या आत,
भांड भांडूनिया भूस
नकळे कशात अंत !
होण्या मन मोकळे
फिरे गरगरा भोवर्यावाणी,
पळे इकडून तिकडे,
मग भटके रोनोमाळी !
मन गेले बुद्धीकडे
विचाराव्या यावरील उपया,
फिरवी बुद्धी प्रेमाने
मनाच्या डोक्यावरुनी हात !
सांगतसे बुद्धी मनाला
युक्तीच्या गोष्टी चार,
शांती, तृप्ती, प्रेम, आनंद
मान मनाचा आधार !
झुलू नको हिंदोळ्यावर
सोडविण्या मनातील गुंता,
तुझ्या मनाचा लगाम
दे माझ्या हाता !
-- जगदीश पटवर्धन
राज्य तमाचे येथें
बाह्य जगावरती,
म्हणून दिसे आम्हां,
विध्वंसक प्रवृती ।।१।।
नाश करण्यासाठीं
शक्तीच हवी येथे,
हेच रुप शिवाचे,
समजण्या अवघड जाते ।।२।।
जागा करु देई,
नविन घटनांना,
चक्र कसे चालेल,
न मिटवता त्यांना ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
न्यायाच्या अपेक्षेने ग्राहक मंचाकडे तक्रार घेऊन येणार्या ग्राहकांना आता महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. आता ग्राहक मंचाकडे दाखल करण्यात येणार्या तक्रारी मराठीतूनच घेण्यात येतील आणि त्याची उत्तरेही मराठीतूनच दिली जातील असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
सुख दुःखाच्या लाटेमध्ये,
तरणे वा बुडणे,
जगेल तो त्या क्षणी,
ज्याला माहित पोहणे ।।१।।
पोहणे जगणे कला असूनी,
अनुभव हा शिकवूनी जातो,
जागरुकतेने कसे जगता,
यशही त्याला तसेच देतो ।।२।।
जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या,
कष्ट लागती महान,
परि केवळ एक अनुभवी प्रसंग,
सारे देतो मिळवून ।।३।।
अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे,
निसर्ग शिकवी क्षणोक्षणी,
सतर्कतेने वेचून घ्यावे,
दैनंदिनीच्या घटनामधूनी ।।४।।
बोल सारे अनुभवाचे,
त्या बोलीची भाषाच न्यारी
सुख दुःखाच्या गुंत्यामधला,
अर्थ सांगतो कुणीतरी ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
माझा जन्म मुंबईचा. आयुष्याची साधारण ३० वर्षं मुंबईत काढलेला मी एक अस्सल मुंबईकर आहे. आई वडिलांच्या दोघांच्याही बाजूने वकीली आणि शिक्षकी हे दोन महत्वाचे पेशे. दोन्ही बाजूंच्या कुटुंबांमधे काहीजण डॉक्टर्स किंवा इंजिनिअर्स, बरेचसे पोस्टग्रॅज्युएट्स आणि काहीजण Ph.D. त्यामुळे घरातलं वातावरण शिक्षणाला सर्वस्व मानणारं. बहुतेक सारेजण मुंबई, पुण्यात स्थिरावलेले. त्यामुळे या सार्या शहरी वातावरणात, गावरान वारा लागण्याचं काहीच कारण नव्हतं. नाही म्हणायला ९-१० वर्षांचा होईपर्यंत मी आजोळी (आईच्या माहेरी) डोंबिवलीला वाढलो. डोंबिवली म्हणजे मुंबईपासून ५० कि.मि.वर ठाणे जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. मध्य रेल्वेवर ठाणं आणि कल्याण या दोन मोठया गावांच्या मधे आणि रेल्वेच्या लोकल सेवेने मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर. १९६५ – १९७० च्या सुमारास देखील डोंबिवली फार वेगळं होतं. त्यावेळी ते उच्चभ्रू, सुसंस्कृत लोकांचं, मुंबईच्या धकाधकीपासून दूर पण तरीही सोईस्कर अंतरावर वसलेलं असं एक छोटंसं वसतिस्थान होतं. गावाच्या सुसंस्कृत वातावरणाची साक्ष पटवण्यासाठी पु.भा. भावे आणि शं.ना.नवरे यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक / नाटककार डोंबिवलीला आपलं घर मानून रहात होते.
आजीच्या घरातून पाठीमागे भाताची शेती दिसायची. पुढच्या अंगणात पेरू, चिंचा, जांभूळ आणि पपईची झाडं होती. त्यामुळे घरची फळं खाण्याचा आनंद उपभोगला होता. आजीच्या घरापुढच्या रस्त्याच्या कडेलाच भाजीवाले, फळवाले टोपल्या घेऊन विकायला बसायचे. त्यावेळी डोंबिवलीत व आजूबाजूच्या खेड्यांमधे आगरी लोकांची वस्ती खूप होती. आगरी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी. कमरेला जेमतेम फडकी गुंडाळलेले आगरी पुरुष आणि चापूनचोपून नेसलेल्या रंगीबेरंगी लुगडयातल्या आगरी बायका कायम दिसायच्या. सगळे रापलेले आणि काटक. पुरुषांच्या कमरेला उघडे कोयते आणि बायकांच्या केसात भरपूर फुलं. काही आगरी बायका आजीकडे वर्षानुवर्षे घरकामाला होत्या. कुणी शेतातले तांदूळ घेऊन यायचं, कुणी वरी, तर कुणी करवंद. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड, टरबुजांनी भरलेल्या बैलगाडया घेऊन आजूबाजूच्या खेडयांतून आगरी लोक यायचे. आजीच्या घरासमोरच बैलगाडया सोडून बैलांना बांधून ठेवलं जायचं. या बैलगाडया घेऊन येणारे काही आगरी लोक आजीच्या चांगले ओळखीचे झाले होते. मग ते कधी कधी विकायला आणलेल्या कलिंगडांची रास आजीच्या घरातच लावून जायचे.
आजीच्या घरासमोरचं अंगण मातीचं होतं. दर आठवडा पंधरवडयाने ते शेणानं सारवलं जायचं. समोरच्या रस्त्याच्या कडेला भाजीवाल्यांनी इतस्तत: टाकून दिलेला सडका भाजीपाला खायला गावातली भटकी गाई-गुरं यायची. ती कधी मधी आजीच्या अंगणात फुलझाडं खायला किंवा अंगणात वाळत टाकलेलं काही हुंगायला यायची. मग त्यांना आरडा ओरडा करून हुसकावून लावलं की मोठंच काम केल्यासारखं मला वाटायचं. शाळेतनं आलं की संध्याकाळी हुंदडतांना आसपास मोकाट गुरांचा वावर कायम असायचा. त्यातले काही सांड कधी कधी एकमेकांवर नाक फेंदारून आणि शिंगं रोखून चालून जायचे आणि त्यांच्या झुंजीमुळे सगळीकडे धुरळा उडायचा. आसपासचे लोक आरडा ओरडा करून, दगडं काठया मारून त्यांना पळवून लावायला बघायचे. मग तो सगळा गलका ऐकून आजी किंवा मामा धावत बाहेर यायचे आणि आम्हा मुलांना घरात घेऊन जायचे.
त्याकाळी डोंबिवली गावाच्या थोडसं बाहेर गोग्रासवाडी म्हणून एक गोशाळा होती. आजूबाजूला भरपूर झाडी आणि शेतं असलेलं ते एक शांत आणि सुंदर ठिकाण होतं. कधीतरी काही सणानिमित्ताने किंवा केवळ सहलीसाठी आजी आणि आजूबाजूच्या बायका आम्हा मुलांना तिकडे घेऊन जायच्या. त्या श्रद्धाळू बायकांच्या देखरेखीखाली आम्ही मुलं त्या गाई वासरांना हिरवं गवत आणि गूळ खायला द्यायचो आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून नमस्कार ठोकायचो.
माझ्या मामांना भटकण्याची खूप आवड. त्यामुळे शनिवार-रविवारी आसपासच्या खेडयांमधे, टेकडयांवर, खाडयांवर मामांबरोबर मी खूप भटकलो. कल्याण किंवा मुंब्र्याच्या खाडीवर जायचं, करवंदाच्या जाळीमधून फिरून करवंद खायची, शेतांच्या बांधांवरून चालायचं, पावसात भिजायचं हे सारं भरपूर केलं.
एकंदरीत १९६० च्या दशकातल्या डोंबिवलीने मला एका छोटयाशा गावातलं स्वछंद बालपण उपभोगू दिलं. त्या निमग्रामीण वातावरणाचा रंग माझ्या नकळत माझ्या अंतरंगावर पक्का बसला आणि मग पुढे शहरी वातावरणाचे, रंगाचे, कितीही थर त्यावर चढले तरी तो मूळ निमग्रामीण वातावरणाचा गाभा काही पुसला गेला नाही.
१९७१ साली आजोळ सोडून मी माटुंग्याला (मुंबई) आई वडिलांकडे रहायला आलो. दादरच्या बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या, त्या काळच्या मुंबईतल्या अग्रगण्य शाळेमध्ये पाचवीपासून शिकू लागलो. दादासाहेब रेग्यांसारख्या (मुलांसाठी “दादा”) शिक्षण महर्षींनी सुरू केलेल्या या शाळेने, मराठी माध्यमाची कास धरून, मध्यमुंबईतल्या कमीत कमी दोन पिढयांवर शुद्ध मराठी मध्यमवर्गीय संस्कार केले.
Copyright © 2025 | Marathisrushti