(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • साठवणुकीकडे कानाडोळाच

    योग्य साठवणुकी अभावी लाखो टन अन्नधान्य वाया जाण्याच्या घटना देशात अनेकदा घडतात. त्यासंदर्भात सरकारवर तसेच कृषी खात्यावर वेळोवेळी ताशेरेही झाडण्यात आले आहेत. तरीही धान्य साठवणुकीचा महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित आहे. खरीप हंगामात झालेले अधिक उत्पादन आणि रब्बीतील उत्पादनवाढीची शक्यता लक्षात घेता अजून तरी शासनाने साठवणुकीबाबत काही ठोस निर्णय घेतल्याचे दिसत नाही.

  • राजकारणातील गुन्हेगारीची नाकाबंदी!

    साम, दाम, दंड आणि भेद या आयुधांवर आधारित असलेलं राजकारण…गुन्हेगारी पार्श्वभूमीचा ठपका पुसण्यासाठी राजाश्रय हे एक पूरक आणि पोषक साधन…असुशिक्षित, असुशील व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते, ज्यांना समाजसेवेची ओढ,आवड अथवा समाजाशी कसलीही बांधिलकी नाही,..जनतेच्या अडी-अडचणी, दैनंदिन समस्या, सामाजिक प्रश्नांची जाण व समज नसलेले नेते जनतेचे नेतृत्व करण्यास लायक असतील का?

  • प्रेझेंट देण्यासाठी वेगळी पाकिटे !

    0005.. हल्ली भेटवस्तू द्यायच्या असतील तर पुन्हा एकदा गहन प्रश्न पडायला लागलाय काय द्यायचे ? पूर्वी लग्नामध्ये ५-५,६-६ मिल्क कुकर्स,कफ लिंक्स,४/५ लेमन सेट प्रेझेंट आलेले असायचे. नंतर फ्लॉवर पॉटस, स्टीलची भांडी,घड्याळे,पेन्स,रुमाल. आता अगणित निरुपयोगी चीनी वस्तू,गणपतीच्या विविध मूर्ती,नको असलेले शो पिसेस. काय द्यायचे प्रेझेंट ?… लोकं पुन्हा रोख रक्कमच देण्याकडे आता पुन्हा वळायला लागली आहेत. मी स्वत: बनविलेल्या पाकिटातून असा आहेर किंवा भेट देतो. सोबतची शाळेतील पाटी ही काळा कागद व पट्ट्यांचा वापर करून बनवली असून त्यामागे रोख राक्कामेसाठी पाकीट आहे. १०वी उत्तीर्ण झालेल्या 0001एका मुलीला मी असेच पाकीट दिले होते ती मुलगी आज वकील झाली तरी तिने ते जपून ठेवले आहे. साध्या की चेनला असलेल्या छान बाहुल्या चिकटवून बारशाचा आहेर देता येतो. बडीशेपेच्या गोळ्या भरलेल्या बदकाचे २ उभे तुकडे चिकटवून मुला-मुलींचे नाव लिहायला पताका करता येते.छोटी गणेशमूर्ती,प्लास्टिकचे छोटे गुलाब फुल व गवत (दुर्वा) चिकटवून आकर्षक पाकीट तयार होते. २ छोटी कागदी भिरभिरे किंवा छोट्या (लहानपणी पाण्यात सोडायला करायचो तश्या ) होड्या पाकिटांवर चिकटवून उत्तम पाकिटे 0002तयार होतात' सोबत काही पाकिटांची छायाचित्रे देत आहे. त्यावरून अनेकांना अधिक चांगल्या कल्पना सुचू शकतील. नवीन वर्षाचा हा एक नवा उपक्रम !


    -- मकरंद करंदीकर.

  • मार्लेश्वरची यात्रा

    सह्याद्रीच्या उंच कडय़ांच्या कुशीत वसलेले शंकाराचे स्वयंभू देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील पवित्र देवस्थान आहे. हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. विशेष म्हणजे, त्यादिवशी मार्लेश्वराचे शुभमंगल साजरे केले जाते.(या वर्षी हा योग १४ जानेवारी ला आहे) मारळ या गावचा देव म्हणजे मार्लेश्वर. भगवान परशुरामाने मारळच्या देवस्थानाची स्थापना केली, असे सांगितले जाते. आणेराव साळुंके हा आंगवलीचा सरदार १८०० मध्ये शिकारीला गेला असता त्याला गुहेमध्ये शंकराचे दर्शन झाले. तोच हा मार्लेश्वर. ज्यादिवशी मार्लेश्वराचा शोध लागला तो दिवस मकर संक्रांतीचा होता. म्हणून संक्रांतीला मार्लेश्वराचा उत्सव साजरा होतो.

    त्यादिवशी साखरपा या गावातील गिरिजादेवी या देवीला मिरवत मार्लेश्वराच्या विवाहासाठी आणले जाते. आंगवली या गावात मार्लेश्वर प्रकट झाला म्हणून तेथील लोक चांदीचा मुकुट या सोहळ्यासाठी आणतात. अनेक गावांतून मार्लेश्वरला पालख्या येतात. देवरुख येथील श्री देव व्याडेश्वर हे यजमानी असतात. हा लग्नसोहळा मोठय़ा थाटात पार पडतो. त्यानंतर ठिकठिकाणच्या पालख्या व दिंडय़ा येतात. या दिंडय़ा श्री मार्लेश्वराच्या करवल्या होतात. या यात्रेसाठी अन्नछत्र चालवले जाते. अतिशय रमणीय निसर्ग लाभलेल्या या ठिकाणी आलेला माणूस तहानभूक विसरून आजूबाजूच्या सुंदर परिसराचा व हिरव्यागार वनराजीचा आस्वाद घेण्यातच दंग होतो. उंचच उंच डोंगर, मधूनच वाहणारी बावनदी, हिरवीगार झाडी.. हे सर्व पाहून प्रवासात आलेली मरगळ दूर होऊन मन प्रसन्न होते. येथून चालताना सभोवतालचे सृष्टीसौंदर्य व हिरवीगार वनराजी पाहून व या सर्वाचा आस्वाद घेत असतानाच आपण देवळाजवळ केव्हा पोहोचतो ते कळतच नाही.

    शंकराचे हे स्वयंभू देवस्थान संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावापासून 18 कि.मी. वर आहे. शंकराचे निस्सीम भक्त मार्लेश्वरची फेरी सहसा चुकवत नाहीत. मार्लेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नास्तिक मंडळीही रमतात. याचं कारण म्हणजे इथला रम्य निसर्ग. पावसाळ्यात इथला धबधबा रौद रूप धारण करतो. परंतु त्याचं ते रूपही मनाला भावतं. भाविक मंडळी शंकराचं दर्शन घेऊन तृप्त होतात तर निसर्गप्रेमींना इथे आगळीच भेट मिळते. म्हणूनच मार्लेश्वर हे ठिकाण लोकप्रिय आहे.

    मार्लेश्वर. भगवान शंकराचं मंदिर आणि नजिकचा धबधबा यामुळे आस्तिकांबरोबरच नास्तिकही इथे आवर्जून येतात. संगमेश्वर रेल्वेस्थानकापासून ३८ कि.मीटर अंतरावर आहे. देवरूख समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे इथला बराचसा भाग ओसाड भासतो. मात्र पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी वेढला जातो. लांबवर पसरलेल्या सह्यादीचं दर्शन रस्त्यावरून जाताना होतं. देवरूख गावं मागं पडलं की काही मिनिटांतच आपण मार्लेश्वरला पोहोचतो. सह्यादीच्या उंच पर्वतांच्या तुलनेत मालेर्श्वरचा डोंगर एका दमात चढण्याइतपतच उंच आहे. डोंगर किंवा ब्रीज चढून गेल्यावर डोंगर पोखरून गुहा तयार केलेली दिसते. गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आत प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं. असं सांगितलं जातं की या गुहेत एकही विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी इथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस तो असफल ठरला असं इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी, मेणबत्ती किंवा कंदिल घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास बरेच साप दिसतात. परंतु आजवर कुणालाही सापाने चावल्याचं ऐकण्यात आलेलं नाही.

    मार्लेश्वराच्या मंदिरानंतर डोंगराची सपाटी संपते. इथल्या सपाट भागाला लागूनच खाली घळी आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर समोर पांढराशुभ्र धबधबा आपल्याला खुणावतो. घळीत उतरून या धबधब्याकडे जाता येतं. इतर मोसमात तुम्ही या धबधब्याच्या पाण्यात खेळू शकता. पण पावसाळ्यात मात्र त्या घळीत उतरणंही कठीण होतं. गुळगुळीत दगड आणि डोंगरकपारीतून वाहणारा तो शांत धबधबा अचानक उग्र रूप धारण करतो. आता ब्रीजवर उभं राहून पावसाळ्यातही जवळून धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो. मार्लेश्वराच्या डोंगराला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे. मार्लेश्वरचा परिसर पावसाळ्यात अधिक खुलतो. त्यावेळेस तर इथे निसर्गप्रेमींनी आवर्जून यावं. त्याचबरोबर इतर दिवसांमध्येही मार्लेश्वरला आवर्जून भेट द्या. निसर्गाची भिन्न रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकिपीडिया

  • असेल हरी तर देईल… (नशायात्रा – भाग ३)

    इयत्ता आठवीपासूनच अभ्यासाकडे दुर्लक्ष करत गेलो होतो, त्यामुळे दहावीत जेमतेम ५० टक्के मार्क्स मिळालेले. कॉलेजला तर आभ्यासाच्या बाबतीत आनंदीआनंदच होता, मित्र, सिनेमा आणि व्यसने अश्या उनाडक्या जोरात सुरु राहिल्या….

  • लिहावेसे वाटले म्हणून

    दादर चौपाटीच्या वाळूसारखे मुठीतून निसटून गेलेले, रुपेरी पडद्याला साक्षीला ठेऊन, स्वतःच्या घरापेक्षाही जास्त आपलेपणा वाटणाऱ्या अंधाऱ्या थिएटरमध्ये अनुभवलेले ते मंतरलेले क्षण आम्ही कायमचे गमावले.

  • टिप्पणी – (३) : ‘गधेगाळ’वरील प्रतिमा : ( नरेंच केली हीन किति नारी !!)

    बातमी : (शीर्षक ) : बदलापुरात शिलाहारकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा
    - लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. २९ जून २०१६.

    ‘लोकसत्ता’मधील बातमी सांगते की बदलापुरनजीक शिरगांव येथें शिलाहारकालीन, ‘गधेगाळ’, ‘वीरगळ’ इत्यादी प्रकारची शिळाशिल्पें सापडली आहेत. शिलाहार हे राष्ट्रकूटांचे अंकित होते, व त्यांचे कोंकण, दक्षिण महाराष्ट्र भागात राज्य होते. बदलापुरनजीकाचा भाग ‘उत्तर कोंकणा’वर राज्य करणार्‍या शिलाहार-शाखेकडे होता. हा काळ होता इ.स. चें नववें ते तेरावें शतक. याचा अर्थ असा की ही शिळाशिल्पें आजपेक्षा ७००/८०० ते १२०० वर्षें जुनी आहेत. हजार वर्षें म्हणूं या. लोसत्तामधील बातमीही सादारण हाच काळ दाखवते.

    आपण या ‘गधेगाळ’ नामक, शिळेवर-कोरलेल्या-प्रतिमेचा विचार करणार आहोत. ‘लोकसत्ता’च्या शब्दात-
    ‘शिलाहार राज्याच्या काळात, राजाज्ञा मोडल्यास कठोर शिक्षा करण्यात येण्याची ताकीद म्हणून,
    गाढव व स्त्रीचा समागम होत असल्याचें शिल्प कोरलें जाई’.

    राजाज्ञा मोडल्यास सज़ा होणें योग्यच आहे. आजही कायदा मोडणार्‍यांना शिक्षा होतेच. लोकांना या बाबीची आगाऊ वॉर्निंग देणेंही ठीकच आहे. राजाज्ञा, म्हणजेच तत्कालीन कायदा, मोडणार्‍याला ‘गाढव’ या सदरात टाकणें, हेंही ठीक आहे. पण ऑब्जेक्शनेबल् आहे ती ही गोष्ट की गाढवाचा स्त्रीशी समागम दाखवणें. गाढवाशी समागम दाखवून नारीला किती हीन, किती नीच पातळीला आणून ठेवलेलें आहे ! गुन्हा कुणाचा, अन् हीनत्व कुणाला !!

    बिचार्‍या ‘स्त्री’नें राजाचें (आणि समाजाचें) काय ‘घोडें मारलें होतें’, म्हणून तिचा असा अवमान ? अशी ‘प्रतिमा’ कोरल्यानें 'per se' नारीजातिची प्रतिमा मलिन होते, याचा विचार राजा किंवा त्याच्या जबाबदार प्रधानमंडळानें केला नाहीं काय? धर्मशास्त्र्यांनी हें राजाला सांगितलें नाहीं काय ? कोणी असा बदसल्ला शिलाहार राजाला दिला असेल ? कोणत्या शास्त्रात, कोणत्या ग्रंथात, अशा प्रकारचा समागम दाखवणें रास्त म्हटलें आहे ? शिल्प कोरलें भलेही पाथरवटानें असेल, पण त्याला, ‘काय कोरायचें’ हा हुकूम तर कोणी सुशिक्षित अधिकार्‍यानेंच दिला असेल ना ? राजाला या शिल्पाची कल्पना देऊन , त्याची पूर्वसंमतीही घेतली गेली असणारच. तत्कालीन राजे काय, मंत्री काय, धर्मशास्त्री काय, सगळेच, एकीकडे, ‘यत्र नार्यस्तु पूज्यंते, रमन्ते तत्र देवता’, ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ , ‘मातृदेवो भव’ असें म्हणत म्हणत, दुसरीकडे अशा प्रतिमा कोरायाच हुकूम देतात, याचा स्पष्ट अर्थच असा की, तत्कालीन सर्व समाजातच 'per se' स्त्रीला मान नव्हता, आणि असलाच तर तो फक्त तोंडदेखलाच होता. प्रत्येक व्यक्ती आपापल्या आई-बहीण-पत्नी-पुत्री यांना ममत्वानें वागवत असेलच, मान देत असेलच ; पण 'per se' नारीजातिला हीन समजलें जात असणार हें उघड आहे.

    आणि हा ‘समागम’ कुणाच्या साक्षीनें ? तर, शिल्पांवर कोरलेल्या सूर्य, चंद्र व (मंगल-)कलश यांच्या साक्षीनें ! ‘सूर्य-चंद्र असेतो ही राजाज्ञा कायम राहील’ असा याचा अर्थ लोकसत्तामध्ये दिलेला आहे. पण, सूर्य व चंद्र हा ‘समागम’ पहाताहेत, म्हणजेच, असा हीन समागम ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ चालूं असल्याचाही अर्थ यातून काढता येईल. आणि, मंगल-कलशाचें काय ? हा हीन ‘समागम’, तत्कालीन ‘प्रस्थापित-उच्चपदस्थांना’ मंगल वाटला की काय ? सगळेंच आक्रित !

    प्रस्तुत शिल्पाजवळ मंदिराच्या खांबांचे अवशेष सापडले आहेत. म्हणजेच, अशी शिल्पें मंदिराजवळही प्रस्थापित केलेली असणारच. या मंदिरांमध्ये विविध स्तरातील अनेक स्त्रिया वेळोवेळी देवदर्शनाला, कथा-पुराण-प्रवचन ऐकायला, उत्सव साजरे करायला, जातच असणार. त्यांच्या नजरेला अशी शिल्पें नक्कीच पडत असणार. त्यांना ते पाहून काय वाटत असेल ? पण सांगणार कुणाला, तक्रार कोणाकडे करणार ? आणि, केलीच तर, ऐकणार कोण ? ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ ! ( आजच्या काळातही , जातां-जातां, स्त्रियांच्या कानांवर ‘आईबहिणीच्या’ हीन शिव्या पडतातच, आणि त्या बिचार्‍या ऐकून न-ऐकल्यासारखें करतात ! दुसरा पर्यायच काय आहे त्यांना ? )

    ‘थोर भारतीय संस्कृती’असें आपण सदासर्वदा म्हणत असतो, आपल्याला या संस्कृतीचा अभिमानही असतो. संस्कृतीतील चांगल्या गोष्टीबद्दल अभिमान असणें रास्त आहे ; पण संस्कृतीचें हेंही दुसरें अयोग्य रूप आहे, आणि त्याला राजमान्यता होती , ‘शिष्टजन’ यांची मान्यता होती, हेंही आपण विसरतां कामा नये. मध्ययुगात समाज एकीकडे राजकीयदृष्ट्या खाली-खाली जात होताच, व दुसरीकडे, सामाजिक दृष्ट्याही तो अधिक ‘दकियानूसी’, जुनाट, बनून खाली-खाली जात होता. पण, या शिल्पाचा काळ तर १००० वर्षांपूर्वीचा, म्हणजेच, आपण ज्याला ‘मध्ययुग’ म्हणतो, त्याआधीचा आहे. त्या काळात भारत राजकीय दृष्ट्या ‘उंच’च होता ( मध्ययुगीन परकीयांची , परधर्मियांची आक्रमणें सुरूंही झालेली नव्हती) ; मात्र सामाजिक दृष्ट्या, भारतीय समाजातील विचार, चालीरीती ‘उच्च’ पातळीच्या नव्हत्या, हेंच असली शिल्पें प्रकर्षानें दाखवतात.

    म्हणूनच, एका जुन्या सुभाषिताला पॅरॅफ्रेज करून म्हणावें लागतें की, ‘नरेंच केली हीन किति नारी’ !!

    कोणी म्हणूं शकेल , की, २१ व्या शतकातील विचार, अशा अनेक-शतकें-जुन्या शिल्प-प्रतिमेला लावणें कितपत योग्य आहे ? पण लक्षात राहूं द्या की, कांहीं सत्यें कालातीत असतात. किमान, नारीचा समाजातील दर्जा ‘उच्च’ ठेवणें , हें सत्य त्रिकालबाधितच असायला हवें. पण, जिथें आजही ‘स्त्री’ला, समानतेसाठी, तिच्या न्याय्य हक्कांसाठी, मंदिरप्रवेश, ‘राइट टु पी’ सारख्या गोष्टींसाठीं झगडावें लागतें, जिथें आजही सुनांच्या छळाच्या, त्यांना जाळायच्या घडना घडत आहेत ; तिथें, अनेक-शतकें जुन्या ‘प्रतिमां’मुळे डिस्टर्ब् व्हायला कुणा पुरुषाला वेळ आणि इंटरेस्ट आहे ? होय ना ?

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • सुविचार : जगातिल सर्व कंपन्या मोठ्या आहेत, आपण केव्हा मोठे होणार !

    सुविचार : जगातिल सर्व कंपन्या मोठ्या आहेत, आपण केव्हा मोठे होणार !

  • पेस्ट कंट्रोलची पाऊलवाट

    श्री समर्थ आणि दीपज्योती बचत गटाने नुकतेच सुरु केलेले पेस्ट कंट्रोल हे पुण्यातील पहिलेच युनिट ! पापड, कुरडई करणार्‍या महिला आता पेस्ट कंट्रोलसारख्या व्यवसायातही आपले अस्तित्व दाखवत आहेत. पुणे जिल्ह्यातील वडगांव बु।। येथील समर्थ महिला बचत गटाने पुरुषांच्या मक्तेदारीला बगल देवून आपले सामर्थ्य सिध्द करुन दाखवले आहे.

  • डर्बन भाग २

    डर्बन शहर तसे समुद्र किनारी वसलेले असले तरी उपनगरे मात्र डोंगराळ भागात आहेत. याचा परिणाम असा होतो, मुख्य शहरात डिसेंबर/जानेवारी मध्ये कडाक्याचे उन असले तरी उपनगरी भागात तितका कडाका जाणवत नाही. इथे आणखी एक गन्मात वारंवार बघायला मिळते. उन्हाळ्याच्या महिन्यात समजा सलग ३ दिवस उन्हाची काहिली (मुंबईच्या तुलनेत) झाली तरी ४ थ्या दिवशी हमखास पावसाची सर येते किंवा जोरदार पाउस पडतो आणि वातावरण पुन्हा सुस्नात होते. हवामान कोरडे असल्याने, पावसाची साधी सर देखील, इथले वातावरण थंड करते.

    जोहान्सबर्गच्या मानाने, इथली जीवनशैली शांत आहे. अर्थात इथे देखील मॉल संस्कृती रुजली आहे. इथले मॉल्स मात्र अतिशय प्रशस्त आहेत. Pavilion, Gateway सारखे मॉल्स म्हणजे प्रचंड संस्थाने आहेत. एकाच ठिकाणी, जगातील कुठलीही वस्तू इथे प्राप्य असते, भौतिक सुखाच्या परिसीमा इथे गाठलेल्या आहेत. जवळपास ३,४ मजली इमारतीमधून नुसते चालत हिंडणे, हाच पायांना व्यायाम आणि सुखाचे आनंदनिधान असते. डर्बन नॉर्थ भागात तर Pick n Pay Hypermarket म्हणून अवाढव्य मार्केट आहे.
    जगातील अति महागडे कपडे इथे बघायला मिळतात. इथल्या वस्तू महाग असतात, हे तर खरेच पण, थोडी माहिती काढली की इथे तशी स्वस्त किमतीची दुकाने देखील आहेत. अर्थात दर्जाच्या बाबतीत कुठेही तडजोड नसते आणि किराणा माल, खाण्याच्या वस्तूबाबत हेच बघायला मिळते. पहिल्यांदा मला नवल वाटायचे, इथे मॉल्समध्ये असंख्य हॉटेल्स असतात पण तिथे कोण खायला/जेवायला येत असेल? नंतर समजले, शिनिवार सकाळ, रविवार सकाळ इथल्या हॉटेल्समध्ये येउन नाश्ता करायची पद्धत आहे. अगदी सकाळ, सकाळी ८ वाजता देखील, शनिवार/रविवारी हॉटेल्स तुडुंब भरलेली असतात. केवळ, तरुण/तरुणी नसून, कुटुंबाचा सगळा जथ्था इथे हॉटेलमध्ये हजर असतो!!
    मला तर नेहमी असेच वाटते, इथला सगळा समाज, हा हॉटेल्स मध्ये खाणे आणि सदैव काहीना काही तरी शॉपिंग करणे, यातच गुंग असतो. त्यातून, इथली खरेदी म्हणजे सदैव क्रेडीट कार्डचा वापर. नगदी चलनाचा वापर फारसा इथे आढळत नाही. तुमच्या पाकिटात, किती क्रेडीट कार्डस आहेत, यावर तुमची पत ठरत असते. सुरवातीला मला देखील नवल वाटायचे पण नंतर मी देखील याच मार्गाने जायला सुरवात केली!! बरे यांचे हॉटेल्स मधील खाणे म्हणजे एक सोहळा असतो. प्रथम ड्रिंक्स ऑर्डर करायचे, नंतर "स्टार्टर्स" मागवायचे. यात जवळपास, एक, दोन तास निघून जातात. त्यानंतर मग, "मेन मेन्यु" ठरवायचा!! यात, ड्रिंक्सचे आचमन चालूच.
    इथे मी कितीतरी गोरे लोकं सज्जड पिणारे बघितले आणि त्यांना पिताना बघून, "अजून यांची शरीर यष्टी कशी काय सडपातळ राहू शकते?" याचे नवल वाटायचे!! काळ्यांच्या बाबतीत तर पिण्याबाबत तोड नाही. मी तर कधीच पासंगादेखील पुरू शकलो नाही, शकणारच नाही.
    पुढे, या समाजात जसा रुळायला लागलो तशी ध्यानात आले, इथले लोकं - यात स्त्रिया/मुली देखील आल्या, रोज पहाटे व्यायामशाळेत तरी जातात किंवा मैलो न मैल, धावण्याचा जबरदस्त व्यायाम करतात. आदल्या दिवशीचे सगळे खाणे, दुसऱ्या दिवसाच्या व्यायामात रिचवून टाकतात!! इथे सायकलिंग करणे, हा देखील आनंदाचा खेळ असतो. वातावरणात कितीही गारवा असला तरी, विशेषत: डोंगराळ भागात राहणारे, कितीतरी गोरे युवक/युवती, आपल्या सायकल घेऊन, रपेट करीत असताना, नित्याच्या दिसत असतात. अर्थात, यांच्या सायकली देखील देखण्या तर असतातच पण अतिशय दणकट असतात. एकूणच इथल्या समाजात, स्वच्छता, व्यायाम, कायदे पाळणे या बाबतीत जागरूकता आहे आणि मला वाटते, ती लहानपणापासून मनावर बिंबवली जाते.
    अर्थात, "गाव तिथे महारवाडा" या उक्तीप्रमाणे उकिरडा प्रत्येक ठिकाणी आढळतो. आपण, साउथ आफ्रिका टीव्हीवर बघतो, त्यामुळे या देशाची चांगली(च) बाजू नेहमी प्रकाशात येते. इथे काही वर्षे काढली म्हणजे अस्तरामागील ठिगळे दिसायला लागतात!! डर्बन इथे देखील गुन्हेगारीचे प्रमाण जरी भयानक नसले तरी नगण्य अजिबात नाही. १९९७/९८ साली, मी रात्री, बेरात्री रस्त्यावरून हिंडत असे, मध्यरात्री समुद्राकाठी जाउन बसत असे पण, जेंव्हा २००९ मध्ये परत इथे राहायला आलो आणि बदलत्या परिस्थितीचे वास्तव भान आले.
    हळूहळू, इथले जीवन देखील काहीसे बकाल व्हायच्या मार्गावर लागले आहे. भ्रष्टाचार अगदी आचारसंहिता झाली नसली तरी बऱ्याच प्रमाणात वाढ होत आहे. त्यातून, इथल्या चलनाचे आंतरराष्ट्रीय पतमापन घसरायला लागले आहे आणि महागाईचे चटके बसायला लागले आहेत. आर्थिक विषयी बोलायचे झाल्यास, या देशात प्रचंड प्रमाणात आयात केली जाते आणि चलन विनिमयाच्या दरातील घसरण, प्रामुख्याने महागाईला कारणीभूत ठरत आहे. अजूनही, इथे गोऱ्या लोकांचा प्रभाव असेल किंवा कायद्याविषयी आदर असेल म्हणा, भारताच्या मानाने, इथे निश्चितपणे, सुस्थित जीवन जगण्याच्या विपुल संधी आहेत. आजही, Tax Evasion संस्कृती भारताइतकी बोकाळलेली नाही. अर्थात, इथे Tax चे प्रमाण बरेच आहे पण त्याचबरोबर ज्या प्रकारच्या सुविधा मिळतात, त्याची तुलना केली तर, युरप किंवा अमेरिकेपेक्षा इथे जीवनमान स्वस्त आहे.
    एक अनुभव सांगण्यासारखा आहे. N3 या राष्ट्रीय महामार्गावर, मी गाडी चालवत होतो, महामार्गावर गाडी चालवणे म्हणजे गाडीचा वेग, कमीत कमी ८० कि.मी.!! अशा भरघाव वेगात गाडी धावत असताना, समजा अपघात झाला तर मृत्यूचे प्रमाण हमखास. बराच वेळ गाडी चालवत असताना, माझ्या मागून, एक मर्सिडीज गाडी पुढे गेली. त्यावेळी मी १०० कि.मी. वेगाने गाडी चालवत होतो, तेंव्हा मर्सिडीजचा वेग माझ्यापेक्षा अधिक, हे ओघाने आलेच. त्यापाठोपाठ दुसरी मर्सिडीज, माझ्या गाडीला pass on करून गेली आणि काही क्षणात, माझ्या समोर दोन्ही गाड्या, एकमेकांवर आदळल्या!!
    सुदैवाने, माझ्या गाडीपासून, अपघाताचे अंतर तसे सुरक्षित असल्याने, मी गाडीचा वेग कमी केला . एकात गौर वर्णीय तर दुसऱ्यात कृष्ण वर्णीय लोक होते, माझ्या डोळ्यासमोर गाड्यांच्या पुढील भागाचा चकणाचूर होत होता. सुदैवाने, गाडीतील लोकं सुरक्षित होते. त्यातील एकाने, Help नंबर लावला आणि अक्षरश: दहाव्या मिनिटाला, तिथे ३ Ambulance, ४ पोलिस गाड्या आणि वरून helicopter (टेहळणीसाठी) हजर!! लगेच पुढील कारवाईला सुरवात झाली आणि अर्ध्या तासात, तिथे अपघाताची साधी निशाणी देखील उरली नव्हती!! आपण, इथे infrastructure म्हणून धोशा लावतो आणि तसे बघितले त्याची आवश्यकता आहे, कारण आता आपल्याकडे देखील अशाच प्रकारचे प्रचंड महामार्ग अस्तित्वात येत आहेत. पण, त्याचबरोबर अशा सुविधा मिळणे देखील अत्यंत गरजेचे आहे. असे अपघात जरी झाले, तरी रस्ता कमीत कमी वेळात मोकळा करणे, अत्यावश्यक असते.
    इथे लोकांच्या गरजेची किती काळजी घेतली जाते, याचे दुसरे उदाहरण देतो. एकतर इथे "वीज" जाणे, असे प्रकार जवळपास नाहीच!! डर्बन इथे राहताना, एकदा, इथे काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता भासली. अर्थात, इथे वीज नाही म्हणजे आयुष्य ठप्प!! अशा वेळी, डर्बन महापालिकेने, आमच्या भागातील प्रत्येक घरात, एक छापील पत्र पाठवले होते. त्या पत्रात, कुठल्या दिवशी वीज पुरवठा खंडित होणार आहे आणि किती वेळ खंडित होणार आहे, याची सगळी माहिती दिली होती. प्रत्यक्षात काम सुरु होणार होते, ते २ आठवड्यांनी!! तरी देखील कुणालाही गैरसोय होऊ नये, याची इथे नित्यनेमाने काळजी घेतली जाते आणि पत्रात दिलेली वेळ, अत्यंत कसोशीने पाळली जाते. प्रकार, रस्ता दुरुस्तीबाबत चालतो. हे केवळ महामार्गाबाबत घडते असे नसून, शहरातील आडमार्ग जरी दुरुस्तीला काढायचा असेल तरी हीच पद्धत पाळली जाते.
    डर्बन शहर माझ्या डोळ्यादेखत विस्तारले पण, प्रत्येक ठिकाणी अत्यंत कसोशीने आणि काटेकोरपणे Planning केले जाते. आहे रिकामी जागा म्हणून बांधली बिल्डींग, असा प्रकार इथे अजिबात चालत नाही. काहीवेळा याचा त्रास होतो म्हणजे समजा, तुम्ही रस्ता चुकलात तर तुम्हाला कमीत कमी, १,२ कि.मी. चा फटका बसतो!! महामार्गावर तर अधिक लांबचा फटका बसतो. महामार्ग आखतानाच, लोकांच्या सोयींचा तसेच commercial complexes ध्यानात घेऊनच बांधले जातात. तसेच अशा नवीन मार्गांवर वृक्षांची लागवड, अत्यंत आग्रहाने केली जाते. डर्बन इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने हिरव्या रंगाचा सोहळा अनुभवता येतो. रिकामी जागा आहे आणि तिथे काही बांधकाम करायचे झाल्यास, तिथल्या वृक्षांची निगराणी कशी राखली जाइल, याचा विचार प्रथम केला जातो. उचलली कुऱ्हाड आणि तोडले झाड, हा इथे अक्षम्य गुन्हा आहे. मी जिथे रहात होतो, तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी होती आणि संध्याकाळी, रस्त्याच्या कडेने, फिरत रहाणे, हा एक आनंदसोहळा असायचा.
    आता, कधीकधी मनात असा विचार येतो, हे इथले सौंदर्य, सोयी, सवलती आणखी किती वर्षे शाबूत राहणार आहेत? डर्बन तसे टुमदार शहर आहे. जोहान्सबर्गप्रमाणे अंगावर येत नाही. जोहान्सबर्ग शहराचा विस्तार बघून, तुमची छाती दबून जाते. डर्बन आकाराने छोटे आहे, म्हणूनच तुम्ही त्याच्या लगेच प्रेमात पडू शकता. हे शहर तुम्हाला प्रेमात पडायला भाग पाडते आणि प्रेमात पडावे, अशा इथे असंख्य जागा आहेत, उद्याने आहेत, लायब्ररी आहे, समुद्र किनारे आहेत. प्रश्न परत, परत मनात येतो, हे शहर किती काळ, आपल्याला असे ओढून घेईल?
    - अनिल गोविलकर