(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • निसर्ग — पक्षी ( Birds )

    फोटो-विडीओ

  • वाचाळपणा……!!!

    कशी संपवावी यांची कटकट.

  • पंगत सोलापुरची

    पिकतं तिथं विकत नाही ,अशी एक म्हण आहे.
    पण सोलापुरात ती खोटी ठरते..
    इथे जे पिकतं ,तेच विकतं...
    कमी पाऊस आणि काळी माती असणार्या सोलापूर परिसरातील ज्वारी ,बाजरी,तूर,हरभरा,भुईमूग
    ही प्रमुख पिके...
    त्यामुळे "ज्वारीची भाकरी " हा सोलापुरी जेवणातील मुख्य पदार्थ..
    सोलापुरातील पंचतारांकित हॉटेला पासून ते साध्याशा धाब्यावर मिळणारा नि
    श्रीमंत आणि गरीब घरातही खाल्ला जाणारा!
    दुपारी बाराच्या सुमारास सोलापुरातल्या कोणत्याही घरात "ठक् ठक् " असा आवाज ऐकू येतोच
    तो भाकरी बडवण्याचा असतो..
    हो..इथे भाकरी थापत नाहीत ...बडवतात..
    ज्वारीच्या पिठाचा गोळा भरपूर मळून ,पोळपाटावरील भरपूर ज्वारीच्या पिठावर ठेऊन दोन्ही हातांनी एका लयीत नि बांगड्याच्या सुरात बाई भाकरी बडवू लागली की पाहणार्याचीही समाधी लागते..
    दोन मिनिटात भाकरी थापून तयार होते नि तव्यावर पडते..
    तव्यावर पाणी पिऊन ती अशी टम्म फुगते की तिच्यावरून नजर हटत नाही..
    एकही काळा डाग न पडू देता छान भाजलेली पांढरीशुभ्र भाकरी करणं हे अतिशय कौशल्याचं काम...
    ही भाकरी एवढी पातळ असते की नवीन माणूस ही पोळी आहे की भाकरी या संभ्रमात पडावा...
    अशी भाकरी बनवायला अंगीभूत कौशल्य नि सराव लागतोच..
    म्हणूनच सोलापुरात लग्नासाठी मुलगी पसंत करताना रूप,रंग ,पैसा यांपेक्षा मुलीला चांगली भाकरी करता येते की नाही, हे पाहिलं जातं..
    चुलीवर भाकरी करता येत असेल तर तिला शंभर गुण मिळतात..
    कारण चुलीवरची भाकरी म्हणजे
    अतीव कौशल्याचं नि संयमाचं काम!
    अंगच्या गोड सोलापुरी ज्वारीला चुलीचा खरपूस स्वाद मिळाला की फक्त "अहाहा "...
    या भाकरीच्या चवीत जितका करणारीचा हातगुण असतो तितकाच इथल्या ज्वारीचाही असतो.
    कदाचित कमी पावसामुळे इथल्या ज्वारीची चव,गोडी टिकत असावी..
    लग्नापूर्वी भाकरीला नाक मुरडणारी मी लग्न करून सोलापुरात आल्यापासून भाकरीशिवाय राहू शकत नाही...
    " कडक भाकरी " हे सोलापुरचं खास वैशिष्ट्य..
    अतिशय पातळ थापलेली भाकरी तव्यावर भाजून चुलीच्या धगीपाशी उभी करून ठेवली जाते..
    ती थोड्याच वेळात कडक होते..
    मीठ,तीळ ,हळद घालून केलेली बाजरीची कडक भाकरी पापडासारखी चविष्ट नि खुसखुशीत लागते..
    अनेक दिवस टिकणारी कडक भाकरी प्रवासासाठीही उत्तम..
    लग्न झाल्यानंतर चार दिवसात आम्ही एका धाब्यावर जेवायला गेलो होतो .
    तिथे कोपर्यात अनेक पोती उभी करून ठेवलेली होती..
    ती भाकर्यांनी भरलेली होती...
    हॉटेलातल्या शिळ्या भाकर्या ( भाकरीचं अनेकवचन भाकरीच होतं पण सोलापुरसाठी ते भाकर्याच असत..विषय संपला )
    अशा का पोत्यात भरून ठेवल्यात?
    उत्सुकता गप्प बसू देईना..
    शेवटी वेटरकाकांना विचारलच ...
    आणि तिथे "कडक भाकरी" शी पहिली ओळख झाली.
    "कडक चहा","कडक लक्ष्मी ","कडक शिक्षक" " कडक उपास" ...यांच्या पंगतीत आता "कडक भाकरी " ही बसली..
    प्रामुख्याने मटन किंवा चिकन रस्स्यांत चुरा करून खाल्ली जाणारी ही कडक भाकरी आमटी किंवा वांग्याच्या आणि शेंगाभाजीच्या रश्श्यात कुस्करून खायलाही छान लागते....
    धपाटा ...हा भाकरीचा खमंग चुलत भाऊ...
    ज्वारीच्या पिठात थोडी कणिक,थोडं बेसन (कणिक ,बेसन ऑप्शनल बरंका),ओवा,तीळ, जिरे,हळद,मीठ,लसणाची पेस्ट , भरपूर कोथिंबीर घातली ,पाणी घालून भाकरीच्या पिठासारखा गोळा केला ,लहान गोळा घेऊन ओल्या कापडावर अगदी पातळ थापला आणि तव्यावर टाकला,त्यावर तेल पडलं की असा काही खमंग सुवास आसमंतात दरवळतो की तुम्ही ताटली घेऊन बसायलाच पाहिजे...
    धपाटे भाजून झाले की त्याच तापलेल्या तव्यावरून "चुर्र....." असा आवाज येतो , दणदणीत खाट नाकात शिरतो नि तुम्ही खोकू लागता..
    हा ठसका असतो तव्यावर जन्माला येऊ पाहणार्या ठेच्याचा..
    भाकरीच्या किंवा धपाट्याच्याच तव्यावर तेल ,जिरं ,भरपूर लसूण नि हिरव्या मिरच्या परतल्या जातात, त्यात खडेमीठ,शेंगदाणे पडतात नि खरपूस भाजल्यावर त्याच तव्यात वाटीने या सगळ्या गोतावळ्याला खरडलं जातं...आणि ठेसा(शब्द सोलापुरी) जन्माला येतो.
    एका ताटलीत गरम-गरम धपाटा किंवा ज्वारी/बाजरीची पातळ भाकरी,ठेचा,घट्ट दही घ्यायचा नि मारायचा ताव...
    काहीतरी राहिलय वाटतय नं...
    हो, श्येंगा चटणी...हा तर सोलापुरी जेवणाचा आत्मा..
    लालभडक ,मुद्दाचटणीशिवाय नाष्टा काय,जेवण काय पूर्ण होतच नाही ...
    गावरान सोलापुरी शेंगदाणे अतिशय गोड नि चविष्ट.
    हे शेंगदाणे खरपूस भाजून,साले काढून घ्यायचे. उखळात किंवा खलात जिरं ,मीठ , हिंग,लाल तिखट घालायचं.( लसूण, चिंच पाहिजे असल्यास) कुटायचं नि मग शेंगादाणे घालून मुद्दा होईपर्यंत कुटायचं..
    ही चटणी किलोवर करावी लागते बरंका...
    सोलापुरमधे घरात एखादेवेळी फर्निचर नसलं तरी चालतं पण श्येंगाचटणी मात्रं घरात नसेल तर पाप लागतं..
    ही शेंगाचटणी भाकरी/पोळी,धपाटा,पुरी,बटाटेवडा,उत्तप्पा,डोसा अगदी पिझा,बर्गरसोबतही चालते..
    सोलापुरातलं लहान मूल बालवाडीत जातं ते भाकरी चटणीचा डबा घेऊन नि हॉस्पिटलात ऐडमिट केलेल्या आजोबांनाही शेंगाचटणी भाकरीचे चार घास खाल्ल्याशिवाय आराम पडत नाही.
    आता तुम्ही म्हणाल सोलापुरकर भाज्या खातात की नाहीत की फक्त चटणी भाकरीच?
    खातात हो खातात..
    पण कोणती खातात हे तुम्हाला ओळखूच येणार नाही .
    भरपूर शेंगाकूट आणि काळा मसाला यात लपलेली भाजी कोणती आहे ,हे कसं बरं ओळखणार?
    कळस म्हणजे इथे फक्त शेंगाची भाजी असते..म्हणजे शेंगाकूट,मसाला,तेल आणि मीठ यांचा बनवलेला रस्सा..छान लागतो बरं का ...!!
    पण इथली वांग्याची भाजी खास...!!
    नुकतीच शेतातून काढलेली ताजी -ताजी छोटी ,जांभळी,काटेरी वांगी पाहिली की कधी एकदा भाजी करून रिचवतोय ,असं होऊन जातं.
    शेंगादाणे,भरपूर कोथिंबीर,लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यायची.
    त्यात मीठ,काळा मसाला,लवंगाचीपूड घालायची नि हे मिश्रण छोट्या वांग्यात भरायचं..
    जरासं जास्त तेल घालून तेलावर ही भरली वांगी शिजवून घ्यायची..
    नुसती खायलाही अप्रतीम लागतात..
    रस्सा हवा असेल तर यातच पाणी घालून शिजवायचं ...
    कोवळ्या ताज्या पालेभाज्या हे सोलापुरच्या बाजाराचं वैशिष्ट्य..
    मेथी,पालक,अंबाडी,करडी,चुका,राजगिरा,तांदुळसा, कांदापात,हरबर्याची भाजी या पालेभाज्यांनी बाजार हिरवागार झालेला असतो..
    "पेंडपाला" सोलापुरकरांचा आवडता..
    कोणत्याही कोवळ्या पालेभाजीत तूर,मूग किंवा मसुराची भिजवलेली डाळ नि लसूण ,मिरची आणि शेंगाकूट घालून केलेली कोरडी भाजी म्हणजे पेंडपाला..
    अतिशय चविष्ट नि पौष्टिक!!
    पालक,चुका,मेथी शिजवून त्यात तुरीचं वरण नि लसणाची फोडणी दिली की "गरगट्टा " तयार होतो..
    याच गरगट्ट्यात जास्तीचं वांगी,घेवडा,गाजर,ओला हरबरा,
    पेरू,बोरं,हरबर्याची भाजी,सगळ्या डाळी हे सगळं घातलं की तयार होते
    ती संक्रातीच्या भोगीची " भज्जी "
    भाज्या तर भारीच असताना पण सोलापुरकरांना जास्त आवडतं ते
    " बेसन ".
    पिठल्याला सोलापुरात बेसन म्हणतात..
    ओवा,हिरवी मिरची ,जिरं,मोहरी,कढीलिंब घालून केलेलं पातळ नाही पण कोरडंही नाही ,असं पिठलं..
    सोलापुरी जेवणात भात असतो ...
    पण त्याचं स्थान दुय्यम...
    बरं तो आंबेमोहर,बासमती,इंद्रायणी पाहिजे असली नाटकं नाहीत..
    भात दमळदार नि मोकळा असणं पुरेसं असतं..
    भाताशी खायला डाळ लागते..
    तूरडाळ
    टोमॅटो,हिरवी मिरची,लसूण ,जिरं आणि मीठ एवढ्याच भांडवलावर केलेली डाळ अप्रतीम लागते..
    पण मला इथली तेलगु पद्धतीची भरपूर चिंच घातलेली आंबट आमटी जास्त आवडते..
    आणि इथे ती वाटीतून न देता पाणी पिण्याच्या फुलपात्रातून दिली जाते..
    मज्जा म्हणजे हिला तेलगुत "पप्पू " म्हणतात.
    गरम-गरम भात आणि पप्पू खाणं ही भातप्रेमींसाठी मेजवानी असते...
    असाच नोव्हेंबर,डिसेंबर,जानेवारीसारखा थंडीचा एखादा महिना असावा...
    नेहमीच्या उकाड्यापासून सोलापुरला काडीमोड मिळालेला असावा.
    गुलाबी थंडीत अख्खं गाव लपेटलेलं असावं...
    शनिवार रविवार धरून पाहुणे यावेत..
    शनिवारी रात्री एखाद्या धाब्यावर जाण्याची टूम निघावी..
    गावाच्या गर्दीपासून दूर पण फार लांब नसलेल्या एखाद्या हॉटेलात
    आकाशाखालील लॉनवरील किंवा मातीवरील खुर्च्यांत स्थानापन्न व्हावं..
    बाळगोपाळांनी हॉटेलातील घसरगुंडी,झोक्याचा आनंद लुटावा..
    मोठ्यांनी राजकारण,समाजकारण,अर्थकारणावर जोरजोराने चर्चा झोडाव्यात..
    एवढ्यात खाकरा, मसाला शेंगदाणे यावेत..त्यासोबतच एखादं शीतपेय
    आणि चाटमसाला शिंपडलेली खेकडा भजी मागवावीत..
    उगाच सूपबिप मागवून सुपाचा अपमान करू नये..
    पोरांना खेळून आणि मोठ्यांना गप्पांमुळे पोटात कावळे ओरडू लागले की जेवण आणायला सांगावं..
    तोपर्यंत आकाशदर्शनात रमून जावं..
    एकावर एक ठेवलेली ताटांची चळत
    वेटरने आणावी..
    तुमचं ताट तुमच्यासमोर यावं.
    त्यात एका वाटीत पिवळंजर्द बेसन, दुसरीत हिरवागार पेंडपाला,तिसरीत लालबुंद मसाला वांगं , चौथीत पांढरंशुभ्र दही आणि पाचव्या वाटीत
    पुन्हा पिवळीजर्द डाळ असावी.
    डावीकडे कांदा,लिंबू ,ठेचा आणि ही भाजी की चटणी असा संभ्रम पडावा असा
    मोठा शेंगाचटणीचा ढीग...
    या पदार्थांच्या सप्तरंगांनी नि सुगंधाने पोटातील जाठररसाला नि लाळग्रंथीना साद घालावी..
    आणि गरमागरम ,पातळ पांढर्याशुभ्र भाकर्या घेऊन वेटरची स्वारी यावी...
    आपल्या पानात भाकरी पडताच दही चटणी नि भाकरीचा पहिला घास पोटात जावा, मग बेसन -भाकरीचा दुसरा , तिसरा वांगं नि भाकरीचा...
    या रसोत्सवात इतकं मश्गुल व्हावं की भोवतालच्या जगाचा विसर पडावा..
    पहिली भाकरी संपल्यावर पुन्हा या जगात यावं नि कुणी बाजरीची भाकरी तर कुणी धपाटा मागवावा..
    भाकर्या नि धपाट्यांची गणती न करता खात जावं...
    आणि आपल्या खाण्याची आपल्याला लाज वाटली की मोर्चा
    भैरवीच्या भाताकडे वळवावा..
    डाळ भाताचा आस्वाद घेऊन शेवटचे दोन घास दहीभातासाठी ठेवावेत..
    " साहेब ,गोड काय आणू ?"
    वेटरने अन्नसमाधीतून जागे करावे ..
    शेंगापोळ्या ,खवापोळी नि हुग्गीची ऑर्डर निघावी..
    पाच मिनिटांत गावरान तुपात थबथबलेल्या शेंगापोळ्या ,खवापोळ्या नि हुग्गीच्या वाट्या याव्यात..
    पोटात भूक नाही असं वाटत असतानाही मऊसूत खवापोळी, खुसखुशीत शेंगापोळी खातच जावी..
    हुग्गीच्या वाट्यांवर वाट्या रिकाम्या व्हाव्यात...
    आपण केवढं जेवतोय असे वाटून खजील व्हावे ,नि जेवणाला पूर्णविराम द्यावा..
    पाहुण्यांचे समाधानी चेहरे नि जेवणाचं कौतुक ऐकून ऊर भरून यावा...
    बिल देऊन निघायला सुरुवात करावी नि उभे राहिल्यावर लक्षात यावे ..
    आपण इतके जेऊनही पोटाला जडपणा, जळजळ काहीच होत नाहीये...
    हेच तर सोलापुरी जेवणाचं वैशिष्ट्य .....!!
    --नीला महाबळ गोडबोले
    --सोलापूर
  • मुक-बधिर शाळा, अलिबाग

    कुठलीही सुंदर गोष्ट हृदयात साठवून तिचा अनुभव घेण्यासाठी ऐकण्याच्या शक्तीची खुप गरज असते. नुसतं पावसात भिजणं, आणि त्या पावसाचा आणि कडाडणार्‍या विजांचा आवाज शांतपणे ऐकत भिजणं यात खूप फरक असतो. आईची पाठीवर प्रेमाची थाप पडली तर आपल्याला बरं वाटतच, परंतु जोडीला तिचे प्रेमाने ओथंबलेले शब्द कानांवर पडले तर आपला आनंद अजून द्विगुणीत होतो.

  • चिनी कलेची विविधता – भाग ३

    जेवणाची वेळ होईपर्यंत अशीच गंमत जंमत चालली होती. अर्थातच 'तू' जमातीची विवाहपद्धती परदेशी पाहुण्यांना माहीत करून देण्यासाठीच हा सगळा खेळ होता. जेवणाची वेळ होताच आम्ही सगळे आतल्या खोलीत गेलो, नेहेमी प्रमाणे टेबलाभोवती बसलो. 'नवरा मुलगा' आमच्या शेजारीच होता. सूपचा आस्वाद घेत होतो तोच 'नवरीला' बरोबर घेऊन तिच्या 'सख्या' जेवणघरात आल्या आणि 'नवऱ्यामुला'च्या खुर्चीमागे घोळका करून दाटीवाटीने उभ्या राहिल्या. सूप चालू असताना त्या चिनी भाषेत गाणी गात होत्या. आमचे बाऊल उचलून दुसऱ्या प्लेट आल्या, पण 'नवऱ्या' मुलाचे सूप बाऊल 'नवरी' च्या सख्या उचलूच देईनात. आमच्यासाठी भात व भाजी आली, पण 'नवरा' रिकामा बाऊल पुढ्यात घेऊन तसाच! सख्यांची गाणी संपेनात, बाऊल उचलला जाईना! शेवटी आमच्या गाईडला 'दया' आली व त्याने 'मुली' कडच्या एका वयस्कर स्त्रीला पुढे आणले व "हा काय प्रकार आहे?" असे विचारले. भाषेचे गोंधळ संपले व उलगडा झाला की मैत्रिणींना बाऊल उचलण्यासाठी 'मेहुणीचा मान' म्हणून काही रक्कम हवी होती. शेवटी नवरोबांनी काही किरकोळ नोटा त्यांच्या हातात सरकवल्यावर त्याला पुढचे जेवण मिळाले. जेवण पूर्ण होईपर्यंत नवरी नवऱ्याला वारा घालत होती, जेवण वाढत होती, आग्रह करत होती. तोही या 'व्ही आय पी' ट्रीटमेंटमुळे खूप खूष होता, एन्जॉय करत होता, त्याची खरी बायको व्हीडियो शूट करत होती. आम्ही सगळे गंमत पहात होतो. त्याचे जेवण होताच लग्न समारंभ संपल्याचे जाहीर झाले, सगळे उठले. आम्ही वस्तीबाहेर पडणार तोच शेवटच्या घरातून पुनः नवरीच्या मैत्रिणी व नवरी तिचे सामान घेऊन आडव्या आल्या. नवरी राजरोसपणे आपल्या सख्यांना सोडून नवऱ्या शेजारी जाऊन उभी राहिली. तिच्या सख्या मोठमोठ्याने हुंदके देऊ लागल्या. तिची 'आई' तर तिला मिठी मारून रडायला सुद्धा लागली. आमची बस थोडी दूरवर उभी होती. आम्ही, आमच्या मागे नवरा-नवरी, त्यांच्या मागे त्याची खरी बायको, व तिच्या मागे वस्तीवरचे 'बाराती'. बस जवळ आली तरी मंडळी मागे फिरेनात. उलट नव्या नवरीची नव्या नवऱ्याबरोबरची जवळीक वाढतच चालली. शेवट तिने त्याचा हात पकडला तेव्हा मात्र तोच काय आम्ही पण चपापलो. गाईडच्या मध्यस्थीने विचारले तर कळले की वस्तीवरचे लोक म्हणताहेत, "या दोघांचे लग्न झाले असून ही आता त्याची बायको झालीय, त्यामुळे ती त्याच्या बरोबर सिंगापूरला जाणार व त्याला तिला न्यावेच लागणार." आता मात्र नवरा व त्याची खरी बायको चांगलेच सटपटले. बसमधे चढून त्याची खरी बायको त्याला बसमध्ये खेचू लागली, तर 'ती' त्याला बसमधून खाली ओढू लागली. "हे काय संकट आले" म्हणून बायको, तर 'तो' आपल्याला नेणार नाही" म्हणून 'ती' रडू लागली. शेवटी मी सिंगापूरला रहातो, तिथे तुला व्हिसाखेरीज प्रवेश मिळणार नाही" असे सांगताच खरी गोष्ट उघडकीस आली व 'नवरी'ला माहेरी ठेऊन घेण्यासाठी भल्या मोठ्या रकमेची मागणी झाली. घासाघीस होऊन शेवटी थोड्याशा डॉलर्सवर सौदा तुटला. बिचाऱ्या नवरदेवाला फुकटचा भुर्दंड व त्याची बायको रडून रडून हैराण ! पैसे घेऊन 'नवरी' व बाराती मागे झाले व 'नवऱ्या'ला बसमधे जाण्याची परवानगी मिळाली. बस सुटेपर्यंत बाराती मात्र खिडकीपाशी टाचा उंच करून, नवरीकडे अंगुलीनिर्देश करून 'तिला लवकर घेऊन जा, विसरू नका' असे हातवारे करून सांगत होते. आता चालकाला तो नवराच बस सोडण्याची घाई करू लागला.

    तेवढ्यात आमच्यासारखीच दुसरी प्रवासी बस तिथे येऊन थांबली. त्यातून नवे प्रवासी उतरू लागताच इतका वेळ ओक्साबोशी रडणारी 'नवरी' हसतहसतच नटण्यासाठी खोलीकडे पळाली, बाराती बस मधल्या लोकांच्या स्वागतासाठी परत दरवाजाच्या दोन्ही बाजूस उभे राहिले. नव्या पाहुण्यांबरोबर हाच खेळ, याच थेटरात फक्त नवीन 'नवऱ्या'साठी सज्ज होत होता. हा सगळा पैसे मिळवण्यासाठी चालणारा खेळ आहे हे जरी सुरुवातीपासूनच माहिती होते तरी त्या कलाकारांच्या अभिनयाला मनापासून दाद द्यावीशी वाटली. पैसे मिळवण्याची अशी पूर्वी न पाहिलेली अजब युक्ती गाईडने समजावताच चीनी नवरा आणि त्याची बायको यांच्यासह सर्वजण हसायला लागले. आम्ही मार्गस्थ झालो पण डोळ्यासमोर तरळत होती ती त्या नवरीची अप्रतिम 'अभिनय कला.'

    पुढचा टप्पा होता चेंगडू. विमानप्रवास करून आम्ही तिथे पोहोचलो. तिथली उत्कृष्ट बाग पहाणे व बाकी राहिलेली किरकोळ खरेदी एवढाच कार्यभाग होता. चेंगडूही ३००० फुटांवर आहे. त्यामुळे हवा आल्हाददायक होती. सिच्युआन प्रॉव्हिन्समधील चेंगडू हे महत्त्वाचे गाव. दुसऱ्या महायुद्धाचे वेळी या गावाचा चीनला खूप उपयोग झाला होता अन् त्यामुळे महत्वही. जगातील सर्वात उंचावरून जाणारा रेल्वेमार्ग सुरू होण्याअगोदर तिबेटमध्ये प्रवेश करण्यासाठी हा मार्ग जास्त सोयिस्कर होता. शहरावर चिनी छाप अगदी ठळक दिसत होती. गजबजाटही बऱ्यापैकी होता. फिरत फिरत आम्ही तिथले प्रसिद्ध उद्यान व त्याच्या जवळच्या बाजार गल्लीपाशी आलो. आता चिनी वस्तू सर्वत्र मिळत असल्याने मोठे मोठे रंगीत पंखे, लाल केशरी दिवे, लायन-ड्रॅगनच्या मूर्ती यांचे विशेष आकर्षण वाटले नाही. बाग मात्र आकर्षक होती. वेगवेगळ्या पुष्परचना, ठिकठिकाणी कमानी होत्या. मधोमध एक ऍफीथिएटर होते. एक छोटा हौशी ऑर्केस्ट्रा आपली कला सादर करत होता. त्या सुरांवर व तालावर गोबरी गुटगुटीत मुले नाचत होती. खूपच छान होते ते दृश्य! आम्ही बागेत हिंडत असता ती मुले आमच्या जवळ येऊन माझ्या साडीला हात लावून पहात होती. पदर ओढत होती, इतकेच काय आमच्या हातालाही स्पर्श करत होती. तिथे आम्ही दोघेच भारतीय असल्याने मोठ्या माणसांचेही आम्ही आकर्षण केंद्र ठरलो. खूप मजा वाटली या सगळ्याची. आम्ही भारतीय वंशाचे हे मात्र त्यांनी माझी साडी-कुंकू पाहून ओळखले. काही जणांनी आमच्या बरोबर फोटोही काढून घेतले. भारतीय वेषभूषा व भारताची काही वैशिष्ट्ये इतक्या दूरवरही माहिती आहेत हे पाहून खूपच आनंद झाला.

    चेंगडूमध्ये आमचे भेट देण्याचे दुसरे ठिकाण होते 'सिच्युआन ऑपेरा.' इतरही बरेच ऑपेरा आता जागोजागी दिसतात, पण 'सिच्युआन ऑपेरा' हे महत्त्वाचे, खूप पुरातन व मुख्य सांस्कृतिक केंद्र आहे. चेंगडू शहराची शोभा बघत बघत आम्ही पूर्वीच्या पद्धतीच्या खास चिनी कलाकुसर दाखवणाऱ्या भव्य कमान असणाऱ्या ऑपेराहाऊसपाशी पोहोचलो. सायंकाळी पाचच्या सुमारास हा खेळ सुरू होणार होता. भल्यामोठ्या प्रशस्त रंगमंचासमोरच्या अर्धगोलाकारात मांडलेल्या आसनांवर आम्ही स्थानापन्न झालो, पहातापहाता सगळे थिएटर आमच्यासारख्या पर्यटकांनी भरून गेले. भोवताली असलेल्या २ मजली छोट्या छोट्या कमानी असणाऱ्या खोल्यांच्या मधल्या मोकळ्या जागेत ही आसनव्यवस्था होती. सगळीकडे रंगीबेरंगी छोटे-मोठे आकाशदिवे टांगलेले होते. पताकांच्या माळा वाऱ्यावर झुलत होत्या. संगीताचे मंद स्वर वातावरण प्रसन्न करत होते. आम्ही सगळी शोभा बघतो आहोत तोच कार्यक्रमाच्या निवेदनाला सुरुवात झाली. निवेदक सांगत होता, "या कार्यक्रमात रंगीबेरंगी वेशभूषा केलेले विविध समूह एकामागोमाग आपापली कला सादर करतील. यात सिच्युआन प्रॉव्हिन्सच्या, चीनच्या इतिहासाची उजळणी केली जाईल. कलाकार नाच, गाणे, नकला यांच्या माध्यमातून इतिहास आपल्या डोळ्यासमोर साकार करतील. चिनी राजेराण्यांच्या, त्यांना घाबरवणाऱ्या राक्षसांच्या, परिकथेतील दयाळू पऱ्यांच्या गोष्टी छोट्या छोट्या नाटकांद्वारे आपल्या समोर येतील.” सर्व निवेदन अर्थात मॅडरिन भाषेत होते. आम्हाला भाषा कळत नव्हती तरी त्याचे व इतर कलाकारांचे हावभाव इतके बोलके होते की, कथा सहज समजली. कार्यक्रम सुरू असताना छोट्या छोट्या किटल्यातून बिन दुधाचा बिन साखरेचा चिनी चहा, भाजलेल्या विविध बिया, शेंगदाणे आमच्या समोर येत होते. त्याचा आस्वाद घेताना कार्यक्रमात अधिकच रंग भरत होता. साधारण २ तास हा कार्यक्रम चालला.त्यानंतर चेंगडूच्या पारंपारिक कलेचा खेळ सादर होणार होता. तो होता 'फेस चेंजिंग उर्फ 'बियान लियान' -सिच्युआन प्रॉव्हिन्सचा फार पूर्वापार चालत आलेला खेळ. तो सादर करणारे कलाकार अत्यंत चमकदार रंगीबेरंगी वेशभूषा करतात. त्यांना साथसंगत तशीच नाट्यमय व जलद गतीची असते. रंगभूमीवर कुठली तरी चिनी परिकथा चालू असते. त्यात राक्षसाचा किंवा खलनायकाचा प्रवेश उशीरा असतो. भाषेमुळे कथा कळत नाही, पण राक्षस अवतरला की लगेच कळते की, हा आता राजाराणीला त्रास देणार. त्या दोघांना मदत करणारी देवताही यथावकाश अवतरते. आणि सुरू होते त्या दोघांचे युद्ध! आपण गुंग होऊन पहात असतो. आता देवतेची सरशी होणार.....तेवढ्यात पिवळ्या चेहऱ्याचा राक्षस अचानक लाल तोंडाचा दिसू लागतो. पुन: देवता त्याच्यावर कुरघोडी करणार तितक्यात लाल चेहरा अचानक निळा होतो. अंगातल्या कपड्यांमुळे एकच व्यक्ती वेगवेगळ्या चेहऱ्यांखाली आहे हे पटते. कोणतीही रंगरंगोटी न बदलता, स्टेजवरून नाहीसे न होता आपल्या डोळ्यांसमोर त्या व्यक्तीचा चेहरा पिवळ्याचा लाल-लालचा निळा-निळ्याचा हिरवा-काळा-पांढरा होत असतो. कोणाच्याही मदतीशिवाय, नृत्य नाट्यात क्षणभराचाही खंड पडू न देता हे चेहरे एकच व्यक्ती वारंवार बदलते याचे खूप आश्चर्य वाटते. जोवर हे सगळे स्टेजवर चालू आहे तोवर "अंतर खूप आहे, त्यामुळे हातचलाखी दिसत नसेल, एकावर एक मुखवटे घातले असतील, ओढून काढलेला मुखवटा अंगरख्यात लपवला असणार" वगैरे शंका मनात येतात. पण जेंव्हा तेच पात्र प्रेक्षकात उतरून असे चेहरे क्षणार्धात बदलू लागते, तेंव्हा तोंडाचा 'आ' वासून दाही बोटे कधी तोंडात जातात, कळतही नाही. पापणीही न लववता हे आश्चर्य डोळ्यात साठवून घेता घेता कार्यक्रम संपतो. जेमतेम १५-२० मिनिटे चालणारा हा 'बिआन लिआन' चा खेळ मनात घर करून रहातो. पूर्वी हा खेळ फक्त चिनी सणावारीच ऑपेरात केला जाई, तोही फक्त चीनमध्येच. हल्ली मात्र त्याचे वैशिष्ट्य व वेगळेपण लक्षात आल्याने सिच्युआनमधील कलाकार हे प्रयोग जगभर करतात.

    या खेळाबद्दल खूप गंमतशीर माहिती समजली. ही कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केली जाते. पण पहिल्या पिढीतले बुजुर्ग पुढच्या पिढीतल्या फक्त मुलांनाच ही कला शिकवतात. मुली लग्न होऊन दुसऱ्या घरात जातात, त्यांच्या बरोबर आपली फेस चेंजींगची कला दुसऱ्या घराण्यात जाऊ नये यासाठी ही खबरदारी! मलेशियात काही स्त्री कलाकारांना ही कला येते, पण त्यात मुखवटे बदलताना इतकी सफाई येत नाही हेही आम्ही नंतर पाहिले. चिनी कलाकारांची शिताफी मात्र अगदी जवळून लक्ष देऊन पाहिले तरी समजत नाही. सहसा ४ पद्धतींनी हे मुखवटे बदलले जातात. डोक्यावर घट्ट मास्क एकावर एक बसवून ते संगीताच्या तालावर नाचता नाचता मानेला झटका देऊन चेहऱ्यावर ओढणे हा एक प्रकार. काही वेळा भुवया, गालावरचे कल्ले यात वेगवेगळे रंग लपवतात व बघता बघता तो चेहऱ्यावर ओढून मूळ रंगच बदलतात. कधीकधी फक्त मिशीत लपवलेला रंग मिशीवर ओढून आणून मिशीमुळेच चेहऱ्याचे वेगळेपण भासवले होते.

    चौथ्या प्रकारात चक्क मुठीत धरलेली धूळ वा रंगाची पूड उधळणे व त्या धुळीच्या पडद्या आड चेहऱ्याचा मुखवटा बदलणे हे केले जाते. जरी या चारी पद्धती प्रेक्षकांना माहीत झाल्या तरी प्रत्यक्षात ते कसे साध्य केले जाते हे अजिबात समजत नाही हेच या खेळाचे वैशिष्ट्य. चिनी कलाकारांच्या या नाविन्यपूर्ण 'चेंजींग फेस' या कलेला किती नावाजावे तेवढे थोडेच.

    बियान लियान चा मनावरचा प्रभाव कमी व्हायला खूप वेळ लागला. त्यानंतर एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये १३ कोर्सचे ग्रँड डिनर होते. पूर्ण शाकाहारी असल्याने मी फक्त सूप, ब्रेड, भाजी व भात याचीच मानसिक तयारी ठेवली होती. पण सिंगापूरहून आलेली एक पाहुणी पूर्ण शाकाहारी असल्याचे शेफला सांगताच तो मान डोलावून अदृश्य झाला. हळूहळू इतरांची एकेक डिश समोर येऊन गट्टम होऊ लागली. मी मात्र तशीच! इतरांच्या सात-आठ डिशेस संपल्यासुद्धा. तितक्यात आतून माझ्यासाठी एका मागोमाग एक पदार्थ -दिसायला इतरांसारखे पण पूर्ण शाकाहारी-यायला लागले.१२ पदार्थ माझ्यासमोर मांडले गेले. हे आश्चर्य व शेफच्या कौतुकाने पोट खाण्याआधीच भरले. शेवटची १३ वी डिश मात्र आम्ही बनवू शकत नाही कारण बीफ फ्लेवर हेच त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे" असे सांगून शेफने मनापासून माफी मागितली व त्याची भरपाई आइस्क्रीम खिलवून केली. सर्वच पदार्थ एकदम चविष्ट व आकर्षक होते. प्रत्येक डिश सादर करताना शेफचा आविर्भाव 'अतिथी देवो भव' मानणाऱ्या संस्कृतीशी मिळता जुळता होता. भरल्या पोटाने व आनंदी मनाने शेफचे आभार मानत आम्ही त्याचा निरोप घेतला. साध्या जेवणात सुद्धा त्याने जी त्याची 'पाककला' दाखवली त्याने मन एकदम तृप्त होऊन गेले. चेंगडू सोडून सिंगापूरला परतलो तरी या साऱ्या गोष्टी कायमच्या मनात ठसल्या. अचानक बघायला मिळालेल्या विविध कला दाखवणाऱ्या कलाकारांची आठवण मनात कायमच घर करून राहिली आहे.

    -- अनामिका बोरकर

  • साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015

    साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 संपादकाच्या नजरेतून वाचकांसाठी...

    आमचा साहित्य उपेक्षिताचे दीपावली विशेषांक 2015 अवघ्या 52 पृष्ठांचा आहे. त्या 52 पृष्ठात आंम्ही सर्व वसाहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 संपादकाच्या नजरेतून वाचकांसाठी...

    आमचा साहित्य उपेक्षिताचे दीपावली विशेषांक 2015 अवघ्या 52 पृष्ठांचा आहे. त्या 52 पृष्ठात आंम्ही सर्व वयोगटातील वाचकांचा त्यांच्या आवडीचा विचार करुन साहित्याची निवड केलेली आहे.

    आमच्या दीपावली विशेषांक 2015 च्या मुखपृष्ठावर डॉ.शांताराम कारंडे यांचे छायाचित्र आहे ते पाह्ताच वाचकांच्या भुवया उंचावतील विशेषता स्त्री वाचकांच्या कारण दीपावली विशेषांक म्ह्टला की त्यावर सुंदर दिसणार्याभ स्त्रियांचे छायाचित्र पाह्ण्याची आमच्या वाचकांना सवयच जडलेय ! असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. डॉ.शांताराम कारंडे हे एक उत्तम साहित्यिक आहेत त्यासोबत साहित्यिकांचे सच्चे मित्रही आहेत. मला व्यक्तीशः नेहमी वाटायचं की दीपावली विशेषांकाच्या मुखपृष्ठावर साहित्यिकांचे छायाचित्र का नसतात ? कदाचित ते दिसायला सुंदर नसतात हे कारण असेलही. पण डॉ.शांताराम कारंडे त्याला अपवाद आहेत हे मी खात्रीने सांगू शकतो. कदाचित दीवाळी अंकांच्या संपादकाना लेखकांच्या चेह्र्याआतील सौंदर्य कधी दिसलेच नसावे. डॉ.शांताराम कारंडे आमचे मित्र, मार्गदर्शक आणि प्रसंगी गुरु असले तरी आमच्या दीपावली विशेषांकाच्या मुखपृष्ठावर त्यांचे छायाचित्र असावे ही कल्पना माझ्याच सुपिक डोक्यातून बाहेर आली होती. कारण मला व्यक्तीशः कोणत्याही मासिकांच्या मुखपृष्ठांवर साहित्यिकांची छायाचित्रे पाहायला आवडेल कारण त्यामुळे सामान्य वाचकही लेखकांना चेहर्यापने ओळखू लागतील.

    आमच्या दीपावली विशेषांकाची सुरुवात माझी संपादकीय सोडली तर डॉ.शांताराम कारंडे यांच्या मॅरेथॉन मुलाखतीने झालेय पण माझ्या एका पत्रकार मित्राने ती मुलाखत मॅरेथॉन कशी नाही हे मला पटवून देण्याचा प्रयत्न केला जो योग्यही होता. पण मी साहित्याची निर्मिती अतीशय सामान्य वाचकांसाठी करतो हे ही त्याला मान्य करावे लागेल. मला लेखकांचा लेखक व्हायचं नाही तर मला सामान्य वाचकांचा लेखक व्हायचंय. आमचा दीपावली विशेषांक सामन्य वाचकालाही वाचायला आवडेल याची आंम्हाला खात्री आहे.

    आमच्या दीपावली विशेषांकात डॉ.शांताराम कारंडे यांची ‘आत्मह्त्या’, अशोक कुमावत यांची ‘वनदेवीची कृपा’, वर्षा किडे – कुळकर्णी यांची ‘मनिनी’ आणि माझी ‘एक रुपया’ हया चार कथा वाचकांना काहीतरी संदेश देताना दिसतील याची आंम्हाला खात्री आहे. डॉ.शांताराम कारंडे यांचे लेख वाचकांना मार्गदर्शन करतील तर सहभागी कविंच्या कविता वाचकांच्या मनावर हळुवार फुंकर घालतील. जयेश मेस्त्री यांची ‘टर्निंग पॉईंट’ ही एकांकीका फक्त तरुणांनीच वाचावी अशी आमची अपेक्षा आहे.

    आमचा हा साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 लहान मुलांपासून जेष्ठांपर्यत सर्व वाचकांचा विचार करून तयार केलेला आहे. विकत घेऊन वाचलात तर आनंद आहे आणि नाही वाचलात तरी तो आपल्या पर्यंत मोफत पोहचविण्याची आमची तयारी आहे कारण वाचनसंस्कृती जपणे हेच आमचे स्वप्न आहे....

  • पांडू हवालदार (१९७५)

    दादा कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला पांडू हवालदार हा चित्रपट १९७५ साली पडद्यावर झळकला. दादा कोंडके यांनी स्वत: या चित्रपटात दिग्दर्शनाबरोबरच अभिनयही केला होता. अशोक सराफ, उषा चव्हाण या कलाकारांनीही या चित्रपटात भूमिका वठवल्या. चला तर मग पाहूया हा चित्रपट..

  • महाकवी कालीदास भाग५

    महाकवी कालीदासाची कथा कवन रूपात ५ भागात मांडली आहे.रसिक वाचकांनी जरूर वाचावी.

  • नोकरशाही कि भेकडशाही?

    “शिवरायाचे आठवावे स्वरुप, शिवरायाचा आठवावा साक्षेप. शिवरायाचा आठवावा प्रताप, भूमंडळी”. हा उपदेश समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजी महाराजांना केला. तरी आपण सर्वांनी हा उपदेश लक्षात घ्यायला पाहिजे. कुठल्याही क्रांतिकारकाचे/सज्जनाचे आराध्य शिवाजी महाराज होते(आहेत?). शिवाजी म्हणजे जगण्याची पद्धत. शिवाजी महाराजांसारखे जगावे, म्हणजे प्रामाणीकपणे जगावे. आपण म्हणतो शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरात. आजच्या जीवनात शिवाजी कुणालाही परवडणार नाही.

  • सन सिटी – रस्टनबर्ग

    २००४ साली, मला अचानक रस्टनबर्ग इथे नोकरी चालून आली. वास्तविक, पीटरमेरीत्झबर्ग इथे तसा स्थिरावलो होतो पण नवीन नोकरी आणि नवीन शहर, याचे आकर्षण वाटले. खरे तर २००३ मध्ये इथे माझा इंटरव्ह्यू देखील झाला होता पण, तेंव्हा काही जमले नाही. मनातून, या गावाचा विचार काढून टाकला होता पण, एके संध्याकाळी, त्यांचा फोन आला आणि दोन दिवसांत सगळे नक्की झाले. सन सिटी, या गावाच्या जवळ आहे, हे माहित होते, अर्थात, मी याआधी देखील सन सिटी इथे एकदा जाउन आलो होतो पण ती भेट तशी उडत, उडत झाली होती. एका रणरणत्या दुपारी, मी इथे पोहोचलो. प्रथम दर्शनी गाव तसे लहानखोर वाटले आणि पुढे जवळपास वर्षभर राहिल्यावर, हे मत पक्के झाले. माझे घर भारतीय कम्युनिटीमध्ये होते. इथे तसा विचार केला तर या गावात जवळपास २००० भारतीय वंशाची लोकवस्ती आहे, यात, मुस्लिम देखील आले. एक गमतीचा भाग मला वारंवार अनुभवायला मिळाला. परदेशात रहाताना, भारतीय, पाकिस्तानी लोकांच्यात अजिबात वैमनस्य नसते. देशाचा अभिमान असणे, यात काहीही गैर नाही परंतु जेंव्हा अडचण येते, तेंव्हा कुणीही असला विचार करीत नाही.

    वास्तविक, या गावात, आपल्याकडे जसे वाणी असतात, त्याप्रमाणे पण जरा मोठ्या प्रमाणावर काही दुकाने आहेत आणि ती बहुतांशी पाकिस्तानी लोकांनी चालवलेली आहेत परंतु तिथे खरेदी करणारे, प्रामुख्याने भारतीय वंशाचे लोक आहेत. इतकेच नसून, एकमेकांच्या घरी सातत्याने येणे,जाणे चालू असते. धर्माबाबत कडवा अभिमान, तिथेही आहे पण, मैत्रीच्या आड या गोष्टी येत नाहीत. इतकेच कशाला, एखाद्या शनिवारी रात्री, काही पाकिस्तानी, माझ्या मांडीला मांडी लावून, ड्रिंक्स घ्यायला बसले आहेत. एक अलिखित नियम तिथे नेहमी पाळला जातो, देश आणि राजकारण, याला गप्पांत कधीही स्थान नसते. तसेच धर्माबद्दल कधीही कुठलाही विषय निघत नाही.
    इथेच मला, एकदा एका पाकिस्तानी मित्राने, मेहदी हसनच्या एका खासगी मैफिलीची सीडी ऐकवली होती. संगीताच्या बाबतीत, साउथ आफ्रिकेने मला अनंत हस्ते मदत केली आणि जाणीवा विस्तारित केल्या, हे नक्की. पुढे जेंव्हा मी, रस्टनबर्ग सोडून, दुसरीकडे नोकरीसाठी निघालो, तेंव्हा याच पाकिस्तानी मित्रांनी, माझ्या साठी रात्रभर चालणारी अशी मेजवानी दिली होती. एक नक्की होते, आता आमच्या गाठी भेटी होणे जवळपास अशक्य आहेत, म्हणून असेल पण, त्यांनी मला इथे या नव्या गावात स्थिरावण्यासाठी निरपेक्ष मदत केली होती.
    भारतीय वंशाचे लोक तसे फार नाहीत आणि कारण असे, इथे फार मोठ्या इंडस्ट्रीज नाहीत, आजूबाजूला प्रचंड खाणी आहेत पण तिथे बहुतांशी गौर वर्णीय किंवा कृष्ण वर्णीय!! घर तसे दुमजली मिळाले होते. ऑफिसमध्ये, मजुरीची कामे बहुतांशी कृष्ण वर्णीय लोकं करीत असत पार त्यांच्या वर देखरेख ठेवायचे काम, भारतीय लोकं करीत असत. कंपनीच्या व्याप फार मोठा होता. प्रचंड सुपर मार्केट आणि त्याला जोडून, होलसेल मार्केट असल्याने, तिथे गर्दी ही कायमची!! या कंपनीत, आम्ही ४ जण, सडाफटिग होतो. मी वगळल्यास, बाकीचे गुजराती, त्यातून माझ्या आणि त्यांच्या वयात बराच फरक. त्यामुळे,त्यांनी मला "अनिलभाय" म्हणायचे ठरले. आम्ही एकत्रच जेवणाचा कार्यक्रम करत असू, म्हणजे कधी माझ्या घरी जेवण तर कधी त्यांच्या घरी जेवण, असला प्रकार चालायचा. अर्थात, मला कधी मांसाहार खायची लहर आली तर मात्र मी वेगळा!!
    इतर शहरांत जो प्रकार आढळतो, तसाच प्रकार या शहरात देखील आहे, गौर वर्णीय लोकांची वस्ती वेगळी आणि अर्थात अधिक आटोपशीर, देखणी तसेच वैभवशाली!! या भागात गेल्यावर, लगेच तुम्हाला फरक जाणवतो. वास्तविक या गावात तशी हिरवी झाडी फारशी नाही पण या भागात गेल्यावर, हिरव्या रंगाचे अस्तित्व डोळ्यांत भरणारे असते.नशिबाने, घरात जाण्याचा प्रसंग आला तर स्वच्छता आणि टापटीपपणा डोळ्यांत भरणारी असतो. अर्थात, इथे एक बाब अनाकलनीय आढळते आणि केवळ इथेच नाही साउथ आफ्रिकेत सर्वत्र आढळते. सार्वजनिक स्वच्छतेला इतके प्रचंड महत्व देणारे, वैय्यक्तिक स्वच्छतेबाबत फार गलथान असतात. एकतर, याची आंघोळीचे वेळ ही संध्याकाळची असते!! युरप/अमेरिकेत हे चालून जाते कारण तिथे बारमाही गारठा असतो पण या देशात तसे नसते. ऑफिसमध्ये, सकाळी आपण जेंव्हा शिरतो तेंव्हा नाकाशी परफ्युमचा सगंध दरवळत असतो पण कधी जवळ जायची वेळ येते, तेंव्हा घामाचा उग्र वास येतो. केवळ युरप/अमेरिकेचे अंधानुकरण, इतपतच याचा अर्थ पण, हे लोण केवळ गौर वा कृष्ण वर्णीय लोकांत आहे, असे नसून, इथे सगळ्या समाजात, हीच पद्धत आहे!! त्यामुळे, इथे लोकांना भेटावे तर ऑफिस सुटल्यावर!!
    मी जवळपास, १७ वर्षे या देशात काढली पण आपली आंघोळीची पद्धत कधीही मोडावीशी वाटली नाही, अगदी पुढे जोहान्सबर्गच्या हाडे गारठवणारया थंडीत राहताना देखील, सकाळची आंघोळ चुकली नाही. जरी हे लहानखोर गाव असले तरी, गावातील रस्ते तसेच दृष्ट लागणारे!! इथूनच पुढे ४० कि.मी.वर जगप्रसिद्ध सन सिटी आहे. साउथ आफ्रिकेचा सगळा ऐय्याशी आणि विलासी राहणीचा अत्युच्च बिंदू म्हणजे सन सिटी. वास्तविक, सन सिटी आणि लॉस्ट सिटी, असे एकाला जोडून, दोन भाग आहेत. सन सिटी म्हणजे casino चे आगर. इथले जग(च) वेगळे आणि कधीही शांत न होणारे!! सगळ्या आफ्रिका खंडात इतका मोठा casino बहुदा नसावा आणि अर्थातच आर्थिक उलाढाल देखील तितकीच अवाढव्य. शुक्रवार संध्याकाळ पासून ते सोमवार सकाळ पर्यंत, इथे अक्षरश: जत्रा असते. तसे सन सिटी आड मार्गाला आहे, त्यामुळे तिथे जायचे म्हणजे तिथे हॉटेल बुक करूनच जायला हवे अन्यथा जवळ असलेल्या रस्टनबर्ग मध्ये रहायची सोय करायला हवी. इथे लोकं जाबडल्यासारखी यंत्राला चिकटून असतात सन सिटी मधील हॉटेल्स त्यामानाने स्वस्त आहेत परंतु लॉस्ट सिटी म्हणजे सगळा जगावेगळा कारभार!!
    अगदी मिलियन डॉलर्सची बक्षिसे असतात. मी स्वत:, एका भाग्यवंताला २.५ मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्याचे बघितले आहे आणि त्या रात्री, त्याने सगळ्यांना दिलेली पार्टी देखील!! "इस रात को सुबह नही" याची अचूक प्रचीती इथे बघायला मिळते.
    लॉस्ट सिटी, हे हॉटेल आहे पण, तुमच्या ऐय्याशीच्या कल्पनांना सुरुंग लावणारी आलीशानता इथे आहे.इथे राहायचे म्हणजे केवळ पैसे उधळायला यायचे. सन सिटीत तुमचे बुकिंग असेल तर इथे तुम्हाला फिरायला परवानगी मिळते. हॉटेलच्या बाहेरूनच, आपल्याला त्याच्या स्वरुपाची झलक मिळते.
    आता, इतका प्रचंड खर्च करून प्रवासी येणार म्हणजे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या मनोरंजनाची साधने निर्माण करणे, ओघाने आलेच. आजूबाजूचा भाग तसा सगळा रखरखीत असल्याने, इथे विज्ञानाला हाताशी धरून, अनेक मनोरंजनाची साधने निर्माण केली आहेत. इथे पाण्याचा कृत्रिम जलाशय तयार केला आहे आणि विज्ञानाच्या सहाय्याने, प्रचंड आकाराच्या लाटा निर्माण केल्या जातात आणि तदनुषंगाने इतर पाण्यावरचे खेळ खेळले जातात. वास्तविक, एक प्रचंड डोंगर फोडून हे गाव वसवले आहे, तेंव्हा त्या डोंगराच्या खडकांत, निरनिराळे प्राणी तयार केले आहेत आणि अगदी "जिवंत" वाटावेत, इतके अप्रतिम केले आहेत आणि जसे तुम्ही जवळ जाल, तशी त्या प्राण्यांच्या भयप्रद आवाजाची डरकाळी, पूर्वसूचना न देता ऐकवतात!! तसेच एके ठकाणी, कृत्रिम भूकंप केला जातो. अक्षरश: पायाखालची "जमीन" हादरते आणि सरकते देखील!! मध्यरात्री, हा प्रकार फार भयप्रद वाटतो. इथे पाण्यासारखा पैसा खर्च होतो. रात्री सगळा डोंगर वेगवेगळ्या रंगांच्या दिव्यांनी मढवला जातो आणि दर शनिवारी रात्री इथे, केवळ धनवान व्यक्तीच भाग घेऊ शकतील, अशा आलिशान पार्ट्या रंगतात.
    मी तिथे रहात असताना, सन सिटीमध्ये, आपल्या बॉलीवूडच्या कलाकारांचा ताफा आला होता. हा देश वर्णद्वेषाच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर, इथे भारतीय कलाकार नित्यनेमाने येतात. त्या वर्षी, शाहरुख, सैफ, राणी, प्रीती, मलायका असे कलाकार आले होते. अर्थात, अस्मादिक तिथे गेले होते - पास मिळवला होता. कार्यक्रमाला, भारतीय वंशाच्या लोकांनी तुडूंब गर्दी केली होती, अगदी जोहान्सबर्ग वरून लोकांचे जत्थे आले होते. जोहान्सबर्ग इथून १५० कि.मी. दूर असून देखील तिथल्या लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या कार्यक्रमात, इथे शाहरुख किती लोकप्रिय आहे, याची झलक बघायला मिळाली. तसे बघितले तर इथल्या लोकांचे हिंदी म्हणजे सगळाच आनंद आहे पण, भारतीय कलाकारांबद्दल इथे प्रचंड आकर्षण आहे. पुढे डर्बन इथे हरिप्रसाद चौरसियांचा कार्यक्रम असाच तुफान गर्दीत झाला.
    रस्टनबर्ग, गाव तसे लहान आहे, फार तर तालुका म्हणता येईल. इथे मोठ्या शहरांप्रमाणे आलिशान व्यवस्था नाहीत, घरे देखील बुटकी, टुमदार अशी आहेत. त्यामुळे असेल, पण, गावांत एकोपा आहे. भारतीय सण, जमतील तशा प्रकारे साजरा करतात. बहुतेक सण, गावातील, हिंदू देवळांत होतात, अगदी गणपती,दसरा, दिवाळी आणि नवरात्र. वर्षातून एक वीक एंड सामुदायिक पिकनिक निघते आणि तेंव्हा मोजून सगळ्या धर्मातील माणसे एकत्र जमतात!! इथे सगळे धर्मीय राहतात, पण प्रत्येकजण आपला धर्म पाळतो आणि त्यात कुणीही "नाक"खुपसत नाही!!
    अर्थात, इथे सगळा "गोडीगुलाबी" किंवा "भाबडेपणा" नक्कीच नाही पण आपापल्या मर्यादा जाणून घेऊन, सगळे व्यवहार चालतात.
    इथेच मला, "तान्या" नावाची, पहिली गौर वर्णीय मैत्रीण भेटली. माझ्याच सोबतीने काम करत होती. मुळची "डच" संस्कृतीत मुरलेली पण, आता या देशातली सातवी पिढी!! गोऱ्या समाजाची प्रातिनिधिक प्रतिनिधी, असे म्हणता येईल. वागायला अतिशय मोकळी, सतत स्मोकिंग करणारी, प्रसंगी ड्रिंक्स घेणारी आणि वयाच्या १७ व्या वर्षी घरापासून वेगळे राहण्याचा आपणहून निर्णय घेतलेली, निळ्या डोळ्यांची ही मैत्रीण, मला गोऱ्या समाजाची जवळून ओळख करून देणारी. तोंडाने अति फटकळ पण कामात मात्र वाघ!! ओळख झाल्यावर, साधारणपणे, एका महिन्यात, तिने माझ्यासमोर, तिच्या आयुष्याचा "पंचनामा" स्वच्छ डोळ्याने मांडला.
    सध्याचा Boyfriend हा, तिचा तिसरा असून, पहिल्या दोघांशी नाते का तोडले, हे तिने मला अगदी सहज, बिनदिक्कतपणे सांगितले. सांगताना, स्वर अतिशय थंड, कुठलाही अभिनिवेश न घेतलेला!! खरेतर, सगळा गोरा समाज,हा याच प्रवृत्तीचा, निदान मला तरी इथे आढळला. तसेच, माझ्या CEO ची गोरी सेक्रेटरी, "बार्बरा" अशीच माझ्या चांगल्या परिचयाची झाली. तिची देखील अशीच कथा म्हणजे, पहिले लग्न मोडलेले पण सध्या Live-in-relation मध्ये रहात होती. पदरी चार वर्षाचा मुलगा असून, या नात्यात, त्याची जबाबदारी मात्र बार्बराची!!
    या दोघींनी, मला वारंवार त्यांच्या घरी बोलावले.त्यानिमित्ताने, गोरा समाज कसा आहे, त्याची विचारसरणी कशी असते, स्वभाव कसा असतो, याचा अंदाज आला. पुढील काळात मी आणखी नोकऱ्या केल्या आणि प्रत्येक ठिकाणी अशाच गोऱ्या मुली संपर्कात आल्या आणि त्यावेळी, माझा "बुजरेपणा" मात्र लोपलेला होता. या दोघींच्या, मित्रांशी माझी चांगली ओळख झाली आणि त्यांच्या स्वतंत्र गाठीभेटी होण्याइतपत जवळीक साधली. अर्थात, त्यावेळी मनाशी बांधलेले "ठोकताळे" तेच प्रत्येकवेळी कायम अनुभवास आले, असे नाही पण, तरी देखील, प्रमाणाबाहेर अंदाज चुकले नाहीत, हे नक्की!!
    इथल्या लोकांची एक बाब मात्र शेवटपर्यंत "अगम्य" राहिली. इथे वैय्यक्तिक व्यवहार, शक्यतो "क्रेडीट कार्ड" वर चालतात, अगदी Underwear सारख्या गोष्टी विकत घ्यायचे झाले तरी, "पेमेंट" मात्र क्रेडीट कार्डाने करायचे!! शक्यतो Cash व्यवहार चालत नाहीत. याचा परिणाम असा होतो, महिन्याचा पगार झाला की पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात, बहुतेक सगळे "कफल्लक"!! मग, पगार कितीही मोठा असो. जितका पगार अधिक, तितका क्रेडीट कार्डचा वापर अधिक!! किंबहुना, जितके उत्पन्न अधिक, तितकी क्रेडीट कार्ड्सची संख्या अधिक!! एक अनुभव सांगतो. पुढे मी प्रिटोरिया मध्ये नोकरी करताना, तिथला आमचा IT Manager, जेम्स माझ्या चांगल्या ओळखीचा झाला. तिथून, जेंव्हा डर्बन इथे जायची वेळ आली तेंव्हा, मी घरातील काही सामान विकायला काढले, त्यातील, "प्लास्टिक मोल्डेड" फर्निचर तसे फार स्वस्त म्हणून घेतलेले होते, ते विकायला काढले.
    घराच्या बाहेरच्या व्हरांड्यात बसण्यासाठी, मी चार खुर्च्या आणि एक टेबल घेतले होते. तशी काही फार महागडी नव्हती पण, त्याने विकत घेतले आणि त्याचे पेमेंट, तो Cash देऊ शकत होता पण, त्याने क्रेडीट कार्ड वापरले!! मला नवलच वाटले पण इथे अशीच पद्धत आहे.
    या शहरात, मी जवळपास एक वर्ष काढले. एखादा दुसरा मित्र सोडला तर आता कुणाशीच संबंध राहिलेले नाहीत. अर्थात, एका वर्षात "घनिष्ट" म्हणावी अशी मैत्री होऊ शकते, या वर माझाच विश्वास नाही. तेंव्हा या शहराने मला काय दिले? गोऱ्या लोकांशी कसे वागावे, हा समाज कसा आहे, या सगळ्याची ढोबळ ओळख करून दिली. पुढील वाटचालीसाठी, हे निश्चितच उपकारक ठरले.
    - अनिल गोविलकर