(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • व्यथा…

    कधी कधी वाटतं… सालं हे लिखाण वगैरे सोडून द्यावं कायमचं. स्नुझ व्हावं जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात…..

  • निवृत्तीच्या उंबरठ्यावर !

  • किल्ल्यातील मुंबई ते किल्ल्याबाहेरील आधुनिक मुंबई

    मुंबई शहराबद्दल बरंच काही लिहिलं-बोललं गेलेलं आहे. त्यात आता ही नवी भर कशाला असं वाटणं सहाजिकच आहे. मात्र या लेखमालेत मुंबईच्या इतिहासाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांकडे नजर टाकण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुंबईतली दळणवळण साधने, रस्तावाहतूक, ट्राम, रेल्वे, टॅक्सी-रिक्शा यापासून थेट आत्ताच्या मेट्रोच्या होऊ घातलेल्या जाळ्याकडे एक नजर टाकलेय. मुंबईतली घरबांधणी आणि त्यातील स्थित्यंतरे, म्हाडा, मुंबईतली “चाळ”संस्कृती, सहकारी गृहनिर्माण संस्था, एसआरए, क्लस्टर कॉक्रिट टॉवर्स आणि इतर बरंच काही..... याबद्दल वाचा या लेखमालेत...


    मुंबईच्या इतिहासातील रंजक गोष्टींची माहिती घेण्यापूर्वी अगदी थोडक्यात मुंबईचा इतिहास बघायलाच हवा.

    शिलाहार राजवटीतील बिंब नावाच्या राजाने महिकावती (माहीम) शहर वसवले आणि तेथे किल्ला बांधून आपली राजधानी वसवली. त्याची कुटुंब देवता 'प्रभादेवी' ही होती असे म्हणतात. या राजाच्या राजवटीत लोक सुखी होते. जमीन, महसूल, न्याय वगैरेच्या बाबतीत बिंब राजा न्यायी व आदर्श होता.

    नंतर अनेक राजसत्तांनी मुंबईवर राज्य केले. १७३९ साली ब्रिटीशानी मराठी राजेशाही कमकुवत झाल्याचा फायदा घेऊन साष्टी बेटावर आपला कब्जा केला. तोपर्यंत पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या अतिमहत्त्वाकांक्षेने आणि अतिउत्साहाने इथल्या लोकांचा अनेक प्रकारे छळ केला. त्यांनी हिंदूंची अनेक देवळेही भ्रष्ट केली. वान्द्रयापासून वसई पर्यंत अनेक ठिकाणांचे ख्रिस्तीकरण झाले होते.

    पोर्तुगीजांकडून साष्टी बेटे इंग्रजांकडे गेल्यामुळे मुंबईचे गोवा झाले नाही हे आपले नशीब. ब्रिटीशांचा ख्रिस्तीकारणापेक्षा राजकारण करण्याकडे विशेष मुत्सद्दी दृष्टीकोन होता. त्यांना केवळ व्यापार करायचा नव्हता तर येथे राज्य करायचे होते. त्यामुळे त्यांनी त्याचदृष्टीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती.

    माझगाव, परळ, वरळी हा भाग म्हणजे त्यावेळची मुख्य मुंबई. येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. परळ व शिव येथे कुणबी राहत. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू आणि साष्टीमधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती. १६७० मध्ये सुरतेहून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनियावर्ग येथे आला. तेंव्हापासून गुजराती वस्ती वाढू लागली.

    इंग्रजांच्या ताब्यात मुंबई आली त्यावेळची मुंबईची लोकसंख्या जेमतेम दहा हजारांच्या आसपास होती. १८७५ मध्ये ती ६० हजारांवर गेली. यामध्ये ब्राह्मण, पाठारे प्रभू, पाचकळशी, माळी, ठाकूर, भोई, आगरी इत्यादि जमातीची मंडळी होती.

    मुंबईत कापडाच्या गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आणि मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. १९२० ते १९३० च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या १० लाखांच्या वर गेली.

    किल्ल्याबाहेरच्या आधुनिक मुंबईचा जन्म :

    १८२० ते १८३० च्या दरम्यान टुमदार मुंबई शहर ४५०० चौरस मैल परिघाच्या किल्ल्याच्या आतल्या बाजूला वसलेले होते. निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या मुंबईची लोकसंख्या केवळ अडीच लाखाच्या आसपास होती. किल्ल्याच्या तटबंदीबाहेर १००० यार्डापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास कुणाला परवानगी नव्हती.

    १८२९ साली गव्हर्नरने आपले राहण्याचे ठिकाण किल्ल्याबाहेर हलवण्याचे ठरवले. त्याआधी जवळजवळ ७० वर्षे मुंबईचा गव्हर्नर अपोलो स्ट्रीटवर वास्तव्याला असे आणि तेथूनच मुंबईचा कारभार बघत असे. गव्हर्नर किल्ल्याबाहेर रहायला गेला म्हटल्यावर अनेक श्रीमंत लोकांनीही परळ, माझगाव, भायखळा, मलबार हिल वगैरे भागात वस्ती करायला सुरुवात केली.

    एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आज आकंठपणे बिअरबार संस्कृतीमध्ये बुडालेल्या मुंबईत पहिल्यांदा प्यायचा सोडा मिळू लागला तो १८३५ मध्ये. बर्फ मिळायला मुंबईकरांना आणखी २ वर्ष वाट बघायला लागली.

    १८३८ साली मुंबई आणि लंडन यामधील नियमित टपाल सेवा सुरु झाली. ही आणि अशीच रंजक माहितीही बघूया कालांतराने येणार्‍या काही लेखांमध्ये.....

    -- निनाद अरविंद प्रधान
    व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
    www.marathisrushti.com

    मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे - भाग १
    (क्रमशः)

  • जेष्ठांचा आशीर्वाद….

    एका पोस्ट मध्ये वाचले होते की जेष्ठ महिना. जेष्ठ वडवृक्ष आणि जेष्ठांचा आशीर्वाद. किती गहरा अर्थ आहे ना?

    रखरखता रणरणत्या उन्हाळ्यात जीव कासावीस झाला होता. मन पण उद्विग्न. कधी एकदा पावसाची सर कधी येणार आणि सगळे कसे वातावरण बदलून जाईल याची ओढ असते.

  • माध्यमातील स्त्री

    एक स्त्री म्हणून या क्षेत्रात काम करताना काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात. सतत सजग असावे लागते. कारण या महिला आहेत, यांना काय कळते या पुरुषी मानसिकतेचा त्रास याही क्षेत्रात असतो. थोडक्यात ‘बायकांना काय अक्कल असते?’ या दृष्टीकोनाला या क्षेत्रातही तोंड द्यावे लागते.

  • अमेरिकेतील सुखान्त

    कर्करोगाने ग्रासलेल्या आणि अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून पत्नीसमवेत मी मध्यंतरी तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर आंघोळ वगैरे उरकून ‘हॉस्पिस’(हॉस्पिटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंत:काळ जवळ आलेला असतो अशांना ‘हॉस्पिस’मध्ये ठेवतात. त्या ठिकाणी कुठलाही रोग बरा करणारा औषधोपचार होत नाही, परंतु अटळ असणारा मृत्यू सर्वार्थाने शांतपणे व्हावा, वेदना न होता यावा यासाठी वेदनामुक्तीच्या उपचाराची सर्व व्यवस्था हॉस्पिसमध्ये असते. (‘हॉस्पिस’ ही संकल्पना आता भारतातही रुजू लागली आहे. भारतातील काही शहरांमध्ये ‘हॉस्पिस’ आहेत.) अमेरिकेतील ‘हॉस्पिस’मध्ये रुग्ण जास्तीत जास्त किती काळ जगण्याची शक्यता आहे, याची स्पष्ट कल्पना रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. स्वच्छ आणि टापटीप असणाऱ्या या हॉस्पिसमध्ये भेटायला जाणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांवर वेळेचे बंधन नसते. रात्री- अपरात्री केव्हाही, कितीही नातेवाईक हॉस्पिसमध्ये जाऊन मरणासन्न रुग्णाला भेटू शकतात. रुग्णाच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस होते. त्यांना कॉफी, केक इत्यादी पदार्थ मिळण्याची आणि विश्रांती घेण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. हात र्निजतुक करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ठेवलेले असतात. हॉस्पिसमधील कर्मचारी आणि नर्सेस अत्यंत अदबीने वागतात. रुग्ण मरणासन्न अवस्थेत असल्याने त्याच्या मनाने खचलेल्या नातेवाईकांची काळजी सातत्याने जाणीवपूर्वक घेतली जाते. रुग्णाच्या नातेवाईकांसाठी इंटरनेटची आणि फोनची व्यवस्था असते.

    आम्ही सकाळी ११ च्या सुमारास हॉस्पिसमध्ये पोहोचलो आणि दुपारी ४.२५ वाजता माझ्या पत्नीची वहिनी निवर्तली. हॉस्पिसमधल्या सुंदर, शांत आणि आरामदायी वातावरणात हळूहळू श्वास मंद होत तिला मृत्यू आला. योग्य प्रमाणात वेदनाशामके दिल्यामुळे मृत्यू येताना तिच्या चेहऱ्यावर अथवा शरीरावर कुठलीही वेदना अथवा घुसमट जाणवली नाही. हॉस्पिसमधील डॉक्टर जवळच होते. त्यांनी व्यवस्थित तपासले आणि ‘सॉरी’ म्हणून मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
    मृत्यू एक-दोन दिवसांत येईल, याची पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे फ्यूनरलची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. न्यूयॉर्कमधील लाँग आयलन्ड या भागात असलेल्या ‘फ्यूनरल होम’ या संस्थेस अंत्ययात्रेचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. दु:खाचा पहिला आवेग ओसरल्यावर फ्यूनरल होमच्या व्यवस्थापकास फोन केला गेला. काही मिनिटांच्या आत सुटाबुटातील एक तरुण आणि त्याचा साहाय्यक शववाहिका घेऊन आले. त्याने डेथ सर्टिफिकेट ताब्यात घेतले. मृतदेहाचा ताबा घेतला. चेन असलेल्या कापडी बॅगेत मृतदेह काळजीपूर्वक ठेवून तो शववाहिका घेऊन गेला. जाताना त्याने हळुवारपणे सर्व नातेवाईकांचे सांत्वन केले आणि अत्यंत खुबीने पुढील कार्यक्रमाची माहिती दिली.

    शास्त्रशुद्ध पद्धतीने मृतदेह स्वच्छ करण्यात आला. काही रासायनिक द्रव्ये शरीरात सोडली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी काही जवळचे नातलग फ्यूनरल होममध्ये गेले. त्या मृत शरीरास साडी-चोळी नेसवण्यात आली. फ्यूनरल होममधील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला चक्क मेकअप केला. मखमली पेटीत पहुडलेला तो मृतदेह एखाद्या सुंदर बाहुलीसारखा दिसत होता. दुपारी २ ते ४ आणि संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत त्या मृतदेहाच्या अंत्यदर्शनाचा (viewing) चा कार्यक्रम होता. सुंदर मखमली पेटीत मृतदेह ठेवला होता. ज्या हॉलमध्ये मृतदेह ठेवला होता, तो हॉल उंची फर्निचर, गुबगुबीत गालिचे आणि चांगल्या आसन व्यवस्थेने सजवला होता. फ्यूनरल होमचे सर्व कर्मचारी सुटाबुटात होते. इमारतीच्या समोर सुमारे २०० गाडय़ा उभ्या राहतील, अशी पार्किंगची सोय होती. प्रवेशद्वारावरील दोन तरुणी अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे अदबीने स्वागत करीत होत्या. अमेरिकेतील भारतीय मंडळीसुद्धा सुटाबुटात आली होती. येताना अत्यंत शोभिवंत असे फुलांचे मोठे गुच्छे मृतदेहाशेजारी ठेवण्यासाठी आणत होते. शवपेटीच्या मागे अमेरिकेचा राष्ट्रध्वज होता. मंद आवाजात श्रीमद्भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायाची सीडी लावलेली होती. वातावरणात खिन्नता होती पण कुठल्याही प्रकारची भयाणता, भीती, दडपण जाणवत नव्हते.

    तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता क्रिमेशन होते. स्थानिक ब्राह्मणांनी फ्यूनरल होममधील हॉलमध्ये काही धार्मिक विधी केले. मंत्रघोषात शवपेटी बंद करण्यात आली. त्या वेळी सर्व भारतीय आणि अमेरिकन मंडळींनी हात जोडून नमस्कार केला. शवपेटी एका लांब रुंद शववाहिकेत ठेवण्यात आली. शववाहिका मार्गस्थ होण्यापूर्वी शववाहिकेबरोबर असलेल्या गाडय़ांचा जो ताफा होता, त्या ताफ्यातील प्रत्येक चालकाच्या हातात क्रिमॅटॉरिअमपर्यंत जाण्याचा मार्ग आणि नकाशा दिला गेला. शववाहिका मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे दिवे लावून गाडय़ांचा ताफा मार्गस्थ झाला. प्रचंड ट्रॅफिक असूनही या अंत्ययात्रेतील गाडय़ांच्या ताफ्याला कुणीही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत नव्हते. उलट सन्मानाने पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करीत होते. क्रिमॅटॉरिअममध्ये जाण्यापूर्वी शववाहिका मृताच्या घरापाशी गेली. घराच्या दरवाजात फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी गुलाबाची फुले ठेवली. काही काळ सर्वजण स्तब्ध उभे राहिले आणि पुन्हा गाडय़ांचा ताफा मार्गस्थ झाला.

    सुमारे ३५ मैलांवर असलेल्या क्रिमॅटॉरिअममध्ये सर्वजण पोहोचले. पुन्हा मंत्रपठण होऊन विद्युत दाहिनीमध्ये हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडले. फ्यूनरल होमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होण्यासाठी साहाय्य केले. मंत्रपठण होत असताना मान खाली ठेवून आणि अदब दाखवून आपल्या धार्मिक भावनांचा आदर राखला जात होता.
    विद्युतदाहिनी असलेली इमारत भव्य नक्षीकाम केलेली होती. एखाद्या चर्चसारखी तिची रचना होती. सभोवती सुंदर फुलांची बाग होती, कारंजी होती. हल्ली दफन करण्यासाठी जमिनीचा तुटवडा असल्याने पुष्कळ अमेरिकन लोकही पुरण्याऐवजी विद्युतदाहिनीमध्ये दहन करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये विद्युत दहन करण्याच्या पर्यायावर एका पत्रकाराने भलामोठ्ठा लेख लिहून विद्युतदहनाची आवश्यकता असल्याचे ठासून सांगितले होते.
    ज्या दिवशी दहन झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी अस्थी देण्यात आल्या. व्यवस्थितपणे एका खोक्यात प्लॅस्टिकच्या झिपलॉक असलेल्या पिशवीत पॅक करून अस्थी देण्यात आल्या. या अस्थींबरोबर डेथ सर्टिफिकेट आणि क्रीमेशन सर्टिफिकेट एका फाईलमध्ये देण्यात आले. ही सर्व कामे फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कुठलीही तसदी नव्हती. या सर्टिफिकेटबरोबर फ्यूनरल होमतर्फे सांत्वनाचे पत्र होते आणि एका भल्या मोठय़ा पुडय़ात केक्स्, बिस्किटे, कुकीज वगैरे पदार्थ दिले होते.

    (२७ नोव्हे.२०१० साली चतुरंग लोकसत्ता मधे सदर लेख मी प्रसिद्ध केला होता. तो पुन्हा या ठिकाणी देत आहे.)

    -- चिंतामणी कारखानीस

  • नवीन घर घेणार्‍यांनो.. सावधान

    नवीन घर घेणाऱ्यांनो सावधान !!! सर्व मराठी मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाचा सल्ला

    इलेक्शनच्या तोंडावर अनेक राजकीय नेत्यांनी या बिल्डर-डेव्हलपरकडे ठेवलेले पैसे परत मागायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक बिल्डर-डेव्हलपर्सच्या पायाखालची माती सरकली आहे. कारण त्यांनी विकसित केलेल्या अनेक गृहसंकुलांमध्ये गिऱ्हाईकच नाही. कोटींच्या घरातले फ्लॅट इथेकुणाला परवडणार आहेत?

    पण राजकारण्यांना इलेक्शनसाठी त्यांचं काळं धन परत करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे बिल्डर-डेव्हलपरला जागांचे भाव खाली आणण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे रिअल इस्टेट म्हणजे राहत्या जागांचे भाव झपाट्याने खाली येणार यात शंकाच नाही.

    शहापूरमध्ये तीन महिने पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असतानाही तिथल्या एका मोठ्या प्रोजेक्टसाठी त्या बिल्डरने तर आघाडीच्या हिंदी सिनेमा नटीचा चेहरा वापरून लोकांनी स्वस्तातले फ्लॅट घ्यावेत म्हणून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सोबत कार, दागिने, किचन अक्सेसरीज वगैरे निःशुल्क देण्याचं आमीषही दाखवलंय.

    पण मराठी मध्यमवर्गीयांनो सावधान. हीच वेळ आहे एकजूट दाखवण्याची. या जाहिरातींना भुलून धावू नका. कारण बड्या बिल्डर-डेव्हलपर लॉबीची नुकतीच एक गोपनीय मीटिंग झाल्याचं समजतं. त्यात त्यांनी जागांचे भाव ५० टक्क्यांपर्यंत उतरू द्यायचे नाहीत, अशी स्ट्रॅटेजी आखल्याचं समजतं. केवळ २५ टक्क्यांपर्यंत भाव उतरवले तर मिडलक्लास जागांवर उड्या मारेल आणि रिअल इस्टेट तेजीत येईल अशी त्यांची योजना आहे. पण मराठी मध्यमवर्गीयांनो ध्यान्यात घ्या.

    तुम्ही एकजूट ठेवा. जागांचे भाव आता आहेत त्याच्या निम्मे येईपर्यंत घाई करू नका. हा गेम ऑफ पेशन्स आहे. प्रचंड होल्डिंग कपॅसिटी असलेले बिल्डर जिंकतात की घरांची गरज असलेला सर्वसामान्य जिंकतो, हे आता लोक बघतायत. यात काही बँकाही भरडल्या जाण्याचा
    संभव आहे. बिल्डरांना कोट्यवधी रुपयांचं कर्ज देणारी एक बँक सध्या डगमगते आहे. अनेक बँकांना गिऱ्हाईके नाहीत. कारण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, असेच लोक सध्या जागा विकत घेताहेत. इथल्यापेक्षा दुबईतले घर स्वस्त झाले आहे.

    मराठी मध्यमवर्गीयांनो जागांचे भाव कृत्रिमरीत्या वाढवणाऱ्या बिल्डरांना नमवण्याची हीच संधी आहे. तुम्ही जर एकजूट दाखवून पेशन्स दाखवला आणि जागांचे भाव ५० टक्के खाली आल्याशिवाय नवे घर घेणार नाही अशी धमक दाखवली तर सर्वसामान्य लोकांना ग्राण्टेड धरणाऱ्या बिल्डरांना कायमचा धडा शिकवता येईल.

  • भाजप-सेना युती टिकणार की तुटणार?

    भाजप-सेना युती टिकणार की तुटणार? भाजपही आगामी काळात ‘परिणाम’ दाखविण्यास सिद्ध!

  • विरही बागेश्री

    रात्रीच्या शांत समयी, एकांतात भेटलेल्या विरहिणीची तरल मनोवस्था म्हणजे बागेश्री. आपल्या शेजारी बसलेला प्रियकर, साथीला आहे पण तरीही मनात कुठेतरी धडधड होत आहे आणि त्या स्पंदनातून उमटणारी वेदना आणि हुरहूर म्हणजे बागेश्री. बागेश्री रागाच्या या आणि अशा अनेक छटा आपल्याला एकाचवेळी आकर्षित करतात आणि त्याचबरोबर चकित देखील करतात.
    रागाची मांडणी बघायला गेल्यास, आरोहात पाच स्वर तर अवरोहात संपूर्ण सप्तक आहे - म्हणजेच औडव/संपूर्ण असा राग आहे. आरोहात "पंचम" आणि "रिषभ" वर्जित तरीही "कोमल निषाद","दोन्ही मध्यम" तसेच "कोमल गंधार" असल्याने रागाची प्रकृती नाजूक अशीच आहे. शास्त्रकारांनी या रागाचा समय मध्यरात्र असा दिलेला आहे. इथे बहुतेक कोमल स्वरांचा प्रभाव असल्याने, ठाय लयीत आणि मंद्र स्वरी सप्तकात. इतक्या प्रकारचे विभ्रम ऐकायला मिळतात की, प्रत्येक कलाकाराला या रागाची मांडणी वेगवेगळ्या प्रकाराने करायला अवसर देते. रात्रीच्या गूढ अंधारात हातातील हिऱ्यातून फाकणाऱ्या अननुभूत प्रकाश किरणाने आसमंत उजळून निघावा त्याप्रमाणे या रागाचे स्वर, कलाकाराच्या मगदुराप्रमाणे या रागाचे सौंदर्य दाखवतात. अर्थात "विरह" आणि "करुणा" हे या रागाचे खरे भाव आहेत, असे म्हणता येईल. या रागाची आणखी खासियत अशी सांगता येईल, या रागात तुम्ही आलापी कितीही वेळ रंगवून आळवायला भरपूर संधी आहे. बहुदा त्यामुळेच या रागात "विरही" भाव अधिक सुंदर खुलतो.
    याच विवेचनाच्या आधारावर, कौशिकी चक्रवर्ती या असामान्य गायिकेने मांडलेली बागेश्री रागातील रचना खास आहे. "पतियाला" घराण्याचा संस्कार घेऊन देखील इतर घराणी आपल्या गायनात सामावून घेऊन, आपली गायकी अधिकाधिक विस्तृत आणि विलोभनीय केली आहे.
    मुळात या गायिकेचा गळा इतका लवचिक, सुरेल आणि संपूर्ण सप्तकाला आवाक्यात सहज घेणारा असल्याने, गळ्यातून येणाऱ्या तानेला कुठेही "अटकाव" म्हणून नसतो. त्याचा परिणाम असा होतो,गळ्यातून येणारी ताण, हरकत ही अतिशय स्वच्छ, सलग असते. बंदिशीच्या सुरवातीलाच, "कोमल गंधार" आणि "कोमल निषाद" जोडीने आल्याने, आलापी अतिशय सुंदर खुलते. गंमतीचा भाग ऐकण्यासारखा असा आहे, वादी स्वर मध्यम आणि हे दोन्ही कोमल स्वर इतके बेमालूम मिसळलेले आहेत की बागेश्री पहिल्याच आलापित आपल्या समोर येतो.
    यात आणखी गंमत म्हणजे सरगमचा वैशिष्ट्यपूर्ण वापर. गाण्यात बरेचवेळा सरगम घेतली जाते, ती त्याच्या आधीच्या तानेच्या संदर्भात किंवा पुढे येणारी जी तान आहे, त्याचे आरेखन मांडणारी असते. त्यामुळे सरगम म्हणजे "स्पेलिंग" असा काहीवेळा प्रकार होतो. तान घेत असताना, ती सरगम बरोबर जोडून घेणे किंवा सरगम संपत असतना, तिला हरकतीच्या वेलबुट्टीची आरास चढविणे, ही खास ऐकण्यासारखे आहे. सरगम मधून परत मुख्य प्रवाहात येणे, ही देखील अप्रतिम कला आहे आणि ती इथे स्पष्टपणे ऐकायला मिळते. तसेच, बंदिश मध्यलयीत असताना, त्याच लयीत "तराणा" गायलेला आहे. फारच सुरेख गायन. आपल्याकडे "तराणा" हा शक्यतो द्रुत लयीत मांडला जातो आणि तालाशी त्याचे नाते जुळवले जाते. "अवधपूर की ये सैंय्या" ही बंदिश म्हणजे खास "पतियाला" घराण्याची मुद्रा आहे.
    इथे बंदिशीच्या ओघात "तराणा" सुरु केला आहे आणि त्याचबरोबर सरगम जोडीने घेतली आहे. याचा फायदा असा होतो, सरगम ऐकताना, "कोमल" स्वर कुठले आणि "तीव्र" स्वर कुठले, याचे भान रसिकाला नेमकेपणाने समजून घेता येते. साधारणपणे तान ऐकताना, अशा स्वरांचा "अदमास" घेणे कधीकधी अवघड होऊन जाते.
    संगीतकार सी. रामचंद्र आणि लताबाई. या जोडीने कितीतरी अजरामर गाणे दिली आहेत आणि रसिकांचे कान तृप्त केले आहेत. या संगीतकाराचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, यांनी बांधलेली गाणी अतिशय गोड, श्रवणीय तर असतात(च) पण, त्याचबरोबर आपणही गाऊ शकतो, असे आवाहन करणारी असतात. अर्थात, लताबाईंच्या हरकती घेणे मुश्किल असते तरीदेखील, गाण्याच्या चालीचा स्वत:चा असा अप्रतिम गोडवा असतो आणि तो गोडवा, रसिकांना गायला प्रवृत्त करीत असतो. प्रस्तुत गाणे अतिशय साधे, सरळ आहे पण तरीही अप्रतिम गोडवा त्या गाण्यात भरलेला आहे.
    "ना बोले, ना बोले, ना बोले रे
    घुंघट के पट ना खोले रे
    राधा ना बोले, ना बोले, ना बोले रे"
    कवी राजेंद्र कृष्ण यांनी हे गीत लिहिले आहे. गीताची शब्दकळा बघितली तर असेच समजून घेता येते, गाण्यात जे "खटके","हरकती घेतल्या आहेत त्या घेताना कुठेही शब्दांची (फारशी) ओढाताण होत नाही. रचना गेयताप्रधान असणे म्हणजे नाकी काय, याचे हे गाणे एक सुरेख उदाहरण म्हणून मानावे लागेल. सोप्या शब्दात देखील, प्रसंग गहिरा करण्याची, या कवीची ताकद विलक्षण अशीच होती.
    गाण्यात नेहमी वापरला जाणारा "दादरा" ताल आहे पण, तालाची योजना किती सुंदर आहे. सुगम संगीतात, कुठल्या शब्दावर समेची मात्रा ठेऊन, त्या गाण्याचे सौंदर्य कसे वाढवायचे, यावर संगीतकाराची, शब्दाची जाणकारी दिसून येते. गाण्याची चाल अतिशय सरळ आहे पण ठिसूळ नाही!! गाण्यात सुरवातीच्या सुरांपासून बागेश्री दिसत आहे पण तरीही हे गाणे आहे, याची जाणीव असल्याने. त्या रागाच्या सावलीतच गाण्याची चाल बांधली आहे. खरे तर बागेश्री राग, बहुदा या संगीतकाराचा खास आवडीचा राग असावा, असे वाटते, त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी इतर वेळी देखील, बागेश्री रागाचा अप्रतिम उपयोग करून घेतल्याचे आढळून येते. मी वरती, या रागाच्या भावदर्शनाबद्दल "विरही',"करुन" असे शब्द वापरले होते परंतु या भावनांचा परिपोष असून देखील, याच रागातून, अशी आनंदी, उत्फुल्ल तर्ज शोधून काढण्याचे कसब मात्र याच संगीतकाराचे. शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास असेल तर तुम्ही रागाच्या पलीकडे जाउन देखील रागाशी साम्य दाखणारी तर्ज निर्माण करू शकता, हे आणखी खास वैशिष्ट्य इथे सांगता येईल.
    हृदयनाथ मंगेशकरांनी या रागावर आधारित काही गाणी बांधली आहेत. मंगेशकरांच्या गाण्याचे एक वैशिष्ट्य सांगता येईल, त्यांच्या गाण्यात कवितेचा दर्जा नेहमीच अतुलनीय असतो. किंबहुना, ज्या कवितेला चाल लावायची आहे, ती कविता आशयघन असणे, त्यांना जरुरीचे वाटते. मराठीतील अनेक कवी - खास करून असे कवी जे कधीही भावगीतकार म्हणून प्रसिद्ध नव्हते, अशा कवींच्या कविता हुडकून काढून, त्यांना चाल लावणे, मंगेशकरांना नेहमीच आव्हानात्मक वाटत आले आहे. त्यामुळे, गाणे म्हणून आस्वाद घेताना, कविता म्हणून देखील त्या गाण्याचा आस्वाद घेणे तितकेच आनंददायी असते. कवितेचा, कविता म्हणून एक आशय ध्वनित होत असताना, सुरांच्या मदतीने त्याच कवितेचा वेगळाच आशय काहीवेळा अनुभवायला मिळतो आणि तीच कविता झळाळून उठते. आता सुगम संगीतात "कविता" असावी का नसावी, हा एक सनातन विषय आहे आणि अर्थातच त्याचा इथे उहापोह करण्यात काहीच हशील नाही. परंतु कविता दर्जेदार असेल तर संगीतकाराला, चाल बांधायला हुरूप मिळतो, असे कित्येक रचनाकारांनी मान्य केलेले आहे.
    खरतर संत ज्ञानेश्वर यांची शब्दकळा आहे. ज्ञानेश्वर हे आधी कवी आहेत, नंतर मग, तत्वज्ञ, साधक इत्यादी.
    ज्ञानेश्वरांच्या रचनेत "गीतमयता" आहे, याची जाण संगीतकार म्हणून हृदयनाथ मंगेशकरांना झाली आणि त्यातून मराठीतील काही अजरामर गाणी निर्माण झाली.
    "घनु वाजे घुणघुणा, वारा वाजे रुणझुणा" ही ज्ञानेश्वरीमधील अशीच अप्रतिम काव्यरचना.
    "घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा;
    भवतारकु आहे कान्हा, वेगी भेटवा का".
    या रचनेतील पहिलाच आलाप बागेश्री रागाची खूण पटवतो. हा आलापच किती कठीण आहे आणि त्यावरून पुढील रचना कशी वळण घेईल, याचा थोडाफार अंदाज बांधता येतो. वास्तविक, या गाण्यात, "निर्मळ" बागेश्री सापडत नाही तरी एकंदरीत गाण्यावर याच रागाची सावली आहे. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे, या गाण्याचा कविता म्हणून आस्वाद घेत येतो आणि तो तसा घेत यावा, म्हणून गाण्यात फार कमी वाद्ये वापरली आहेत, ज्यायोगे सुरांचे शब्दांवर आक्रमण होऊ नये. अर्थात, नेहमीप्रमाणे, "अनघड" चाल, हे या गाण्याचे लक्षण दिसून येते आणि त्यामुळे ऐकायला गोड वाटणारे गाणे, त्यातील हरकतीसहित गायचे म्हणजे परीक्षाच असते.
    गुलाम अली, हे असेच गझल गायकीमधील सुप्रतिष्ठित नाव. मेहदी हसन साहेबांनी रागावर आधारित गझलांच्या चाली बांधल्या तर गुलाम अलींनी, ठुमरीला हाताशी धरून, गझल गायनाला नवा रंग दिला.
    "मस्ताना पिये जा युं ही मस्ताना पिये जा;
    पैमाना तो क्या चीज है, मैखाना पिये जा".
    अर्थात, उर्दू भाषेत, "मैखाना", "साकी" या विषयावर अनंत रचना वाचायला मिळतात आणि त्याच "मैखाना"ला समोर ठेऊन ही गझल लिहिली आहे. तेंव्हा या शब्दातील भाव ओळखून, गुलाम अलींनी चाल बांधली आहे आणि त्याच स्वरूपाचे गायन केले आहे.
    बागेश्री रागातील नखरेल रंग शोधून, उस्तादांनी अप्रतिम रंग दिला आहे. या सादरीकरणात, आपल्या नेहमीच्या शैलीला थोडी मुरड घालून, किंचित भावगीताच्या अंगाने गायन केले आहे. खानसाहेबांच्या गायकीवर काहीवेळा एक आक्षेप घेतला जातो - गझल गाताना, त्यात इतक्या वेळा तानांचा वर्षाव केला जातो की त्यात शायरी कुठल्याकुठे विसरली जाते आणि गायकीची कलाकुसर फक्त ध्यानात रहाते. पण, इथे मात्र अत्यंत लडिवाळपणे, स्वरांना गोंजारत अति आत्मीयतेने गायन केले आहे आणि त्यामुळे आपण शायरीची देखील मजा घेऊ शकतो.
    मराठीत कवी सुरेश भटांनी अशाच प्रकारच्या म्हणजे गेयतापूर्ण कवितेचा आग्रह धरून, मराठी कवितेत अनमोल भर टाकली आहे. विशेषत: "गझल" हे वृत्त मराठीत रुजवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, ही बाब कुणी नाकारू शकणार नाही.
    "तरुण आहे रात्र अजुनी, राजस निजलास का रे;
    एवढ्यातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे".
    काहीशी रंगेल वाटणारी ही कविता, मराठीत तशी विरळाच वाचायला मिळते. तसे बघितले तर या कवितेला "गझल" म्हणता येईल का? उर्दूतील "नझ्म" या वृत्ताशी जवळचे नाते सांगणारी ही कविता आहे. कविता वाचतानाच, त्या शब्दात दडलेली लय आपल्याला सापडते पण तरीही संगीतकाराने त्यांच्या प्रतिभेला अनुसरून, संपूर्ण वेगळ्या वळणाची चाल बांधली आहे. चाल अतिशय राजस, रंगेल आणि गायकी थाटाची आहे. गमतीचा भाग बघण्यासारखा आहे. वरतीच आपण, याच संगीतकाराने, याच बागेश्री रागात ज्ञानेश्वरांची विराणी सादर केलेली बघितली आणि आता इथे संपूर्ण वेगळ्या घाटाची कविता आणि त्या घाटानुसार संगीतरचना तयार केलेली बघायला मिळते. संगीतकार किती बहुपेडी प्रतिभेचा असू शकतो, हे या दोन उदाहरणांवरून समजून घेता येते.
    तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे

  • व्हॉईस गुरु- दिपक वेलणकर

    ‘वृत्तनिवेदक – दिपक वेलणकर” असं ऐकताक्षणीच डोळ्यासमोर येतं एक भारदस्त व्यक्तीमत्वं ज्यांना आवाजाची अनमोल देणगी आहे, ज्यात अनोखेपण लपलंय.