एका बाजूला दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पोट भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या करतोय. पिकवणारया शेतकरयांची तूर खरेदी ला पैसे नाही. शेतकरी कर्जमुक्ती करायला पैसे नाहीत.
असे म्हणतात की डाव्या हाताने केलेले दान हे उजव्या हाताला देखील कधी माहित होऊ नये. दान हे नेहमी गुप्त असावे. पण मला वाटते दान गुप्त असावे यापेक्षा ते प्रेरणा देणारे असावे. त्यामुळे अन्नदान असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचे मानवतेला मदत करणारे दान असो त्याचा प्रचार, प्रसार करणे मला अगदीच चुकीचे वाटत नाही.
नैराश्य :बालमनातील स्व-संकल्पना (Despair in Child Self-Concept)
वेगवान स्पर्धेच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सुखी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धडपडत असते.संयुक्त कुटूंबातून एकल कुटुंबापर्यंत ,ग्रामीण भागातून शहराकडे, त्याच्या गरजा ,स्वप्नं ,आशाआकांक्षा ,राहणीमान, खानपान, चैनीच्या वस्तू ,सुंदर घर ,शिक्षण ,चांगली नोकरी ,सुंदर जीवन-साथी इ. गोष्टीच्या लालसेने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अनिश्चित घटना आणि अस्थिरता,अगतिकता,असुरक्षितता,अपेक्षांचं ओझं ,अपमानास्पद वागणूक त्यामुळे ताणतणाव,चिंता व नैराश्य या घटनांना सामोरे जावे लागत आहे.
ताणतणाव म्हणजे,
" ज्या एका मानसिक अवस्थेतेमुळे शरीर स्वास्थ्य प्रभावित होऊ शकते ती म्हणजे ताण (Stress). ""ज्यांच्यामुळे शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते किंवा घडून येण्याचा धोका संभवतो,अशा घटनांद्वारे उद्धवणारी प्रक्रिया म्हणजेच ताण (by Lazhrous /fhokman,psychologist).
वाईट घटनांमुळे निर्माण होणारा ताण खऱ्या अर्थाने त्रासदायक असतो तर चांगल्या घटनांमुळे होणारा ताण हा आनंददायक किंवा सुखद असतो.
स्व-संकल्पना म्हणजे ,
"स्वतःचे स्वतःविषयीची कल्पना,भावना,अभिवृत्ती,आवडी निवडी ,सवयी,क्षमता,राहणी,प्रेरणा इत्यादींचे मूल्यांकन म्हणजे स्वसंकल्पना होय." ताण निर्माण करणाऱ्या घटना :
जीवनात ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर मानवी जीवन अस्वस्थ होण्यास सुरुवात होते . जसे ,जीवनसाथी ,नोकरी दैनंदिन वादविवाद ,संशयवृत्ती ,भांडणे ,वैचारिक मतभेद ,नोकरीमधील वरिष्ठांची अपमानित वागणूक, प्रेमप्रकरणं ,फसगत अशा अनेक कारणांमुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक घटकांवर प्रतिकूल परिणाम होऊन मानवी आरोग्य बिघडते . अपमान ,एकाकीपणा ,अभ्यासाचे दडपण ,भीती व अपयश, नातेसंबंधातील दुरावा ,जीवनातील अनेक लहान सहान समस्यांनी त्रस्त होणे,इतरांकडून न मिळणारा आधार,प्रेम ,यामुळे सतत तणावात राहणे त्यामुळे आंतरिक प्रतिकार शक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होतो . व्यक्तीच्या आयुष्यात एका उंचीपर्यंत कार्यक्षमतेच्या प्राप्तीसाठी ताण येणे आवश्यक असते ,परंतु ताणाच्या कार्यक्षमतेची पातळी सतत वाढली तर त्याचे रूपांतर नैराश्याकडे जाऊ शकते . बालपणातील मानसिक,शारीरिक किंवा लैंगिक आघात . नकारात्मक विचार येणे,त्याबद्ल स्वप्नं पडणे,भीती वाटणे,लक्ष केंद्रित करता न येणे,स्मरणशक्ती कमी होणे,नकारात्मक विषयावरील टीव्ही सिरीयल पाहणे . समाजात मिळून मिसळून वागायची भीती वाटणे . कमकुवत आर्थिक स्थितीमुळे नेहमी ताण येतो.
समस्या १ : दीपाली मॅडम सरकारी शाळेत नोकरीला. वर्गात छान शिकवायच्या,प्रेमळ होत्या . त्यांच्या लग्नानंतर पतिपत्नीतील वैचारिक वादावरून पटेनासे झाले, नित्याची भांडणे,मारझोड,संशयवृत्ती यामुळे पतीचा त्रास वाढत गेला. सतत ताणतणावात असल्याने चिंता,नैराश्य यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. या दरम्यानच्या काळात दोन अपत्य झाली .घरच्या सदस्यांनी समजाविले परंतु मार्ग निघाला नाही.एकाकीपणा ,सामाजिक नीति-नियम ,प्रतिष्ठेच्या कल्पना यामुळे इतरांना समस्या न सांगण्याचे धाडस अशा अनेक नकारात्मक कारणांमुळे नैराश्यात आयुष्य जगणे सुरु झाले .
मॅडम होळीला आपल्या सहा वर्षाच्या मुलासह माहेरी गेल्या . ताणतणावाचा परिणाम त्यांच्या शरीरावर व मनावर झालेला होता. आईला म्हणाल्या, माझ्या मुलांचा सांभाळ करशील का? या सवांदावरून आई वडिलांनी काळजी घ्यायला हवी होती. त्यांना आईवडिलांची साथ लाभले नाही व आई वडिलांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी सारं काही असहय होऊन आपल्या मुलासह आत्महत्या केली .
समस्या २ : सरिता मुलाला घेऊन आईवडिलांकडे वास्तव्याने राहायला आली. ती नोकरी करते. पाहायला सुंदर, प्रेमळ ,इतरांना मदत करणारी ,काय झालं असेल तिच्या आयुष्यात ?लग्नानंतर लहानसहान कारणावरून भांडण, वादविवाद,मतभेद ,नेहमीचा ताणतणाव चिंता यामुळे एकत्र आयुष्य जगणे असह्य झाले .समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु अपयश .
दरम्यानच्या काळात पतीने एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला परंतु सरिताने नकार दिला .पती मुलाला शाळेतून परस्पर घेऊन गेला . पतीला काहीही न बोलता आपल्या ताणतणावाचे व वात्सल्याचे समायोजन केले पालकांनी सकारात्मक मानसिक धाडस दिलं . जगण्याची नवी उमेद दिली . तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या प्रेमळ सहवासाने पती व मुलाविना सरिता आनंदाने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतेय .
व्यक्तीच्या बालमनांतील स्वसंकल्पना :
स्पर्धेच्या काळात मनुष्य स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार न करता स्वतः अंध काळोखात जात आहे. ही लहानपणातील स्वसंकल्पना होय .अनुवंश व बाह्य घटकांमुळे व्यक्तीची जडणघडण होते. उदा .स्वतःचे विचार व्यक्त न करू देणे ,स्वतःला कमी लेखणे, काळा वर्ण ,शारीरिक व्यंग इ .कारणांमुळे व्यक्तिमत्व न्यूनतेची स्व-संकल्पना बालमनात बनते . उद्धट बोलू नकोस ,वाद घालू नकोस,मुलीच्या जातीने जास्त बोलायचे नाही , अशा नकारात्मक गोष्टीचे मुले अनुकरण करतात यातून स्वसंकल्पनेची बीजे रुजविल्या जातात .कुटुंब व शाळेत मुलांमधील स्वतःचे महत्व कमी असल्याची स्वसंकल्पना दृढ होत जाते .बालकाच्या स्वसंकल्पनेवरच जीवनाचे यश अपयश अवलंबून असतेबालमनात कुटुंब व शाळामधून ऐकविलेल्या काल्पनिक परिकथा /गोष्टी उदा. सिंड्रेला, भुताच्या गोष्टी इत्यादींमधून स्वसंकल्पना बनत जातात समस्येचे मूळ त्याच्या बालमनांतील स्वसंकल्पनेत दडलेले असते .
बालमनातील भीतीयुक्त स्वसंकल्पनेमुळे समस्येचे समायोजन दीपाली मॅडमला करता आले नाही. पालकांनी समस्या व्यक्त करण्याचे धाडस निर्माण केले असते तर टोकाचा निर्णय घेतला नसता . आयुष्यातील चिंता ,ताणतणाव, नैराश्य या बाबत पालक ,जीवलग मित्र ,यांना सांगून समस्येचे निराकरण झाले असते.स्वतः कमावती असल्याने पतीपासून विभक्त किंवा वेगळे राहून आनंदी जीवन जगता आले असते .पालक, मित्र, नातेवाईकांनी भावनिक आधार दयायला हवा होता .आत्महत्या करण्यापेक्षा थोडे अपमान सहन करण्याची सकारात्मक हिंमत करायला हवी होती . सरिताने आयुष्यातील ताणतणावाचे आईवडिलांच्या भावनिक आधाराने,प्रेम व सहकार्याने समस्येचे व्यवस्थापन केले, आज आपले आयुष्य आनंदाने जगत आहे .
तणाव, चिंता ,नैराश्य यातून सुटका होण्यासाठी योगा आणि प्राणायाम यांचा उपयोग नियमित करावा .नैराश्य दूर करण्यासाठी परिस्थिशी जुळवून घेणे व समस्येचे भावनिक समायोजन करण्यास शिकणे .जीवनशैली साधी व गरजा कमी ठेवणे . बालमनावर कुटुंब व शाळांमधून सकारात्मक स्वसंकल्पनेची बीजे रुजविणे .स्वतःची बलस्थाने आणि उणिवा ओळखून त्याचा स्वीकार करणे .नकारात्मक विचार, गैरसमजुती, व्यसनाधीनता यापासून दूर राहणे, रागावर नियंत्रण ठेवावे .विनोदबुद्धी, छंद जोपासणे ,मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवणे, साजेसा जीवनसाथी शोधणे. आपले काम प्रामाणिकपणे करणे व आनंदी राहणे. स्वआदरभाव राखून स्वतःचा व इतरांचा मानसन्मान करणे .अपमान सहन करायला शिकले पाहिजे .सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या महामानवांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाचन करावे. जसे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले , सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम, बाबा आमटे इ. स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा, मी माझे मानसिक आरोग्य उत्तम ठेऊन आनंदाने आयुष्य जगू शकतो,असे स्वतःला सुचवित राहावे . सकारात्मक विचार देणाऱ्या चित्रपट, टीव्ही मालिका पाहाव्या .
ताणतणाव ,चिंता व नैराश्य यावर मात करून सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावा व सकारात्मक विचारधारेचा अंगीकार करावा.
-- प्रा. हितेशकुमार पटले
ExamVishwa
युग संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. सगळ्याच गोष्टी कशा संगणकाच्या वेगाने होऊ लागल्या आहेत. तसे पाहिले तर वेगाचे हे अप्रूप मानवासाठी नवे नाही.
ज्या संवेदनशीलतेचा आपण अतिशय कौतुकाने उल्लेख करतो, ती संवेदनशीलता, मग ती सामान्य माणसाची असो, राजकीय पक्षांची असो, माध्यमांची असो अथवा सरकारची असो, आपल्या सोयीनुसार, स्वार्थानुसार बदलत असते. आपली संवेदनशीलताच सर्वाधिक असंवेदनशील झाली आहे आणि हेच खरे दु:ख आहे.
आमच्या बॅंकेच्या लोन डिफॉल्टरच्या लिस्टवर दर तीन महिन्यानी सही करायचे काम फिल्ड ऑफिसर म्हणुन माझ्याकडेच आहे , सहसा मी या यादीवर नुसती नजर टाकतो , आणि सही करुन टाकतो . यात विशेष असे काहीच बघण्यासारखे नसते. ही लिस्ट आमच्या रिकव्हरी एजन्सीकडे जाते , आणि ती एजन्सी येन केन प्रकारेण लोनची रिकव्हरी करुन बॅंकेत भरते. याबद्दल काही पर्सेंटेज रिकव्हरी एजन्सीला मिळते . आज मात्र या यादीत गजानन बंडोपंत कुलकर्णी हे नाव बघुन माझा हात थबकला. या महाशयांनी तीन महिन्यांचा कार लोनचा हप्ता चुकवला होता .हे महाशय म्हणजे माझा परममित्र गजा . वर्षभरापुर्वीच हे कारलोन घेण्यासाठी मी गजाला मदत केली होती . तसे गजा आणि त्याची बायको स्नेहा चांगल्या नोकरीत आहेत . गजा इंजिनियरींग कॉलेजला प्रोफेसर आहे , तर बायको सॉफ्टवेअर ऍनालिस्ट . दोघांनाही अत्यंत चांगला पगार आहे. त्यावरच गजाने तीन वर्षापुर्वी साठ लाखांचे घर घेतले होते , आणि मागच्या वर्षी कारलोन घेऊन होंडा सिटी घेतली . तिचाच हप्ता आता थकला होता .कारण काही कळाले नव्हते . गजाची पण बर्याच दिवसात भेट नव्हती . संध्याकाळी मी गजाच्या घरी जायचे ठरवले , आणि त्या लिस्टवर सही केली . अर्थात त्या आधी गजाच्या नावापुढे फुली मारायला मी विसरलो नव्हतो . काही प्रतिष्ठित ग्राहकांना आमची बॅंक थोडा वेळ देते , आणि त्यांच्या अडचणीपण समजावुन घेते . फिल्ड ऑफिसर म्हणुन एवढा अधिकार माझ्याकडे आहे.
’ क्लाउड नाइन ‘ या गेटेड कम्युनिटीमधे गजाचे घर आहे. स्विमिंग पुलापासुन जॅकुजीपर्यंत सर्व सुविधा या अपार्टमेंटमधे आहेत. गाडी लावली आणि गजाच्या घराची बेल वाजवली . बागेकडे माझे लक्ष गेले , गजाने बागेत अत्यंत सुंदर झाडे लावली होती. मोगर्याचा फुलांचा घमघमाट सुटला होता. गजाने दार उघडले .
” अरे तू , ये बस बस . “ गजा लुंगी आणि बनियनवरच होता . कितीही मोठा झाला तरी माणसाच्या काही सवयी बदलत नाहीत .
” बर्याच दिवसात घरी आला नाहीस ? इकडे आलो होतो , म्हटलं जरा चक्कर टाकावी . कसा आहेस ? “
” मजेत . मधे तु काय आठ दिवस दिल्लीला होतास म्हणे . स्नेहा सांगत होती . तिची आणि वहिनींची मार्केटमधे भेट झाली होती. “
” हो , गौरी म्हणाली मला . ‘ कस्टमर सॅटिसफॅक्शनच ‘ ट्रेनिंग होतं दिल्लीला . नेमकं मला पाठवलं बॅंकेनी . तुला सांगतो गजा , या ट्रेनिंग म्हणजे नुसता वैताग बघ ! या एमबीए मुलांपेक्षा आपल्या शाळेतले शिक्षक बरे. ते रागवायचे , पण किमान त्यावेळेला त्यांच्या चेहेर्यावर रागवण्याचा अविर्भाव तरी असायचा . ही एमबीए मंडळी अत्यंत सुतकी चेहेर्याने प्रेझेंटेशन करतात . आपलच सॅटिसफॅक्शन होत नाही , कस्टमरचं काय होणार बोडख्याच ! ”
यावर मी आणि गजा खदाखदा हसलो.
” बरं काय घेणार चहा , की कॉफी ? “
” चहा चालेल .”
“ स्नेहा , दोन कप चहा टाक गं , सागर आलाय “.
मधुन जोरात भांडी आपटण्याचा आवाज आला , आणि नंतर चहासुध्दा गजाच जाउन घेउन आला , मी ओळखले , नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे . चहा पिला थोड्याफार गप्पा मारल्या , आणि मी निघालो. गेटचे दार लावताना गजाला विचारले ,
” गजा , इज एव्हरीथिंग ओके ? “
” सागर , एक्चुअली थोडा प्रॉब्लेम झालाय. ” गजाचा आवाज खोल गेला .
“ कॅन आय हेल्प यु ? “
” आपण उद्या दुपारी भेटु . मी बॅंकेत येतो “ . गजा म्हणाला .
” ओके . टेक केअर . “ मी गजाच्या खांद्यावर थोपटत म्हणालो.
दुसर्या दिवशी कामात लक्षच लागेना . दुपारची वाट बघत बसुन राहिलो . एक वाजता गजा आला .
” सागर आपण बाहेरच लंचलाच जाउ या . आर यु फ्री ? “
” या शुअर . जरा पाच मिनिट थांबतोस ? मी चाव्या साहेबांकडे देउन येतो. “
“ प्लीज कंटीन्यू .”
साहेबांना चाव्या दिल्या आणि बॅंकेसमोरच्याच एका चांगल्यापैकी हॉटेलात गेलो . ऑर्डर दिली .
” आता बोल गजा . काय प्रॉब्लेम ? “
” अरे एक्चुअली - काय झालय ? स्नेहाला त्यांच्या कंपनीने पिंक स्लिप दिलीये . “
“ मग ? “
” मग काय ? त्याचा अर्थ आपण रिझाइन करायच किंवा एक महिन्याने कंपनी आपल्याला काढुन टाकणार .”
” का ? “
” का काय बाबा, त्यांच्या कंपनीचे सर्व क्लायंटस युएसचे . त्यांच्याकडे आलय रिसेशन. त्याचा फटका बसतोय आम्हाला . “
” अरे पण एवढ काय त्यात ? “
” तुला कळणार नाही सागर , तु अजुन होमलोन घेतल नाहियेस ना , मी तीन वर्षांपुर्वी साठ लाखाच लोन काढुन घर घेतलय . त्याचा हप्ता मला पन्नास हजार येतोय . तो मी माझ्या पगारातुन भरतो. तोपण थोडाथोडका नाही वीस वर्ष भरायचाय . तो भरल्यानंतर दहा हजार रुपये उरतात . मागच्या वर्षी स्नेहाच्या सॅलरीवर कारलोन घेउन होंडासिटी घेतली. तिचा हप्ता वीस हजार रुपये जातो . तिच्या पगारातले पंधरा हजार उरतात , अशा पंचवीस हजारात आमचा महिना भागतो .”
” ओके .”
” तुला खरे वाटणार नाही , इतक्या वर्षांची सर्विस झाल्यावरपण पाच पैशाचीही सेव्हिंग माझ्याकडे नाही . सगळ काही क्रेडिटवर आहे . तुला माहित आहे , मागच्या तीन महिन्यापासुन कारलोनचा हप्ताही भरला नाहीये मी .”
मला ही गोष्ट माहित असल्याचे मी बोललो नाही . गजा अत्यंत भावनाविवश झाला होता .
” आणि आता या नविन लाइफस्टाइलची इतकी सवय झालीये , दर रविवारी कंपल्सरी मल्टीप्लेक्सला जातो , रविवारी घरी जेवण बनवत नाही , बाहेर साधं हॉटेल चालत नाही , थ्री स्टार लागतं , दरवर्षी हॉलिडेला जावच लागत , इव्हन सोनुलापण या सर्वांची सवय झालीये. माहितीये , काल शाळेत रिक्शातुन जा म्हणालो तर गेला नाही . गाडी नसेल तर शाळेत जाणार नाही म्हणाला . अजुन चार वर्षाचा झाला नाही आणि याचे नखरे बघा .”
” त्याच्यावर काय चिडतोयंस गजा ? ही सवय तुम्हीच लावली ना त्याला ? “
” होय रे बाबा , तेच चुकलेय . बर त्याचेच नाही , स्नेहाचेपण तसेच . महागड्या साड्या , मॉलमधे शॉपिंग , महागडी परफ्युम्स , आमच्या घरात ब्रॅंडेड वस्तुंना फार महत्व आलयं . सकाळच दुधपण साधं चालत नाही , ब्रॅंडेड लागतं .”
“गजा चिडु नकोस . हे बघ ,या सगळ्या सवयी तूच लावल्यांस ना त्याला . मग बदल . त्यात अवघड ते काय आहे ? “
” सागर ही वेळ तुझ्यावर आली नाहियेना , म्हणुन तु सल्ला देतोयस ,एकवेळ संपुर्ण माणुसच बदलणे शक्य आहे , पण त्याच्या सवयी , अशक्य ! “
” हे बघ, स्नेहाशी एकदा समोर बसुन बोल , तिला परिस्थितीची कल्पना दे . ती समजुतदार आहे , मला वाटतय ती समजावुन घेईल. “
“सगळे प्रकार झाले सागर , म्हणुनच मी म्हणालो ना , माणसाच्या सवयी बदलणे ,अशक्य ! ती बदलायला तयार नाही . मीच चुकलो , पुर्वी लहान घरात मी सुखी होतो , थोडाचा पैसा आला आणि मी वाहावत गेलो . या वर्षी ईन्क्रीमेंट मिळाले ,या एवढ्या गोष्टीवरच खुश राहिलो. पुढच्या आयुष्याचा काडीचाही विचार केला नाही , आणि स्वतःवर ही वेळ आणुन घेतली .”
“मला वाटतय , तु तिच्याशी एकदा मोकळेपणाने बोलावस . आणि सर्व परिस्थीती समजावुन सांगावीस . मी गजाच्या हातावर हात ठेवत म्हणालो .”
“ट्राय करतो .”
जेवण करुन गजा गेला . बिल देउन मी बॅंकेत आलो. फारफारतर दोन महिने मी गजाच्या कारलोनची रिकव्हरी थांबवू शकलो असतो. त्यानंतर मात्र काहीही माझ्या हातात नव्हते .
संध्याकाळी घरी आलो. फ्रेश झालो . पेपर हातात घेउन बसलो.गौरी म्हणाली
“उद्या आमीरचा थ्री इडियटस आयनॉक्सला लागतोय . मी तिकीट बुक करायला सांगितलीयेत . नंतर बाहेरच जेवण करुन घरी येउ.”
मी चरकलो .डोळ्यासमोर गजा उभा राहीला.
“माझा मुड नाहिये ग . आपण उद्या नको, पुढच्या आठवड्यात जाउ . एखाद्या आठवड्यात बाहेर पिक्चरला आणि जेवायला नाही गेलो तर काही बिघडत नाही .”
“ते काही नाही . मला शक्य नाही . मी उद्या स्वयंपाक करणार नाही . आणि रविवारी बाहेर जेवायला नेले नाही तर पिंटु रडुन गोंधळ घालतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा , मी जाणार म्हणजे जाणारच ..”
ताडताड पाय आपटत गौरी मधे निघुन गेली. मला गजाचे शब्द आठवले
‘ एकवेळ माणसेच बदलणे शक्य आहे पण त्यांना लागलेल्या सवयी ,अशक्य ! ‘
या बदलत्या जगाने माझेच घर कधी विळख्यात घेतले होते , माझे मलाच कळाले नव्हते !
-- निखिल मुदगलकर
प्रगत महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांना यावर्षीच्या उन्हाळ्याने मागास राज्यातील सामान्य नागरिकांच्या व्यथांची जाणीव करून दिली आहे. महाराष्ट्रातील उन्हाळा तसा दरवर्षीच तापतो, परंतु यावर्षी उन्हाच्या चटक्यांना भारनियमनाच्या झळांची साथ मिळाल्याने मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र चांगलाच भाजल्या जात आहे. या अतिरेकी भारनियमनाने त्रस्त होऊन ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरत आहेत.
एका दु:खी बापाचे काय सांगू गाऱ्हाणे.....! काळाने उलटा डाव टाकला होता हसतं खेळतं बाळ अंथरुणाला खिळलं होतं. एक दिवशी काळ उगवला अन बाबूचा बबन्या देवाघरी गेला. डेंग्यूने एक बळी घेतला होता. बाबु हतबल झाला. तीळ तीळ तुटला. बाबु होता कणखर तरीही वाहत होती डोळ्यातून आसवांची खळखळ...! एखादे फुल उमलण्याच्या आधीच नष्ट झाले. त्या मात्या- पित्यावर झालेला आघात अत्यंत दुर्दैवी. किती जपलं होतं त्या फुलाला. त्या दु:खी माईचे अश्रू सांगत होते. पण विधात्याने जे भाळी लिहिले त्याला सामोरे जाणे भाग आहेच. पण हे एकाच घरात घडले नाही. अनेकांच्या घरी या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या घातक रोगाची लागण झाली. गेले अनेक. लागण झालेल्यांची संख्या मोजता न येण्यासारखी होती. विशेषत: नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. याची नोंद कुणी घ्यावी अथवा न घ्यावी परंतु आपलेच चुकत असेल तर.....! महापालिका आरोग्यसेविकांचा सल्ला ऐकत नाही. त्यांना हवं असलेले सहकार्य करीत नाहीत, अशी एक कुजबूज आहे. आपण आपल्या कुटुंबियांसाठी काळजी घ्यायला हवीच.
डॉक्टर हा ईश्वरी अंश मनाला जातो. डॉक्टर हा देव तर दवाखाना हे एक मंदिर. कारण रुग्णाला बरं करण्यासाठी जीवाचे रान करीत असतो. म्हणून ईश्वरानंतर डॉक्टरांना देवच. यात शंका घेण्यासारखे काहीच नाही. खरोखर डॉक्टर हे आई वडील गुरुजनानंतर चौथे पूज्यनीय स्थान म्हणावे लागेल. डेंग्यू,मलेरियाची लागण झाल्यापासून विभागातील महापालिका दवाखान्यातील डॉक्टर शिंदे, डॉक्टर जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा गौरव करणे स्वाभाविक आहे. गरिबांनी नव्हे तर श्रीमंतांनी देखील धाव घेतली या दवाखान्यात आणि उपचार घेतले. योग्य सल्ला आणि आवश्यक तपासण्या करून त्यांनी उपचार केल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. डेंग्यू, मलेरिया आणि कावीळ या दहशतवादी रोगांवर प्रतिबंध करणारे माणुसकीचे डॉक्टर आपल्या विभागात कार्यरत असल्याने मनस्वी आनंद होत आहे.
विभागात कितीतरी डॉक्टर होऊन गेले.आजही आहेत. रस्त्याने जाताना मंदिर दिसले तरी अदबीने नमस्कार करावासा वाटतो, त्या प्रमाणे त्या डॉक्टरांना पाहताच आपोआप हात जोडले जातात. आपणां कुणाला *डॉक्टर पांडुरंग कुलकर्णी* आठवत असतील.नावाप्रमाणे विठोबाच, या विठोबाच्या मंदिरात सदानकदा रांग लागलेली असे. काय राजा माणूस....! गरीबांचा डॉक्टर... पैसे नसले तरी उपचार केले त्यांनी. आपल्या श्रमजीवी लोकांचा डॉक्टर. डॉक्टर कुलकर्णीसारखे अनेक देव विभागाला लाभले. ते ही रुग्णांचा स्थिती पाहून उपचार करीत म्हणजे एखाद्याकडे पैसे नसले तरी इलाज करीत होते. तेव्हा परिस्थिती तशी होती. त्या वेळेस डॉक्टर रुग्णांच्या सुख दु:खाशी समरस होत होते. आजही समाजात अनेक देव आहेत जे रुग्णसेवा म्हणजेच आपला धर्म मानतात. भगवंत त्यांना शक्ती देवो. त्यांच्यामुळे आपण निश्चित आहोत आणि बरेच देव असे आहेत की,देव बनण्यात झालेला खर्च लवकरात लवकर कसा भक्ताकडून काढू शकतो ह्यातच आपला धर्म आहे असे मानतात... त्यांना भगवंत सद्बुद्धी देवो.
पण आता हेच डॉक्टर आपली मर्यादा ओलांडू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. खरं बोलले की, खऱ्या आईला राग येतो. हे अनुभवलेले आहे. त्यामुळे या पूज्यनीय देवांवर कडक भाषेत लिहिण्याऐवजी सौम्य भाषेत लिहावं, असं मन सांगत होते. काय करीत आहेत हे गल्लीबोळातले देव ...? एक डॉक्टर आपल्या दवाखान्यात विनापरवाना औषधं विक्री करीत आहे. उपचार अधिक औषध या दोन्ही गोष्टी देऊन लुबाडत आहे. आता या डॉक्टरला सौम्य भाषेत सांगायचं की, आपला बडगा दाखवायचा. अनेक डॉक्टर अनैतिक स्वरूपाचे व्यवहार करीत आहेत. रुग्ण दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. वृध्द असतात. चालू शकत नाहीत किंवा अन्य कारणाने डॉक्टरला घरी बोलाविण्यात येते तेव्हा एक डॉक्टर विभागातल्या विभागात घरी भेट द्यायचे ५०० रुपये आकारत आहेत. हे बरोबर आहे का ...? काही डॉक्टर केवळ रजेचे दाखले देण्यासाठी बसलेले आहेत. दिवसापाठी रुपये २० आकारीत आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या दोनशे अडीचशे पगार वाल्यांनी काय करायचे. काही महिन्यापूर्वी एका डॉक्टरने मयत दाखला देण्यासाठी ५०० रुपये घेतले. एका रुग्णाला डॉक्टरने जागचे हलायचे नाही. एकाच जागी पडून राहायचे, आराम करायचा, सल्ला दिला. पेशंटला थोडासा त्रास होऊ लागला. तेव्हा एक दोन मिनिटावर असलेल्या डॉक्टरला सांगितले त्याने बेधडक सांगितले. मी एम डी आहे. माझी फी परवडणारी नाही. घर एक मिनिटावर असो वा दहा मिनिटावर....! फी ठरलेली आहे. ती देत असाल तर येतो. वैद्यकीय व्यवसायाकडे डॉक्टरांची दृष्टी बदलत्या काळानुसार बदलत आहे. आताचे डॉक्टर रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारत आहेत. पैसे नसले तर उपचार करतात, उधारी ठेवतात. पण फीचा तगादा यांचा भारी आहे. एका फेरीत पेशंट बरा होईल असे त्यांच्याकडून घडत नाही. दोन तीन फेऱ्या मारायला लावल्यानंतर पेशंटला आराम मिळतो. तो पर्यंत खिसा खाली झालेला असतो. कोणी तरी म्हणेल या पेशंटला जवळच्या सरकारी किंवा महापालिकेच्या रुग्णालयात जाता येत नाही का ...? काहींचे हातावर पोट असते.दिवसभर राबावे लागते. आजारी असल्याचे सांगता येत नाही. दुकानात कामावर असलेल्या नोकरदारांचे उदाहरण घ्या. कामावर नाही गेलात तर ते तुम्हाला घरचा रस्ता दाखवितात. काही तरी कमवून आणले तरच त्यांची कच्ची बच्ची जेवतात. त्यांच्यासाठीच.....! या गल्लीबोळात मंदिर उभारून बसलेल्या देवांनो समजुतीने घ्या. जेव्हा जेव्हा साथीच्या रोगांनी नागरिक त्रस्त असतात. तेव्हा तरी त्यांना सांभाळून घ्या.
अशोक भेके
भिती माणसांच्या विचारांमध्ये असते, ती जगात कुठेही अस्तित्वात नाही. भितीग्रस्त माणूस ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट सर्वात मोठी समजतो, ज्या गोष्टीला तो घाबरत नाही त्या गोष्टीला तो तुच्छ समजतो. भितीग्रस्त माणूस ज्याची भिती वाटते अशा गोष्टींच्या सूचना अंमलात आणतो, भीतीदायक माणसांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो आणि ज्या गोष्टीची भीती वाटत नाही त्यांना अक्षरशः नजरअंदाज करतो.
आत्म्याने आत्म्याचा केलेला आदर म्हणजे मर्यादा. ती आपल्या कामात, व्यवहारात, राहणीमानात असायला पाहिजे. मर्यादा हि सृष्टीने दिलेली संस्कृती आहे, ती सर्वांनी पाळायलाच पाहिजे…..
Copyright © 2025 | Marathisrushti