वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जसा ईसीजी हृदयाचे आरोग्य सांगतो, तसेच इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ हा मेंदूचे आरोग्या कसे आहे हे सांगतो. मेंदूतील विद्युत प्रक्रियेची नोंद करणाऱ्या यंत्राला इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ असे म्हणतात. मेंदूविषयक रोगांच्या निदानासाठी त्याचा उपयोग होतो. मेंदूला गाठ, पक्षाघात अशा आजारात प्राथमिक निदानासाठी ईईजी वापरला जातो. पण आता एमआरआय (मॅग्नेटिक झोनन्स इमेजिंग) व सिटीस्कॅनमुळे ईईजीचा वापर तुलनेने कमी केला जातो.
आवळ्याची आठवण काढली कि तोंडाला पाणी न सुटणारी व्यक्ती विरळाच. अशा ह्या आवळ्याची माहिती करून घेऊ.
हा वृक्ष २५ ते ३० फुट वाढणारा असून तो आकाराने मोठा आहे. उभ्या व लांबट अशा त्याच्या खपल्या पडतात. त्याची पाने ही ऋतूपर्णी, चामड्यासारखी १३ ते २० से.मी. वाटूळकी व देठाकडे निमुळती होणारी असतात. शेंडे पिवळसर असतात. त्याची फळे ही २.५० ते ५ से.मी. लांब चामड्या सारखी जाड पंख, निमुळती व त्यावर आडव्या रेषा व त्याला पंचाकृती आवरण असते.
फायब्रोस्कोप म्हणजेच एन्डोस्कोप नावाच्या यंत्राने आपल्याला मानवी अवयवांची अत्यंत अचूक अशी तपासणी करता येते. सर्पिलाकार दिसणाऱ्या या अवयवाने केल्या जाणाऱ्या तपासणीला एन्डोस्कोपी म्हणतात. ही एक प्रकारची दुर्बीण असते व ती मानवी शरीरात घालून कुठे काय झाले आहे हे पाहता येते.
चिकूचे शास्त्रीय नाव Acharas sapota (family Sapotaceaae) आहे. यास Manilkara zapota (family Z apotaceae) असेही नाव आहे. सुमधुर फळाबद्दल परिचित असलेल्या या मध्यम आकाराच्या (सु. ८–१० मी. उंचीच्या) वृक्षाचे मूलस्थान मेक्सिको असून आता उष्ण कटिबंधातील सर्व प्रदेशांत तो लागवडीत आहे. महाराष्ट्रात कुलाबा व ठाणे या जिल्ह्यांत आणि गुजरातच्या दक्षिण भागात व सौराष्ट्रात अधिक पिकवितात. महाराष्ट्रातील डहाणू येथील चिक्कू प्रसिद्ध आहेत. तेथे दरवर्षी चिक्कू महोत्सव भरतो.

हा वृक्ष रक्त मंदार; हि. फराद, पांगारी, दादप, मंदार; गु. बांगारो; क. हळीवन, हालिवाळ; सं. मंदार, रक्तपुष्पा, पारिजात, परिभ्रदा; इं. इंडियन कोरल ट्री, इंडियन कोरल बीन, मोची वुड; लॅ. एरिथ्रिना इंडिका, नावांनी ओळखला जातो. हा सुंदर वृक्ष सु. १८ मी. उंच, काटेरी, पानझडी, शिबांवंत (शेंगा येणारा), मध्यम आकारमानाचा व जलद वाढणारा असून समुद्रकिनाऱ्यावरील जंगलात निसर्गतः आढळतो.
तसेच रस्त्यांच्या दुतर्फा वा बागेत, शोभेकरिता किंवा शेतांच्या कुंपणाकडेने लावलेलाही आढळतो. जावा, ब्रह्मदेश, अंदमान व निकोबार बेटे, पाकिस्तान व भारत इ. प्रदेशांत त्याचा प्रसार विशेषतः पानझडी जंगलांत भरपूर आहे. या वृक्षांची साल गुळगुळीत, पातळ करडी किंवा पिवळट असून पातळ ढलप्यांनी सोलून जाते. लहान फांद्यांवर तीन-चार वर्षे टिकून राहणारे, काळपट, शंकूसारखे काटे येतात. पाने संयुक्त त्रिदली, एकाआड एक, पातळ व झडणारी असून प्रत्येक दल १०-१५ सेंमी. लांब व तितकेच रुंद असते. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात सु. ५-७ सेंमी. लांब, पतंगरूप, लाल पोवळ्यासारखी (त्यावरून इंग्रजी नाव व लॅटिन वंशनाव ही पाडली आहेत), मोठी, बिनवासाची फुले सु. १०-३० सेंमी. लांब मंजऱ्यांवर फांद्यांच्या टोकास येतात. फुलात भरपूर मध असल्याने अनेक पक्षी व भुंगे व फुलपाखरे त्याभोवती सदैव गर्दी करतात व परागण (पराग एका फुलातून दुसऱ्या नेणे) घडवून आणतात. फुलांची सर्वसाधारण संरचना अगस्त्याच्या किंवा गोकर्णाच्या; गोकर्ण फुलाप्रमाणे अथवा लेग्युमिनोजी कुलातील पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णिल्या प्रमाणे असते. संवर्त टोकाशी पंचदंती, महाछदासारखा लालसर परंतु प्रदले (पाकळ्या) तळापर्यंत चिरलेला, गर्द लाल, ५-७ सेंमी. लांब आणि केसरदले दहा व लाल असतात. शिबा (शेंगा) १३-३० सेंमी. लांब गोलसर, गाठाळ, काळी असून मे-जुलैमध्ये पक्व होते; त्यात सु. ६-८ पिंगट किंवा गर्द लाल, आयताकृती गुळगुळीत बिया असतात. पिकलेल्या शेंगा काळ्या पडतात नी त्यात तपकिरी बैंगणी तांबडट रंगाच्या बिया पिकून तयार होतात. पण या बिया विषारी असतात.
पांगारा वसंत क्रतुत जंगला मद्धे फुलतो तेंव्हा जणू कांही ज्वालाच फुलल्या आहेत असा भास होतो. त्यामुळे याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट असेही म्हणतात.नवीन लागवड बिया किंवा कलमे (१.८ मी. x ७.५ सेंमी.) लावून करतात.
महाराष्ट्रात हा वृक्ष कोकण किनारपट्टीवर भरपूर प्रमाणात आढळतो. तसेच पश्चिम घाटात मलबार पर्यंत ही तो दिसतो. दौंड जिह्यात लेकीचे झाड या प्रकपाखाली याची मुद्दाम लागवड केली आहे.
मूळचा हा वृक्ष भारतीय आहे फुलांच्या रंगांनुसार पांगाऱ्याचे तीन प्रकार आढळतात. लाल, शेंदरी आणि पांढरा. त्यांपैकी पांढरी फुले येणारा पांगारा हा दुर्मिळ असून लाल फुले येणारा पांगारा सर्वत्र आढळून येतो. या वंशातील सुमारे ८ जाती मूळच्या भारतातील असून सु. १० जाती आयात केलेल्या आढळतात.
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यास नाजुक, सुन्दर लाल फुले येतात. पांगारा पर्णसंभार असल्यावर हिरवी शाल पांघरल्यागत वाटणारा हा वृक्ष आपल्या हिशेबी जरी हा फारसा महत्त्वाचा नसला तरी त्याच्या सर्व अंगोपांगाच्या उपयुक्ततेचा विचार केला तर याचे महत्त्व पटते. पर्णसंभार नसताना येणारी लाल सॅटीनसारखी फुले मिरवणारा उघडा-बोडका पांगारा एखाद्या उघड्या अंगाच्या, कपाळावर लाल मळवट भरलेल्या पोतराजासारखा वाटतो. ही लाल फुले फुलपाखरे, पक्षी यांना आपल्याकडील मधामुळे आकर्षून घेतात आणि या पोतराजाचा खेळ पाहायला आपणही नकळत क्षणभर त्याच्या सन्निध थांबतोच थांबतो. आपल्याकडे पांगारा जंगलात खडकातला, शहरातील बागेमध्ये, शेताच्या कुपणाला लावतात. चहाच्या मळ्याला सावलीसाठी लावलेला असतो. या वृक्षाचा प्रसार पश्चिम द्वीपकल्प भागातील कोकण व उत्तर कारवार येथील पानझडी व मिश्र जंगलात विशेषकरून आहे. पांगाऱ्याचा प्रवास तसा निसर्गातच होतो. पक्षी भुंगे फुलातील मध घेताना परागीकरण करतात. त्यातून धरलेल्या शेंगांमधील बी पडूनही रोपे होतात. पांगारा फांद्या लावूनही जगतो. पांगारा याच्यावर एकही पान नसताना लाल मनमोहक फुलांनी बहरतो. याच्या फुलांना गंध नसला तरी आपल्या मनाला त्याचा रंग मोहिनी घालतो. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात पांगाऱ्याला फुले येतात. फुलांचा लाल रंग आणि मखमली वाटणाऱ्या पाकळ्या कुणालाही आपल्याकडे पाहायला लावतात. अंगावर जरी काटे असली तरी या ५०-६० फुट उंच वृक्षाच्या पानाच्या हिरवाईने त्याचा फुलाच्या लाल रंगाने आसमंत रसरसून उठतो. पांगाऱ्याला फार महत्त्वाचे स्थान आहे.
हे भारतीय झाड देशात बहुतांश राज्यांमध्ये आढळतं. मात्र लक्षणीय गोष्ट अशी की, समुद्रालगत असलेल्या जंगलांमध्ये याची वाढ जोमाने होते. जर या झाडाला नीट बघितलं तर लक्षात येईल की हे झाड प्रचंड वृक्ष या सदरात मोडत नाही. साधारण मध्यम उंचीचा होणारा पांगारा ६० ते ७० फ़ुटापर्यंत वाढतो. पानझडी सदरात मोडणारा पांगारा दणकट समजला जातो. सुरुवातीस लहान वाटणारं पांगारा, झपाझप वाढतो. पांगाऱ्याच्या खोडावर, झाड लहान असताना अणुकुचीदार काटे असतात. जसजसं झाडं मोठं होत जातं, तसतसे हे काटे नाहीसे होत जातात. बाल्यावस्थेतल्या झाडाचं पशुंपासून संरक्षण होण्यासाठी निसर्गाने केलेली ही सोय असते. हे काटे काळ्या वाघ नखांसारखे असतात व पांगाऱ्याच्या मऊ काळपट हिरवट सालीच्या खोडाचं रक्षण करतात.
पानगळ होत असतानाच जानेवारीत झाडाच्या निष्पर्ण डहाळ्यांवर भडक शेंदरी फ़ुलं यायला सुरुवात होते. डहाळीच्या अगदी टोकावर कळ्यांचा आणि फ़ुलांचा गुच्छ येतो. हे भडक फ़ुलं पाच पाकळ्यांच असतं नी यातली एकच पाकळी मोठी असते. या भडक रंगाच्या फ़ुलांमुळे पांगारा सुशिभिकरणाचा वृक्ष म्हणुन ओळखला जातो. आपल्याला हा भडक पांगारा माहित आहे पण पांगाऱ्याच्या फ़ुलांना सुगंध अजिबात नसतो. पण त्यात तयार होणाऱ्या मधाकडे अनेक पक्षी आणि किडे आकर्षित होतात.
उपयोग:
पांगाऱ्याच्या सालीचा लेप व्रण, सूज व सांधेदुखी यांवर लावतात. साल पित्तरोधक आणि कृमिनाशक आहे. ताज्या पानांचा रस कानदुखी तसेच दातदुखी यांवर वापरतात. कोकणात ताज्या पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात. लाल पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून लाल रंग, तर शेंदरी पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून शेंदरी रंग मिळवितात. या वृक्षाचे लाकूड हलके व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग खेळणी, हलक्या वस्तू (उदा., फळ्या, खोकी, तक्ते, आगकाड्या, पळ्या, चाळणीच्या चौकटी इ.) बनविण्याकरिता करतात. चहाच्या किंवा कॉफीच्या मळ्यांत आणि बागांमध्ये सावलीसाठी तसेच मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल इ. वेलींना आधार देण्यासाठी मुद्दाम पांगारा वृक्षाची लागवड करतात.
विहीर बांधताना विहिराच्या पायाच्या घोळभागाला पांगाऱ्याची फळी वर्तुळाकार बसवतात. सालीतील धाग्यापासून दोर बनवतात. अशा पद्धतीने पांगारा हा अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. पांगारा हा उष्ण अग्निदीपक व कफ–कृमी-मेद नाशक आहे.
त्यांच्यापासून हिरवे खतही बनवितात. मुळे, साल व बिया यांपासून कीटकनाशके तयार करतात. काहींची खोड आणि मुळे चेचून मासे गुंगविण्याकरिता वापरतात. ‘हाई तुंग पी’ हे चिनी द्रव्य सर्व जातींच्या सुक्या सालीपासून मिळते; ते स्टॅफिलोकॉकस ऑरियसया सूक्ष्म जंतूविरुद्ध जंतु-वृद्धिरोधक म्हणून उपयुक्त आहे.
मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल व जाईजुई इत्यादींवा आधार देण्यास आणि चहा व कॉफीच्या मळ्यांत सावलीकरिता ही झाडे लावतात. पाने सारक (पोट साफ ठेवणारी), मूलत्र (लघवी साफ करणारी), कृमिघ्न (जंत वगैरे मारणारी), सांसर्गिक रोगातील सांधेदुखीवर व गाठीवर पाने बाहेरून लावतात. कानदुखीवर व दातदुखीवर पानांचा ताजा रस गुणकारी असून जखमांतील किडे मारण्यासही उपयुक्त असतो. साल ज्वरनाशक, पित्तनाशक, कृमिघ्न असते; नेत्रदाहात (डोळ्यांची जळजळ होण्यावर) तिचे अंजन घालतात. कच्च्या बिया विषारी असतात; परंतु उकळून व भाजून खातात. लाकूड पांढरे, हलके व टिकाऊ असल्याने पालखीचे दांडे, नक्षीकाम, फळ्या, खेळणी, पेट्या, नौका-बांधणी, तराफे, पडाव इत्यादींसाठी उपयुक्त असते. पोहावयास शिकताना याचे लाकूड वापरतात. साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास आणि त्यातील धागे दोऱ्याकरिता वापरतात. फुलांपासून लाल रंग काढतात. हा वृक्ष सुमारे २ मी. उंच वाढल्यापासून फुले येऊ लागतात. याच्या लागवडीमुळे जमीन सुपीक होते. गावाकडे या लाकडाचा मुख्य वापर जळणासाठी करतात.
पांगाऱ्याची मुळं फ़ार खोल जात नाहीत पण जमिनीचा कस सुधारण्यासाठी हे झाड काम करतं. याची केशमुळे हवेतला नत्र वायु शोषुन जमिनीत पुरवतात. समुद्रसपाटीवरच्या गावांमध्ये रस्त्याच्या सुशोभिकरणासाठी, दागिन्यांच्या आधारात या पांगिऱ्याच्या लाकडाचा वापर करतात. गोव्याकडे पांगिऱ्याच्या कोवळ्या पानांची आमटी केली जाते. याच्या फ़ुलांच्या पाकळ्या उकळून नैसर्गिक लाल रंग केला जातो. पांगारा लावायलाही सोप्पा असतो. ह्याची रोपं बियांमधून येतात. बाळ रोपं कुठेही चटकन रुजतात. रोपं मिळाली नाही तर याच्या फ़ांद्यांमधुन फुटवे येतात. त्यातूनही नवीन झाडं तयार होतात. शोभेसाठी हे झाड अत्युत्तम.
औषधी उपयोग:
१. ह्याची पाने साल व फुलांचा उपयोग आयुर्वेदामद्धे केला जातो.
२. पानांचा उपयोग भूक वाढविण्या करता व मूत्ररोगावर केला जातो.
३. गाठ व सांध्याच्या समस्यात सुद्धा याचा उपयोग होतो.
४. सालीचा उपयोग यकृताच्या रोगामद्धे व डोळ्याच्या औषधात करतात.
५. फुलांचा उपयोग पित्तदोष व कानांच्या समस्यांत होतो.
६. आदिवासी लोक ह्याच्या पानाच्या रसात कपडा भिजवून त्याचा शेक सांध्यांना देतात.
७. लिंबाच्या रसात ह्याच्या बियांचे चूर्ण एक आठवडा जखमेवर लावतात.
८. कोकणात ताज्या पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात
९. आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी) आणि दुग्धवर्धक असतात.
मराठी साहित्यातील पांगारा:
पांगारा म्हणजे बोलायचे काम नाही! एकदा फुलला की, बहराशिवाय झाडावर काही नसते. फुललेल्या पळसाला काही पाने लगडलेली दिसतात. पांगारा आणि काटेसावर यांच्या बाबतीत बहर म्हणजे बहर! पण काटेसावरीपेक्षा पांगाऱ्याचा बहर जास्त गडद असतो. पांगारा म्हणजे केवळ लाल रंगाची एक अपूर्व दंगल असते. लाल रंगात चमकदार भगवा मिसळला की, जी मजा येईल ती या फुलांवर पसरलेली असते.
उतरत्या उन्हात पांगारा जणू चमकतो आहे असे वाटते. आपण तळवा पसरला आणि त्यावर जर लाल-भगव्या रंगाच्या ज्योती उमलून आल्या, तर जसे दिसेल तशी पांगाऱ्याची फुले दिसतात! एका रांगेत पाच-पाच फुले. तपकिरी, सोनेरी आणि लाल रंगाच्या कळ्यांमधून ती उमलून येतात. फुलांइतकीच या फुलांची बाह्यदले सुंदर असतात. पण, ती बघणाऱ्याच्या पटकन लक्षात येत नाहीत, कारण फुलांच्या ज्योती म्हणजे सौंदर्याची एक दंगल असते, आणि हे बाह्यदलांचे सौंदर्य अतिशय शालीन आणि मृदू असते. तपकिरी, सोनेरी आणि लाल छटा असलेली ही बाह्यदले एखाद्या सुंदर निरंजनासारखी असतात आणि त्यातून या लाल भगव्या ज्योती उमलून आलेल्या असतात.
पाच फुलांची एक रांग उमलून आली की, पुढच्या कळ्यांची रांग वर येऊ लागते. आधीची फुले पक्व होऊन गळून पडतात आणि त्यांना नाजूक गवारीसारख्या शेंगा लागतात. तोपर्यंत पुढची रांग रसरसून उठते. एकूण रचना फुलांची वेणी करतात तशी असते. अर्धचंद्राकार. एकूण लाल तेज बघता अर्धसूर्याकार म्हणावे लागेल.
पांगाऱ्याच्या फुलण्याला ‘फुलणे’ हा शब्द कितीही सुंदर असला तरी जरा सौम्य ठरेल. पांगाऱ्याची आतषबाजी असते. संध्याकाळचे सोनेरी ऊन पांगाऱ्याच्या तपकिरी आणि पांढूर फांद्यांवर पडलेले असते. संपूर्ण झाडाला एक सोनेरी छटा आलेली असते. सोनेरी झाड आपल्या सर्वांगावर चमकदार ज्योतींचे तुरे लेवून उभे असते. डोळ्याचे पारणे फिटेल अशी ही आतषबाजी असते.
रेनर मारिया रिल्केने लिहिले आहे -
सगळेच फुलते आहे भन्नाट बेपर्वाईने, फुलांवर सजवले गेले असते आवाज जर रंगांऐवजी, तर रात्रीच्या हृदयातून ऐकू आला असता बेफाम कोलाहल!
रात्री उडणारी फुलांच्या उमलण्याची धांदल ही कविता वाचली की, डोळ्यासमोर येते. रिल्के हा थोर कवी आहे तो त्याच्या या दृष्टीमुळेच!
किती लगबगीने लाल रंग भगव्या रंगात मिसळला जात असेल. त्यावर अद्भुत चमक कशी जाऊन बसत असेल. स्टेजवर एंट्री घेण्याच्या वेळी एखाद्या सुंदर आणि सेन्सिटिव्ह नटीची धांदल उडते, ती या वेळी माझ्या डोळ्यासमोर येते. तिचे ते ग्रीन रूममधील मेकअप करणे, तिची ते वेशभूषा सावरणे, तिचे ते संवाद आठवणे, तिचे ते आपली एंट्री येण्याची वाट पाहणे. हा सर्व गोंधळ सुरू राहतो आणि मग एंट्रीची वेळ आली की, सगळी धांदल सावरून ती स्टेजवर अवतरते. सगळ्यांना बेभान करते ती आपल्या रूपाने, ‘ग्रेस’ कवीने लिहले आहे.
रिल्के वाचला की वाटते- सूर्य उगवला की पांगाऱ्याच्या कळ्या रात्रीची सौंदर्यरचनेची धांदल बाजूला ठेवून अशाच अवतरत असतील विश्वाच्या या स्टेजवर लाल-भगव्या चमकदार ग्रेसने उत्फुल्ल होऊन! पांगाऱ्याच्या या सगळ्या आतषबाजीच्या मागील धांदल-नाट्य समजून घ्यायला रिल्केच पाहिजे. येरागबाळ्याचे काम नाही हे! संध्याकाळी पक्षी किलबिलाट करत असतात. नटीच्या अभिनयाला जशी संगीताची पार्श्वभूमी असावी लागते, तशी पांगाऱ्याच्या या आतषबाजीला पक्ष्यांच्या किलबिलाटाची पार्श्वभूमी असावी लागते. आतषबाज पांगरा, सोनेरी ऊन आणि किलबिलाट करणारे पक्षी... संपूर्ण टेकडी आनंदून गेलेली असते. का नाही घेणार?
यौवन, वसंत आणि सौंदर्य एक आदिम त्रिकुट आहे! पांगाऱ्याची फुले कित्येकांना एखाद्या सुंदर स्त्रीच्या ओठांसारखी दिसतात. योगी अरविंद यांच्या ‘नाईट बाय द सी’ या कवितेतल्या ओळी अशा वेळी आठवतात. पुढे मोठे योगी झालेले श्री अरविंद, फुले, यौवन, स्त्रीत्व, वसंत आणि प्रेम यांना किती सहजपणे एकत्र आणतात हे बघण्यासारखे आहे!
या फुलांच्या मनमुराद सोहळ्यात, या मुग्ध समयी,
प्रेमाच्या उगवत्या सूर्यप्रकाशात लाजून चूर होतात मुली;
ज्यांच्या गालांवर चमकत राहते लज्जेची लाली,
ज्यांचे ओठ आहेत लाल माणकांसारखे आणि
ज्यांच्या ओठात भरून राहिला आहे काठोकाठ.
मध वसंताच्या यौवनाचा.
या सौंदर्याच्या सानिध्यात राहिले की, मन प्रसन्न होते, शांत होते. अशा वेळी जाणवते की, आपण शहरात राहून कशा कशाला मुकलो आहे. सौंदर्य नसेल तर आयुष्यात बाकी म्हणून फार कमी उरते. उरते ते बेगडी स्थैर्य आणि त्यातून येणारे बेगडी समाधान!यौवन, वसंत आणि प्रेम हे सर्व गोड वादळे तयार करतात. ही वादळांची नशा काढून टाकली आणि सौंदर्याकडे एक तत्त्व म्हणून पाहिले तर सौंदर्य आपल्याला नशेकडून शांततेकडे नेते.
सौंदर्याचे, फुलांचे, माणसाचे आणि पृथ्वीचे नाते जॉन कीट्सने त्याच्या ‘एन्डिमियन’ या कवितेत फार सुंदर सांगितलेले आहे -
‘A thing of beauty is a joy for ever:
उन्हातान्हात पोळून आणि तावून सुलाखून निघालेला पळस एखाद्या संसारात पोळलेल्या संतासारखा वाटतो. कारण शिशिराने या झाडांची झाडाझडती घेतलेली असते. त्यामुळे पिकली पाने त्याला सोडून जातात व अश्रू ओघळावे तशी पानगळ सुरू होते. पळसाच्या पानसंभाराला अवकळा येते आणि पळस जणू काय जगापासून निवृत्त होतो.
हिवाळयात घुसमटलेली झाडे उन्हाळयाची चाहूल लागताच मोकळा श्वास घेतात आणि मग तो श्वास लाल, गुलाबी, हिरव्या पालवीच्या रूपाने बाहेर येतो. या हिरव्यागार श्वासामुळे झाडे ताजी व टवटवीत होतात. त्यांच्यामधून एक प्रकारचा जिवंतपणा सळसळत असतो. अशा झाडांपैकी आपल्याच पानांच्या टाळ मृदंगाच्या तालात दंग असतो. तो सालस पळस! उन्हातान्हात पोळून आणि तावून सुलाखून निघालेला पळस एखाद्या संसारात पोळलेल्या संतासारखा वाटतो. पळसाच्या पानसंभाराला अवकळा येते आणि पळस जणू काय जगापासून निवृत्त होतो.
असा निष्पर्ण वृक्ष संसार त्यागाची तयारी करत असतानाच त्याच्या हिरवट काळया कळया लोंबतात व त्या कळयातून आपला विचार बदलून पळस हळूहळू पालवीबरोबर भगव्या रंगाच्या कळया नि फुले जेव्हा धारण करतो त्यावेळी हा सालस पळस जणू काय खांद्यावर भगव्या पताका घेऊन कुठे तरी वारीला निघालेला वाटतो.
कोकणात जसे वा-याने झपाटलेले माड सागरकिनारी आपले हिरवे रुमाल डोक्याला बांधत जणू काय मक्केस निघाल्यासारखे ओळीने सागर किना-यावर उभे असतात तसाच हा पळस आपल्या फुलांच्या भगव्या पताका घेऊन पंढरीस निघाल्यासारखा वाटतो.
नाशिकच्या आदिवासी किंवा खंडाळयाच्या पळस दरीत हा भगवाधारी आपल्याला दर्शन देतो. आदिवासी पोरं ही पळस फुलांचा रंग तयार करून होळीला रंग खेळतात. काही तर भाजीसाठी या फुलांचा वापर करतात. पण यावेळी पळसावरील कावळे मात्र पोट भरून फुलांचा रस अमृतासारखा पित असतात. कोण म्हणतो कावळे घाणच खातात?
उन्हाळयात झाडे गरम झाली की त्यांची डोकी भडकतात. अशाच झाडांपैकी पांगारा हे झाड फारच भडक आहे. हे पांगारकर वसंत ऋतूची चाहूल लागताच गरम होऊ लागतात, त्यामुळे हिवाळयात यांना पालवी फुटत नाही तर लाल फुलंच फुटतात. उन्हाळयात तर पांगारकराचे डोके भडकते आणि त्यांच्या फांद्यातून लालभडक ज्वाळा निघाव्यात अशी लालभडक फुले उमटतात. त्यामुळे हिवाळयात शिशिर ऋतूत हातापायावर आलेले काटे उन्हाळयातही बोचत असतात. त्यामुळे त्याच्या जवळ पब्लिक जरा कमीच येतात. पण पांगारकर जेव्हा लालभडक निशाणे खांद्यावर घेऊन काटेरी थाटात उभे राहतात तेव्हा रानात आता क्रांती जवळ आली, असे वाटते.
फुले इतकी लालभडक असतात जणू पांगारकर ज्वाळेसारखा धगधगीत श्वास घेतात. हे जरी खरे असले तरी त्यांची फुलं तेवढीच रसपूर्ण व गोड असतात आणि येथेही कावळे, इतर पक्षी त्यांच्यावर ताव मारतात. पण या पांगारकरांना कसला वंशाचा विधिनिषेध नसतो.
गंधाच्या बाबतीत हा अरसिक असतो इतर क्रांतिकारका सारख्याच पण नुसते लाल झेंडे खांद्यावर घेऊन क्रांती होत नाही. त्यासाठी माणूस अंतरबाह्य बदलायला हवा. नुसता पांगारकरासारखे नुसते लालभडक झेंडे (फुलांचे) घेऊन उपयोगी नाही. पांगारा वसंत ऋतूत फुलला तरी त्यांच्या अंगावर काटे येतात. हे काटे रोमांचाचे नसतात तर ते क्रांतीचे भाले असतात. म्हणूनच म्हणतात,
पांगारा फुलला
लाल लाल बावटा
परि क्रांतीचा काटा
देहावरी!
म्हणूनच पांगाऱ्याला भारतीय पोष्टाच्या तिकिटावर मान मिळाला आहे.
-- डॉ. दिलीप कुलकर्णी.
संदर्भ:
१. मराठी विकिपीडिया
२. श्रीनिवास जोशी Tue, 13 April 2021
३. मिलिंद हळबे यांचे विविध लेख.
४. श्रीकांत इंगळहळीकर यांचे विविध लेख.
५. April 24, 2016 01:30:36 AM dainik prahar
६. गुगल वरील अनेक लेख
महाराष्ट्रामध्ये हा सदाहरित वृक्ष सर्व ठिकाणी आढळतो. परंतु याची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल नाही. मूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र्सपाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते.
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान, नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो.

पृथ्वी वरील अमृत वृक्ष हिरडा:
हिरडा हा पर्णझडी जंगलामध्ये आढळणारा वृक्ष आहे. हा काँब्रेटेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नांव Terminalia chebula आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिण भारतातील राज्यापर्यंत ही प्रजाती मुबलक आढळते. बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य भारत, महाराष्ट्र इ. ठिकाणी ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण प्रांत, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे, विदर्भ इत्यादी ठिकाणी हा वृक्ष नैसर्गिकरीत्या आढळून येतो. हिरडा वृक्ष आजरा, चंदगड, राधानगरी, गगनबाडा, पन्हाळा, शाहुवाडीच्या जंगली भागात दिसतो. उंच डेरेदार वाढणारा हा वृक्ष आहे. नव्याने येणारी पालवी, फांद्या इत्यादी भागांवर मऊ चमकणारे चांदीसारखे केस असतात. नवीन येणारी पालवी बदामी लालसर रंगाची असते. पाने अंडाकृती किंवा काहीशी आंब्याच्या पानांसारखी, एकाआड एक ८-२० सें.मी. आकाराची असतात. पाने थंडीच्या वेळी गळून पडतात. फुले मंद, पांढरट, सुवासिक, देठविरहित असतात, फळे अंडाकृती आकाराची असतात. फळांवर कधी कधी पन्हाळीसारख्या पाच रेषा असतात. कोवळ्या वाळलेल्या फळांस "बाळहिरडा', तर परिपक्व फळास "सुरवारी हिरडा' या नावांनी संबोधले जाते. समुद्र सपाटीपासून २ हजार मी. उंची पर्यंतच्या जमिनीत हिरड्याची झाडे भारतात सर्वत्र आढळतात.
आयुर्वेद व इतर पारंपरिक औषध पद्धतींमध्ये या वनस्पतींचा उपयोग रसायन म्हणून केला जातो. त्रिफळा चूर्णामध्ये आवळा आणि बेहडा या फळांसोबत हिरड्याच्या फळांच्या चूर्णाचा समावेश असतो. फळांमुळे शरीरातील सर्व क्रिया सुधारतात असे शास्त्र सांगते. चूर्ण, आसव, आरिष्ट, काढे, क्वाथ, गुटी, अर्क, मलम, भस्म, घृत इ. औषधे यांपासून बनविली जातात. औषधात व आरोग्य वाढविणाऱ्या द्रव्यात याचे स्थान महत्त्वाचे आहे.
एका लोक कथेनुसार एकदा इंद्र अमृत पीत असतांना त्यातील काही थेंब पृथ्वीवर सांडले. ते थेंब जेथे सांडले तेथे (त्या थेंबातून) हिरड्याची उत्पत्ती झाली.
हरीतकी मनुष्याणां मातेव हितकारणी ।
कदाचित्कुप्यते माता गोदरस्था हरीतकी॥
या वचनात हिरड्याला मातेची उपमा दिलेली आहे. हिरडा मातेसमान प्रेम करणारा आणि हितकारक आहे. आई सुद्धा काहीवेळा आपल्या मुलांवर रागवते परंतु हिरड्याचे सेवन केले असता त्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
तसेच
यस्यां नास्ति माता, तस्य माता हरितकीः
अर्थात - माताविहीन लहान मुलांची माता हिरडा असतो असे एक संस्कृत मधील वचन आहे. त्यावरून याच्या उपयोगाची कल्पना येते.
हिरड्याचे महत्त्व विशारद करणारा आणखीन एक श्लोक-
हरिं हरीतकीं चैव गायत्रींच दिने दिने।
मोक्षरोग्यतपः कामाश्चिन्तयेद भक्षयेज्ज्पेत् ॥
अर्थात-
मोक्षाची इच्छा करणाऱ्याने प्रत्येक दिवशी विष्णूचे चिंतन करावे, आरोग्याची इच्छा करणाऱ्याने प्रत्येक दिवशी हिरड्याचे सेवन करावे व तपाची इच्छा करणाऱ्याने गायत्रीचा जप करावा.
आयुर्वेदात जेवढी म्हणून औषधे सांगितली आहे. तेवढ्या सगळ्या औषधात हिरडा श्रेष्ठ म्हटला आहे. स्वर्गात देवांसाठी साठविलेले अमृत पृथ्वीवर पडले आणि त्याचे हिरडे झाले. खरेच हिरडा अमृत आहे. ह्याच्या नित्य सेवनाने वृध्दत्वपणा जाणवत नाही.
हिरड्याला "हरीतकी" असे म्हणतात. हिरड्याची झाडे २५ ते ३० मी. उंच वाढणारी असतात. झाड झुपकेदार, पसरट व अनेक वर्षे टिकणारे असते. याचे लाकूड अत्यंत कठीण असते. खोडाची उंची ७ ते १० मी. (मध्यम जमीन) २४ ते ३० मी. (सुपीक जमीन) खोडाचे साल करड्या रंगाचे त्यावर असंख्य चीरा असतात. पाने १० ते ३० सें. मी. लांब, टोकदार, पानातील शिरा ६ ते ८ असून समोरा समोर असतात. पाने टोकाशी एकवटलेली असतात. कोवळेपणी पानांवर केस असतात.
फुले - ग्रीष्म ऋतुत येतात रंग पांढरा पिवळसर असतो. ती शाखाग्री व पानांच्या बगलेत असतात. नवीन फुलांना सुवास असतो तर जुन्या फुलांचा वास उग्र असतो.
फळ - लांबी साधारणपणे ३ ते ६ सें. मी. कोवळ्या फळांचा रंग हिरवा तर पिकलेल्या फळांचा रंग पिवळसर धूसर. आकार लंब वर्तुळाकार, प्रत्येक फळात एक बी असते, फळांवरून हिरड्याच्या अनेक जाती ओळखता येतात. बी लांबट आणि कठीण असते.
साधारण १० वर्षे वयाचे झाड झाल्यावर फळे मिळण्यास सुरुवात होते. २ ते २.५ महिन्यांच्या अपरीपक्व फळांना बाळ हिरडे म्हणतात.
फळांच्या रंगावरून हिरड्याच्या सात जाती आहेत,
१) विजया,
२) रोहिणी,
३) पूतना,
४) अमृता,
५) अभया,
६) जीवन्ती
७) चेतकी
बाळ हिरडा – फळात अठळी तयार होण्यापूर्वीच आपोआप गळून पडणारे फळ, याचा औषधात विशेष उपयोग होतो. लहान बालकात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
चांभारी हिरडा – हिरड्याचे थोडे अपरिपक्व फळ म्हणझे चांभारी फळ, उपयोग कातडी कमविण्यासाठी होतो. मोठ्या प्रमाणात निर्यात होतो.
सुरवारी हिरडा – हिरड्याचे पूर्ण पिकलेले फळ म्हणजे सुरवारी, औषधी उपयोग अनेक.
रंगारी हिरडा - याचा उपयोग रंगासाठी होतो.
या वनस्पतीला संस्कृत भाषेत अनेक नावे आहेत -
• हरीतकी - शंकराच्या घरात (हिमालयात) उत्पन्न होणारी, सर्व रोगांचे हरण करते.
• हेमवती, हिमजा - हिमालय पर्वतावर उत्पन्न होणारी.
• अभया - हिरड्याचे नित्य सेवन केल्याने रोगाचे भय राहत नाही.
• कायस्था - शरीर निरोगी, धष्टपुष्ट करणारी.
• पाचनी - पाचन करणारी.
• प्रपथ्या - पवित्र करणारी.
• प्रमथा - रोगांचे समूळ उच्चाटन करणारी.
• श्रेयसी - श्रेष्ठ.
• प्राणदा - जीवन देणारी.
रोपनिर्मिती व लागवड
हिरडा वनस्पतीची रोपेनिर्मितीसाठी परिपक्व फळे गोळा करून सावलीत वाळवावी. उन्हात वाळविलेली फळे कमी उगवणक्षमता दाखवितात, त्यामुळे फळे सावलीतच वाळविणे आवश्यक आहे. चांगल्या वाळलेल्या फळांचा मगज काढून बिया बाजूला करणे आवश्यक असते. यासाठी लाकडी ठोकळा किंवा दगड याने फळाचा मगज काढावा. एका किलोत साधारणतः ४०-८० फळे आणि मगज काढलेल्या ६०-१२० बिया असतात. बियांना रोपवाटिकेत वाफ्यावर पेरण्याआधी कोमट पाण्यात चार-सहा दिवस ठेवून वाफ्यावर पेरणी करावी. दोन बियांतील अंतर पाच सें.मी. व दोन ओळींतील अंतर दहा सें.मी. ठेवावे २१ ते ३० दिवसांत बियाणे उगवते. साठ टक्के उगवण टक्केवारी संस्करण केल्याने आपणास मिळते. उगवलेल्या रोपांना ऊन, पाऊस, कडाक्याची थंडी इ. पासून संरक्षण करणे आवश्यक असते. यासाठी शेडनेटचे आच्छादन करावे लागते. बियाणे जानेवारी- फेब्रुवारीमध्ये मिळाल्यास रोपे जूनपर्यंत तयार होतात. गादीवाफ्यावर बियाणे उगविल्यानंतर ती पिशवीमध्ये टोकून घ्यावीत. दोन ते चार फूट वाढलेली रोपे लागवडीसाठी वापरावीत. काही ठिकाणी कलमे करून या वनस्पतींची लागवड केली जाते.
लागवडीसाठी २ x२ x२ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. दोन झाडांमधील अंतर ४x ४ मीटर आणि दोन ओळींतील अंतर ७x ७ मीटर ठेवून लागवड करावी. शेताच्या बांधावर पूर्व-पश्चिम लागवड केल्यास शेतातील मुख्य पिकाबरोबर या वनस्पतीपासूनही आपणास उत्पन्न मिळू शकते.
फळामध्ये अथ्रोक्यूनान, ग्लुकोसाईड, च्युबेलिनिक ऍसिड, टॅनिक ऍसिड, टारचेबिन, व्हिटॅमिन "सी', च्युबेलीन, गॅलिक ऍसिड ही रासायनिक द्रव्ये असतात. लागवडीनंतर ८ ते १२ वर्षांनी उत्पादन सुरू होते. कलमे तयार करून लागवड केल्यास रोपे लवकर फळे देतात. साधारणतः पंधरा वर्षे वयाचे झाड २०किलो बाळहिरडा किंवा ५० किलो मोठा हिरडा देते.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत निरोगी राहणं हे एक मोठं आव्हानच आहे. निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहारासोबतच काही आयुर्वेदिक आणि घरगूती उपचार तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात. यासाठी एका नैसर्गिक आणि घरगुती औषधाबाबत माहिती देत आहे. ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. हिरडा या औषधी वनस्पतीबाबत तुम्ही सर्वांनी नक्कीच ऐकलं असेल. या नैसर्गिक औषधामध्ये अनेक आजारापणांना दूर ठेवण्याची ताकद असते. आर्युर्वेदात याबाबत अनेक संदर्भ आढळतात. प्राचीन काळापासून हे औषध विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी वापरलं जातं. तुमचा वात, पित्त आणि कफ दोष नियंत्रणात राहण्यास मदत होते. या औषधी वनस्पतीची साल, फळं आणि मुळांचा औषधाप्रमाणे वापर केला जातो. हिरडाचे फळ पिकल्यावर त्याचा हिरवेपणा संपून ते काळसर दिसू लागते. मात्र हिरडा औषधासाठी वापर करण्यापूर्वी या वनस्पतीविषयी सारं काही जाणून घेणं गरजेचं आहे. कारण हिरडा जसा आरोग्यदायी आहे तसंच काही वेळा त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. म्हणूनच हिरड्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या. हिरडा या वनस्पतीमध्ये अनेक औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात. हिरडा आरोग्यासाठी अतिशय पोषक असतं. यामध्ये व्हिटॅमिन्स सी आणि पोषक घटक असतात. म्हणूनच जर तुमच्या शरीरात व्हिटॅमीन सीची कमतरता असेल तर हिरडा खाण्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
हिरड्याचे औषधी गुणधर्म:
हिरड्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यासोबत तुम्ही अनेक आजारपणांना दूर करण्यासाठी हिरड्याचा वापर करू शकता. तज्ञ्जांच्या सल्लानूसार तुम्ही काही आजारपणांवर हिरडाचा वापर करता येतो. हिरड्यातील औषधी गुणधर्मांमुळे अनेक आरोग्य समस्या दूर ठेवता येतात.यासाठीच खाली दिलेल्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी हिरड्याचा वापर करा.
लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की ही एक अतिशय प्रसिद्ध कायाकल्पिक औषधी वनस्पती आहे. या झाडाची फळे, मुळे आणि साल आयुर्वेदिक औषधी तयार करण्यासाठी वापरतात. हिरड्यामध्ये मीठ वगळता पाच रस म्हणजेच गोड, तिखट, कडू, तुरट आणि आंबट सापडतात. या औषधामध्ये खनिज, जीवनसत्व, प्रथिने, जीवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ व प्रतिजैविक गुणधर्म आहेत. याचे बिया असलेले फळ खाल्ले जाऊ शकते. हिरड्या चे इतर फायदे जाणून घ्या.
१. आजकालच्या सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आणि प्रदूषणामुळे तुम्हाला सतत सर्दी, खोकला आणि कफाचा त्रास होतो. मात्र या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्ही हरड वापरू शकता. कारण तुमच्या शरीरातील कफदोष संतुलित राहण्यास मदत होते. यासाठी मधात हिरड्याची पावडर मिसळून त्याचे एक चाटण तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी हे चाटण घ्या ज्यामुळे रात्री तुम्हाला निवांत झोप लागेल. नियमित हा उपचार केल्यामुळे हळूहळू तुमचा खोकला अथवा सर्दी कमी होईल. हिरड्यामध्ये तुमचे शरीर चांगल्या पद्धतीने डिटॉक्स होण्यास मदत होते. ज्यामुळे तुमचे पोट साफ होते आणि आतड्यांना आराम मिळतो. अनेक आजारपणं आपोआप कमी होतात. याशिवाय तुमचे वजन देखील संतुलित राहते. त्यामुळे जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर हिरडा तुमच्या फायद्याची वनस्पती आहे.
२. कधी कधी तेलकट पदार्थ, हवामानातील प्रदूषण अथवा दूषित पाण्यामुळे तुम्हाला घशाचे इनफेक्शन होते. ज्यामुळे घसा बसणे अथवा घसा खवखवण्याचा त्रास जाणवू लागतो. जर तुम्हाला वारंवार असा त्रास होत असेल तर तुम्ही हिरड्याच्या पाण्याने गुळण्या करू शकता.
३. मायग्रेनचा त्रास असेल तर जीवन जगणं अतिशय कठीण जातं. कारण या आजारपणात तीव्र डोकेदुखीला सामोरं जावलं जागतं. जर तुम्हाला सतत मायग्रेनचा त्रास होत असेल तर तुम्ही तो दूर करण्यासाठी हिरड्याचा वापर करू शकता. यासाठी कोमट पाण्यातून हिरड्याची पावडर घ्या आणि डोकेदुखी कमी करा.
४. मुळव्याध ही अशी एक समस्या आहे. ज्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. मुळव्याधीमुळे पोट स्वच्छ होत नाही. पोट स्वच्छ न झाल्यामुळे शौचाला जाणं आणखी त्रासदायक होतं. मात्र जर तुमच्या घरी हिरड्याची पावडर असेल तर काळजी करण्याची मुळीच गरज नाही. कारण तुम्ही पाण्यात हिरड्याचे फळ उकळून ते पाणी घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होईल आणि मुळव्याधीचा त्रास कमी होईल.
५. जर तुम्हाला युरीनरी विकार असतील तर तुमच्यासाठी हिरडा एक उपयुक्त औषधी आहे. युरीनला गेल्यावर जळजळ होणे, युरीनचे प्रमाण कमी असणे अथवा सतत युरीन इनफेक्शन होणे असे त्रास होत असतील तर हिरड्याचा वापर तुम्ही करू शकता. यासाठी मधातून हिरड्याची पावडर घातलेले चाटण दिवसभरात दोन वेळा घ्या.
६. जखमा बऱ्या करण्यासाठी अथवा सूज कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर करू शकता. कारण हिरडा तुमच्या शरीरातील सूजेला कमी करून शरीराचा दाह कमी करण्यास मदत करतो. यासाठी जखम अथवा सूज कमी करण्ययासाठी हिरडा कोमट पाण्यातून पिण्याचा सल्ला दिला जातो. हिरडा आणि सेंद्रिय गूळापासून तयार केलेले लाडू खाण्यामुळे देखील शरीराचा दाह कमी होतो आणि जखमा बऱ्या होतात.
७. ज्यांना बद्धकोष्ठताचा त्रास होतो त्यांना हिरडा वरदान ठरू शकतं. संशोधनानुसार हिरड्यामधील औषधी गुणधर्मांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकतो. यासाठी तज्ञ हिरड्याचा कच्च्या फळांचा गर मीठासोबत खावा. दालचिनीसोबत हिरड्याचे चुर्ण घेण्यामुळे देखील तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. ज्यामुळे शरीरातील आतड्यांची शुद्धी होते.
८. आईचे दुध पिणाऱ्या तान्हा बाळांना बऱ्याचदा पोट दुखीचा त्रास होतो. पोटात गॅस झाल्यामुळे ही लहान मुलं रडतात. लहान असल्यामुळे ती बोलून त्यांचं दुखणं सांगूही शकत नाही. त्यांच्या रडण्यातून त्याच्या आईला आणि डॉक्टरांना त्याची ही समस्या समजते. मात्र बाळघुटीतील हिरड्याची मात्रा दिल्यामुळे बाळाच्या पोटातील गॅस कमी होऊ शकतो. मात्र हे चाटण देण्यापूर्वी बालरोग तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्या.
९. हिरड्यामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखी अथवा पायदुखीपासून सुटका मिळू शकते. बऱ्याचदा सांधेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही एखादी पेनकिलर घेता मात्र त्यामुळे ते दुखणे तात्पुरते थांबते आणि पुन्हा थोड्यावेळाने सुरू होते. मात्र सांधेदुखीचा त्रास मुळापासून कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर नक्कीच करू शकता.
१०. या औषधामध्ये खनिज, जीवनसत्व, प्रथिने, जीवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ व प्रतिजैविक गुणधर्म आहेत. याचे बिया असलेले फळ खाल्ले जाऊ शकते.
१२ लैंगिक समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात हिरड्याचा वापर केला जातो. लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी, एका महिन्यासाठी दररोज 1-2 ग्रॅम हिरड्याची पावडर खा. अकाली स्खलन होण्यावर याचा उपचार करणे फायदेशीर आहे. हिरड्याचा वापराबद्दल हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. की जर आपण जास्त काळासाठी त्याचा वापर केला, तर याचे गरम आणि तुरट गुणधर्मांमुळे लैंगिक शक्तीचा अभाव देखील होऊ शकतो.
हिरडा सेवनाचे साईड इफ्फेक्टस
हिरडा आरोग्यासाठी उत्तम आहे हे तर आपण जाणतोच मात्र हिरड्याचा वापर काही वेळा धोकादायकही ठरू शकतो. कारण हिरडा ही एक उष्ण प्रवृत्तीची वनस्पती आहे. म्हणूनच गरोदरपणात हिरड्याचा वापर मुळीच करू नका. त्याचप्रमाणे तान्हे बाळ आणि पाच वर्षांच्या खालील मुलांना हिरडा अतीप्रमाणात देणे धोकादायक ठरू शकते. यासाठीच स्तनपान देणाऱ्या मातेनेही हिरड्याचा वापर आहारात करू नये.
हिरडा व पर्यावरण
हिरडा या झाडापासून वजनाने जड व चांगल्या प्रतीचा कोळसा निघतो व हाच गुणधर्म या वृक्षाचा कर्दनकाळ ठरला आहे. महाराष्ट्रातील भोर तालुक्यात हिरडेशी भागात त्या झाडाची तोड विशेष करण्यात येते व त्याला बाहेरून भरपूर मागणी असल्याने दलाल लोक रोख पैशाचे आमिष दाखवून ‘अधिक कोळसा पिकवा’ या प्रकारची मोहीम सुरू करून त्यासंबंधी उत्तेजन व कारवाया सुरू करतात. याच मोहिमेची साथ शेजारील प्रदेश, विशेषत: भाटघर धरणावरील वेळवंडी खोरे यात पसरू पाहत आहे. भोर संस्थानात त्या काळात वावडुंग, किंजळ, ऐन, येलूर वगैरे वनस्पती तोडण्यास बंदी असे. हिरडा झाडाची तर फांदीदेखील खासगी वा सरकारी रानांतील तोडू देत नसत. याबद्दल लोकांना शिक्षाही होत असत.
आज या भागांत अगदी वेगळी परिस्थिती दिसत आहे. हल्ली जरी कोणीही पेठेच्या रस्त्यावरून निरीक्षण करेल अगर लोकांची बोलणी ऐकेल तर हिरडीचे व्यवहाराऐवजी कोळशाची आवक व त्यासंबंधीचे सौदे कानावर ऐकू येतील. जवळजवळ सर्व खासगी राने तुटत चालली असून, पुणे शहराच्या आसपास जशा रूक्ष टेकडय़ा दिसतात, तसा हिडरेशी गावासभोवतालचा प्रदेश दिसण्यास सुरुवात झाली आहे. हिरडी, किंजळ, ऐन या झाडांची सरसकट तोड सुरू असून त्याचा कोळसा करण्याच्या भट्टय़ा शेताशेतावर रचल्या जात आहेत. हिरडा गोळा करण्याचे उत्पन्न यावरून सोन्याचे अंडे देणाऱ्या हंसी पक्ष्याची आठवण होते. हे पैशाच्या भ्रमाने धुंद झालेले लोक हंसी पक्ष्यालाच मारत आहेत. सरकारी रानांतील झाडे तोडण्यास जरी बंदी असली तरी एकदा खासगी रानं तुटली की लोकांची वखवखलेली दृष्टी शेजारील जंगलावर जाणार व त्याचाही ऱ्हास होण्याचा धोका वाढू लागला आहे. जंगल खाते कितीही तत्पर असले तरी सर्व जनताच जर भ्रम पडून काही गुन्हे करण्यास प्रवृत्त होऊ लागली आणि खात्यातील लोकांना त्यांच्यातच चांगल्या रीतीने राहावयाचे असल्याने एकंदर सर्व प्रकार नियंत्रणाखाली आणणे फार जड जाणार आहे.
कोळसा तयार करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की बऱ्याच शेतांतून कोळशाचे ढीग व तोडलेली लाकडे दिसतील. जंगलातून गावाकडे येणाऱ्या पायवाटेवर ठिकठिकाणी बांधाच्या कडेवर कोळशाची पोती आढळून येतील. अगदी डोंगरकपारीतून हे भोळे, अशिक्षित आदिवासी डोक्यावरून कोळशाची पोती घेऊन १० ते १५ मैल वाटचाल करून येतात. येथे रानावनातून प्रत्येक जण कोळसा करण्याचे उद्योगात असल्याचे आढळून येईल. लोकांची वृत्ती अस्थिर बनत चालली आहे. नवीन वृक्ष लावण्याचे ऐवजी चांगली जोमदार झाडे कशी तोडता येतील, सरकारी रानातील झाडे वठलेले (सुकलेले) वृक्ष कसे बनतील, यासंबंधीच्या कारवाया आत्तापासूनच काही उपद्व्यापी लोकांनी सुरू केल्यास नवल नाही. पूर्वी येथे धान्याची आवक क्वचितच होई; परंतु आता पाहिले तर हजारो रुपयांच्या ज्वारीची आयात करावी लागते. दिवसेंदिवस हिरडा पाठविण्याचे प्रमाण घसरत चालले आहे व कोळशाचे प्रमाण अनेक पटींनी वाढलेले दिसून येईल. येथील सुज्ञ लोकांस विचारले असता त्यांनाही पटते व कळते, की जंगल नाही की पाऊस कमी पडतो, जमिनीची धूप वाढते व त्याचेच शेवटी दुष्काळात रूपांतर होते. हे सर्व माहीत असूनदेखील या भोळ्या, परंतु आता पैशाच्या भ्रमात पडलेल्या लोकांस कसे पटवून द्यावे याचा त्यांस विचार पडला आहे, आणि त्यासंबंधी निर्भीड विचार बोलून दाखविण्यास ही मंडळी तयार नाहीत हे खेदाने म्हणावे लागते. एकंदरीत पैशाच्या भ्रमाने पछाडलेले लोक स्वत:चे हित न जाणता काही लोभी, आपमतलबी लोकांच्या सल्ल्याने विनाशाकडे खेचले जात आहेत, हे निश्चित. हीच जर स्थिती अशीच काही वर्षे चालू राहिली तर एक अत्यंत दुष्काळी प्रदेश म्हणून या भागाची गणना करावी लागेल.
अजूनही या प्रदेशाच्या काही भागांत अगदी अल्प प्रमाणात लोकांच्या झाडतोडी मोहिमेपासून वाचलेला भाग आढळतो. त्यास येथील लोक ‘रहाट’ असे म्हणतात.
कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा हिरडा वृक्षाचे प्रमाण जिल्ह्यातील जंगलात विरळ झाले आहे. शासनाच्या शतकोटी वृक्ष योजनेत तसेच स्थानिक पातळीवर हिरड्याचे संरक्षण अन् संवर्धन केले तर हिरड्याची झाडे अधिक प्रमाणात दिसू शकतील; मात्र एकेकाळी हिरड्याचे प्रमाण जंगलांत खूप होता मात्र सध्या ही स्थिती नाही. हिरड्यामध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त असल्याने चर्म उद्योगात तसेच आयुर्वेदिक औषधांत मोठ्या प्रमाणात वापर होतो. घर बांधणीत लाकूड वापरले जाते. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील जंगली भागांमधून रस्ते केले गेले. रस्त्याशेजारी असणारी हिरड्याची झाडे तोडली गेली. गवताळ कुरणे, शेताच्या बांधावर, शहरात, गावभागात कोणी हिरड्याचे झाड लावत नाही.
हिरडा फळे गोळा करावयाचा कालावधी ३-४ महिने चालतो. त्या काळात आदिवासी लोकांना चांगला रोजगार मिळतो. अशा हा बहुगुणी, बहुउपयोगी व औषधी गुणधर्मानी युक्त अशा हिरडा वृक्षाचे संरक्षण सर्वानी केले पाहिज
संदर्भ:
दैनिक सकाळ २४ नोव्हेंबर २०२१
मराठी विकिपीडिया
महाऔषधी हिरडा (२००६) डॉ. अंकुश जाधव, मनोविकास प्रकाशन, मुंबई
मराठी विश्वकोश (प्रथम आवृत्ती)
गुगल वरील बरेच लेख
सर्व फोटो गुगल वरून साभार
मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय उपकरण वापरले जाते त्याला ग्लुकोज मीटर असे म्हणतात.
Copyright © 2025 | Marathisrushti